शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१९

महाराष्ट्रातील राजकीय सामना - निकालाचा अर्थ



महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूकीचा निकाल लागला. निकालाने विविध सर्वेचे अंदाज बहुतांशी चुकीचे ठरविले आहेत. अनेक चॅनेलवाल्यांनी लोकसभेच्या निवडणूकीत भाजपाला मिळालेली मतें आधारभूत मानून अंदाज वर्तविले होते आणि ते खरे ठरतील का हे निकालाच्या दिवशी कळेल, असे मी माझ्या मागील लेखात मांडले आहे. जसजसा प्रचाराचा जोर वाढू लागला, भाजपा-सेने मध्ये बंडखोरी होऊ लागली तेव्हाच मी सर्वेचा अंदाजा बाबत सांशक होत गेलो. विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत मतदान लोकसभेच्या निवडणूकी पेक्षा वेगळ्या तर्हेंने  होत असते, आणि त्याची कारणें मी मागच्या लेखात मांडली आहेत. त्यामूळे या लेखात त्यासंबंधीची पुनरूक्ती करण्याची गरज नाही. इथे आपण निवडणूक निकालाचा विविध पक्षांनी, राजकीय अभ्यासकांनी, विचारवंतानी आणि मिडीयातील पत्रकार व संपादक मंडळींनी जो अन्वायार्थ काढला त्यावर चर्चा करू या.

महाराष्ट्रातील निवडणूकीतील निकालाचे विश्लेषण अनेक राजकीय अभ्यास, नेतेमंडळी आपआपल्या सोयीनुसार करीत आहेत.  मी सुद्धा त्यांच्यापैकीच आहे असे आपण मानले तरी त्याबाबत माझा काही आक्षेप नाही. गेल्या पाच वर्षापासून निवडणूकांच्या प्रचारात विविध जाती-जमातीत विभागलेल्या आपल्या समाजात राजकीय विचारसरणीच्या नावाखाली एक स्पष्टपणे जाणवणारा भेद निर्माण झाल्याचे दिसत आहे. त्या भेदाचे नाव आहे, हिंदुत्व विरूद्ध सर्वधर्मसमभाव. लोकसभेच्या निवडणूकीच्या निकालावर सर्वधर्मसमभावा पेक्षा हिंदुत्व विचारसरणी अधिक प्रभावी ठरत असल्याचे आपण अनुभवत आहोत. पण ह्याचा अर्थ असा नव्हे की राज्याच्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रीय सुरक्षा, जम्मू- काश्मीर मधील कलम ३७०, ३५ अ, आपल्या लष्कराने बालकोटावर केलेला एअर स्ट्राईक, हे मुद्दे बाद होतात. कारण ह्या मुद्यांसंबंधी मोदी सरकारने दाखविलेले धाडस व राजकीय इच्छा लोकांच्या स्मरणात कायम राहणार आहे. कारण स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची धमक मोदी सरकारने दाखविली आहे. हिंदुत्व विचारसरणीला समाजमन मोठ्या प्रमाणात स्विकारीत आहे. त्याचे कारण संघीय विचारसरणीच्या मंडळीची १९२५ पासूनची अविरत तपस्या. त्यामुळे ह्यापुढेही  राष्ट्रीय सुरक्षा (बाह्य तसेच अंतर्गत) हा मुद्दा देशातील प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या निवडणूकीत कमी अधिक प्रमाणात प्रभाव करीत राहणार आहे. जिथे कमी प्रमाणात हा मुद्दा येत आहे त्या राज्यांत हिंदुत्व विचारसरणी बाळसे धरत आहे. ती राज्ये ही हिंदुत्वाच्या झेंड्याखाली आज ना उद्या येणारच आहेत.  महाराष्ट्र म्हणे पुरोगामी राज्य, पण इथे ही सलग दुसर्यांदा हिंदुत्व विचारसरणीच्या पक्षांना आघाडी मिळत असेल तर कुठेतरी पुरोगामी विचारसरणीची मंडळी त्यांनीच निर्माण केलेल्या चिखलात रूतली आहेत हे मानावे लागतेच. पण  हे सत्य पुरोगामी मंडळी मान्य करणार नाहीत. म्हणून महाराष्ट्र व हरयाणा राज्यातील विधानसभा निवडणूकीत स्थानिक मुद्यांवर मतदारांनी मते दिली आहेत असा निष्कर्ष काढून एक पळवाटीचा मार्ग बहुतांश डावे व पुरोगामी विचारवंतानी स्विकारलेला दिसतो.  स्थानिक मुद्दे कुठले या संबंधीची वाच्यता ही मंडळी करीत नाहीत.  रस्ते, शेती, शिक्षण आरोग्य व्यापार- उद्योग,  बेकारी,आर्थिक मंदी इत्यादी विषय निवडणूकीतील प्रचारात फारसे ऐकू आले नाहीत. मग निवडणूकीच्या निकालाचा अन्वयार्थ कसा लागणार ? म्हणून महाराष्ट्रातील निवडणूकीच्या सामन्याचे स्वरूप जसे दिसले त्याचा आधार घेतच निकालाचा अन्वयार्थ काढला जाऊ शकतो. दुसरा पर्याय शिल्लक राहीला नाही.

स्थानिक मुद्यांपैकी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे विविध पक्षांच्या नेत्यांचा पंचक्रोशीत व मतदारसंघात असलेला करीष्मा. खरा करीष्मा असलेली मंडळी महाराष्ट्रात असती तर ही मंडळी राष्ट्रीय स्तरावर ही लोकप्रिय झालेली पाहायला मिळाली असती. पण तसे कोणी दिसत नाही. विधानसभा व स्थानिक संस्थाच्या निवडणूकीतल्या करीष्माची व्याखा करावयाची असल्यास नेत्याची असलेली जात, मनी आणि मसल पाॅवर ह्यापेक्षा पुढे जात नाही. हे सत्य पुरोगामी मंडळी स्विकारणार नाहीत. पुरोगामी व सर्वधर्मसमभावी असे दोन बिल्ले आपल्या शर्टावर लावणार्या नेत्यांचा व विचारवंताचा आपल्या देशात तोटा नाही, फक्त अशा नेत्यांकडे  कार्यकर्त्यांची फळी नाही. पुरोगामी विचाराने भारलेले कार्यकर्ते तयार करण्यासाठी नेत्यांनी आपण स्वतः स्विकारलेल्या विचारसरणीचा बदलत्या काळात अपेक्षित अभ्यास करून बदल स्विकारणे गरजेचं असते. फक्त मिडीयातील  भाट मंडळी, साहित्यिक, व अल्पसंख्याकांच्या धर्मगुरूंना आपल्या आश्रयाखाली ठेवून निवडणूका आजच्या काळात जिंकता येणार नाहीत ह्याचे भान ज्यांना नाही अशा नेत्यांनी संपूर्ण प्रांत धुंडाळला तरी तेवढी बाब फक्त कौतूकाची राहील पण निवडणूकीत अपेक्षित यश मिळत नसते. मग तो आपला पराभव आहे असे मान्य करणे हाच उपाय शिल्लक राहातो. श्री शरद पवारांनी आपला पराभव मान्य केला ह्यात त्यांचे मोठेपण आहे. परंतु त्यांची भाट मंडळी पवारांच्या पराभवाच्या स्विकृतीला राजकीय खेळी म्हणत, शरद पवार जे म्हणतात त्याच्या विरोधात कृती करतात असे समजून महाराष्ट्रात शरद पवार भाजपाचे सरकार पाडणारच असे मानत आपले समाधान मानून घेत राहतील. ही एक प्रकारे अंधश्रद्धाच. मग आपण पुरोगामीत्वाचा बिल्ला का लावता?   महाराष्ट्र टाईम्सचे संपादक कालच्या आपल्या अग्रलेखात शरद पवारांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन मोकळे झाले. मागे मी शरद पवाराच्या राजकारणावर एक लेख लिहीला आहे. त्यामध्ये त्यांनी केलेल्या चूकांमध्ये आज एका चूकीची आणखिन भर टाकतो आहे. ती म्हणजे जेव्हा राष्ट्रीय स्तरावर शरद पवारांनी श्रीमती सोनिया गांधीच्या विदेशी नागरिकत्वा संबंधी आक्षेप घेऊन स्वतःचा एक नवा पक्ष निर्माण केला व त्या पक्षाला राष्ट्रवादी हे बिरूद लावले तेव्हाच त्यांनी भाजपाला आपला मित्र पक्ष  म्हणून स्विकार करावयास हवा होता. जर नितीशकुमार भाजपाशी संगत करीत असेल तर शरद पवारांना कुठली अडचण होती? शरद पवारांनी कधी तिसर्या तर कधी चौथ्या आघाडीचे स्वप्न रंगवित राजकारण करण्याची भली मोठी चूक केली. ती चूक केली नसती तर शरद पवारांना आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी इतके परीश्रम करावे लागले नसते. मला वाटतं त्यांनी ह्या निवडणूकीत घेतलेल्या परीश्रमाची इतिहासात नोंद नक्की राहील पण जितेंद्र आव्हाड, अजित पवारा सारखे फटकळ शिष्य कधीही सुधारणार नाहीत.

आताच्या निकालावर स्थानिक व लोकल मुद्यांचा प्रभाव झाला आहे असे न्यूज चॅनेलवरील चर्चात भाग घेणारे राजकीय अभ्यासक म्हणत आहेत. ह्यात तथ्य आहे. पण मी मांडत असणारे मुद्दे त्यांच्या कल्पनातील मुद्यांपेक्षा भिन्न असण्याची शक्यता आहे. वस्तुस्थिती अशी आहे की ह्या अभ्यासकांकडे स्थानिक मुद्दे नाहीतच. स्थानिक मुद्याच्या आड राहून राष्ट्रवादाचा मुद्दा चालला नाही असे भासवून संघ, भाजपा, मोदी यांची उलटी गणती सुरू झाली आहे असे दाखवयाचे आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी असे प्रयोग पोटनिवडणूकीच्या निकालानंतर ही केले आहेत. वर्तमान लोकसभेचा काल संपेपर्यंत असाच रडीचा डाव ही मंडळी मांडत राहणार आहे. पण त्यांच्या हाती काही लागेल असे वाटत नाही. विधानसभेच्या निवडणूकीच्या वेळी जे काही स्थानिक मुद्दे पुढे येतात ते असे आहेत. 
१)मतदारसंघातील जिल्हा परीषद, पंचायत समितीच्या हलगर्जीपणामूळे लोकांना त्रास होत असतो. 
२)रस्त्यावर रात्रीच्या वेळी दिवे न लागणे, 
३)तलाठी कार्यालयातील कामात होणारा विलंब, 
४)रेशनिंग दुकानात माल वेळेवर न येणे 
५)विभिन्न व्यवसाय करणार्या मंडळीचे ज्यामध्ये शेतमाल, मच्छीमारी, कुटीरोद्योग, गाव-बाजारासाठी जागा, स्मशानासाठी जागा, आरोग्य केंद्र, छाटे रस्ते, रेल्वक्रासिगऐवजी छोटे पूल, सार्वजनीक वाचनालय, पाणवठे असे अनेक प्रश्न आहेत ज्याची तड स्थानिक पातळीवर होणे गरजेचे असते, ते सोडविण्यासाठी होणारा विलंब 
वरील यादी संक्षिप्त आहे. मतदारसंघ निहाय समस्यांचे स्वरूप ही भिन्न असतात, असे अनेक मुद्दे निवडणूकीच्या काळात मतदार उमेदवारा समोर पुढे मांडतात. पण ह्या समस्यांचे निराकरण व्हावे ह्यासाठी जनमताचा रेटा जितका तीव्र व्हावयास हवा तितका झालेला नाही असे दिसते. ज्या घटकांचा परीणाम निवडणूक निकालावर झाला आहे त्यांची नावे आहेत,  जात, स्थानिक नेत्यांची मनी व मसल पाॅवर, आणि स्थानिक नेत्यांचा खानदानी प्रभाव. आणि ह्या बाबतीत आजही काॅग्रेस व राष्ट्रवादी काॅग्रेस भाजपा पेक्षा अधिक पारंगत आहेत.  एकंदरीत प्रचारात शेती, आर्थिक मंदी, बेरोजगारी इत्यादी मुद्ये  दिसले नाहीत ह्याला कारणीभूत जितके राजकीय पक्ष जबाबदार आहेत तितके आपण मतदार ही जबाबदार आहोत. कारण आपण अनेक विषयावर सरकार विरूद्ध जी काही अंदोलने करतो त्यात स्वयंस्पूर्ती कमी आणि राजकीय पक्षांची राजकारणातील स्पर्धेचा प्रभाव अधिक असतो.

मिडीयात जी चर्चा सुरू आहे, त्यात शिवसेने पेक्षा भाजपाचा पराभव झाला असे मत मांडले जाते ते  भाजपाला एकटं पाडण्यासाठी दोन्ही काॅग्रेस व मिडीया ह्यांच्या राजकीय खेळीमुळेच. शिवसेना आघाडीला सोबत घेऊन सरकार स्थापन करेल असा सूर जो निघतो तो एक राजकीय स्टंट आहे.  हिंदुत्व विचारसरणीची पिछाडी झाली असे जर विरोधी पक्षांना वाटत असेल तर मग शिवसेनाचा पराभव झाला असे उद्गार विरोधी पक्ष तसेच मिडीयातील संपादक मंडळी का काढीत नाहीत? भाजपाला एकाकी पाडण्यात महाराष्ट्रातील काॅग्रेस व राष्ट्रवादी काॅग्रेसने पाच वर्षात जी शक्ती खर्च केली तिचा उपयोग स्वतःच्या पक्षाचे संघटन वाढविण्यात केली असती तर काॅग्रेस व राष्ट्रवादी काॅग्रेसचा फायदा अधिक झाला असता. राजकारणात शार्ट कट शोधून फार काळ यशस्वी होण्याचे दिवस संपले आहेत. कर्नाटकात जेडीएस व काॅग्रेसच्या सरकारचे काय झाले ? निदान केंद्रात भाजपाचे सशक्त सरकार अस्तित्वात आहे ह्याची जाणीव ठेवावयास हवी की नाही? जो पर्यंत राजकारणातील सामान्य ज्ञानाचा विसर पडत राहील  तो पर्यंत महाराष्ट्रातील विरोधी पक्ष व मिडीयातील त्यांची भाट मंडळी , डावे विचारवंत, साहित्यिक कम राजनेते, अल्पसंख्याकांचे धर्मगुरू भाजपाचा सपशेल पराभव करू शकणार नाहीत. तसे पाहता शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या १२४ जागातून ५६ जागावर विजय मिळाला आहे, ह्याचा अर्थ भाजपा व शिवसेनेचा स्ट्राईक रेट जवळपास सारखाच आहे. म्हणजे भाजपाचे नुकसान अधिक झाले असे म्हणता येत नाही. कारण निवडून आलेल्या भाजपाच्या बंडखोरांची संख्या जास्त आहे आणि ही मंडळी भाजपा सोबत जाणार हे निश्चीत. भाजपाचे जे काही नुकसान झाले आहे त्याचे कारण शिवसेनेला वाजवी पेक्षा अधिक महत्व दिल्यामूळेच. शिवसेनेला अधिक जागा देऊनही शिवसेनेला फायदा उठविता आला नाही ह्याबाबत मिडीयात चर्चा का होत नाही?  ह्याचे कारण विरोधकांनी संघ व मोदी ह्यांचा केलेला द्वेष हे होय. प्रिन्ट व इलेट्राॅनिक्स मिडीयात शिवसेनेच्या पदरी आलेल्या अपयशासंबंधी ब्र काढला जात नाही तिथे कान टोचण्याचे राहीले दूरच. म्हणून शिवसेनेच्या नेत्यांना २०१४ पासून Comfort Zone मध्ये राहण्याची सवय जडली जात आहे. शिवसेनेला एक प्रकारे saturation आलेले दिसते. शत प्रतीशत शिवसेना अशी ताकद निर्माण करण्याची इच्छाच शिवसेनेकडे राहीलेली नाही. म्हणून शिवसेना ५५ ते ६५ जागांच्या पलीकडे झेप घेत नाही. हा एक मोठा धोका आहे  हे शिवसेनेच्या शिर्षस्थ नेत्यांनी हेरण्याची गरज आहे व त्यावर तातडीने उपाय शोधावयास हवेत. त्यातला पहीला उपाय म्हणजे सत्तेत असताना युती धर्माला साजेसं वागणं हे होय. 

वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातील सर्वच पक्षांना अपेक्षा पेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. त्यामूळे सर्वच पक्ष दूःखी आहेत. पण त्यातील भाजपाच्या दुःखाचे स्वरूप इतर पक्षापेक्षा भिन्न आहे. भाजपाच्या दुःखाचे स्वरूप म्हणजे  मेरीटमध्ये येऊ शकणार्या किंवा मेरीटमध्ये येणाच्यी इच्छा धरणार्या एखाद्या हुषार विद्यार्थ्याच्या दुःखासारखे आहे. जसा तो हुषार विद्यार्थी  परीक्षेत मेरीट मध्ये न येता तो साठ ते सत्तर टक्के मार्क्स मिळवून उत्तीर्ण होतो तशाच प्रकारे भाजपा महाराष्ट्रात व हरयाणातील निवडणूकीत उत्तीर्ण झाला आहे. भले भाजपाने उसने अवसान आणून विजयोत्सव साजरा केला असला तरी भाजपाला आत्मपरीक्षण करावे लागणार आहेच. लोकसभेचा सलग दोनदा दारूण पराभव होऊन काॅग्रेस आत्मपरीक्षण करीत नसली तरी सुध्दा काॅग्रेसच्या महाराष्ट्रात व हरयाणात जागा वाढल्या आहेत. ह्याचे कारण काही ठिकाणी भाजपाला लोकांनी झिडकारण्यास सुरूवात केली आहे असेच दिसते. प्रत्येक वेळेस मोदीचा करीष्मा उपयोगी पडणार नाही. प्रत्येक वेळेस राष्ट्रवाद उपयोगी पडणार नाही. लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न राष्ट्रवादाच्या संकल्पनेत येत नाही काय? रोटी, कपडा, मकान ह्या गोष्टी राष्ट्रवादात अंतर्भूत नाहीत काय? राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचा राज्यस्तरीय पातळीवरच्या नेत्यांशी , राज्यस्तरीय नेत्यांचा जिल्हास्तरीय नेत्यांशी, जिल्हा स्तरीय नेत्यांचा तालूका स्वतरारील नेत्यांशी, व तालूका स्तरीय नेत्यांचा गावपातळीवरील कार्यकर्त्यांशी संपर्क बिघडत गेला की पक्षाचा संपूर्ण डोलारा कोसळावयास एका लोकसभेच्या निवडणूकीतला पराभव पुरेसा ठरतो. ह्याचे भान भाजपाला ठेवावे लागेल. बंडखोरी हा रोग प्रत्येक पक्षाला भेडसावत आहे. त्यामागची कारणे शोधावी लागतील. केवळ बंडखोरांनाच आरोपीच्या पिंजर्यात ठेवून राजकारण करणे हे लोकशाहीच्या मुल्यांशी विसगंत आहे हे लक्षात ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक पक्षाची आहे. ती पार पाडली न गेल्यास  नोटाचा पर्याय स्विकारण्याचे प्रमाण वाढत जाऊ शकते. संसद व विधानसभेतील गोंधळ, व राडा, सार्वजनिक व्यवहारातील लाचलुचपत, समाजातील वाढती गुन्हेगारी व अशांचा राजकारणातील प्रभाव, विद्यार्थी वर्गात पसरलेले बेशिस्तेचे वातावरण, नाचगाण्याचे चित्रपट, महिलांवर होणारे बलत्कार, कोणत्याही दुर्गुणाविषयी दिसून येणारी सामाजिक बेफिकिरी, पाहून प्रजेचा जर लोकशाहीवरील विश्वास उडाला तर कसले हिंदुत्व आणि कसला सर्वधर्भसमभाव उरणार आहे ? कसले व्यक्ती स्वातंत्र्य व कसले धार्मिक स्वातंत्र्य उरणार? आपल्या संस्कृतीत राजनीती, राजधर्म असे शब्दप्रयोग अस्तित्वात आहे ह्याचे भान सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ठेवावयास हवे. कारण समाजातील बहुतांशी लोक प्रवाह पतीत असतात. हाच काय तो महाराष्ट्रातील राजकीय सामन्याच्या निकालाचा खरा अन्वायर्थ असावा असे वाटते.

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

राजा (मतदार) कालस्य कारणम्



आपल्या महाराष्ट्र राज्याच्या परवा होणार्या विधानसभेच्या निवडणूकीत प्रथमच मोठ्या प्रमाणावर पक्षांतर व बंडखोरी झालेली पाहतो आहोत. युतीतील भाजपा व शिवसेना ह्या पक्षांकडे येणार्या राजकीय नेत्यांची संख्या अधिक आहे. अर्थात पक्षांतर करणारी ही मंडळी बहूतांश काॅग्रेस व राष्ट्रवादी काॅग्रेसची आहे.  भाजपा व सेनेतील नेत्यांनीही पक्षांतर केले आहे पण त्यांची संख्या अगदी नगण्य आहे. कारण जनमत भाजपा-सेना युतीकडे अधिक झूकलेले दिसत आहे. ह्याला आधार कोणता ? तर मे महिन्यात झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत भाजपा-सेना युतीला भरभरून मिळालेली मतें. साधारणतः अंदाजे विधानसभेच्या २२० मतदार संघात भाजपा-सेनेला मताधिक्य मिळाले असल्यामूळे पुन्हा तशाच प्रकारचे मतदान होईल असा अंदाज राजकीय अभ्यासकांनी मांडलेला आहे. तो किती खरा ठरेल हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. पण एक गोष्ट मान्य करावी लागेल की राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदींचा उदय झाल्यापासून विरोधी पक्षांची वाताहात झाली आणि त्यामूळे भाजपा-सेनेची सध्या चलती झाली आहे. तथापी पक्षांतर व बंडखोरीची लागण हा आपल्या राजकीय व्यवस्थेला जडलेला जुनाट रोग आहे. हे आपण विसरून कसे चालेल?

मागच्या लेखात मी म्हटले आहे की विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीतील बंडखोरीचा रोग नजिकच्या भविष्यात बरा होणार नाही. तसेच भ्रष्ट्राचार व फौजदारी खटले ज्यांच्यावर आहेत असे नेतेही निवडणूक जिंकू शकतात. काल परवा पर्यंत काॅग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादी काॅग्रेस मध्ये असलेले नेते पक्षांतर करून भाजपा व सेनातर्फे  निवडणूक लढविणारे नेते ही निवडून येऊ शकतात.  इतकेच काय स्वतःच्या पक्षाने तिकीट नाकारल्यामूळे अधिकृत उमेदवाराविरूद्ध बंडखोरी करून निवडणूक लढविणारे नेते सुद्धा जिंकू शकतात. लोकसभेच्या निवडणूकीत बंडखोरी व  पक्षांतरांच्या घटना कमी असतात पण विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत बंडखोरी तसेच पक्षांतराच्या घटना अधिक प्रमाणात दिसतात. असे का घडते ?

पक्षातंर तसेच बंडखोरी करणारे नेते  नैतिकेतेचा आव  आणत असले तरी खरें कारण लोकप्रतिनिधी होण्याची स्वतःची इच्छा हेच असते. सामान्यतः निवडून येण्याची शक्यता आहे असे ज्यांना वाटते तसेच तिकीट न दिल्यामूळे आपल्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करण्याची उर्मी ज्यांना असते असेच नेते पक्षांतर किंवा बंडखोरी करीत असतात. निवडून येण्याच्या ज्या काही शक्यता असतात त्यांचे मोजमाप स्वाभाविकपणे उमेदवाराकडे असलेल्या पैशाच्या ताकदीवरून केले जाते. त्याखालोखाल पक्षातील श्रेष्ठीचा वरदहस्त, जातीचा पगडा, प्रभाव टाकण्यासाठी असलेली मसल पाॅवर इत्यादींचा नबंर लागतो. पुष्कळदा उमेदवाराला  बंडखोरीची फूस वरीष्ठ नेत्यांपैकी एक-दोघांची असू शकते. कारण प्रत्येक पक्षात वरीष्ठ पातळीवर ही गटबाजी असते. काही वेळा स्थानिक पातळीवरील नाराज नेते बंडखोरी न करता  गुप्तपणे आपल्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करण्याचे कार्य करीत असतात. म्हणून विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत काही चमत्कारीक निकाल येत असतात. मग ह्या विजयाचे विश्लेषण करतेवेळी उगीच आपण नेते मंडळींना  चाणक्य अशी पदवी देऊन मोकळे होतो. निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर कोणालाच स्पष्ट बहूमत न मिळाले तर परस्पर आघाडी, व युती असली तरी आघाडीतील एक पक्ष व युतीतील एक पक्ष असे एकत्र येऊन विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थातील सत्ता काबीज करण्याच्या घटनाही आपण पाहील्या आहेत. असे का घडते? 

वरील दोन प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत असताना जे काही उत्तर गवसले आहे ते आपल्या पुढे ठेवतो पण तेच उत्तर बरोबर व अंतिम आहे असे नव्हे.

१) विधानसभा आणि स्थानिक संस्थाच्या निवडणूकीत पक्षांतर व बंडखोरी अधिक प्रमाणात होते ह्याचे कारण आपली राजकीय व्यवस्था संघीय (Fedaral) आहे त्यामूळे राज्याच्या सत्तेत बर्यापैकी अधिकार असतात. राज्यस्तरावरील सत्तेच्या शिडीला पायर्या कमी असतात. विधानसभेच्या जागा अधिक असतात. मतदारसंघाचे क्षेत्र कमी असते. त्यामूळे इच्छूकांची संख्या अधिक असते. त्यातून स्पर्धा व ईर्षाचे प्रमाण वाढते. मग प्रथम तोंडी बंडखोरी नंतर पक्षांतर किंवा लेखी बंडखोरी होते. ह्यावर राजकीय पक्षांकडे तसा उपाय नसतो. निवडणूक आयोग व संसदच उपाय तयार करू शकतात. आपण मतदार म्हणून पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुयोग्य उमेदवाराला निवडून द्यावयास सुरूवात करू तेव्हा हा तिढा सुटू शकतो. अन्यथा आपण लोकशाही व्यवस्थेत पुर्णपणे प्रगल्भ होऊ तो पर्यंत वाट पाहात बसणे हाच तूर्तास पर्याय दिसतो.  

२) नागरीक व मतदार म्हणून आपण सारे व्यक्तीपूजक आहोत. आपण घराणेशाहीचे भक्त आहोत. त्यामूळे राजकीय पक्षांच्या नेत्यांचे फावते. त्यामूळे राज्यात व देशात राजकारण हा काही घराण्यांचा खानदानी पेशा झाला. त्यामूळे सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता हे दृष्टचक्र आपल्या वाट्याला आहे.  पक्षांसाठी मिळालेला निधी हा प्रत्यक्षात एका व्यक्तीचा व त्या व्यक्तीच्या कुटुंबीय मंडळीच्या मालकीचा होत असतो. मग पक्षाची मालकी सुध्दा त्याच कुटंबीयांची होत जाते. कुटंबात सत्तेसाठी झगडे रामायण महाभारतात ही सापडतात.

३)आपण मतदार म्हणून तात्काळ मिळणार्या प्रलोभनाला भूलत असतो. मग ती प्रलोभने अंदाजपत्रकातून प्रत्यक्षपणे आलेली असो वा अप्रत्यक्ष वा गुप्त स्वरूपात निवडणूकीच्या प्रचाराच्या वेळी आलेली असोत.

४)आपण आपली जात--जमात, धर्म, या पलीकडचा विचार करू शकत नाही. त्यात कुठली ही जात-जमात अपवाद नाही. हिंदुतून धर्मांतर झालेले व अल्पसंख्यांचा दर्जा मिळालेले समाज बांधव सुद्धा अपवाद ठरले नाहीत. त्यामूळे शिया-सुनी वाद, अस्पृशता हे रोग अल्पसंख्यांकातही अस्तित्वात आहेत.

५)आपण कित्येक वेळा पुर्णतः निर्भयपणे मतदान करीत असतोच असे नाही. कारण राजकरणात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या सहभाग वाढला आहे. ज्यांच्याकडे माया (पैसे) आहे, ज्यांच्या कडे बल आहे, अशांच्या आहारी आपण अधिक जात असतो भले मग आपण साहित्यिक, लेखक, कवी, बुद्धजीवी, सुशिक्षीत असोत वा निरीक्षर असोत.

६)पुष्कळदा आपण स्वतः पुरोगामी म्हणून मिरवत असलो तरी आपला व्यवहार प्रतिगाम्यासारखाच असतो. आपण कितीही सर्वधर्म समभावाच्या गप्पा मारल्या तरी आपण आपल्या धर्माबद्दलची आत्मियता लपवू शकत नाही. कारण आपण सारे सांस्कृतिक दृष्ट्या एक आहोत ही भावना जी मोगलाई व ब्रिटीश राजवटीत विस्मृतीत गेली होती, ती पुर्ववत होण्यासाठी करावयास लागणारे जनजागरण करण्याचे कार्य स्वातंत्र्यानंतरच्या सरकारने केले नाही. उलट ब्रिटाशांनी सुरू केलेली फोडा व झोडा हीच नीती सत्तेसाठी चालू ठेवली. त्यासाठी शालेय व महाविद्यालयीन पातळीवरील इतिहास विषयाचा अभ्यासक्रम ठरविणार्या मंडळावर गुलामी मानसिकेतेचे विचारवंत बसविले. मग ते साम्यवादी असोत वा पाश्चात्य संस्कृतीला भाळलेले अँग्लो इडियन्स असोत. आपल्याहून नव्याने स्वतंत्र झालेला चीन सारखा देश आर्थिक व सामरिक दृष्ट्या आपल्या देशापेक्षा वरचढ ठरला आहे. दुसर्या महायुद्धात उध्वस्त झालेले जपान जर्मनी सारखे देश प्रगत देशाच्या यादीत आहेत ह्याचे कारण त्यांनी आपल्या मूळ संस्कृतीचा ढाचा तोडला नाही.

७)आपण अनाठायी कुठल्यातरी विचारसरणेशी फार चिकटून राहात असतो. ह्यात दुर्दैवाने काही साहित्यिक, कवी, धर्मगुरूंचा ही समावेश दिसतो. वस्तुस्थिती ही आहे की कुठलिही विचारसरणी टाकाऊ नसते तसेच चिरंतन टिकाऊ ही नसते. अर्थशास्त्र, परराष्ट्र धोरण, सुरक्षा, उद्योग, शिक्षण, आरोग्य, इत्यादी विषयीचे आपले ज्ञान अपूरे असले तरी आपण तावातावाने चर्चा करीत असतो. इतकेच काय हे जग म्हणजे आपले गाव आहे असे समजून आपण उदारमतवादी वा साम्यवादी म्हणून मिरवतो पण त्यातून  पुष्कळदा आपणच आपल्या देशाच्या संस्कृतीपेक्षा इतर देशांची संस्कृती उच्च समजतो. ' आपण सारे भारतीय आहोत ' अशी शपथ घेतो पण मूळ संस्कृतीला शुद्र मानतो. 

८)राजकीय नेते मंडळीच सर्वोच्च स्थानी आहेत आणि तेच आपले आदर्श अशी आपली समज होऊन बसली आहे. त्यामूळे सच्चे समाजसेवक, सच्च्या स्वयंसेवी संघटना, इत्यादींना गौण मानण्याची एक खोड आपल्यात रूजली आहे. त्यामूळे राष्ट्रीय पातळीपासून ते प्रादेशिक आणि पंचायत पातळीवरील छोटे मोठे राजकीय नेत्यांवर भष्ट्राचार तसेच फौजदारी आरोप असले तरी आपण त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळीत असतो.

९)सारे काही सरकारने करावे हीच आपली धारणा असते. पुष्कळदा  सरकार कडून फूकट कसे मिळेल ह्यावरच आपले लक्ष केंद्रीत करतो मग आपण आरक्षण, स्वतंत्र धार्मीक दर्जा, राज्याला खास दर्जा, अशा मागण्यासाठी रस्त्यावर येतो आणि आपली सृजनशक्ती गमावितो.

१०)सार्वजनिक या शब्दातील सर्वजनांमध्ये आपण स्वतः असतोच पण ते सोयीस्कर रित्या आपण विसरतो. त्यामूळे आपण सार्वजनिक मालमत्तेसंबंधी बेजबाबदारीने व्यवहार करतो. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छतेला आपणच जबाबदार आहोत.  पुष्कळदा आपण आपल्या शुद्र मागण्यांसाठी सार्वजनिक मालमत्तेची नासाडी करीत असतो. आपण अनाठायी आपल्या हक्काबद्दल जागृत राहतो, पण कर्तव्याकडे दुर्लक्ष करतो. राजा कालस्य कारणम या न्यायानूसार लोकशाही व्यवस्थेत निर्माण झालेल्या सार्या अनिष्ट प्रथांना, अव्यवस्थेला गलथानपणाला आपण ही जबाबदार आहोत असे मानणें योग्य नव्हे काय ?

११)आपली मिडीया मग ती प्रिन्ट असो वा इलेट्राॅनिक्स राजकीय घडामोडींना अधिक प्राधान्य देत असते. इतकेच नव्हे तर मिडीयातही अनेक विचारसरणीच्या लाॅब्या आहेत. असे ऐकू येते की ह्या लाॅब्या  केंद्र तसेच विविध राज्यातील मंत्रीमंडळाचा चेहरामोहरा वर प्रभाव टाकतात. जर मिडीया इतक्या हिराहिरीने राजकारणात रस घेत असेल तर स्वाभाविकपणे सोशल मिडीयावर  तसाच प्रकार घडणार. पुष्कळदा मिडीया घडलेल्या घटनांचे अतिरंजीतपणे वर्णन करते. ही सारी मंडळी ही मतदार आहेतच ना !

१२)आपली चित्रपटसृष्टी ही राजकरणापासून अलिप्त राहात नाही. चित्रपट सृष्टीतही निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, गीतकार, संगीतकार अनेक राजकीय नेत्यांचा आसरा घेतलेले दिसतात. क्रिडा-जगत, साहित्य-जगत, व्यापार उद्योग-जगत सगळीकडे अंतर्गत राजकारण आहेच शिवाय आपल्या आवडत्या  विचारसरणीच्या नेत्यांच्या भोवती ही मंडळी घुटमळत असतात. ह्या क्षेत्रातल्या मंडळींना, आपल्या व्यवसायातील कामानिमित्त सरकार दरबारी जाणं-येणं करावे लागते ह्यात गैर काही नाही पण आपल्या कामासाठी राजकीय नेत्यांची खास मेहरबानी व्हावी, अशी खास गैरकानूनी कामें आपण करावीच का ? जसे चित्रपट तसे समाजमन तयार होते. जसे साहित्य तसे समाजमन बनते. जशा जाहिरती तसा प्रतिसाद. मनुष्य हा सुद्धा एक प्राणी आहे. अनुकरण ही त्याची जन्मतः प्रवृत्ती. त्यातही आपल्या देशात अनेक भाषा अनेक प्रांत, अनेक जाती-जमाती मग आपण सिनेमा, नाटके, कथा, साहित्याची निर्मीती करतेवेळी काळजी घ्यावयास हवी की नाही? कुठल्याही क्षेत्रात मर्यादेचे उल्लंघन म्हणजे स्वातंत्र्य असा अर्थ काढण्याची सवय जडली की तो रोग बनतो. सिनेसृष्टी,  क्रिडाजगत ही आपल्या सारख्या सर्वसामान्यांची आवडती क्षेत्रं. आपण नागरिक आहोत, आपण मतदार आहोत हे भान ह्या क्षेत्रातील मान्यवरांनी ठेवावयास हवे असे आपण म्हणू तेव्हा  आपल्या सारख्या सर्वसामान्यांनी ही मनोरंजनातून समाज न दुभंगण्याचे भान  ठेवावयास हवेच की.

वरील सारं विवेचन हे संवादमय आहे. मी  जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा अभिमान बाळगणारा आपल्या सारखा एक सामान्य मतदार आहे. १९७७ च्या लोकसभेच्या निवडणूकीत  सत्ताधारी काॅग्रेसने आणिबाणी द्वारे लोकशाही गळा घोटला होता त्याचा निषेध म्हणून आपण सत्ताधारी काॅग्रेसचा मतपेटी द्वारें पराभव केला. रक्तहीन क्रांती म्हणून जगभर आपल्या लोकशाहीचा गौरव झाला. १९८० साली  मिड-टर्म निवडणूकीत जनता पक्षाचा पराभव करून पुन्हा काॅग्रेसला सत्तेवर बसविले ते ही मतपेटी द्वारें. पुढे केंद्रात सत्तातरें होत राहीले. काही काळ राजकीय अस्थिरता केंद्रात राहीली. शेवटी १९९९ पासून आपणच आघाडी सरकारचे युग निर्माण करून राजकीय अस्थिरता संपविली. २०१४ व  यंदाच्या मे महीन्यातील निवडणूकीत भाजपाला स्पष्ट बहुमताने केंद्रात सत्तेवर आपणच बसविले. तरीही भाजपाला सरकारचा चेहरा एनडीएचा  ठेवावा लागला आहे, कारण भाजपाला ही आपल्या सारख्या मतदारांचा वाटत असलेला धाक. हळूहळू देशभरातील प्रत्येक राज्यातील विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थातील निवडणूकीतही आपण मतदार म्हणून, लोकशाहीचे रक्षक म्हणून, मतदार राजा म्हणून आपला धाक राज्यकर्त्यावर ठेवू अशी आशा आहे. मी राजकीय अभ्यासक नाही. नीतीज्ञ व विचारवंत तर मूळीच नाही. साधा पत्रकार ही नाही. पण आपल्या देशातील राजकारणावर आपण नाराज असलो तरी आजच्या युगातल्या सुसंस्कृत मानव समाजाला लोकशाही हीच राज्यप्रणाली योग्य आहे असे मला वाटते, आणि तिला सुयोग्य बनविण्याचे कार्य आपल्या हातात असते. लोकशाही राज्यप्रणाली असो की एक पक्षीय राजवट असो देशाचा विकास कशावर अंवलबून असतो ह्या संबंधीचे एक वाक्य वाचनात आले आहे. ते मला फार भावले आहे. त्या वाक्यानीच या लेखाची समाप्ती करतो. ते वाक्य असे आहे "The progress of the nation is far less depend upon it's form of institution rather than character of it's own men. कुठल्याही देशाचा वा समाजाचा विकास तिथे कुठल्या प्रकारची राजप्रणाली आहे, ह्या पेक्षा तेथील नागरिकांच्या चारीत्र्यावर अधिक अवलंबून असतो."
                                   वन्दे मातरम |

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

राजकिय मैदानावरील सामना स्थान-महाराष्ट्र(खेळाडू व खेळ)



                        
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूका घोषित होण्यापुर्वी महाराष्ट्रात तसेच देशात सुरू झालेल्या घाऊक पक्षांतरावर लेख लिहीला. सलग दोन लोकसभेच्या निवडणूकीतल्या पराभवानंतर विरोधी पक्ष सावरलेले दिसत नाहीत त्यामूळे महाराष्ट्र व हरियाणा विधानसभेच्या निवडणूकीत  विरोधी पक्षांचा  पराभव होईल असे दिसू लागल्यामूळे लेख लिहीण्याचे टाळले होते. पण महाराष्ट्रातील एक बडा नेता श्री शरद पवार ह्यांना ईडी कार्यालयाने नोटीस पाठविल्यानंतर मिडीयात कमालीची चर्चा सुरू झाल्यामूळे लेख लिहावा असे वाटले. लेखाचे शिर्षक राजकीय मैदानावरील सामना ( स्थान महाराष्ट्र) असे असले तरी सर्वच राज्यातील राजकीय मैदानात बरेच साम्य आहे. फक्त खेळाडूंची नावे भिन्न आहेत इतकेच. बाकी सामना भाजपा विरूद्ध विरोधी पक्ष असेच चित्र आहे. आणखिन दहा वर्षे तशीच स्थिती राहील असे दिसते. पुर्वी  राजकीय मैदानात फक्त राजकीय नेतेच खेळत असत. पण गेल्या पाच वर्षापासून विरोधी पक्षांच्या वतीने मिडीयातील पत्रकार, संपादक, विचारवंत, साहित्यिक, धर्मगुरू, कलाकार इत्यादी मंडळी राजकीय मैदानात उतरलेली दिसत आहे. त्यांची भाषा समाजहिताची, समाजसेवेची, देशाच्या भविष्याची चिंता अशी असली तरी ही मंडळी सुद्धा राजकीय मैदानातील खेळाडूच आहेत. कारण ह्या मंडळींनी कितीही सोज्वळपणाचा आव आणला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीच्या विरोधात असलेल्या विविध कम्पूतील रोजगाराच्या सुचीवर ही मंडळी आहे. आणि ह्यांच्या खेळासंबंधी मी अनेक लेखात निर्देश करीत असतो. त्यामूळे लेखाच्या शेवटी यावर चर्चा करू. प्रथम राजकीय मैदानात उतरलेल्या खेळाडूंचा खेळ कसा आहे ह्यावर चर्चा करू या. सुरूवात अर्थातच राजकारणातले महान खेळाडू श्री शरद पवार ह्यांच्या पासून सूरू करीत आहे.

