मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०१८

साहित्यिकांचे राजकीयकरण झाले आहे का?



बडोदा येथील साहित्यसंमेलनात आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री लक्ष्मीकांत देशमुख ह्यांनी 'राजा तू चुकतोय' असे उद्गार काढून मुख्यमंत्र्यांना सुनाविले. दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राजने पंतप्रधान मोदी हे माझ्यापेक्षा चांगले अभिनेते आहेत अशा शब्दात टिका केली. पाठोपाठ मुबंईत मटा मैफलच्या व्यासपीठावरून साहित्यसंमेलनाच्या आजी-माजी अध्यक्षांनी 'समाज ऐतिहासिक साहित्यात रमतोय' असे उद्गार काढून समाजालाही सुनाविले. एकूण सुनाविण्याच्या भाषेने जोर धरलेला दिसतोय. म्हणून हा लेख प्रपंच. केंद्रात तसेच राज्यात हिंदूत्व विचारसरणीचे पक्ष सत्तेवर आहेत, म्हणून संपूर्ण देशाने हिंदूत्व स्विकारले असे होत नाही. तसेच साहित्य-संमेलनांच्या आजी-माजी अध्यक्षांनी केलेली वक्तव्ये सार्या साहित्यिकांची आहेत असे समजण्याचीही गरज नाही हे लक्षात घेऊनच चर्चा करू या.

भाजपाच्या मुंबईतील खासदार पुनम महाजनांनी पुण्यात 'साहित्यिकांनी दर्जेदार साहित्य आणि कलेवर लक्ष द्यावे, राजा काय करतोय, ह्यावर लक्ष न देता प्रथम मतदानाचा हक्क बजावा' असे म्हणत पलटवार केला. साहित्यसंमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत देशमूख, माजी अध्यक्ष श्री नागनाथ कोतापल्ले आणि अभिनेता प्रकाश राज ह्यांना पूनम महाजनांनी केलेला पलटवार झोंबला असला तरी बहूतांश वाचक आणि मतदारांना आवडलेला असू शकतो. Every action has Reaction हा वैज्ञानिक वा नैसर्गिक नियमच आहे.

सामान्य  वाचक-रसिक  साहित्यिकांकडून प्रबोधनाची तसेच  मंनोरंजनाची  अपेक्षा करतो  ती त्यांच्या साहित्यिक  कृतीतून.  साहित्यिकांनी राजकिय व्यवस्थेवर केलेल्या टिकेतून प्रबोधनाऐवजी मनोरंजन होत आलेलं आहे हा अनुभव आहे. राजकिय व्यवस्थेवर साहित्यिकांनी भाष्य करू नये असे ना साहित्य रसिकाला वाटतं ना सामान्य मतदाराला. पंरतु साहित्यिकांच्या टिकेवर राजकिय नेत्याने पलटवार केला कि जो साहित्यप्रेमी आहे आणि मतदारही आहे, त्याने कुठलीतरी राजकिय विचारसरणी अंगिकारली असल्याकारणाने त्याची अवस्था फुटबाॅल सारखी होते. मग मात्र  समाजाचे मनोरंजन होते. असो. 

आज केद्रात आणि राज्यात भाजपा-सेनेचं सरकार आहे. म्हणजेच हिंदूत्व विचारसरणीचं. त्यामूळे पूनम महाजन ह्यांनी पलटवार करणं स्वाभाविक आहे. मागे एकदा कवीवर्य वसंत बापट आणि शिवसेनाप्रमूख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्यांतही वाक्-युध्द झालेलं होतं. त्यावेळी वसंत बापटांना बाळासाहेबांनी ठाकरे शैलीत फटकारले होते. शब्द हे दुधारी तलवारीसारखे असतात असे वर्णन साहित्यिकांनीच केलेलं आहे. सामान्य वाचकाने वा सामान्य मतदाराने केलेलं नाही. परंतु राजकिय नेत्यांना शब्दाचा शस्त्र म्हणून वापर करण्याची वेळ का यावी? ह्याच उत्तरही सरळ आहे. जेव्हा भाजपा-सेनेचं सरकार असते, तेव्हा सरकारवर टिका करणारे साहित्यिक काँग्रसी, समाजवादी, वा साम्यवादी विचारसरणीचा अंगिकार केलेलेच असतात, हे लपून राहीलेलं नाही. सर्वसामान्यांना राजकीय जाण चांगली आहे, म्हणून लोकशाहीचा प्रयोग आपल्या येथे यशस्वी झालेला आहे. १९७५ च्या आणिबाणीच्या काळानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीच्या निकालानंतर ही बाब अधोरेखीत झाली आहे. 'राजा तू चूकतोय' असे म्हणणार्या संमेलनाध्यक्षांनी आणिबाणीच्या काळात आपण तत्कालीन पंतप्रधानांना फटकारले होते असे जाहीर केले असते, तर बरे झाले असते. त्यांनी खरोखरच आणिबाणीला विरोध दाखविलेला असेल तर आपल्या भाषणात तितक्याच पोटतिडकीने आणिबाणीच्या काळ्याकुट्ट काळाबद्दल तिरस्कार व्यक्त केला असता. पण तसे काही घडले नाही. त्यामूळे समेलनांध्यक्ष देशमूखांच्या 'राजा तू चूकतोय' ह्या टिकेला काही वजन प्राप्त झालेलं दिसलं नाही. मी साहित्यिक आहे आणि आता संमेलनाचा अध्यक्ष आहे, म्हणून 'राजा तू चुकतोय' असे म्हणणे वाचक खपवून घेतील असे होत नाही. ह्याचं कारण त्यांनी केलेली टीकाच मूळी हिंदूत्व विचारसरणीला विरोध करावा ह्या हेतूने केलेली दिसते. 

आजही साहित्यिकांपेक्षा राजकिय नेत्याला अधिक वलय आहे. का? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा साहित्यिकांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत का? निदान जे साहित्यिक संधी प्राप्त होताच राजकिय नेत्यावर टिका करतात, त्या साहित्यिकांनी तरी करायला हवे होते की नाही? साहित्य महामंडळ, साहित्य संमेलन, त्याच्या अध्यक्षपदासाठी होणार्या निवडणूका, विभिन्न पातळीवरील साहित्य परिषदेच्या शाखा, त्या शाखांचा कारभार ह्यावर दरवर्षी वर्तमानपत्रातील लेखातून अनेक मान्यवर सूचना करीत असतात. त्यावर साहित्यिक लक्ष देतात का? बहूतांश प्रतिथयश साहित्यिक साहित्य संमेलनात फिरकतही नाहीत. ते सर्व वादविवादापासून दूर राहतात. असे का व्हावे? साहित्यिक जगतात ही राजकारण असतेच ना! तिथेही मतदान असतेच की. मतदान आले की, मॅनेज करण्याची पध्दतही जोडीला येते. आपलं घर अस्वच्छ आणि दुसर्याच्या घरातून दुर्गंधी येते असा आकाडतांडव करणे बरे नव्हे. प्रश्न साहित्यिकांनी सरकारवर टिका करण्याचा नसून राजकीय चष्म्याचा वापर करून टिका करण्याची सवय मोडण्याचा आहे. सवयीतून स्वभाव बनतो. स्वभावातून खोड बनते आणि खोड झाली कि ती जात नाही. लोकसभेच्या निवडणूकीचं वारं साहित्यिकांच्या अंगात संचारले असेल तर अधिक काय बोलावे? 

'ऐतिहासिक साहित्यात समाज रमतोय' हे उद्गार आहेत ,जेष्ठ साहित्यिक आणि ८६ व्या संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले ह्यांचे. त्या वक्तव्यात मटाने बदल करून 'उदात्तीकरण केलेल्या इतिहासात समाज रमतोय' अशी हेडलाईन देऊन बातमी दिली. महाराष्ट टाईम्स ह्या वृत्तपत्रानेच आयोजित केलेल्या मटा मैफलच्या व्यासपिठावरूनच श्री नागनाथ कोतापल्लेंनी हे वक्तव्य केले असल्यामूळे मटाच्या संपादकांचा तो हक्क समजून त्यावर फारशी प्रतिक्रीया द्यावीसी वाटत नाही. त्यातही वृत्तपत्रं हा ही एक व्यवसाय आहे. त्यामूळे समाज इतिहासात रमतोय असे लिहीण्यापेक्षा 'उदात्तीकरण केलेल्या इतिहासात' अशी वाक्यरचना केल्यामूळे खप वाढण्याची शक्यता मटाच्या संपादकांना वाटली असावी,असेच समजू या. श्री कोतापल्ले ह्यानी इतिहासात समाज रमतोय हे वक्तव्य केले, त्यावेळी सोबत 'राजा तू चुकतोय' असे वक्तव्य केलेले नवनिर्वाचित अध्यक्ष श्री देशमूखही होते. आज ऐतिहासिक कांदबर्यावर टिका करावयाची आणि काल परवा सरकारवर टिका करताना 'राजा' शब्दाचा वापर केला होता हे काय दर्शवित आहे? स्वतः देशमूख इतिहासात रममाण झाले होते असे समजावयाचे का? आपण लोकशाही राज्य प्रणाली स्विकारली आहे, ह्याचा देशमूख साहेबांना कोण्या एके काळी संस्थान असलेल्या बडोद्यात विसर पडला होता का? हे संभवत नाही. संमेलनाध्यक्षांनी राजा हा शब्द उपाहासाने वापरला होता. हे भारतीय राजकारणातील एक अभ्यासू , हुषार, चतूर आणि स्पष्ट वक्ता असलेले भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजनांच्या मुलीने पक्के हेरले आणि पुण्यातील साहित्यिक विषयक मैफलीतच शिताफीने महाजन स्टाईल वापरून देशमूखांवर पलटवार केला.

अलीकडे सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायधिशांच्या बंडाबाबत लाॅबीचा उल्लेख मिडीयामधून ऐकू आला. तशाच प्रकारच्या लाॅबीचा संसर्ग काही साहित्यिकांना जडला असावा असे दिसते. एकतर 'मटा मैफल' गाजविणार्या साहित्यिकांना इतिहासाची अॅलर्जी असावी किंवा इतिहासातील काही पात्रांच्या समाजमनात असलेल्या स्थानाविषयी अॅलर्जी असावी. श्री नागनाथ कोतापल्ले ह्यांनी आपल्या भाषणात पुढे रामायण, महाभारत ह्या दोन ग्रंथांच्या सोबत स्वामी ह्या कांदबरीच्या खपाबद्दलचा उल्लेख केला असल्यामूळे त्यांचा रोख ह्या ग्रंथातील व्यक्तीरेखांवर असावा असा अंदाज आहे. 

प्रश्न आहे तो ऐतिहासिक कांदबर्यात समाज का रमतोय? समाजाला पुढे जावयाचे नाही, असेच मटा आणि कोतापल्लेना सुचवयाचे आहे का? भारतीय समाज आधूनिक वैज्ञानिक उपकरणांचा वापर करीत नाही का? आजचा तरूण पुस्तके वाचतच नाही का? काही मूलं ई-बूक सेवा वापरत आहेत. सामाजिक आशयघन असलेले नाटकं, सिनेमांना लोक चांगला प्रतिसाद देत आहेत ना. 'आपलं माणूस' ह्या चित्रपटाला इतका उत्स्फुर्त पांठीबा मिळतोय, तो कशामुळे? नाना पाटेकरांच्या अभिनयाचा ह्या चित्रपटाच्या यशात मोठा वाटा असला तरी चित्रपटात ब्रिटीश लेखक सर आर्थर काॅनन डाॅयल ह्यांच्या शेरलाॅक होम्सच्या कथांना साजेसे असे प्रसंग उभे केले, आणि ते ही चित्रपटाच्या सामाजिक आशयघनाची, वा समस्येची चौकट न मोडता केले आहेत. ह्याचं श्रेय दिग्दर्शक, पटकथाकार, संवाद लेखनाला जातेच की. ते ही साहित्यिकच ना. अलीकडे आपला समाज संगीत नाटकाकडे आकर्षित होत आहे. संगीत नाटकं हे ही आपल्या सांस्कृतिक इतिहासाचा भाग नाहीत का? त्यातील कथा,पात्रे पौराणिक- ऐतिहासिक आहेत. म्हणून ती लोकांनी पाहूच नये का? ज्या प्रथा, रूढीमूळे आपला समाज ग्रासला होता, त्यांच उच्चाटन करण्यासाठी आगरकर, फूले ,आंबेडकर शाहू महाराज, सावरकर, टिळक, महर्षी कर्वे, न्यायमूर्ती रानडे, साधू-संत, इत्यादींनी केलेल्या प्रबोधनात्मक प्रयत्नांवर आधारित कथा, कादंबर्या, नाटकं, टिव्ही सिरियल्सना समाज चांगला पाठींबा देत आहेच की. प्रत्येक वेळी नकारात्मक दृष्टीकोन ठेवण्यात काय हशील? एकदा बोरीवलीत शब्द प्रकाशनातर्फे पुस्तकांच प्रदर्शन भरविले असताना एका युवकाला नाटकांची पुस्तके हवी होती. तो युवक अनओळखीचा असूनही त्याने माझ्याकडे विचारपूस केली होती. ययाती कादबंरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ती तर पौरिणिक विषयावर आधारित आहे. स्वामी ही कादंबरी ऐतिहासिक आहे. त्यात माधरवराव पेशव्याच्या कर्तबगारीच दर्शन असलं तरी स्वतःच्या मातोश्रीं आणि राघोबा दादांना कर्मकांड, पूजा-हवन इत्यादींवर सरकारी खजीनाच्या वापरावर कडक निर्बंध घातले होते हे ही कादंबरीकरांनी मांडलेलं आहे. भाऊबंदकी हा विषयही त्यात मांडलेला आहे. अशा कादंबरीच्या खपाबद्दल बोटं मोडणे म्हणजे मराठी साहित्याच्या इतिहासावरही टिका करण्यासारखे आहे . ऐतिहासिक कादबंर्या लिहिणारे लेखक हे सुध्दा समाजाचे घटक आहेत, हे ही कोतापल्लेंना खटकते की काय? छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, समर्थ रामदास, जनाबाई, चोखोबा, बहीणाबाई, गोरा कुंभार, इत्यादी संत मंडळी ही समाजाची दैवते आहेत. कारण ती ह्या भूमीतली आहेत. म्हणून त्यांच्या जीवनावरील साहित्य समाज वाचत राहणारच. संस्कारः एकम् धनम् न क्षीण जायते| असे संस्कृत वचन आहे. आज संस्कृत भाषा व्यवहारातून बाद झालेली असतानाही सरकारच्या सर्व मंत्रालयाच्या विभागाचे असो वा सार्वजनिक उद्योगांची  बोध वाक्ये ही संस्कृत भाषेत आहेत. रामायण, महाभारत हे ग्रंथ हे समाजानेच जीवनग्रंथ मानले आहेत, त्यासंबंधी माझ्यासारखा एक सामान्य वाचक काय बोलू शकतो? ज्यांना साहित्य वा लेखन ह्यासंबंधी खपाचा विचार मांडून बाजाराचं स्वरूप द्यावयासं वाटत असेल तर त्यांना कोण अडविणार?

ऐतिहासिक विषयक साहित्याचा खप वाढतोय, तसाच  साहित्याच्या इतर प्रकारांच्या पुस्तकांचाही खप वाढावा, ह्याबाबत दूमत नाही. कारण विख्यात शास्त्रज्ञ आलबर्ट आईनस्टाईननी म्हटले आहे, Immgination is more important than knowlege. मनातील वेगवेगळ्या कल्पना त्यानी प्रयोगात उतरविल्या असाव्यात. त्यातूनच त्यांना सापेक्षवाद गवसला. हा सिध्दांत मानवी जीवनात व्यापलेला आहे.  त्यामुळे कल्पनाधारीत कथा, वैज्ञानिक कथा, ललीत, भटकंती इत्यादी विषयावरील पुस्तकांचा खप वाढावा, ह्याबाबत दूमत नाही. परंतु समाज इतिहासात रमतोय अशी उथळ वा प्रसिध्दीसाठी टिका करणे प्रशस्त नाही. संमेलनाच्या आजीमाजी अध्यक्षांना जर खरी तळमळ असेल तर त्यांनी स्वतः खांद्यावर जबाबदारी स्विकारून साहित्यक्षेत्राचा चौफेर विकास घडणविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यांनी प्रयत्न केले तर समाज त्यांना साथही देईल आणि खांद्यावर घेऊनही नाचेल. हा, एक गोष्ट मात्र अशी आहे कि समाजासाठी तुम्ही ऐतिहासिक पुरूष व्हाल. कदाचीत तुमच्या पश्चात तुमच्या जीवनावर कांदबंरी लिहतील. आपला समाज हा असा आहे. तो दुर्गूण समजावा का? आपल्या देशात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात येता-जाता  पाश्चात्य व साम्यवादी मोजपट्टी घेऊन आपल्या समाजाची वैचारिक उंची मोजण्याचा अट्टहास धरावयास नको.

आपल्या देशात थोर योध्देही होते, तसेच अंहिसावादी नेतेही होते. संत होते, शास्त्रज्ञही होते. गणिती होते, तत्वज्ञही होते. महाभारत, रामायण, संताचे अंभग, इत्यादी साहित्याचे प्रकार नव्हेत का? परकिय आक्रमणे मग ती सामरिक, असो वा वैचारिक, समाजाने आपल्या उपजत शक्तीने त्यावर मात केलेली आहे. इतर देशाच्या संस्कृतीतील, साहित्यातील जे काही चांगले, पचेल ते सारं काही आपला समाज स्विकारत आहे, प्रश्न कदाचीत गतीचा असू शकतो. म्हणून भावनावेगात कोणी साहित्यिक समाजाला वाचनाच्या आवडी-निवडीसंबंधी दोष देत असतील, तर तो त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा विषय आहे किंवा त्यातही राजकारण असावे हेच समजून आपला समाज दुर्लक्ष करेल असे वाटते.

बुधवार, २१ फेब्रुवारी, २०१८

मोठा आर्थिक घोटाळा - PNB



'पंजाब नॅशनल बॅकमध्ये मोठा आर्थिक घोटाळा' अशी बातमी ऐकल्यानंतर सर्वसामान्यांना धक्का बसला. भ्रष्टाचाराची बातमी आपल्याला ऐकण्याची सवय आहे. परंतू बँकेतील त्यातही सार्वजनिक क्षेत्रातील बँकेंत घोटाळा झाल्याची बातमी ऐकली की सामान्य माणूस हादरून जातो. ज्यांच पंजाब नॅशनल बँकेत खातं नाही, त्यांच्या मुखातून "आपलं बाबा, त्या बँकेंत खातं नाही" असेच शब्द उमटले असू शकतात. परंतु ज्यांच खातं आहे, त्यांच्या भावना काय असतील? त्यांची मनःस्थिती कशी असेल, हा विचार मनात आल्यावर लक्षात येते, आपलं ही खातं सरकारी बँकेंतच आहे. उद्या आपल्या बँकेतही असे घडू शकते. घडू शकते? अहो, घडलेलं असेलही. फक्त बाहेर आलेलं नसेल. हा ही विचार झपकन मनात आला.

आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण आणि प्रत्येक क्षेत्रात दिवसागणिक बदलत जाणारं तंत्रज्ञान ह्यामूळे अनेक गोष्टी घर बसल्या होऊ लागल्या. तसे चोरी करण्याचे प्रकारही घर बसल्या होऊ लागले. कर्ज घेऊन पोबारा करावयाचा आणि घर फोडून चोरी करणे ह्यात फरक तो काय राहीला? सर्वसामान्यांना पैसे काढण्यासाठी एटीमकडे किंवा बॅकेकडे जावे लागते. जिथे पास बुक अपडेट करणे, वा चेकबूक घेण्यासाठी बॅकेत दोन वेळा जावे लागते, तिथे सर्वसामान्यांना कर्ज सहजरित्या मिळण्याची सोय कशी असू शकेल? कर्ज घ्यावयाचे असले तरी बॅकेत जाऊन कर्ज मिळू शकते का, ह्यासंबधी प्रथम विचारपूस करावी लागते. नंतर अर्ज भरणे, सोबत जामिनदार, उत्पन्नाचा दाखला आणि तारण म्हणून जमीन, घर ,दुकान, दागदागिने इत्यादींची मालकी सोडावयाची आणि मग कर्ज मिळते. जी पध्दत मल्या आणि निरव मोदींना कर्ज देण्यासाठी वापरली तिचा अभ्यास बँकिग ह्या विषयाच्या पदवीच्या अभ्यासक्रमात नसणार. असा काही मोठा आर्थिक घोटाळा झाला, की मग वृत्तपत्रांतून टिव्ही चॅनेल्स, किंवा सोशल मिडीयावर येणार्या पोस्ट्स् मधून कळू लागते. पण घोटाळ्याला जबाबदार कोण? हे कधी कळेल? हे कोण सांगू शकेल? 

न्यूज चॅनेल्स अशा घोटाळ्यासंबंधी चर्चा-सत्र आखतात, त्यातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तू तू मै मै असा खेळ पहावयास मिळतो. त्या खेळातूनही अंदाज बांधता आला असता, जर का सार्या चॅनेल्स वरील चर्चा-सत्र निपक्षपातीपणे आयोजीत केल्या असत्या तर. पण तसे प्रत्यक्षात घडते का? नाही. कारण घोटाळ्यासंबंधीत माहीती गोळा करीत असता, मिडीयावाल्यानांच घोटाळा(मॅनेज) करण्यात कुणीतरी खुणावत असतात किंवा ते ही संधी प्राप्त करीत असतात. असे नसते तर सोशल मिडीयावर अमक्या चॅनेलच्या संपादकांचा तमक्या ठिकाणी पाॅश बंगला आहे, अशा बातम्या आल्या नसत्या. आपल्या ज्ञानात भर होते ती एकाच गोष्टीची. ती म्हणजे बँकेला, उद्योगपतीने कुठे आणि कसे गंडाविले? हे झाले बँक घोटाळ्या संदर्भात. 

सरकारी योजनांच्या अमंलबजावणीमध्ये कसा आर्थिक घोटाळा होतो ह्या संबधीत आपल्याला थोडीफार माहीती आहे. सरकारी योजनाचं काॅन्ट्रॅक्ट ज्यांना दिले जाते, ती मंडळी, नोकरशहा आणि राजकीय नेत्यांशी सलगी करून सरकारी तिजोरीतून एक तर त्या योजनासांठी झालेला खर्च वाढीव दाखवून किंवा ज्या योजना राबवयाच्या आहेत, त्या निकृष्ट दर्जाच्या करून, पैसा लुटतात. हा झाला, भ्रष्टचाराचा दूसरा प्रकार. 

घोटाळा कुठल्याही प्रकारचा असो, नोकरशहा, राजकारणी आणि ज्यांचा आर्थिक फायदा होतो ते उद्योगपती वा काॅन्ट्रक्टर ह्यांच्यात मिलीभगत असल्याशिवाय घडतात का? आर्थिक घोटाळे, हे सर्वसामान्यांच्या खिशातून कराद्वारे गोळा केलेल्या महसूलातूनच होतात. सरकारचा पैसा म्हणजे लोकांचाच. आर्थिक घोटाळे फक्त लोकशाही राज्यप्रणाली मध्येच होतात असे काही नाही. एक पक्षीय राजवट असो, वा लष्करशाही तिथेही असे प्रकार घडत असताच. 'तळे राखी तो पाणी चाखी ' अशी म्हण प्रचलीत आहेच की. पण त्याची वार्ता लोकांपर्यंत जात नाही. लोकशाहीत अशा घटनांची माहिती लोकांपर्यंत जरूर जाते. पण आपण काय करू शकतो? खरं काय, खोटं काय हेच कळत नसते. हो, मतदानातून सरकार बदलता येते. पण नव्या प्रकरातील दरोडे बंद होतील का? सगळ्याच पक्षांकडे वकीलांचा ताफा असतो. त्याचं वागणं, उठणं,चालणं, बोलणं ह्यात फरक नसतोच. बोलण्यात पटाईत,आणि मामला थंड कसा करावयाचा ह्यात ही पटाईत. बहुतांश असे वकील राज्यसभेवर निवडून आलेले असतात. लोकांशी ह्यांचा फारसा संबंध येत नसतो. कारण हे पक्षाचे मॅनेजर असतात. कसे काय कोणास ठाऊक? कदाचीत काॅर्पोरेट जगत हे त्यांचे क्लाएंट्स असतात म्हणून. 

निरव मोदी वा चौक्सी ह्याच्या कंपनींची खाते पंजाब नॅशनल बँकेत आणि पैसे काढले किंवा कर्ज म्हणून पैसे मिळाले दुसर्याच बँकांतून. केवळ लेटर ऑफ अंडरटेकींग वरून. अशी कर्जे म्हणजे खात्यात पैसे नसतानाही पैसे मिळण्याची सोय. किती वर्षापासून? साधारणतः २०११ पासून. प्रश्न येतो, तो म्हणजे सरकार कुठल्या पक्षाचं होतं? ह्याचाच अर्थ लोकांचे सरकार नसतेच की. मग लोकाचं काय असते? फक्त कष्ट आणि कमाविलेली मिळकत. सरकारकडे जमा केलेला कर हि सरकारचा. कर आणि कर्ज ह्याची फेड नाही केली तर, तुमची मिळकत, संपत्ती ही सरकारची. उद्योगपती, ज्यांनी कर्जे वाम मार्गाने घेतली, माया जमविली अशी मंडळी, 'कर नाही,त्याला डर नाही' अशा अहिर्भवात वावरताना दिसतात. 

आता शोध सुरू होईल. चौकशी किती वर्षपर्यंत चालेल? अंदाज वर्तीता येत नाही. गुन्हेगारांना शिक्षा मिळेल का आणि कधी? देव जाणो. रिझर्व बँक आॅफ इंडीया ही बँकिंग व्यवहारावर लक्ष ठेवणारी यंत्रणा. २०११ समयी अनेकांकडून कौतुकास प्राप्त झालेले रघुराम राजन हे गव्हर्नर होते. हुषार, प्रामाणिक असे गौरविलेले. मग त्यांनी काय केलं? कि हे सुध्दा पध्दतशीर रित्या मिडीयाच्या साह्याने गौरविलेले? ज्या पक्षांनी त्यांना रिझर्व बँकेच्या गव्हर्नर पदी बसविले, ते सारे पक्ष तसेच त्यांचे नेतेही भ्रष्टाचारामूळे पराभूत झाले. केंद्रात भाजपाचे सरकार आले. रघुराम राजन ह्यांची गव्हर्नर पदाची मुदत संपली. दुसरी टर्म मिळाली नाही. नंतर हे महाशय पुन्हा शिखागो येथील काॅलेजात प्रोफेसर म्हणून शिकावावयास गेले. भारतात प्रोफेसर म्हणून नोकरी देणारी महाविद्यालयें नाहीत का? आहेत की. पण लठ्ठ पगार देणारी नाहीत. हे देशभक्त. रिझर्व बँकेत पुन्हा गव्हर्नर पद मिळाले असते तर हे महाशय थांबले असते का? सांगता येत नाही. कारण संशयाची सुई त्यांच्या दिशेने जाऊ लागली आहे. पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यासंबंधी काही प्रतिक्रीया त्यांना द्यावयाची गरज भासत नाही. एरवी अर्थसंकल्पांवर टिका करण्यासाठी ह्यांची घाई असते. सरकारने लोकानुयायचं, सवलती देण्याचा अर्थसंकल्प सादर केला की हे महाशय लोकांना(म्हणजे मध्यम वर्गीयांना) आवडेल अशी टिका अर्थसंकल्पावर करणार. ज्यांना प्रामाणिक म्हटलं जात आहे, तेच नोकरशहा ठग निघाले तर ----. बरं, मग आता नवीन आलेले गव्हर्नर, त्यांनी काय केलं? त्यांना कसा सुगावा लागला नाही, इतक्या मोठ्या रकमेचा घोटाळयाचा? मग अशा प्रकारच्या आर्थिक घोटाळ्याला व्यवस्था जबाबदार असेच समजावयाचे का? मुळात जिथे अव्यवस्थेलाच व्यवस्था असे नाव पडले आहे तिथे सुरळीत आणि स्वच्छ व्यवहाराची अपेक्षा कशी काय ठेवावी? बॅकांचे राष्ट्रीयकरण झाले. काही फायदा झाला. पण काळ बदलला, हे ध्यानात घ्यावयास हवे होते ना? मोदीजी म्हणतात "Minimium Governance" मग राष्ट्रीयकृत बॅकां कशाला हव्यात? सहकारी बॅकां कशाला हव्यात? राजकीय नेत्यांच्या आणि उद्योगपतींच्या सोयीसाठी ठेवावयाच्या का? सहकार क्षेत्रात तर, 'एकमेकां सहाय्य करू ' एवढ्याच अर्थाने. अर्थ म्हणजे पैसा. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी बॅकांचं राष्ट्रीयकरण केलं. पाठोपाठ स्टेट बॅकेंत घोटाळा झाला. कोण्या नगरवाला अधिकाराचा संशयास्पद रित्या मृत्यु झाला. संशयाची सुई इंदिरा गांधींच्या दिशेने गेली होती असे ऐकावयास मिळाले होते. अनेक सरकारी बँकेंत घोटाळे झालेले असू शकतात. फक्त उघड झाले नाहीत एवढेच. बँकांचे NPA वाढत जात आहेत हे काय दर्शवित आहे?

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरमय्याच्या सरकारने नीरव मोदी आणि चोक्सी ह्यांच्यावर मेहरबानी केल्याचे वृत्त आहे. काँग्रेसचे नेते अभिषेक संघवीचाही सहभाग ह्या घोटाळ्यात आहे असे वृत्त आहे. इतरही नेतेमंडळींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. इतका मोठा भ्रष्टाचार राजकारणातील मोठ्या नेत्यांच्या सहभाग असल्या शिवाय घडणार नाही. Special feature of big scam in India is that it goes vertically and horizontally too, involving more and more politicians and bureaucrats. पण पुष्कळदा मोठ्या नेत्यांऐवजी छोटे नेते किंवा नोकरशहा अडकतात किंवा अडकवले जातात. कालातंराने ज्यांच नशीब थोर ते सही सलामत सुटतात. 

भ्रष्टाचार उघडकीस होण्यात उशीर का होतो, भ्रष्टाचार करणारे विजय मल्या आणि नीरव मोदी अशा मंडळींनी देश सोडून पलायन कसे केले? ह्या दोन्ही प्रश्नावर भाजपा आणि काँग्रेसमध्ये निकाराची लढाई सुरू आहे. दुसरी काही घटना घडली की मग ह्या विषयासंबंधीची चर्चा बंद होणार हे ही पहावयास मिळणार. क्रिकेट खेळात विक्रम असतात ते मोडण्यासाठी. आणि मोडले जात आहेत ते आपण पाहतो. पंजाब नॅशनल बँकेतला हा घोटाळा आतापर्यंत सर्वात मोठा असे मानले जाते. पुढे कधी तरी ह्याहूनही मोठा. नंतर महाघोटाळा. असेच चालू राहणार का? किती रकमेचा महाघोटाळा? अंकगणितात मोजता येईल का? नाही. 

बर्टाड रसेलांचे उद्गार आठवतात, "माणसाचा मूलभूत विकास झाल्याशिवाय वैज्ञानिक प्रगती त्याच्या पचनी पडणार नाही". महात्मा गांधीजींनी म्हटले आहे, "When u do not have what you like, you should love what you have". आपल्याकडे जे आहे त्यातून सचोटी आणि चिकाटीने स्वर्ग निर्माण करा'. पंडीत दिनदयाळ उपाध्याय म्हणत असत, "पैशाचा अभाव नसावा पण प्रभावही नसावा". शेवटी नैतिकता शिल्लक राहावयास हवी ना. असे म्हटले जाते की If you lose money nothing is lost, If you lose health some thing is lost and if you lose character everything is lost. म्हणूनच कोण्या अर्थशास्त्रज्ञाचे बोल आठवतात , The progress of the nation is far less depend upon form of it's institution rather than charcter of it's own men. कुठल्याही देशाची प्रगती ही तिथे कुठल्या प्रकारची राजवट आहे, ह्या पेक्षा तेथील नागरिकांच्या शील वरच अधिक अवलंबून असते. आपल्या देशाला प्राचीन काळापासून चागंल्या संस्काराची पंरपंरा आहे. नैतिकतेचे धडे देणार्या ईश्वरनिष्ठांची मांदियाळी होऊन गेली. त्यांनी आपआपल्या विपूल,विविधांगी साहित्य-कृतींतून, त्यांच्या जीवन चरीत्रातून अशी शिकवण दिली आहे कि कोणाच्याही हृदयात मुर्तीमंत पावित्र्य साकार व्हावे. पण ते साहित्य आपण शोकेसमध्येच ठेवले आहे. काॅलेजमध्ये अर्थशास्त्रात शिकलो आहे, A country is poor because it is poor. त्याच न्यायाने दुर्दैवाने म्हणावं लागेल, A country is corrupt because it is corrupt.

रविवार, ४ फेब्रुवारी, २०१८

तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः|



अलिकडे WhatsApp वर एक पोस्ट आली. ती अशी आहे, Life is very similar to a Boxing Ring. Defeat is not declared when you fall down. It is declared when you refuse to rise up. ही पोस्ट वाचल्यानंतर मी एलआयसीत काम करीत असतानाचा एक प्रसंग आठवला. एका रविवारी सकाळी मी आयुर्विमा व्यवसायानिमित्त जोगेश्वरी पश्चिम येथील बेहरामबाग भागात गेलो होतो. माझा एजंट त्याच भागात राहात होता. तेथील काम आटोपून मी जोगेश्वरी स्टेशनला बोरीवलीकडे येणार्या गाडीसाठी वाट पाहात होतो. गाडीला उशीर झाला होता. इतक्यात रेल्वेची अनौन्समेंट झाली. 'बारह बजकर दस मिनिटकी बोरीवली तरफ जानेवाली गाडी आज फ्लॅटफार्म क्रमांक एक के बजह फ्लॅटफार्म क्रमांक तीनपर आ रही है!'. अनौन्समेट 'गाडी आयेगी' अशी नव्हती तर 'गाडी आ रही है ' असा त्यामध्ये उल्लेख होता. विशेषतः मुबंईकरांना लोकलमध्ये प्रवास करीत असताना असा अनुभव येणे हे नित्याचे झाले आहे . धावपळीतच मी एकेक पायरी सोडूनच जीना चढलो आणि फ्लॅटफार्म क्रमांक तीनकडे उतरणार्या जीन्यातून सावधानेतेने उतरून कसाबसा एकदाचा गाडीत चढलो. गाडीत बसल्यानंतर माझं विचारचक्र सुरू झालं. फ्लॅटफार्म क्रमांक एकवरून जीना चढलो असं म्हणण्यापेक्षा अक्षरशः धावलो. परंतु फ्लॅटफार्म क्रमांक तीनसाठी उतरतेवेळी मी जिन्याच्या प्रत्येक पायरीवर पाय ठेवीत होतो. असे का? साधारणतः सारे प्रवासी जीन्यावरून उतरताना अशीच सावधगिरी बाळगत असतात. बस लक्षात आलं एक सत्य. मनुष्य खाली उतरताना सावधगिरी बाळगत असतो. घसरणे,पडणे म्हणजे अवनिती. अवनिती कुणालाही प्रिय नसते. मनुष्याच्या अंगी उन्नतीची आस जन्मतः विराजित असते. हेच ते सत्य. 

विकासाची इच्छा मानवाव्यतिरिक्त कोणताही दुसरा प्राणी करू शकत नाही. आपल्याला काय हवयं ह्याची जाणीव होणे आणि ती मिळविण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करणे हे माणसाचे वैशिष्ट्य आहे. Growth is the evidence of life. वाढ मग ती शारिरीक असो वा बौध्दीक, आर्थिक असो वा अध्यात्मिक हेच जीवंतपणाचं खरं लक्षण आहे. पृथ्वीच्या पोटात अनेक खनिजं, मौल्यवान रत्ने दडलेली असतात. जो शोधेल त्याला गवसतील. आदिशक्तीने आपल्या अंगी सृशनशिलता, सहनशिलता,उद्योमशिलता, नाविन्यता, शौर्य, धैर्य , इच्छाशक्ती, विविध कला, इत्यादी अनंत क्षमतेचे डबे भरून ठेवले आहेत. आळस, भिती, शंका-कुशंका, न्युनगंड अधंश्रध्दामुळे आपण ते उघडून बघत नसतो. आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करून ते डबे उघडून बघणे आवश्यक असते. आर्य चाणक्यने म्हटले आहे 'अयोग्यः पुरुषः नास्ति|' प्रत्येक व्यक्तीत कुठलीतरी क्षमता असेतच. अयोग्य वा बिनकामाचा असा माणूस नसतोच.  आर्य चाणक्यांना स्वतःला काही उपभोगायचं नव्हतं; शारिरीक क्षमता, साधनेही मर्यादित; परंतु यवनांच्या आक्रमणांमुळे आणि अत्याचारांमुळे क्षुब्ध झालेले अंतःकरण होते; कर्तव्यविमुख, विलासी आणि उद्दंड नंदराजाचे वेडेचार पाहून कार्योद्यत झालेली बुध्दी होती; दृढनिश्चय होता;  त्यातूनच त्यांनी चंद्रगुप्त मौर्याला घडविले, आणि स्वतः हाती शस्त्र न घेता मायभूमीवरील, देशबांधवांवरील अन्यायाचे निराकरण केले.

दैनंदिन जीवनात अनेक उदाहरणे आपल्याला काय दर्शवित असतात? कुस्ती असो वा कबड्डी ह्या खेळात आव्हान देते वेळी प्रतिस्पर्धी काय म्हणत असतात 'दम आहे का तुमच्यात?'. पूर्ण शक्तीने चढाई आणि पकड म्हणजेच ह्या दोन्ही खेळातील यश. शिकारी जेव्हा शिकारीला जातो आणि योग्य स्थान पाहून बंदूक रोखून बसतो, तेव्हा त्याला दमाचाच अवलंब करावा लागतो. तो त्या वेळी खाणेपिणे, हसणे, बोलणे सारे काही विसरतो. शरीरातील सारी शक्ती त्याने आपल्या डोळ्यात एकवटलेली असते. एक डोळा मिटून, दृष्टी, बंदुकीच्या नळीचे टोक आणि शिकार यांचे ऐक्य साधले रे साधले की, क्षणमात्र तो श्वास रोखून धरतो आणि गोळी मारतो. अचूक नेम लागून शिकार साधते. प्रचंड शक्ती असलेला हिंस्त्र पशू निमिषार्धात धरणीवर लोळू लागतो. पाण्यापासून वीज निर्माण करावयाची असल्यास त्या पाण्याला वर न्यावे लागतेच. सभेमधील भाषण असो वा घोषणा असो आपल्याला आवाज वरच्या पातळीवर न्यावाच लागतो. कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायाचं असेल तर आपल्या आंतरिक शक्तीला उच्चतम श्रेणीत न्यावे लागते तरच आपल्याला इच्छीत कार्यात यश मिळते. प्राणशक्ती, प्रतिकारशक्ती, धैर्य इत्यादी वाढविण्यासाठी प्राणायमच आवश्यक असतो. 

पृथ्वी स्वतः भोवती फिरत फिरत सुर्याभोवती फिरते. त्यामूळे दिवस -रात्र असे चक्र सुरू झाले. भले हे सत्य असले, तरीही सूर्य उगवतो आणि मावळतो असाच अर्थ जगभरातल्या प्रत्येक भाषेत रूढ झालेला दिसतो. ह्याचं कारण जगभरातील सार्याच तत्ववेत्त्यांनी, संतमहंतानी प्रगती म्हणजे वर चढत जाणे rising up तर अधोगती म्हणजे downfall असेच मानले आहे. "Sunset at one place is always Sunrise at another place and at the same place too after twelve hours. संकटे येतात, ती आपली कसोटी पाहात असतात. पुष्कळदा आपला व्यवसाय, उद्योग, संशोधन वा नोकरीतील बढती असो ह्यातील यशासाठी करावे लागणारे कष्ट , ज्ञान, संपर्क आणि क्षमतामध्ये वृद्धी करण्यासाठी 'Sky is the limit ' असेच मॅनेजमेंट वा मार्केटिंग गुरू सांगत असतात. त्यामागील हेतू हाच कि आपल्यामध्ये आकाश नावाचं पंचमहाभूताचा अंश जन्मतः असतो, त्याचे विस्मरण होऊ नये. There is no limit to our ability and efficiency. Excellence is always a moving target. म्हणूनच वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे कि Defeat is not declared when u fall down .It is declared when u refuse to rise up.

एक साधा भोळा लाकूडतोड्या होता. लाकडे तोडून झाली की तो त्या रानातील साधूची सेवा करायचा आणि मग घरी जात असे. एकदा तो साधूमहाराजांना म्हणाला, "महाराज माझी स्थिती फार वाईट आहे. जेमतेम पोटापुरता मिळते. फाटके कपडे घालतो; मोडक्या झोपडीत राहतो. आपण काही कृपा करा आणि मला चांगले दिवस येतील असा आशिर्वाद द्या". साधू म्हणाला पुढे जा, म्हणजे तुला चांगले दिवस येतील. दुसर्या दिवशी तो नेहमीच्या लाकूड तोडण्याच्या जागी न थांबता पुढे गेला तेव्हा त्याला खैराची आणि शिसवाची लाकडे मिळाली. त्याला नित्यापेक्षा अधिक पैसे मिळाली. मग तो रोज तेथून लाकडे आणू लागला. तो आता श्रीमंत झाला. एकाएकी त्याला आठवण झाली कि साधूने पुढे जा असे म्हटले होते. मग तो पुढे गेला तेव्हा त्याला सागाचे लाकडे मिळू लागली. आता तो लखपती झाला. पण थांबला नाही. साधूचे म्हणणे आठवले पुढे जा. बस तो आता पुढे जाऊ लागला. तिथे चंदनाचे जगंल लागलं. चदंनाची लाकडे विकून तो करोडपती झाला. तरी तो थांबला नाही. ' पुढे जा ' हे साधू महाराजाचे बोल आठवले. तो आणखिन पुढे गेला तर त्याला क्रमाक्रमाने चांदीच्या, सोन्याच्या, आणि रत्नाच्या खाणी सापडल्या. तो सर्वात धनवान म्हणून प्रसिध्दीस पावला. 

वरील कथा आणि पोस्टचा अर्थ हाच कि विधाता आपल्याला पराभूत कधी घोषीत करतो, जेव्हा आपण थोडसं अपयश आल्यावर प्रयत्न सोडून देतो तेव्हाच. जीवन हे बाॅक्सींग रिंग सारखेच आहे. दुसर्या महायुध्दात बेचीराख झालेले जर्मनी आणि जपान देश पुन्हा उठून जोमाने काम करीत प्रगत राष्ट्रात पुन्हा स्थान मिळविते झाले हे आपण पहातच आहोत. इजरायल एक छोटासा देश. पण सामरिक तसेच तंत्रज्ञानात आज अग्रणी देशात स्थान मिळवून आहे. पोखरणच्या अणूचाचणीनंतर जगातील अनेक देशांनी आपल्या देशावर आर्थिक, आयात-निर्यातसंबंधीची बंधने लादली, तरीही आपल्या देशाची प्रगती अडली नाही. 
आल्या जरी कष्टदशा अपार 
न सोडती धीर तथापी थोर | 
केले जरी पोत बळेंची खाली
ज्वाळा तरी ते वरती उफळी|| 
ह्या नियमानुसार,आलेल्या संकटांना जे दुप्पट आवेशाने तोंड देतात, ते यशस्वी होतात. अपयश, पराभव ह्या गोष्टी तात्पुरत्या असतात. पराभवाने खचून जाणे हाच मोठा पराभव असतो. थांबला तो संपला. स्वामी विवेकानंद म्हणत असत, 'नैराश्य म्हणजे मृत्यु, उत्साह म्हणजे जीवन'.

असे वाचनात आले आहे की इंगंल्डचा एक राजा होता. त्याच्या राज्यावर एका पर प्रान्तातील राजाने अकस्मात रित्या आक्रमण केले. इंग्लडच्या राजाचा सपशेल पराभव झाला. तो आपला जीव मुठीत धरून एका गुहेत लपला. अत्यंत निराश अवस्थेत तो तिथे बसला असता, त्या गुहेत एक कोळी आपलं जाळं विणत होता, त्यावर त्याचे लक्ष गेलं. हे करीत असता तो कोळी पुन्हा पुन्हा वर चढण्याचा प्रयत्न करीत होता आणि पुन्हा पुन्हा खाली पडत होता. असे वारंवार घडत होते. इंग्लडचा तो पराभूत राजा टक लावून त्या कोळ्याकडे पाहात होता. त्या कोळ्याने चिकाटी सोडली नाही. शेवटी तो यशस्वी झाला. यत्कचिंत तो कोळी इतक्या वेळा खाली पडत होता तरीही शेवटी यशस्वी झाल्याचं पाहून त्या राजाला स्पुर्ती आली. गुहेतून बाहेर आला, पुन्हा आपल्या सैनिकांना गोळा केलं आणि शेवटी सारी शक्तीपणाला लावून आपलं गमाविलेलं राज्य परत मिळविण्यात यशस्वी झाला. चराते चरति भाग्यः| जो चालत राहतो त्याच्या गळ्यात सदैव भाग्यश्री वा यशश्री माळ घालीत असते. हे त्रिकालातीत सत्य आहे. 

रणागंणात हात-पाय गळून पडलेल्या अर्जुनाला भगवंत टोमणा मारतात, 'क्लैब्यं मा स्म गमः पार्थ'! अरे, अर्जुना काय हा लाजिरवाणा प्रकार, नामर्दपणाची कास धरली आहेस? भगवंत पुढे सागंतात, 'ठार झालास तर स्वर्गाची प्राप्ती होणार आहे, आणि जिंकलास तर पृथ्वीचे राज्य उपभोगशील'. शेवटी मात्र अधिकारवाणीनेच म्हणतात, 
'तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युध्दाय कृतनिश्चयः| 'अर्जुना उठ, युध्दास तयार हो. जीवन जगत असताना अनेक आघाड्यावर आपलाही संघर्ष वा युध्द चालू असते. पुष्कळदा निर्णय घेताना मानसिक गोंधळही  होत असतोच. त्या अर्थाने आपण सारे क्षत्रियच आणि अर्जूनच. Life is challenge ,accept it. आपल्यामधली क्षात्र तेज जे सुप्त अवस्थेत गेलेलं असते, ते वारंवार मनाच्या पृष्ठभागावर आणण्याचा प्रयत्न करीत राहणे हाच खरा धर्म. व्यक्ती असो वा समाज किंवा देश, जो आव्हान स्विकारील, तोच विकास करीत जाईल, त्याचीच प्रगती होईल. स्वामी विवेकानंदानी म्हटले आहे "Arise, Awake and stop not till the goal is achived ".

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...