चातुर्वण्यम् मया सृष्टी गुणकर्मविगागशः ह्या लेखात मी म्हटलं आहे कि विविधता हे सृष्टीचं वैशिष्ट्य आहे. निसर्गातील पंचमहाभूतें आप (जल), तेज ( प्रकाश) वायु, आकाश आणि पृथ्वी इत्यादीचीं कार्ये आणि वैशिष्टे ही भिन्न आहेत. आपल्याला ज्ञात असलेल्या ग्रहांचे आकारमान, गती, कक्षा, गुरूत्वाकर्षण ह्यातही भिन्नता आढळते. मानवी शरीर हे पंचमहाभूतांचे बनलेले असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं शरीर, त्याचे मन, त्याची बुद्धी, दुसर्या व्यक्तीचं शरीर, मन, बुद्धी पेक्षा भिन्न असते. आपल्या जन्मदात्या आई-वडीलांच्या जनुकामुळे काही अंशी अनुवांशिक गुण, स्वभाव, रंग,रूप ह्यात साधर्म्य आढळत असले तरी एकंदरीत प्रत्येक व्यक्तीचं एक स्वतंत्र अस्तित्व असते. त्यातूनच पुढे व्यक्ती तितक्या प्रकृती, जशी दृष्टी तशी सृष्टी, जशी बुध्दी तशी कुवत इत्यादी नियम अस्तित्वात आले असावेत. कुवत म्हणजेच गुण. जसे गुण तसे कर्म आणि कर्म तसे फल. त्यातून विभागणी म्हणजे वर्ग असावेत. परंतु मूळ सत्य हे कि विविधता हेच विश्वाचे वैशिष्ट्य. आणि त्या विविधतेतील चैतन्य म्हणा वा ऊर्जा ते एकच. आणि तेच तत्व विसरले गेले आणि केवळ आपल्या देशात नाही तर जगातील प्रत्येक देशात. इतर देशातही वेळोवेळी समाजव्यवस्थेत काहीना काही स्वरूपात भेदाभेद निर्माण झालेले दिसून येतात. ह्याचं मूळ कारण माणसामध्ये श्रेष्ठत्व दाखविण्याची असलेली ऊर्मी. त्यामुळे कालच्या जगात संघर्ष होता. आजही आहे. आणि भविष्यातही राहणार असेच दिसते.
ही सृष्टी निर्माण होण्यामागे कुठलीतरी एक शक्ती आहे. त्या शक्तीचं स्वरूप कसे? तर ' जशी दृष्टी तशी सृष्टी ' ह्या नियमाचेच वेष्टन असलेले. त्यामुळे तिथेही भिन्नता निर्माण झाली. त्यातून विविध धर्म, पंथ, संप्रदाय निर्माण झाले. ज्यांनी ज्यांनी त्या शक्तीच्या स्वरूपाचं वर्णन केले त्यांना ईश्वराचा पुत्र, दूत, प्रेषीत वा त्या त्या धर्माचे पंथाचे संस्थापक मानले गेले. पुढे मध्ययुगीन काळात दुर्दैवाने त्यात श्रेष्ठता आणि कनिष्ठतेचा वाद विकोपाला जात युध्दे झाली. त्यालाच क्रुसेडेस म्हटलं गेलं. मानवाने मानवाचेच रक्त सांडले. एवढ्याने भागले नाही. मग बाटवा-बाटवी, सक्तीने धर्मातंर, साम्राज्यवादाची लालसा असे प्रकार घडले. आणि त्याची परिणती विनाशकारी दोन महायुध्दात झाली.
आज बहुतांश देश स्वतंत्र असले तरी साम्राज्यवादी अपप्रवृत्ती, धार्मिक उन्माद शिल्लक आहेतच. आज जे काही प्रमुख धर्म आहेत त्या सर्व धर्मांना संस्थापक आहेत. हिंदू धर्माला कोणी संस्थापक नाही. वर उल्लेख केलेल्या अपप्रवृत्ती आणि क्रुसेडस ह्याचें जनक इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म मानणारेच. हे ऐतिहासिक सत्य आहे. या उलट हिंदू धर्म हा सहनशिलता आणि संयमाची शिकवण देणारा. तसेच more inclusive. येथे प्रत्येकाच्या मताला, विचाराला मान आहे. येथे धर्म आणि देव न मानणार्यांनाही सन्मान दिला जातो. कारण येथे कर्म चांगले असणे महत्वाचे मानले जाते. हिंदू ही एक जीवनपध्दत आहे. असा आपल्या सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आहे.
वस्तूतः हिंदू धर्माचं स्वरूप कसं आहे? "नाही जन्म, नाही नाम! नाही कोणी माता, नाही कोणी पिता ! नाही कुठला एक ग्रंथ प्रमाण, नाही एक भाषा प्रमाण ! नाही कुठला एकच देव, नाहि कुठला एकच सण! विविध देव - देवता , विविध वेषभूशा ! विविध पुजा-अर्चा, विविध उपासना !" एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति! इतकी व्यापक देवाची व्याख्या आपल्या शास्त्रकारांनी केलेली आहे. सत्य हाच ईश्वर अशी आपली उपनिषदें मानतात. छांदोग्य उपनिषदात सत्य म्हणजे काय हे ही मांडले आहे. सत्य हा शब्द स, ति आणि य ह्या तीन मात्राने बनलेला आहे. स म्हणजे सत् अर्थात अविनाशी; म्हणजे ईश्वर, सृष्टीचे कारण. ति म्हणजे नाशिवंत. अर्थात सृष्टी. म्हणजेच कार्य. ह्यांचा योग म्हणजे जुळणी य ने झाली. आणि सत्य झाले. कोणत्याही प्रसंगीं कारण आणि कार्ये ह्यांचा संबंध यथार्थाने ओळखणे म्हणजे सत्य होय. ही व्याख्या विज्ञानालाही शोभून दिसते. उपनिषदांना भौतिक विज्ञानाचे वावडे नाही. विज्ञानाचेच काय कुठल्याही विषयाचे वावडे नाही. उपनिषदे अंत्यत स्पष्टवक्तीं आहेत. ऐहिक आनंदाची श्रेष्ठतम प्रचिती जननेंद्रियेनेंच घेता येते इथपर्यंत स्वच्छ विधानें आहेत. त्यात अर्थशास्त्र आहे, कामशास्त्र आहे. शेतकीशास्त्र शिक्षणशास्त्र, सृष्टीशास्त्र , विज्ञान, सारं काही आहे.
'एक तत्व नाम 'ही सुध्दा उपासना. कर्म करीत असता ईश्वराच्या नामाचं स्मरण केलं तरी ती उपासनाच होय. येथे केरसुणीची पूजा होत असते. तसेच वृक्षाचे पूजन होत आलेले आहे. जे जे मानवी जीवनाला कल्याणकारक ते सारे पूजनीय असेच मानले जाते. यत्किंचित प्राणी, पक्षी सारे ईश्वरमय.' जे जे भेटीले भूत ते ची भगवंत'. चराचर सृष्टीत ईश्वर सामावलेला आहे.' इशावास्यम् इदं सर्वम् '! हे उपनिषदातींल वचन. अनादि काळापासून ह्या धर्माचं अस्तित्व. रामनाम महात्म्यामध्ये म्हटलं आहे, बीजं धर्म मूलस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम् !! अर्थ असा आहे, श्रीराम हे धर्मरूपी वृक्षाचे बीज आहे. असे हे श्रीराम नाव तुम्हांला वैभव व सुख प्रदान करो. ह्या ठिकाणी धर्म म्हणजे वैश्विक धर्म असेच आपल्या शास्त्रकारांना अपेक्षित आहे. म्हणून सर्वे भवन्तु सुखीनः ! सर्वे सन्तु निरामया! अशी प्रार्थना आपल्या येथे वैदिक काळापासून आजतागात म्हटली जात आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे पासयदान ही सुध्दा वैश्विक प्रार्थना. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत आपण स्वतः मानवी अवतार केव्हा घेतो ह्या संबंधी म्हटले आहे,कि
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ! धर्माची ग्लानी म्हणजे सदाचारणाचा अभाव, नीती मूल्यांची अवहेलना. पुढे भगवंतांनी म्हटले आहे, परित्राणायम् साधूनाम्, विनाशाय च दुष्कृताम् ! धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे !! साधु-सज्जनांच्या रक्षणासाठी आणि अधर्म कृत्ये करणार्यांचा नायनाट करण्यासाठी आणि धर्मतत्वांची पुन्हा प्रतिष्ठापनाकरितां मी युगा-युगात अवतार घेत असतो. येथेही हिंदूधर्म असा उल्लेख दिसत नाही .धर्म म्हणजे सदाचारण, सामंजस्य, सत्य, सहकार, सहमती, सहजीवन आणि सख्य हाच अर्थ मांडलेला दिसतोय. "जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला" हीच भगवंतांच्या भक्ताची व्याख्या. त्या व्यक्तीचा भगवंत कुठला हा प्रश्नच गौण. आजकाल मानवता धर्माचा जो वांरवांर उल्लेख सर्वत्र होत आहे, त्याही पलीकडे जाऊन म्हणजे प्राणीमात्रांच्याही हिताचा , सुखाचा, आणि पर्यावरणाचा विचार जिथे मांडला गेलेला आहे , ती आपली संस्कृती. मग त्याचं नाव भारतीय संस्कृती म्हणा वा हिंदू संस्कृती. आपल्याच देशाचीच ती संस्कृती. अशा संस्कृतीत ज्यांच पोषण झालेलं आहे, त्यांनी इतर धर्मियांच्यावर जबरदस्तीने वा धाकातून छळ केलेला आहे असे वाचनात आले आहे का? वैदिक काळापासून आपल्या येथे ' समाजाची धारणा करतो, तो धर्म' हे धर्माचे स्वरूप राहिलं आहे. त्यामुळे पुत्रधर्म, पिताधर्म, माताधर्म, अतिथीधर्म, गुरूधर्म, शिष्यधर्म, शरीरधर्म, सेवाधर्म, शेजारधर्म, दानधर्म, नीतीधर्म, संन्यासधर्म अशा अनेक संज्ञाने व्यापलेला असा शाश्वत धर्म प्रचलीत आहे. आचार-विचार, आहार- विहार, इत्यादी संबंधीचं मूल्यांवर आधारीत मार्गदर्शन असलेल्या ग्रंथांची भली मोठी तिजोरी असलेला हा आपला देश. बहुसंख्याक हिंदू. आणि जे अल्पसंख्याक म्हणून गणले जातात ते ही मुळातील ह्याच देशाचे. म्हणून सहिष्णुता पाळणार्या नागरिकांचीही संख्याही अधिक. हे ऐतिहासिक सत्य कोणीही नाकारू शकत नाही. Intolerance आणि Secularism हे शब्द आयात झालेले आहेत. गुण्यागोविंदाने राहणे ही परंपरा जिथे रूजली, तिथे असहिष्णुतेचं काटेरी झाड कोठे आणि कसे उगवेल? सतरा वेळा महमंद गझनीचा पराभव करून त्याला जीवदान देणारे पृथ्वीराज चौहान सारखे राजे ह्याच भूमीत जन्मतात. Excees of anything is poison ह्या निसर्ग नियमाचं भान भारतातल्या अनेक राजे महाराजांना राहिले नाही. सहिष्णुतेची वा चांगुलपणाची नशा, आपआपसातील वैर, फितूरी इत्यादी संबंधी मर्यादा जेव्हा जेव्हा ओलाडंली गेली, तेव्हा तेव्हा शक्तिमान असा आपला देश पारतंत्राच्या शृखंलात अडकला गेला. आजही "जियो और जिने दो" हे आपले ब्रीद परंतु जगातील बहुतांश देश आजही "जिवो जिवस्य जिवनाम्" ह्या तत्वाचंच आचरण करीत आहेत. आजही' बळी तो कान पिळी' हाच जगाचा न्याय दिसतो." अहिंसा परमो धर्मः"!. हे तत्व फार काळ उराशी बाळगता येत नाही. कारण" नायमात्मा बलहिनेन लभ्यता." " देवो दुर्बलो घातकः"! ही वचनें ही उपशिषदातील. दुर्बलांना ईश्वर भेटत नाही. देव म्हणतोय मी तुला दोन कर(हात) दिले आहेत. त्या हातातून काहितरी चांगलं कर. युध्दाच्या भयानक परिणामांची तीव्रता अर्जुनाला गोधंळवून टाकीत असताना भगवान श्रीकृष्णाने त्याला गीतोपदेश दिला. तस्मात उत्तीष्ठं कौतेंय असे म्हणत अर्जुनाचा क्षात्रधर्म जागविला. त्यातून सत्य आणि धर्माचा विजय झाला. येथे हे ही ध्यानात घेणे आवश्यक आहे कि युध्द हा शेवटचा पर्याय असतो. स्वतः भगवान श्रीकृष्णाने शांतीसाठी केलेली शिष्टाई फलद्रुप झाली नाही. म्हणून त्यांनी अर्जूनाला क्षात्रधर्माची आठवण करून दिली. शेवटी क्षात्रधर्म हा ही धर्माचं एक अंग आहे. हे विसरता येत नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लागलीच पाक पुरस्कृत टोळ्यांनी काश्मीरवर हल्ला केला तेंव्हा महात्मा गाधीजींनीही लष्कर कारवाईला हिरवा कंदील दिला होता. आपला देश अणू-परमाणू सारख्या शस्त्राने सज्ज असला तरी केंद्रात कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी परमाणूचा प्रयोग संभाव्य युद्धात प्रथम करणार नाही, असेच आपले धोरण आहे. आणि ते आपल्या संस्कृती आणि सभ्यतेला साजेसंच आहे.
आपले वैज्ञानिक आणि सेनादल देशाला सामरिक दृष्टया बलवान करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. आपण सामरिक रित्या बलवान होत आहोत. जेव्हा केव्हा आपला देश महसत्ता म्हणून उदयास येईल तेव्हा विविधता हे सृष्टीचं वैशिष्ट्य आहे, सहमती आणि सहजीवन हाच मानवाला निसर्गाचा संदेश आहे, आणि आपली जीवनपध्दत विश्वकल्याणकारी आहे हे जगाला पटवून देऊ शकतो. परंतू त्यासाठी सर्वात मोठं दायित्व हे राजकिय पक्षांवर आहे. राजकिय स्वार्थापोटी जाती-जमातीत भेदभाव वाढविण्याचे काम थांबविणे आवश्यक आहे. एखाद्या राजकिय विचारसरणीशी घट्ट चिकटून बसण्याचा हट्ट सोडून परस्पर सहमतीने, सर्व देशबांधवांना एका सुत्रात बांधून ठेवण्यासाठी वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. कुठल्याही परकिय देशाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या(विविध NGO साठी परदेशातून येणारी आर्थिक मदत) हस्तक्षेप आपल्या देशांतर्गत कारभारात होऊ नये हे पाहणं प्रत्येक राजकिय पक्षाची जबाबदारी आहे. आजच्या युगात विचारसरणी कुठली, जात कुठली, धर्म कुठला, आपली भाषा कुठली ह्या बाबी गौण आहेत. प्रत्येक प्रान्तामधील भाषेतील उत्कृष्ट साहित्यकृतीचं देशभरातील सर्व भाषातं अनुवाद होऊन देशभर प्रिय होईल असे प्रयत्न होणं गरजेचं आहे. प्रांता-प्रांतातील भाषेत समान अर्थाच्या म्हणी , वाक्प्रचार आहेत त्याचाही अभ्यास शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना देता येऊ शकतो. महाविद्यालयीन शिक्षणात परकिय भाषा ऐच्छिक विषय असू शकतो तर शेजार-पाजारील प्रांताची भाषा अभ्यासणं अडचणीची का वाटावी? नद्याचं पाणी वाटप असो वा धरणातून निर्माण होणारी वीज असो ह्याबाबत प्रांता-प्रांतातील वाद प्रत्येक वेळी न्यायालयातून सोडविण्याची गरज असते का? मग न्यायालय नसत्या विषयात हस्तक्षेप करते अशी ओरड राजकीय पक्षांनी का करावी ? When govt machinery fails , judiciary becomes proactive हे तर राज्यशास्त्रातील सुत्र आहे. अनेक धार्मिक सण-उत्सव ह्या मधील भाव वा धारणा ह्यात समानता दिसून येत असते. त्यावर भर देऊन, भले उत्सव साजरे करण्यातील भिन्नता असेल, वा उपासना पध्दत भिन्न असेल तरी, संपूर्ण समाज एकसंध होण्यात अडचण भासणार नाही. आपण एकाच देशाचे नागरिक आहोत ही भावना वाढविण्यासाठी सर्वच राजकिय पक्षात सहमती झाली तर एक सशक्त देश म्हणून आपण उदयास येऊ शकतो. शेवटी सामान्यजनांवर नेते मंडळींचा प्रभाव पडत असतोच. हे तर समाजशास्त्र आणि राज्यशास्त्रातील त्रिकालातीत सत्य. म्हणतात ना, "राजा कालस्य कारणाम् "!