शेवटच्या चरणाचे मतदान संपले व सारे विरोधी पक्षांचे नेते परस्पर भेटण्याची कवायत करू लागले आहेत. ह्यातून काय दिसते ? एनडीएचे मताधिक्य घटेल पण सत्तेवर एनडीए येईल असे सर्व विरोधी पक्षांना कळले असावे. निदान त्यांची बाॅडी लाईन तर तशीच दिसते. मतदान संपल्या संपल्या लागलीच विरोधी पक्षांची जी धावपळ दिसते त्यावरून मला आणखिन एक गोष्ट दिसते ती ही की, युपीए आघाडीची ताकद अपुरी ठरेल हे काॅग्रेसला ध्यानात कधीच आले असणार. म्हणून प्रियंका गांधी वड्राने ' आम्ही उत्तर प्रदेश मध्ये भाजपाची मते खाण्यासाठी स्वतंत्र लढतो ' असे विधान केले. विरोधी पक्ष येनकेन प्रकारे एकत्र येऊन सत्ता काबीज करण्यासाठी जीव तोडून मेहनत घेतील. पण त्यात त्यांना यश मिळेल का? त्यांचा पंतप्रधान कोण ? इत्यादी बाबत सर्वत्र चर्चा रंगेल. विविध एक्झीट पोल ह्यावयास सुरवातही झाली आहे.
काय निकाल येईल अशी उत्सुकता सर्वांना लागली असणार. एक्झीट पोल काय सांगतात, त्याची सत्यता, त्यांनी दिलेली आकडेवारी आपल्याला पटते की नाही हे आपण कोणत्या पक्षाचे समर्थक आहोत, कुठल्या पक्षाला वा उमेदवाराला मतदान केले ह्यावर अवलंबून असते. त्यात आपला दोष नसतो. मी तरी कुठे दुसर्यांच्या भाकीतावर विश्वास ठेवतो ? सामान्यतः प्रत्येक जण कुठल्यातरी पक्षाचा समर्थक असतोच. त्यामूळे आपण भाकीत तयार करताना आपोआप आपल्या आवडत्या पक्षांसंबंधीची ओढ आकडेवारी करतेवेळी आपल्या मदतीस धावत असते. तसाच काहीसा प्रकार माझ्या बाबतीत झाला असावा. त्यामुळे मी सुद्धा वेळोवेळी म्हटले आहे की, एनडीएचे सरकार अस्तित्वात येईल.
एक गोष्ट मी तटस्थपणे मांडत आलो आहे ते म्हणजे नवयुवक मतदारांना राजकीय पक्षातील घराणेशाही मान्य होताना बिलकूल दिसत नाही. घराणेशाही पक्षाचे समर्थक होणे हे आधुनिकतेचे लक्षण आहे असे ह्या वर्गाच्या गळी उतरविणे कठीण आहे. ह्या वर्गातील युवकांची मते भाजपाकडे अधिक झाले असण्याची शक्यता आहे. घराणेशाही असलेल्या पक्षांचे समर्थक होणे ही मानसिक गुलामी आहे. ती एक अंधश्रद्धा आहे. तिचे निर्मूलन करण्याचे कार्य अंनिसचे कार्यकर्ते का घेत नाहीत, हे कळायला मार्ग नाही. बर ते जाऊ द्या. देव न मानणारे राजकीय नेते व विचारवंत ह्यांना त्यांचे कार्यकर्ते देव मानतात, त्यांच्या चरणी लीन होतात, ते कसे खपवून घेतले जाते? देव जाणो !
दुसरे असे की स्वातंत्र्यापासूनच सार्या विरोधी पक्षांनी अल्पसंख्याक समाजात हिंदुत्ववादी पक्षांची भिती उत्पन्न करून ठेवलेली आहे. त्यातूनच ख्रिस्ती धर्मगुरू, मुस्लीम मौल्लवी एकमुखाने अनेक वेळा राष्ट्रवाद्यांचा पराभव करा असा फतवा काढत असतात. राष्ट्रवाद हा मुद्दा प्रचारात गेल्या वर्षी प्रथम आणला ख्रिस्ती धर्मगुरूनी. देशातला एक मोठा वर्ग धर्मगुरूच्या फतव्याची आज्ञा पाळून आपले मतदान करीत असेल तर ते लोकशाही मुल्यांशी फारकत घेत आहे असेच मानावे लागते. हे ही एक कारण आहे ज्यामुळे तटस्थेने मतदान करणार्याची मते भाजपाकडे अधिक गेली असावीत. ख्रिस्ती धर्मगुरूंच्या विधानामुळे जानेवारी पासूनच धार्मिक धृवीकरणाला सुरवात झालेली होती. ती फक्त दिसली नाही एवढेच. तसेच जातीची अस्मिता, प्रान्तीय अस्मीता ह्या बाबतीत विरोधकांचा हातखंड आहे. तो ही त्यांच्या मदतीस आला असणारच. नाहीतर त्यांचा ह्या निवडणूकीत पुरा बेंडबाजा वाजला असता. दक्षिण भारतात प्रान्तीय अस्मितेचा फायदा विरोधी पक्षांच्यांच विरोधी गटांना झाला आहे. उदाहरण आहे आन्ध्र व तेलंगण. इथे टीआरएस व जगन रेड्डीच्या पक्षांना अधिक जागा मिळतील. पण एनडीएचे स्वबळावर सरकार येणार असेल तर ते आपली तटस्थेची भुमिका घेतील. कशाला केंद्राशी पंगा घ्या, विशेष करून मोदीशी हा विचार काल पासूनच त्यांच्या मनात घोंगावत असणार. पुलवामा आणि बालाकोट संबंधी विरोधी पक्षांची वक्तव्ये बेजबादारपणाची वाटली. समाजातील तटस्थ मतदान करणार्या घटकाला ही रूचले नाही. हे विरोधी पक्षांच्या लक्षात आले, म्हणून हे विषय मागे पडावेत ह्या हेतूने त्यांनी मोदीवर व्यक्तीगत हल्ले सुरू केले. दहा वर्षाचा युपीए सरकारचा कारभार जनता विसरू शकली नाही. प्रंचड मताधिक्याने मोदींना निवडून देणार्यांना पुन्हा मोदीकडे सत्ता द्यावयाची वाटले असेल तर ते ही स्वाभाविक आहे.
राष्ट्रवादाच्या संदर्भात विरोधकांनी असा प्रचार केला की संघवाले त्यांच्या विरोधी मतांच्या लोकांना देशद्रोही समजतात. आपण राष्ट्रवादी आहोत हे सिद्ध करण्यासाठी संघावर उपाहसाने शेरे मारतानाच विरोधी पक्षांचे पितळ उघड पडले. सत्तरहून अधिक वर्षे राज्य करणार्या काॅग्रेस पक्षाच्या हितसंबंधीयांना सत्तेचा फायदा झालाच नाही असे छातीठोकपणे कोण सांगू शकेल का? मोदी, भाजपा, व संघावर टिका करताना जे विष पेरले ते काॅग्रेसच्या अशा हितसंबंधीयांनीच. दिल्लीत ह्यांना ल्युटीन्स म्हणून ओळखले जाते परंतु ही मंडळी देशाच्या प्रत्येक राज्यात, तालुक्यात, गावागावत आहे. काॅग्रेस आणि विरोधी पक्षांनी मांडलेल्या राष्ट्रवादाची कल्पना ठिसूळ होती हे सप्रमाण मोदी सरकारने सिद्ध केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलिकडे एका मुलाखतीत अनेक वर्षाच्या तपस्याचा उल्लेख केला, ती तपस्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या असंख्य त्यागी नेते आणि स्वयंसेवकांची आहे, हे आता सर्वसामान्यांना ठाऊक झाले आहे.
मे २०१४ सालच्या निवडणूकांचे मतदान संपल्यानंतर मुंबई सकाळ वर्तमानपत्रात माझा एक लेख छापून आला होता. तो लेख पुर्णतया तटस्थेने लिहीला होता. मुलतः तो लेख राष्ट्रवाद ह्या संकल्पनेचं रूप स्पष्ट करणारा आहे. लोकसभा निवडणूक हे निमित्त ठरले एवढेच. २०१४ ला मोदींच्या प्रचार सभांना देशाच्या कानाकोपर्यात प्रचंड प्रतिसाद मिळत होता. मोदींची भाषणें मी मांडलेल्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेशी जुळत होती आणि ती मतदारांना भावली आहे हे ही लेखात आवर्जून लिहले होते. पण संपादकांनी माझ्या लेखातील हा भाग वगळला. मुद्दा लांबला आहे पण करणार काय ? विरोधी पक्ष किती वर्षे मोदी-भाजपा-संघाचा द्वेष करीत राहणार ? हे कृत्य जो पर्यंत विरोधी पक्ष थांबविणार नाहीत तो पर्यंत भाजपा जिंकत राहणार. पंतप्रधानावर बेछूट आरोप करताना मर्यादेचे भान न ठेवल्यामूळे अनेक तटस्थ विचारवंत, उद्योगपती, व मतदार भाजपाचे समर्थक होत आहेत. हे निदर्शनास आणताना मला आज नाईलाजास्तव म्हणावेसे वाटते, विरोधी पक्षांच्या नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे डोके ठिकाणावर आहे का ?
अलीकडे सुजीत भोगले ह्यांनी ' मोदींची पत्नी व आपण ' ह्या शिर्षकाखाली लिहलेला एक लेख सोशल मिडीयावर व्हायरल झालेला आपण पाहीला व वाचला. तो लेख मी अनेक ग्रुपवर फारवड ही केला होता. पंतप्रधान मोदींवर होणार्या खालच्या पातळीवरील टिकेमुळे सुजीत भोसले अस्वस्थ झाले. सुजित भोसलें संघाचे स्वयंसेवक नाहीत हे येथे लक्षात घ्यावयास हवे. त्यांनी त्या लेखात नरेद्र मोदींची ' राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रचारक ' अशी मुळ ओळख आपल्याला करून दिली आहे. ज्यांना पंतप्रधान मोदी हिटलर वाटतात, ज्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फॅस्टीट संघटना वाटते, भाजपा सांप्रादायिक वाटतो अशा सर्वांनी सुजित भोसलेंची ही पोस्ट वाचावी. मग संघ-भाजपाची विचारसरणी लोकांना पंसत का पडते ह्याचे कारण त्यांना कळू शकेल असे वाटते.
महात्मा गांधीजींचे वारस म्हणून मिरविणार्या पक्षांनी व त्यांच्या समर्थकांनी १३ मे ला सिनेस्टार कम पाॅलीटीसीयन कमल हसन ह्यांना महात्मा गांधीजींचे पणतू श्री श्रीकृष्ण कुळकर्णी ह्यांनी बंगलोरहून लिहीलेले पत्र वाचावे. ते पत्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. त्या लेखात श्रीकृष्ण कुळकर्णींनी अंत्यत विनयाने काही गोष्टी कमल हसन ह्यांच्या निदर्शनास आणल्या आहेत. महात्मा गांधीजींना संघाचे कार्य आवडत होते हे ही त्यांनी मांडले आहे. सन १९८२ ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तळजाई (पुणे ) येथे अंत्यंत शिस्तीने संपन्न झालेल्या शिबीराची समाजवेदी नेते एस एम जोशी ह्यांनी ही कौतुक केले होते. एस एम जोशी, लोकनायक जयप्रकाश नारायण व महात्मा गांधीजी ह्यांच्या सारख्या महापुरूषांनी शाबासकी दिलेल्या संघटनेला नावे ठेवण्याइतके आपण मोठे आहोत का ? हा विचार भाजपेतर पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी करावयास हवा. सार्या पुरोगामी विचारवंतानी दर वर्षी संघाच्या पुढाकाराने हिंदु नववर्ष स्वागत यात्रा होतात , त्यात सामील होऊन पहावे आणि मगच आपली मते मांडावयास हवीत. त्या यात्रेत सारा हिंदु समाज कुठलाही भेदभाव न ठेवता सामील झालेला दिसतो. संघ स्वयंसेवकासाठी ज्या कार्यशाळा वा वर्ग आयोजित होतात तिथे भेट देऊन पाहाता येईल की खरेच तिथे ब्राह्मण्यवाद आहे का?
आज संघ विचाराचा वाढता प्रभाव पाहता, देशातील किमान एक दोन पुरोगामी विचारवंताना तरी संघ जवळून पाहावा असे वाटत नाही ह्याचे मला आश्चर्य वाटते. खरे म्हणजे इथेच ह्या विचारवंतातील पुरोगामीत्व कच्चे ठरत आहे. पुरोगामी शब्दाचा अर्थ भले, नव्या कल्पनेने भरलेला आधुनिक विचार वा व्यवस्था इत्यादी संबंधीत असला तरी पुरोगामित्व आपल्या मनात तेव्हाच बाळसे धरते जेव्हा आपण दुसर्या विचारसरणीचा ही आदर करतो. संघाला विरोध करणारे विचारवंत पैसा, बंगला, उंची गाड्या, कपडे, मद्य, इत्यादीने नटलेल्या जीवनशैलीचे बळी ठरलेले दिसतात. त्यांना असे लाचार कोणी बनविले ? विदेशी एनजीओ व सेक्युलरवादी पक्षांनी. त्यामुळे झाले असे की, संघ विरोधी विचारवंत एअरकंडीशन्ड रूम मध्ये बसून ऐशबाजी करीत असतात. दुसरीकडे ह्या विचारवंताच्या भरवशावर तथाकथीत सेक्युलर पक्षांच्या नेत्यांनी आपआपल्या जातीचा, भाषेचा अंहकार फुलवित, ख्रिस्ती व मुस्लीम बांधवांना गळाभेट करीत रस्त्यावर जागोजागी आपली दुकाने थाटली आहेत. रस्त्यावरील ह्यांच्या दुकानावर कोण बसले आहेत ? पगारी पोरं-टोरं. त्यांना आदेश कोण देत आहेत ? तर ह्या नेत्यांचे वारसदार. हे वारसदार बसतात कुठे ? पक्षांच्या सच्च्या कार्यकर्त्यांपासून फार फार दुरवर. नेतमंडळीचा व विचारवंताचा सामान्य कार्यकर्त्यांशी बिलकूल संबंध नाही. मग अशा पक्षांचे समाजाशी नाते कसे जुळणार ?
सध्या आपल्या देशात विशेष करून स्वतःला पुरागामी समजणारे विचारवंत व मिडीयातील मंडळी भारताची संघीय रचना धोक्यात आणली जात आहे असा आरोप करीत आहे, हा सुद्धा एक डावपेच आहे. जितके प्रान्तीय पक्ष अधिक तयार होतील तितके भाजपाशी टक्कर घेणे विरोधी पक्षांना अधिक फारदेशीर ठरेल असे समिकरण मांडले जात आहे. आपल्या संविधनात माडलेल्या संघ रचनेच्या संकल्पनेचा अर्थ रितसर लावावयाचा असेल तर, सामान्यातील सामान्यांना राज्य विधानसभेत केवळ प्रतिनिधीत्व म्हणून नव्हे तर राज्याचा मुख्यमंत्री व त्या प्रादेशिक पक्षाचा अध्यक्ष बनण्याचाही हक्क आहे हे मान्य करणे होय. परंतु असा हक्क प्रदान करतेवेळी राज्यातील राजकीय पक्षांचे स्वरूप जे घराणेशाहीचे आहे ते नष्ट करायला हवे. तरच खर्याने Fedaral System अस्तीत्वात आली असे आपण मानू शकतो. संविधान रचणार्या आपल्या पुर्वाश्रमींना प्रांतीय व राष्ट्रीय पक्षात घराणेशाही येईल असे स्वप्नात ही आले नसेल. एकदा का एखाद्या प्रांतीय पक्षात घराणेशाही घुसली की लागलीच त्या प्रांतात दुसराच तसा एक नवीन पक्ष तयार होतो व तोही प्रांतीय अस्मीतेला खत पाणी देत आपली घराणेशाही शाबूत ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो. एखाद्या राज्यात आलटून पालटून दोन खानदानाचे राज्य येणे हे काही शुभ लक्षण नव्हे. ती एक प्रकारे राजेशाहीच म्हणावी. मग आपोआप त्या घराण्यातील सदस्यांचा वावर युवराज, सम्राज्ञी असा होत राहतो. त्यांचा कल ऐषारामी जीवन जगण्यात राहतो व जनतेशी त्यांचा संपर्क तुटतो.
ह्या उलट संघाचे नेते मंडळी जमीनीवर दिसतात. स्वयंसेवक, कार्यकर्ते, नेते असा भेदभाव तिथे नसतो. मग संघ बलवान होत असेल तर नवल का वाटावे ? नवल वाटले तर मी समजू शकतो पण संघ बलवान होत आहे, ह्या बद्दलचा द्वेष का वाटावा ? संघाची मंडळी विदेशातून आली आहे का? ह्या मातीतील संस्कृतीतून घेतलेल्या जीवनमुल्यांनीच ती उभारली आहे ना ! मला ह्या सार्या तथाकथीत पुरोगामी मंडळींना सांगावेसे वाटते, ते हे की, तुम्ही मोदींचा द्वेष, ते गुजरातचे मुख्यमंत्री बनले तेव्हापासून करीत आहात. भगवा आंतकवाद सिद्ध करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कटात सामील झालात. कशासाठी तर भाजपा व संघाला कायमचे नेस्ताबूत करून सत्ता व सत्तेची मलई लुटण्यासाठी. काय हाती आलं तुमच्या? तुम्ही कितीही प्रयत्न करा, जीवाचे रान करून संघाला संपविण्याचे प्रयत्न करा, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वाढत जाणार आहे. कारण तिथे कार्यकर्त्यांचा त्याग असतो. कार्यकर्ते सेवा धर्माचे व्रत घेतलेले असतात. सायकल व पायी फिरणारे कार्यकर्ते असतात. कुठे भूकंप होवो, पुर होवो, अपघात होवो, तिथे स्वयंसेवक जातात. सरसंघचालकांना आदेश द्यावा लागत नाही. स्वतः आपातग्रस्तांच्या मदतीसाठी धावतात. आपातगस्त सारे आपले बांधव आहेत हीच अंतःकरणी भावना. धर्म-जात-भाषा कसलेच भेद स्वयंसेवकांना शिवत नाहीत. म्हणून म्हणतोय की संघाच्या शाखेत जाऊन या, संघाच्या सेवा विभागातर्फे चालविले जाणार्या प्रकल्पांना, आश्रमांना, शाळांना भेट देऊन बघा आणि मगच आपले मत ठरवा."
आता पर्यंत आलेल्या सर्वे नुसार केद्रात भाजपा आघाडीचे सरकार अस्तित्वात येणार असे दिसते. ते भाकीत वेळोवेळी मी ब्लाॅगवरील लेखात मांडले आहे. पुलवामा आणि बालाकोट नंतर विरोधकांचा व्यवहार पाहून विरोधकांना कदाचित २०१४ हून अधिक दारूण पराभव चाखण्याची शक्यताही मी वर्तविली आहे. ह्या घटकेला एक्झीट पोलचा अन्वायर्थ लावताना, भाजपाचा विजय मानावा की विरोधकांचा पराभव मानावा असा एक मोठा अडथळा माझ्यासमोर उभा आहे. पण तो अडथळा काल्पनिक वा मनाचा खेळ असेच म्हणा हवे तर. निवडून येणारे सरकार आपलेच असणार. देश आपला आहे, समाज आपला आहे. सरकाराला समाज निवडून देतो. त्यामूळे त्याचा आपण मान राखला पाहीजे. जिथे सरकार चूक करेल तिथे टिका कराच. पण मनभेद होऊ देऊ नका. मनभेदामुळेच कालच पार पडलेल्या निवडणूक प्रचाराचे स्वरूप शाब्दिक चकमकीतून, पुढे सरकत ते रणागंणावरील लढाई पर्यंत गेले. लढाईतून युद्ध , व पुढे युद्धातून महायुद्धासारखे झाले. ही आपली सार्यांची शोकांतिका आहे. आपणच आपल्या लोकशाहीचे केलेलं हे अवमूल्यन आहे. असे पुढे घडू नये हे पाहणे आपल्या सारख्या मतदारांचे ही कर्तव्य असते. एक्झीट पोल वर दाखविलेला विरोधकांचा होणारा पराभव हा त्यांच्या विचारसरणीचा आहे असे जर त्यांनी मानले तर आपल्या विचारसरणीत बदल करावयाचे भान त्यांना येऊ शकेल. पण त्यांना ' मोदी व संघ-विरोध ' ह्या धोरणाचा पराभव झाला असे वाटत असेल तर त्यावर उपाय सापडणार नाही. पराकोटीच्या द्वेषातून महायुद्ध लढले असल्यामूळे द्वेषाचा पिळ सुटण्याची सुतराम शक्यता नाही. ह्यावर उपाय फक्त काळच ठरविल. काळाचे भान न ठेवता जे कोणी आपले दुष्कृत्यें सुरू ठेवतात, त्यांना काळ क्षमा करीत नाही. काळ जेव्हा क्षमा करण्याच्या स्थितीत नसतो तेव्हा तो आपलं महाविक्राळ रूप धारण करतो. मग काय होत असते हे सांगावयाची गरज ही संपते. कारण महाकाळाच्या तावडीत सापडलेल्यांची अवस्था अश्वस्थामा सारखी होते. हे विरोधकांनी लक्षात ठेवून आपल्यात योग्य तो बदल करावा. देशातील जनता कुठल्या राजकीय विचारसरणीला, कुठल्या पक्षाला, कुठल्या पक्षाच्या नेत्याला, कुठल्या उमेदवाराला निवडून देणार हा हक्क सर्वस्वी जनतेच्या हातात असतो. पराभूत राजकीय पक्षांनी नाना प्रकारच्या सबबी सांगण्यापेक्षा जनतेने दिलेला कौल मानावा. सरंजामशाही पद्धतीने राजकीय पक्ष चालविण्याचे दिवस संपत आले आहेत. पक्षांतर्गत लोकशाही आणा तरच देशातील लोकशाहीचे सुकाणू सांभाळण्याची संधी मिळेल. विजयी झालेल्या आघाडीतल्या प्रत्येक घटक पक्षाने जनतेने दिलेला कौल अत्यंत विनयाने स्विकारावा. सरकार प्रजेचं आहे हे ध्यानात ठेवून कारभार अधिकधिक लोकाभिमुख कसा ठेवता येईल हे पाहणे हेच सत्ताधारी पक्षाचे आद्य कर्तव्य असते. ते पार पाडण्यात कुचराई केली तर आपली अवस्था विरोधी पक्षासारखी होणार हा ही काळाचा एक नियम आहे, इतके सदैव ध्यानात ठेवावे.
वन्दे मातरम् !
छान लेख आहे
उत्तर द्याहटवा