गुरुवार, २३ मे, २०१९

निकाल लागला ! लोकसभेचा व विरोधकांचाही !


लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. निकाल विविध एक्झीट पोल मध्ये दाखविलेल्या आकड्यांच्या ही पुढे गेला.
' पहीलं पुलवामा, नंतर बालाकोट पुढे काय ' ह्या शिर्षकाच्या लेखात मी म्हटले होते की कदाचीत विरोधकांना २०१४ पेक्षा अधिक दारूण पराभवाला सामोरे जावे लागेल. झाले ही तसेच. ' फिर एक बार मोदी सरकार ' या नाराचा विजय झाला. एक्झीट पोल बाहेर आल्यानंतर  प्रचार, मतदान ह्या संबंधीत दोन भागात पब्लीश केलेल्या लेखात मी माझ्या प्रतिक्रीया व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळे अधिक काही लिहावे असे मला वाटत नव्हते. म्हटलं राजकीय पक्ष आपआपल्या जय-पराजयावर विचार मंथन करतील. फार तर पराभव झालेल्या पक्षांच्या अंतर्गत वाद उफाळून येतील. परंतु विरोधी पक्षांनी एक्झीट पोल आल्यानंतर लागलीच एवीएम मशीन संबंधी आरोप करावयास सुरूवात केलेली आपण पाहीले. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर पुन्हा लढाई सुरू होण्याचे संकेत मिळाल्यामुळे लोकसभा निवडणूक २०१९ ह्या नाट्याचा अजून एक अंक आहे हे ध्यानात आले.त्या संबंधी काही तरी मत मांडल्याशिवाय चैन पडेना म्हणून हा लेख प्रपंच. 


आपल्या पराभवानंतर दिलेल्या मुलाखतीत काॅग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी म्हणाले, "हा पंतप्रधान मोदीचा  विजय आहे. आमची लढाई विचारसरणीची आहे ती सुरू राहील."  राहूल गांधीची एका ओळीची मुलाखत संपली. राहुल गांधींना  काॅग्रेसची विचारसरणी नीटशी माहीती असती तर प्रचारात  'चौकीदार चोर है ' हे वाक्य आपल्या ओठातून बाहेर पडण्या अगोदरच  विचार केला असता. पण त्यांनी तसा विचार केला नाही. कदाचीत त्यांनी आपली अक्कल गहाण ठेवली असावी. त्यावर प्रत्युत्तर म्हणून भाजपाने ' मै भी चौकीदार हूँ  ' ही टॅग लाईन आणली. मतदारांचा मोदीवर प्रचंड भरोसा होता त्यामूळे ही टॅग लाईन भाजपाचे अस्त्र ठरले. त्यातून सार्या विरोधी पक्षांचा एक प्रकारे निकाल लागला. काल पराभवानंतर राहूल गांधीनी एका ओळीची मुलाखत दिली खरी पण  उद्यापासून पुन्हा मित्र पक्षासमवेत ते EVM संबंधीची रड  पुढील पाच वर्षापर्यंत सुरू ठेवतील. विरोधी पक्षांची मानसिकता बदलेल असे दिसत नाही. पराभव मान्य करायचाच नाही अशा हेकट वृत्तीने विरोधी पक्ष नेत्यांची मनं ग्रासली असावीत. त्यावर वैद्यकीय उपाय नाही. अनेक वर्षे केंद्रातील व विविध राज्याची सत्ता उपभोगलेल्या ह्या विरोधकांवर अनेक भ्रष्टाचाराच्या केसेस आहेत. अनेक केसेसमध्ये तपास सुरू आहे. बहुतांश विरोधी पक्षांच्या नेत्यांची, त्यांच्या मुलांच्या नावावर, जावई, नातेवाईकांच्या नावावर बेनामी संपत्ती आहे. काळा पैसा आहे. इडी, सीबाय, आयबी, आयटी , इत्यादी सरकारी विभागाचे छापे ह्यांच्या घरावर, कार्यालयावर पडत आहेत. त्यामूळे विरोधक बेभान झाले आहेत. त्यामूळे कुठे जातीच्या नावावर वा आरक्षणावर, कुठे असहिष्णूता वा धर्माच्या नावावर ही मंडळी जाळपोळ, फोडातोडी, दंगली माजवून अराजक स्थिती निर्माण करणार नाहीत असे ठामपणे म्हणता येणार नाही. भाजपाच्या या दैप्यमान विजयाच्या पाठीमागील कारणे मांडायची झाली तर लेखाचा विस्तार वाढेल. विरोधी पक्षांची हेकट वृत्ती, मोदींचा करिष्मा, भाजपाचे संघटन कार्य, मोदी सरकारने केलेली कामें, विरोधी पक्षाकडे सशक्त नेत्याचा अभाव, पुलवामा व नंतर बालाकोट वर भारतिय वायुसेनेने केलेला एअर स्ट्राईक अशी अनेक कारणें आपल्याला ज्ञात आहेत. मला भाजपाचा हा विजय भारतीय राजकारणावर दुरगामी परीणाम करणारा ठरेल असे दिसते.  देशातील संपुर्ण राज्यव्यवस्था जी सडली होती तिच्यात सुधारणा करणारा एकमेव नेता नरेंद्र मोदीच आहे ही बाब २०१४ साली अधोरेखीत झालेली होती. त्यावर शिक्कामोर्तब झाले. साठ-पासष्ठ वर्षात सडलेली राज्यव्यवस्था भाजपाच्या विजयाला कारणीभूत ठरली असल्यामूळे ह्या लेखात आपण त्यावर चर्चा करू या. प्रथम आपण न्यायव्यवस्थे संबंधी संवाद साधू या. 


मध्यंतरी सुप्रीम कोर्टातील चार न्यायाधिशांनी सरन्यायाधिशा विरूद्ध बंड करून विरोधी पक्षांच्या हेकट वृत्तीला खतपाणी घालण्याचे काम केले. चार न्यायधिशांच्या बंडाशी विरोधी पक्षांच्या नेत्यांचा काय संबंध आहे असा प्रश्न साहाजिकच आपल्या मनात आला असेल. तर त्याचे उत्तर असे आहे की सोळाव्या लोकसभेच्या काळात विरोधकांचा सत्ताधारी पक्षाशी झगडा होता. त्यामुळे न्यायाधिशांनी केलेले बंड सरकार विरोधी आहे, असे सर्वसामान्यांना वाटावे ह्या हेतूने विरोधी पक्षांनी त्यांच्या बंडाला पाठींबा दर्शविला. विरोधी पक्षांनी न्यायाधिशांच्या बंडाला दिलेला पाठींबा केवळ तापलेल्या तव्यावर पोळी भाजण्याइतका मर्यादीत नव्हता. न्यायधिश मंडळी बंड करू लागतात तेव्हा  सर्वसामान्य जनता दोन प्रकारे अर्थ लावते. एक मोदी सरकारने सर्व सरकारी संस्था आपल्या हातात घेतल्या आहेत, हा होतो. दुसरा अर्थ न्यायधिशांच्या ही कुठेतरी, कसल्या तरी हितसंबंधात बाधा उत्पन्न झाली असावी, हा आहे. ह्या पैकी दुसरा अर्थ सर्वसामान्यात लौकर रूजला. ह्याचे कारण पंतप्रधान मोदींसंबंधी सर्व सामान्यांना विरोधी पक्षांपेक्षा अधिक भरवसा वाटत आहे. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाचे पुर्ण बहुमताचे सरकार आले तेव्हाच न्यायमुर्तीनी बंड का केले असा प्रश्न साहाजिकच सर्वसामान्यांना पडला. त्यांनी ह्याबाबत शोध सुरू केला. माहीती व तंत्रज्ञानात झालेल्या क्रांती मुळे सर्वोच्च न्यायालयात लाॅब्या आहेत अशी गाठ सर्वसामान्यांनी पक्की बांधली. अटलजींचे सरकार एनडीएचे होते. काॅग्रेसच्या  साठ -पासष्ठ वर्षात सरकारच्या प्रत्येक विभागात तसेच प्रत्येक स्वायस्त संस्थेत नोकरशाहांशी संगनमत करून  देशाची लुट होत राहीली. त्यावर अटलजी उपाय करू शकले नाहीत.  कारण अटलजींच्या सरकारला वीस ते पंचवीस पक्षांचा सपोर्ट होता. विविध पक्षांच्या आघाडी सरकारचा कारभार मिनिमियम काॅमन प्रोग्राम वर आधारीत असला तरी ते फक्त एक गोंडस नाव असते. प्रत्यक्षात विविध पक्षात सहमती कुठे, कशी असते हे जाणून घेणे आवश्यक आहे. ' आम्ही सरकारला सपोर्ट केला आहे ना, मग तुम्ही आमच्या लफड्यात, घोटाळ्यात पडायचे नाही, अशी अट सरकार मधील मुख्य पक्षाला सपोर्ट देणार्या पक्षांची असते. ती मुख्य पक्षाला मानावी लागते. युपीए १ आणि युपीए २ ह्या काळात मुख्य पक्ष काॅग्रेस होता. त्यामूळे ' तुम भी खाओ, हम भी खायेंगे ' असे मित्र पक्षांना अप्रत्यक्ष रित्या काॅग्रेसने सांगितलेले असावेच म्हणून भ्रष्टाचार कळसाला पोहचला. जेव्हा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिश सरकार विरूद्ध बंड करते झाले, तेव्हा विरोधी पक्षांची त्यांना साथ मिळाली. त्याचवेळी लक्षात आले की इथे पाणी मुरतयं. सरकारची विविध खाती व संस्था कशा सडलेल्या होत्या ह्याचे हे मुर्तीमंत उदाहरण. तेच जगाजाहीर झाले. त्याची पर्वा ही न्यायमुर्तींनी केली नाही हे फार क्लेशकारक होते. 

पंतप्रधानपदावर आरूढ होताच मोदींनी शासन व्यवस्थेत सफाई सुरू केली. त्या साफसफाईत न्यायालयातील नोकरशहा व नावाजलेल्या वकीलांच्या लाॅब्यावर टार्गेट करण्याचा प्रयत्न सरकार कडून झाला असावा. त्यातून दुखावलेल्या न्यायाधिशांनी सरन्यायाधिशां विरूद्ध बंड केले असावे. पंतप्रधान मोदी अथवा सरन्यायाधिश मनमानी करीत होते असे बंडखोर न्यायाधिशांच्या म्हणण्यात तथ्य असते तर  बंडखोर न्यायाधिशांनी राजीनामा देऊन सरळ राजकीय लढाई पुकारून सरकारशी दोन हात करावयाचे होते. तो हक्क त्यांच्यासाठी संविधानात उपलब्ध होताच की.  पण तसे त्यांनी केले नाही. का? भावी काळात मिळणार्या न्यायालयातील सर्वोच्च पदावर पाणी सोडण्याचे बंडखोर न्यायाधिशांच्या जीवावर आले असावे. शेवटी न्यायालय काय, सीबीआय काय सर्वत्र सत्ता असते आणि त्याची चव सोडता येत नाही. हेच खरे. दशहतवादाचा आरोप असलेल्या कैद्याची  किंवा गुजरात मधील राज्यसभा निवडणूकीच्या संदर्भातील सुनावणीसाठी मध्यरात्री न्यायालय उघडण्यात का आले, हा आपणा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न. पण ह्याचे उत्तर मिळाले नाही. सीबाय असो वा आयबी ह्या संस्थेत अधिकारी वर्गाची भांडणे मोदीच्या काळात उघडकीस का आली ? ह्याचे कारण  मोदींच्या साफसफाई मोहीमेमुळे. नोकरशहाशी संधान बांधून असलेली हितसंबंधीय मंडळीच्या टोळीचे नाव ल्युटीन्स. हीच ती डावे, उपरे, मंडळी. ह्याच मंडळीच्या टोळीत सुप्रिम कोर्टातील वकील ही आहेत. त्यांचे बंडखोर न्यायमुर्तींशी सख्य होते व आहे हा समज जनतेत पसरला. आपल्या देशात सर्व सरकारी व्यवस्था  का सडल्या गेल्या ह्याचे कारण सत्तेत असणार्यांना सत्ता टिकविण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध व्हावा हे होय. हा निधी अनेक उद्योजकांकडून मिळतो. उद्योजकांच्या कंपन्यांच्या कारभारा संबंधी टॅक्स, पर्यावरण , कामगार, इत्यादी बाबीसंबंधी सर्वोच्च न्यायालयात खटले असतात. त्यात अटकाव न व्हावा त्यासाठी दिल्लीतील ल्युटीन मंडळी अघोषित दलाल म्हणून काम करीत असतात असे आपल्या वाचनात येत असते. प्रश्न असा आहे की केव्हापासून सरकारी अधिकाराचा दुरूपयोग सुरू झाला ?  हा आहे. ह्याचा शोध घ्यावयाचा असेल तर आपल्याला थेट १९६६-६७ काळात मागे जावे लागते. त्या काळाचा राजकीय घडामोडीचा इतिहास काय आहे त्यावर एक नजर मारू या. म्हणजे काॅग्रेस पक्ष व डावे विचारवंत, ल्युटीन्स मंडळीचे सत्ताधार्या समवेत असलेले संबंध ह्या संबंधी माहीती मिळू शकते. आज मोदी सरकार विरूद्ध विरोधकांचा जो लढा आहे, तो राहूल गांधी म्हणतात तसा विचारसरणीचा असला तरी तो कमी प्रमाणात आहे. मोदींचा मुख्य लढा  सरकारच्या दरबारात असलेल्या लाॅबी तोडण्याचा. त्यातील मुख्य घटक काॅग्रेस त्यामुळे मोदीजी काॅग्रेस मुक्त भारत करू या असे सतत म्हणत आहेत. काॅग्रेस मुक्त भारत ह्याचा अर्थ देशातील व्यवस्था ज्या सडलेल्या आहेत त्यातून देशाला मुक्त करायचे आहे असे स्पष्टीकरण मोदींनी एका मुलाखतीत दिले आहे. आता काॅग्रस मुक्त म्हटले तर पर्यायाने ' नेहरू-गांधी घराणे मुक्त काॅग्रेस ' असाच अर्थ निघतो.

काॅग्रेस पक्षात नेहरू- गांधीची घराणेशाही निर्माण झाली तेव्हापासून सरकारी अधिकार, सरकारी व्यवस्था,  संस्था, बरबटायाला सुरूवात झाली असे मोघमपणे म्हणता येईल. काॅग्रेसमध्ये जी घराणेशाही आली, त्याला भारताचे पहीले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू जबाबदार आहेत असे मानता येत नाही. जर तसे असते तर नेहरूंच्या निधनानंतर काॅग्रेस पक्षांचे संसदेतील नेता म्हणून लाल बहादूर शास्त्रीची निवड झाली नसती. सर्वात सनदशीर पंतप्रधान म्हणून ज्यांचे नाव घेता येईल असे लाल बहादूर शास्त्रींच्या अकाली मृत्युनंतर पंतप्रधानपदी पंडीत नेहरूंच्या कन्या श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. शास्त्रीजींचा मृत्यु  रशियात झाल्यामूळे तसेच इंदिरा गांधी अकल्पीतपणे पंतप्रधान झाल्यामुळे  शास्त्रीजींच्या मृत्यु संबंधी एक गुढ उत्पन्न झाले. ते आजही तसेच आहे. त्या सोबत ' काॅग्रेस पक्षात दादागिरी करून इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या ' अशी चर्चा ही होती. ती आजही कायम आहे. दादागिरी कोणाच्या ताकदीच्या बळावर तर त्याचे उत्तर रशिया हेच असावे. कारण त्यावेळी जग दोन अद्यावत शस्त्रानीं भरलेल्या महाशक्तीत विभागलेला होता. त्या महाशक्ती  म्हणजे भांडवलशाही अमेरिका व साम्यवादी रशिया. रशियाशी आपल्या देशाला नाते जोडणे सामरिक दृष्ट्या आवश्यक होते हे मान्य केले तरी व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणार्या रशियन साम्यवादी स्टाईलने राज्यकारभार चालविण्याची इंदिराजींना काय  गरज होती ? आपल्या देशाच्या संविधानात  समाजवादी राज्यव्यवस्ता तसेच सर्वधर्मसमभाव हे शब्द दुरूस्ती करून घुसडविण्यात आले. पंतप्रधान म्हणून १९७१ च्या पाकीस्ताशी झालेल्या युद्धातील विजयात पंतप्रधान इंदिरा गांधीच्या कणखरापणाचा वाटा होता. म्हणून तत्कालीन जनसंघ  (भाजपा) पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयींनी जाहीर कौतुक केले. परंतु देशाचे राजकारण खालच्या पातळीवर आले ह्यास इंदिरा गांधीच जबाबदार होत्या. राजकीय व्यवस्थेत आपल्या हिंतसंबंधीयांना झुकते माप देण्याच्या प्रथेचे जनकत्व त्यांच्याकडेच जाते. त्यांच्याच कारकिर्दीत काॅग्रेस फुटली. १९७१ च्या निवडणूकीत स्वतः च्या मतदार संघात शासकीय धन व शक्तीच्या गैरवापरामुळे त्यांची निवडणूक अलाहाबाद न्यायालयाने रद्दबादल केली. न्यायालयाचा निर्णय धाब्यावर बसविला. तो खटला सर्वोच्च न्यायालयात गेला. तेव्हा सर्वोच्च न्यायालयात काय झाले हे कधीच बाहेर आले नाही. कारण इंदिरा गांधीनी देशात ( २५ जून सन १९७५) आणिबाणी लावली ते ही मध्यरात्री. त्या अध्यादेशावर राष्ट्रपती महोदयांची सही दुसर्या दिवशी घेतली. आणिबाणीतील कृष्णकृत्यें,  पुत्र संजय गांधीचा सरकारच्या कारभारातला हस्तक्षेप इत्यादी कारणामूळे देशाच्या राजकारणात व्यक्तीपूजा  घराणेशाही, थैलीशाही, हुकूमशाही, भ्रष्टाचार सारख्या दुर्गूणांचा शिरकाव इंदिराजींच्या काळात झाला. हेच दुर्गूण काॅग्रेस मधून बाहेर पडलेल्या नेत्यांनी स्वतःचे प्रान्तीय पक्ष स्थापन केले त्या पक्षांतही शिरले. हे सारे दुर्गूण आपल्या येथील राजकीय व्यवस्थेत आजही आहेत.  

पंतप्रधानपद सांभाळायला घेतल्यावर मोदींनी ह्या व्यवस्थेविरूद्ध लढा पुकारला. परंपरांगत वा इंदिरा गांधीच्या वारसाच्या कृपेने  चालत आलेल्या व्यवस्थेत काॅग्रेसच्या निष्ठावंताकडे देशाच्या तिजोरीच्या चाव्या होत्या. निष्ठावंत व श्रेष्ठी हे दोन शब्द काॅग्रेसच्या इतिहासात इंदिराजींच्या काळात रूढ झाले. श्रेष्ठी म्हणजे इंदिरा गांधी. निष्ठावंत म्हणजे नेहरू-गांधी घराण्याची भाट मंडळी. ह्या भाट मंडळीत फक्त काॅगसचीच मंडळी होती असे नाही. काॅग्रेस व्यतिरिक्त डावे विचारवंत, पत्रकार-मिडीयातील मंडळी, काही उद्योजक, काही विदेशी लोक ही होते. ज्यांना आपण आज ल्युटीन्स म्हणून ओळखतो, ती हीच मंडळी. बँकाचे राष्ट्रीयकरण केल्यामुळे बँकेतील पैसा ही काॅग्रेसचा असाच समज पसरला.(त्यात तथ्य होतेच हे नगरवाला प्रकरणाने कळले. लेखाचा विस्तार वाढेल म्हणून त्यावर चर्चा इथे करीत नाही.) पण तेव्हा आजच्या काळातील माहीती व प्रसारण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान नव्हते. तरीही सरकार दरबारतल्या बातम्या काढण्याचे धाडस व कसब काही व्रतस्थ पत्रकार मंडळीकडे होते.  म्हणून काही गोष्टी सर्वसामान्यांच्या कानीं आल्या. 

आज जगात काय घडते आहे हे मोबाईलच्या एक बटनावरून समजते. तरी ही विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदींवर सर्व सरकारी संस्थेचं खच्चीकरण केले आहे, अशी ओरड सुरू केली. हे  म्हणजे ' उलटा चोर  चौकीदारको डाँटे 'असेच झाले की ! पंतप्रधानपद आणि काॅग्रेसचे अध्यक्षपद हे एकाच व्यक्तीकडे राहण्याची प्रथा इंदिराजींच्या काळात सुरू झाली. सरकारच्या सार्या यंत्रणा इंदिराजींच्या ताब्यात होत्या. आज पुलवामा येथे दशहतवाद्यांने हल्ला कसा केला, इन्टीलीजन्स एंजन्सी काय करत होते, असे खडे सवाल करणार्या काॅग्रेस नेत्यांना माझा प्रश्न हा आहे की, पंतप्रधान इंदिरा गांधीची हत्या कशी झाली, तिही त्यांच्या निवासस्थानी ? महात्मा गांधीजींची हत्या झाली ती काॅग्रेसच्या राज्यातच झाली ना ! तीही दिल्लीतच ना ! माजी पंतप्रधान राजीव गांधीची हत्या काॅग्रेसने पाठींबा दिलेल्या तामीळनाडूतील डीएमके  सरकारच्या काळात का व कशी झाली? त्यावेळी तामीळनाडू तील काॅग्रेसचे नेते मंडळी राजीव गांधीच्या जवळ का नव्हती? ती असती तर मृतामध्ये वा जखमी मध्ये त्यांची नावे आली असती ! पण तसे काही वाचले नाही, ऐकले ही नाही. वरील तिन्ही घटनांच्या संदर्भात  गृहखाते झोपा काढत होते का, हा प्रश्न काॅग्रेस ला ही लागू होतोच ना! काॅग्रेस पक्ष व काॅग्रेसचे सरकार स्वतःच्या नेत्यांचे सरक्षण करण्यात कमी पडले हा तर इतिहास आहे. पण तत्कालीन भाजपाने उलट-सुलट प्रश्न विचारले नाही. प्रसंगाचे गांभीर्य सांभाळण्याचा सुसंकृतपणा भाजपाने दाखविला होता.  पुलवामा येथे जवानावर  पाक पुरूस्कृत दशहतवाद्यांनी हल्ला केल्यावर काॅग्रेस व विरोधी पक्षांनी मोदी सरकारला ' गुप्तहेर खाते काय करीत होते ' असे म्हणत धारेवर धरले. हाती काही पुरावा नसताना लागलीच मोदी सरकारवर आरोप करण्याची काय गरज  होती ? स्थितीचे गांभीर्य विरोधकांनी वार्यावर सोडले. आपल्या हवाई सेनेने पाकिस्तान मध्ये जाऊन बालाकोटवर हवाई हल्ला केला व पाकिस्तानला धडा दिला, त्यावेळी विरोधी पक्षानी त्या संबंधी पुराव्याची मागणी केली. हे काम देशद्रोही स्वरूपाचे नसले तरी ते देशद्रोहाच्या कृत्या एवढे संतापजनक होते. तसे पाहता  प्रगत देशात अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा असूनही तिथे दशहतवाद्यांचे हल्ले होतातच. आपल्या देशात अंतर्गत सुरक्षेबाबत अत्याधूनिक तंत्रज्ञान वापरण्यावर काॅग्रेसने सतत दुर्लक्ष केलेच,  शिवाय सुरक्षापासुन ते प्रशासन पर्यंतच्या हर एक व्यवस्थेत स्वार्थी नोकरशाह, नाटकी देशभक्ती असलेले ल्युटीन्स, आणि त्यांच्या सोबत असलेली तत्कालीन सत्ताधारी  पक्षाची नेते मंडळी देशाची तिजोरी लुटत राहीले. त्यामुळे  सारी राज्यव्यवस्था सडून गेली. पंतप्रधान मोदींचा लढा हा या अव्यवस्थेविरूद्ध आहे. या अव्यवस्थेतून मालदार झालेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची कोंडी होत असल्यामूळे आजचे विरोधी पक्ष (कालचे सत्ताधारी) मोदींवर आरोप करीत आहेत. मार्क टूलीनी म्हटल्याप्रमाणे मोदी विचलीत होणार नाहीत. हे खरे ठरले.  मटा मधील सुनिल चाबके सारख्या पत्रकाराला  मोदींचा आत्मविश्वास प्रचार काळात ढळलेला दिसला तरी,  मला ते नेहमी प्रमाणे आक्रमकच दिसले. निवडणूकीला ते विचलीत न होता सामोरे गेले व विजयी झाले. मोदींच्या  करिष्माला माझा प्रणाम !


आता पुढे काय ? विरोधक एविएम वर संशय व्यक्त करण्यासाठी, आकाश पाताळ एक करण्याची शक्यता आहे. जाती-पातीच्या नावावर दंगल करू लागतील. पुलवामा व बालकोट संबंधी हलकट वृत्तीचे प्रदर्शन करणार्या विरोधी पक्षांची विश्वासहर्ता संपली आहे. तर दुसरीकडे मोदी अधिक मोठ्या संख्येने विजयी झाले आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी अधिक कठोर पावले उचलतील असे दिसते. ती पावले कशी असतील हे आपल्याला वेळोवेळी कळणार आहेतच. त्यासंबंधीची चर्चा आपणही त्या त्या वेळी करूच.  विरोधी पक्षांचा पराभव का झाला ह्याची कारणे अनेक आहेत. ती कारणे अनेक लेखात ह्यापुर्वी मी दिलेली आहेत. थोडक्यात द्यावयाची असतील तर ती अशी आहेत.


१) पंतप्रधान मोदींचा करिष्मा लाजबाब आहे.

२) तथाकथीत पुरोगामी, डावे विचारवंत, कलावंत, साहित्यिक काय म्हणतात ह्यावर भरवसा टाकून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोदी,  भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर नाहक शिव्याची लाखोली वाहिली. ती त्यांना नडली.

३)संघाचा सांस्कृतिक राष्ट्रवाद सरस ठरला आहे. तसेच संघाची पुण्याई भाजपाला उपयुक्त ठरली. प्रत्येक मतदार संघातील बहुतांश मतदार भाजपा उमेदवारास मत देताना हा संघाचा माणूस आहे, असा विचार करून मत देऊ लागले आहेत. संघाच्या चड्डीची टिंगल करणार्या शरद पवारांची काय स्थिती झाली आहे, ह्यावर सार्या विरोधी पक्षांनी विचार करावयास हवा.
      
४) विदेशी पैशावर चालणार्या एनजीओ, तसेच चर्च, मशिदी, मदरेसा ह्यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादावर प्रहार केले. त्यामुळे नवीन मतदार भाजपाकडे वळाला.
  
५) मोदी सरकारने अनेक लोकपयोगी व विकासाची कामे केली आहेत. त्यातील काही अशी आहेत, की ती स्वातंत्र्यानंतर देशात प्रथमच झालेली आहेत. 

६) भाजपा कार्यकर्ते सरस ठरले.

७) प्रथमतः आपल्या देशाचा जागतिक राजकरणावर दबाव वाढला आहे हे सत्य विरोधकांनी स्विकारले नाही.
   
८) दशहतवाद्या संबंधी झिरो टाॅलर्न्स दाखविण्यात विरोधी पक्षांनी नेहमीच्या सवयी प्रमाणे नालायकपणा केला.
   
९) विरोधी पक्षांत असलेल्या घराणेशाहीच्या नाण्यावर जनता  नोटाबंदीसारखा प्रयोग करू लागली आहे.
     
१०)जाती-पातीच्या गणितावरून आता निवडणूकीत मिळणार्या यशाची गँरेन्टी संपत आली आहे. 

११) छोट्या छोट्या कारणासाठी अंदोलने करून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणारे अस्त्र हळूहळू निकामे होत जात आहे. म्हणून राज ठाकरे नावाचे अस्त्र निकामी ठरले.

१२) केवळ सत्ता प्राप्तीसाठी भाषा व प्रांतीय अस्मिता चेतवून अंदोलनाचा वापर उपयोगी पडण्याची शक्यता कमी होत आहे. 

एकंदरीत देश बदलतोय, समाज बदलतोय !  सांप्रादायिक, पेशवे, शेठजी-बनियाचा पक्ष असे हिणविले जात होते त्याच पक्षांची मंडळी काळानुसार बदल स्विकारीत, देशात प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर राहून एकसंघ व उन्नत समाज निर्माण करण्याचे आव्हान पेलविण्याचे काम करीत आहे, हीच बाब जनतेला भावली आणि भाजपाला तिने विजयी केले. ह्या विजयाच्या संदर्भात मला भुतपूर्व  पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी ह्यांनी सन १९९७ साली संसदेत विराधकांना इशारा दिला होता, तो आठवला. तो असा आहे.

" मेरी बातको गांठ बांध ले, आज हमारे कम सदस्य होने पर आप हंस रहे है लेकीन वो दिन आएगा जब पूरे भारतमे हमारी सरकार होगी, उस दिन देश आप पर हंसेगा | "

विरोधी पक्षांनी वर नमूद केलेल्या कारणांवर तसेच अटलजी सारख्या द्रष्ट्या नेत्याने केलेले भाकीत खरे का ठरले ह्यावर अंतर्मुख होऊन आपले राजकारण विशुद्ध देशभक्तीच्या भावनेने करण्याचा प्रयत्न करावयास हवा. लोकशाहीत जय पराजय होत राहतात. पक्ष येतील जातील, नेते होतील जातील, समाज शाश्वत आहे. विसाव्या शतकाच्या प्रारंभी जगाच्या क्षितीजावर उदयास आलेल्या राष्ट्रवादाला पर्याय सध्या तरी नाही. म्हणून आपण सारे एक आहोत ही भावना दॄढ ठेवावीच लागेल. विजयाच्या उत्साहात वा द्वेषाच्या नशेत आपल्या एकतेला तडा देण्याचा प्रयत्न ना सत्ताधारी पक्षाकडून होवो, ना विरोधी पक्षांकडून होवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना !
     
                     भारत माताकी जय !

सोमवार, २० मे, २०१९

प्रचार संपला, मतदानही संपले, पुढे काय ? भाग २



शेवटच्या चरणाचे मतदान संपले व सारे विरोधी पक्षांचे नेते परस्पर भेटण्याची कवायत करू लागले आहेत. ह्यातून काय दिसते ? एनडीएचे मताधिक्य घटेल पण सत्तेवर एनडीए येईल असे सर्व विरोधी पक्षांना कळले असावे. निदान त्यांची बाॅडी लाईन तर तशीच दिसते.  मतदान संपल्या संपल्या लागलीच विरोधी पक्षांची जी धावपळ दिसते त्यावरून मला आणखिन एक गोष्ट दिसते ती ही की, युपीए आघाडीची ताकद अपुरी ठरेल हे काॅग्रेसला ध्यानात कधीच आले असणार. म्हणून प्रियंका गांधी वड्राने ' आम्ही उत्तर प्रदेश मध्ये भाजपाची मते खाण्यासाठी स्वतंत्र लढतो ' असे विधान केले. विरोधी पक्ष येनकेन प्रकारे एकत्र येऊन सत्ता काबीज करण्यासाठी जीव तोडून मेहनत घेतील. पण त्यात त्यांना यश मिळेल का? त्यांचा पंतप्रधान कोण ? इत्यादी बाबत सर्वत्र चर्चा रंगेल. विविध एक्झीट पोल ह्यावयास सुरवातही झाली आहे.

काय निकाल येईल अशी उत्सुकता सर्वांना लागली असणार. एक्झीट पोल काय सांगतात, त्याची सत्यता, त्यांनी दिलेली आकडेवारी आपल्याला पटते  की नाही  हे आपण कोणत्या पक्षाचे समर्थक आहोत, कुठल्या पक्षाला वा उमेदवाराला मतदान केले ह्यावर अवलंबून असते. त्यात आपला दोष नसतो. मी तरी कुठे दुसर्यांच्या भाकीतावर विश्वास ठेवतो ? सामान्यतः प्रत्येक जण कुठल्यातरी पक्षाचा समर्थक असतोच. त्यामूळे आपण भाकीत तयार करताना आपोआप आपल्या आवडत्या पक्षांसंबंधीची ओढ आकडेवारी करतेवेळी आपल्या मदतीस धावत असते. तसाच काहीसा प्रकार माझ्या बाबतीत झाला असावा. त्यामुळे मी सुद्धा वेळोवेळी म्हटले आहे की, एनडीएचे सरकार अस्तित्वात येईल.  

एक गोष्ट मी तटस्थपणे मांडत आलो आहे ते म्हणजे नवयुवक मतदारांना राजकीय पक्षातील घराणेशाही मान्य होताना बिलकूल  दिसत नाही. घराणेशाही पक्षाचे समर्थक होणे हे आधुनिकतेचे लक्षण आहे असे ह्या वर्गाच्या गळी उतरविणे कठीण आहे. ह्या वर्गातील युवकांची मते भाजपाकडे अधिक झाले असण्याची शक्यता आहे. घराणेशाही असलेल्या पक्षांचे समर्थक होणे ही मानसिक गुलामी आहे. ती एक अंधश्रद्धा आहे. तिचे निर्मूलन करण्याचे कार्य अंनिसचे कार्यकर्ते का घेत नाहीत, हे  कळायला मार्ग नाही. बर ते जाऊ द्या. देव न मानणारे राजकीय नेते व विचारवंत ह्यांना त्यांचे कार्यकर्ते देव मानतात, त्यांच्या चरणी लीन होतात, ते कसे खपवून घेतले जाते? देव जाणो !

दुसरे असे की स्वातंत्र्यापासूनच सार्या विरोधी पक्षांनी अल्पसंख्याक समाजात हिंदुत्ववादी पक्षांची भिती उत्पन्न करून ठेवलेली आहे. त्यातूनच  ख्रिस्ती धर्मगुरू, मुस्लीम मौल्लवी एकमुखाने अनेक वेळा राष्ट्रवाद्यांचा पराभव करा असा फतवा काढत असतात. राष्ट्रवाद हा मुद्दा प्रचारात गेल्या वर्षी प्रथम आणला ख्रिस्ती धर्मगुरूनी. देशातला एक मोठा वर्ग धर्मगुरूच्या फतव्याची आज्ञा पाळून आपले मतदान करीत असेल तर ते लोकशाही मुल्यांशी फारकत घेत आहे असेच मानावे लागते. हे ही एक कारण आहे ज्यामुळे तटस्थेने मतदान करणार्याची मते भाजपाकडे अधिक गेली असावीत. ख्रिस्ती धर्मगुरूंच्या विधानामुळे जानेवारी पासूनच धार्मिक धृवीकरणाला सुरवात झालेली होती. ती फक्त दिसली नाही एवढेच. तसेच जातीची अस्मिता, प्रान्तीय अस्मीता ह्या बाबतीत विरोधकांचा हातखंड आहे. तो ही त्यांच्या मदतीस आला असणारच. नाहीतर त्यांचा ह्या निवडणूकीत पुरा बेंडबाजा वाजला असता.  दक्षिण भारतात प्रान्तीय अस्मितेचा फायदा विरोधी पक्षांच्यांच विरोधी गटांना झाला आहे. उदाहरण आहे आन्ध्र व तेलंगण.  इथे टीआरएस व जगन रेड्डीच्या पक्षांना अधिक जागा मिळतील. पण एनडीएचे स्वबळावर सरकार येणार असेल तर ते आपली तटस्थेची भुमिका घेतील. कशाला केंद्राशी पंगा घ्या, विशेष करून मोदीशी हा विचार काल पासूनच त्यांच्या मनात घोंगावत असणार. पुलवामा आणि बालाकोट संबंधी विरोधी पक्षांची वक्तव्ये बेजबादारपणाची वाटली. समाजातील  तटस्थ मतदान करणार्या घटकाला ही रूचले नाही. हे विरोधी पक्षांच्या लक्षात आले, म्हणून हे विषय मागे पडावेत ह्या हेतूने त्यांनी मोदीवर व्यक्तीगत हल्ले सुरू केले. दहा वर्षाचा युपीए सरकारचा कारभार जनता विसरू शकली नाही.  प्रंचड मताधिक्याने मोदींना निवडून देणार्यांना पुन्हा मोदीकडे सत्ता द्यावयाची वाटले असेल तर ते ही  स्वाभाविक आहे. 

राष्ट्रवादाच्या संदर्भात विरोधकांनी असा प्रचार केला की संघवाले त्यांच्या विरोधी मतांच्या लोकांना देशद्रोही समजतात. आपण राष्ट्रवादी आहोत हे सिद्ध करण्यासाठी संघावर उपाहसाने शेरे मारतानाच विरोधी पक्षांचे पितळ उघड पडले. सत्तरहून अधिक वर्षे राज्य  करणार्या काॅग्रेस पक्षाच्या हितसंबंधीयांना सत्तेचा फायदा झालाच नाही असे छातीठोकपणे कोण सांगू शकेल का? मोदी, भाजपा, व संघावर टिका करताना जे विष पेरले ते  काॅग्रेसच्या अशा हितसंबंधीयांनीच. दिल्लीत ह्यांना ल्युटीन्स म्हणून ओळखले जाते परंतु ही मंडळी देशाच्या प्रत्येक राज्यात, तालुक्यात, गावागावत आहे.  काॅग्रेस आणि विरोधी पक्षांनी मांडलेल्या राष्ट्रवादाची कल्पना ठिसूळ होती हे सप्रमाण मोदी सरकारने सिद्ध केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलिकडे एका मुलाखतीत  अनेक वर्षाच्या तपस्याचा उल्लेख केला, ती तपस्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून  ते आतापर्यंतच्या असंख्य त्यागी नेते आणि स्वयंसेवकांची आहे, हे आता सर्वसामान्यांना ठाऊक झाले आहे. 

मे २०१४ सालच्या निवडणूकांचे मतदान संपल्यानंतर मुंबई सकाळ वर्तमानपत्रात माझा एक लेख छापून आला होता. तो लेख पुर्णतया तटस्थेने लिहीला होता. मुलतः तो लेख राष्ट्रवाद ह्या संकल्पनेचं रूप स्पष्ट करणारा आहे. लोकसभा निवडणूक हे निमित्त ठरले एवढेच. २०१४ ला मोदींच्या प्रचार सभांना  देशाच्या कानाकोपर्यात प्रचंड प्रतिसाद मिळत होता. मोदींची भाषणें मी मांडलेल्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेशी जुळत होती आणि ती मतदारांना भावली आहे हे ही  लेखात आवर्जून लिहले होते. पण संपादकांनी माझ्या लेखातील हा भाग वगळला. मुद्दा लांबला आहे पण करणार काय ? विरोधी पक्ष किती वर्षे मोदी-भाजपा-संघाचा द्वेष करीत राहणार ? हे कृत्य जो पर्यंत विरोधी  पक्ष थांबविणार नाहीत तो पर्यंत भाजपा जिंकत राहणार.  पंतप्रधानावर बेछूट आरोप करताना मर्यादेचे भान न ठेवल्यामूळे अनेक तटस्थ विचारवंत, उद्योगपती, व मतदार भाजपाचे समर्थक होत आहेत. हे निदर्शनास आणताना मला आज नाईलाजास्तव म्हणावेसे वाटते, विरोधी पक्षांच्या नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे डोके ठिकाणावर आहे का ? 

अलीकडे सुजीत भोगले  ह्यांनी ' मोदींची पत्नी व आपण ' ह्या शिर्षकाखाली लिहलेला एक लेख सोशल मिडीयावर व्हायरल झालेला आपण पाहीला व वाचला. तो लेख मी अनेक ग्रुपवर फारवड ही केला होता.  पंतप्रधान मोदींवर होणार्या खालच्या पातळीवरील टिकेमुळे सुजीत भोसले अस्वस्थ झाले. सुजित भोसलें संघाचे स्वयंसेवक नाहीत हे येथे लक्षात घ्यावयास हवे. त्यांनी त्या लेखात नरेद्र मोदींची  ' राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रचारक '  अशी मुळ ओळख आपल्याला करून दिली आहे. ज्यांना पंतप्रधान मोदी हिटलर वाटतात, ज्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फॅस्टीट संघटना वाटते, भाजपा सांप्रादायिक वाटतो अशा सर्वांनी सुजित भोसलेंची ही पोस्ट वाचावी. मग संघ-भाजपाची विचारसरणी लोकांना पंसत का पडते ह्याचे कारण त्यांना कळू शकेल असे वाटते.

