शुक्रवार, २७ जुलै, २०१८

गुरू पौर्णिमा-पुज्य पांडुरंगशास्त्रीजींच्या शब्दात



आज आषाढ शुद्ध पौर्णिमा. ह्या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा तसेच गुरू पौर्णिमा असेही म्हटले जाते. आपल्या देशात वैदिक काळात संस्कृती घडविण्याचे काम वेगवेगळ्या रीतींने अनेक ऋषींनी केले आहे. पण महर्षी वेदव्यासांनी सर्व विचाराचे संकलन करून आपल्याला संस्कृतीचा ज्ञानकोष असा महाभारत ग्रंथ दिला. भारतः पन्चमो वेदः असे म्हटले गेले. महाभारत ह्या ग्रंथाला पाचव्या वेदाची उपमा प्राप्त झाली. महाभारताद्वारे व्यासांनी सांस्कृतिक विचार द्दष्टान्तासहित सरळ भाषेत समाजासमोर ठेवला. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने मुनिनामप्यहम् व्यासः असे विभूती योगात म्हणत व्यासांचा गौरव केला आहे. संस्कृती घडवितांना व्यक्तीचा मोक्ष आणि समाजाचा उद्धार ह्या दोन्ही आदर्शाकडे महर्षी व्यासांनी अभेद दृष्टीने पाहीले. अभ्युदय आणि निःश्रेयस ह्या दोहोंचा समन्वय साधता कसा येईल ह्यावर चिंतन करून त्यांनी ग्रंथ लेखन केले. म्हणून अध्यात्म परायण असे महर्षी व्यास एक अग्रणी समाजशास्त्रज्ञ ठरले. त्यांचे वैदिक व लौकीक ज्ञान एवढे अमर्याद होते की, 'व्यासोच्छिष्टं जगत् सर्व ' आणि महाभारताला 'सारं विश्वस्य' असे म्हटले गेले. सार्या मानव जातीला कवेत घेणारे साहित्य निर्मिती त्यांनी केली. पुढे त्यांनी पुराणेही लिहली. एका परिने महर्षी व्यासांना हिंदू संस्कृतीचा प्रणेता अशी मान्यता मिळाली. वेदव्यासांचे जीवन व कथन अमर बनविण्यासाठी त्यांच्या अनुयायी चिंतकांनी, संस्कृतीचा प्रचार करणार्या सर्वानी त्यांच्यासाठी' व्यास' संबोधन निश्चित केले. सांस्कृतिक विचार ज्या पिठावरून सांगितले जात होते त्याचे नाव व्यासपीठ म्हणून रूढ झाले. प्रणेता ह्या शब्दाला साधा पर्यायी शब्द म्हणजे गुरू. पंरपंरागत सुरू झालेली व्यासपूजा पुढे गुरूपुजा मानली गेली. तो दिवस आषाढ शुद्ध पौर्णिमा. 

पुज्यनीय शास्त्रीजींनी महर्षि व्यासांची महत्ती आपल्यासमोर मांडून व्यास पौर्णिमेचे नाव गुरू पौर्णिमा कसे झाले ; सांस्कृतिक कार्यक्रमाला जो मंच उभा केला जातो त्याचे नाव व्यासपिठ कसे झाले अशी माहिती देऊन शास्त्रीजींनी आपल्यावर फार उपकार केले आहेत असेच मानावयास हवे. कारण आपण सामान्यजन कुठे पुराणे, गीता, उपनिषदे वाचायला बसतो? सतत व्यासपिठाचा उच्चार करीत असतो पण व्यासपीठ म्हणजे काय हे आपणास ठाऊक होते कुठे? धर्मशास्त्रातील कर्मे करतो पण त्याचा अर्थ, त्यामागील धार्मिक, वैज्ञानिक, शारीरशास्त्रीय , सामाजिक इत्यादी कारणे काय आहेत हे कुठे ठाऊक होते? या संबंधीतील सारी माहिती सरळ आणि सोप्या भाषेत 'संस्कृती पूजन ' हे पुस्तकाद्वारे आपल्या समोर ठेवून आपल्यासारख्या सामान्यजनांत शुद्ध भक्तीभाव निर्माण केल्याबद्दल शास्त्रीजींचे धन्यवाद व्यक्त करावयास शब्द अपूरे पडतात. आजच्या गुरू पौर्णिमेच्या शुभ पर्वावर त्यांना कोटी कोटी प्रणाम! 

सामान्यतः आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, ज्यांचा आपण आदर करतो, ज्यांचा आपल्याला आधार वाटतो अशा व्यक्ती आपल्या जीवनात बर्यापैकी संख्येने येतात. परंतु आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, ज्यांचा आदर करतो तसेच जे आपल्याला आधारवड असतात आणि त्याही पलिकडे जाऊन आपल्याला ज्यांची भक्ती कराविसी वाटते अशा व्यक्ती दुर्मीळ असतात. अशा लोकांना आचार्य, गुरू संबोधले जाते. व्यक्तीगत जीवनात माता-पिता, आप्त आणि आप्तांच्या व्यतिरिक्तही गुरू असतात. मानवी जीवनाच्या कक्षा इतक्या विस्तारल्या आहेत की प्रत्येक क्षेत्रात गुरू आवश्यक असतात. मानवाने जी अनेक क्षेत्रात प्रगती केली ती पुर्वाश्रमींनी केलेल्या संशोधन, निष्कर्षाच्या आधारेच. मानवाने प्रगती केली पण पशू-पक्ष्यांचे काय? त्यांच्यात गुरू-शिष्य पंरपंरा आहे का? ना पक्षी आपल्या पिल्लांना उडण्याची कला शिकवतो, ना सिंह आपल्या बछड्याला शिकार शिकवितो. आपण आपली उन्नती करू शकतो ही जाणिव मानवातच आहे. म्हणून त्याला गुरूची आवश्यकता वाटते. दुसरे असे कि, आर्य चाणक्य म्हणत की,' प्रगतीद्वारा येणारी प्रत्येक नवीन सुविधा, एका असुविधेला अथवा दुष्परिणामांना जन्म देत असते.' म्हणून संस्कृती आणि समाज व्यवस्थेचं, सामाजिक स्वास्थ्याचे रक्षण करण्यासाठी जी व्यवस्था आपल्या समाजात आहे त्याचे नाव आहे 'गुरू-शिष्य पंरपंरा'. ती अबाधित राहणे गरजेचे असते. कारण गुरू हा मानव आणि ईश्वर यांच्यातील एक दुवा असतो. म्हणून आज भारतभर गुरू-पुजनाचा उत्सव साजरा होत असतो.

गुरू पूजन का हवे ह्याचे उत्तर देताना पुजनीय पांडुरंग शास्त्रीजी म्हणतात, जसे निर्जीव वस्तू वर फेकण्यासाठी जशी सजीव वस्तूची गरज(मानवी हाताची) लागते तशीच साधारणतः जीवनहीन व पशुतुल्य बनलेल्या मानवाला देवत्वाकडे पाठविण्यासाठी जीवंत व्यक्तीची आवश्यकता भासते. ही व्यक्ती म्हणजेच गुरू. मानवाला देवत्वा कडे जाण्याच्या वाटेवर स्वतःच्या पशुतुल्य वृत्तीवर संयम ठेवावा लागतो. ही संयमाची प्रेरणा त्याला गुरूच्या जीवनातून मिळत असते. गुरू म्हणजे जो लघु नाही तो आणि लघुला जो गुरू बनवितो तो. गुरूपुजन म्हणजे ध्येयपूजन. गुरूचे जीवन ध्येयमूर्तीसारखे असते. ध्येयाचे साकार रूप असते. मानवाच्या जीवनात ध्येय येताच संयम येतो. संयमाने शक्ती संग्रह होत जातो आणि या शक्तीनेच मानव ध्येयाच्या जवळ जातो आणि शेवटी साक्षात्कार होतो.
गुरूच्या उपकारानी ज्याचे हृदय भरून आले की त्याच्या मुखातून आपोआप कृतज्ञता बाहेर पडते--

गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णुः गुरूर्देवो महेश्वरः |
गुरूः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः || 

ब्रह्मदेवाप्रमाणे सद्गुणाचा निर्मात; विष्णूप्रमाणे सद्वृत्तीचा पालक व महादेवाप्रमाणे दुर्गुण व दुर्वृत्तीचा संहारक, तसाच जीव व शिव ह्यांचे मिलन करणारा गुरू हा साक्षात परब्रह्मासमान आहे. अशा गुरूचे पुजन हे भारतीय संस्कृतीचे सुमधुर व भावार्द काव्य आहे. गुरूजवळ पोहताच बुद्धी ग्रहणशील बनते. त्याचा सहवासच इतका मधुर असतो की, त्याच्यापासून दूर होणे मनातच येत नाही. त्याच्या एका चित्ताने वर्षानुवर्षाचा थकवा दूर होतो. त्याची कृपादृष्टी होताच मनाची मलिनता दूर होते. म्हणून गुरू पूजन होत असते. गुरूबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. त्या भावनेतून एखादी वस्तू वा दक्षिणा गुरूच्या चरणी वाहण्याची पंरपंरा सुरू झाली आहे.

शास्त्रीजी पुढे म्हणतात, 'मी कोणाचा तरी आहे ' हा मधुर भाव त्यात आहे. ह्या भावनेत कृतज्ञता असते. जनकाचे गुरू याज्ञवल्क्य होते आणि शुकाचार्याचे गुरू जनक होते. सांदीपनीचा शिष्य म्हणवून घेण्यात कृष्ण व सुदामा गौरव मानीत होते. विश्वामित्राची सेवा करण्यामध्ये राम व लक्ष्मण कधी थकत नव्हते. वेद, उपमन्यु किंवा आरूणी ह्यांना धौम्य ऋषी गुरू लाभले ह्याबद्दल ते स्वतःला धन्याता समजत होते. द्रोणाबद्दल अर्जुनाच्या मनात असलेला नाजूक भावच त्याला युद्धकर्तव्यात थोडा शिथिल बनवितो. परशुरामापासून ज्ञान प्राप्त करण्यासाठी कर्णाने खूप कष्ट घेतले. शुक्रचार्यापासून संजीवनी प्राप्त करणार्या कचाची ज्ञाननिष्ठा व गुरूभक्ती आजही आपल्याला नतमस्तक बनविते. गंडपदाचार्याचे नाव येताच शंकराचार्य भावविभोर होत असत. पाश्चात्य देशातही ' मी अमक्याचा शिष्य आहे ' असे मानण्यात गौरव अनुभवतात.' मी साॅक्रेटीसाचा शिष्य आहे ' असे समजण्यात प्लेटो स्वतःला कृतकृत्य समजत होता. तर 'प्लेटो माझा गुरू आहे ' असे सांगण्यात आॅरिस्टाॅटल स्वतःचे जीवन धन्य समजत होता.

पुज्यनीय शास्त्रीजींनी गुरू-शिष्य पंरपंरा विशद करून आपण शिष्य कसे असलो पाहिजे हे ही अप्रत्यक्षपणे वरती सांगितले आहे. मनुष्य कितीही बुद्धिमान असला तरी गुरू केल्या शिवाय त्याला खरे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. अशी भारतात सार्वत्रिक मान्यता आहे. ज्याच्या ठिकाणी अहंकार नसेल आणि जो ज्ञानार्त असेल तोच गुरू करील आणि त्याच्याच ज्ञानाला काही आकार येऊ शकतो. पंढरपुरच्या विठ्ठलाचा नामदेव किती परमभक्त! पण ज्ञाना शिवाय नाम ही अधुरे असते. म्हणून देवाने नामदेवाला विसोबा खेचरांना गुरू करण्याविषयी पुनः पुनः स्वप्नादेश दिला. म्हणून "गुरूपुजन म्हणजे ज्ञानाचे पुजन, अनुभवाचे पुजन, सत्याचे पुजन." गुरू-शिष्य परंपरा ही मानव जातीतच आहे. एका पिढ्याकडून दुसर्या पिढीला ज्ञानाची पुंजी सरकत गेली म्हणून मानव प्रगत झाला. प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक शतकात ज्ञानी, तसेच शिक्षण, आरोग्य, विज्ञान, कला, उद्योग, शेती इत्यादी क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्याचे कसब असलेली मंडळीच प्रायः गुरूपदावर आरूढ होत आलेली आहेत. गुरू-शिष्य पंरपंरा म्हणजे ज्ञानाची गंगोत्रीच. गुरूशिष्य पंरपंरेमुळे मनुष्याला अनंत काळाचा वारसा प्राप्त झाला. गुरूशिष्य पंरपंरा म्हणजे मानवाच्या व्यापकतेचा आणि एकात्मतेचा साक्षात्कार आहे. संसहवेदना हे मानवाचे एक वैशिष्य आहे. गवसलेल्या गोष्टीचा आपण एकट्यानेच उपभोग घेणे ही पाशवी वृत्ती आहे. आपल्याला मिळालेली वस्तु इतरांना वाटावी ही मानवाची सहज प्रवृत्ती. तिच्यामुळेच गुरू-शिष्य पंरपंरा सुरू झालेली दिसते.
जें जें आपणास ठावे | तें तें इतरांस शिकवावे | शहाणे करून सोडावे | सकल जन | 
ह्याच मानवी स्वभावातून गुरू- शिष्य परंपंरा निर्माण झालेली दिसते. 

क्षेत्र कुठलेही असो प्रत्येक क्षेत्रातल्या गुरूचे वर्तन, स्वभाव, शिष्यासंबंधीची ओढ, इत्यादी गुण-वैशिष्टे कमी अधिक प्रमाणात सारखीच असतात. 
पुढे शास्त्रीजी गुरू कसा असतो, ह्याचे वर्णन पुजनीय संस्कृतमधून लिहून मराठीत अर्थ समजून देतात, 



ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तीं |
द्वंदातीत गगनसद्दशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम ||
एकं नित्यं विमलमंचलं सर्वधीसाक्षिभूतं |
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरू तं नमामि || 



ब्रह्माचा आनंदरूप, परमसुखरूप,ज्ञानमूर्ती, द्वंदापासून दूर, आकाशासारखा निर्लेप व सूक्ष्म, तत्त्वामसि तोच तू आहेस, हे ईशतत्त्व तूच आहेस त्याची अनुभूती हेच ज्याचे लक्ष्य आहे; अद्वितीय, नित्य, विमल, अचल, कोणत्याही मनाच्या पलिकडे, त्रिगुणरहित, अशा सद्गुरूला मी नमस्कार करतो.'

शेवटी शास्त्रीजी म्हणतात असा गुरू मिळाला नाही तर? ' कृष्णं वन्दे जगदूगुरूम् '. भगवान कृष्णाला गुरू मानून त्याने गीतेत सांगितलेल्या जीवनपंथावरून चालणे हैच श्रेयस्कर.' त्यासाठी स्वाध्याय परिवाराच्या आश्रयास जाऊन तेथून ' कृष्ण चरीत्र ' व 'गीतामृत ' ही पुस्तके घेऊन वाचावित आणि त्यातील बोधावरून जीवनाचा प्रवास केला की खरे गुरूपुजन होईल आणि गुरूला खरी दक्षिणा मिळाल्यासारखे होईल.



जय योगेश्वर !

सोमवार, २३ जुलै, २०१८

आषाढी एकादशी -- पुज्य पांडूरंग शास्त्रीजींच्या शब्दात


आज आषाढी एकादशी. आपल्या हिंदू मान्यतेनुसार भगवंत चार महीन्यासाठी झोपी जातात. म्हणून ह्याला देवशयनी एकादशी म्हणतात. आपल्या धर्मातील आणखिन एक मान्यता माझ्या वाचनात आली आहे. त्यात चार युगाचे वर्णन एका वाक्यात केलेले आहे. आपण जेव्हा झोपलेलो असतो ते कलीयुग. झोपेतून जागे होतो तेव्हा द्वापार युग सुरू होते. जाग आल्यावर आपण उभे राहतो तेव्हा त्रेता युग असते. आणि आपण जेव्हा चालायला लागतो तेव्हा सत्ययुग असते. आता आपण ह्याच मान्यतेचा अर्थ काय असावा ते पाहू या. जेव्हा सर्वत्र सत्याचा संचार असतो ते सत्ययुग. सत्याचा विसर पडयाला सुरूवात झाली की त्रेतायुग सुरू होत असावे. सत्याचा विपर्यास सुरू झाला की द्वापारयुग सुरू होत असावे. आणि सत्य नष्ट होत जाऊन असत्य आणि अधर्माचे राज्य सर्वत्र माजते तेव्हा ते कलीयुग असते. जेव्हा आपण झोपतो ते कलीयुग असे वर्णन असल्यामुळे भगवंत झोपी जातात म्हणजे काय असावे? हा प्रश्न सहज आपल्या मनात उठतो. असा प्रश्न आपल्या मनात आला कि निश्चीतपणे आपण समजावे की भक्त होण्यासाठी आपले पहीले पाऊल पडले आहे. खाली दिलेले उत्तर वाचले की भगवंताच्या लाडक्या भक्ताच्या घरात आपला प्रवेश झाला अशी आपली खात्री होईल.

स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पुज्यनीय पांडुरंगशास्त्री उर्फ दादा आठवले ह्यांनी आपल्या संस्कृती-पूजन ह्या पुस्तकात आपल्या बहूतांश सण, उत्सव, प्रतिकांच्या पाठीमागे व्यक्ती आणि समाजाची ऐहिक व परलौकीक उन्नतीचं प्रयोजन असते, हे उत्तमरित्या मांडले आहे. देव झोपी जातो म्हणजे काय, त्यातून शास्त्रकारांना काय अभिप्रेत आहे, ह्या संबंधींचं निरूपण वाचू या, पुज्यनीय दादांच्या शब्दात.

"या दिवसापासून चार महिने प्रभू झोपी जातो. ' मला जे आवडते ते प्रभूला आवडते.' या भावानेच भक्त प्रभूला फूल, अत्तर, प्रसाद इत्यादि वस्तू अर्पण करतो. भक्ताला स्नान आवडते म्हणून तो देवालाही स्नान घालतो. भक्ताला उत्तम उत्तम कपडे घालायला आवडते म्हणून प्रभूलाही सुंदर, जरीचे कपडे घालतो. काम करून स्वतः थकून जातो म्हणून त्याचा भगवानही आराम करतो. कारण, विश्वाचा व्यवहार चालवता चालवता तो थकून जात असेल. म्हणून त्यालाही आराम पाहिजे. त्यानेही चातुर्मासात झोपले पाहिजे असा भक्तिशील हट्ट देखील भक्ताने केलेला असेल. हा भक्तिशील हट्ट देवशयनी या कल्पनेत सौंदर्य व माधुर्य आणतो."

"माणूस जसा थकून जातो, तसा केव्हा केव्हा कंटाळूनही झोपी जातो. जिद्दी मुलांना कंटाळून ' तुला योग्य वाटते ते कर' असे बोलून पुष्कळ वेळा आई किंवा वडील झोपी जातात; तसे तर भगवंताचे मानवाच्या बाबतीत होत नसेल ना?"

पुज्यनीय दादा पुढे म्हणतात, "काही वेळा दुसर्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी माणूस झोपी जातो. फंड किंवा वर्गणी गोळा करणारे लोक येतात तेव्हा पुष्कळ वेळा माणूस त्यांच्यापासून वाचण्यासाठी जाणून बुजून झोपी जातो. शंकर कैलासात निघून गेले व विष्णू क्षीरसागरात झोपले ते अशा लोकांपासून स्वतःहाला वाचविण्यासाठी तर नाहीत ना?"

पुज्यनीय दादांच्या मनात आलेले असे प्रश्न ऐकताना वाटते की आपली संतमंडळी जसे देवाला प्रश्न विचारीत तद्वत दादा साक्षात पांडुरंगालाच हे प्रश्न विचारीत असावेत. कारण त्यांच्या वाणीत, लेखणीत, संताच्या वाणीतला आणि लेखणीतला लाडीकपणा दिसतो. आपले संपूर्ण जीवन भक्तीमय झाले की भगवंतापाशी भक्त हट्ट करू शकतो, हेच खरे. पुज्यनीय दादांची ईश्वरनिष्ठा आणि समाजिक बांधिलकी उच्च कोटीची होती. समाजातील उच्च-निच्चता, राजस आणि तामस वृत्तीची सतत होणारी वाढ थांबवून सात्विक वृत्तीचा अंगिकार करण्यासाठी समाज बांधवांना प्ररीत करण्याची साध्या आणि सोप्या भाषेतील प्रयोग शाळा म्हणजे त्यांच्या पाठशाळा. समता ही कायद्यापेक्षा ममतेने आणि अध्यात्मिक अधिष्ठानातून होऊ शकते. त्यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला 'स्वाध्याय परिवार' ह्यातील परिवार हा शब्दच दर्शवितो की 'आम्हां सार्या देशवासीयांची ओळख फक्त आणि फक्त बंधुत्वाने होईल,अन्य कुठल्याही शब्दाने होऊ शकत नाही.' आधुनिक जीवनशैलीतून सर्वत्र उत्पन्न होत असलेल्या व्यसनाधिनतेच्या रोगाचं भक्तीमार्गाने उच्चाटन करणारे, आपल्या धरतीमातेला सतत हिरवागार शालू परिधान करता यावा ह्यासाठी वृक्षारोहणाचे कार्य करणारे महामानव म्हणजे पुजनीय पांडुरंगशास्त्री आठवलेजी. 'ज्ञानाशिवाय भक्ती अपुरी, भक्तीशिवाय ज्ञान अपूरे' आणि ह्या दोन्ही गोष्टीं शिवाय कर्म अधांतरीत राहते. हेच तत्व मानवी जीवनात शांती निर्माण करू शकते हे त्यांनी आपल्या जीवनयात्रेतून सिध्द केले आहे. पुज्यनीय दादांचं व्यक्तीमत्व म्हणजे ज्ञानयोग,भक्तीयोग आणि कर्मयोगाचा विलोभनीय संगम. म्हणूनच देव चार महिन्यासाठी झोपी जातात म्हणजे काय ह्या प्रश्नांचे उत्तर ते लिलयाने तितक्याच मातेच्या ममत्वाने समजावून देतात. 

पुढे ते म्हणतात, "भगवंताच्या मंदिरात लहान मोठ्या लोकांची जी गर्दी होते ती मागणार्यांची असते. भगवंताकडे मागणे यात वाईट काही नाही. मागणार्याला भगवान देतो देखील. पण भगवंताला आनंद तर तेव्हाच होतो की, जेव्हा कोणी तरी त्याला निरपेक्षरीत्या भेटायला येतो अथवा स्वतःच्या कर्माची फळे भगवंताच्या चरणावर अर्पण करायला येतो." 

देवशयनी एकादशी संबंधीचे दादांचे हे निरूपण आता भक्तीयोगातून कर्मयोगाकडे वळते. पण मायेचा ओलाव्यात काही कमी पडू देत नाहीत. ते म्हणतात, "या सर्व कल्पनाहून श्रेष्ठ अशी एक कल्पना आहे आणि ती म्हणजे कर्मयोग्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भगवान झोपी जातो. प्रभू जे चार महीने झोपी जातो त्याला आपल्या देशात चातुर्मास म्हणतात. सामान्य प्रसंगातही जर भगवान झोपी गेला तर सृष्टीचा व्यवहार चालणार नाही, मग चातुर्मासासारख्या अमूल्य काळात, ज्यावेळी सर्व सृष्टीसाठी जल व अन्नाची व्यवस्था करायची असते त्यावेळीच भगवान झोपतो हे कसे चालेल? त्यामुळे काही लोकांना 'भगवान झोपतो ही कल्पना जुनी, पुराणातून शोधून काढलेली कथा आहे असे वाटते. पण तसे नाही. वर्षा ऋतूत सृष्टीचे सौंदर्य सोळाही कलांनी फुलून उठते. मानवाला जीवन मिळते. शेतकर्याला मुबलक पीक मिळते आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरते. भगवंताच्या या कृपेने न्हाऊन निघालेला कृतज्ञ बुद्धीचा मानव प्रभूचे गुण गाताना थकत नाही. 'माझे वैभव हे तुझ्या कृपेचे फळ आहे.' असे जेव्हा मानव प्रभूला सांगतो त्यावेळी प्रभू त्याला जणू उत्तर देतो की,'मला माहित नाही. हे सर्व वैभव तुझ्या परिश्रमाचे फळ आहे. मी तर चार महिने झोपी गेलो होतो.' काम करताना सतत जागृत राहणे आणि फळ येते त्यावेळी माहित नसल्याचा बहाण करून झोपी गेलो होतो असे सांगणे ह्याच्यापेक्षा हृदयाची महान विशालता कोणती असू शकेल का? खर्या कर्मयोग्याला याच्यापेक्षा दुसरे श्रेष्ठ मार्गदर्शन कोणते होऊ शकते? भावनेच्या दृष्टीने ही कल्पना जेवढी आर्द्र वाटते तेवढीच विचारांच्या दृष्टीनेही माधुर्यपूर्ण वाटते. शिवाय याच्यावरून असेही फलित निघते की, कर्म करा पण कर्म करताना अभिमान करू नका. कर्म करताना 'मी' ची समाधी लागू दे. 'अहम' गाडा, झोपू द्या. प्रभू झोपी गेला म्हणजे अहम न ठेवता तो कर्म म्हणजे जगव्यवहार करीत राहिला." 

पुजनीय दादाजींच्या निरूपणाचा अर्थ किंवा आपल्यासाठी संदेश म्हणा तो हाच आहे की भंगवतांचे लाडके भक्त व्हावयाचे असेल तर आपले प्रत्येक कर्म भक्तीमय झाले पाहीजे. क्षेत्र कुठलेही असो आपआपले कर्म आनंदाने स्विकारा. म्हणजे तुम्ही त्या कर्मात रमाल, रंगाल. इतके तास काम केले हे कळणारही नाही. आपण काहीच करीत नसून सगळी हितावह, शुभ कर्म भगवंत आपल्याकडून करवून घेतात. कर्माचा नैवेद्य त्याला दाखवयाचा आणि म्हणायचे देवा अजून हे कर्म हवे तसे साधले नाही. कृपा करून मला सहाय्य करा. भगवंत झोपले नसून ते बघत आहेत कि कोण भक्त त्यांना निश्चिन्त बनविण्यासाठी झटत आहे. आपल्यासारख्या लेकरांकडून त्या परमपित्याने जी अपेक्षा केलेली आहे ती पुर्णत्वाकडे नेण्यासाठी जो काही प्रयत्न करवयाचा त्याची सुरूवात करण्यासाठी ह्या एकदशी सारखा शुभ दिवस अन्य कुठला असू शकतो ? शिखरावर चढून चमकण्यापेक्षा स्वतःला कार्यमंदिराच्या पायात गाढून घेण्यात धन्यता माना. मग आपोआप आपण भगवंताचे लाडके होऊ .

जय योगेश्वर !

रविवार, १ जुलै, २०१८

सर्जिकल स्ट्राईक वरून पुन्हा राजकारण



दोन वर्षापुर्वी भारतीय सेनादलाने पाकिस्त्तानच्या हद्दीत जाऊन दशहतवादाचे अड्डे उडविले होते. ते ही मध्यरात्री. सेनादलाची ती कारवाई सर्जिकल स्ट्राईक ह्या नावाने आपल्याला परिचित झाली आहे. देशभरातून सामान्यजनांनी आपल्या जवानांच्या पराक्रमाचं कौतूक केलं. गेली अनेक वर्षे सीमापार पाक पुरस्कृत दशहतवाद्यांनी आपल्या देशाविरूध्द पुकारलेल्या छूप्या युध्दा विरूध्द असा दणका द्यावयास हवा होता असे बोल सर्वसामान्य भारतियांच्या मुखातून आले. जवानांच्या कौतुकासोबत सामान्य जनतेने पंतप्रधान मोदींचं ही कौतूक केले. पंतप्रधान मोदींचं कौतूक होत असलेलं पाहून विरोधी पक्षांना अवदसा आठवली आणि सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही, अशी बोंब मारत सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागू लागले. योग्य वेळी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे दिले जातील असे भाजपाचे प्रवक्ते न्यूज चॅनेल्यवरून सांगत होते. तरीही विरोधी पक्षांनी आपला हेका सोडला नाही. त्याची किंमत नंतर झालेल्या काही राज्यातील विधानसभा निवडणूकात त्यांना मोजावी लागली.

काल-परवा सर्जिकल स्ट्राईकचे विडीओ प्रसारीत झाले. काही न्यूज चॅनेलवर चर्चाही घडल्या. सर्जिकल स्ट्राईकला फर्जिकल स्ट्राईक हिणविणार्या अशा भाजपा विरोधी न्युज चॅनेल्सनी चालाखीने ह्या संबंधी मौन पाळले. ज्या चॅनेलवर सर्जिकल स्टाईक संबंधीच्या विडोओवर चर्चेचे कार्यक्रम झाले तिथे विरोधी पक्षांच्या प्रवक्त्यांनी भाजपा आणि सरकारवर आरोप केला की सर्जिकल स्ट्राईकचा विडीओ प्रसारीत करून भाजपा २०१९ च्या निवडणूकीत फायदा घेण्याचं राजकारण करीत आहे. 

प्रथम सर्जिकल स्ट्राईक ही बातमीच खोटी मानायाची आणि सोबत त्यासंबंधी पुरावे मागत देशभर फिरायचे. आता पुरावे सादर केले, तर हे जवानांच शौर्य आहे, सरकारचं कसले कौतूक आले? खरं म्हणजे पुरावे मागितले तेव्हा जवानांच्या शौर्याचा अपमान आपल्या हातून होतोय ह्याचं भान विरोधी पक्षांना राहीलं नाही. त्यामुळे आता जवानांचं कौतुक करून विरोधी पक्षांच्या पदरात पडण्यासारखं काही राहीलं नव्हतंच, जे काही सामान्य जनतेला द्यावयाचे होते, ते भाजपाला दिले होते. मला विरोधी पक्षांना विचारावेसे वाटते की, तुम्हाला आपल्या पंतप्रधानांचे आणि संरक्षण मंत्र्याचे कौतुक नसेल करावयाचे तर नका करू पण मग १९६५ सालच्या पाकिस्तानशी झालेल्या युध्दातील विजयाचं श्रेय तत्कालीन पंतप्रधान शास्त्रीजींना आणि 'हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री' अशी उपमा दिलेल्या यशवंतराव चव्हाणांना तसेच १९७१ सालच्या युध्दातील विजयाचं श्रेय पंतप्रधान इंदिरा गांधींना आपल्या बापज्याद्यांनी दिले होते त्याचे काय? आपल्या बापज्यादांना काय वेड लागले होते? सेनादलातर्फे कुठच्याही आघाडीवरील शत्रुवर केलेली यशस्वी वा अयशस्वी कारवाई ही सत्तधारी पक्षाच्या निर्णयाची फलश्रुती असते. सर्जिकल स्ट्राईकची कारवाई ज्यांच्या नेतृत्वाखाली पार पडली त्या, नाॅर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल डी एस हुड्डांनी, टिव्ही चॅनेलवर सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईसंबंधीचा निर्णय पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्रालयाची लष्कर प्रमुखांच्या सोबत झालेल्या बैठकीत झाला हे अलीकडे स्पष्ट केले आहे. सेनादलाचं शौर्य हेच अंत्यंत महत्वाचं असते. परंतु अशा निर्णयात अपयश आले तर त्याबाबत पुर्णपणे पंतप्रधान आणि सरकारलाच आरोपीच्या पिंजर्यात उभे केले जाते.१९६२ च्या चीनने केलेल्या आक्रमणाने झालेल्या पराभवाचं खापर तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरूच्या माथ्यावरच पडले. नेहरूंनी संरक्षण मंत्री कृष्ण मेनन ह्यांचा राजीनामा घेऊन स्वतःची सुटका केली. देशाच्या संरक्षण खर्चात योग्य ती आर्थिक तरदूत तसेच सरकारची राजकीय इच्छाशक्ती आणि सेनादलांना कारवाईबाबत पुर्ण स्वातंत्र्य दिले जाते तेव्हाच विजय प्राप्त होत असतो. त्यामुळे पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आणि राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख अजित डोवल ह्यांचे ही जवानासोबत अंभिनंदन करणे क्रमप्राप्त ठरते. किंबूहना हा साधा शिष्टाचार किंवा comman sense चा भाग आहे. विरोधी पक्षांना काॅमन सेन्स वापरायचंच नसेल तर त्यांनाही जनतेच्या  टिकेला सामोरे जावे लागेल.

सत्ताधारी पक्ष पुर्वीही आपल्या सोयीचे राजकारण करीत आलेले आहेत. स्वातंत्र्य पुर्व काळात ब्रिटीशांनीही भारतातील त्यांची सत्ता स्थिर राहण्यासाठी सोयीचे राजकारण केले होतेच. पहील्या जागतिक महायुध्दात होरपळून गेल्यानंतर भारतीय नेत्यांमधील जहाल आणि क्रान्तीकारकांचं आव्हान पेलवणार नाही असे पाहून काँग्रेसमधील मवाळ पंथीय गांधी-नेहरूनां जवळ केले. नंतर सत्ता टिकावी म्हणून भारतियांना स्थानिक स्तरावर शोभेचे प्रतिनिधित्व देण्याचे राजकारण केले होते. त्यालाच 'फोडा आणि झोडा' नीती असे नाव पडले. तिच नीती काँग्रेसने स्वांतत्र्यानंतर वापरली. आयटी क्षेत्रातील प्रगती ही अलीकडच्या काळातील. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील घटना पब्लीक डोमेनमध्ये चटकन येतात. पुर्वी वर्तमानपत्रे , रेडीओ ह्यांच्या वार्ताहारांच्या एकूण कक्षा मर्यादीत होत्या. म्हणून सत्ताधारी पक्षाचं सोयीचे राजकारण करण्याची पध्दत ठळकपणे दिसत नव्हती हाच काय तो फरक. 

'सर्जिकल स्ट्राईक झाला नाही ' अशी बोंबाबोंब विरोधी पक्षांनी केली आणि वर पुरावे मागितले. सर्जीकल स्ट्राईक सारख्या अत्यंत गोपनीय बाबीचे लागलीच पुरावे देणे सरकारला राष्ट्रहीताच्या गरजेपोटी शक्य नव्हते. ही अडचण माहीत असल्यामूळेच सरकारला निष्प्रभ करण्यासाठी राजकारणातील नीच पातळी विरोधी पक्षांनी गाठली. सरकारने योग्य वेळ येताच सर्जिकल स्ट्राईकचा विडीओ प्रसारीत केला. भाजपासाठी खड्डा खणला, पण विरोधी पक्ष स्वतःच त्या खड्डयात पडले. विरोधी पक्षाची संख्या फार मोठी. त्यामुळे त्या खड्डयात त्यांना गुदमरायला होत आहे. आता नेतेमंडळीच गुदमरायला लागली आहेत तर त्यांचे कार्यकर्तेही आणि हितसंबंधीय पत्रकार, विचारवंत सैरभैर होणारच ना! शहरातील गल्लीबोळातील तसेच गावपातळीवरील कार्यकर्ते गंभीरपणाचा आव आणून देशात अदृश्य अशी आणिबाणी आहे असे सांगत सुटले आहेत. आणिबाणीचे जनक आणि समर्थक हीच मंडळी होती. उगाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कैवार घेत आहेत. मला वाटतं काँग्रेस सकट सर्व विरोधी पक्षाच्या प्रस्थापित मंडळींचे (त्यात सत्ताधारी भाजपाची मंडळी असू शकते) नोटाबंदीमुळे, जीएसटीमुळे जबरदस्त नुकसान झाले असावे, काळे धंदे बंद झाले असावेत. अन्यथा मोदीबाबतचा असा पराकोटीचा द्वेष दिसला नसता. ही मंडळी आयकर खात्याच्या रडारवर असावीत, त्यातूनच सार्या देशात आणिबाणी असल्याचा ह्यांना भास होत असावा. आज स्थिती अशी आहे कि अनेक बॅन्का, सहकारी बॅका, पतपेढ्या ह्यात मोठाले आर्थिक घोटाळे झालेले आहेत. अजुनही काही उघडकीस आलेले नाहीत. उद्योगधंदे, व व्यवसायात मिळणार्या यशातून प्रतिष्ठेच्या नशेत, आर्थिक व्यवहारात बेशिस्तपणा आलेला दिसतो. देशात खरेच आणिबाणी अंमलात आणण्याची गरज आहे ती आर्थिक क्षेत्रात. त्यासाठी मिडीया वा नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याची गरज नसते. प्रत्येक आर्थिक व्यवहारावर कडक तपासणी करून दोषींवर जबर शिक्षा द्यायला हवी. त्यासाठीच आणिबाणीची घोषणा होणे आवश्यक आहे.  