                           १) श्री शरद पवार 

सतराव्या लोकसभेच्या निवडणूक प्रचार काळात १४ मार्च २०१९ ला ' शरद पवारांची निवडणूकीतील माघार की हार ' या शिर्षकाचा एक लेख मी लिहीला आहे. त्यामध्यें पवारांनी राजकारणात कुठे  आणि कशा प्रकारच्या चूका केलेल्या आहेत ह्याबाबत मी सविस्तर मांडले आहे. पंतप्रधान नरसिंहरावांच्या सरकारात असतेवेळी नरसिंहरावांशी मिळते जुळते न घेतल्यामूळे उल्हास नगरचे आमदार पप्पू कलानी आणि वसईतील हिंतेद्र ठाकूर ह्यांना टाडा खाली अटक करून तत्कालीन पंतप्रधान नरसिंहरावांनी पवारांचे पंख छाटून टाकले तेव्हापासून शरद पवांराची राजकारणातील भरारी राष्ट्रीय पातळी वरून घसरत फक्त पश्चीम महाराष्ट्रापुरती सिमीत राहिली. महाराष्ट्र सहकारी बँकेतील घोटाळ्यात प्रथम दर्शनी शरद पवारांचा हात असू शकतो असे न्यायालयाने मानले व त्यांच्यावर नोटीस पाठविण्याचा आदेश दिला.  शरद पवारांवर मिडीयातील लोकांचे फार प्रेम असल्यामूळे त्यांनी शरद पवारांवर झालेला भ्रष्टाचाराचा आरोप जणू आपल्यावर आरोप झाला आहे असे मानून  ईडीची आलेली नोटीस शरद पवारांना राजकीय बळ मिळवून देणार आणि आता राष्ट्रवादी काॅग्रेसची महाराष्ट्रात हवा निर्माण झाल्याचे चित्र उभे केले. एके ठिकाणी शरद पवार ईडीच्या कार्यालयात स्वतःहून जावयास निघाले असता दुसरीकडे त्यांच्या पुतण्यांनी म्हणजे अजित पवारांनी विधानसभेच्या सभासद सदस्यात्वाचा राजीनामा देऊन राजकीय संन्यासाची घोषणा केली. त्यामूळे शरद पवार ईडीच्या कार्यालयात स्वतःहून हजर राहण्याची चाल खेळले खरे पण ती चाल उलटी त्यांच्याच अंगावर आली. त्यांच्या पुतण्यांनीच अडथळे निर्माण केले. शेवटी घराणेशाही वर आधारीत राजकीय पक्षांच्या सर्वोच्च खानदाना अंतर्गत सत्तेची स्पर्धा असते, त्याला पवार घराणे अपवाद कसे ठरेल असा अर्थ काढून सर्वसामान्यांनीं काका पुतण्याच्या शह-काटशहावर सोयीस्कर रित्या दुर्लक्ष केले. त्यामूळे मिडीयातील शरद पवारांच्या चमच्यांचा भ्रमनिरास झाला हे नक्की. नंतर अजित पवारांनी सावरण्याचा प्रयत्न केला पण तो निरर्थक ठरला.

मुळात दिल्लीतील युपीए सरकारचा दहा वर्षाचा कारभार व महाराष्ट्रातील काॅग्रेस व राष्ट्रवादी काॅग्रेसच्या आघाडी सरकारचा पंधरा वर्षाच्या कारभारासंबंधी सामान्य जनतेत असलेला रोष अजूनही कमी झालेला  नाही. त्यामूळे ईडीने शरद पवारांना नोटीस पाठविल्यामूळे महाराष्ट्र पेटून उठेल व शरद पवाराची लाट निर्माण होईल असा अंदाज बांधणार्यांचे हसे झाले आहे. कारण असे अंदाज बांधणारी मंडळी घराणेशाही पक्षातील सर्वोच्च घराण्यातील सदस्यांपेक्षा त्या घराण्यावर अधिक निष्ठा दाखवित असतात. अशा मंडळीत घराणेशाही पक्षांचे समर्थक व कार्यकर्तेही असतात. ही मंडळी सोशल मिडीयावर अशा काही उड्या मारत असतात की जणू ह्यांना वेड लागलेय की काय असे वाटून जाते. लोकसभेच्या निवडणूकीत केंद्रात मोदी सरकार सत्तेवरून पायउतार होणार असे छातीठोकपणें सांगत ही मंडळी नाचत होती. परीणाम काय झाला ?  ह्यांच्या बहुतांश धन्यांचा सपशेल पराभव झाला. साधारणतः सत्ताधारी पक्षावर मुद्यांच्या आधारे टिका करण्याचे सोडून व्यक्तीगत टिकेचा अतिवापर झाला की विरोधी पक्षांचा दारूण पराभव होतो. कित्येकदा घराणेशाही पक्षांच्या पराभवाला कार्यकर्तेच अधिक जबाबदार आहेत असे आता वाटू लागले आहे. सर्व राजकीय पक्षांचे पहील्या व दुसर्या फळीतील नेते आपआपसात संधान बांधून असतात. त्यामूळे अशा नेतेमंडळींचे सतत पक्षातंरे होत असताना आपण पाहात असतो. सध्यातरी आपल्या राजकीय व्यवस्थेत यावर उपाय नाही.  विरोधी पक्षातील घराण्याची चलती नाही असे दिसते. महाराष्ट्रात शरद पवारांना ईडीची नोटीस आली म्हणून त्या विरोधात आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काॅग्रेसने केला तरी मतदार साथ देतील असे वाटत नाही. कारण शरद पवारांना ईडीची आलेली नोटीस ही कोर्टाकडून आलेली आहे इतकं सामान्य ज्ञान मतदारांपाशी आहे. त्यामूळे महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूकी संबंधी विविध सर्वेनी काढलेला अंदाज खरा ठरेल असे दिसते.

                            २) श्री आदित्य ठाकरे 

ठाकरे घराण्यातील आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अर्ज भरला यासंबंधी फारसे आश्चर्य वाटत नाही. कारण निवडणूक न लढविता राजकरणात राहणे ही बाब शिवसेना प्रमूख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाय अजून तरी कोणाला जमलेले नाही. उद्धव ठाकरे व राज ठाकरे निवडणूक न लढविता राजकारण करीत असले तरी स्वर्गीय बाळासाहेबांचा करिष्मा वेगळ्या थाटाचा होता हे सर्वमान्य आहे. आदित्य ठाकरे हे निवडून येतील याबाबत शंका नाही. कारण वरळी हा सेनाभवनच्या अगदी नजीकचा मतदारसंघ आहे. आदित्य ठाकरें युवा सेनेचे अध्यक्षपद भूषवित  असल्यामूळे ते राजकारणात नवखे आहेत असे मानता येत नाही. तरी ही  त्यांच्या कार्यशैली संबंधी इतक्या लौकर मतप्रदर्शन करणे शक्य नसते. त्यामूळे त्यांच्यावर  टिका करणे प्रशस्त ठरत नाही. असे असले तरी आदित्य ठाकरे ह्यांच्या विरूद्ध काॅग्रेस आघाडीचा उमेदवार असणारच. त्यामूळे आदित्य ठाकरे एक बच्चा आहे अशी टिपण्णी विरोधी पक्षांकडून ऐकावयास मिळणार आहे. त्याला आदित्य ठाकरे कसे प्रत्युत्तर देतात हे पाहणे एक अभ्यास आहे. हा अभ्यास पत्रकार तसेच राजकीय विश्लेषकांसाठी आहेच पण आदित्य ठाकरे ह्यांच्यासाठी अधिक महत्वाचा आहे. कारण एखाद्या घराण्यात लोकोत्तर व्यक्ती होऊन गेली असेल तर तिसर्या पिढीवर दबाव अधिक असतो मग क्षेत्र कुठले का असेना ! तुर्तास आदित्य ठाकरे ह्यांना हार्दिक शुभेच्छा !

                             ३)श्री छगन भूजबळ 

दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधण्यात भ्रष्टाचाराचा आरोप होऊन कारावास भोगून आलेले छगन भुजबळ विधानसभेची निवडणूक लढवीत आहेत ही बातमी मुळीच आश्चर्यकारक नाही. तामीळनाडूमधील ए राजा, डीएमके सुप्रिमोच्या कन्या, बिहारचे लालू प्रसाद यादवासारखे भ्रष्टाचाराचा आरोप असलेले अनेक नेते राजकारणात सक्रीय राहात आलेले आपण पाहात आहोत. भ्रष्टाचार व फौजदारी असे दोन्ही प्रकारचे आरोप असलेले उमेदवार ही निवडणूकीत यशस्वी झालेले आपण पाहातो. त्यामूळे निवडणूकीत निवडून येण्याचे निकष जे  राज्यशास्त्र या विषयात आपण अभ्यासिले आहेत ते ही कधी कधी  खोटे ठरतात. असे का होते, आणि कुठपर्यंत असे चालणार ह्याबाबत निदान विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था संबंधीत ठोस असे उत्तर नजिकच्या भविष्यात देता येईल असे वाटत नाही. त्यामूळे छगन भुजबळ निवडून आले तरी आश्चर्य वाटणार नाही.

                ४) श्री एकनाथ खडसे निवडणूक

हा लेख लिहावयास घेतला तेव्हा एकनाथ खडसे ह्यांचे बंड थंड झाल्याची बातमी ऐकू आली. समजा एकनाथ खडसेंनी बंड करून निवडणूक लढविली असती तरी ते निवडून आले असते असे म्हणण्यास वाव आहे. कारण त्यांची केस छगन भुजबळासारखीच आहे. मुक्ताईनगर मधून त्यांच्या पसंदीच्या उमेदवारास भाजपा तिकीट देईल असे त्यांना आश्वासन दिल्याचे कळते. खडसेंना तिकीट नाकारून त्यांच्या पंसतीचा उमेदवारास तिकीट देण्यामागचे तर्कशास्त्र काय आहे हे कळत नसल्यामूळे इथेही भुजबळासारखे अर्थशस्त्र महत्वाचे ठरले  असे गृहीत धरू या.

                          ५) श्री विनोद तावडे

विद्यमान कॅबीनेट मंत्री आणि काॅग्रेस आघाडी सरकारच्या काळात  विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेता म्हणून काम पाहीलेले विनोद तावडे हे भाजपाचे महाराष्ट्र राज्यातील पाच बड्या नेत्यापैकी गणले जातात. त्यांना निवडणूकीसाठी तिकीट नाकारण्यात आले ही वृत्तपत्रासाठी ठळक बातमी ठरली ह्या संबंधी आश्चर्य वाटले नाही. विनोद तावडे ह्यांना तिकीट नाकारले जाऊ शकते असा अंदाज मी बांधला होता.  पंतप्रधान नरसिंहरावांना आव्हान देण्याची शरद पवारांनी जी घोडचूक केली तशीच चूक विनोद तावडे ह्यांच्या हातून घडली असावी. ' राष्ट्राध्यक्ष वा पंतप्रधान तसेच राज्याचा मुख्यमंत्री ही अशी पदे आहेत ज्यांची ताकद ही विरोधी पक्षांच्या नेत्यांपेक्षा सत्ताधारी पक्षांच्या बड्या नेत्यांना अधिक जाचक ठरत असते. हा जागतिक स्तरावरील राजकारणाचा ट्रेंड वा पोत आहे.  श्री विनोद तावडे ह्यांनी २०१४ साली विधानसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तोच मूळी चुकीचा होता. त्यात त्यांनी विले पार्ले येथून निवडणूक न लढविता बोरीवली सारख्या सुरक्षित मतदारसंघाची निवड केली. पक्षाने ती मान्य केली. ह्यासंबंधीची जाणीव विनोद तावडे यांनी ठेवली नसावी. तसेच त्यांचा कोकणात असा खास मतदारसंघ ही नसावा. त्यातच युतीमधील जागेच्या वाटाघाटीत शिवसेना कोकणातील वर्चस्व सोडावयास तयार नसते. शिवाय खडसे प्रमाणे तावडेचीं प्रतिमा मातोश्री मध्ये कट्टर विरोधी अशीच राहील्याचे आपण ऐकत आलो आहोत. आणखिन एक कारण असे आहे की विनोद तावडे ह्यानी अटल स्मृती सारखा भव्य प्रकल्प उभा केला असूनही  खासदार गोपाळ शेट्टींच्या ताकदीवर तावडे निवडून आले असा सुर ऐकू येत होता तो पाच वर्षे उलटली तरी बंद झाला नाही. खासदारापेक्षा राज्यातील कॅबीनेट मंत्र्याचे काम व स्वभाव अधिक लोकाभिमूख असावयास हवा हा विधानसभेच्या निवडणूकीतला आपोआप बनलेला एक नियम आहे. त्याला पक्ष कारणीभूत ठरत नाही. शेवटी जगभरातील राजकारणात सरकार वा पक्षात ज्याच्याकडे अधिक अधिकार आहेत त्यांच्याच शब्दाला अधिक किंमत असते.

          ६)श्री देवेंद्र फडणवीस व श्री उद्धव ठाकरे 

महाराष्ट्रात पुर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री पदावर राहण्याचा विक्रम विद्यमान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणविसांच्या नावावर झाला आहे ह्यावरूनच फडणवीस प्रशासकीय व सत्तेच्या खेळातील एक बडे माहीर आहेत हे सिध्द झाले आहे. जनमानसात त्यांची प्रतिमा निःकलंक आहे. त्यामूळे केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही टॅग लाईन सर्वतोमुखी झाली. म्हणून मैदानावरील त्यांच्या कार्यक्षमतेसंबंधी अधिक काही बोलायची गरज उरलेली नाही. २०१४ च्या निवडणूकीत महाराष्ट्रातील चार प्रमुख पक्षांनी स्वतंत्र रित्या निवडणूका लढवून आपआपली ताकद अजमाविली. चारही पक्षांच्या नेत्यांनी परस्परांवर अशी काही चिखलफेक केली होती की हे चार ही पक्ष जणू विधानसभेची निवडणूक मैदानात नसून युद्धभूमीवर युद्ध लढताना दिसले. काॅग्रेस व राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष मोदींच्या लाटेमुळे लुळे-पांगळे झाले, तर शिवसेनेला छोट्या भावाच्या भुमिकेत जावे लागले. सत्तेत राहूनही शिवसेनेने भाजपा सरकारवर टिका करण्याचे सत्र सुरू ठेवले. भाजपा-सेनेमधील कलगीतुर्याचं स्वरूप  उत्तरप्रदेशमधील बुवा आणि बबूआ (मायावती व अखिलेश) ह्याच्यामधील राजकीय खेळासारखे झाले हे मी ब्लाॅगवरील लेखात नमूद केलेले आहे. मायावती व अखिलेश यादवांनी काॅग्रेस व भाजपाला उत्तरप्रदेशमधून उखडून काढले होते. त्यातील भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये सत्ता काबीज केली पण काॅग्रेसचे अस्तित्वच संपले. तसाच खेळ फडणवीस व उद्धव ठाकरें मांडत गेले पण त्यात शिवसेनेचं  अधिक नुकसान होईल असे भाष्य मी केले होते. आज शिवसेनेला छोट्या भावाची भूमिका स्विकारावी लागली. याची कारणे चार आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे  देश व आतंरराष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी नावाच्या नेत्याचा उदय व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला मिळत जाणारा वाढता प्रतिसाद. दुसरे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांचे सक्षम प्रशासकीय कौशल्य व जनहितासंबंधीची त्याची तळमळ. तिसरे कारण शिवसेनेच्या नेत्यांना सोडवता न येणारी सत्तेची उब. चौथे कारण म्हणजे स्वबळावर सेनेची सत्ता बाळासाहेबांच्या हयातीत येऊ शकली नाही तिथे उद्धव ठाकरेंच्या करिष्म्यावर येणार नाही ह्याची सेना नेत्यांना झालेली जाणीव. त्यामुळे सत्तेतून आपल्या पुत्राचा राजकारणात जम बसविण्याच्या कामाला प्राधान्य देणे उद्धव ठाकरेंना आवश्यक वाटले असावे. कदाचित भाऊ तोरसेकरांनी म्हटल्या प्रमाणे शिवसेनेला बर्यापैकी जागा जिंकता आल्या  तर आदित्य ठाकरेसाठी उपमुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेता येऊ शकते.  हा हिशोब उद्धव ठाकरेनी केला असावा. तसे झाले तर आदित्य ठाकरेंचा राजकारणात जम बसणे अधिक सोपे जाईल. म्हणून कमी जागा लढविण्यात उद्धव ठाकरेंची नामूष्की  नसून राजकीय शहाणपण आहे असेच मानावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे या जोडीच्या फिरकी( विशेषतः गुगली) चेंडूचा विरोधी पक्षांतील फलंदाजांना अंदाज आला नाहीच पण भाजपा व शिवसेना मधील फलंदाजांना ही अंदाज आला नाही. त्यामूळे राज्यभरातील अनेक फलंदाज बाद झाले आहेत. त्यासंबंधीचे रोजचे समालोचन वृत्तपत्रातून व न्यूज चॅनेलवरून आपण पाहातो आहोत, ऐकतो आहोत, आणि वाचतो ही आहोत. म्हणून आता आपण या लेखाच्या सामारोपाकडे वळू या.

एकंदरीत काॅग्रेस व मित्र पक्षांची लोकसभेच्या निवडणूकीत जी दाणादाण उडाली त्यातून त्यांना सावरता आलेले दिसत नाही. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीतील निकाला संबंधी जे सर्वे येतात त्यावरून युतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल असेच दिसते. श्री शरद पवार निकराची लढाई लढत आहेत. त्याबद्दल त्यांचे कौतूक जरूर आहे. पण ही झाली सत्तेची लढाई. विचाराची लढाई ते का हरले आहेत यावर त्यांनी चिंतन केले नाही. महाराष्ट्र दिल्लीपुढे वाकला नाही हे वाक्य स्वातंत्र्यानंतर फक्त चिंतामणराव देशमूख ह्यांच्या मुखी शोभते. शरद पवारांनी दोन वेळा काॅग्रेस सोडली व नंतर पुन्हा काॅग्रेसमध्ये वापसी केलेली आपण पाहीली आहे.  शेवटी संरक्षण मंत्रीपदाऐवजी  सोनियाच्या जवळ जाऊन कृषीमंत्रीपदावर समाधान मानणार्या शरद पवारांना ताठ पाठीचा (मराठी बाण्याचा) कणा आहे, असे मराठीचींया नगरीत किती लोक मानतील ? आणि हा प्रश्न निवडणूकीतला मुद्दा बनला तो स्वतः शरद पवार व त्यांच्या  मिडीयातील संपादक, विचारवंत, व साहित्यिकांच्या रूपाने त्यांच्या सोबत असलेल्या राजकीय खेळाडू मुळेच ना !

महाराष्ट्रातील सहकारी बँका, सहकारी कारखाने, सहकारी दुध, फळे भाज्या, कापूस इत्यादी संस्था कंगाल का झाल्या? जे काही वाटोळे झाले आहे ते फक्त या पाच वर्षात झालं आहे असे मतदाराने समजावयाचे आहे का ? महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील सरंमजामशाही वृत्तीने सत्ता उपभोगलेल्या सार्या विरोधी पक्षांना विचारलेला हा प्रश्न आहे. विरोधी पक्ष व झाडून सारे विरोधी पक्षांचे मिडीयातील समर्थक व विचारवंत भाजपा मतदारांना राष्ट्रवादाची मोहनी घालते असा आरोप करीत आहेत.  राष्ट्रवाद हा लोकांच्या अंतःकरणाला भिडणारा विषय आहे. आपले कार्य निःसंदेह त्यागातीत असेल तर तीच मंडळी जनतेपुढे राष्ट्रभक्तीचा आदर्श मांडू शकतात व लोक ही त्यांच्याच आवाहनाला प्रतिसाद देत असतात. एअरकंन्डीशन घर, ऑफीस मध्ये बसलेली व वेळोवेळी मिडीयात चमकत राहणारी मंडळी कितीही विद्वान असली तरी लोकांसाठी आदर्श बनू शकत नाहीत. सध्यातरी आपल्या देशात संघाच्या मुशीतून तयार झालेले भाजपाचे जे खेळाडू आहेत त्यांना जनतेचे समर्थन मिळत आहे.  भाजपा व मोदी सरकार भगवा आंतकवाद राबवीत आहे असे आंतरराष्ट्रीय समुदाय मानत असते तर आज पंतप्रधान मोदींचा व भाजपा सरकारचा जगभर इतका बोलबाला दिसला नसता.

भारतीय राजकरणातील वस्तुस्थिती अशी आहे की विरोधी पक्षांना पंतप्रधान मोदी, अमीत शहा,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इत्यादींचा विरोध करण्यासाठी मुद्देच शोधता येत नाहीत. सारे विरोधी पक्ष चक्रव्युहात अडकले आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी ज्यांनी मदत करावयास हवी अशी संपादक, विचारवंत, साहित्यिक मंडळी  मोदी, भाजपा, व संघावर अशा रितीने आगपाखड करीत आहेत की त्यांचेच शब्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान आपल्या मुखी ठेवून संघ व भाजपा वर टिका करीत आहेत. ह्याचमूळे सार्या विरोधी पक्षांची मोठी कोंडी झाली आहे हे मी ह्याच ब्लाॅगवरील ' इम्रानखान व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ' ह्या लेखात विस्तृतपणे दिलेले आहे. विरोधी पक्षांची एक बी टिम आहे, ज्यात विचारवंत, राजकीय अभ्यासक, साहित्यिक, पत्रकार, संपादक महाशय, अल्पसख्यांचे काही धर्मगुरू, सेलीब्रीटी कलाकार इत्यादी खेळाडू आहेत. त्यांनी प्रथम संघ--भाजपा प्रणीत हिंदुत्व, व सांस्कृतिक राष्ट्रवाद या विषयावर खुल्या मनाने चर्चा करावयास हवी. मिडीयातील पोपटपंचीय शहाणे व अल्पसंख्याकांचे दिडशहाण्या धर्मगुरूंनी सुरू केलेले  पांडीत्य पाजळण्याचे काम  सोडून द्यावयास हवे. गेली पाच वर्षे असहिष्णूता, अघोषित आणिबाणी, इत्यादी मुद्यांच्या पलिकडे ह्यांचे पांडीत्य पुढे सरकतच नाही.  अवती-भावती भाटगिरी करणार्या मंडळींची गर्दी दिसली म्हणजे बदलते समाजमन समजते अशा स्वप्नात ही मंडळी का रमत आहे हे समजण्याच्या पलिकडचे आहे. भाजपामध्ये सर्व काही आलबेल आहे, असे मी मानत नाही पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची सेवाभावी वृत्ती आणि देशभक्तीचे कौतूक करण्याचे सौजन्य ह्यांच्यापाशी नसेल तर ह्यांना पुरोगामी ह्या शब्दाचा अर्थ कळलेला दिसत नाही असे मानावे लागते. साने गुरूजींच्या भारतीय संस्कृती ह्या पुस्तकातले धडे ह्यांनी पुन्हा पहील्यापासून गिरवायला सुरूवात करावी आणि त्यानुसार वागण्याचा, बोलण्याचा प्रयत्न करावा. स्वातंत्र्यपुर्व काळातील काॅग्रेसच्या अध्यक्षा ॲनी बेंझट ह्यांनी हिंदू संस्कृती जगभरातील अनेक संस्कृतीची जननी आहे असे स्पष्टपणे व निर्भीडपणे मांडले आहे ह्याची जरा तरी आठवण या मंडळींनी ठेवायला हवी की नाही? झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टिका करता करता यांच्या हातातील एकेक राज्य असे करता देश निसटला, आणि आता देश संकटात आहे असे म्हणत गावभर फिरत जात आहात जोडीला ह्यात राजकारण नाही असे म्हणत आहेत. हा ढोंगीपणाचा कळस आहे. भारत बदलला आहे. एक समर्थ सरकार भारतात कार्यरत आहे. भारताचा पंतप्रधान जगातील समर्थ नेत्यांत गणला जात आहे. भारतातील या बदलाचं जागतिक समुदाय स्वागत करीत असताना दिसत आहे, अपवाद आपल्या येथील डावे,  समाजवादी व सर्वधर्मसमभावी विचारवंत, साहित्यिक, धर्मगुरू, आणि पाकिस्तान व चीन. सामान्यातला सामान्य मतदाराला हे पटत आहे. तो शांतपणे मतपेटीद्वारें ढोंगी लोकांना आपली जागा दाखवित असल्याचे अनुभवयास येत आहे. ह्यापेक्षा महाराष्ट्रातील निवडणूकीतल्या निकालाचा अंदाज स्वतंत्र रित्या मांडण्याची गरज तरी कुठे उरते ?

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...