महात्मा गांधीजींचे वारस म्हणून मिरविणार्या पक्षांनी व त्यांच्या समर्थकांनी १३ मे ला सिनेस्टार कम पाॅलीटीसीयन कमल हसन ह्यांना महात्मा गांधीजींचे पणतू श्री श्रीकृष्ण कुळकर्णी ह्यांनी बंगलोरहून लिहीलेले पत्र वाचावे. ते पत्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. त्या लेखात श्रीकृष्ण कुळकर्णींनी अंत्यत विनयाने काही गोष्टी कमल हसन ह्यांच्या  निदर्शनास आणल्या आहेत. महात्मा गांधीजींना संघाचे कार्य आवडत होते हे ही त्यांनी मांडले आहे. सन १९८२ ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तळजाई (पुणे ) येथे अंत्यंत शिस्तीने संपन्न झालेल्या शिबीराची समाजवेदी नेते एस एम जोशी ह्यांनी ही कौतुक केले होते. एस एम जोशी,   लोकनायक जयप्रकाश नारायण व महात्मा गांधीजी  ह्यांच्या सारख्या महापुरूषांनी शाबासकी दिलेल्या संघटनेला नावे ठेवण्याइतके आपण मोठे आहोत का ? हा विचार भाजपेतर पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी करावयास हवा.  सार्या पुरोगामी विचारवंतानी दर वर्षी संघाच्या पुढाकाराने हिंदु नववर्ष स्वागत यात्रा होतात , त्यात सामील होऊन पहावे आणि मगच आपली मते मांडावयास हवीत. त्या यात्रेत सारा हिंदु समाज कुठलाही भेदभाव न ठेवता सामील झालेला दिसतो. संघ स्वयंसेवकासाठी ज्या कार्यशाळा वा वर्ग आयोजित होतात तिथे भेट देऊन पाहाता येईल की खरेच तिथे ब्राह्मण्यवाद आहे का? 

आज संघ विचाराचा वाढता प्रभाव पाहता,  देशातील किमान एक दोन पुरोगामी विचारवंताना तरी संघ जवळून पाहावा असे वाटत नाही ह्याचे मला आश्चर्य वाटते. खरे म्हणजे इथेच ह्या विचारवंतातील पुरोगामीत्व कच्चे ठरत आहे. पुरोगामी शब्दाचा अर्थ भले, नव्या कल्पनेने भरलेला आधुनिक विचार वा व्यवस्था इत्यादी संबंधीत असला तरी पुरोगामित्व आपल्या मनात तेव्हाच बाळसे धरते  जेव्हा आपण दुसर्या विचारसरणीचा ही आदर करतो.  संघाला विरोध करणारे विचारवंत पैसा, बंगला, उंची गाड्या, कपडे, मद्य, इत्यादीने नटलेल्या जीवनशैलीचे बळी ठरलेले दिसतात. त्यांना असे लाचार कोणी बनविले ? विदेशी एनजीओ व सेक्युलरवादी पक्षांनी. त्यामुळे झाले असे की, संघ विरोधी विचारवंत एअरकंडीशन्ड रूम मध्ये बसून ऐशबाजी करीत असतात.  दुसरीकडे ह्या विचारवंताच्या भरवशावर  तथाकथीत सेक्युलर पक्षांच्या नेत्यांनी आपआपल्या जातीचा, भाषेचा अंहकार फुलवित, ख्रिस्ती व मुस्लीम बांधवांना गळाभेट करीत रस्त्यावर जागोजागी आपली दुकाने थाटली आहेत. रस्त्यावरील ह्यांच्या दुकानावर कोण बसले आहेत ? पगारी पोरं-टोरं. त्यांना आदेश कोण देत आहेत ? तर ह्या नेत्यांचे वारसदार. हे वारसदार बसतात कुठे ? पक्षांच्या सच्च्या कार्यकर्त्यांपासून फार फार दुरवर. नेतमंडळीचा व विचारवंताचा सामान्य कार्यकर्त्यांशी बिलकूल संबंध नाही. मग अशा पक्षांचे  समाजाशी नाते कसे जुळणार ? 

सध्या आपल्या देशात विशेष करून स्वतःला पुरागामी समजणारे विचारवंत व  मिडीयातील मंडळी भारताची संघीय रचना धोक्यात आणली जात आहे असा आरोप करीत आहे, हा सुद्धा एक डावपेच आहे. जितके प्रान्तीय पक्ष अधिक तयार होतील तितके भाजपाशी टक्कर घेणे विरोधी पक्षांना अधिक फारदेशीर ठरेल असे समिकरण मांडले जात आहे. आपल्या संविधनात माडलेल्या संघ रचनेच्या संकल्पनेचा अर्थ रितसर लावावयाचा असेल तर, सामान्यातील सामान्यांना राज्य विधानसभेत केवळ प्रतिनिधीत्व म्हणून नव्हे तर राज्याचा मुख्यमंत्री व त्या प्रादेशिक पक्षाचा अध्यक्ष बनण्याचाही हक्क आहे हे मान्य करणे होय. परंतु असा हक्क प्रदान करतेवेळी  राज्यातील राजकीय पक्षांचे स्वरूप जे घराणेशाहीचे आहे ते नष्ट करायला हवे. तरच खर्याने Fedaral System अस्तीत्वात आली असे आपण मानू शकतो. संविधान रचणार्या आपल्या पुर्वाश्रमींना  प्रांतीय व राष्ट्रीय पक्षात घराणेशाही येईल असे स्वप्नात ही आले नसेल. एकदा का एखाद्या प्रांतीय पक्षात घराणेशाही घुसली की लागलीच त्या प्रांतात दुसराच तसा एक नवीन पक्ष तयार होतो व तोही प्रांतीय अस्मीतेला खत पाणी देत आपली घराणेशाही शाबूत ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो.  एखाद्या राज्यात आलटून पालटून दोन खानदानाचे राज्य येणे हे काही शुभ लक्षण नव्हे. ती एक प्रकारे राजेशाहीच म्हणावी.  मग आपोआप त्या घराण्यातील सदस्यांचा वावर युवराज, सम्राज्ञी असा होत राहतो. त्यांचा कल ऐषारामी जीवन जगण्यात राहतो व जनतेशी त्यांचा संपर्क तुटतो.

ह्या उलट संघाचे नेते मंडळी जमीनीवर दिसतात. स्वयंसेवक, कार्यकर्ते,  नेते  असा भेदभाव तिथे नसतो.  मग संघ  बलवान होत असेल तर नवल का वाटावे ? नवल वाटले तर मी समजू शकतो पण संघ बलवान होत आहे, ह्या बद्दलचा द्वेष का वाटावा ? संघाची मंडळी विदेशातून आली आहे का? ह्या मातीतील संस्कृतीतून घेतलेल्या जीवनमुल्यांनीच ती उभारली आहे ना ! मला ह्या सार्या तथाकथीत पुरोगामी मंडळींना सांगावेसे वाटते, ते हे की, तुम्ही मोदींचा द्वेष, ते गुजरातचे मुख्यमंत्री बनले तेव्हापासून करीत आहात. भगवा आंतकवाद  सिद्ध करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कटात सामील झालात. कशासाठी तर भाजपा व संघाला कायमचे नेस्ताबूत करून सत्ता व सत्तेची मलई लुटण्यासाठी. काय हाती आलं तुमच्या? तुम्ही कितीही प्रयत्न करा, जीवाचे रान करून संघाला संपविण्याचे प्रयत्न करा, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वाढत जाणार आहे. कारण तिथे कार्यकर्त्यांचा त्याग असतो. कार्यकर्ते सेवा धर्माचे व्रत घेतलेले असतात. सायकल व पायी फिरणारे कार्यकर्ते असतात. कुठे भूकंप होवो, पुर होवो, अपघात होवो, तिथे स्वयंसेवक जातात. सरसंघचालकांना आदेश द्यावा लागत नाही. स्वतः आपातग्रस्तांच्या मदतीसाठी धावतात. आपातगस्त सारे आपले बांधव आहेत हीच अंतःकरणी भावना. धर्म-जात-भाषा कसलेच भेद स्वयंसेवकांना शिवत नाहीत. म्हणून म्हणतोय की संघाच्या शाखेत जाऊन या, संघाच्या सेवा विभागातर्फे चालविले जाणार्या प्रकल्पांना, आश्रमांना, शाळांना भेट देऊन बघा आणि मगच आपले मत ठरवा."

आता पर्यंत आलेल्या सर्वे नुसार केद्रात भाजपा आघाडीचे सरकार अस्तित्वात येणार असे दिसते. ते भाकीत वेळोवेळी मी ब्लाॅगवरील लेखात मांडले आहे. पुलवामा आणि बालाकोट नंतर विरोधकांचा व्यवहार पाहून विरोधकांना कदाचित २०१४ हून अधिक दारूण पराभव चाखण्याची शक्यताही मी वर्तविली आहे.  ह्या घटकेला एक्झीट पोलचा अन्वायर्थ लावताना, भाजपाचा विजय मानावा की विरोधकांचा पराभव मानावा असा एक मोठा अडथळा माझ्यासमोर उभा आहे. पण तो अडथळा काल्पनिक वा मनाचा खेळ असेच म्हणा हवे तर. निवडून येणारे सरकार आपलेच असणार. देश आपला आहे, समाज आपला आहे. सरकाराला समाज निवडून देतो. त्यामूळे त्याचा आपण मान राखला पाहीजे. जिथे सरकार चूक करेल तिथे टिका कराच. पण मनभेद होऊ देऊ नका. मनभेदामुळेच कालच पार पडलेल्या निवडणूक प्रचाराचे स्वरूप शाब्दिक चकमकीतून, पुढे सरकत ते रणागंणावरील लढाई पर्यंत गेले. लढाईतून युद्ध , व पुढे युद्धातून महायुद्धासारखे झाले. ही आपली सार्यांची शोकांतिका आहे.  आपणच आपल्या लोकशाहीचे केलेलं हे अवमूल्यन आहे. असे पुढे घडू नये हे पाहणे आपल्या सारख्या मतदारांचे ही कर्तव्य असते. एक्झीट पोल वर दाखविलेला विरोधकांचा होणारा पराभव हा त्यांच्या विचारसरणीचा आहे असे जर त्यांनी मानले तर आपल्या विचारसरणीत बदल करावयाचे भान त्यांना येऊ शकेल. पण त्यांना ' मोदी व संघ-विरोध ' ह्या धोरणाचा पराभव झाला असे वाटत असेल तर त्यावर उपाय सापडणार नाही. पराकोटीच्या द्वेषातून महायुद्ध लढले असल्यामूळे द्वेषाचा पिळ सुटण्याची सुतराम शक्यता नाही. ह्यावर उपाय फक्त काळच ठरविल. काळाचे भान न ठेवता जे कोणी आपले दुष्कृत्यें सुरू ठेवतात, त्यांना काळ क्षमा करीत नाही. काळ जेव्हा क्षमा करण्याच्या स्थितीत नसतो तेव्हा तो आपलं महाविक्राळ रूप धारण करतो. मग काय होत असते हे सांगावयाची गरज ही संपते. कारण महाकाळाच्या तावडीत सापडलेल्यांची अवस्था अश्वस्थामा सारखी होते. हे विरोधकांनी लक्षात ठेवून आपल्यात योग्य तो बदल करावा. देशातील जनता कुठल्या राजकीय विचारसरणीला, कुठल्या पक्षाला, कुठल्या पक्षाच्या नेत्याला,  कुठल्या उमेदवाराला निवडून देणार हा हक्क सर्वस्वी जनतेच्या हातात असतो. पराभूत राजकीय पक्षांनी नाना प्रकारच्या सबबी सांगण्यापेक्षा जनतेने दिलेला कौल मानावा. सरंजामशाही पद्धतीने राजकीय पक्ष चालविण्याचे दिवस संपत आले आहेत. पक्षांतर्गत लोकशाही आणा तरच देशातील लोकशाहीचे सुकाणू सांभाळण्याची संधी मिळेल. विजयी झालेल्या आघाडीतल्या प्रत्येक घटक पक्षाने जनतेने दिलेला कौल अत्यंत विनयाने स्विकारावा. सरकार प्रजेचं आहे हे ध्यानात ठेवून कारभार अधिकधिक लोकाभिमुख कसा ठेवता येईल हे पाहणे हेच सत्ताधारी पक्षाचे आद्य कर्तव्य असते. ते पार पाडण्यात कुचराई केली तर आपली अवस्था विरोधी पक्षासारखी होणार हा ही काळाचा एक नियम आहे, इतके सदैव ध्यानात ठेवावे.

                              वन्दे मातरम् !

प्रचार संपला, मतदानही संपले, पुढे काय ? - भाग १



लोकसभेच्या निवडणूकीच्या सातव्या व शेवटच्या चरणाचे मतदान काल पार पडले. २३ मे रोजी निकाल लागेल. निकाला नंतर  सोळाव्या लोकसभेचं विसर्जन होईल व पुढील  तीन-चार  दिवसात निवडून आलेल्या उमेदवारांचा संसद सदस्य म्हणून शपथविधी होईल व सतराव्या लोकसभेचं गठन होईल. नंतर नवीन सरकार अस्तित्वात येईल. जे सरकार अस्तित्वात येईल ते कोण्या विदेशी नागरिकांसाठी नाही, तर ते आपल्या सर्वांसाठी असणार आहे. कारण ते आपण सर्वांनी अस्तित्वात आणलेले असणार. ते परदेशातून आयात केलेले नसणार. लेखाची सुरूवात राज्यशास्त्र ह्या विषयातील लोकशाही राज्यप्रणालीच्या  अभ्यासक्रमातील बाळबोधने करावी लागली,  ह्याचे कारण असे की  निवडणूकीतला प्रचार राजकीय न राहता रणसंग्राम दिसला. लढाईचं स्वरूप ' भाजपा विरूद्ध इतर पक्ष ' असे असते तर ते लोकशाही मूल्यांशी अधिक सुसंगत वाटले असते. परंतु निवडणूकीतल्या प्रचाराचं स्वरूप  मोदी विरूद्ध इतर पक्षाचे नेते असे झाले. त्याला जबाबदार कोण ह्याचा मागोवा घेतला असता मला जे दिसले त्यावरून मनात आलेले  निष्कर्ष आपल्या समोर ठेवत आहे. 

भारतिय राजकारण ज्यांनी अनेक वर्षे जवळून पाहीले आहे, अशा बीबीसीचे जेष्ठ पत्रकार मार्क टूली ह्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की " पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीत एका नव्या दमाचा भारत होऊ लागला आहे; आज भारताला जगात विशेष मान प्राप्त होत आहे;  सुरक्षा, व्यापार, उद्योगधंद्यासंबंधीचे निर्णय झटपट होऊ लागले आहेत ; परंतु मोदींना विरोधी पक्ष   अनेक अडथळे निर्माण करतील ;  तरीही मोदी आपल्या मार्गावरून विचलीत होणार नाहीत." मार्क टूलींचे हे  भाष्य २०१६ सालचे आहे. मार्क टुली सारख्या विदेशी संपादकांनी मोदींचा करिष्मा व कार्यशैलीचे कौतूक केले. पण--- 

पंतप्रधान मोदींचे असे कौतूक व भाष्य आपल्या येथील किती राजकीय अभ्यासक, व पत्रकार- संपादक मंडळींनी केले आहे?  करू शकले असते पण का केले नाही हा खरा प्रश्न आहे. ह्याचे उत्तर असे आहे की, आपल्या येथील बहुतांश संपादक--पत्रकार मंडळींनी २०१४ चा विजय ना मोदीचा मानला ना भाजपा-संघाचा. ह्या सार्या मंडळींनी २०१४ चा भाजपाचा विजय केवळ भरमसाठ आश्वासनांचा व मोदींच्या जाहिरातबाजीचा मानला. राजकीय भाष्य करतेवेळी दुषित पुर्वग्रह एकदा बाळगला की पुन्हा मागे फिरता येत नाही.  त्यामूळे युपीए सरकारचा दहा वर्षाचा भ्रष्ट आणि गलथान कारभारामुळे काॅग्रेस व मित्र पक्षांचा पराभव झाला ह्या सत्याकडे ह्या पत्रकार मंडळीचे दुर्लक्ष झाले. झाले असे म्हणण्यापेक्षा ह्या मंडळीने जाणून-बुजून केले. कारण ही मंडळी स्वस्थ ही बसली नाही. मग ह्यांनी कोणता उद्योग केला? निरोद्योगी माणसाचा ! 

आता आपण मलाच विचाराल, अहो निरोद्यागी माणूस आणि त्याला उद्योग कसा असू शकतो? मित्रांनो हे कलीयुग आहे. सत्ययुगाच्या अगदी विरूध्द असलेले असत्ययुग. त्यामूळे रेटून खोटे म्हणत जावयाचे हा एक मोठा उद्योग झाला आहे . तो राजकारण आणि मिडीयाशी संबंधीत असतो. इथे सर्वात मोठी कमाई असते. मिडीयातील काही मंडळी व डावे, पुरोगामी विचारवंतानी एक उद्योग सुरू केला. तो म्हणजे मोदी, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर खोटे नाटे आरोप करीत जाण्याचा. राहूल गांधीनी संघावर महात्मा गांधींची हत्या केल्याचा आरोप केला. पण कोणाच्या सांगण्यावरून ? संघ सांप्रादायिक आहे. कुठे पुरावा आहे? राहूल गांधी म्हणत राहीले ' चौकीदार चोर है '. कोणाच्या सांगण्यावरून ? चेन्नईचे कोणी हिंदु वार्तापत्राचे संपादक आहेत. त्यांनी त्यांच्या वर्तमान पत्रात की मासिकात लिहले आहे त्यावरून. पुरावा कुठे आहे?  

मोदी, संघ, भाजपा ह्यांनी देशात असहिष्णुता, द्वेष, लोकशाहीवर घाला, अल्पसंख्याकांवर अन्याय इत्यादी कुप्रवृत्ती वाढविल्या आहेत असे चित्र रंगविण्याचे एक कलमी उद्योग सुरू केला. असहिष्णुता वाढली असती तर देश सोडून जाण्याची भाषा करणार्यांनी देश सोडला का? उत्तर  नाही ! लोकशाहीवर घाला असता तर टुकडे गँगने अफझल गुरू अमर रहे चा नारा दिला असता का? किती पुरस्कार विजेत्यांनी आपले पुरस्कार परत केले आहेत ? हाताच्या बोटाच्या संख्याएवढे ही नाही. निवडणूका जशा जवळ येऊ लागल्या, तेव्हा मोदी नीच कसे आहेत हे वेगवेगळ्या तर्हेने मांडत राहाण्याचा उपक्रम ह्या संपादक मंडळींनी अग्रलेख, साप्ताहीक, व  विविध खोटे विडीओज् वरून राबविण्यास सुरूवात केली. तेच सुत्र विरोधी पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी वापरात आणले. निवडणूक प्रचार व एकंदरीत राजकीय व्यवहार हा खालच्या पातळीवर येण्यामागचे मुख्य कारण संघ व मोदी विषयी पराकोटीचा द्वेष पसरविण्याचे कार्य काही माध्यमांनी केले हेच होय. २०१४ ते २०१९ ह्या कालावधीत विरोधी पक्ष,  विविध एनजीओ, विदेशी हात,  मिडीयातील पत्रकार-संपादक,डावे विचारवंत, राजकीय अभ्यासक इत्यादी मंडळींनी एक जाॅईन्ट व्हेन्चर उघडलेले दिसले.

ह्या जाॅईन्ट व्हेन्चरमुळे २०१४ साली आपण भुईसपाट का झालो ह्यावर विचारमंथन करण्याची विरोधी पक्षांना गरज भासली नाही. विरोधी पक्षांनी एका बाजूला मोदीला झोडपयाचे व दुसर्या बाजूला वाजपेयींची थोरवी गावयाची असे धोरण अवलंबिविले. मोदी वाजपेयजी सारखे नाहीतच, हे खरे आहे. परंतु अटल बिहारी वाजपेयींनाही ह्या मंडळींनी सळो की पळो करून सोडले होते. शांत, संयमी अटलजींनी त्वेषाने ह्या मंडळीवर संसदेत प्रतिहल्ला केलेला आपण पाहीला आहे. मोदी अटलजी नाहीत पण अटलजी ही मोदी सारखे नव्हते. मोदींनी एक हाती स्वबळावर बहुमत आणले , हे नाकारण्यासारखे होते का? भाजपाची सत्ता असलेल्या राजस्थान मध्य प्रदेश, छत्तीसगड ह्या तीन राज्यांची सत्ता काॅग्रेसला मिळाली. हा काॅग्रेसने राहूल गांधीचा करिष्मा मानला. पण इतर विरोधी पक्षांनी  'भाजपाचा पराभव ' मानला. त्यांनी राहूल गांधीचा करिष्मा मानला नाही. तेव्हाच मी अंदाज बांधला होता की सारे विरोधी पक्ष एकत्र येणार नाहीत. झाले ही तसेच. काॅग्रेस प्रणित आघाडीचे स्वरूप थिटे पडले. राजस्थान, मध्यप्रदेश, व छत्तीसगड ह्या राज्यांतील विधानसभेच्या निवडणूकीत भाजपाचा पराभव झाला त्याचे फारसे आश्चर्य वाटण्याचे कारण नव्हते. तिथे पंधरा-वीस वर्षे सत्तेनंतर येणारा Law of Dimnishing Utility आपले कार्य करणारच होता. शिवाय तिथे मोदी साठी मतदान झाले नव्हते ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नव्हती.  (अधिक माहितीसाठी  सेमी फायनलच्या निकालाचा अन्वायार्थ ' ह्या शिर्षकाचा  ब्लाॅगवरील लेख पाहता येईल)  

तीन राज्यात काॅग्रेसला सत्ता मिळाल्याच्या आनंदापेक्षा भाजपाला नमविले ह्याचा आसूरी आनंद सार्या विरोधी पक्षांना झाला . त्यांचे मिडीयातील समर्थक मंडळींना व कार्यकर्त्यांना तर हर्षवायुचा रोग जडला कि काय असेच वाटले. त्या आनंदाच्या नशेत काॅग्रेसने  'अब राहूल लाओ, देश बचाओ '  'अब न्याय होगा ' हा नारा दुमदुमवयास सुरूवात केली. प्रतिसाद अपेक्षेइतका दिसला नाही.  पुढे वाजत-गाजत प्रियंका वड्राला उतरविले. मग काय प्रियंकाच्या अंगात इंदिराजी अवतरल्या आहेत हे पिल्लू सोडून दिले. त्यावर कुमार केतकर, गिरीश कुबेर, काही विरोधी सुर लावतील असे वाटले होते. पण त्यांनी तसे काही केले नाही, कसले हे विज्ञानवादी ? कसले हे पुरोगामी विचारवंत ? 

'अब आयी है मैदानमे इंदिराजीकी पोती ' ह्या घोषणेची  नशा काॅग्रेस कार्यकर्त्यांनांच नव्हे, तर इतर विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना ही जडली. बस सार्यांनी, आपआपले पत्ते हातात ठेवतच, चहुबाजूनी  मोदी हटाव, भाजपा हटाव, संघ नष्ट करो, लोकशाही बचाओ,  अशी हुल्लडबाजी सुरू केली.  शिवाय  भाजपा-संघाच्या कार्यकर्त्यांवर ठीकठीकाणी गुर्मी  दाखविली. ह्या गुर्मीचे स्वरूप कल्पनेपेक्षा अधिक भयावह व व्यापक दिसले. मोदी  गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच हा कट रचला गेला होता हे सत्य अलिकडे उघड झाले आहे.  ह्या कटाची व्याप्ती केवळ मोदी विरोधा पुरता मर्यादीत नाही . संपुर्ण संघ परिवाराला नामशेष करण्याचा हा कट आहे. त्याचेच परीचित नाव भगवा आतंकवाद. प्रथम मोदीना हटवायचे मग भाजपा, नंतर संघ परिवार अशी क्रमवारी ठेवली गेली. मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून अनेक विदेशी लाॅब्या , डावे विचारवंत, संपादक - पत्रकार इत्यादी मंडळीच्या साथीने  विरोधी पक्षांच्या नेत्यांनी, त्यांच्या शेंबड्या पोरांनी व कार्यकर्त्यांनी मोदींच्या कमरेखाली वार सुरू केले ते शेवटच्या मतदाराचे मत मतपेटीत बंद होईपर्यंत. भाजपाने ही तोडीस तोड वार केले. भाजपा अटलजी अडवाणीच्या कालखंडातला राहीला नाही हे तर दिसले होतेच मग विरोधी पक्षांनी थोडा समजूतदारपणा दाखवून मुद्यावर भाजपाला पकडावयाचे होते की ! पण विरोधी पक्षांना ते जमले नाही, कारण संयम व प्रगल्भतेचा अभाव आणि परस्परांमधील अविश्वास.

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...