मंगळवार दिनांक २७ आगस्ट २०१९ रात्री घरी परतल्यावर टिव्ही ऑन केला तर NewsX चॅनेलवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान ह्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंबंधी केलेल्या वक्तव्यावर चर्चा सत्र सुरू होते. चर्चा सत्रातील सर्व मान्यवरांनी इम्रानखानच्या वक्तव्यावर कडक ताशोरे ओढले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपाला देशवासियांनी एकजुटीने विरोध करावा असे मत मांडले. एकूण चर्चेचा सुर व स्वरूप पाहून समाधान वाटले. प्रथम इम्रानखान ह्यानी त्यांच्या देशाला संबोधन करताना, काय म्हटले आहे ते पाहू या. इम्रानखानने म्हटले की, ' काश्मीर मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गुंडगिरी सुरू केली आहे ; मोदी सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एजंडा राबवित आहे ; राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदूची फॅस्टीट संघटना आहे.' इतर न्यूज चॅनेलवर इम्रानखान यांच्या वक्तव्यावर चर्चा सत्र झाले की नाही ह्या संबंधीची मला कल्पना नाही. पण बुधवारच्या मटा मध्ये इम्रानखानच्या वक्तव्यासंबंधी साधी बातमी ही नव्हती. बहूतांश प्रिन्ट मिडीया आणि इलेट्राॅनिक्स मिडीयाने इम्रानखानच्या या वक्तव्याची दखल घेतली नाही, म्हणून हा लेख प्रपंच.
प्रथम आपण इम्रानखान यांनी असे वक्तव्य का केले असावे यावर चर्चा करू या. एकंदरीत जम्मू आणि काश्मीर राज्यातील ३७० आणि ३५ अ कलम हटविल्यानंतर पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. भारताने बालाकोट वर एअर स्ट्राईक करून पुलवामा वर केलेल्या हल्ल्याचा बदला घेतला. भारत असा काही बदला घेईल असे पाकिस्तानला वाटले नाही तसेच आतंरराष्ट्रीय समुदायाला ही वाटले नाही. आतापर्यंत सहिष्णूता आणि विश्वशांतीच्या स्वप्नात रमलेल्या भारताच्या ओळखीची सवय जडेलेले सारे जग खडबडून जागे झाले. पाकिस्तान तर गोंधळलेल्या स्थितीत गेला. काय करावे असा प्रश्न पाकिस्तानला सतावू लागला. आंतरराष्ट्रीय मंचावर दशहतवाद्यांचा खात्मा झाला पाहीजे असे सतत मांडत राहण्याची भारताच्या नीतीने सार्या जगाला आपलेसे करून घेतल्या मुळे बड्या देशाची भारतावर डोळे वटारण्याची हिम्मत झाली नाही. पण पाकिस्तानची मात्र जगभर नाच्चकी झाली. युद्धनीतीमध्ये असे म्हटले जाते की ' शत्रूला प्रथम बेसावध करून गाठायचे म्हणजे त्याला गोंधळात टाकावयाचे. मग आपोआप शत्रूमध्ये अस्वस्थता निर्माण होते. अस्वस्थतेतून शत्रू पक्ष अस्थिरतेकडे सरकतो मग शत्रू आपोआप दिशाहीन होतो. पाकिस्तानात गोंधळाची, अस्वस्थेची, अस्थिरतेची स्थिती झाली असतानाच भारत सरकारने जम्मू आणि काश्मीर राज्यातील कलम ३७० व कलम ३५ अ तडकाफडकी हटवून दोन्ही प्रेदशाचा ताबा आपल्याकडे घेतला. काश्मीरचे स्वतंत्र अस्तीत्व संपले आहे. तिथे भारतीय संविधान लागू झाले आहे. तेथे कुठल्याही स्थानिक पक्षांची चाललेली मनमानी पुढे सुरू राहणार नाही. आता काश्मीरमध्ये काही ऊठाठेव वा आगळीक केली तर तो भारताच्या सार्वभौमत्वा वर हल्ला मानण्यात येईल. त्यावर भारत पाकिस्ताला सडेतोड उत्तर देईल आणि सोबत देशांतर्गत अलगावाद्यांच्या कारवाया मोडीत काढू शकेल. एका अर्थाने भारताने आपली जम्मू व काश्मीर संबंधीची भूमिका फक्त पाकिस्तानलाच नव्हे तर सार्या जगापुढे मांडली आहे. वाचकांना ठाऊक असेलच की पाकचे पंतप्रधान इम्रानखान यांचा अलिकडे अमेरीकेचा दौरा झाला तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इम्रानखान समवेत झालेल्या चर्चेत काश्मीर प्रश्नात अमेरिका मध्यस्थी करावयास तयार आहे असे आश्वासन दिले होते. ते हवेत विरण्याच्या आत जी ७ च्या निमित्ताने फ्रान्स येथे झालेल्या संयुक्तिक पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्न हा भारत व पाक ह्या दोन देशामधील आहे हे स्पष्ट केले. स्पष्ट केले असे म्हणण्या ऐवजी स्पष्ट करावे लागले असेच मानू या. हा भारताच्या परराष्ट्र नीतीचा, अतंर्गत व बाह्य सुरक्षा नीतीचा विजय आहे हे सार्यांना मान्य करावे लागते.
जम्मू आणि काश्मीर राज्यासंबंधी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाने एका दगडात अमेरिका व पाकिस्तानला बेजार करून टाकले. असे ऐकीवात आहे की इराणचे पंख छाटण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानच्या भूमीची गरज होती. इतकेच नव्हे तर तालीबानचा सतत द्वेष करीत आलेल्या अमेरिकेने, पाकिस्तानला तालिबान संघटनेची मदद घ्यावी अशी आज्ञा ही दिली होती. मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीर राज्यातील कलम ३७०, व कलम ३५अ तडकाफडकी रद्दबदल करून पाकिस्तानालाच जखडून ठेवले. अमेरिका व इराण ह्याच्यात जो काही दुरावा निर्माण झाला आहे त्याबाबत भारताची भूमिका स्पष्ट आहे. ती म्हणजे भारत अमेरिकेच्या सांगण्यावरून नाचणार नाही. अफगणिस्तानात अमेरिकेने केलेल्या लष्करी कारवाईत भारताने वाजपेयीचे सरकार असताना अमेरिकेला लष्करी साहाय्य देण्याचा तसेच आपल्या भूमीचा वापर करण्यासंबंधी स्पष्ट नकार दिला होता. काश्मीर मधील कलम ३७० व कलम ३५ रद्द झाले असल्यामूळे जम्मू आणि काश्मीर प्रश्नासंबंधी चर्चा करायची म्हटले तर पुन्हा १९४७ च्या पुर्वपदावर जावे लागेल. म्हणजे पाकिस्तानने बळजबरीने हिसकवलेला पाक व्याप्त काश्मीर भारताला परत करावा अशी अट टाकूनच भारत चर्चा करेल आणि ती ही द्विपक्षीय स्वरूपाचीच राहील. तसेच वेळ पडल्यास पाकव्याप्त काश्मीर लष्करी बळावर घेण्याचा पर्याय ठेवू शकतो असे अप्रत्यक्ष रित्या जगाला कळविले आहे. ह्या बाबत युनोचा ही हस्तक्षेप चालू शकणार नाही. म्हणून भारत सरकारचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवित असल्याचा आरोप इम्रानखानने केला आहे. शेवटी जिहादी मनोवृत्तीच्या लोकांना सर्वत्र जिहादच दिसतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर इम्रानखानने केलेला आरोप म्हणजे स्वतःच्या देशातील जिहादी मनोवृत्तीच्या विरोधी पक्षांच्या आरोपातून आपली सुटका करण्यासाठी जिहादी मनोवृत्तीच्याच इम्रानखानने केलेली ही कवायत आहे. या पलिकडे इम्रानच्या वक्तव्याला फारसा अर्थ नाही.
आता आपण इम्रानखान यांनी संघावर केलेल्या आरोपांची आपल्या देशांतर्गत राजकीय स्थितीवर काय परीणाम झाले आहेत आणि काय होतील यावर चर्चा करू या. इम्रानखानने संघावर केलेल्या आरोपाला भारत सरकारने कवडीची ही किंमत दिली नाही. आपल्या कडील संघ व भाजपा द्वेष्टे वर्तमानपत्रे व इलेट्राॅनिक्स मिडीयाने इम्रानखानने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टिकेची साधी बातमी ही दिली नाही. भारत सरकारने इम्रानखानच्या वक्तव्याकडे केलेलं दुर्लक्ष आणि आपल्या देशातील विरोधी पक्षांनी इम्रानच्या वक्तव्याकडे केलेलं दुर्लक्ष ह्यात जमीन आस्मानाचा फरक आहे. समजा मटा, लोकसत्ता, लोकमत इत्यादी वर्तमानपत्रे, व एनडीटिव्ही सारख्या न्यूज चॅनेलनी इम्रानखानने संघावर केलेल्या टिकेची बातमी जर दिली असती तर त्या वर्तमान पत्राच्या तसेच न्यूज चॅनेलच्या संपादकांना वाचक आणि श्रोते ह्यांनी म्हटले असते, की ' तुम्ही सुध्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अशाच शब्दात गेली नव्वद वर्षे टिका करीत आहात ना ! तुम्ही इम्रानखानचे सगे सोयरेच आहात की !' आपली कुंचबणा होऊ नये म्हणूनच ह्या मंडळींनी इम्रानखानने संघावर केलेल्या टिकेला प्रसिध्दी देण्याचे टाळले आहे. आपली कातडी वाचविण्याच्या नादात इम्रानखानने त्यांच्या भारतातील (राहूल गांधी सिताराम येचूरी, मणीशंकर अय्यर, शरद पवार लालू मुलायम ममता बॅनर्जी इत्यादी मंडळी) हितचिंतकांनाच अडचणीत आणले आहे. इम्रानखानने संघावर टिका केल्यानंतर विरोधी पक्षांची मंडळी व मिडीयातील त्यांचे भाट मित्र चूपचाप बसले आहेत. त्यांचेच शब्द इम्रानखानने त्यांच्या घशात लोटले आहेत. म्हणून त्यांची तोंडे बंद आहेत. इम्रानखानने संघावर केलेल्या आरोपाचा आपल्या येथील तथाकथीत पुरोगामी मंडळींनी निषेध नोंदविला असता तर ते अप्रत्यक्षरित्या संघाचे समर्थक ठरले गेले असते. बरं चुप राहूनही या मंडळींचा फायदा झाला, असेही नाही. कारण चूप राहिल्याने देशवासियांना संदेश काय पोहचला, तर हाच की 'राष्ट्रप्रेमी संघापेक्षा यांना इम्रानखान पंसद पडला आहे. आपल्या देशातील विरोधी पक्षांची स्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे.'
बुधवारी २८ आगस्ट च्या दिवशी पत्रकार परिषद चालू असताना, पाकचे पंतप्रधान इम्रानखान सैरभैर झालेले NewsX च्या कॅमरामनने अचूक रित्या दाखविले. त्यावरून पाकिस्तान किती दिशाहीन झाला असावा ह्याचा अंदाज येऊ शकतो. पाकिस्तान सोबत अमेरिका ही काश्मीर संबंधी हतबल झालेली दिसते. भारतावर दादागिरी अमेरिकाही करू शकत नाही. पण काही तरी केले पाहीजे व करावेच लागते याचेच नाव आहे राजकारण. मग ते देशांतर्गत हो वा जागतिक पातळीवरचे असो. भारतात संघाला विरोध करणारी मंडळी आहेच. त्यातच कलम ३७० व ३५ अ हटविल्याच्या विरोधात कोर्टात याचीका ही दाखल झाल्या आहेत. हीच सोय समजून इम्रानखानने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टिका केलेली दिसते. म्हणून इम्रानखानचा बोलाविता धनी अमेरिका, चीन तसेच मुस्लीम आतंकवादी संघटना, आएएस, पाक लष्कर आणि आपल्या येथील राहूल गांधी, मणीशंकर अय्यर, केरळचे डावे मंडळी तसेच ख्रिस्ती आणि मुस्लीम धर्मगुरू, अनेक विदेशी कंपनीच्या मदतीने सुरू असलेले एनजीओ इत्यादी असू ही शकतात.
इम्रानखानचा बोलविता धनी कोणी का असेना, पण संघावर इम्रानखानने जी टिका केली आहे ती आपल्या देशातील विरोधी पक्ष संघावर टिका करतात त्या धाटणीची आहे. इथेच पाणी मुरतयं अशी देशातील बहूतांश मतदारांची भावना आहे आणि अशी भावना २०१४ पासूनच झालेली आहे म्हणून तर विरोधी पक्षांना सलग दोनदा दारूण पराभव स्विकारावा लागला. आपल्या देशांतर्गत राजकारणाचे असे स्वरूप येण्यामागे विरोधी पक्षांचे धोरण कारणीभूत आहे. पाकिस्तानचे विरोधी पक्ष स्वतःच्या देशहिताची बूज राखून व्यवहार करतात. पुलवामा येथे भारतीय जवानांना दशहतवाद्यांतर्फे मारले तेव्हा त्यांनी मानवतावादी भूमिका घेऊन इम्रानखानवर टिका केली नाही पण बालाकोटवर दशहतवाद्यांचे अड्डे भारताने उडविले त्याबद्दल इम्रानखानवर कडक ताशोरे ओढले. दशहतवाद्यांवर केलेला हल्ला हा आपल्या देशावरच हल्ला असे पाकमधील विरोधी पक्ष मानतात. ह्यातून आपल्या येथील विरोधी पक्ष व त्यांचे पाठिराखे पत्रकार, संपादक आणि स्वयंभू विचारवंत काहीतरी बोध घेतील असे वाटले होते. पण निराशाच पदरी आली. सुंभ जळाला तरी पीळ काही जात नाही ना !
भाजपाला तसेच ज्या पक्षांनी ३७० व ३५ अ कलम हटविण्याच्या संदर्भात राज्यसभेत पाठींबा दिला आहे अशा सार्या पक्षांच्या बद्दल जनसामान्यांमध्ये एक प्रकारचा आदर निर्माण झालेला दिसतो. ह्याचा अर्थ नजिकच्या भविष्यात देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अभिप्रेत असलेली सांस्कृतिक राष्ट्रवादाची संकल्पना मूळ धरू लागल्याचे दिसू लागेल. संघाला अस्पृश मानणार्या विचारवंतांची वाटचाल वैचारिक रित्या दिवाळखोरीच्या मार्गावर सुरू झालेली ठळकपणे दिसू लागेल. नक्षलवादी, डाव्याच्या इतर संस्था, मदरेसातून धार्मीक उन्माद शिकविणारे मौल्लवी वर्ग, निवडणूकीत राष्ट्रवाद्यांचा पराभव करण्याचे पत्रक काढणारे काही अतिशहाणे ख्रिस्ती धर्मगुरू, इत्यादींचे कंबरडे नजिकच्या काळात मोडले जाईल असे दिसत आहे. मेवाणी, कन्हैय्या, हार्दिक पटेल सारख्या जातीय द्वेष पसरविण्यारांना त्यांची जागा दाखविली जाईल, भ्रष्टाचारी राजकीय नेत्यांची अब्रू वेशीवर टांगली जाईल. प्रतिष्ठीत, विचारवंत, राजकीय अभ्यासक म्हणून गणलेली गेलेली काॅग्रेस व डाव्या पक्षांची पिल्लावळांची नशा उतरवली जाईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इम्रानखानच्या वक्तव्यावर काही प्रतिक्रीया देईल असे वाटत नाही. कारण आजवर संघ आपल्यावर होणार्या टिकावर सतत दुर्लक्ष करून देश व समाज हिताय कार्यें करूनच उत्तर देत आलेला आहे. तसेच ३७० व ३५ अ संबंधीत सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून सरकार सकट सर्वांनी संयम राखावा असा सल्लाही संघाने दिला आहे. संघ प्रथम राष्ट्राचेच हित पाहतो, सत्ता कोणाची ही असू द्या. केंद्रातील मोदी सरकार मध्ये अनेक मंत्री संघाचे स्वयंसेवक आहेत. खुद्द आपले पंतप्रधान तर संघाचे प्रचारक होते. त्यामुळे केंद्र सरकार संघाने दिलेला सल्ला मानेल आणि सतत संयम राखून जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख संबंधीचे धोरण सर्वसमावेशक ठेवील व सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास ह्या धोरणातून जनसामान्यांना दिलासा देईल असा विश्वास वाटतो. आणखिन एक गोष्ट स्पष्ट दिसते ती ही की , ३७० व ३५ अ कलम हटविल्याच्या निर्णयावर चर्चा अधून मधून होत राहील व प्रत्येक वेळी काॅग्रेस व मित्र पक्षांचे नेते दिशाहीन झालेले पाहावयास मिळालेले दिसतील. तशी अवस्था येणे आपल्या लोकशाहीच्या वाटचालीच्या दृष्टीने अयोग्य आहे, पण बुडत्याचा (आपल्या देशातील संघ-भाजपा द्वेष्टे राजकीय पक्ष व पुरोगामी पत्रकार, संपादक व पुरोगामी विचारवंत इत्यादींचा) पाय खोलात जातो ना ! आपण काय करू शकतो?
मञ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा