बुधवार, २१ नोव्हेंबर, २०१८

कार्तिकी एकादशी - पु.पांडुरंग शास्त्रींच्या शब्दात


परवा कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने अनेक भाविकांनी  मंदिरात जाऊन विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. बहुतांश  मंदिरात काकड आरती, भजन आणि किर्तनाचे कार्यक्रम झाले. आपल्या संस्कृतीचे ज्ञान-भांडार श्लोक आणि सुभाषितांनी ओतप्रत भरलेले आहे. एक सुभाषित असे आहे की त्यातून आपण काय आणि कसे बोलावे, काय ऐकावे इत्यादी संबंधी बोध मिळतो. ते सुभाषित असे आहे,
    हस्तस्य भुषणम दानम्  सत्यम कंठस्य भुषणम |
    श्रोतस्य भुषणम् शास्त्रम् भुषणयैः किम प्रयोजनम् || 
(दान करणे हे हाताचे अलंकार आहेत, तर सदा सत्य बोलणे हे आपल्या कंठाचे भुषण आहे. नेहमी आपल्या धर्म शास्त्रातील देव-देवतांच्या अवतारासंबंधी कथा, सुभाषिते, स्तोत्रे, किर्तन भजन इत्यादी आपल्या कानी ऐकू यावे आणि आपण रंगून जाणे हीच खरी कानाची आभूषणे आहेत मग सोन्याचांदीच्या दागिन्यांची गरज काय ?) 

वरील सुभाषितामध्ये आपण काय ऐकावे ह्याचा उल्लेख आहे पण काय वाचावे ह्यासंबंधी उल्लेख नाही. असे असले तरी  'ग्रंथ हे आपले गुरू आहेत ' हे वचन तर आहेच. आपल्या मनाला, बुद्धीला तजेल ठेवील अशा ग्रंथाचे वाचन करणे न जमले तरी सोप्या भाषेत सणवारांच्या पाठीमागील सामाजिक प्रयोजन काय असते  इत्यादी संबंधीची माहीती ज्यात आहे अशी पुस्तके जाणीवपुर्वक वाचणे आवश्यक आहे. कारण वाचन म्हणजे अतिसुक्ष्म रित्या ओठाने आपण बोलत असतो आणि आपला मेंदू कानांना आज्ञा देतो की ऐक. एका परिने आपण जे वाचतो ते आपण बोलतो, आणि जे बोलतो  ते आपण ऐकतो हे सत्य असल्यामूळे आपण प्रथम चांगले  वाचायला शिकले पाहीजे की मग आपण चांगले बोलतो.नंतर आपोआप चांगले ऐकायला सुद्धा मिळणार ही बाब सुद्धा  कर्माच्या सिद्धान्तात गणली जाते. म्हणून आपण चांगले वाचणे आवश्यक आहे. हे जरी खरे असले तरी निरीक्षर मंडळीनी कुठे वाचन केले होते? तरी त्यांनी भजने किर्तने ऐकून आपले वर्तन, आचरण आणि व्यवहार सात्विक ठेवल्याचे आपण अनुभवित आहोतच ना ! ऋग्वेद हा पहीला वेद.तरी भगवान श्रीकृष्णाने विभूती योगात 'वेदानाम सामवेदोऽस्मी ' असे का म्हटले आहे? ह्यावर विचार करता असे वाटते की आपल्या सारख्या जनसामान्यांना  जाडजूड ग्रंथ वाचण्यापेक्षा संगीतमय ढंगात भजने किर्तने, आरत्या द्वारे देवाच्या रूपाची व अस्तित्वाची जाण सहजगत्या होऊ शकते. हे सत्य कलासक्त, पुर्ण पुरूषाचा अवतार असणार्या, व ज्याने साध्या पावीतून माणसापासून ते मुक्या प्राण्यांनाही मंत्रमुक्त केले अशा जगतगुरू भगवान श्रीकृष्णाला माहीत होते ह्याबद्दल आश्चर्य कसे वाटेल? विश्वाची उत्पत्तीच ओम् ह्या नादब्रह्मातू झाली असल्यामुळे माणूस जन्मतःच कुठलेतरी गाणे गुणगुणत असतोच, भले त्याला राग, स्वर, सुर ठेका इत्यादीविषयीची फारशी जाण नसली तरीही. ऋग्वेदात तीन स्वरानी उगम झालेल्या संगीताची वाढ सामवेदात सात स्वरापर्यंत पोहोचते. ऋग्वेदातील ज्या ऋचा गावयाच्या त्याचा संग्रह म्हणजे सामवेद. देवाच्या दरबारात भक्तांच्यात भूतलावर असलेल्या भेदांना थारा नसतो. वेदशाळा संपन्न भक्त असो वा साध्या सोप्या आरत्या म्हणणारा निरीक्षर भक्त असो, देव भक्ताच्या भावातील पातळीवरून गुण देत असतो. ह्याचा अर्थ मी साक्षरतेच्या विरोधात आहे असे बिलकूल नाही. साक्षरतेच्या अभावाने व्यवहारी जगात माणसाला किती त्रास झाला हे आपण मानवाच्या उत्क्रान्तीच्या इतिहासात अनुभवले आहे. माझा मुद्दा हा आहे की साध्या सोप्या भाषेत आपल्या देव-देवतांच्या कथामधील रूपके तसेच आपल्या सणासंबंधी व प्रतिकासंबंधीची माहीती असेल अशा पुस्तकाचे वाचन करणे आवश्यक आहे. जसे वाचन वा श्रवण तसा आपला विचार, आणि जसा विचार तसा जीवनाला आकार हा शाश्वत सिद्धांत. ह्याच सिद्धांताचे दर्शन स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पुजनीय पांडुरंगशास्त्री आठवले ह्यांच्या संस्कृती पुजन ह्या पुस्तकातील प्रत्येक पृष्ठावर होत असते. ह्याच पुस्तकाच्या आधारे आपण आषाढी एकादशीच्या महतीवर लेखाद्वारे चर्चा केली तशीच चर्चा कार्तिकी एकादशीवर व्हावी ह्यासाठीच ह्या लेखाचा प्रपंच मांडला आहे. 

आषाढी एकादशी पासून चार महिन्यासाठी झोपी गेलेले सार्या विश्वाचे पालक, भगवान विष्णू आज झोपेतून जागे होतात ते ह्याच दिवशी.  म्हणून या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते. देव झोपतो म्हणजे काय ह्या संबंधीचे विवरण  'आषाढी एकादशी वरील लेखात झालेले आहे. त्यात  पूजनीय शास्त्रीजींनी विवरण करीत असताना भक्तीयोग आणि कर्मयोगाची सांगड घातली आहे हे आपण पाहीले. देव झोपी जातो म्हणजे कर्म करताना गर्वाचा लवलेश आपण ठेवू नये असा संदेश आपल्याला द्यावा ह्यासाठी  चार महिन्यासाठी देव झोपी जातो ही कल्पना आपल्या शास्त्रकारांनी मांडली आहे. देव झोपतो अशी कल्पना  मांडल्यानंतर, देव जागा झाला ही कल्पना जन्मास येणे क्रमपाप्त होते. देवाच्या झोपेचा काळ हा चातुर्मास म्हणून मानला जातो. ह्या  काळात आपण  आहार-विहार- आचार-विचार ह्यासंबंधी जागरूक राहायला हवे असा सल्ला आपल्या शास्त्रकारांनी दिलेला आहे. ह्या सर्व कल्पना वरवर पाहता भ्रामक, वेडगळ वाटू शकतात पण थोडासा विचार केला की ह्या पाठीमागे सामाजिक व्यवस्था कशी टिकविता येते, आपले आरोग्य कसे चांगले राहील ह्या बाबींचा उहापोह झाल्याचे दिसून येते.

सामान्यतः ' पावसाळा रोगी, हिवाळा भोगी आणि ऊन्हाळा योगी ' असे आपण ऐकतो. ही कल्पना आयुर्वेदातून आलेली असली तरी आधुनिक वैद्यकशास्त्र सुद्धा हेच सांगते. अध्यात्मशास्त्रात म्हटले जाते की आपल्या नियत कर्मात समरस होण्यासाठी आणि विशेषतः ऊन्हाळ्यानंतर येणार्या वर्षा ऋतूतील हवामानात बदलाला सामोरे जाण्यासाठी आपली शारिरीक क्षमता शाबूत राहणे आवश्यक असते. कारण 'शरीर माध्यम खलू धर्मसाधनम'| सारी कर्मे आपण शरीराद्वारे करीत असतो. म्हणून  पोट भरून खाण्याऐवजी एक घास कमी खा असे विज्ञान म्हणते. पोट भरून अन्न खाल्ले की पाठोपाठ सुस्ती येते हा आपला सार्वत्रिक अनुभव आहे. त्यातच चार महीन्याचा हा काळ आरोग्यासाठी धोकादायक असतो. म्हणून चातुर्मासात उपवासाचा सल्ला दिला जातो. सुस्ती म्हणजे झोप नव्हे. झोप ही रात्रीच्या वेळी घ्यावी हा निरोगी राहण्याचा मंत्र आहे. एकूण चातुर्मासात सुस्ती टाळावी आणि आपण कर्मयोग साधावा हाच संदेश आपल्या शास्त्रकारांनी दिलेला आहे. ऋतुमानानुसार आहार घेऊन शरीर सक्षम ठेवणे,  तसेच निसर्गाशी आपले नाते अतूट रहावे, पर्यावरणाचा र्हास करू नये  ह्यासाठी भरमसाठ वाढणार्या आपल्या भौतिक गरजांना नियंत्रणात ठेवावे हे ध्यानात ठेवूनच ऋषींनी आपल्या संणाची रचना केलेली दिसते. आता आपण ह्या कार्तिकी एकादशी संबंधी पुजनिय पांडुरंगशास्त्री आठवले काय म्हणतात हे पाहू या.

शास्त्रीजी म्हणतात, " लाक्षणिक रित्या ऋषीमुनींनी देवाला जसे झोपविले (आषाढी एकादशीच्या दिवशी ) तसेच त्यांनी ह्या दिवशी झोपेतून देवाला उठविले. देवाला झोपेतून उठविले म्हणजे आपण स्वतःलाच उठवावयाचे.  झोपलेल्याला उठविणारी, बसलेल्याला उभी करणारी, उभा असलेल्याला चालायला लावणारी, आणि जो चालत असेल त्याला धावायला लावणारी ही एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी. झोपणे म्हणजे आळस, अज्ञान, अंधार इत्यादी अवगुणांच्या निद्रेत असणे. आपले शास्त्रकार म्हणतात,  'उत्तिष्टत, जाग्रत प्राप्यवरान् निबोधात ! ' श्रुतींचा आदेश आहे, ' उठा आणि जागे व्हा.' आता इथे हा प्रश्न उभा होतो की, माणूस प्रथम जागतो, की उठतो ? खूप माणसे उठतात पण जागे होत नाहीत. जगातील किती माणसे, स्वतःच्या मानसिक, बौद्धिक, किंवा आत्मिक विकासाच्या बाबतीत जागृत असतील? भौतिकरित्या थोडे ही नुकसान होऊ नये ह्याची सतत काळजी घेणारे लोक जगातील भाव, प्रेम, आनंद, किंवा संस्कार हरवून जात आहेत. विकृतीच संस्कृतीच्या नावाने खपू लागली आहे. खर्या जागृतीच्या अभावामुळे आपल्या जीवनाचे सर्व व्यवहार जणू वरवरचे बनले आहे. आपण जीवनाची खोली गमावून बसलो आहोत. आपण चालतो ते फक्त पायाने चालतो; हृदयाने नाही ! पाय चालले तर प्रवास होतो, हृदय चालले तर यात्रा ! आपण पाहतो खूप; पण प्राप्त काहीच करीत नाही. डोळे पाहतात ते दृश्य आणि हृदय अनुभवते ते दर्शन ! आपण ऐकतो खूप; पण समजत काही नाही, कारण उपनिषदांनी,  श्रुतीनी सांगितलेले आपण मन लावून ऐकत नसतो. वाणीमागे अपेक्षित तपश्चर्येचे बळ आपण साधलेले नाही. आपण कामें पुष्कळ करतो पण कर्मयोगाची उंची गाठू शकत नाही. कारण कर्मामागे ज्ञानाचा प्रकाश किंवा भावाची आर्द्रता नाही. म्हणून सतत प्रवृत्तीत मग्न असूनही आपल्या वाट्याला प्राप्तीच्या नावाने शून्य आहे. शरीराने यंत्रवत् काम करीत राहून मनाने अन्यत्र रमत राहाणे म्हणजे Absent  mindedness होय.  हा देखील झोपेचाच एक प्रकार आहे.  प्रबोधिनी एकादशी मानवाला अशा विभिन्न निद्रांमधून जागण्याचा संदेश घेऊन येते."

पुजनीय पांडुरंग शास्त्रीजी जेव्हा बोलत असत, तेव्हा ते ना मुखातून बोलत असत, ना ते बुध्दीने बोलत असत. ते निश्चीतपणे अंतःकरणातून बोलत असत. त्यांच्या प्रवचनातून सामान्यजनांसंबंधीचा कळवळा आपण आजही अनुभवत आहोत. म्हणून ते जनसामान्यांचे दैवत ठरले. आजच्या चंगळवादी च्या काळात जे जीवन आपण जगत आहोत, ह्या संबंधी जगभरातील समाजशास्त्रज्ञ, तत्तवेते , मानसशास्त्रज्ञ वेळोवेळी आपल्याला सावध राहण्याचा सल्ला देत आहेत.  ह्यावरूनच पुजनीय पांडुरंगशास्त्री आठवले हे महामानव होते ह्याची साक्षता पटल्याशिवाय राहात नाही. केवळ डोळ्याने आपण पाहतो म्हणजे नजर असावी. पाहाताना नजर आणि बुद्धींची सागंड झाली ती दृष्टी होय आणि जेव्हा दृष्टीला मन जोडले की दृष्टीचे रूपातंर होते, ती दूरदृष्टी असावी. त्याचेच नाव संवेदनशीलता असावे. हीच दुरदृष्टी शास्त्रीजींकडे होती. म्हणून त्यांच्या लिखाणातून वाणीतून समाजातील लोकांप्रती संवेदनशिलतेचे दर्शन घडत गेले. शेवटी हे सारं मानण्यावर आहे. पण मग चांगलं-वाईट, पाप-पुण्य, संस्कती-विकृती ह्यातील फरक तर ओळखता आला पाहीजेच की. साधारणतः आपण प्रवृत्तीनुसार वागत, बोलत असतो. प्रवृत्तीकडून आपली घसरण होत गेली की विकृतीची पातळी सुरू होत असावी. आणि प्रवृत्तीकडून वरच्या पातळीवर गेलो की संस्कृती सुरू होत असावी. त्याही पुढे प्रवास असतोच. पण तो पल्ला फार फार मोठा आहे. कुठेतरी निवृत्तीची पातळी सुरू होत असावी. निवृत्ती म्हणजे बुद्धीची स्थिरता. शेवटचा पल्ला कोठून सुरू होत असेल हे फक्त महामानव आणि संतमहंतच जाणो. त्या पातळीवरील प्रवास हा विरक्तीचा असावा असेच म्हणावेसे वाटते. अंतिमतः जीवाची शिवाची भेट होते. सारांशाने असेच म्हणू या, की  जीव व शिवाची जी अखंड मैत्री आहे ती अबाधित ठेवण्याचा सल्लाच आपल्या सणांद्वारे, प्रतिकाद्वारे किंवा जे विशेष दिन आपण मानतो  त्या द्वारे मिळत असतो. आणि तोच उपदेश आपल्याला विठूरायाने  कार्तिकी एकादशीच्या दिनानिमित्त दिला आहे असे समजून आपण चांगल्या विचारांचे जागरण करीत प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडीत जावे तेव्हाच खर्या अर्थाने आषाढी एकादशी, चातुर्मास, कार्तिकी एकादशी आपण साजरी केली असे समजता येईल.

३ टिप्पण्या:

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...