शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०१७

सहिष्णुता : हिंदू जीवनमूल्य


चातुर्वण्यम् मया सृष्टी गुणकर्मविगागशः ह्या लेखात मी म्हटलं आहे कि विविधता हे सृष्टीचं वैशिष्ट्य आहे. निसर्गातील पंचमहाभूतें आप (जल), तेज ( प्रकाश) वायु, आकाश आणि पृथ्वी इत्यादीचीं कार्ये आणि वैशिष्टे ही भिन्न आहेत. आपल्याला ज्ञात असलेल्या ग्रहांचे आकारमान, गती, कक्षा, गुरूत्वाकर्षण ह्यातही भिन्नता आढळते. मानवी शरीर हे पंचमहाभूतांचे बनलेले असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं शरीर, त्याचे मन, त्याची बुद्धी, दुसर्या व्यक्तीचं शरीर, मन, बुद्धी पेक्षा भिन्न असते. आपल्या जन्मदात्या आई-वडीलांच्या जनुकामुळे काही अंशी अनुवांशिक गुण, स्वभाव, रंग,रूप ह्यात साधर्म्य आढळत असले तरी एकंदरीत प्रत्येक व्यक्तीचं एक स्वतंत्र अस्तित्व असते. त्यातूनच पुढे व्यक्ती तितक्या प्रकृती, जशी दृष्टी तशी सृष्टी, जशी बुध्दी तशी कुवत इत्यादी नियम अस्तित्वात आले असावेत. कुवत म्हणजेच गुण. जसे गुण तसे कर्म आणि कर्म तसे फल. त्यातून विभागणी म्हणजे वर्ग असावेत. परंतु मूळ सत्य हे कि विविधता हेच विश्वाचे वैशिष्ट्य. आणि त्या विविधतेतील चैतन्य म्हणा वा ऊर्जा ते एकच. आणि तेच तत्व विसरले गेले आणि केवळ आपल्या देशात नाही तर जगातील प्रत्येक देशात. इतर देशातही वेळोवेळी समाजव्यवस्थेत काहीना काही स्वरूपात भेदाभेद निर्माण झालेले दिसून येतात. ह्याचं मूळ कारण माणसामध्ये श्रेष्ठत्व दाखविण्याची असलेली ऊर्मी. त्यामुळे कालच्या जगात संघर्ष होता.  आजही आहे. आणि भविष्यातही राहणार असेच दिसते. 

ही सृष्टी निर्माण होण्यामागे कुठलीतरी एक शक्ती आहे. त्या शक्तीचं स्वरूप कसे? तर ' जशी दृष्टी तशी सृष्टी ' ह्या नियमाचेच वेष्टन असलेले. त्यामुळे तिथेही भिन्नता निर्माण झाली. त्यातून विविध धर्म, पंथ, संप्रदाय निर्माण झाले. ज्यांनी ज्यांनी त्या शक्तीच्या स्वरूपाचं वर्णन केले त्यांना ईश्वराचा पुत्र, दूत, प्रेषीत वा त्या त्या धर्माचे पंथाचे संस्थापक मानले गेले. पुढे मध्ययुगीन काळात दुर्दैवाने त्यात श्रेष्ठता आणि कनिष्ठतेचा वाद विकोपाला जात युध्दे झाली. त्यालाच क्रुसेडेस म्हटलं गेलं. मानवाने मानवाचेच रक्त सांडले. एवढ्याने भागले नाही. मग बाटवा-बाटवी, सक्तीने धर्मातंर, साम्राज्यवादाची लालसा असे प्रकार घडले. आणि त्याची परिणती विनाशकारी दोन महायुध्दात झाली. 

आज बहुतांश देश स्वतंत्र असले तरी साम्राज्यवादी अपप्रवृत्ती, धार्मिक उन्माद शिल्लक आहेतच. आज जे काही प्रमुख धर्म आहेत त्या सर्व धर्मांना संस्थापक आहेत. हिंदू धर्माला कोणी संस्थापक नाही. वर उल्लेख केलेल्या अपप्रवृत्ती आणि क्रुसेडस ह्याचें जनक इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म मानणारेच. हे ऐतिहासिक सत्य आहे. या उलट हिंदू धर्म हा सहनशिलता आणि संयमाची शिकवण देणारा. तसेच more inclusive. येथे प्रत्येकाच्या मताला, विचाराला मान आहे. येथे धर्म आणि देव न मानणार्यांनाही सन्मान दिला जातो. कारण येथे कर्म चांगले असणे महत्वाचे मानले जाते. हिंदू ही एक जीवनपध्दत आहे. असा आपल्या सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आहे. 

वस्तूतः हिंदू धर्माचं स्वरूप कसं आहे? "नाही जन्म, नाही नाम! नाही कोणी माता, नाही कोणी पिता ! नाही कुठला एक ग्रंथ प्रमाण, नाही एक भाषा प्रमाण ! नाही कुठला एकच देव, नाहि कुठला एकच सण! विविध देव - देवता , विविध वेषभूशा ! विविध पुजा-अर्चा, विविध उपासना !" एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति! इतकी व्यापक देवाची व्याख्या आपल्या शास्त्रकारांनी केलेली आहे. सत्य हाच ईश्वर अशी आपली उपनिषदें मानतात. छांदोग्य उपनिषदात सत्य म्हणजे काय हे ही मांडले आहे. सत्य हा शब्द स, ति आणि य ह्या तीन मात्राने बनलेला आहे. स म्हणजे सत् अर्थात अविनाशी; म्हणजे ईश्वर, सृष्टीचे कारण. ति म्हणजे नाशिवंत. अर्थात सृष्टी. म्हणजेच  कार्य. ह्यांचा योग म्हणजे जुळणी य ने झाली. आणि सत्य झाले. कोणत्याही प्रसंगीं कारण आणि कार्ये ह्यांचा संबंध यथार्थाने ओळखणे म्हणजे सत्य होय. ही व्याख्या विज्ञानालाही शोभून दिसते. उपनिषदांना भौतिक विज्ञानाचे वावडे नाही. विज्ञानाचेच काय कुठल्याही विषयाचे वावडे नाही. उपनिषदे अंत्यत स्पष्टवक्तीं आहेत. ऐहिक आनंदाची श्रेष्ठतम प्रचिती जननेंद्रियेनेंच घेता येते इथपर्यंत स्वच्छ विधानें आहेत. त्यात अर्थशास्त्र आहे, कामशास्त्र आहे. शेतकीशास्त्र शिक्षणशास्त्र, सृष्टीशास्त्र , विज्ञान, सारं काही आहे. 

'एक तत्व नाम 'ही सुध्दा उपासना. कर्म करीत असता ईश्वराच्या नामाचं स्मरण केलं तरी ती उपासनाच होय. येथे केरसुणीची पूजा होत असते. तसेच वृक्षाचे पूजन होत आलेले आहे. जे जे मानवी जीवनाला कल्याणकारक ते सारे पूजनीय असेच मानले जाते. यत्किंचित प्राणी, पक्षी सारे ईश्वरमय.' जे जे भेटीले भूत ते ची भगवंत'. चराचर सृष्टीत ईश्वर सामावलेला आहे.' इशावास्यम् इदं सर्वम् '! हे उपनिषदातींल वचन. अनादि काळापासून ह्या धर्माचं अस्तित्व. रामनाम महात्म्यामध्ये म्हटलं आहे, बीजं धर्म मूलस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम् !! अर्थ असा आहे, श्रीराम हे धर्मरूपी वृक्षाचे बीज आहे. असे हे श्रीराम नाव तुम्हांला वैभव व सुख प्रदान करो. ह्या ठिकाणी धर्म म्हणजे वैश्विक धर्म असेच आपल्या शास्त्रकारांना अपेक्षित आहे. म्हणून सर्वे भवन्तु सुखीनः ! सर्वे सन्तु निरामया! अशी प्रार्थना आपल्या येथे वैदिक काळापासून आजतागात म्हटली जात आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे पासयदान ही सुध्दा वैश्विक प्रार्थना. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत आपण स्वतः मानवी अवतार केव्हा घेतो ह्या संबंधी म्हटले आहे,कि
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ! धर्माची ग्लानी म्हणजे सदाचारणाचा अभाव, नीती मूल्यांची अवहेलना. पुढे भगवंतांनी म्हटले आहे, परित्राणायम् साधूनाम्, विनाशाय च दुष्कृताम् ! धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे !! साधु-सज्जनांच्या रक्षणासाठी आणि अधर्म कृत्ये करणार्यांचा नायनाट करण्यासाठी आणि धर्मतत्वांची पुन्हा प्रतिष्ठापनाकरितां मी युगा-युगात अवतार घेत असतो. येथेही हिंदूधर्म असा उल्लेख दिसत नाही .धर्म म्हणजे सदाचारण, सामंजस्य, सत्य, सहकार, सहमती, सहजीवन आणि सख्य हाच अर्थ मांडलेला दिसतोय. "जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला" हीच भगवंतांच्या भक्ताची व्याख्या. त्या व्यक्तीचा भगवंत कुठला हा प्रश्नच गौण. आजकाल मानवता धर्माचा जो वांरवांर उल्लेख सर्वत्र होत आहे, त्याही पलीकडे जाऊन म्हणजे प्राणीमात्रांच्याही हिताचा , सुखाचा, आणि पर्यावरणाचा विचार जिथे मांडला गेलेला आहे , ती आपली संस्कृती. मग त्याचं नाव भारतीय संस्कृती म्हणा वा हिंदू संस्कृती. आपल्याच देशाचीच ती संस्कृती. अशा संस्कृतीत ज्यांच पोषण झालेलं आहे, त्यांनी इतर धर्मियांच्यावर जबरदस्तीने वा धाकातून छळ केलेला आहे असे वाचनात आले आहे का? वैदिक काळापासून आपल्या येथे ' समाजाची धारणा करतो, तो धर्म' हे धर्माचे स्वरूप राहिलं आहे. त्यामुळे  पुत्रधर्म, पिताधर्म, माताधर्म, अतिथीधर्म, गुरूधर्म, शिष्यधर्म, शरीरधर्म, सेवाधर्म, शेजारधर्म, दानधर्म, नीतीधर्म, संन्यासधर्म अशा अनेक संज्ञाने व्यापलेला असा शाश्वत धर्म प्रचलीत आहे. आचार-विचार, आहार- विहार, इत्यादी संबंधीचं मूल्यांवर आधारीत मार्गदर्शन असलेल्या ग्रंथांची भली मोठी तिजोरी असलेला हा आपला देश. बहुसंख्याक हिंदू. आणि जे अल्पसंख्याक म्हणून गणले जातात ते ही मुळातील ह्याच देशाचे. म्हणून सहिष्णुता पाळणार्या नागरिकांचीही संख्याही अधिक. हे ऐतिहासिक सत्य कोणीही नाकारू शकत नाही. Intolerance आणि Secularism हे शब्द आयात झालेले आहेत. गुण्यागोविंदाने राहणे ही परंपरा जिथे रूजली, तिथे असहिष्णुतेचं काटेरी झाड कोठे आणि कसे उगवेल? सतरा वेळा महमंद गझनीचा पराभव करून त्याला जीवदान देणारे पृथ्वीराज चौहान सारखे राजे ह्याच भूमीत जन्मतात. Excees of anything is poison ह्या निसर्ग नियमाचं भान भारतातल्या अनेक राजे महाराजांना राहिले नाही. सहिष्णुतेची वा चांगुलपणाची नशा, आपआपसातील वैर, फितूरी इत्यादी संबंधी मर्यादा जेव्हा जेव्हा ओलाडंली गेली, तेव्हा तेव्हा शक्तिमान असा आपला देश पारतंत्राच्या शृखंलात अडकला गेला. आजही "जियो और जिने दो" हे आपले ब्रीद परंतु जगातील बहुतांश देश आजही "जिवो जिवस्य जिवनाम्" ह्या तत्वाचंच आचरण करीत आहेत. आजही' बळी तो कान पिळी' हाच जगाचा न्याय दिसतो." अहिंसा परमो धर्मः"!. हे तत्व फार काळ उराशी बाळगता येत नाही. कारण" नायमात्मा बलहिनेन लभ्यता." " देवो दुर्बलो घातकः"! ही वचनें ही उपशिषदातील. दुर्बलांना ईश्वर भेटत नाही. देव म्हणतोय मी तुला दोन कर(हात) दिले आहेत. त्या हातातून काहितरी चांगलं कर. युध्दाच्या भयानक परिणामांची तीव्रता अर्जुनाला गोधंळवून टाकीत असताना भगवान श्रीकृष्णाने त्याला गीतोपदेश दिला. तस्मात उत्तीष्ठं कौतेंय असे म्हणत अर्जुनाचा क्षात्रधर्म जागविला. त्यातून सत्य आणि धर्माचा विजय झाला. येथे हे ही ध्यानात घेणे आवश्यक आहे कि युध्द हा शेवटचा पर्याय असतो. स्वतः भगवान श्रीकृष्णाने शांतीसाठी केलेली शिष्टाई फलद्रुप झाली नाही. म्हणून त्यांनी अर्जूनाला क्षात्रधर्माची आठवण करून दिली. शेवटी क्षात्रधर्म हा ही धर्माचं एक अंग आहे. हे विसरता येत नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लागलीच पाक पुरस्कृत टोळ्यांनी काश्मीरवर हल्ला केला तेंव्हा महात्मा गाधीजींनीही  लष्कर कारवाईला हिरवा कंदील दिला होता. आपला देश अणू-परमाणू सारख्या शस्त्राने सज्ज असला तरी केंद्रात कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी परमाणूचा प्रयोग संभाव्य युद्धात प्रथम करणार नाही, असेच आपले धोरण आहे. आणि ते आपल्या संस्कृती आणि सभ्यतेला साजेसंच आहे. 

आपले वैज्ञानिक आणि सेनादल देशाला सामरिक दृष्टया बलवान करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. आपण सामरिक रित्या बलवान होत आहोत. जेव्हा केव्हा आपला देश महसत्ता म्हणून उदयास येईल तेव्हा विविधता हे सृष्टीचं वैशिष्ट्य आहे, सहमती आणि सहजीवन हाच मानवाला निसर्गाचा संदेश आहे, आणि आपली जीवनपध्दत विश्वकल्याणकारी आहे हे जगाला पटवून देऊ शकतो. परंतू त्यासाठी सर्वात मोठं दायित्व हे राजकिय पक्षांवर आहे. राजकिय स्वार्थापोटी जाती-जमातीत भेदभाव वाढविण्याचे काम थांबविणे आवश्यक आहे. एखाद्या राजकिय विचारसरणीशी घट्ट चिकटून बसण्याचा हट्ट सोडून परस्पर सहमतीने, सर्व देशबांधवांना एका सुत्रात बांधून ठेवण्यासाठी वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. कुठल्याही परकिय देशाचा    प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या(विविध NGO साठी परदेशातून येणारी आर्थिक मदत) हस्तक्षेप आपल्या देशांतर्गत कारभारात होऊ नये हे पाहणं प्रत्येक राजकिय पक्षाची जबाबदारी आहे. आजच्या युगात विचारसरणी कुठली, जात कुठली, धर्म कुठला, आपली भाषा कुठली ह्या बाबी गौण आहेत. प्रत्येक प्रान्तामधील भाषेतील उत्कृष्ट साहित्यकृतीचं देशभरातील सर्व भाषातं अनुवाद होऊन देशभर प्रिय होईल असे प्रयत्न होणं गरजेचं आहे. प्रांता-प्रांतातील भाषेत समान अर्थाच्या म्हणी , वाक्प्रचार आहेत त्याचाही अभ्यास शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना देता येऊ शकतो. महाविद्यालयीन शिक्षणात परकिय भाषा ऐच्छिक विषय असू शकतो तर शेजार-पाजारील प्रांताची भाषा अभ्यासणं अडचणीची का वाटावी? नद्याचं पाणी वाटप असो वा धरणातून निर्माण होणारी वीज असो ह्याबाबत प्रांता-प्रांतातील वाद प्रत्येक वेळी न्यायालयातून सोडविण्याची गरज असते का? मग न्यायालय नसत्या विषयात हस्तक्षेप करते अशी ओरड राजकीय पक्षांनी का करावी ? When govt machinery fails , judiciary becomes proactive हे तर राज्यशास्त्रातील सुत्र आहे. अनेक धार्मिक सण-उत्सव ह्या मधील भाव वा धारणा ह्यात समानता दिसून येत असते. त्यावर भर देऊन, भले उत्सव साजरे करण्यातील भिन्नता असेल, वा उपासना पध्दत भिन्न असेल तरी, संपूर्ण समाज एकसंध होण्यात अडचण भासणार नाही. आपण एकाच देशाचे नागरिक आहोत ही भावना वाढविण्यासाठी सर्वच राजकिय पक्षात सहमती झाली तर एक सशक्त देश म्हणून आपण उदयास येऊ शकतो. शेवटी सामान्यजनांवर नेते मंडळींचा प्रभाव पडत असतोच. हे तर समाजशास्त्र आणि राज्यशास्त्रातील त्रिकालातीत सत्य. म्हणतात ना, "राजा कालस्य कारणाम् "! 

पुन्हा असहिष्णुतेचा मुद्दा!!


आजच्या जगाची व्याख्या करावयाची असल्यास आर्थिक जगत अशी केली तरी ती अतिशयोक्ती ठरत नाही. जगातील बहुतांश देशांनी आर्थिक उदारिकरण आणि जागतिकरण स्विकारले आहे. सरकार कुठल्या विचारसरणीच्या लोकांचे आहे ही बाब सर्वत्र गौण ठरली आहे. मग तो देश साम्यवाद्यांचा चीन असो कि समाजवादी भारत असो. सारं जग हे एक व्यापार केंद्र बनले आहे. संपूर्णतः भांडवलशाहीवादी आणि लोकशाही मानणार्या अमेरिकेचा  साम्यवादी आणि एक पक्षीय राजवट असलेल्या चीन  देशाशी  सर्वात जास्त व्यापार  आहे. अनेक वेळा सीमा प्रश्नावरून कुरापती काढणार्या साम्यवादी चीनसाठी आपला देश व्यापार क्षेत्रातील एक मोठा ग्राहक आहे. अलीकडे दोन्ही देशामध्ये डोकलाम ह्या सीमेवर तणाव निर्माण झाला होता. चीनची भाषा दिसामाशीं आक्रमक होत गेली. पुढे युद्धाची धमकी दिली . ह्याच काळात आपल्या पंतप्रधानांनी जगातील सर्वात छोटा परंतु अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सामरिक रित्या बलशाली आणि आक्रमक असलेल्या इजरायल देशाला भेट देऊन चीनच्या आक्रमकतेतील हवा काढली. आपल्या पंतप्रधानांनी दाखविलेला संयम आणि मुत्सद्दीपणा ह्या संबंधीचं जगभरातील अनेक देशांनी कौतुक केलं  

असहिष्णुतेचा मुद्दा चर्चीला जात असता, भारत-चीन ह्या दोन देशातील परस्पर संबंध तसेच आजचं आर्थिक जगत, ह्या विषयाचं प्रास्ताविक मी का मांडले असा प्रश्न आपल्याला पडला असावा. परंतु अलीकडे देशाच्या राजकिय पटलावर घडलेल्या घटनावर नजर टाकली तर त्यासंबंधी फारसं आश्चर्य वाटणार नाही. मूलतः चीन साम्राज्यवादी देश आहे. आणि आपल्या देशातील माओवादी नक्षलवाद्यांना फूस लावण्याचं काम चीनी राज्यकर्ते करीत असतात हे सर्वश्रुत आहे. गौरी लंकेशच्या हत्येनंतर काही अवधीतच काॅग्रेसचे उपाध्यक्ष श्री राहूल गांधी आणि मार्क्सवादी पक्षाचे नेते सिताराम येचूरी ह्यांनी तथाकथित असहिष्णुतेची पुंगी वाजवत गौरी लंकेशच्या हत्येत भाजपा आणि पंतप्रधान मोदींचा हात आहे असा आरोप केला. कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कुणाच्या हत्ये संबंधी दुसर्या पक्षाच्या नेत्यावर आरोप केला कि त्यात काही राजकिय खेळी असते. हे समजण्याइतकी भारतातील सामन्यातील सामान्य नागरीकालाही राजकिय जाण आहे हे निश्चीत. अलिकडे भारत-चीन सिमेवर युध्दजन्य स्थिती झालेली असताना आपले पंतप्रधान इजरायल देशाच्या दौर्यावर गेले होते. का तर चीनवर दबाव वाढविण्यासाठी तर दुसरीकडे राहूल गांधी रहस्यमयरित्या चीनच्या भारतातील दूतवासास भेटीला. का व कशासाठी ? ना काॅग्रेसला स्पष्टीकरण द्यावयाचं वाटलं, ना माध्यामांनी माहिती काढली. भारतीय कम्युनिस्ट पार्टी दुभंगली ह्याचं कारण रशिया आणि चीन ह्या साम्यवादी देशात मतभिन्नता झाली म्हणून. त्यामुळे सिताराम येचुरींनी (ज्यांच्या पक्षाचा ओढा रशिया ऐवजी चीनकडे असल्यामूळे) राहूल गांधीसोबत गौरी लंकेशच्या हत्येत मोदी सरकार आहे असा आरोप केला. राहुल गांधींना येचूरीनीं पाठींबा दिला कि येचूरींना राहुल गांधीनी पाठिंबा दिला. हा प्रश्न अनुत्तरीतच राहणार. येचुरीनीं  बंगालमधील निवडणुकीत काॅग्रेसशी घरोबा केल्यामुळे मार्क्सवादी पक्षात बवाल माजला आहे. न्यूज चॅनेल्स वरील राजकिय विषयावरील चर्चेत गौरी कधी दिसल्या आहेत, असे मला स्मरत नाही. असे असुनही  त्यांच्या हत्येसंबंधी आवेशपूर्ण चर्चा  न्युज चॅनेल्सवर  घडल्या. बहुतांश न्यूज चॅनेल्स आणि वृत्तपत्रांनी असहिष्णुता वाढत आहे, अशी हाकाटी मारावयास सुरूवात करून उजव्या विचारसरणीच्या मंडळीनां टारगेट केलं. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या देशातील माध्यमांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीला सतत सापत्न वागणूक कशी दिली, हे 'माध्यमातील सुत्र नावाचं अपत्य ' ह्या माझ्या लेखात मांडले आहे. केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर काही न्यूज चॅनेल्स पंतप्रधान मोदी आणि सरकारचं कौतुक करीत आहेत, नाही असे नाही. तरीही एकूण मिडीया व्यवसायातील आर्थिक उलाढाल, हितसंबंधी आणि गुंतवणूकदारांची यादी पाहता उजव्या विचारसरणीच्या मंडळीवर माध्यमें टिका करीत राहणार हे निश्चीत. मुद्दा मोदी सरकारवर टिका करण्याचा नाही. तो तर पत्रकार मंडळी आणि माध्यमांचा हक्कच आहे. परंतु जिथे काॅग्रेस पक्षाचं सरकार आहे अशा कर्नाटकात गौरी लंकेशची हत्या झाली असतांना तिथल्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारवयास हवा कि नको? गौरी लंकेशच्या हत्येसंबंधीची प्राथमिक स्तरावरील पोलीस चौकशी सुरू होण्याअगोदरच, राहूल गांधी आणि सिताराम येचूरीनीं न्यायधिशांच्या थाटात संघ आणि भाजपाला आरोपी कसं ठरविलं हा खरा मुद्दा आहे. सध्यातरी कुठच्याही शक्यतेचा अंदाज वर्तविणे हे उचीत नाही. परंतु राजकरणात अंधूक वातावरणातच शत्रू पक्षाला गारद करण्याची संधी मिळविण्याची घाई करणे फायद्याचं असतं. अशी समजूत सर्व राजकीय पक्षांची असते. परंतु पुष्कळदा तोंडघशी पडण्याची पाळी येते. ह्याचा विचार करायलाही वेळ काढायचा नाही ही राजकिय पक्षांची खोड आहे. आणि तोच प्रकार गौरी लंकेशच्या हत्येसंबंधी होत असताना दिसतोय.

मोदी सरकारनी अलिकडे तीन वर्षे पूर्ण केली. अनेक माध्यमातून २०१९ च्या लोकसभेत पुन्हा भाजपाचेच सरकार येणार आणि मोदीजी पुन्हा पंतप्रधानपदी असणार असा अंदाज वर्तविला जातो. विरोधी पक्षाकडे मोदींना टक्कर देऊ शकेल असा तोडीचा नेता नाही. जो नितिशकुमाराच्या रूपाने होता तो ही भाजपवासी झाला. राजकिय स्थिती इतकी मजबूत असताना एखाद्या फारशा नावाजल्या न गेलेल्या पत्रकाराची हत्या भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कार्यकर्त्याने केली असेल हे तर्काला धरून नाही. रक्तरंजित क्रांती हे संघ आणि भाजपाचं बोधवाक्य नाही. रशिया आणि चीन देशाचा अर्वाचीन इतिहासाकडे पाहता रक्तरंजित क्रांती ह्यावर विश्वास फक्त साम्यवादी विचारसरणीच्या लोकांचा असतो, भले अर्थकरणातं त्यांचा सपशेल पराभव झाला असला तरी. भारतातील समाजवादी तसेच काॅग्रेसची मंडळी (१९८४ दिल्लीतील शिखांची कत्तल वगळता) तशी नेमस्त. जर का भाजपा आणि संघावर आरोप करता येतो तर डाव्या विचारसरणीच्या पक्षावरही आरोप होऊ शकतो. चीन सारख्या साम्राज्यवादी देशाचं आपल्या देशात अस्थिरता निर्माण करण्याचं कृत्य म्हणजेच गौरी लंकेशची हत्या असा अंदाज भाजपाही मांडू शकतो. डाव्या विचारसरणीच्या पक्षात माजलेली दूही तसेच नक्षलवाद्यांमध्ये असलेले अंतर्गत भेद हे ही कारण गौरी लंकेशच्या हत्येच्या पाठीमागे असू शकते. कर्नाटकात पुढल्या वर्षी निवडणूका आहेत. अॅन्टी इनकंबन्सी फॅक्टर असणार. मोदी आणि भाजपाला अडचणीत आणू शकणारा खास मुद्दा विरोधी पक्षांकडे नाही. त्यामुळे डाव्या पक्षाच्या अतंर्गत झगड्यातून गौरी लंकेशची हत्या होणार असा सुगावा लागूनही कर्नाटकाच्या मुख्यमंत्री सितारमैय्यांनी गौरीला सुरक्षा पुरविण्यात हलगर्जीपणा दाखविला असण्याची शक्यता असू शकते. इत्यादी सारे  अंदाज मिडीयातील टाॅक शो मधूनच आपल्यापर्यंत आलेले आहेत. त्यात सत्यता किती, हे काळ ठरविल. प्रत्येक पक्षात टोकाची भूमिका घेणारे कार्यकर्ते आणि हमरीतुमरीवर येणारे प्रवक्ते असतात. त्यामुळे कुणा एका भाजपाच्या कार्यकर्त्यांने गौरीच्या हत्येसंबंधी 'असे घडणारच होतं ' अशी प्रतिक्रिया दिली म्हणून  भाजपा किंवा संघाला आरोपी ठरविता येत नाही. गौरीच्या हत्येनंतर  काही अवधीपूरताही  काॅग्रेसचे आणि मार्क्सवादीच्या राष्ट्रीय नेत्यांना संयम पाळता आला नाही तिथे भाजपाच्या सामान्य कार्यकर्त्याकडून संयमाची अपेक्षा कशी ठेवता येईल? मिडीयात कुठल्याही विषयांवरील चर्चेत आक्रास्तळेपणा दिसणं हे नित्याचं झालं आहे. आणि त्यालाच रंगतदार हे नाव प्राप्त झालं आहे. ही बाब दुर्दैवी असली तरी आपण पंडीत नेहरू, सरदार पटेल, बॅरिस्टर नाथ पै, डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी, डाॅ लोहिया आणि पं. दिनदयाळ उपाध्याय ह्यांच्या युगात राहात नाही. हे वास्तव स्विकारायला हवेच. मिडियातील चर्चा रंगत असतात. कुठपर्यंत रंगत राहतात? सांगता येत नाही. परंतु नवीन विषय मिळाला कि गौरी लंकेशच्या हत्येचा विषय बाद. आज हा लेख पूर्ण होईतो, मिडीयाला नवीन विषय मिळालेला ही असू शकतो. मुळात चौकशी कोणत्या एजन्सी मार्फत करावयाची ह्यावर कर्नाटक सरकार विचार करण्यासाठी वेळ घेणार. कारण त्यांचे श्रेष्ठी दिल्लीत बसतात. त्यानतंरच्या प्रकियाला वेळ किती लागणार ह्याचा अंदाज नरेंद्र दाभोलकर, पानसरे आणि कुलबुर्गी ह्यांच्या हत्येतील तपासात झालेल्या दिरंगाईवरून बांधता येतो. गौरीच्या हत्येसंबंधीचा प्राथमिक तपास पुर्ण होईपर्यंत कर्नाटकात नवीन सरकार येणार. जरी काॅग्रेस परत सत्तेवर आली तरी सितारमैय्या पुन्हा मुख्यमंत्री असतील हे सांगता येत नाही. त्यामुळे न्यायालयात खटला उभा राहिल्यानंतर अंतिम निकाल येईपर्यंत वाट पाहात बसणे. हया व्यतिरिक्त आपल्या हातात काही नाही. 

राहता राहिला प्रश्न तथाकथित असहिष्णुतेचा. सहिष्णुता हे हिंदू जीवनशैलीतील मूल्य. ह्यासंबंधी एक स्वतंत्र लेख ह्या लेखापाठोपाठ पब्लीश करीत आहे. काॅग्रेस, तृणमूल काॅग्रेस, आरजेडी, द्रमुक आणि डावे पक्ष ह्या सार्यांचा एक कलमी कार्यक्रम म्हणजे कुठेही हत्या घडली कि मोदींना ह्यात कसं गोवता येईल हाच आहे. असहिष्णुता, मुस्लिमांची असुरक्षिततेची भावना असे विषय घेत युपीएचे घटक पक्ष उगाच आपली शक्ती खर्च करीत आहेत. गुजरात मधील दंगलीपासून विरोधक मोदींना टिकेचं लक्ष्य करीत आहेत.परंतु त्यांच्या हाती काही गवसत नाही.उलटपक्षी मोदी अधिक बलवान होत आहेत. मोदी विरोधी कार्यक्रमात अलीकडे    उपराष्ट्रपतीपद ज्यांनी भुषविले असे हमीद अन्सारीही उतरले. मुस्लिमांना आजकाल असुरक्षितता वाटत आहे असं वक्तव्य आपला कार्यकाल संपताना करण्याची गरज होती का? सोशल मिडीयावर त्यांची खिल्ली उडविली जात आहे. आजच सोशल मिडीयावर 'अन्सारी साहेब, मुस्लिमांना भारतात असुरक्षित वाटत असल्यामुळे रोहिंग्या निर्वासितांना समजावून सांगा कि, येथे येऊ नका '. अशा अर्थाची पोस्ट व्हायरल झाली. स्वतः अन्सारींनी व्हायरल होत असलेली ही पोस्ट पाहिली तर त्यांना कळू शकेल की डाव त्यांच्यावर उलटला आहे. सध्या सर्वसामान्यांना सोशल मिडीयाचं शस्र गवसले आहे त्यातून मुत्सद्दी राजकिय नेत्याचीही मग तो नेता कुठल्याही पक्षाचा असला तरी विकेट पडते. विरोधासाठी विरोध हेच ध्येय ठेवत गेलात तर राजकरणात पराभवाशिवाय हाती काही लागत नाही. हे जितक्या लौकर विरोधी पक्षांना कळेल आणि त्यानुसार ते वागण्याचा प्रयत्न करतील तर ते त्यांच्या हिताचे ठरेल. सारे विरोधी पक्ष स्वतःच निर्माण केलेल्या चक्रव्युहात अडकत आहेत. आणि हे चित्र देशाच्या लोकशाहीसाठी चांगले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ विचारवंत म. गो. वैद्य ह्यांनी अलिकडेच माध्यमांकडे काॅग्रेसची भौमितिक पध्दतीने होणार्या घसरण संबंधी चिंता व्यक्त केली आहे. म. गो. वैद्यांनी राहूल गांधीना अपरिपक्व म्हटलं आहे आणि घराणेशाहीचा ठपक्यातून बाहेर येण्यासाठी दुसरी लायक व्यक्ती शोधावी असा मोलाचा सल्ला काॅग्रेसला दिला आहे. ह्यावर काॅग्रेसने विचार करावयास हवा. इतर सर्व विरोधी पक्षापेक्षा आजही गावपातळीवर बर्यापैकी काॅग्रेसचा बेस आहे. साम्यवाद्यांनीं काॅग्रेसला वेळोवेळी अडचणीत आणले. आपले पहिले पंतप्रधान पंडीत नेहरूनांही त्यांच्याच मंत्रिमंडळातील साम्यवादी विचारसरणीचे संरक्षण मंत्री कृष्ण मेनन ह्यांनी गोत्यात आणले आणि १९६२ मध्ये चीनशी युध्दात आपल्याला पराभव स्विकारयला लागला. अलिकडील चीनच्या अरेरावीत जी वाढ दिसली त्या पाठीमागे मार्क्सवादी पक्षाची चीनशी असलेल्या जवळीकीतून उत्पन्न झालेली राजकिय खेळी असू शकेल का?  देव जाणो. परंतुु  फितूरीचा रोग आपल्या समाजात पुर्वापार पासूनचा आहे ह्या सत्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.          

सध्यस्थिती अशी आहे कि साम्यवाद्यांच्या हातातून बंगालची  सत्ता गेलेली आहे. साम्यवाद ही कालबाह्य होत आहे. आणि त्या पक्षात केवळ वैचारिक गोंधळच नव्हे तर सोबत गटबाजी फार वाढली आहे. आणि ह्या गटबाजीला कधीही हिंसक वळण लागू शकेल. पक्षांतर्गत शह काटशहाचे खेळ करीत असताना त्या मंडळींतल्या विभिन्न गटांमध्ये एनकेन प्रकारे देशात अस्थिरता निर्माण करण्याची स्पर्धा सुरू झालेली असू शकते. कारण साम्यवाद पसरविण्यासाठी रक्तरंजित क्रांतीकारक मार्गच पत्कारावा  लागतो. परंतु तसला विचार आपल्या भूमीत फार काळ टिकत नाही. कारण आपल्या समाजाचा क्रांतीवर विश्वास नसतो. त्याची उत्क्रांतीवर श्रध्दा आहे. ही बाब माजी पंतप्रधान मनमोहनसिंग जाणून होते. म्हणून सरकारला डाव्यांचा पाठींबा असूनही त्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी अमेरिकेशी अणू-करार केला. काॅग्रेसला २००९ साली पुन्हा विजय   मिळण्यात हे ही एक कारण होते. डाव्या पक्षांनी मनमोहनसिंगाची बर्याच वेळा कोंडी केली. त्यामुळे मनमोहनसिंगबाबत मतदारांची सहानुभूती निर्माण झाली आणि काॅग्रेस पुन्हा सत्तेवर आली. परंतु काॅग्रेसला नेहमी वाटत असते कि त्यांना गांधी परिवारामुळे विजय मिळतो. आणि त्याचमुळे काॅग्रेसचा २०१४ च्या निवडणुकीत कधी नव्हता झाला असा दारूण पराभव झाला. काॅग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधीचे सल्लागार साम्यवादी आहेत कि काय अशी शंका येत आहे. काॅग्रेसला पुन्हा उभारी घ्यावयाची असल्यास त्यांनी लालूप्रसाद यादव आणि साम्यवाद्यांचा नाद सोडावा आणि शक्य असेल तिथे स्वबळावर निवडणूका लढवाव्यात. कारण राजकरणातही पुष्कळदा शार्टकट्स महाग पडतात. बिहारमधील महाआघाडीचा प्रयोग फसल्याचा महाअनुभव काॅग्रेसच्या नुकताच पदरी आलेला आहेच की.

बुधवार, ६ सप्टेंबर, २०१७

दुर्घटनांचा महिना व सरकारची हतबलता


उत्तराखंडासह उत्तर व ईशान्य भारतातील नद्यांना आलेला पूर, उत्तरप्रदेशमध्ये झालेला  रेल्वे अपघात, मुंबईसह महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी, काल- परवा मुंबईतील भेंडीबाजारात इमारत कोसळण्याची घटना, गोरखपूर आणि फारुकाबाद सरकारी रूग्णालयात झालेले बालकांचे मृत्यू इत्यादी घटनामूळे जवळपास गेला महिना दुर्घटनांचा म्हणावा लागेल. उत्पत्ती, स्थिती आणि लय हा सृष्टीचा नियमच आहे. जगभरातील प्रत्येक देशात दुर्घटना घडतच असतात. त्यातील काही घटना नैसर्गिक आपत्तीच्या प्रकारात मोडत असतात तर काही मानवाने आमंत्रित केलेल्या असतात. परंतु वित्त आणि जिवीतहानी दोन्ही प्रकारच्या आपत्तीत होत असते. फरक फक्त आपत्तीची तीव्रता किती आणि त्या संबंधी घेतलेली आगाऊ खबरदारी तसेच आपत्ती काळात प्रशासकीय पातळीवरून केलेला प्रतिकार किंवा निवारणासाठी केलेला प्रयत्न ह्यावर दोन्ही प्रकारच्या आपत्तीतील वित्त तसेच जीवीतहानीचं प्रमाण अवलंबून असते.

नैसर्गिक आपत्तीत निश्चितच वित्त व जीवीतहानीचं प्रमाण अधिक असते. आपत्ती नैसर्गिक वा मानवाने आमंत्रित केलेली असो, आपल्या देशात सर्वसामान्य नागरिक आपत्तीत सापडलेल्या देशबांधवांना मदत करीत असतात आणि तेही स्वयंस्पूर्तीतून. ही बाब आपल्यासाठी अभिमानाची आहे. परंतु त्याचं कौतुक केलं कि आपली जबाबदारीतून किंवा आपल्या कर्तव्यातून सूटका होते असा सत्ताधारी पक्ष समज करून घेतात, ही त्यांची घोडचूक होत असते. काल-परवा तुफान पावसात मुंबईवासियांची उडालेल्या त्रेधाची बारा वर्षापूर्वी झालेल्या पूरग्रस्त स्थितीशी आज तूलना होत आहे. बारा वर्षापूर्वी मुंबईत पडलेल्या पावसापेक्षा २९ ऑगस्टला पडलेला पाऊस कमी होता हे वेधशाळेने केलेल्या तूलनात्मक अभ्यासाअंती जगजाहीर झाले आहे. त्यामूळे मुंबईतील सत्ताधारी शिवसेनेच्या मताधिक्यात जी घसरण सुरू आहे ती आणखिन घसरत जाईल, हे निश्चीत. जसं २६ जूलैची घटना लोकांच्या स्मरणात आज ही दिसते तसेच २९ ऑगस्ट हा दिवस ही मुंबईतील मतदार पुढल्या पाच वर्षात स्मरणात ठेवणार नाही असे कसे म्हणता येईल? जाहिरातीद्वारें आपण कितीही आपली पाठ थोपटून घेतली तरी, सत्ताधारी पक्षाला नैसर्गिक वा मानव निर्मित आपत्तीमधील अपयशाची निदान आपत्तीत सापडलेल्या मतदारसंघ वा राज्यापूरता किंमत मोजावी लागतेच. मग ते मुंबईतील सत्ताधारी असो कि उत्तराखंडातील. आसामातील असो कि उत्तरप्रदेश. ह्याची जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना झालेली दिसत आहे, हे त्यांनी आपल्या मंत्रीमंडळात केलेल्या फेररचनेवरून दिसत आहे. Government has to deliver. हा सिध्दांत कुठल्याही प्रकारच्या राज्यप्रणालीचा श्वास असतो. If Government fails to deliver, it gets finished, how mighty it may. तसेच When Government machinery fails, Judiciary becomes proactive, wheather party in power does  like or not,  people welcome Judiciary's decession. इत्यादी सिद्धांतांची जाणीव असल्यामूळेच पंतप्रधान मोदीजींनी अनुभवी आणि कार्यक्षम नोकरशहांना आपल्या मंत्रीमंडळांत स्थान दिलं आहे.

देशाच्या पंतप्रधानांना जी जाणीव दिसली ती आसाम उत्तराखंड, व उत्तरप्रदेश येथील भाजपच्या सरकारातील मंडळीनां झाली आहे कि नाही ह्याबाबतची माहिती हाती आली नाही. तर दुसर्या बाजूला मुंबई महापालिकेतील शिवसेनाप्रणित सत्ताधार्यांनी सारा दोष निसर्गावर टाकून हात झटकले आहेत. वस्तुतः आपत्ती ही नैसर्गिक असली, तरी कमीत कमी त्यासंबंधींचं स्पष्टीकरण देताना साळसूदपणाचा आव आणू नये. प्रशासकीय चूकांची जबाबदारी झटकण्याची वृत्ती सरकारमधील मंडळीनां महागात पडत असते हा ही एक निसर्गाचा नियम आहे, ज्याचे नाव "करावे तसे भरावे " असं आहे. रेल्वेचे झालेले अपघात ही आपली जबाबदारी आहे असे मानून स्वतःहून पंतप्रधानांकडे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा तीन दिवस अगोदरच पाठवून देणारे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू ह्यांना असलेली नैतिकतेची चाड ही निश्चितच ह्या दुर्घटनांच्या महिन्यातील आपल्या लोकशाही राज्यप्रणाली संबंधी एक शूभ घटना मानावी लागेल. एखाद्या मंत्र्याने राजीनामा द्यावा आणि वरिष्ठाने तो फेटाळावा अशी नाटकं आपल्याला परीचित आहेत. श्री सुरेश प्रभू एक सनदशीर, बुद्धीवान, सौजन्यशील तसेच कल्पकतेने आणि चोखपणे काम करणारे व्यक्ती आहेत. ह्याबाबत कुणाचे दूमत होणार नाही. रेल्वेमधील गुतंवणूक वाढविण्यासाठी एलआयसीकडून मोठालं कर्ज मिळविले. जागतिक बॅंकेतूनही तीस बिलीयन डाॅलर कर्ज मंजूर करून घेतलं. रेल्वेची इजिनं, डबे, स्टेशन्समध्ये आधूनिकता आणण्याचे कार्य शिघ्र गतीने सुरू केलं. बिहारमध्ये फ्रान्समधील तसेच अमेरिकेतील कंपन्या द्वारे जवळपास पचवीस कोटी रूपये खर्च करून प्रोजेक्ट उभारले. भारतीय रेल्वेच्या इतिहासात इतकं परकिय भाडंवल आणून दूरदर्शीपणा अजूनपर्यंत एकाही रेल्वेमंत्र्याला जमलेलं नाही. रेल्वे विस्तारिकरण जे युपीए सरकारच्या २००९-२०१४ पाच वर्षात झालं त्याहून जवळपास ८५ टक्के अधिक विस्तारिकरण एका वर्षात सुरेश प्रभूनी करून आपली कार्यक्षमता सिध्द केली आहे. त्यांनी सिग्नल यंत्रणेची सुधारणा असो वा रेल्वेमधील कर्मचार्यांच्या भरतीमधील पारदर्शकता असो, वा महिलांवर होणार्या छळासंबंधीच्या घटना कमी करण्यासाठी आखलेली योजना, अशा अनेक कामांची यादी सविस्तर आकडेवारी सहित श्री अनुपम कांबळी ह्यांच्या वाॅलवर उपलब्ध आहे. रेल्वे खात्यामधील सचीव पातळीवर असलेल्या अधिकार्या पेक्षाही सुलभ रित्या मांडणी करणार्या श्री अनुपम कांबळींच्या अभ्यासासंबंधी कौतुकाचे शब्द आपोआप आपल्या ओठीं येतात. 

श्री प्रभूच्यां कामाचा तपशील येथे ह्यासाठी दिला कि तसं पाहिलं तर रेल्वे अपघातासाठी ते अप्रत्यक्षरित्याही जबाबदार ठरत नाहीत. कुठलंही सरकार अस्थिर करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे रेल्वे ट्रॅकवर थोडंफार उलटसुलट केलं कि नक्षलवादी, दशहतवादी, समाजकंटकांचं काम भागतं. श्री अनुपम कांबळीनीं आपल्या लेखात श्री प्रभूनीं रेल्वे खात्यातील नोकरशहा आणि ठेकेदारांनी संगनमताने इतकी वर्षे सुरू असलेली लूट e टेंडर पध्दतीने संपविली ; त्यामुळे ठेकेदारांनी घातापात घडवून आणल्याची शक्यता वर्तविली आहे. मूळात रेल्वेचा प्रचंड आवाका आणि देशाच्या कानाकोपर्यंत पसरलेलं जाळं पाहता रेल्वे मार्गावरील सुरक्षेचं काम फक्त रेल्वे पोलीसांपुरता न ठेवता संबंधीत राज्य सरकार, केंद्रीय गृहखातं तसेच इन्टीलींजन्स सर्विसेस ह्यांना ही जबाबदार धरायला हवं. नैसर्गिक आपत्तीत वेधशाळा, डिझाझस्टर मॅनेजमेंट, गृहखातं, पुनर्वसन खातं ह्यामधे एक कोआर्डीनेशन ठेवलं तर निदान जीवीत हानी तरी वाचू शकेल. तसेच विकास आराखडा आखतानाच पर्यावरणवाद्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उकल करणे हे सरकारचं काम असते. सरकारी रूग्णालयात ऑक्सीजनचा तुटवडा होणे आणि त्यातून बालकांचे प्राण गमाविणं ही अत्यंत क्लेशकारक घटना आहे. अशा घटना योगी सरकारचाही ऑक्सीजन पुरवठा खंडीत करणार नाही असे कसे म्हणता येईल? सरकार केंद्रातील असो वा राज्यातील, प्रजेचा ऐहीक विकास आणि सुरक्षा ही सरकारची प्राथमिक कर्तव्यें आहेत. ह्याचा विसर सरकार वा प्रशासनाला पडू नये. सबबी सांगत जबाबदारी झटकून टाकण्यार्यांनी हे ही लक्षात ठेवावे कि प्रत्येक वेळी जनता लाटेवर मतदान करीत नाही. इंदिरा गांधी, राजीव गांधी सोनिया गांधींच्या करिष्म्यावर अवलंबून राहणार्या काॅग्रेस पक्षाची होत असलेली घसरण आपण पाहात आहोतच. श्री नरेंद्र मोदींच्या करिष्मावर सतत अवलंबून राहणार्या भाजपाच्या राज्या-राज्यातील नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी वेळीच सावरून लोकहीताच्या कामातील दिरंगाई, हलगर्जीपणा दूर करणे तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात तत्परता आणि कार्यक्षमता सिद्ध करणे गरजेचं आहे. हाच ह्या दुर्घटनेच्या महिन्यातील  भाजपाला संदेशवजा इशारा आहे. 

वरील सर्व  दुर्घटनेत मृत्यू पावलेली बालकं, देशबांधव ह्यांच्या आत्म्यांना शांती लाभो तसेच त्याच्यां कुटुंबीयांना धक्यातून सावरण्याची शक्ती लाभो अशी प्रार्थना करतो.तसेच ज्या समाजबांधवांना दुखापत झाली आहे त्यांना लवकर बरं वाटावे अशी प्रार्थना करून हा लेख संपवितो. 

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...