लोकसभेच्या निवडणूकीच्या सातव्या व शेवटच्या चरणाचे मतदान काल पार पडले. २३ मे रोजी निकाल लागेल. निकाला नंतर सोळाव्या लोकसभेचं विसर्जन होईल व पुढील तीन-चार दिवसात निवडून आलेल्या उमेदवारांचा संसद सदस्य म्हणून शपथविधी होईल व सतराव्या लोकसभेचं गठन होईल. नंतर नवीन सरकार अस्तित्वात येईल. जे सरकार अस्तित्वात येईल ते कोण्या विदेशी नागरिकांसाठी नाही, तर ते आपल्या सर्वांसाठी असणार आहे. कारण ते आपण सर्वांनी अस्तित्वात आणलेले असणार. ते परदेशातून आयात केलेले नसणार. लेखाची सुरूवात राज्यशास्त्र ह्या विषयातील लोकशाही राज्यप्रणालीच्या अभ्यासक्रमातील बाळबोधने करावी लागली, ह्याचे कारण असे की निवडणूकीतला प्रचार राजकीय न राहता रणसंग्राम दिसला. लढाईचं स्वरूप ' भाजपा विरूद्ध इतर पक्ष ' असे असते तर ते लोकशाही मूल्यांशी अधिक सुसंगत वाटले असते. परंतु निवडणूकीतल्या प्रचाराचं स्वरूप मोदी विरूद्ध इतर पक्षाचे नेते असे झाले. त्याला जबाबदार कोण ह्याचा मागोवा घेतला असता मला जे दिसले त्यावरून मनात आलेले निष्कर्ष आपल्या समोर ठेवत आहे.
भारतिय राजकारण ज्यांनी अनेक वर्षे जवळून पाहीले आहे, अशा बीबीसीचे जेष्ठ पत्रकार मार्क टूली ह्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की " पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीत एका नव्या दमाचा भारत होऊ लागला आहे; आज भारताला जगात विशेष मान प्राप्त होत आहे; सुरक्षा, व्यापार, उद्योगधंद्यासंबंधीचे निर्णय झटपट होऊ लागले आहेत ; परंतु मोदींना विरोधी पक्ष अनेक अडथळे निर्माण करतील ; तरीही मोदी आपल्या मार्गावरून विचलीत होणार नाहीत." मार्क टूलींचे हे भाष्य २०१६ सालचे आहे. मार्क टुली सारख्या विदेशी संपादकांनी मोदींचा करिष्मा व कार्यशैलीचे कौतूक केले. पण---
पंतप्रधान मोदींचे असे कौतूक व भाष्य आपल्या येथील किती राजकीय अभ्यासक, व पत्रकार- संपादक मंडळींनी केले आहे? करू शकले असते पण का केले नाही हा खरा प्रश्न आहे. ह्याचे उत्तर असे आहे की, आपल्या येथील बहुतांश संपादक--पत्रकार मंडळींनी २०१४ चा विजय ना मोदीचा मानला ना भाजपा-संघाचा. ह्या सार्या मंडळींनी २०१४ चा भाजपाचा विजय केवळ भरमसाठ आश्वासनांचा व मोदींच्या जाहिरातबाजीचा मानला. राजकीय भाष्य करतेवेळी दुषित पुर्वग्रह एकदा बाळगला की पुन्हा मागे फिरता येत नाही. त्यामूळे युपीए सरकारचा दहा वर्षाचा भ्रष्ट आणि गलथान कारभारामुळे काॅग्रेस व मित्र पक्षांचा पराभव झाला ह्या सत्याकडे ह्या पत्रकार मंडळीचे दुर्लक्ष झाले. झाले असे म्हणण्यापेक्षा ह्या मंडळीने जाणून-बुजून केले. कारण ही मंडळी स्वस्थ ही बसली नाही. मग ह्यांनी कोणता उद्योग केला? निरोद्योगी माणसाचा !
आता आपण मलाच विचाराल, अहो निरोद्यागी माणूस आणि त्याला उद्योग कसा असू शकतो? मित्रांनो हे कलीयुग आहे. सत्ययुगाच्या अगदी विरूध्द असलेले असत्ययुग. त्यामूळे रेटून खोटे म्हणत जावयाचे हा एक मोठा उद्योग झाला आहे . तो राजकारण आणि मिडीयाशी संबंधीत असतो. इथे सर्वात मोठी कमाई असते. मिडीयातील काही मंडळी व डावे, पुरोगामी विचारवंतानी एक उद्योग सुरू केला. तो म्हणजे मोदी, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर खोटे नाटे आरोप करीत जाण्याचा. राहूल गांधीनी संघावर महात्मा गांधींची हत्या केल्याचा आरोप केला. पण कोणाच्या सांगण्यावरून ? संघ सांप्रादायिक आहे. कुठे पुरावा आहे? राहूल गांधी म्हणत राहीले ' चौकीदार चोर है '. कोणाच्या सांगण्यावरून ? चेन्नईचे कोणी हिंदु वार्तापत्राचे संपादक आहेत. त्यांनी त्यांच्या वर्तमान पत्रात की मासिकात लिहले आहे त्यावरून. पुरावा कुठे आहे?
मोदी, संघ, भाजपा ह्यांनी देशात असहिष्णुता, द्वेष, लोकशाहीवर घाला, अल्पसंख्याकांवर अन्याय इत्यादी कुप्रवृत्ती वाढविल्या आहेत असे चित्र रंगविण्याचे एक कलमी उद्योग सुरू केला. असहिष्णुता वाढली असती तर देश सोडून जाण्याची भाषा करणार्यांनी देश सोडला का? उत्तर नाही ! लोकशाहीवर घाला असता तर टुकडे गँगने अफझल गुरू अमर रहे चा नारा दिला असता का? किती पुरस्कार विजेत्यांनी आपले पुरस्कार परत केले आहेत ? हाताच्या बोटाच्या संख्याएवढे ही नाही. निवडणूका जशा जवळ येऊ लागल्या, तेव्हा मोदी नीच कसे आहेत हे वेगवेगळ्या तर्हेने मांडत राहाण्याचा उपक्रम ह्या संपादक मंडळींनी अग्रलेख, साप्ताहीक, व विविध खोटे विडीओज् वरून राबविण्यास सुरूवात केली. तेच सुत्र विरोधी पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी वापरात आणले. निवडणूक प्रचार व एकंदरीत राजकीय व्यवहार हा खालच्या पातळीवर येण्यामागचे मुख्य कारण संघ व मोदी विषयी पराकोटीचा द्वेष पसरविण्याचे कार्य काही माध्यमांनी केले हेच होय. २०१४ ते २०१९ ह्या कालावधीत विरोधी पक्ष, विविध एनजीओ, विदेशी हात, मिडीयातील पत्रकार-संपादक,डावे विचारवंत, राजकीय अभ्यासक इत्यादी मंडळींनी एक जाॅईन्ट व्हेन्चर उघडलेले दिसले.
ह्या जाॅईन्ट व्हेन्चरमुळे २०१४ साली आपण भुईसपाट का झालो ह्यावर विचारमंथन करण्याची विरोधी पक्षांना गरज भासली नाही. विरोधी पक्षांनी एका बाजूला मोदीला झोडपयाचे व दुसर्या बाजूला वाजपेयींची थोरवी गावयाची असे धोरण अवलंबिविले. मोदी वाजपेयजी सारखे नाहीतच, हे खरे आहे. परंतु अटल बिहारी वाजपेयींनाही ह्या मंडळींनी सळो की पळो करून सोडले होते. शांत, संयमी अटलजींनी त्वेषाने ह्या मंडळीवर संसदेत प्रतिहल्ला केलेला आपण पाहीला आहे. मोदी अटलजी नाहीत पण अटलजी ही मोदी सारखे नव्हते. मोदींनी एक हाती स्वबळावर बहुमत आणले , हे नाकारण्यासारखे होते का? भाजपाची सत्ता असलेल्या राजस्थान मध्य प्रदेश, छत्तीसगड ह्या तीन राज्यांची सत्ता काॅग्रेसला मिळाली. हा काॅग्रेसने राहूल गांधीचा करिष्मा मानला. पण इतर विरोधी पक्षांनी 'भाजपाचा पराभव ' मानला. त्यांनी राहूल गांधीचा करिष्मा मानला नाही. तेव्हाच मी अंदाज बांधला होता की सारे विरोधी पक्ष एकत्र येणार नाहीत. झाले ही तसेच. काॅग्रेस प्रणित आघाडीचे स्वरूप थिटे पडले. राजस्थान, मध्यप्रदेश, व छत्तीसगड ह्या राज्यांतील विधानसभेच्या निवडणूकीत भाजपाचा पराभव झाला त्याचे फारसे आश्चर्य वाटण्याचे कारण नव्हते. तिथे पंधरा-वीस वर्षे सत्तेनंतर येणारा Law of Dimnishing Utility आपले कार्य करणारच होता. शिवाय तिथे मोदी साठी मतदान झाले नव्हते ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नव्हती. (अधिक माहितीसाठी सेमी फायनलच्या निकालाचा अन्वायार्थ ' ह्या शिर्षकाचा ब्लाॅगवरील लेख पाहता येईल)
तीन राज्यात काॅग्रेसला सत्ता मिळाल्याच्या आनंदापेक्षा भाजपाला नमविले ह्याचा आसूरी आनंद सार्या विरोधी पक्षांना झाला . त्यांचे मिडीयातील समर्थक मंडळींना व कार्यकर्त्यांना तर हर्षवायुचा रोग जडला कि काय असेच वाटले. त्या आनंदाच्या नशेत काॅग्रेसने 'अब राहूल लाओ, देश बचाओ ' 'अब न्याय होगा ' हा नारा दुमदुमवयास सुरूवात केली. प्रतिसाद अपेक्षेइतका दिसला नाही. पुढे वाजत-गाजत प्रियंका वड्राला उतरविले. मग काय प्रियंकाच्या अंगात इंदिराजी अवतरल्या आहेत हे पिल्लू सोडून दिले. त्यावर कुमार केतकर, गिरीश कुबेर, काही विरोधी सुर लावतील असे वाटले होते. पण त्यांनी तसे काही केले नाही, कसले हे विज्ञानवादी ? कसले हे पुरोगामी विचारवंत ?
'अब आयी है मैदानमे इंदिराजीकी पोती ' ह्या घोषणेची नशा काॅग्रेस कार्यकर्त्यांनांच नव्हे, तर इतर विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना ही जडली. बस सार्यांनी, आपआपले पत्ते हातात ठेवतच, चहुबाजूनी मोदी हटाव, भाजपा हटाव, संघ नष्ट करो, लोकशाही बचाओ, अशी हुल्लडबाजी सुरू केली. शिवाय भाजपा-संघाच्या कार्यकर्त्यांवर ठीकठीकाणी गुर्मी दाखविली. ह्या गुर्मीचे स्वरूप कल्पनेपेक्षा अधिक भयावह व व्यापक दिसले. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच हा कट रचला गेला होता हे सत्य अलिकडे उघड झाले आहे. ह्या कटाची व्याप्ती केवळ मोदी विरोधा पुरता मर्यादीत नाही . संपुर्ण संघ परिवाराला नामशेष करण्याचा हा कट आहे. त्याचेच परीचित नाव भगवा आतंकवाद. प्रथम मोदीना हटवायचे मग भाजपा, नंतर संघ परिवार अशी क्रमवारी ठेवली गेली. मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून अनेक विदेशी लाॅब्या , डावे विचारवंत, संपादक - पत्रकार इत्यादी मंडळीच्या साथीने विरोधी पक्षांच्या नेत्यांनी, त्यांच्या शेंबड्या पोरांनी व कार्यकर्त्यांनी मोदींच्या कमरेखाली वार सुरू केले ते शेवटच्या मतदाराचे मत मतपेटीत बंद होईपर्यंत. भाजपाने ही तोडीस तोड वार केले. भाजपा अटलजी अडवाणीच्या कालखंडातला राहीला नाही हे तर दिसले होतेच मग विरोधी पक्षांनी थोडा समजूतदारपणा दाखवून मुद्यावर भाजपाला पकडावयाचे होते की ! पण विरोधी पक्षांना ते जमले नाही, कारण संयम व प्रगल्भतेचा अभाव आणि परस्परांमधील अविश्वास.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा