आपल्या महाराष्ट्र राज्याच्या परवा होणार्या विधानसभेच्या निवडणूकीत प्रथमच मोठ्या प्रमाणावर पक्षांतर व बंडखोरी झालेली पाहतो आहोत. युतीतील भाजपा व शिवसेना ह्या पक्षांकडे येणार्या राजकीय नेत्यांची संख्या अधिक आहे. अर्थात पक्षांतर करणारी ही मंडळी बहूतांश काॅग्रेस व राष्ट्रवादी काॅग्रेसची आहे. भाजपा व सेनेतील नेत्यांनीही पक्षांतर केले आहे पण त्यांची संख्या अगदी नगण्य आहे. कारण जनमत भाजपा-सेना युतीकडे अधिक झूकलेले दिसत आहे. ह्याला आधार कोणता ? तर मे महिन्यात झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत भाजपा-सेना युतीला भरभरून मिळालेली मतें. साधारणतः अंदाजे विधानसभेच्या २२० मतदार संघात भाजपा-सेनेला मताधिक्य मिळाले असल्यामूळे पुन्हा तशाच प्रकारचे मतदान होईल असा अंदाज राजकीय अभ्यासकांनी मांडलेला आहे. तो किती खरा ठरेल हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. पण एक गोष्ट मान्य करावी लागेल की राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदींचा उदय झाल्यापासून विरोधी पक्षांची वाताहात झाली आणि त्यामूळे भाजपा-सेनेची सध्या चलती झाली आहे. तथापी पक्षांतर व बंडखोरीची लागण हा आपल्या राजकीय व्यवस्थेला जडलेला जुनाट रोग आहे. हे आपण विसरून कसे चालेल?
मागच्या लेखात मी म्हटले आहे की विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीतील बंडखोरीचा रोग नजिकच्या भविष्यात बरा होणार नाही. तसेच भ्रष्ट्राचार व फौजदारी खटले ज्यांच्यावर आहेत असे नेतेही निवडणूक जिंकू शकतात. काल परवा पर्यंत काॅग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादी काॅग्रेस मध्ये असलेले नेते पक्षांतर करून भाजपा व सेनातर्फे निवडणूक लढविणारे नेते ही निवडून येऊ शकतात. इतकेच काय स्वतःच्या पक्षाने तिकीट नाकारल्यामूळे अधिकृत उमेदवाराविरूद्ध बंडखोरी करून निवडणूक लढविणारे नेते सुद्धा जिंकू शकतात. लोकसभेच्या निवडणूकीत बंडखोरी व पक्षांतरांच्या घटना कमी असतात पण विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत बंडखोरी तसेच पक्षांतराच्या घटना अधिक प्रमाणात दिसतात. असे का घडते ?
पक्षातंर तसेच बंडखोरी करणारे नेते नैतिकेतेचा आव आणत असले तरी खरें कारण लोकप्रतिनिधी होण्याची स्वतःची इच्छा हेच असते. सामान्यतः निवडून येण्याची शक्यता आहे असे ज्यांना वाटते तसेच तिकीट न दिल्यामूळे आपल्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करण्याची उर्मी ज्यांना असते असेच नेते पक्षांतर किंवा बंडखोरी करीत असतात. निवडून येण्याच्या ज्या काही शक्यता असतात त्यांचे मोजमाप स्वाभाविकपणे उमेदवाराकडे असलेल्या पैशाच्या ताकदीवरून केले जाते. त्याखालोखाल पक्षातील श्रेष्ठीचा वरदहस्त, जातीचा पगडा, प्रभाव टाकण्यासाठी असलेली मसल पाॅवर इत्यादींचा नबंर लागतो. पुष्कळदा उमेदवाराला बंडखोरीची फूस वरीष्ठ नेत्यांपैकी एक-दोघांची असू शकते. कारण प्रत्येक पक्षात वरीष्ठ पातळीवर ही गटबाजी असते. काही वेळा स्थानिक पातळीवरील नाराज नेते बंडखोरी न करता गुप्तपणे आपल्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करण्याचे कार्य करीत असतात. म्हणून विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत काही चमत्कारीक निकाल येत असतात. मग ह्या विजयाचे विश्लेषण करतेवेळी उगीच आपण नेते मंडळींना चाणक्य अशी पदवी देऊन मोकळे होतो. निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर कोणालाच स्पष्ट बहूमत न मिळाले तर परस्पर आघाडी, व युती असली तरी आघाडीतील एक पक्ष व युतीतील एक पक्ष असे एकत्र येऊन विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थातील सत्ता काबीज करण्याच्या घटनाही आपण पाहील्या आहेत. असे का घडते?
वरील दोन प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत असताना जे काही उत्तर गवसले आहे ते आपल्या पुढे ठेवतो पण तेच उत्तर बरोबर व अंतिम आहे असे नव्हे.
१) विधानसभा आणि स्थानिक संस्थाच्या निवडणूकीत पक्षांतर व बंडखोरी अधिक प्रमाणात होते ह्याचे कारण आपली राजकीय व्यवस्था संघीय (Fedaral) आहे त्यामूळे राज्याच्या सत्तेत बर्यापैकी अधिकार असतात. राज्यस्तरावरील सत्तेच्या शिडीला पायर्या कमी असतात. विधानसभेच्या जागा अधिक असतात. मतदारसंघाचे क्षेत्र कमी असते. त्यामूळे इच्छूकांची संख्या अधिक असते. त्यातून स्पर्धा व ईर्षाचे प्रमाण वाढते. मग प्रथम तोंडी बंडखोरी नंतर पक्षांतर किंवा लेखी बंडखोरी होते. ह्यावर राजकीय पक्षांकडे तसा उपाय नसतो. निवडणूक आयोग व संसदच उपाय तयार करू शकतात. आपण मतदार म्हणून पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुयोग्य उमेदवाराला निवडून द्यावयास सुरूवात करू तेव्हा हा तिढा सुटू शकतो. अन्यथा आपण लोकशाही व्यवस्थेत पुर्णपणे प्रगल्भ होऊ तो पर्यंत वाट पाहात बसणे हाच तूर्तास पर्याय दिसतो.
२) नागरीक व मतदार म्हणून आपण सारे व्यक्तीपूजक आहोत. आपण घराणेशाहीचे भक्त आहोत. त्यामूळे राजकीय पक्षांच्या नेत्यांचे फावते. त्यामूळे राज्यात व देशात राजकारण हा काही घराण्यांचा खानदानी पेशा झाला. त्यामूळे सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता हे दृष्टचक्र आपल्या वाट्याला आहे. पक्षांसाठी मिळालेला निधी हा प्रत्यक्षात एका व्यक्तीचा व त्या व्यक्तीच्या कुटुंबीय मंडळीच्या मालकीचा होत असतो. मग पक्षाची मालकी सुध्दा त्याच कुटंबीयांची होत जाते. कुटंबात सत्तेसाठी झगडे रामायण महाभारतात ही सापडतात.
३)आपण मतदार म्हणून तात्काळ मिळणार्या प्रलोभनाला भूलत असतो. मग ती प्रलोभने अंदाजपत्रकातून प्रत्यक्षपणे आलेली असो वा अप्रत्यक्ष वा गुप्त स्वरूपात निवडणूकीच्या प्रचाराच्या वेळी आलेली असोत.
४)आपण आपली जात--जमात, धर्म, या पलीकडचा विचार करू शकत नाही. त्यात कुठली ही जात-जमात अपवाद नाही. हिंदुतून धर्मांतर झालेले व अल्पसंख्यांचा दर्जा मिळालेले समाज बांधव सुद्धा अपवाद ठरले नाहीत. त्यामूळे शिया-सुनी वाद, अस्पृशता हे रोग अल्पसंख्यांकातही अस्तित्वात आहेत.
