बडोदा येथील साहित्यसंमेलनात आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री लक्ष्मीकांत देशमुख ह्यांनी 'राजा तू चुकतोय' असे उद्गार काढून मुख्यमंत्र्यांना सुनाविले. दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राजने पंतप्रधान मोदी हे माझ्यापेक्षा चांगले अभिनेते आहेत अशा शब्दात टिका केली. पाठोपाठ मुबंईत मटा मैफलच्या व्यासपीठावरून साहित्यसंमेलनाच्या आजी-माजी अध्यक्षांनी 'समाज ऐतिहासिक साहित्यात रमतोय' असे उद्गार काढून समाजालाही सुनाविले. एकूण सुनाविण्याच्या भाषेने जोर धरलेला दिसतोय. म्हणून हा लेख प्रपंच. केंद्रात तसेच राज्यात हिंदूत्व विचारसरणीचे पक्ष सत्तेवर आहेत, म्हणून संपूर्ण देशाने हिंदूत्व स्विकारले असे होत नाही. तसेच साहित्य-संमेलनांच्या आजी-माजी अध्यक्षांनी केलेली वक्तव्ये सार्या साहित्यिकांची आहेत असे समजण्याचीही गरज नाही हे लक्षात घेऊनच चर्चा करू या.
भाजपाच्या मुंबईतील खासदार पुनम महाजनांनी पुण्यात 'साहित्यिकांनी दर्जेदार साहित्य आणि कलेवर लक्ष द्यावे, राजा काय करतोय, ह्यावर लक्ष न देता प्रथम मतदानाचा हक्क बजावा' असे म्हणत पलटवार केला. साहित्यसंमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत देशमूख, माजी अध्यक्ष श्री नागनाथ कोतापल्ले आणि अभिनेता प्रकाश राज ह्यांना पूनम महाजनांनी केलेला पलटवार झोंबला असला तरी बहूतांश वाचक आणि मतदारांना आवडलेला असू शकतो. Every action has Reaction हा वैज्ञानिक वा नैसर्गिक नियमच आहे.
सामान्य वाचक-रसिक साहित्यिकांकडून प्रबोधनाची तसेच मंनोरंजनाची अपेक्षा करतो ती त्यांच्या साहित्यिक कृतीतून. साहित्यिकांनी राजकिय व्यवस्थेवर केलेल्या टिकेतून प्रबोधनाऐवजी मनोरंजन होत आलेलं आहे हा अनुभव आहे. राजकिय व्यवस्थेवर साहित्यिकांनी भाष्य करू नये असे ना साहित्य रसिकाला वाटतं ना सामान्य मतदाराला. पंरतु साहित्यिकांच्या टिकेवर राजकिय नेत्याने पलटवार केला कि जो साहित्यप्रेमी आहे आणि मतदारही आहे, त्याने कुठलीतरी राजकिय विचारसरणी अंगिकारली असल्याकारणाने त्याची अवस्था फुटबाॅल सारखी होते. मग मात्र समाजाचे मनोरंजन होते. असो.
आज केद्रात आणि राज्यात भाजपा-सेनेचं सरकार आहे. म्हणजेच हिंदूत्व विचारसरणीचं. त्यामूळे पूनम महाजन ह्यांनी पलटवार करणं स्वाभाविक आहे. मागे एकदा कवीवर्य वसंत बापट आणि शिवसेनाप्रमूख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्यांतही वाक्-युध्द झालेलं होतं. त्यावेळी वसंत बापटांना बाळासाहेबांनी ठाकरे शैलीत फटकारले होते. शब्द हे दुधारी तलवारीसारखे असतात असे वर्णन साहित्यिकांनीच केलेलं आहे. सामान्य वाचकाने वा सामान्य मतदाराने केलेलं नाही. परंतु राजकिय नेत्यांना शब्दाचा शस्त्र म्हणून वापर करण्याची वेळ का यावी? ह्याच उत्तरही सरळ आहे. जेव्हा भाजपा-सेनेचं सरकार असते, तेव्हा सरकारवर टिका करणारे साहित्यिक काँग्रसी, समाजवादी, वा साम्यवादी विचारसरणीचा अंगिकार केलेलेच असतात, हे लपून राहीलेलं नाही. सर्वसामान्यांना राजकीय जाण चांगली आहे, म्हणून लोकशाहीचा प्रयोग आपल्या येथे यशस्वी झालेला आहे. १९७५ च्या आणिबाणीच्या काळानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीच्या निकालानंतर ही बाब अधोरेखीत झाली आहे. 'राजा तू चूकतोय' असे म्हणणार्या संमेलनाध्यक्षांनी आणिबाणीच्या काळात आपण तत्कालीन पंतप्रधानांना फटकारले होते असे जाहीर केले असते, तर बरे झाले असते. त्यांनी खरोखरच आणिबाणीला विरोध दाखविलेला असेल तर आपल्या भाषणात तितक्याच पोटतिडकीने आणिबाणीच्या काळ्याकुट्ट काळाबद्दल तिरस्कार व्यक्त केला असता. पण तसे काही घडले नाही. त्यामूळे समेलनांध्यक्ष देशमूखांच्या 'राजा तू चूकतोय' ह्या टिकेला काही वजन प्राप्त झालेलं दिसलं नाही. मी साहित्यिक आहे आणि आता संमेलनाचा अध्यक्ष आहे, म्हणून 'राजा तू चुकतोय' असे म्हणणे वाचक खपवून घेतील असे होत नाही. ह्याचं कारण त्यांनी केलेली टीकाच मूळी हिंदूत्व विचारसरणीला विरोध करावा ह्या हेतूने केलेली दिसते.
आजही साहित्यिकांपेक्षा राजकिय नेत्याला अधिक वलय आहे. का? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा साहित्यिकांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत का? निदान जे साहित्यिक संधी प्राप्त होताच राजकिय नेत्यावर टिका करतात, त्या साहित्यिकांनी तरी करायला हवे होते की नाही? साहित्य महामंडळ, साहित्य संमेलन, त्याच्या अध्यक्षपदासाठी होणार्या निवडणूका, विभिन्न पातळीवरील साहित्य परिषदेच्या शाखा, त्या शाखांचा कारभार ह्यावर दरवर्षी वर्तमानपत्रातील लेखातून अनेक मान्यवर सूचना करीत असतात. त्यावर साहित्यिक लक्ष देतात का? बहूतांश प्रतिथयश साहित्यिक साहित्य संमेलनात फिरकतही नाहीत. ते सर्व वादविवादापासून दूर राहतात. असे का व्हावे? साहित्यिक जगतात ही राजकारण असतेच ना! तिथेही मतदान असतेच की. मतदान आले की, मॅनेज करण्याची पध्दतही जोडीला येते. आपलं घर अस्वच्छ आणि दुसर्याच्या घरातून दुर्गंधी येते असा आकाडतांडव करणे बरे नव्हे. प्रश्न साहित्यिकांनी सरकारवर टिका करण्याचा नसून राजकीय चष्म्याचा वापर करून टिका करण्याची सवय मोडण्याचा आहे. सवयीतून स्वभाव बनतो. स्वभावातून खोड बनते आणि खोड झाली कि ती जात नाही. लोकसभेच्या निवडणूकीचं वारं साहित्यिकांच्या अंगात संचारले असेल तर अधिक काय बोलावे?
'ऐतिहासिक साहित्यात समाज रमतोय' हे उद्गार आहेत ,जेष्ठ साहित्यिक आणि ८६ व्या संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले ह्यांचे. त्या वक्तव्यात मटाने बदल करून 'उदात्तीकरण केलेल्या इतिहासात समाज रमतोय' अशी हेडलाईन देऊन बातमी दिली. महाराष्ट टाईम्स ह्या वृत्तपत्रानेच आयोजित केलेल्या मटा मैफलच्या व्यासपिठावरूनच श्री नागनाथ कोतापल्लेंनी हे वक्तव्य केले असल्यामूळे मटाच्या संपादकांचा तो हक्क समजून त्यावर फारशी प्रतिक्रीया द्यावीसी वाटत नाही. त्यातही वृत्तपत्रं हा ही एक व्यवसाय आहे. त्यामूळे समाज इतिहासात रमतोय असे लिहीण्यापेक्षा 'उदात्तीकरण केलेल्या इतिहासात' अशी वाक्यरचना केल्यामूळे खप वाढण्याची शक्यता मटाच्या संपादकांना वाटली असावी,असेच समजू या. श्री कोतापल्ले ह्यानी इतिहासात समाज रमतोय हे वक्तव्य केले, त्यावेळी सोबत 'राजा तू चुकतोय' असे वक्तव्य केलेले नवनिर्वाचित अध्यक्ष श्री देशमूखही होते. आज ऐतिहासिक कांदबर्यावर टिका करावयाची आणि काल परवा सरकारवर टिका करताना 'राजा' शब्दाचा वापर केला होता हे काय दर्शवित आहे? स्वतः देशमूख इतिहासात रममाण झाले होते असे समजावयाचे का? आपण लोकशाही राज्य प्रणाली स्विकारली आहे, ह्याचा देशमूख साहेबांना कोण्या एके काळी संस्थान असलेल्या बडोद्यात विसर पडला होता का? हे संभवत नाही. संमेलनाध्यक्षांनी राजा हा शब्द उपाहासाने वापरला होता. हे भारतीय राजकारणातील एक अभ्यासू , हुषार, चतूर आणि स्पष्ट वक्ता असलेले भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजनांच्या मुलीने पक्के हेरले आणि पुण्यातील साहित्यिक विषयक मैफलीतच शिताफीने महाजन स्टाईल वापरून देशमूखांवर पलटवार केला.
अलीकडे सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायधिशांच्या बंडाबाबत लाॅबीचा उल्लेख मिडीयामधून ऐकू आला. तशाच प्रकारच्या लाॅबीचा संसर्ग काही साहित्यिकांना जडला असावा असे दिसते. एकतर 'मटा मैफल' गाजविणार्या साहित्यिकांना इतिहासाची अॅलर्जी असावी किंवा इतिहासातील काही पात्रांच्या समाजमनात असलेल्या स्थानाविषयी अॅलर्जी असावी. श्री नागनाथ कोतापल्ले ह्यांनी आपल्या भाषणात पुढे रामायण, महाभारत ह्या दोन ग्रंथांच्या सोबत स्वामी ह्या कांदबरीच्या खपाबद्दलचा उल्लेख केला असल्यामूळे त्यांचा रोख ह्या ग्रंथातील व्यक्तीरेखांवर असावा असा अंदाज आहे.
प्रश्न आहे तो ऐतिहासिक कांदबर्यात समाज का रमतोय? समाजाला पुढे जावयाचे नाही, असेच मटा आणि कोतापल्लेना सुचवयाचे आहे का? भारतीय समाज आधूनिक वैज्ञानिक उपकरणांचा वापर करीत नाही का? आजचा तरूण पुस्तके वाचतच नाही का? काही मूलं ई-बूक सेवा वापरत आहेत. सामाजिक आशयघन असलेले नाटकं, सिनेमांना लोक चांगला प्रतिसाद देत आहेत ना. 'आपलं माणूस' ह्या चित्रपटाला इतका उत्स्फुर्त पांठीबा मिळतोय, तो कशामुळे? नाना पाटेकरांच्या अभिनयाचा ह्या चित्रपटाच्या यशात मोठा वाटा असला तरी चित्रपटात ब्रिटीश लेखक सर आर्थर काॅनन डाॅयल ह्यांच्या शेरलाॅक होम्सच्या कथांना साजेसे असे प्रसंग उभे केले, आणि ते ही चित्रपटाच्या सामाजिक आशयघनाची, वा समस्येची चौकट न मोडता केले आहेत. ह्याचं श्रेय दिग्दर्शक, पटकथाकार, संवाद लेखनाला जातेच की. ते ही साहित्यिकच ना. अलीकडे आपला समाज संगीत नाटकाकडे आकर्षित होत आहे. संगीत नाटकं हे ही आपल्या सांस्कृतिक इतिहासाचा भाग नाहीत का? त्यातील कथा,पात्रे पौराणिक- ऐतिहासिक आहेत. म्हणून ती लोकांनी पाहूच नये का? ज्या प्रथा, रूढीमूळे आपला समाज ग्रासला होता, त्यांच उच्चाटन करण्यासाठी आगरकर, फूले ,आंबेडकर शाहू महाराज, सावरकर, टिळक, महर्षी कर्वे, न्यायमूर्ती रानडे, साधू-संत, इत्यादींनी केलेल्या प्रबोधनात्मक प्रयत्नांवर आधारित कथा, कादंबर्या, नाटकं, टिव्ही सिरियल्सना समाज चांगला पाठींबा देत आहेच की. प्रत्येक वेळी नकारात्मक दृष्टीकोन ठेवण्यात काय हशील? एकदा बोरीवलीत शब्द प्रकाशनातर्फे पुस्तकांच प्रदर्शन भरविले असताना एका युवकाला नाटकांची पुस्तके हवी होती. तो युवक अनओळखीचा असूनही त्याने माझ्याकडे विचारपूस केली होती. ययाती कादबंरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ती तर पौरिणिक विषयावर आधारित आहे. स्वामी ही कादंबरी ऐतिहासिक आहे. त्यात माधरवराव पेशव्याच्या कर्तबगारीच दर्शन असलं तरी स्वतःच्या मातोश्रीं आणि राघोबा दादांना कर्मकांड, पूजा-हवन इत्यादींवर सरकारी खजीनाच्या वापरावर कडक निर्बंध घातले होते हे ही कादंबरीकरांनी मांडलेलं आहे. भाऊबंदकी हा विषयही त्यात मांडलेला आहे. अशा कादंबरीच्या खपाबद्दल बोटं मोडणे म्हणजे मराठी साहित्याच्या इतिहासावरही टिका करण्यासारखे आहे . ऐतिहासिक कादबंर्या लिहिणारे लेखक हे सुध्दा समाजाचे घटक आहेत, हे ही कोतापल्लेंना खटकते की काय? छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, समर्थ रामदास, जनाबाई, चोखोबा, बहीणाबाई, गोरा कुंभार, इत्यादी संत मंडळी ही समाजाची दैवते आहेत. कारण ती ह्या भूमीतली आहेत. म्हणून त्यांच्या जीवनावरील साहित्य समाज वाचत राहणारच. संस्कारः एकम् धनम् न क्षीण जायते| असे संस्कृत वचन आहे. आज संस्कृत भाषा व्यवहारातून बाद झालेली असतानाही सरकारच्या सर्व मंत्रालयाच्या विभागाचे असो वा सार्वजनिक उद्योगांची बोध वाक्ये ही संस्कृत भाषेत आहेत. रामायण, महाभारत हे ग्रंथ हे समाजानेच जीवनग्रंथ मानले आहेत, त्यासंबंधी माझ्यासारखा एक सामान्य वाचक काय बोलू शकतो? ज्यांना साहित्य वा लेखन ह्यासंबंधी खपाचा विचार मांडून बाजाराचं स्वरूप द्यावयासं वाटत असेल तर त्यांना कोण अडविणार?
ऐतिहासिक विषयक साहित्याचा खप वाढतोय, तसाच साहित्याच्या इतर प्रकारांच्या पुस्तकांचाही खप वाढावा, ह्याबाबत दूमत नाही. कारण विख्यात शास्त्रज्ञ आलबर्ट आईनस्टाईननी म्हटले आहे, Immgination is more important than knowlege. मनातील वेगवेगळ्या कल्पना त्यानी प्रयोगात उतरविल्या असाव्यात. त्यातूनच त्यांना सापेक्षवाद गवसला. हा सिध्दांत मानवी जीवनात व्यापलेला आहे. त्यामुळे कल्पनाधारीत कथा, वैज्ञानिक कथा, ललीत, भटकंती इत्यादी विषयावरील पुस्तकांचा खप वाढावा, ह्याबाबत दूमत नाही. परंतु समाज इतिहासात रमतोय अशी उथळ वा प्रसिध्दीसाठी टिका करणे प्रशस्त नाही. संमेलनाच्या आजीमाजी अध्यक्षांना जर खरी तळमळ असेल तर त्यांनी स्वतः खांद्यावर जबाबदारी स्विकारून साहित्यक्षेत्राचा चौफेर विकास घडणविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यांनी प्रयत्न केले तर समाज त्यांना साथही देईल आणि खांद्यावर घेऊनही नाचेल. हा, एक गोष्ट मात्र अशी आहे कि समाजासाठी तुम्ही ऐतिहासिक पुरूष व्हाल. कदाचीत तुमच्या पश्चात तुमच्या जीवनावर कांदबंरी लिहतील. आपला समाज हा असा आहे. तो दुर्गूण समजावा का? आपल्या देशात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात येता-जाता पाश्चात्य व साम्यवादी मोजपट्टी घेऊन आपल्या समाजाची वैचारिक उंची मोजण्याचा अट्टहास धरावयास नको.
आपल्या देशात थोर योध्देही होते, तसेच अंहिसावादी नेतेही होते. संत होते, शास्त्रज्ञही होते. गणिती होते, तत्वज्ञही होते. महाभारत, रामायण, संताचे अंभग, इत्यादी साहित्याचे प्रकार नव्हेत का? परकिय आक्रमणे मग ती सामरिक, असो वा वैचारिक, समाजाने आपल्या उपजत शक्तीने त्यावर मात केलेली आहे. इतर देशाच्या संस्कृतीतील, साहित्यातील जे काही चांगले, पचेल ते सारं काही आपला समाज स्विकारत आहे, प्रश्न कदाचीत गतीचा असू शकतो. म्हणून भावनावेगात कोणी साहित्यिक समाजाला वाचनाच्या आवडी-निवडीसंबंधी दोष देत असतील, तर तो त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा विषय आहे किंवा त्यातही राजकारण असावे हेच समजून आपला समाज दुर्लक्ष करेल असे वाटते.