शुक्रवार, ४ मे, २०१८

कर्नाटकात घनघोर लढाई ?



कर्नाटकात विधान सभेच्या निवडणूकीतला प्रचार आता शिगेला पोहचत आहे. ह्या लेखाचं शिर्षक घनघोर लढाई पण प्रश्नार्थी द्यावेसे वाटले, ह्याबद्दल आपणांस आश्चर्य वाटू नये. कारण इथे काँग्रेस विरूध्द भाजपा असा सामना नाही. इथे तिरंगी लढत आहे. विविध सर्वे त्रिशंखू विधानसभेची शक्यता वर्तवित आहेत. ही निवडणूक काँग्रेससाठी जीवन-मरणाचा प्रश्न झालेला आहे. कारण काँग्रेसला सत्ता राखावयाची आहे. शिवाय राहूल गांधीकडे काँग्रेसचे नेतृत्व आल्यानंतरची ही पहीली निवडणूक आहे. असे असले तरी काँग्रेसला सत्ता राखण्यात अपयश आले तर काँग्रेस राहूल गांधींना अपयशाचे धनी मानणार नाही. अपयश मुख्यमंत्री सिद्धरामय्याच्या माथीं मारून काँग्रेस राहूल गांधीचा बचाव करील. ह्या उलट भाजपाला गमाविण्यासारखे काही नाही. त्यामुळे भाजपा काँग्रेससारखा गोंधळलेल्या स्थितीत दिसत नाही. पुढील वर्षी होणार्या लोकसभेच्या निवडणूकाची ही तालीम आहे हे भाजपाचे नेते जाणून आहेत. म्हणून बुथ स्तरावरील मतदानाचा नीटपणे अभ्यास करून भाजपाने तयारी केलेली दिसते. लोकसभेच्या २८ जागा असलेले हे राज्य. त्यामुळे ह्या राज्याची ही निवडणूक काँग्रेस तसेच भाजपा ह्या दोन राष्ट्रीय स्तरावरील पक्षाच्या दृष्टीने महत्वाची आहे, माजी पंतप्रधान देवेगौडाचा जनता दल( सेक्युलर) हा पक्ष दुर्लक्ष करण्याइतका कमजोर नाही. कारण रामकृष्ण हेगडे ह्यांच्या कारकिर्दपासून समाजवादी विचार मानणारा मतदार कर्नाटकात आजही अस्तित्वात आहे. त्यातही ह्या पक्षाचे नेते देवेगौडांनी भारताचे पंतप्रधानपद भूषविलेले आहे. त्यामूळे पुढील वर्षी होणार्या लोकसभेतील निवडणूकीसाठी लोकसभेच्या २८ जागामधून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याच्या तयारीसाठीची एक संधी म्हणून ही निवडणूक आहे असे देवेगौडा मानत आहेत. ह्याचा अर्थ असा आहे की विरोधी पक्षांमध्ये ममता बॅनर्जी, शरद पवार, चंद्राबाबू, वायएसआर, के राव, इत्यादींच्या मांदियाळीत पंतप्रधानपदाचे एक स्पर्धक म्हणून देवेगौडा ही  तयार आहेत हे स्पष्ट आहे. ओवीसींचा पक्ष स्वतंत्रपणे लढत आहे. तथाकथीत सर्वधर्मसमभावाच्या पक्षांना मानणार्या मतदारांच्या मतांची विभागणी होणार असे दिसते.

एकंदरीत काँग्रेसच्या प्रचाराचं स्वरूप पाहता, एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, ती म्हणजे काँग्रेस पक्षाला कर्नाटकातील सत्ताधारी म्हणून विकासाच्या कामाची जंत्री देता येत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या प्रचारात मोदी विरोध ठळकपणे दिसत आहे. जाती-जमाती मध्ये भेद करूनही काँग्रेसला गुजरातमध्ये  incumbant भाजपाची २० वर्षाची सत्ता हस्तगत करता आली नाही. राज्याचा स्वतंत्र झेंडा तयार करून सिद्धरामयैना  प्रादेशिक अस्मितेचं राजकरण करावे लागत आहे. लिंगायत समाजाला धर्माचा दर्जा देण्यासंबंधीचा ठराव पास करून हिंदू मताचं विभाजन करण्याचा घाट काँग्रेसला घालावा लागला. मुस्लीम समाजाला गोंजर्ण्याचे नाटक वठवावं लागत आहे. ऑट्राॅसिटी ॲक्ट संबंधीच्या कोर्टाच्या निर्णयावरून मोदींना घेरण्याची काही गरज नसताना काँग्रेसने दलीत बांधवांना चेतावून धुमाकूळ घातला. न्यायमुर्ती लोय्यांच्या मृत्युसंबंधीची याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळून लावली. आता तर सरन्यायधिशांच्या विरोधात महाअभियोग सुरू करण्याची खटपट काँग्रेसने सुरू केली आहे. काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षाकडे भाजपाच्या विरोधात बोलण्यासारखे मुद्दे नाहीत. ह्यांची राजकीय जाण सर्वधर्मसमभाव आणि असहिष्णुता ह्या दोन विषयापुरती सिमीत झालेली दिसते. अलीकडे विद्वान पत्रकार कुमार केतकरने एक मुद्दा विरोधी पक्षासाठी दिला आहे. म्हणे २०१९ च्या निवडणूकी नंतर मोदी पंतप्रधान झाले तर लोकशाही संपुष्टात येणार. ज्यांनी इंदिरा गांधीच्या काळातील आणिबाणीला पाठींबा दिला होता, अशा पत्रकार, संपादकांच्या मुखात लोकशाहीचे नाव शोभत नाही. तो आणखिन एक कन्हैया कुमार, वयवर्षे ३५. अजूनही जेएनयु मध्ये शिकत आहे आणि आजादीचे नारे देत आहे. ह्या दोन्ही कुमारांना चीनमधील स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या व्यवस्थेचा अभ्यास करावयास पाठवयाला हवं. निदान ह्या दोहोमार्फत ह्या विषयांवर एक छान प्रबंध तरी जगाच्या हाती लागेल. 

पंतप्रधान मोदींच्या विरोधात आग ओतूनही काँग्रेसला गुजरातमध्ये नौतिक विजयातच समाधान मानावे लागले. कर्नाटकाच्या प्रचारातही मोदींना लक्ष्य करीत काँग्रेस फार मोठी चूक करीत आहे. कर्नाटक राज्याचा कारभार तुमच्या हातात असून तुम्ही मोदींच्यावर टिका करीत आहात, ही बाब तार्कीक दृष्ट्या मतदारांना कितपत पटेल? त्यामुळे मोदींच्या विरूध्द केलेला प्रचार कर्नाटकात काँग्रेसच्या अंगलट येण्याची शक्यता अधिक आहे. कारण हा पूर्णतः नकारात्मक प्रचार आहे.तसेच निवडणूकीच्या सामन्याचं स्वरूप मोदी विरूध्द राहूल असे होईल. आणि ह्यामध्ये राहूल गांधीची सपशेल हार होऊ शकते. चाणाक्ष मोदीनी कर्नाटकतील प्रचाराची सुरूवात  राहूल गांधीवरच टिका करून केली. गुजरातमध्ये ख्रिश्चन चर्चच्या बीशपचा 'राष्ट्रवादी शक्तींना पराभूत करा' असा आदेश सोशल मिडीयावर व्हायरल होताच काँग्रेसचा पराभव निश्चीत झाला. तसेच लिंगायत समाजा संबंधीचा निर्णय काँग्रेसला महाग पडण्याची चिन्हे दिसत आहेत. कर्नाटकाचे मुख्यमंत्री हे मुळचे जनता दल( सेक्युलर) पक्षाचे. म्हणजे समाजवादी. समाजवादी मंडळीचं एक खास वैशिष्ट्यं म्हणजे स्वपक्षातील फितूरांना हे कधी जवळ करीत नाहीत. त्यामुळे जनता दल( सेक्युलर) निवडणूकीनंतर काँग्रेसला सहकार्य करील असे वाटत नाही. उलटपक्षी आपल्या मुलाला मुख्यमंत्रीपद मिळवून देवेगौडा केंद्रात मोदीं समवेत बसू शकतील. हा अंदाज सत्यतेकडे अधिक जात आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी साॅफ्ट हिंदुत्वाचं कार्डही खेळत आहेत आणि दुसर्या बाजूला साम्यवादी, माओवाद्यांची साथही घेत आहेत. भरीस भर म्हणून लालू प्रसाद यादवांना भेटायला जात आहेत. लालू प्रसादांना भेटावयास जाण्याची गरज निदान ह्या घटकेला राहूल गांधींना नव्हती. मागेही मी एका लेखात म्हटलं होते की काँग्रेसने लालूप्रसाद यादव आणि साम्यवाद्यांपासून दूर रहावयास हवे. आजही प्रत्येक भारतीय नागरिकास चीनची दादागिरी सहन होत नाही. तसेच लालू प्रसाद यादव हे भ्रष्टाचाराचे मोठे किंग आहेत हे बिहारचा काही भाग वगळता भारतीय जनमनास पटले आहे. सोनिया गांधीकडे काँग्रेसचे नेतृत्व आल्यापासून हिंदूचं खच्चीकरण सातत्याने होत आले, अशी धारणा जनमानसात झालेली आहे. मी स्वतः राजकारणात (१९७५ ते १९८३ ) प्रत्यक्ष काम केलेलं आहे. ग्रामीण भागात अनेक कुटंबे, गावे, तालूके वर्षोनवर्षे काॅग्रेसच्या मतपेट्या होत्या, तिथे आता भाजपाचा झेंडा प्रत्येक कुटंबात दिसू लागला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल आपुलकी वाटू लागली. हे सार घडतयं ते केवळ मोदींच्या करिष्म्यामुळे नव्हे. राष्ट्रीय स्वयंसंवक संघाचं विधायक कार्य  भाजपाला उपयोगी पडतेच. पण सोनीया गांधीच्या धोरणामुळे काँग्रेसची हिंदूविरोधी जी प्रतिमा तयार झाली आहे त्याचाही  भाजपाला फायदा होत  आहे. गांधी हत्या, भगवा-आतंकवाद, बाटला हाऊस, सौराबुद्दीन, इशरत जहाॅचं  एन्कांउटर्स  ह्या सर्व मुद्यांचा न्यायालयात बुरखा फाटला आहे. कर्नाटकात बारा हिंदू समाज बांधवांच्या झालेल्या हत्या आणि त्यासंदर्भात आरोपींचा शोध करण्यात सिद्धरामैयांनी जी  ढिलाई दाखविली आहे ती काॅग्रेसला महाग पडण्याची शक्यता आहे. आज  जरासं कुठे, हिंदू समाज वा सणावर टिका झाली की सोशल मिडीयावर अनेक युवक आक्रमक होताना दिसत आहेत. त्यापैकी कित्येक जण भाजपा वा संघाशी प्रत्यक्ष संपर्कात नसलेले आहेत. ही ना लाट, ना क्रान्ती. ही हिंदू समाजात झालेली उत्क्रान्ती होय. काँग्रेस धुरीणांना हे कळतयं; पण वळत नाही अशी स्थिती झाली आहे. राहूल गांधी कितीही मंदिरात जाओ, पण फारसा उपयोग सध्या तरी होणार नाही. ह्याचं कारण हा फार्स आहे, असे लोकांना वाटत आहे. काँग्रेस धुरीणी विशेषतः सोनिया गांधीं पुत्रप्रेमाने अंध झालेल्या आहेत. त्यात कुमार केतकर, कपिल सिबल सारखे तज्ञ अवती-भोवती. काँग्रेस श्रेष्ठी कमालीच्या गोंधळलेल्या स्थितीत असावेत किंवा नॅशनल हेराॅल्डचं भूत त्यांना स्वस्थ बसू देत नसावे. घाईगर्दीने निर्णय घेत एका-मागोमाग हातून चूका घडत आहेत. आपल्या देशाच्या सरन्यायधिशांच्या विरोधी महाभियोग ही एक मोठी घोडचूक आहे.अनेक जेष्ठ, अनुभवी काॅग्रेस नेत्यांना हा निर्णय  पसंत नाही. सर्वसाधारण मतदारांना काँग्रेसची कृष्णकृत्ये कळत नाहीत, अशा भ्रमातच श्रेष्ठी वावरत असतील तर 'विनाशकाले विपरीत बुध्दी' ह्या पलीकडे आणखिन काय म्हणावं? काँग्रेस साम्यवादाची बटीक होत आहे. हाच मोठा अडसर काँग्रेसच्या पुनर्उभारणीत झाला आहे. आजही विरोधी पक्षाकडे ना राष्ट्रीय पातळीवर मोदींच्या तोडीचा नेता, ना काही ठोस कारणें ज्यांच्यावरून ते मतदारांना मोदींपासून दूर नेऊ शकतील. अशा स्थितीत कर्नाटकात होऊ घातलेली ही लढाई घनघोर दिसत असली तरी प्रत्यक्षात मोदींच्या प्रचारसभांचा धडाका सुरू होताच  काँग्रेसच्या हातातून कर्नाटकाची सत्ता निसटत असल्याचे चिन्हे दिसू लागले आहेत.

1 टिप्पणी:

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...