शिक्षक दिनाचे महत्व या विषयावर लेख लिहणे म्हणजे शिवधनुष्य पेलविण्या इतके महाकठीण कार्य आहे याची जाणिव मला आहे. पण ' प्रयत्नांती परमेश्वर ' हा समर्थबोध लक्षात ठेवून माझ्या कुवतीनुसार मी लेख लिहावयास घेतला आहे. वाचक हो , शिक्षक दिनाचे महत्व मांडताना वैदिक काळातील गुरू-शिष्य परंपरा व गुरूपौर्णिमेचा उत्सव यावर चर्चा केल्याशिवाय हा लेख परिपूर्ण होणार नाही असे मला वाटते. म्हणून या लेखाच्या पहिल्या भागात गुरू-शिष्य परंपरावर चर्चा मांडत आहे.
आपल्या देशात प्राचीन काळी म्हणजे वैदिक काळात गुरकूलं होती. त्यातूनच पुढे महर्षी व्यासांच्या
महानिर्वाणा नंतर त्यांच्या भक्तांनी आषाढी पौर्णिमेचा दिवस हा गुरू पुजन व त्यांच्या प्रती समर्पणाचा भाव समाजात युगानयुगे राहावा म्हणून एक मंच स्थापन केला. त्या मंचावरून सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत ही भावना जोपासून गुरू पौर्णिमा उत्सव साजरा होऊ लागला. तेव्हापासून त्या मंचाचे नाव व्यासपीठ या नावाने ओळखले जाऊ लागले. व्यासपीठ म्हणजे निवडणूकांचा प्रचारासाठी वापरले जाणारे मंच नव्हेत. या व्यासपीठावरून फक्त सांस्कृतिक कार्यक्रम ते ही आपल्या संस्कृतीला सुसंगत असावेत अशी जाणीव आपण ठेवावयास हवी, तरच त्याचे पावित्र्य अबाधित राहू शकते.
स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पुजनीय पांडुरंगशास्त्री उर्फ दादा आठवले यांनी आपल्या संस्कृती पुजन या पुस्तकात महर्षी व्यासांच्या कार्याची महती एका वाक्यात मांडली आहे ती अशी आहे ---
" व्यक्तीचा मोक्ष आणि समाजाचा उद्धार या दोन्ही आदर्शाकडे अभेद दृष्टीने पाहणार्या, अभ्युदय व नि:श्रेयस या दोहोंचा समन्वय साधणार्या अध्यात्म पारायण अशा व्यासाइतका अधिक योग्यतेचा समाजशास्त्रज्ञ कोणी झाला नाही. त्यांचे वैदिक व लौकिक ज्ञान एवढे अमर्याद होते की सर्व लोकांनी कृतज्ञतापूर्वक म्हटले की व्यासोच्छिष्टं जगत सर्वम आणि व्यासवाणी (महाभारत) सारं विश्वस्य."
गुरू पौर्णिमेच्या उत्सवावर ब्लाॅगवर गुरूवार दिनांक २८ जुलै २०१९ ला मी लेख लिहीला आहे. तो ही आपण वाचावा कारण त्यावरूनच या विषयाची व्याप्ती लक्षात येईल. परंतु तो लेख हिंदी भाषेत आहे. म्हणून त्या लेखातील काही भाग संक्षिप्त रित्या मी मांडत आहे.
विख्यात महाकवी कालिदासांनी म्हटले आहे की, उत्सव प्रियः खलू मनुष्यः| उत्सव साजरे करणे ही माणसाची स्वाभाविक वृत्ती आहे. जगातील सर्वच देशात आपआपल्या संस्कृती व धार्मिक श्रद्धा व परंपरा नुसार उत्सव साजरे होत असतात. अर्थात या उत्सवामध्यें स्वाभाविक रित्या विभिन्नता असते. परंतु गुरू-शिष्य परंपरा सर्वच देशात आढळते. आपल्या देशात जसे वसिष्ठ- श्रीराम, सांदिपनी-श्रीकृष्ण, शुक्राचार्य-जनक, रामानंद-कबीर, रामकृष्ण परमहंस- स्वामी विवेकानंद, समर्थ रामदास- शिवाजी इत्यादी गुरू-शिष्य जोड्या आहेत, तशाच जोड्या साॅक्रेटीस-प्लेटो, प्लेटो-ऑरिस्टोटल, मार्कस्- लेनीन, इन्सेन-शाॅ इत्यादी विदेशात आहेत. असे असले तरी गुरू-शिष्यांची परंपरा व गुरू पुजन उत्सावाचा जनक आपला भारत देश आहे. आपण म्हणाल ते कसे काय ? तशी कबूली अनेक पाश्चिमात्य विचारवंतानीच दिली आहे. जर्मन विचारवंत शाॅपेनहावर म्हणाले आहेत की ' उपनिषादासारखे उच्च व उदात्त तत्वज्ञान व मानवी जीवनाचे समग्र दर्शन जगाच्या पाठीवर कुठेच नाही.'
आपल्या देशात ब्रिटीशांच्या राजवटीतले दोन खलनायकांनी आपल्या प्राचीन संस्कृतीचे कौतूक केले आहे. ज्याने बंगालच्या फाळणीचं बीज रोवले असे लार्ड कर्झन यांनी एका मेजवानीत ' आम्ही ब्रिटीश लोक जंगलात राहात होतो तेव्हा भारतात गुरूकुलं होती अशी कबुली दिली आहे. दुसरे खलनायक आहेत ते मेकाॅले ! मेकाॅले हे त्यावेळी ब्रिटीश पार्लमेंटचे सदस्य होते. त्यांच्या सल्ल्यानुसार ब्रिटीश सरकारने आपल्या संस्कृती व धर्मशास्त्राचे सारे ग्रंथ जाळून आपल्या देशाच्या इतिहासाचा अभ्यासक्रमच बदलून टाकला व आपल्याला वैचारीक (शैक्षणिक) व मानसिक दृष्ट्या इंग्रजी शिक्षणाचे गुलाम बनविले. मॅक्सम्युलर नावाचा जर्मन विचारवंत हा मेकाॅलेचा मित्र होता. त्याच्याच मार्गदर्शना खाली मेकाॅलेनी आपले सारे ज्ञानभाडांर मोडीत काढले. तेच मॅक्सम्युलर नंतर म्हणाले आहेत की, ' मी माझ्या अनुभवाच्या जोरावर शाॅपेनहावरांनी हिंदू संस्कृती संबंधीत जे गौरवास्पद उद्गार काढले आहेत त्याच्याशी सहमत आहे.' अमेरिकन इतिहास तज्ञ व विचारवंत विल ड्युरांट म्हणतात, ' मनाची विशुद्धता, परिपक्वता आणि व्यापकता या तीन मुल्यांचा अद्भूत संगम घडवून सहिष्णूताचे पालन कसे करावयाचे हे फक्त हिंदु संस्कृतीकडून शिकता येते. काही काळ भारतात ब्रिटीशांच्या राजवटीत काॅग्रेसच्या अध्यक्षा असलेल्या डाॅ ॲनी बेंझट यांची तर हिंदु संस्कृतीवर अपार निष्ठा होती. त्यांनी म्हटले आहे की 'जगातील सर्व देशांनी हिंदु संस्कृती ही आपली जननी मानली तर जगात सहिष्णूता व बंधुत्वाचे वातावरण निर्माण होऊ शकेल.'
गुरू-शिष्य परंपरेतूनच मानव जातीचा सास्कृतिक आणि लौकीक दृष्ट्या विकास झाला आहे. या विश्वाच्या जन्मापासून भूतलावरील पशू-पक्षी व इतर प्राणीमात्र आजही त्याच अवस्थेत आहेत. याचे कारण त्या विधात्याने मानवाला दिलेली बुद्धी प्राणिमात्रांना प्रदान केली नाही हेच होय. मानव हा सामाजिक प्राणी मानला जातो. तो समाजात राहतो. तर पशू-पक्षांचे जीवन सामुदायिक असते. आपल्याला काय हवं आहे याची जाणीव पशू-पक्ष्यांना ही आहे. पण ते मिळविण्यासाठी त्यांच्याकडे मानवा सारखी बुद्धी नाही. पक्षी आपल्या पिल्लांना आकाशात भरारी मारणे शिकवत नाहीत. तसेच सिंह वाघा सारखे हिस्त्र पशू आपल्या बछड्यांना शिकार कशी करावी हे शिकवत नाही. ते अन्न मिळवतात व खाऊन टाकतात. दुसर्या दिवसासाठी लागणारे अन्न साठवून ठेवण्यासाठी त्यांच्यापाशी रेफ्रीजेटर नाहीत. त्यांच्याकडे बुद्धी असती तर ते मानव जातीला डोईजड झाले असते. याचा अर्थ असा आहे की पशू-पक्ष्यांचे जीवन निसर्गाच्या नियमाच्या आधीन आहे. मानव जातीला आकाशातून प्रवास करण्याची प्रेरणा पक्ष्याकडून मिळाली; पाण्यात पोहण्याची कला माणसाला जलचर प्राण्यापासून प्राप्त झाली. समुद्रात दुरवर प्रवास करण्यासाठी बोटी निर्माण करण्याचे ज्ञान अवगत झाले. आपल्या चार पायावर भरधाव वेगाने धावण्यार्या पशूकडून मानवाने चार चाकांची वाहने निर्माण केली. जमिनीवरून सरपटणार्या प्राण्यामूळे माणसाला डोंगरावरून सरपटत जाणारी रेल्वेगाडीची प्रेरणा मिळाली. वृक्ष-वेली, छोटेमोठ्या किटकांपासून ते महाकाय पंचमहाभूतांच्या उदारतामूळे मानव पुष्कळ काही शिकला आहे.
या उदारतेचं भान वैदिक काळातल्या ऋषीमुनींना होते. म्हणून ऋषीमुनींनी ऋतुनुसार आहार ठेवावा, जितकं पचेल तितकंच अन्न घ्यावे, महिन्यातून एक दिवस तरी उपवास करावा असे सांगत अनेक धार्मिक उत्सवाची निर्मिती केली. निसर्गातील चराचर सृष्टीत ईश्वर सामावलेला आहे. त्या सृष्टीतली उदारता अनुभवून ऋषीमुनींनी अनेक बोधवाक्यें आपल्या समोर ठेवली आहेत. त्यातील दोन मी इथे मांडतो आहे -
ईशावास्यम इदं सर्वं यत्किच्च जगत्यां जगत | तेन त्यक्तेन भुज्जीथाः मा गृधः कस्यचित् धनम् || (अर्थ - या जगात जे जे काही आहे त्या सगळ्यात ईश्वराचा वास आहे. तेव्हा ते आपले नसून ईश्वराचे आहे असे समजून त्या सर्वाचा उपभोग घे. (पण कशाचाही लोभ धरू नको.) या बोधवाक्यातला उपदेश संपूर्ण मानव जातीसाठी आहे. संपूर्ण मानव जात हव्यास सोडून काटसरीत जीवन जगली तर हवा, पाणी, उर्जा, इंधन, जमीन इत्यादी महत्वाच्या घटकाची वानवा पडणार नाही आणि विश्वात शांतीचे राज्य येईल.
दुसरे बोधवाक्य असे आहे--
'अयं बन्धुरयन्नेति गणना लघु चेतसाम्
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ||
(अर्थ -- हा माझा बंधू आहे आणि तो नाही असा हिशोब संकुचित किंवा क्षुद्र बुद्धीचे लोक करतात. परंतु उदार-उच्च चारित्र्याचे लोक संपूर्ण पृथ्वी म्हणजेच वसुधा हेच एक कुटुंब आहे असे मानतात. आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी ही म्हटले आहे
' हे विश्वची माझे घर | ऐसी मति जयाची स्थिर | किंबहुना चराचर | आपणची जाहला ||
अनेक शिक्षण संस्थानी ' वसुधैव कुटुम्बकम् हे बोधवचन स्विकारले असले तरी त्यातील प्रमुख आणि महत्वाचे उदाहरण म्हणजे पुणे येथील सिम्बाॅयोसिस ( Symbiosis) या जगद्वविख्यात शिक्षण संस्थेचे होय. भारतिय विद्यार्थींबरोबरच बहुसंख्येने येणार्या परदेशी विद्यार्थ्यांनी आदराने स्विकारले आहे. दक्षिण मुंबईतील एस् एन् डी टी महिला विद्यापिठाच्या गीतात (प्रार्थनात) ' विश्व है परिवार, भारत घर हमारा है सामावून घेतले आहे. वाचक हो अनेक शिक्षण संस्था तसेच सांस्कृतिक संस्थानी आपल्या संस्कृतील अनेक बोधवचने स्विकारली असली तरी ' विद्या ' या शब्दावर सर्वात अधिक बोधवचने वैदिक संस्कृतीत आढळलेली दिसून येतात.
वाचक हो शिक्षक दिन हा उत्सव अलिकडचा आहे. एका परीने हा उत्सव गुरू-शिष्य परंपरेची पुढील आवृत्ती आहे. म्हणून या लेखाच्या भाग-१ चा विस्तार वाढला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून या लेखाची समाप्ती करतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा