सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

राजकिय मैदानावरील सामना स्थान-महाराष्ट्र(खेळाडू व खेळ)



                        
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूका घोषित होण्यापुर्वी महाराष्ट्रात तसेच देशात सुरू झालेल्या घाऊक पक्षांतरावर लेख लिहीला. सलग दोन लोकसभेच्या निवडणूकीतल्या पराभवानंतर विरोधी पक्ष सावरलेले दिसत नाहीत त्यामूळे महाराष्ट्र व हरियाणा विधानसभेच्या निवडणूकीत  विरोधी पक्षांचा  पराभव होईल असे दिसू लागल्यामूळे लेख लिहीण्याचे टाळले होते. पण महाराष्ट्रातील एक बडा नेता श्री शरद पवार ह्यांना ईडी कार्यालयाने नोटीस पाठविल्यानंतर मिडीयात कमालीची चर्चा सुरू झाल्यामूळे लेख लिहावा असे वाटले. लेखाचे शिर्षक राजकीय मैदानावरील सामना ( स्थान महाराष्ट्र) असे असले तरी सर्वच राज्यातील राजकीय मैदानात बरेच साम्य आहे. फक्त खेळाडूंची नावे भिन्न आहेत इतकेच. बाकी सामना भाजपा विरूद्ध विरोधी पक्ष असेच चित्र आहे. आणखिन दहा वर्षे तशीच स्थिती राहील असे दिसते. पुर्वी  राजकीय मैदानात फक्त राजकीय नेतेच खेळत असत. पण गेल्या पाच वर्षापासून विरोधी पक्षांच्या वतीने मिडीयातील पत्रकार, संपादक, विचारवंत, साहित्यिक, धर्मगुरू, कलाकार इत्यादी मंडळी राजकीय मैदानात उतरलेली दिसत आहे. त्यांची भाषा समाजहिताची, समाजसेवेची, देशाच्या भविष्याची चिंता अशी असली तरी ही मंडळी सुद्धा राजकीय मैदानातील खेळाडूच आहेत. कारण ह्या मंडळींनी कितीही सोज्वळपणाचा आव आणला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीच्या विरोधात असलेल्या विविध कम्पूतील रोजगाराच्या सुचीवर ही मंडळी आहे. आणि ह्यांच्या खेळासंबंधी मी अनेक लेखात निर्देश करीत असतो. त्यामूळे लेखाच्या शेवटी यावर चर्चा करू. प्रथम राजकीय मैदानात उतरलेल्या खेळाडूंचा खेळ कसा आहे ह्यावर चर्चा करू या. सुरूवात अर्थातच राजकारणातले महान खेळाडू श्री शरद पवार ह्यांच्या पासून सूरू करीत आहे.

                           १) श्री शरद पवार 

सतराव्या लोकसभेच्या निवडणूक प्रचार काळात १४ मार्च २०१९ ला ' शरद पवारांची निवडणूकीतील माघार की हार ' या शिर्षकाचा एक लेख मी लिहीला आहे. त्यामध्यें पवारांनी राजकारणात कुठे  आणि कशा प्रकारच्या चूका केलेल्या आहेत ह्याबाबत मी सविस्तर मांडले आहे. पंतप्रधान नरसिंहरावांच्या सरकारात असतेवेळी नरसिंहरावांशी मिळते जुळते न घेतल्यामूळे उल्हास नगरचे आमदार पप्पू कलानी आणि वसईतील हिंतेद्र ठाकूर ह्यांना टाडा खाली अटक करून तत्कालीन पंतप्रधान नरसिंहरावांनी पवारांचे पंख छाटून टाकले तेव्हापासून शरद पवांराची राजकारणातील भरारी राष्ट्रीय पातळी वरून घसरत फक्त पश्चीम महाराष्ट्रापुरती सिमीत राहिली. महाराष्ट्र सहकारी बँकेतील घोटाळ्यात प्रथम दर्शनी शरद पवारांचा हात असू शकतो असे न्यायालयाने मानले व त्यांच्यावर नोटीस पाठविण्याचा आदेश दिला.  शरद पवारांवर मिडीयातील लोकांचे फार प्रेम असल्यामूळे त्यांनी शरद पवारांवर झालेला भ्रष्टाचाराचा आरोप जणू आपल्यावर आरोप झाला आहे असे मानून  ईडीची आलेली नोटीस शरद पवारांना राजकीय बळ मिळवून देणार आणि आता राष्ट्रवादी काॅग्रेसची महाराष्ट्रात हवा निर्माण झाल्याचे चित्र उभे केले. एके ठिकाणी शरद पवार ईडीच्या कार्यालयात स्वतःहून जावयास निघाले असता दुसरीकडे त्यांच्या पुतण्यांनी म्हणजे अजित पवारांनी विधानसभेच्या सभासद सदस्यात्वाचा राजीनामा देऊन राजकीय संन्यासाची घोषणा केली. त्यामूळे शरद पवार ईडीच्या कार्यालयात स्वतःहून हजर राहण्याची चाल खेळले खरे पण ती चाल उलटी त्यांच्याच अंगावर आली. त्यांच्या पुतण्यांनीच अडथळे निर्माण केले. शेवटी घराणेशाही वर आधारीत राजकीय पक्षांच्या सर्वोच्च खानदाना अंतर्गत सत्तेची स्पर्धा असते, त्याला पवार घराणे अपवाद कसे ठरेल असा अर्थ काढून सर्वसामान्यांनीं काका पुतण्याच्या शह-काटशहावर सोयीस्कर रित्या दुर्लक्ष केले. त्यामूळे मिडीयातील शरद पवारांच्या चमच्यांचा भ्रमनिरास झाला हे नक्की. नंतर अजित पवारांनी सावरण्याचा प्रयत्न केला पण तो निरर्थक ठरला.

मुळात दिल्लीतील युपीए सरकारचा दहा वर्षाचा कारभार व महाराष्ट्रातील काॅग्रेस व राष्ट्रवादी काॅग्रेसच्या आघाडी सरकारचा पंधरा वर्षाच्या कारभारासंबंधी सामान्य जनतेत असलेला रोष अजूनही कमी झालेला  नाही. त्यामूळे ईडीने शरद पवारांना नोटीस पाठविल्यामूळे महाराष्ट्र पेटून उठेल व शरद पवाराची लाट निर्माण होईल असा अंदाज बांधणार्यांचे हसे झाले आहे. कारण असे अंदाज बांधणारी मंडळी घराणेशाही पक्षातील सर्वोच्च घराण्यातील सदस्यांपेक्षा त्या घराण्यावर अधिक निष्ठा दाखवित असतात. अशा मंडळीत घराणेशाही पक्षांचे समर्थक व कार्यकर्तेही असतात. ही मंडळी सोशल मिडीयावर अशा काही उड्या मारत असतात की जणू ह्यांना वेड लागलेय की काय असे वाटून जाते. लोकसभेच्या निवडणूकीत केंद्रात मोदी सरकार सत्तेवरून पायउतार होणार असे छातीठोकपणें सांगत ही मंडळी नाचत होती. परीणाम काय झाला ?  ह्यांच्या बहुतांश धन्यांचा सपशेल पराभव झाला. साधारणतः सत्ताधारी पक्षावर मुद्यांच्या आधारे टिका करण्याचे सोडून व्यक्तीगत टिकेचा अतिवापर झाला की विरोधी पक्षांचा दारूण पराभव होतो. कित्येकदा घराणेशाही पक्षांच्या पराभवाला कार्यकर्तेच अधिक जबाबदार आहेत असे आता वाटू लागले आहे. सर्व राजकीय पक्षांचे पहील्या व दुसर्या फळीतील नेते आपआपसात संधान बांधून असतात. त्यामूळे अशा नेतेमंडळींचे सतत पक्षातंरे होत असताना आपण पाहात असतो. सध्यातरी आपल्या राजकीय व्यवस्थेत यावर उपाय नाही.  विरोधी पक्षातील घराण्याची चलती नाही असे दिसते. महाराष्ट्रात शरद पवारांना ईडीची नोटीस आली म्हणून त्या विरोधात आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काॅग्रेसने केला तरी मतदार साथ देतील असे वाटत नाही. कारण शरद पवारांना ईडीची आलेली नोटीस ही कोर्टाकडून आलेली आहे इतकं सामान्य ज्ञान मतदारांपाशी आहे. त्यामूळे महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूकी संबंधी विविध सर्वेनी काढलेला अंदाज खरा ठरेल असे दिसते.

                            २) श्री आदित्य ठाकरे 

ठाकरे घराण्यातील आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अर्ज भरला यासंबंधी फारसे आश्चर्य वाटत नाही. कारण निवडणूक न लढविता राजकरणात राहणे ही बाब शिवसेना प्रमूख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाय अजून तरी कोणाला जमलेले नाही. उद्धव ठाकरे व राज ठाकरे निवडणूक न लढविता राजकारण करीत असले तरी स्वर्गीय बाळासाहेबांचा करिष्मा वेगळ्या थाटाचा होता हे सर्वमान्य आहे. आदित्य ठाकरे हे निवडून येतील याबाबत शंका नाही. कारण वरळी हा सेनाभवनच्या अगदी नजीकचा मतदारसंघ आहे. आदित्य ठाकरें युवा सेनेचे अध्यक्षपद भूषवित  असल्यामूळे ते राजकारणात नवखे आहेत असे मानता येत नाही. तरी ही  त्यांच्या कार्यशैली संबंधी इतक्या लौकर मतप्रदर्शन करणे शक्य नसते. त्यामूळे त्यांच्यावर  टिका करणे प्रशस्त ठरत नाही. असे असले तरी आदित्य ठाकरे ह्यांच्या विरूद्ध काॅग्रेस आघाडीचा उमेदवार असणारच. त्यामूळे आदित्य ठाकरे एक बच्चा आहे अशी टिपण्णी विरोधी पक्षांकडून ऐकावयास मिळणार आहे. त्याला आदित्य ठाकरे कसे प्रत्युत्तर देतात हे पाहणे एक अभ्यास आहे. हा अभ्यास पत्रकार तसेच राजकीय विश्लेषकांसाठी आहेच पण आदित्य ठाकरे ह्यांच्यासाठी अधिक महत्वाचा आहे. कारण एखाद्या घराण्यात लोकोत्तर व्यक्ती होऊन गेली असेल तर तिसर्या पिढीवर दबाव अधिक असतो मग क्षेत्र कुठले का असेना ! तुर्तास आदित्य ठाकरे ह्यांना हार्दिक शुभेच्छा !

                             ३)श्री छगन भूजबळ 

दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधण्यात भ्रष्टाचाराचा आरोप होऊन कारावास भोगून आलेले छगन भुजबळ विधानसभेची निवडणूक लढवीत आहेत ही बातमी मुळीच आश्चर्यकारक नाही. तामीळनाडूमधील ए राजा, डीएमके सुप्रिमोच्या कन्या, बिहारचे लालू प्रसाद यादवासारखे भ्रष्टाचाराचा आरोप असलेले अनेक नेते राजकारणात सक्रीय राहात आलेले आपण पाहात आहोत. भ्रष्टाचार व फौजदारी असे दोन्ही प्रकारचे आरोप असलेले उमेदवार ही निवडणूकीत यशस्वी झालेले आपण पाहातो. त्यामूळे निवडणूकीत निवडून येण्याचे निकष जे  राज्यशास्त्र या विषयात आपण अभ्यासिले आहेत ते ही कधी कधी  खोटे ठरतात. असे का होते, आणि कुठपर्यंत असे चालणार ह्याबाबत निदान विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था संबंधीत ठोस असे उत्तर नजिकच्या भविष्यात देता येईल असे वाटत नाही. त्यामूळे छगन भुजबळ निवडून आले तरी आश्चर्य वाटणार नाही.

                ४) श्री एकनाथ खडसे निवडणूक

हा लेख लिहावयास घेतला तेव्हा एकनाथ खडसे ह्यांचे बंड थंड झाल्याची बातमी ऐकू आली. समजा एकनाथ खडसेंनी बंड करून निवडणूक लढविली असती तरी ते निवडून आले असते असे म्हणण्यास वाव आहे. कारण त्यांची केस छगन भुजबळासारखीच आहे. मुक्ताईनगर मधून त्यांच्या पसंदीच्या उमेदवारास भाजपा तिकीट देईल असे त्यांना आश्वासन दिल्याचे कळते. खडसेंना तिकीट नाकारून त्यांच्या पंसतीचा उमेदवारास तिकीट देण्यामागचे तर्कशास्त्र काय आहे हे कळत नसल्यामूळे इथेही भुजबळासारखे अर्थशस्त्र महत्वाचे ठरले  असे गृहीत धरू या.

                          ५) श्री विनोद तावडे

विद्यमान कॅबीनेट मंत्री आणि काॅग्रेस आघाडी सरकारच्या काळात  विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेता म्हणून काम पाहीलेले विनोद तावडे हे भाजपाचे महाराष्ट्र राज्यातील पाच बड्या नेत्यापैकी गणले जातात. त्यांना निवडणूकीसाठी तिकीट नाकारण्यात आले ही वृत्तपत्रासाठी ठळक बातमी ठरली ह्या संबंधी आश्चर्य वाटले नाही. विनोद तावडे ह्यांना तिकीट नाकारले जाऊ शकते असा अंदाज मी बांधला होता.  पंतप्रधान नरसिंहरावांना आव्हान देण्याची शरद पवारांनी जी घोडचूक केली तशीच चूक विनोद तावडे ह्यांच्या हातून घडली असावी. ' राष्ट्राध्यक्ष वा पंतप्रधान तसेच राज्याचा मुख्यमंत्री ही अशी पदे आहेत ज्यांची ताकद ही विरोधी पक्षांच्या नेत्यांपेक्षा सत्ताधारी पक्षांच्या बड्या नेत्यांना अधिक जाचक ठरत असते. हा जागतिक स्तरावरील राजकारणाचा ट्रेंड वा पोत आहे.  श्री विनोद तावडे ह्यांनी २०१४ साली विधानसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तोच मूळी चुकीचा होता. त्यात त्यांनी विले पार्ले येथून निवडणूक न लढविता बोरीवली सारख्या सुरक्षित मतदारसंघाची निवड केली. पक्षाने ती मान्य केली. ह्यासंबंधीची जाणीव विनोद तावडे यांनी ठेवली नसावी. तसेच त्यांचा कोकणात असा खास मतदारसंघ ही नसावा. त्यातच युतीमधील जागेच्या वाटाघाटीत शिवसेना कोकणातील वर्चस्व सोडावयास तयार नसते. शिवाय खडसे प्रमाणे तावडेचीं प्रतिमा मातोश्री मध्ये कट्टर विरोधी अशीच राहील्याचे आपण ऐकत आलो आहोत. आणखिन एक कारण असे आहे की विनोद तावडे ह्यानी अटल स्मृती सारखा भव्य प्रकल्प उभा केला असूनही  खासदार गोपाळ शेट्टींच्या ताकदीवर तावडे निवडून आले असा सुर ऐकू येत होता तो पाच वर्षे उलटली तरी बंद झाला नाही. खासदारापेक्षा राज्यातील कॅबीनेट मंत्र्याचे काम व स्वभाव अधिक लोकाभिमूख असावयास हवा हा विधानसभेच्या निवडणूकीतला आपोआप बनलेला एक नियम आहे. त्याला पक्ष कारणीभूत ठरत नाही. शेवटी जगभरातील राजकारणात सरकार वा पक्षात ज्याच्याकडे अधिक अधिकार आहेत त्यांच्याच शब्दाला अधिक किंमत असते.

          ६)श्री देवेंद्र फडणवीस व श्री उद्धव ठाकरे 

महाराष्ट्रात पुर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री पदावर राहण्याचा विक्रम विद्यमान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणविसांच्या नावावर झाला आहे ह्यावरूनच फडणवीस प्रशासकीय व सत्तेच्या खेळातील एक बडे माहीर आहेत हे सिध्द झाले आहे. जनमानसात त्यांची प्रतिमा निःकलंक आहे. त्यामूळे केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही टॅग लाईन सर्वतोमुखी झाली. म्हणून मैदानावरील त्यांच्या कार्यक्षमतेसंबंधी अधिक काही बोलायची गरज उरलेली नाही. २०१४ च्या निवडणूकीत महाराष्ट्रातील चार प्रमुख पक्षांनी स्वतंत्र रित्या निवडणूका लढवून आपआपली ताकद अजमाविली. चारही पक्षांच्या नेत्यांनी परस्परांवर अशी काही चिखलफेक केली होती की हे चार ही पक्ष जणू विधानसभेची निवडणूक मैदानात नसून युद्धभूमीवर युद्ध लढताना दिसले. काॅग्रेस व राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष मोदींच्या लाटेमुळे लुळे-पांगळे झाले, तर शिवसेनेला छोट्या भावाच्या भुमिकेत जावे लागले. सत्तेत राहूनही शिवसेनेने भाजपा सरकारवर टिका करण्याचे सत्र सुरू ठेवले. भाजपा-सेनेमधील कलगीतुर्याचं स्वरूप  उत्तरप्रदेशमधील बुवा आणि बबूआ (मायावती व अखिलेश) ह्याच्यामधील राजकीय खेळासारखे झाले हे मी ब्लाॅगवरील लेखात नमूद केलेले आहे. मायावती व अखिलेश यादवांनी काॅग्रेस व भाजपाला उत्तरप्रदेशमधून उखडून काढले होते. त्यातील भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये सत्ता काबीज केली पण काॅग्रेसचे अस्तित्वच संपले. तसाच खेळ फडणवीस व उद्धव ठाकरें मांडत गेले पण त्यात शिवसेनेचं  अधिक नुकसान होईल असे भाष्य मी केले होते. आज शिवसेनेला छोट्या भावाची भूमिका स्विकारावी लागली. याची कारणे चार आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे  देश व आतंरराष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी नावाच्या नेत्याचा उदय व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला मिळत जाणारा वाढता प्रतिसाद. दुसरे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांचे सक्षम प्रशासकीय कौशल्य व जनहितासंबंधीची त्याची तळमळ. तिसरे कारण शिवसेनेच्या नेत्यांना सोडवता न येणारी सत्तेची उब. चौथे कारण म्हणजे स्वबळावर सेनेची सत्ता बाळासाहेबांच्या हयातीत येऊ शकली नाही तिथे उद्धव ठाकरेंच्या करिष्म्यावर येणार नाही ह्याची सेना नेत्यांना झालेली जाणीव. त्यामुळे सत्तेतून आपल्या पुत्राचा राजकारणात जम बसविण्याच्या कामाला प्राधान्य देणे उद्धव ठाकरेंना आवश्यक वाटले असावे. कदाचित भाऊ तोरसेकरांनी म्हटल्या प्रमाणे शिवसेनेला बर्यापैकी जागा जिंकता आल्या  तर आदित्य ठाकरेसाठी उपमुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेता येऊ शकते.  हा हिशोब उद्धव ठाकरेनी केला असावा. तसे झाले तर आदित्य ठाकरेंचा राजकारणात जम बसणे अधिक सोपे जाईल. म्हणून कमी जागा लढविण्यात उद्धव ठाकरेंची नामूष्की  नसून राजकीय शहाणपण आहे असेच मानावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे या जोडीच्या फिरकी( विशेषतः गुगली) चेंडूचा विरोधी पक्षांतील फलंदाजांना अंदाज आला नाहीच पण भाजपा व शिवसेना मधील फलंदाजांना ही अंदाज आला नाही. त्यामूळे राज्यभरातील अनेक फलंदाज बाद झाले आहेत. त्यासंबंधीचे रोजचे समालोचन वृत्तपत्रातून व न्यूज चॅनेलवरून आपण पाहातो आहोत, ऐकतो आहोत, आणि वाचतो ही आहोत. म्हणून आता आपण या लेखाच्या सामारोपाकडे वळू या.

एकंदरीत काॅग्रेस व मित्र पक्षांची लोकसभेच्या निवडणूकीत जी दाणादाण उडाली त्यातून त्यांना सावरता आलेले दिसत नाही. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीतील निकाला संबंधी जे सर्वे येतात त्यावरून युतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल असेच दिसते. श्री शरद पवार निकराची लढाई लढत आहेत. त्याबद्दल त्यांचे कौतूक जरूर आहे. पण ही झाली सत्तेची लढाई. विचाराची लढाई ते का हरले आहेत यावर त्यांनी चिंतन केले नाही. महाराष्ट्र दिल्लीपुढे वाकला नाही हे वाक्य स्वातंत्र्यानंतर फक्त चिंतामणराव देशमूख ह्यांच्या मुखी शोभते. शरद पवारांनी दोन वेळा काॅग्रेस सोडली व नंतर पुन्हा काॅग्रेसमध्ये वापसी केलेली आपण पाहीली आहे.  शेवटी संरक्षण मंत्रीपदाऐवजी  सोनियाच्या जवळ जाऊन कृषीमंत्रीपदावर समाधान मानणार्या शरद पवारांना ताठ पाठीचा (मराठी बाण्याचा) कणा आहे, असे मराठीचींया नगरीत किती लोक मानतील ? आणि हा प्रश्न निवडणूकीतला मुद्दा बनला तो स्वतः शरद पवार व त्यांच्या  मिडीयातील संपादक, विचारवंत, व साहित्यिकांच्या रूपाने त्यांच्या सोबत असलेल्या राजकीय खेळाडू मुळेच ना !

महाराष्ट्रातील सहकारी बँका, सहकारी कारखाने, सहकारी दुध, फळे भाज्या, कापूस इत्यादी संस्था कंगाल का झाल्या? जे काही वाटोळे झाले आहे ते फक्त या पाच वर्षात झालं आहे असे मतदाराने समजावयाचे आहे का ? महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील सरंमजामशाही वृत्तीने सत्ता उपभोगलेल्या सार्या विरोधी पक्षांना विचारलेला हा प्रश्न आहे. विरोधी पक्ष व झाडून सारे विरोधी पक्षांचे मिडीयातील समर्थक व विचारवंत भाजपा मतदारांना राष्ट्रवादाची मोहनी घालते असा आरोप करीत आहेत.  राष्ट्रवाद हा लोकांच्या अंतःकरणाला भिडणारा विषय आहे. आपले कार्य निःसंदेह त्यागातीत असेल तर तीच मंडळी जनतेपुढे राष्ट्रभक्तीचा आदर्श मांडू शकतात व लोक ही त्यांच्याच आवाहनाला प्रतिसाद देत असतात. एअरकंन्डीशन घर, ऑफीस मध्ये बसलेली व वेळोवेळी मिडीयात चमकत राहणारी मंडळी कितीही विद्वान असली तरी लोकांसाठी आदर्श बनू शकत नाहीत. सध्यातरी आपल्या देशात संघाच्या मुशीतून तयार झालेले भाजपाचे जे खेळाडू आहेत त्यांना जनतेचे समर्थन मिळत आहे.  भाजपा व मोदी सरकार भगवा आंतकवाद राबवीत आहे असे आंतरराष्ट्रीय समुदाय मानत असते तर आज पंतप्रधान मोदींचा व भाजपा सरकारचा जगभर इतका बोलबाला दिसला नसता.

भारतीय राजकरणातील वस्तुस्थिती अशी आहे की विरोधी पक्षांना पंतप्रधान मोदी, अमीत शहा,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इत्यादींचा विरोध करण्यासाठी मुद्देच शोधता येत नाहीत. सारे विरोधी पक्ष चक्रव्युहात अडकले आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी ज्यांनी मदत करावयास हवी अशी संपादक, विचारवंत, साहित्यिक मंडळी  मोदी, भाजपा, व संघावर अशा रितीने आगपाखड करीत आहेत की त्यांचेच शब्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान आपल्या मुखी ठेवून संघ व भाजपा वर टिका करीत आहेत. ह्याचमूळे सार्या विरोधी पक्षांची मोठी कोंडी झाली आहे हे मी ह्याच ब्लाॅगवरील ' इम्रानखान व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ' ह्या लेखात विस्तृतपणे दिलेले आहे. विरोधी पक्षांची एक बी टिम आहे, ज्यात विचारवंत, राजकीय अभ्यासक, साहित्यिक, पत्रकार, संपादक महाशय, अल्पसख्यांचे काही धर्मगुरू, सेलीब्रीटी कलाकार इत्यादी खेळाडू आहेत. त्यांनी प्रथम संघ--भाजपा प्रणीत हिंदुत्व, व सांस्कृतिक राष्ट्रवाद या विषयावर खुल्या मनाने चर्चा करावयास हवी. मिडीयातील पोपटपंचीय शहाणे व अल्पसंख्याकांचे दिडशहाण्या धर्मगुरूंनी सुरू केलेले  पांडीत्य पाजळण्याचे काम  सोडून द्यावयास हवे. गेली पाच वर्षे असहिष्णूता, अघोषित आणिबाणी, इत्यादी मुद्यांच्या पलिकडे ह्यांचे पांडीत्य पुढे सरकतच नाही.  अवती-भावती भाटगिरी करणार्या मंडळींची गर्दी दिसली म्हणजे बदलते समाजमन समजते अशा स्वप्नात ही मंडळी का रमत आहे हे समजण्याच्या पलिकडचे आहे. भाजपामध्ये सर्व काही आलबेल आहे, असे मी मानत नाही पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची सेवाभावी वृत्ती आणि देशभक्तीचे कौतूक करण्याचे सौजन्य ह्यांच्यापाशी नसेल तर ह्यांना पुरोगामी ह्या शब्दाचा अर्थ कळलेला दिसत नाही असे मानावे लागते. साने गुरूजींच्या भारतीय संस्कृती ह्या पुस्तकातले धडे ह्यांनी पुन्हा पहील्यापासून गिरवायला सुरूवात करावी आणि त्यानुसार वागण्याचा, बोलण्याचा प्रयत्न करावा. स्वातंत्र्यपुर्व काळातील काॅग्रेसच्या अध्यक्षा ॲनी बेंझट ह्यांनी हिंदू संस्कृती जगभरातील अनेक संस्कृतीची जननी आहे असे स्पष्टपणे व निर्भीडपणे मांडले आहे ह्याची जरा तरी आठवण या मंडळींनी ठेवायला हवी की नाही? झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टिका करता करता यांच्या हातातील एकेक राज्य असे करता देश निसटला, आणि आता देश संकटात आहे असे म्हणत गावभर फिरत जात आहात जोडीला ह्यात राजकारण नाही असे म्हणत आहेत. हा ढोंगीपणाचा कळस आहे. भारत बदलला आहे. एक समर्थ सरकार भारतात कार्यरत आहे. भारताचा पंतप्रधान जगातील समर्थ नेत्यांत गणला जात आहे. भारतातील या बदलाचं जागतिक समुदाय स्वागत करीत असताना दिसत आहे, अपवाद आपल्या येथील डावे,  समाजवादी व सर्वधर्मसमभावी विचारवंत, साहित्यिक, धर्मगुरू, आणि पाकिस्तान व चीन. सामान्यातला सामान्य मतदाराला हे पटत आहे. तो शांतपणे मतपेटीद्वारें ढोंगी लोकांना आपली जागा दाखवित असल्याचे अनुभवयास येत आहे. ह्यापेक्षा महाराष्ट्रातील निवडणूकीतल्या निकालाचा अंदाज स्वतंत्र रित्या मांडण्याची गरज तरी कुठे उरते ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...