स्वतंत्रता ही प्रायः सर्व प्राणीमात्रांना प्रिय असते. ती तर एक स्वाभाविक, नैसर्गिक भावना आहे. जगभरातील अनेक तत्ववेत्त्यांनी, साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीतून स्वातंत्र्याची महती वर्णन केली आहे. त्या सार्या वर्णनांतून मतितार्थ काढावयाचा म्हटला तर स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या तंत्राने वागणे. यातील स्व म्हणजे मी,स्वतः आपण,स्व म्हणजे सर्व शरीराचे अधिष्ठान,स्व म्हणजे कर्तृत्वशक्तीचे मूळपीठ. तंत्र म्हणजे रीती, नीती, किंवा पध्दती; तंत्र म्हणजे यमनियमांची बंधने; तंत्र म्हणजे विधिनिषेधात्मक आदेश; तंत्र म्हणजे धारणेसाठी निश्चित केलेली बंधने. हा झाला स्वातंत्र्याचा शब्दशः अर्थ. भगवंतांनी अठराव्या अध्यायात अर्जुनाला उपदेश देताना शेवटी म्हटलं,
"इति ते ज्ञानम् आख्यातं गुह्यात गुह्यतरम् मया|
विमृश्य एतत अशेषेणे यथेच्छसि तथा कुरू||
"अर्जुना, याप्रमाणे सर्व ज्ञानातील गुह्यातील गुह्य ज्ञान मी तुला सांगितले. याचा पूर्ण विचार कर. मग तुझ्या इच्छेस जे येईल तें कर". ह्याचा अर्थ भंगवतं ह्या ठिकाणी अर्जुनाला त्याच्या इच्छेनुसार कृती करण्याचं स्वातंत्र्य देत आहेत असे दिसते. ह्यावरून असेही म्हणता येते कि स्वातंत्र्य ही केवळ नैसर्गिक भावनाच नसून ती ईश्वराची देणगीच आहे.
आता प्रश्न असा पडत असतो कि आपण किती स्वतंत्र आहोत. असे म्हटले जाते कि प्रत्येक माणसात दोन मनें विराजमान असतात. बाह्य मन आणि अंतरमन. कुठलीही कृती (दैनंदिन शरीरधर्माचे नैसर्गिक विधी सोडून) करताना बर्याच वेळा करू कि नको अशी स्थिती आपली होत असते. एक प्रकारचे द्वंद्व सुरू असते. मनच ते, लहरी असतेच. ते आपली बुध्दी स्थिर करू देत नसते. अशा द्विधा अवस्थापुरता तरी आपण सारे अर्जुनच. असे, व पू काळे म्हणतात ते पटते. पण आपल्याला साथ देण्यासाठी पार्थसारथी नसतो ना. हीच मोठी पंचाईत. मग वाटते कर्मत्याग करावा. प्रपंचाचे सगळे पाश सोडावेत. माझ्या शालेय जीवनात मराठी विषयाच्या पुस्तकात "मृत्यू ते म्हणती सबूर" अशी एक कवीता होती. त्या कवितेचं पहिलं चरण असे होते.
"मृत्युते जन बाहतात परि ते भोगास वैतागुनी|
मृत्युते म्हणती सबूर परि ते ना स्वार्थ वृत्तीमूळी||
शेवटचं चरण खालील प्रमाणे आहे,
पाहोनी चिमणी पिला भरविते आणोनी चारामुखी|
आपोआप मनात बोल ऊठले मृत्यू येऊ नको की||"
खरंच बंधनं सुटता सुटत नाही. मग वाटते कसले हो आपण स्वतंत्र? परंतु इथेच आपण स्वातंत्र्याचा अर्थ समजण्यात अनर्थ करीत असतो. स्वातंत्र्य म्हणजे बंधने,आणि ती ही स्वतःवर घालून घेतलेली. बंधने जिथे नाहीत तिथे सत्कार्य कसे असणार. मग तो स्वैराचारच की. आकाशात स्वैर विहार करणारे पक्षी खरेखुरे स्वतंत्र, असे वाटते. पण आपण हे लक्षात घेत नाही कि आकाशात स्वैर विहार हा पक्षांचा स्वाभाविक स्थायीभाव. ते अन्न कुठून आणि कसे गोळा करणार? आपल्या लक्षात हे ही येत नाही कि आणलेले अन्न साठवून ठेवण्याचं स्वातंत्र्य त्यांना आहे का? पावसाचे पाणी डोंगरमाथ्यावर पडते आणि बारा वाटांनी वाहू लागते. त्यामुळे त्याचा काही उपयोग होत नसतो. पण तेच पाणी विशिष्ट पात्रातून वाहू लागले, त्याला तटाघाटांची बंधने आली कि उपयोगी पडते. त्याला शक्तीचे रूप प्राप्त होते. आकाशात स्वैर विहार करणारी वीज तारांच्या बंधनात बांधली गेली तरच घरीदारी उपयोगी ठरते. देहाचे बंधन आहे म्हणून आत्मा विविध प्रकारची कार्यें करीत असतो. प्रत्यक्ष परेमेश्वरदेखील, त्याने स्वतःवर घेतलेल्या मायेच्या आवरणामूळे तो आपल्याला भासमान होतो. त्याच्या मायेतच त्याचे कर्तृत्व आहे.
जे प्राणी मनुष्याच्या अधीन नाहीत, ते ही स्वतंत्र नाहीत, परतंत्र आहेत. रानात मुक्तपणे चरणार्या हरिणांना ज्या वेळी जो चारा मिळेल तो खावा लागतो. त्यांना आपल्याला हवा तसा चारा निर्माण करता येत नाही ना निकडीच्या वेळेसाठी साठवता येतो. वाघ, सिंह इत्यादी हिंस्त्र पशू मोठे बलवान असतात. पण जे प्राणी तावडीत सापडतील त्याचेंच मांस त्यांना खावे लागते. हवे ते खाद्य नेहमी मिळत रहावे, या दृष्टीने वाघसिंहांनी हरिणालये, शूकरालये किंवा शशकालये चालविल्याचे कधी दिसले नाही. आपल्याला काय हवे ह्याची जाणीव होणे आणि ते निर्माण करण्याची बुध्दी, क्षमता फक्त मनुष्यात. म्हणून तो खरा स्वतंत्र. जो स्वतःच्या इच्छेने, स्वतःसाठी किंवा दुसर्यासाठी वागतो , खपतो आणि मरतो तो मनुष्य.
परमेश्वराला ताब्यात ठेवील, बंधनात जखडील, नियमांनी बांधील असा या जगात कोण आहे? अर्थात कोणीच नाही. पण त्या सर्वशक्तीमान परमेश्वराने स्वेच्छेनेच स्वतःहाला नियमबद्ध केले आहे. चंद्राच्या उमलत्या कला पाहा, की प्रचंड ग्रहगोलांची परिभ्रमणे पाहा; समुद्राची भरतीओहटी असो;सर्वत्र व्यवस्था आहे नियम आहेत. परमेश्वराच्या सर्व कृती त्याच्या स्वतःच्याच नियमांनी नित्य बांधलेल्या आहेत. म्हणूनच तो परमेश्वर स्वतंत्र आणि स्वयंभू असे आपण मानतो. 'हृषीकेश ' म्हणजे इंद्रियांचा स्वामी, 'वृषकर्मा ' म्हणजे धर्ममय कामे करणारा, 'नियमः' म्हणजे स्वतः नियमाने वागणारा व सगळ्या प्रजेला नियमांनी वागवणारा, 'यमः' म्हणजे आतून, स्वतःचे आणि सर्व जगाचे नियंत्रण करणारा, अशी जी परमेश्वराची सुप्रसिद्ध अभिधाने आहेत ती सर्व स्वतंत्रतेचेच स्वरूप दर्शवितात.
जन्म आणि मृत्यू ह्याबाबतीत आपण स्वतंत्र नसतोच. कोणाच्या पोटी आपला जन्म होणार तसेच कुठे, केव्हा, आणि कसा आपला मृत्यू होणार हे ही आपल्याला ठाऊक नसते. एक प्रौढ गृहस्थ रस्त्याच्या कडेला पायी चालत असता पाठीमागून भरधाव वेगाने येणार्या ट्रकचं चाक पन्नास फूट दूर असताना निखळून गरगर करीत नेमक्या त्या प्रौढ गृहस्थाला पाठीमागून धडक देते. आणि तो गृहस्थ खाली पडतो,अशाच जागेवर जिथे एक अणुकूचीदार दगड होता त्यावर त्याचे डोक आपटले जाते आणि मृत्यूमुखी पडतो. कधीही शेअर बाजाराच्या इमारतीत न गेलेला माणूस त्याच्या मालकाच्या कामासाठी शेअर बाजाराच्या इमारतीत प्रवेश करतो आणि तेव्हाच बाॅम्ब स्पोट घडतो आणि प्राण गमावितो. भूकंप होतो; सार्या मोठमोठ्या इमारती पडतात आणि तिथे खचाखच पडलेल्या डबरीत छोटं बाळ सुरक्षित सापडते. पुष्कळदा आपण पाहतो, साथींच्या दिवसात किंवा काही दुर्घट घटनेमुळे आई वडीलांना स्वतःच्या मुलाचा/मुलीचा मृत्यू पहावा लागतो. मृत्युला क्रम नसतो. हेच सत्य. म्हणूनच आद्यवाल्मीकी गदिमा म्हणतात, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातात नसतात म्हणून जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात दैवावर विश्वास ठेवणं समर्थनीय ठरत नसतं. अपयश पदरी पडल्यानंतर निराश अवस्थेत राहणे ही सुध्दा आपलं स्व स्वतःहून गमाविण्यासारखे आहे. उत्साह म्हणजे जीवन तर नैराश्य म्हणजे मृत्यू. उत्साह म्हणजे स्वतंत्रता, नैराश्य म्हणजे पारतंत्र्यता.
नैराश्याची कारणे विविध असली तरी जगरहाटी स्विकारताना जे दंद्व आपल्या मनात असते, ते आपण स्वतः सोडवावयाचं असते. "आपणच आपले न्यायाधीश" हेच आपण विसरतो. म्हणजेच आत्मपरिक्षण करीत नाही. श्रीमंत लोक घरातील लग्न कार्यादि सारख्या मंगल कार्यात जसा खर्च करतात, तसा बेताची आर्थिक स्थिती असलेल्यांनी करण्याची गरज असते का? त्याने अंथरूण पाहूनच हातपाय पसरावयाचे असतात. "आपणच आपल्या जिवनाचे शिल्पकार" असे सुप्रसिद्ध वचन आहे. आपल्याला लागणार्या वस्तू विकत घेणं, करिअर निवडणं, व्यवसाय निवड व तो वृदिगंत करणं, इत्यादी बाबतीत वरील वचन सतत ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर बेडकी बैलासारखी फुगण्याचा प्रयत्न करते तशी आपली फसगत होऊ शकते. तसेच Excess of anything is poison. हा ही सिध्दांत सतत ध्यानी ठेवणं महत्वाचं असतं. व्यक्ती तितक्या प्रकृती हे त्रिवार सत्य. आपल्या शरीराचा पिंड, मनाची बैठक, आवड इत्यादी गोष्टी कशा आहेत त्यावरून आपला आहार, विहार साभांळावेत. दुसर्याचं अनुकरण करणे म्हणजे गुलामीच की. स्वतंत्रता म्हणजे आपण स्वतःच निर्माण केलेल्या पध्दतीचं अनुसरण आत्मानुसंधान, आत्मप्रगटीकरण; स्वतंत्रता म्हणजे मी माझ्या विचाराने ठरविलेल्या गोष्टीचे आचरण. स्वतंत्रता म्हणजे दुसर्याचा विचार न करणे असे बिलकूल नाही. ज्या समाजात राहतो त्यासंबंधीची बांधिलकी झूगारून देणे म्हणजे स्वैराचार. सामाजिक बाधिलकी जपणे, आपल्या देशातील कायदे, आपल्या देशाचं संविधान, ह्यावरील निष्ठा ढळू न देणे, जीवन जगत असता समाजाप्रती, देशाप्रती असलेली कर्तव्ये जो पाळतो तो खरा स्वतंत्र. सारं काही दैवावर सोडून आपले नियत कर्माला सोडचिठ्ठी देणे म्हणजे गुलामी. ह्या सार्या विषयांवर "सामाजिक बांधिलकी '', "आपली वाणी आपलं यश", "आपल्यातील देव", "देशभक्ती नारेबाजीत नव्हे अंतःकरणी असावी ", " आषाढी एकादशीच्या निमित्ताने " इत्यादी लेखात मी चर्चा केलीली आहे. म्हणून पुनरावृत्ती टाळीत आहे. फक्त इतकचं सांगावयाचे वाटते कि व्यक्तीसुख आणि व्यक्तीस्वातंत्र्य या गोष्टी अत्यंत इष्ट आणि फार महत्वाच्या असल्या तरी त्या सुखाला आणि स्वातंत्र्याला इतरांच्या सुखाची आणि स्वातंत्र्याची बंधने असतातच. नाहितर रशियात राज्यक्रान्तीनंतर घडलेल्या एका गोष्टीतल्या बाईसारखी समाजाची स्थिती होते. तिथल्या राज्यक्रांतीनंतर माणसांनी आणि वाहनांनी गजबजलेल्या माॅस्कोच्या रस्त्यावरून एक बाई अगदी मधून हवी तशी चालू लागली .पोलिसांनी कडेने चालण्याची सूचना दिली तर ती चक्क म्हणाली, "आता मी स्वतंत्र झाले आहे. मी हवी तशी चालणार! तूम्ही कोण मला हुकूम देणार? मी स्वतंत्र आहे ". ही गोष्ट दोन तीन ठिकाणी माझ्या वाचनात आली आहे. म्हणजे खरी असावी. आपल्या देशात ही अशा प्रकारच्या घटना घडत असतात. दस्तुरखुद्द लोकप्रतिनिधीच कायदे मोडून हव्या त्या गतीने वाहनं चालवितात. हवा तसा नियमात बदल करून आपल्या आप्तेष्टांना सरकारी योजनांतून मालामाल करणं , हवं तेव्हा वेळवर पोहचायचं नाही, संसद असो वा विधीमंडळ उपस्थिती बेताची परंतु त्याही वेळी गोंधळ माजवायचा आणि सभात्याग करायचा, इत्यादी सारे वर्तन स्वातंत्र्याच्या अर्थाच्या विरोधातीलच होय. स्वातंत्र्याचा अर्थ स्वतःच्या बेशिस्त वागण्याच्या समर्थानार्थ जोडायचा आणि सरकारी नोकरांना मारहाण करावी असे प्रकार लोकप्रतिनिधी करीत नाहीत का?
अलीकडे WhatsApp वर घरातल्या मुख्य कर्ताकरविता मातेच्या संदर्भात गांभीर्याने विचार करावी लागणारी एक पोस्ट आली होती. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर घरातील कामें अविरतपणे सुरच ठेवणार्या त्या मातेला मूलगा व सून कशाप्रकारे गृहीत( taken for granted) धरत असतात, ह्यासंबंधीचं वर्णन त्या पोस्टमध्ये आहे. त्यातच त्या मुलाचे निवृत झालेले वडील, कसे स्वच्छंदी जीवन जगत असतात हे ही दाखविले आहे. निवृत्ती नंतर मित्रमंडळीशी सकाळ-संध्याकाळी बाहेर फेरफटका मारतात, कधी रस्त्यावरील भेळ, पानीपुरी खाण्याची सर्रास मौज पुरी करतात, महीन्या दोन महिन्यांतून एक दिवसाच्या पिकनीकला जातात आणि वर दर दिवशी वाॅटर बॅग, जाॅगिंगचे बूट, नॅपकिन इत्यादी वस्तू पत्नीकडून घेण्याची सवय. परंतु ह्याबाबतही त्या महिलेच्या मनात ना हेवा ना काही तक्रार. अशी स्थिती त्या महिलेनी स्वतःहून आणली हे सत्य असलं तरी तिने स्व गमाविला असे म्हणता येणार नाही. उलट एका उदात्त हेतूने, निस्वार्थ वृतीने, आपल्या संस्कृतीतील 'माता' ह्या नात्यात वर्णिलेल्या उच्च प्रतिमेला नैसगिर्क, स्वाभाविक न्याय ती देत आहे. त्यातूनच तीचं कुटुंबासाठी झटणं अविरत सुरू आहे. परंतु त्या महिलेचा मूलगा, सून तसेच तिचा पती स्वातंत्र्याचा गैरफायदा(जाणूनबूजून नसेलही कदाचित) घेत आहेत हे तर निश्चित मान्य करावे लागते. आजची स्त्री पूर्णपणे स्वतंत्र आहे का? ना सरकारला होय म्हणता येते ना समाजाला. स्वातंत्र्य मिळून आज सत्तर वर्षे पूर्ण झाली तरी दर दिवशी स्त्रिच्या शोषणाची, छळाची, बलात्काराची बातमी ऐकू येतच आहे. पतीप्रेम ही कितीही उच्च भावना असली तरी दारूबाजीच्या खितेर्यात वर्षानुवर्षे लोळणार्या आणि व्यसनाधीन होऊन आपल्या पोराबाळांना अत्यंत निर्दयतेने वागविणार्या नवर्याच्या लाथा खात राहणे व एके दिवशी त्याच्या हातून आपला कपाळमोक्ष करून घेणे हे काही सध्याच्या काळात अनुकरणीय पातिव्रत्य होऊ शकत नाही. ती एक प्रकारची गुलामीच होय. स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणून जी सामाजिक जागृती दर्शवायला पाहिजे होती, जी सार्वजनीक नीतीची चाड बाळगणे आवश्यक होते, तिचा मागमूसही अजून आपल्यात आढळत नाही. जुनी ध्येयं आम्ही कधी प्रामाणिकपणे आचरणात आणली नाहीत. मात्र ढोंगीपणाने त्यांची पूजा केली. आपल्या ढोंगाचे आणि दुबळेपणाचे स्तोम माजविले. ही सारी लक्षणे मानसिक दुर्बलतेचेच आहेत. मग स्वतंत्रता कुठे राहिली? न पाळले जाणारे पावित्र्य, आचरणात न उतरणारी नीतीमूल्ये, निसर्गाशी व प्रचलित जीवनक्रमांशी सुसंगत नसलेले ध्येये, ह्यांचा ऊदोऊद करण्यात आपल्याला आनंद वाटतोय कि काय? This is also no less than one type of Bipolar Depression .
महाभारतात जेव्हा अर्जून श्रीकृष्णाच्या बहीणीला सूभद्राला पत्नी म्हणून घेऊन इंद्रप्रस्थात येतो, तेव्हा द्रोपदीचा अंगाचा तीळपापड होत असतो. तेव्हा ती श्रीकृष्णाला जळजळीतपणे विचारते, "तुझी आत्या कुंती ती यादव. तिने मला पाच नवर्यांची बायको बनवलं आणि तू ही यादव. आता तूझी बहीण माझी सवत म्हणून आणली. वर आणखिन दासी आणल्या. तुमच्या राजकारणातले जसे पवित्र्ये, यूद्धात जशी शस्रे, तशा कावेबाजीत साधनं म्हणून आम्ही बायकाच का येतात? शत्रू भुलवायाचा झाला, मित्र फिरवायचा झाला की त्याला एक स्त्री द्यायची, राजांना दासी पुरवायच्या आणि धनवंतांना भोगदासी देऊन रिझवायचे! किमान तू स्त्रियांच्या अशा वापराला अपवाद का नाहिस? श्रीकृष्ण क्षणभर थांबून उत्तर देतो. "पांचाली, राजकरणात आणि राजकारणी माणसांकडून फक्त स्त्रीच वापरली जात नाही. पुरूषाचं प्रात्त्कतनही त्याहून वेगळे नसतं. लढणारे आणि मरणारे सैनिक काय स्वतःसाठी लढत आणि मरत असतात का? गावपातळीपासून ते प्रधान सेनापती पर्यंतचे लोक स्वतःच्या इच्छेने काम करतात का? स्पष्टच सांगायचं तर राजांना आणि सम्राटांनाही त्यांच्या इच्छेनुसार जगता येत नाही. परिस्थितीची मागणीच सार्यांच्या दिशा निश्चित करते. राजाने ठरवायचं आणि सैनिकांनी मरायचं . येथे कोण आहे स्वतंत्र?". द्रौपदी काही न बोलता आपल्या महालाकडे निघून गेली.
मानव देह धारण करून अवतारणार्या देवांनाही छळ, पीडा, अपयश, द्वंद्व, आरोप, वादविवाद सुटले नाहीत हेच खरं. After all, Man is a servant of circumstances.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा