गुरुवार, ३० मार्च, २०१७

आपल्यातील देव


'आपण व आपल्या देव-देवता', या विषयावर चर्चा होत नाही असं ठिकाण किंवा परिसर अस्तित्वात नाही. देव या विषयावर होणार्या चर्चेचं माध्यम म्हणजे भाषा. त्याही विभिन्न आहेत. त्या देवाला शरण जाण्याच्या तर्हा विभिन्न. त्याला कसे पाहायचे ती रूपेंही विभिन्न.

माझ्या व्यवसायातील एका मित्राने मला प्रश्न केला "कि देव आहे, याला पुरावा काय?". मी त्याला म्हणालो, "मी देव आहे असे मानतो, एवढ्या एका गोष्टीसाठी देव मला दर्शन देईल असे संभवत नाही. तसेच तू देव मानत नाही म्हणून, 'मी हा आहे' असे म्हणत तूझ्या समोर उभा राहील असे ही होणार नाही. जे जे काही चांगले, ते ते सारे देव. जे जे काही हितकारक ते ते सारे देव. जे जे काही स्वकष्टाचे ते ते सारे देव. मी एक माणूस आहे ही सत्य बाब. माझ्या अवती-भोवती समाज आहे, निसर्ग आहे, छोट्या- मोठ्या किटकांपासून ते महाकाय प्राण्यांना मी पाहतो आहे. त्या सर्व प्राणीमात्रांत प्राण नावाची एकच चेतना आहे. आप, तेज, वायू, आकाश ,पृथ्वी ह्या पंचमहाभूतांना मी जाणतो, अनुभवतो. मग आणखिन काय पूरावा हवा?". तो माझा मित्र म्हणाला, "होय हे खरे आहे. ह्याचच नाव देव असावं".

आणखिन एक उदाहरण. मी एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून काम करीत असतांना आलेला हा अनूभव. माझ्या एका एजंटचा एक मित्र होता. तो व्यवसायाने डाॅक्टर होता. पूष्कळ वेळा समजावूनही त्याने  विमा घेण्याला  सपशेल नकार दिला होता. म्हणून मला त्या डाॅकटर मित्राकडे  तो घेऊन गेला. प्रथम परस्पर ओळख झाली. चहा-पाण्याचे सोपास्कर झाले. नंतर मी विम्याचा विषय काढला. मी म्हणालो, "डाॅक्टर साहेब, तूमची वार्धक्याची सोय झाली आहे. मला आनंद आहे. तूमच्या अनूपस्थितीत तूमच्या पत्नीला आणि मूलाला ही काही कमी पडणार नाही इतकी आर्थिक तरतूद करून ठेवली त्याबद्दल मी तूमचे कौतुक करतो". मी त्यांना म्हटले, "डाॅक्टरसाहेब तूम्हाला माणूस म्हणून जन्म मिळाला त्याबद्दल देवांचे आभार मानण्याचा एक मार्ग म्हणून तूम्ही विमा घ्यायला हवा". त्यावर ते उत्तरले "मी देव मानत नाही". मी म्हटल, "ठीक आहे. बाहेर तूमचे पेशंट बसले आहेत, त्यांचा तूमच्या नाडी परीक्षेवर विश्वास आहे आणि तूमच्या हाताला गूण आहे असे म्हणत तूमचं कौतुक करतात". त्यावर डाॅक्टर महाशय म्हणाले, "हो त्यांची माझ्यावर श्रद्धा आहे". मी म्हटलं, "Exactly! श्रद्धेचंच दूसरं नाव आहे देव". मी पूढे त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सूरू केली. "डाॅक्टरसाहेब, मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य आहे ना? तूमच्या अकस्मात देवाघरी जाण्यानं तूमचे पेशंट तूमच्या हाताच्या गूणाला आणि औषध-पाण्याला मूकणार ना? वैद्यकिय व्यवसायातील गूणवत्ता, नीतीमत्ता,  सर्जनशीलता,  शालीनता,  आणि  तत्परता हे गुण  तूमच्यापाशी आहेत  ना? ह्यावरून तूमचे ह्या जगात एक स्वतंत्र अस्तित्व आहे हे तूम्हाला मान्य आहे कि नाही?". डाॅक्टरांनी हसत हसत उत्तर दिले, "हो नक्कीचं". मी पूढे मुद्दा रेटत म्हणालो, "मग आम्ही ह्या तूमच्यातील असामान्य कौशल्याचं अशंत: संरक्षण करू इच्छितो. आणि अकस्मात रित्या तूम्ही ह्या जगाचा निरोप घेतला, तर आयुर्विमा मंडळाकडून येणार्या पैशाचं एक ट्रस्ट बनवून तूमच्या पेशंटनां, वेळोवेळी  लागणारी  औषधं,  तूमच्या नावाने देत राहू. शेवटी तूम्ही त्यांच्यासाठी देवमाणुस आहात". डाॅक्टर महाशयांनी हसत हसत देवमाणुस ह्या कल्पनेला दाद  दिली. विमा ही घेतला. वारसांच्या रकान्या समोर  पत्नी आणि मूलाचंच नाव नोंदविले. आम्ही विम्याचा फार्म भरून डाॅक्टरांचे आभार मानून बाहेर पडलो.

आपल्याकडे असणारे कूठल्याही क्षेत्रातले कौशल्य हे ही देवाचेच रूप. हे आपण पाहिले. आता तिसरं उदाहरण बघू या. एकदा भगवान रामकृष्ण परमंहसच्या आश्रमात एक माता आपल्या सात-आठ वर्षाच्या मूलाला घेऊन आली आणि म्हणाली, भगवान माझ्या मूलासाठी काहीतरी तरी उपाय द्या. परमहंसने विचारले, "काय झाले आहे?". ती म्हणाली, "महाराज माझा हा मूलगा फक्त गोडधोडच खातो. ना भात-भाजी, ना भाकरी. ह्याची वाढ कशी होणार?". परमहंसनी त्या बाळाकडे नजर फिरवली आणि त्या मातेला म्हणाले तूम्ही पूढच्या रविवारी या. आश्रमातील शिष्यांनी परमहंसचे उत्तर ऐकले आणि आप-आपल्या कामाला लागले. दूसर्या रविवारी ती माता बाळाला घेऊन पुन्हा परमहंसकडे आली. परंतु परमहंसनी तिला म्हटले कि आज काही काम होणार नाही. तू पून्हा पूढच्या रविवारी ये. तिसर्या रविवारी ती माता बाळाला घेऊन आली तेव्हा आपले गुरुदेव त्या बाळासाठी काय उपाय सूचवतात ते ऐकण्यासाठी सारे शिष्य आपल्या गुरूभोवती गोळा झाले. ती माता भगवान परमहंसच्या समोर बसली. परमंहस महाराजांनी त्या बाळाला नीट निरखीले आणि आपला उजवा हात समोर धरून म्हटले, "बाळा, मला वचन दे तू यापुढे वाजवीपेक्षा अधिक  गोड पदार्थ खाणार नाही". बाळाने परमहंसच्या हातावर टाळी दिली. परमहंसनी त्या मातेला सांगितले, आता तूमचं काम झालं आहे. तुम्ही जाऊ शकता. ती माता आश्रमाच्या बाहेर गेल्यावर शिष्यांनी परमहंसांना विचारले, "गुरूदेव तूम्ही एवढंच सांगण्यासाठी त्या मातेला तीन वेळा का बोलाविले?". महाराज शिष्यांना उद्देशून बोलले, "हे बघा ती माता प्रथमता आपल्याकडे आली त्या दिवसापर्यंत मी लाडू, शिरा, जिलेबी सारखे गोड पदार्थ किती खात होतो हे तूम्हाला माहीत होतेच. त्यानतंर मी गोडधोड खाणे बंद केले हेही तूम्ही पाहिले असणार!". हो, शिष्यगणांनी उत्तर दिले. "पण तूम्ही तिसर्या रविवारी त्या मातेला का बोलावलं?". महाराज म्हणाले, "जरी मी गोडधोड खाणे सोडलं तरी दूसर्या रविवार पर्यंत गोड पदार्थांचा वास माझ्या नाकाला येत होताच. गोडधोड पदार्थांची पूर्णतया आसक्ती काल सूटली आणि त्या मूळे आज मी त्या बाळाकडून गोड पदार्थ न खाण्याच वचन घेऊ शकलो". केवढा हा प्रामाणिकपणा! स्वतःशीच खोटे न बोलता, आधी आचरण आणि मग वचन हा भाव. म्हणूनच परमहंसांना भगवान असे संबोधीत असावेत. आपण जे काही काम हाती घेतो ते समरस होऊन केले कि आपण ते काम पूर्णतेकडे नेण्यास सक्षम होतो. आपला स्वतःहाच्या कौशल्यावर पूर्ण विश्वास असतो तेव्हा यशश्री आपल्याकडे चालत येते. आपला आत्मविश्वास, जे काम करावयाचे आहे त्यावरील आपली श्रद्धा आणि कष्ट ही परमेश्वराचीच आणखिन तीन रूपं असे मी मानतो. या रूपातूंनच यश मिळते आणि जोडीला आनंदही मिळतो. आपल्यातलाच आपला देव हा असा आहे. म्हणून आचार्य विनोबा भावे म्हणतात 'स्वरूप ओळखा'.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...