भाजपा हा एक राजकीय पक्ष आहे. त्यामुळे संधी मिळेल तिथे राजकीय फायदा उठवित राहणार त्यात गैर नाही. विरोधी पक्ष भाजपावर प्रत्येक गोष्टीचं राजकारण करीत आहे असा जो आरोप करीत आहेत ते ही स्वाभाविकच आहे. माझं म्हणणं इतकच आहे की विरोधासाठी विरोध करू नका. नोटाबंदी असो, सर्जिकल स्ट्राईक असो, वा जीएसटी ह्या निर्णयात देशहीत बिलकूल नाही असा आरोप का करावा? आजकाल सामान्य माणसालाही राजकीय चाली संबंधी पुरेसं ज्ञान अवगत झाले आहे. त्यामुळेच तर सोशल मिडीयावर राजकारणातल्या घडामोडीवर सर्वाधिक पोस्ट व्हायरल होताना दिसत आहेत. काश्मीरमधील सत्ता सोडून राज्यपाल राजवट आणणे ही २०१९ च्या निवडणूकीच्या तयारी साठी भाजपाने केलेली First political move आहे. There is no doubt about it. काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा त्या पक्षाने ही आपल्या सोयीचे धोरण काश्मीर समस्या सकट प्रत्येक क्षेत्रात राबविले होतेच ना! बघु द्या लोकांना भाजपाच्या धोरणाचा परीणाम काय होतोय? आज काश्मीरमध्ये आपले जवान व पोलीस दल परस्पर सहाकार्याने दशहतवादी व अलगावाद्यांना सरळ करीत आहेत ना. आणि तेही सामान्य जनतेला विश्वासात घेऊनच ना! आपले लष्कर उगीच निष्पाप काश्मिरी लोकांवर अत्याचार करतील अशी शंका तरी आपल्या मनात का यावी? 'विरोधक पाकिस्तानच्या भाषेत बोलू लागले आहेत, त्यांच्या नियतीत खोट आहे असा धडधडीत आरोप करण्याचे धाडस भाजपा करू शकते' ह्यातूनच विरोधी पक्षांच्या स्विकार्यहतेचं दिवाळे निघालेले दिसते. काश्मीरमधील स्थानिक पक्षांना फक्त अलगावादी आणि दशहतवाद्यांना गोंजारीत पैशाच्या जोरावर नेते म्हणून मिरवावयाचे आहे. हे आता थांबायला हवेच. पंतप्रधान पंडीत नेहरूनीं आणि इंदिरा गांधीनीही शेख अब्दूलानां नजरबंदीत ठेवले होतेच ना! विरोधी पक्षांनी सरकारला सहाय्य करायला हवे. भारतातल्या इतर मुस्लीमांची मते मिळावित म्हणून का आटापिटा करीत आहात? किती वर्षे करीत राहणार? आपल्या देशातील बहुसंख्यांकांना विश्वासात न घेता राजकारण आणि सत्ताकरणाचे दिवस संपले आहेत. हे विरोधी पक्षांनी लक्षात घ्यावयास हवे.

सर्जिकल स्ट्राईकचा विडीओ प्रसारण ही दुसरी खेळी आहे. जर विरोधी पक्षांनी एक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून सर्जिकल स्ट्राईक संबंधी सकारात्मक प्रतिसाद दिला असता, तर विरोधी पक्षांची आणि त्यासोबत जगात देशातील राजकीय व्यवस्थेची शान वाढती ना! मोदी सरकार घेत असलेल्या निर्णयात देशहीतही स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे लोक मोदी सरकारचे कौतूक करीत आहेत. सध्याचा भाजप राजकारणात तरबेज दिसतोय. पुढल्या वर्षी होणार्या लोकसभेच्या निवडणूका जिंकण्याचा भाजपाचा इरादा विरोधी पक्षापेक्षा अधिक ठळकपणे दिसत आहे. भाजपा आणखिन काही निर्णय घेणार, ज्यामुळे विरोधी पक्षांची त्रेधा उडू शकते. ह्या संबंथीची एनसीपीचे सर्वेसर्वा श्री शरद पवारांना इतर विरोधी नेत्यांपेक्षा लौकर चाहूल लागली असावी. कारण चोराच्या मनात चांदणे. त्यामुळे त्यांनी काल-परवा टाईम्स नाॅऊ चॅनेलवर मुलाखतीत "महागठबंधन नावाची अशी व्यवस्था आकारास येईल अशी शक्यता फार अंधूक आहे" असे स्पष्ट म्हणत भाजापा विषयीचा विरोध मंद केला. मोदी आणि शहांच्या संभाव्य आक्रमणांचा अंदाज पवारांना आला असावा.   विरोधी पक्षांमधील परस्परांत असलेले स्पर्धेचं स्वरूप, विविध मतदारसंघातील समसमान असलेले प्राबल्य, काही विरोधी पक्षांचे भाजपासोबत असलेले अदृश्य स्वरूपातील हितसंबंध, अनेक भ्रष्टाचाराच्या केसेस मधील आगतिकता, विचारधारा, कार्यपध्दत इत्यादी बाबींचा विचार करता विरोधी पक्षांचे ऐक्य मृगजळ ठरेल असे दिसते.  केवळ घासून घासून गुळगुळीत झालेले सर्वधर्मसमभावाचे नाणे किती मदतीला येणार? कुठल्या पक्षाच्या मदतीला येणार हा ही प्रश्न जनतेसमोर शिल्लक राहतोच. एकीकडे भाजपा आत्मविश्वासाने तयारी करतोय असे दिसते तर विरोधी पक्षाच्या गोटात काही हालचाल दिसत नाही. त्यातच ख्रिश्चन-आर्चबिशप आणि कट्टरपंथी इस्लामी मौलवींच्या मोदी सरकार विरोधी हालचालीमुळे २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीत कधी झाले नव्हते इतके धार्मीक धृवीकरण होण्याची शक्यता दिसू लागली आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणूकातील मुद्दे निश्चीत करण्याचे काम आपोआप भाजपाकडे येत राहणार आणि विरोधी पक्षांना फक्त उत्तरे देत बसावे लागणार. आपले राजकारण रेटण्यासाठी विरोधी पक्षांनी बाह्यशक्तीचा उपयोग करण्याचा विडाच उचलला असेल तर 'बुडत्याचा पाय खोलात'ह्याहून अधिक काय म्हणावे?

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...