परवा रात्री पंतप्रधान मोदींनी दूरदर्शनवरून कोरोनो व्हायरस संबंधीत देशाला उद्देशून भाषण केले. त्या भाषणात पंतप्रधानांनी देशाचे नागरिक म्हणून आपण काय खबरदारी घ्यावी हे सांगितले. देशातील डाॅक्टर्स, हाॅस्पीटल्स व तेथील स्टाफ, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारे, सर्वत्र डोळ्यात तेल घालून काम करणारे पोलीस यंत्रणादि सुरक्षा व्यवस्थतेतील कर्मचारी मंडळी गेले काही दिवस अहोरात्र मेहनत करीत आहेत त्यांचे कौतूक करून सामान्यजनांनी त्यांच्या बद्दल जाहिररीत्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा सल्ला दिला. येत्या रविवारी सर्व देशवासीयांनी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत घराच्या बाहेर न पडता एक प्रकारे स्वयंघोषित कर्फ्यू मानण्याचे आवाहन ही पंतप्रधानांनी केले आहे. आपण लोकशाही राज्यप्रणाली स्विकारली असल्यामूळे पंतप्रधानांनी जे आवाहन केले आहे त्याला सकारात्मक प्रतिसाद देणे आपले कर्तव्य आहे. देश जेव्हा जेव्हा संकटात असतो त्या त्या वेळी एक समाज म्हणून आपण प्रशासनाला चांगले सहकार्य करीत आलो आहोत. त्यामूळे कोरोनो व्हायरसने निर्माण केलेल्या संकटाला सुद्धा आपण एकजूटीने सामना करणार आहोत या बद्दल कोणाच्या ही मनात शंका नसेल. प्रश्न हा आहे की समाज म्हणून आपण जी एकजूट दाखविणार आहोत तिचे स्वरूप काय असेल हा आहे.
सामान्यतः पावसाने कहर केला असेल आणि अचानकपणे समुद्राला आलेल्या भरतीमूळे शहाराच्या सर्व भागात पाणी तुंबले असेल तर अनेक प्रवाशांना जवळपासचे समाजबांधव आपल्या घरात आश्रय देतात. नदीला पुर आला असेल इतर आसपासच्या जिल्ह्यातील लोक मदत करतात. भुंकपासारखी आपत्ती असो वा मोठा रेल्वे अपघात असो वा दशहतवाद्यांनी केलेल्या बाॅम्ब हल्यातील जखमी झालेले समाजबांधवाच्या मदतीला समाज म्हणून आपण एकजूटीने धावत जातो. शहर व ग्रामीण भागात आजही आगीत होरपळलेल्या वा अचानक आजारी पडलेल्या समाजबांधवासाठी आपण शेजारधर्म पाळून मदत करतो. भले आपण चंगळवादी दुनियेत राहातो आणि त्यात थोडेसे वाहात जात असलो तरी आपली संवेदनशिलता शाबूत आहे याबाबत दुमत नाही. पण कोरोना व्हायरसने निर्माण केलेल्या दशहतीला सामोरे जाताना तीच संवेदनशिलता, तोच भावूकपणा काबूत ठेवावा लागेल. आपल्याला सध्याच्या कोरोना व्हायरसशी जी लढत द्यावयाची आहे, ती जितके शक्य होईल तितकी आपल्या घरात बसूनच द्यावयाची आहे. वेळ पडल्यास शासकीय कर्मचारी व डाॅक्टर मंडळींना सहकार्य करण्यासाठी सरकारने आपल्यापैकी काही जणांना प्रत्यक्ष रणागंणात उतरावयास सांगितले तर तशी तयारी सुद्धा ठेवावी लागेल. समाज म्हणून एकजूटीने बाहेर पडून प्रत्यक्ष मदतीला धावण्याची पारंपारिक पद्धत येथे दुरोपयोगी ठरेल हे आपण सारे जाणत आहोत. त्यासाठी आपल्याला कमालीचा संयम पाळावा लागणार आहे. लग्न, साखरपुडा, वाढदिवस, यात्रा, धार्मिक सण, इत्यादी सारे कार्यक्रम रद्द करावे लागतील. कोरोनाची लागण आणि त्यातून होणार्या प्रादुर्भावाचे स्वरूप आपल्याला एव्हाना ठाऊक झाले आहे. आपला देश कोरोनाने केलेल्या आक्रमणाच्या दुसर्या स्टेजवर आहे. म्हणून आपल्याला प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावयाचे आहे. त्यासाठी जितकं विलग राहाता येईल तितका प्रयत्न करावयाचा आहे. तसा प्रयत्न करणे म्हणजे एक प्रकारे आपल्या हातून देशसेवा घडते असेच मानावे.
हा प्रयत्न करीत असताना पहीला अनुभव येईल तो म्हणजे आपले लहरी मन स्थिर करणे जड जाईल. कारण संपुर्ण दिनचर्या बदलावयाची आहे. मनात अनेक विचाराचं काहूर माजलेलं असणार . काम-धंदा बुडाला, आर्थिक नुकसान होणार, रजा कापली जाईल, आपलं कोणी नातेवाईक परदेशात असेल त्यासंबंधी चिंतेने त्रस्त होणार, इत्यादी अडथळे निर्माण होणार. त्यासाठी योगाभ्यास करावा लागेल. ते जमत नसेल तर थोडा वेळ इष्ट देवतेचा जप करावा. म्हणजे मन स्थिर होईल. मन स्थिर झालं की सृजनतेकडे वळेल. सृजनता ही एक अशी शक्ती आहे की ती आसक्ती आणि विरक्ती मधील परमावधी गाठण्यास आपल्या अवयवांना मदत करते. भले आपण सामान्यजन असू पण 'ज्याची वंदावी पाऊले अशा ईश्वरनिष्ठांची ही भूमी आहे ' असा अभिमान आपल्यात निर्माण होऊ शकतो. त्यातूनच आपल्यावर आलेल्या जबाबदारीचे भान येईल. हाॅटेल्स, माॅल्स, पर्यटन स्थळे, चित्रपटगृहे, बंद झाल्याने आपल्या मनोरंजनाच्या संधी हुकतील. ते ही फार तर एक दोन आठवडे. पण त्या आपल्या प्राथमिक गरजा नव्हेत. आजच्या या व्यापारी व स्पर्धेच्या युगात आर्थिक मंदीचे स्वरूप प्राणावर बेतण्या इतके मारक ठरते असे मला वाटत नाही. आपण स्वतःहून वाढविलेल्या चंगळवादाला लगाम घालण्याची एक इष्ट आपत्ती म्हणजे कोरोना व्हायरसची दशहत समजू या. शेवटी चंगळवाद म्हणजे विकास नाही. चंगळवाद म्हणजे आधुनिकता नाही, आधुनिकता म्हणजे आपल्या संस्कृतीतील मूल्यें फेकून देणे नव्हेच. शेवटी ' Econimics is a science of human bhevaiour between scare means and unlimited needs ' असेच अर्थशास्त्राचे आधुनिक काळातील जनक ॲडाम स्मिथने म्हटले आहे. उत्पन्न वजा खर्च म्हणजे बचत नव्हे. उत्पन्न वजा बचत म्हणजे खर्च करणे हे आपल्या जीवनाचे सुत्र आहे. आपल्या संस्कृतीत अर्थशास्त्राची व्याख्या अनादि काळापासून अशीच मांडलेली आहे. असेच कौटील्याने मांडले आहे. हेच महात्मा गांधीजी, जनसंघाचे नेते (म्हणजे आजच्या भाजपाचे) स्वर्गीय पंडीत दिनदयाळ उपाध्याय, व समाजवादी नेते स्वर्गीय डाॅक्टर राम मनोहर लोहीयांनी मांडले आहे. ' खर्च कमी करा, काही दिवस कळ सोसा व आपला जीव वाचवा ' हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावयाचे आहे. देशावर दुष्काळाचे संकट आले असता स्वतःहून एक दिवस उपवास स्विकारलेल्या सर्वात सनदशीर पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्रींचा हा देश आहे. महाभारतकालीन विदुराचा हा देश आहे. मध्ययुगीन काळातील आर्य चाणक्याचा हा देश आहे, याचे स्मरण आपण करावे. संपूर्ण मानवजातीवर आलेले हे संकट टाळावयाचे असेल तर पंधरा दिवसासाठी आपण स्वतःहून आपल्याच घरात स्विकारलेला कारावास व थोडाफार उपवास समजावा. कदाचीत आपल्याला हे आव्हान स्विकारणे कठीण वाटेल पण अशक्य नाही.
शेवटी पंधरा दिवसासाठी चांगल्या सवयी स्विकारयला मन तयार झाले की आपोआप कोरोनोचा पाडाव झाल्यानंतर एक सुजाण नागरिकत्वाच्या ज्या काही कसोट्या आहेत त्या आपण पार केल्याचा आपल्याला आपलाच अभिमान वाटेल. आपणच आपले प्राण वाचविल्याचा एक स्वर्गीय आनंद अनुभवयास येऊ शकेल. फिजूल खर्च टाळणे, वाईट सवयींवर बंधन घालणे, सार्वजनिक व वैयक्तीक स्वच्छतेचे भान येणे, अशा अनेक चांगल्या गोष्टीं आपल्या अंगवळणी पडतील. आपल्यापेक्षा खालच्या स्तरावरील राहणीमान असलेल्या आपल्या समाजबांधवांकडे पाहावे. त्यांना आपल्यापेक्षा खडतर तपस्या करावयाची आहे. ते सुद्धा कोरोनशी लढत देणार आहेत. त्यांना आपण आपले मानू या. त्यातूनच एक सशक्त समाज म्हणून आपण नवी उभारी घेण्यासाठी सज्ज होऊ शकतो. प्रत्येक घटना राजकीय विचारसरणीच्या चष्म्यातून पाहावयाची जी सवय आपल्याला लागली आहे, तिचे आपोआप उच्चाटन होईल. राजकीय पक्ष निर्माण होतील व जातील; नेते येतील व जातील; सेलेब्रटी होतील व जातील ; पण समाज हाच आपल्या सर्वांचा आधार आहे. आपला देशच आपला आधार आहे. आणि हो , शेवटी धरणीमाता म्हणजे पृथ्वीवरच आपल्याला जगावयाचे आहे व धरणीमातेत विलीन व्हावयाचे आहे हेच जीवनाचे शाश्वत सत्य आहे. दोन आणखीन शाश्वत सिद्धांत कुठल्यातरी इंग्रजी मासिकातून माझ्या वाचण्यात आले आहेत, त्यांची मला वेळोवेळी आठवण होत असते ते इथे मांडतो आहे, आणि नंतर थांबतो. There are some eternal principles which never change even the time changes. One of them is
" When there is a conflict between an individual and group, the group's intrest must prevail. When there is comnflict between group and organisation then organisation's intrest must prevail and When there is conflict between organisation and nation, the nation's intrest must and must prevail at any cost."आणि दुसरा सिद्धांत आहे,
" Success comes to those who plan their work and excute the plan with self confidence and determination."
धन्यवाद !
उत्तर द्याहटवासुंदर, सुदैवाने संपुर्ण भारतात मोदिजींच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला, व पुढेही मिळेल याची खात्री आहे. देश आलेल्या संकटावर मात करो ही ईश्वराकडे प्रार्थना. धन्यवाद.
उत्तर द्याहटवाWell written, now we hv to follow 21 days.
उत्तर द्याहटवा