५)आपण कित्येक वेळा पुर्णतः निर्भयपणे मतदान करीत असतोच असे नाही. कारण राजकरणात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या सहभाग वाढला आहे. ज्यांच्याकडे माया (पैसे) आहे, ज्यांच्या कडे बल आहे, अशांच्या आहारी आपण अधिक जात असतो भले मग आपण साहित्यिक, लेखक, कवी, बुद्धजीवी, सुशिक्षीत असोत वा निरीक्षर असोत.
६)पुष्कळदा आपण स्वतः पुरोगामी म्हणून मिरवत असलो तरी आपला व्यवहार प्रतिगाम्यासारखाच असतो. आपण कितीही सर्वधर्म समभावाच्या गप्पा मारल्या तरी आपण आपल्या धर्माबद्दलची आत्मियता लपवू शकत नाही. कारण आपण सारे सांस्कृतिक दृष्ट्या एक आहोत ही भावना जी मोगलाई व ब्रिटीश राजवटीत विस्मृतीत गेली होती, ती पुर्ववत होण्यासाठी करावयास लागणारे जनजागरण करण्याचे कार्य स्वातंत्र्यानंतरच्या सरकारने केले नाही. उलट ब्रिटाशांनी सुरू केलेली फोडा व झोडा हीच नीती सत्तेसाठी चालू ठेवली. त्यासाठी शालेय व महाविद्यालयीन पातळीवरील इतिहास विषयाचा अभ्यासक्रम ठरविणार्या मंडळावर गुलामी मानसिकेतेचे विचारवंत बसविले. मग ते साम्यवादी असोत वा पाश्चात्य संस्कृतीला भाळलेले अँग्लो इडियन्स असोत. आपल्याहून नव्याने स्वतंत्र झालेला चीन सारखा देश आर्थिक व सामरिक दृष्ट्या आपल्या देशापेक्षा वरचढ ठरला आहे. दुसर्या महायुद्धात उध्वस्त झालेले जपान जर्मनी सारखे देश प्रगत देशाच्या यादीत आहेत ह्याचे कारण त्यांनी आपल्या मूळ संस्कृतीचा ढाचा तोडला नाही.
७)आपण अनाठायी कुठल्यातरी विचारसरणेशी फार चिकटून राहात असतो. ह्यात दुर्दैवाने काही साहित्यिक, कवी, धर्मगुरूंचा ही समावेश दिसतो. वस्तुस्थिती ही आहे की कुठलिही विचारसरणी टाकाऊ नसते तसेच चिरंतन टिकाऊ ही नसते. अर्थशास्त्र, परराष्ट्र धोरण, सुरक्षा, उद्योग, शिक्षण, आरोग्य, इत्यादी विषयीचे आपले ज्ञान अपूरे असले तरी आपण तावातावाने चर्चा करीत असतो. इतकेच काय हे जग म्हणजे आपले गाव आहे असे समजून आपण उदारमतवादी वा साम्यवादी म्हणून मिरवतो पण त्यातून पुष्कळदा आपणच आपल्या देशाच्या संस्कृतीपेक्षा इतर देशांची संस्कृती उच्च समजतो. ' आपण सारे भारतीय आहोत ' अशी शपथ घेतो पण मूळ संस्कृतीला शुद्र मानतो.
८)राजकीय नेते मंडळीच सर्वोच्च स्थानी आहेत आणि तेच आपले आदर्श अशी आपली समज होऊन बसली आहे. त्यामूळे सच्चे समाजसेवक, सच्च्या स्वयंसेवी संघटना, इत्यादींना गौण मानण्याची एक खोड आपल्यात रूजली आहे. त्यामूळे राष्ट्रीय पातळीपासून ते प्रादेशिक आणि पंचायत पातळीवरील छोटे मोठे राजकीय नेत्यांवर भष्ट्राचार तसेच फौजदारी आरोप असले तरी आपण त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळीत असतो.
९)सारे काही सरकारने करावे हीच आपली धारणा असते. पुष्कळदा सरकार कडून फूकट कसे मिळेल ह्यावरच आपले लक्ष केंद्रीत करतो मग आपण आरक्षण, स्वतंत्र धार्मीक दर्जा, राज्याला खास दर्जा, अशा मागण्यासाठी रस्त्यावर येतो आणि आपली सृजनशक्ती गमावितो.
१०)सार्वजनिक या शब्दातील सर्वजनांमध्ये आपण स्वतः असतोच पण ते सोयीस्कर रित्या आपण विसरतो. त्यामूळे आपण सार्वजनिक मालमत्तेसंबंधी बेजबाबदारीने व्यवहार करतो. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छतेला आपणच जबाबदार आहोत. पुष्कळदा आपण आपल्या शुद्र मागण्यांसाठी सार्वजनिक मालमत्तेची नासाडी करीत असतो. आपण अनाठायी आपल्या हक्काबद्दल जागृत राहतो, पण कर्तव्याकडे दुर्लक्ष करतो. राजा कालस्य कारणम या न्यायानूसार लोकशाही व्यवस्थेत निर्माण झालेल्या सार्या अनिष्ट प्रथांना, अव्यवस्थेला गलथानपणाला आपण ही जबाबदार आहोत असे मानणें योग्य नव्हे काय ?
११)आपली मिडीया मग ती प्रिन्ट असो वा इलेट्राॅनिक्स राजकीय घडामोडींना अधिक प्राधान्य देत असते. इतकेच नव्हे तर मिडीयातही अनेक विचारसरणीच्या लाॅब्या आहेत. असे ऐकू येते की ह्या लाॅब्या केंद्र तसेच विविध राज्यातील मंत्रीमंडळाचा चेहरामोहरा वर प्रभाव टाकतात. जर मिडीया इतक्या हिराहिरीने राजकारणात रस घेत असेल तर स्वाभाविकपणे सोशल मिडीयावर तसाच प्रकार घडणार. पुष्कळदा मिडीया घडलेल्या घटनांचे अतिरंजीतपणे वर्णन करते. ही सारी मंडळी ही मतदार आहेतच ना !
१२)आपली चित्रपटसृष्टी ही राजकरणापासून अलिप्त राहात नाही. चित्रपट सृष्टीतही निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, गीतकार, संगीतकार अनेक राजकीय नेत्यांचा आसरा घेतलेले दिसतात. क्रिडा-जगत, साहित्य-जगत, व्यापार उद्योग-जगत सगळीकडे अंतर्गत राजकारण आहेच शिवाय आपल्या आवडत्या विचारसरणीच्या नेत्यांच्या भोवती ही मंडळी घुटमळत असतात. ह्या क्षेत्रातल्या मंडळींना, आपल्या व्यवसायातील कामानिमित्त सरकार दरबारी जाणं-येणं करावे लागते ह्यात गैर काही नाही पण आपल्या कामासाठी राजकीय नेत्यांची खास मेहरबानी व्हावी, अशी खास गैरकानूनी कामें आपण करावीच का ? जसे चित्रपट तसे समाजमन तयार होते. जसे साहित्य तसे समाजमन बनते. जशा जाहिरती तसा प्रतिसाद. मनुष्य हा सुद्धा एक प्राणी आहे. अनुकरण ही त्याची जन्मतः प्रवृत्ती. त्यातही आपल्या देशात अनेक भाषा अनेक प्रांत, अनेक जाती-जमाती मग आपण सिनेमा, नाटके, कथा, साहित्याची निर्मीती करतेवेळी काळजी घ्यावयास हवी की नाही? कुठल्याही क्षेत्रात मर्यादेचे उल्लंघन म्हणजे स्वातंत्र्य असा अर्थ काढण्याची सवय जडली की तो रोग बनतो. सिनेसृष्टी, क्रिडाजगत ही आपल्या सारख्या सर्वसामान्यांची आवडती क्षेत्रं. आपण नागरिक आहोत, आपण मतदार आहोत हे भान ह्या क्षेत्रातील मान्यवरांनी ठेवावयास हवे असे आपण म्हणू तेव्हा आपल्या सारख्या सर्वसामान्यांनी ही मनोरंजनातून समाज न दुभंगण्याचे भान ठेवावयास हवेच की.
वरील सारं विवेचन हे संवादमय आहे. मी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा अभिमान बाळगणारा आपल्या सारखा एक सामान्य मतदार आहे. १९७७ च्या लोकसभेच्या निवडणूकीत सत्ताधारी काॅग्रेसने आणिबाणी द्वारे लोकशाही गळा घोटला होता त्याचा निषेध म्हणून आपण सत्ताधारी काॅग्रेसचा मतपेटी द्वारें पराभव केला. रक्तहीन क्रांती म्हणून जगभर आपल्या लोकशाहीचा गौरव झाला. १९८० साली मिड-टर्म निवडणूकीत जनता पक्षाचा पराभव करून पुन्हा काॅग्रेसला सत्तेवर बसविले ते ही मतपेटी द्वारें. पुढे केंद्रात सत्तातरें होत राहीले. काही काळ राजकीय अस्थिरता केंद्रात राहीली. शेवटी १९९९ पासून आपणच आघाडी सरकारचे युग निर्माण करून राजकीय अस्थिरता संपविली. २०१४ व यंदाच्या मे महीन्यातील निवडणूकीत भाजपाला स्पष्ट बहुमताने केंद्रात सत्तेवर आपणच बसविले. तरीही भाजपाला सरकारचा चेहरा एनडीएचा ठेवावा लागला आहे, कारण भाजपाला ही आपल्या सारख्या मतदारांचा वाटत असलेला धाक. हळूहळू देशभरातील प्रत्येक राज्यातील विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थातील निवडणूकीतही आपण मतदार म्हणून, लोकशाहीचे रक्षक म्हणून, मतदार राजा म्हणून आपला धाक राज्यकर्त्यावर ठेवू अशी आशा आहे. मी राजकीय अभ्यासक नाही. नीतीज्ञ व विचारवंत तर मूळीच नाही. साधा पत्रकार ही नाही. पण आपल्या देशातील राजकारणावर आपण नाराज असलो तरी आजच्या युगातल्या सुसंस्कृत मानव समाजाला लोकशाही हीच राज्यप्रणाली योग्य आहे असे मला वाटते, आणि तिला सुयोग्य बनविण्याचे कार्य आपल्या हातात असते. लोकशाही राज्यप्रणाली असो की एक पक्षीय राजवट असो देशाचा विकास कशावर अंवलबून असतो ह्या संबंधीचे एक वाक्य वाचनात आले आहे. ते मला फार भावले आहे. त्या वाक्यानीच या लेखाची समाप्ती करतो. ते वाक्य असे आहे "The progress of the nation is far less depend upon it's form of institution rather than character of it's own men. कुठल्याही देशाचा वा समाजाचा विकास तिथे कुठल्या प्रकारची राजप्रणाली आहे, ह्या पेक्षा तेथील नागरिकांच्या चारीत्र्यावर अधिक अवलंबून असतो."
वन्दे मातरम |
सर जी प्रणाम । अति सुंदर विश्लेषण । यांदा भाजपा ला पक्षांतर केलेलया लोकांशी खबरदारी धयावी लागेल ।
उत्तर द्याहटवाहो निश्चीतच.भाजपामध्ये जे काॅग्रेसी आले आहेत त्यांचा सन्मान होईल पण त्यांना भाजपामध्ये सुभेदारी करता येईल असे वाटत नाही.लेखाचे कौतूक केल्याबद्दल मनापासून आभार.
उत्तर द्याहटवा