अलिकडे प्रसिद्ध चित्रपट अभिनेता नसरूद्दीन शहा हे फार चर्चेत आलेले आहेत. त्यांच्या एका वक्तव्याने अनेक वृत्तपत्रांच्या अग्रलेखातही त्यांना स्थान मिळालेले आहे आणि संपादक महाशयांनी नसरूद्दीन शहावर स्तुतीसुमने उधळली आहेत. काय होते नसरूद्दीन शहांचे वक्तव्य? नसरूद्दीन शहा म्हणाले, " काही भागात आपण पाहतोय की, एका पोलीस अधिकार्याच्या मृत्युपेक्षा गायीच्या मृत्यूला अधिक महत्व दिले जातेय. अशा वातावरणात मला आपल्या मुलांची काळजी वाटते." ते पुढे म्हणतात की "देशातील वातावरण खूपच विषारी बनलेय आणि ह्या राक्षसाला बाटलीत बंद करणे आता कठीण वाटू लागलेय." कालच्या शनिवार दिनांक २२ डिसेंबर २०१८ मटाच्या अंकात बाटलीतला राक्षस ह्या मथळ्याच्या अग्रलेखात संपादक महाशय म्हणतात, "नझरूद्दीन शहाच्या वक्तव्यात आमीरखानच्या वक्तव्यासारखी निसरडी जागा नाही. ते स्पष्ट आणि स्वच्छ आहे."
मला मटाच्या संपादक महाशयाना विचारावेसे वाटते की, आमीरखानच्या वक्तव्यात निसरडी जागा होती हे तुम्ही आता का मान्य करीत आहात? तेव्हा तुम्ही आमीरखानचीच बाजू घेतली होती की नाही ? तुम्ही कडक शब्दात आमीरखानची हजेरी घेतली होती का? आणि नसेल तर तेव्हा ही तुम्ही आमीरखानलाही विचारवंताचा दर्जा दिला होता असेच मानावे लागते. कारण मोदींच्या कारकिर्दीतच असहिष्णूता वाढली आहे हे गृहितक तुम्ही मानले होते ना ! पुरस्कार परत करणार्या लेखकांचीही तुम्ही बाजू घेत मोदी सरकार आणि संघपरिवार टिका केली होतीच. अहो, संपादक महाशय, मोदींच्या कारकिर्दित असहिष्णूता वाढली की नाही ह्यावर चर्चा करण्याअगोदर पुरस्कार परत करणे ही महाभयंकर असहिष्णूता होती ह्याची जाणीव आपणांस का नाही झाली? पुरस्कार परत करणे हा देशाचा अपमान आहे. जगभरातील देश मोदींचे कौतूक करीत असताना आपल्या येथील तथाकथीत विचारवंत केंद्रात प्रथमच हिंदूत्व विचारसरणीचे सरकार स्थापन झाले हे पाहून पुरस्कार परत करण्याची खेळी सुरू करण्यात गुंतले. काय झाले त्या मोहीमेचं ? मोहीम थंडावली. कारण पुरस्कार परत करणार्या मंडळींना पुरस्कार देण्यातच खोट होती असा समज समाजबांधावांचा झालेला दिसला, तोच त्यांनी सोशल मिडीयावर व्यक्त केला. त्यांना केवळ मोदींचे भक्त म्हणून आपण हिणविण्यात आपली बुद्धी का खर्च करीत आहात? अक्षयकुमार सारख्या अभिनेत्याने शहीद होणार्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी सुरू केलेल्या योजनाचे आपण कौतूक केले आहे का? नसरूद्दीन शहांनी समाजसेवेचे काही उपक्रम राबविले आहेत का? हेच ते नसरूद्दीन शहा, ज्यांनी १९९३ सालच्या मुबंईवर बाॅम्ब स्पोट घडविणार्या याकुब मेननची फाशी शिक्षा रद्द करण्यासाठी राष्ट्रपती महोदयाकडे स्पेशल विनंती अर्जावर सही करणारे महाभाग ! १९९३ च्या बाॅम्ब स्फोटामुळे स्वतःच्या मुलांच्या भवितव्याची चिंता नसरूद्दीन शहांना वाटली नव्हती किंवा UPA सरकार केंद्रात व राज्यात सत्तेत असताना मुस्लिम संघटकांनी म्यानमारमधील दंगलींचा वापर करून मुंबईत आझाद मैदानात जो हौदोस घातला, पोलिसांना मारहाण केली त्याही खेपेस नासिरूद्दीन शहांना मुंबईत असूरक्षित वाटले नव्हते. त्याबद्दल संपादक महाशय आपण अग्रलेखात काहीही लिहलेले नाही. इतकेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी सज्जन कुमारांना ८४च्या शिखविरोधी दंग्यामधिल सहभागा बद्दल जन्मठेप झाली पण आपण तसेच नसरूद्दीन शहांनी त्यासंदर्भात निदान एक राक्षस बाटलीत बंद झाल्याचा आनंद व्यक्त केलेला नाही. बहूदा त्याना ८४च्या दंगेखोरांमागे असलेले खरे राक्षस कोण हे माहित असावे. मोदी सरकार विरूद्ध बोलणार्या सर्वच विचारवंत आणि सेलीब्रटींचे कौतूक करावयाचे हा आपला पेशाच आहे असे जर मटाच्या वाचकांचा समज झाला तर तुम्ही वाचकांच्या बुद्धीचे दिवाळे निघाले आहे असे म्हणत अग्रलेख लिहाल का? उत्तर 'नाही' असेच असणार ! कारण संपादकपद सांभाळणे हा आपला पेशा आहे हे आपण कितीही अमान्य केले तरी वस्तूस्थितीत बदल होत नाही. आणि हो बाटलीतील राक्षस मंडळी आपल्या इथे आली ती आपल्या देशाच्या पश्चीम आणि वायव्य देशातूनच. जगाच्या इतिहासात धर्माच्या नावाखाली जी धर्मयुद्धे झाली, तसेच साम्रज्यवादाच्या नावाखाली जी दोन महायुद्धे झाली ती कुठे आणि कोणत्या मानवी समुहामध्ये झाली त्या संबंधीचा इतिहास आपल्याला ज्ञात आहे. ती एकेश्वरी मानणार्या मानवी समुहातच झाली होती. त्यामुळेच आपल्या येथील तथाकथीत विचारवंतच्या शैलीत तेथील संस्कृतीचा प्रभाव पडलेला दिसतोय. मोदींच्या भक्तांसंबंधी टिका करण्याअगोदर आपण कोणाची री ओढता आहात ह्याकडे लक्ष द्यावे. कारण तिथे सुधारणा होणे आवश्यक आहे. तिथे तुमची मटाच्या मालकावरील भक्तीचे दर्शन होत असते.
नसरूद्दीन शहांनी पोलीसाची हत्या झाल्याबद्दल संवेदनशिलता व्यक्त केली इतपर्यंत ठीक होते. त्यात त्यांनी गायीच्या जीवाला महत्व अधिक दिलं जात आहे, असा टोमणा मारला. हा टोमणा केंद्र सरकारला मारला असला तरी बहूसंख्याक समाजाच्या भावनेला जाणीवपुर्वक ठेंच मारली अशी भावना हिंदु समाजबांधवात झाली आहे हे नाकारता येत नाही. त्याही पुढे जाऊन आपल्या मुलांच्या भवितव्याची भिती त्यांनी व्यक्त केली आहे. अशी भिती कितीही रास्त असली तरी त्यांच्या वक्तव्यात काळजीपेक्षा उपरोधिकपणा अधिक आहे. त्यामुळे त्यांचे वक्तव्य कोणी मानो वा ना मानो हे राजकीय स्वरूपाचे आहे असे वाटते. त्यामुळेच सोशल मिडीयावर त्यांच्यावर टिका होत आहे. मुलायम आणि अखिलेश यादव, मायावती ह्यांच्या कारकिर्दीत कशी गुंडशाही माजली होती, किती हत्या झाल्या, तेव्हा संवेदनशील अभिनेता नसरूद्दीन भारताबाहेर राहात होते का? काश्मीर खोर्यात जवानांवर दगडफेक करणार्यावर अशीच तिरसट शब्दात टिप्पणी नसरूद्दीन शहांनी करायला हवी होती की नाही ? तशी त्यांनी केलेली माझ्या वाचनात आलेली नाही. नसरूद्दीन शहांनी पोलीसाच्या हत्येसंबंधी हळहळ व्यक्त करताना हेतूपुरसर गायीपेक्षा पोलीसांचा जीव कमी महत्वाचा ठरला आहे अशी ओरड केली आहे. इथे मी गोरक्षकांच्या कृतीचे समर्थन करीत आहे असा समज करू नये. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विज्ञाननिष्ट निबंधाचे पुस्तक हे माझे सर्वात आवडते पुस्तक आहे. गाय एक उपयुक्त पशू आहे इतकेच मी मानतो. पण त्याच उपयोगी पशूसंबंधी बहूसंख्य समाजाची श्रध्दा असू शकते इतकं सत्य मानणे हे लोकशाहीच्या मुल्यांशी सुसंगत आहेच की नाही? भूतदया हा सुद्धा धर्म आहे की नाही ? वाईल्ड ॲनिमल प्रोटेक्शन ॲक्ट अस्तित्वात असेल तर गायी सारख्या पशूचे रक्षण करणारी व्यवस्था असण्याची मागणी बहुसंख्याक समाजाकडून लोकशाही प्रणाली राज्यव्यवस्था स्विकारणार्या आपल्या देशात केली तर त्यात चूकले काय? देशात अल्पसंख्याक म्हणून एखाद्या समुहाला दर्जा देण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आणि ती तशीच राहावी हा उद्योग कोणी सुरू केला? समाज राष्ट्राच्या नावाखाली एकजुट राहावा ह्यासाठी प्रयत्न करण्यासाठी सत्ताधार्यांना आडकाठी कोणी केली होती का? देशाच्या फाळणीच्या वेळी बाटलीतील राक्षसासारखे वर्तन कोणी केले होते हा इतिहास नसरूद्दीन शहा आणि आपल्यासारख्या विचारवंताना माहीत नाही असेच गृहीत सतत धरले जावे का? गोरक्षकांपैकी काही जण अतातायी कृत्यें करणारे असू शकतील हे ही मी नाकारीत नाही. पण बहुसंख्याक समाज गाय ह्या पशूला माता मानत असल्यामुळे जाणीवपूर्वक रित्या त्याच्या भावनेची चेष्टा उडविणारी अतिरेकी मंडळी ह्या देशात आहे की नाही? बीफ समर्थनासाठी भर रस्त्यात गाय कापणारे काँग्रेसचे केरळातील नेते सहिष्णू मिडीयाने दाखवलेले शहांनी पाहिले नाहीत काय? त्यांना कोणी आवर का घालत नाही ? सार्या संपादक महाशयांच्या लेखणीतील शाई आपोआप संपते की काय? (की त्यांच्या हाताना लकवा होतो? ही भाषा शरद पवारांची आहे. त्यांना उपदेशाचा डोस तुम्ही पाजू शकता का?) बहुसंख्याक समाजाला सततची सापत्न वागणूक मिळत गेल्यामुळे तो समाज हळवा झालेला असू शकतो. म्हणूनच बहुसंख्याकांच्या भावनेला जरासी ठेंच पोहचेल असे विधान करणे हे कुठल्याही विश्लेषणाच्या पद्धतीने सर्वसमावेशकतेचं लक्षण मानता येत नाही आणि विचारवंताचे लक्षण तर मुळीच ठरत नाही. कदाचित सध्या होऊ घातलेल्या महागठबंधनापैकी कुठल्या तरी एका पुरोगामी पक्षाचे लक्ष आपल्याकडे लागावे ह्या हेतूने नसरूद्दीन शहाने असे वक्तव्य केले असण्याची शक्यता दिसते. तशी शक्यता नाही असे मटाचे संपादक ठामपणे म्हणू शकतात का? उलट उत्तेरीतील तीन राज्याच्या विधानसभेत भाजपाचा पराभव झालेला पाहून नसरूद्दीन शहांना खासदार बनण्याचे डोहळे लागले असण्याची शक्यता दाट आहे असेच दिसते. मटाचे संपादक काँग्रेसच्या राजस्थान व मध्यप्रदेशातील निसरड्या बहूमताला भाजपचे पानिपत म्हणतात व खवळलेल्या भक्तांनी म्हणूनच शहांवर टिका सूरू केली असा निष्कर्ष काढला आहे परंतू महागटबंधनाचा तेलंगणात उडालेला फज्जाही त्यांना मोदीविरोधी कौल वाटावा, व्वा काय न्याय आहे आपल्या येथील पूरोगामी विचारवंताचा ! हिंदी चित्रपटसृष्टीतील बहूतांश कलाकार आपलं काम भलं आणि आपण बरे असेच धोरण आखत वाटचाल करीत असतात. पण नसती उठाठेव करणार्यांपैकी जे काही कलाकार आहेत त्यापैकी एक नसरूद्दीन शहा आहेत. ते एक अशा कलाकारांपैकी आहेत की ज्यांना हिंदुत्वाची ॲलर्जी आहे, आणि ही बाब सर्वश्रुत आहे. त्यामूळे ते काय म्हणाले, ह्याचे आश्चर्य वाटले नाही. आणि मटाच्या संपादकानी काय लिहले ह्याचे आश्चर्य वाटले नाही. पण दोषी नक्की कोण ह्याची चौकशी होण्यापूर्वीच आलेले नसरूद्दीन शहांचे वक्तव्य आणि त्यावरील मटाचा अग्रलेख ह्या दोन्ही गोष्टी लोकसभेच्या निवडणूका तोंडावर आलेला असताना घडाव्यात हे थोडे चमत्कारीक वाटले. मग त्यातून त्या चमत्काराचा शोध घ्यावासा वाटला. म्हणून हा लेख प्रपंच. परंतु एवढ्यावरच हा शोध संपलेला नाही. शोधाचा विस्तार वाढला आहे. त्यामुळे तो पुढील लेखात क्रमशः येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा