गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४

शिक्षक दिन - व्यापकता व महत्व (भाग २)

शिक्षक दिन हा एक प्रकारे शिक्षकांच्या जीवनातील एक मोठा सत्कार च आहे. आजच्या मानवाचा सारा विकास हा शिक्षण व्यवस्था व शिक्षकांनी विद्यार्थ्याना दिलेल्या शिकवणीतून झाला आहे. क्षेत्र कुठलेही असो, एका पिढीचा अनुभव हा दुसर्या पिढीला मिळत असतो त्यातूनच दुसर्या पिढीचा अनुभव तिसर्या पिढीला मिळत असतो. 

सामान्यतः डाॅक्टराचा पुत्र डाॅक्टर होत असतो. इजिनीयरचा मुलगा इंजिनियर बनतो. प्रत्येकाचा व्यवसाय हा त्या घराचा कर्ता पुरूष किंवा कर्ती स्त्री पासून दुसर्या पिढीला मिळत असतो. असे असले तरी विद्यार्थी वर्गाला शाळेचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी शाळेतील शिक्षकांचा आधार लागतोच. ब्रिटीश राजवटीत आपली पुर्वीची शिक्षण व्यवस्था म्हणजे गुरूकूल व्यवस्था संपुर्णतः मोडीत काढली गेली. त्यामूळे शिक्षण देण्यासाठी शाळा उघडण्यात आल्या; शिक्षण देण्यासाठी शिक्षक नावाचा वर्ग निर्माण करण्यात आला. असे  असले तरी गुरू-शिष्य परंपरा आज तागायात टिकून राहिली आहे. याचे श्रेय शिक्षक वर्गाला जाते. प्रश्न असा आहे की गुरू- शिष्य परंपरा अबाधित असतांना शिक्षक दिन साजरा करण्याची प्रथा सुरू का झाली, प्रत्थेक वर्षात ५ सप्टेंबर लाच शिक्षक दिन का पाळला जातो  याची कारणें काय आहेत? यावर चर्चा करू या.

काळानुसार मानवी जीवनातल्या  प्रत्येक व्यवस्थेत बदल होत असतो. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. गती हा या युगाचा मंत्र आहे. विद्येचे स्वरूप ही बदलेलं आहे. विद्येचं बदलेल्या स्वरूपाचे प्रशिक्षण शिक्षक वर्गाला दिले जाते. असे असले तरी  वैदिक काळापासून सुरू झालेली प्राचीन शिक्षण व्यवस्था ब्रिटीश सरकारने मूळासकट उखडून काढल्यामूळे, तसेच नवीन इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्यामुळे देशात कारकून निर्माण होत गेले. तरीही ब्रिटीश राजवटीला खिळखिळी करण्यात अनेक देशभक्तांना यश मिळत गेले. कोणी अहिंसा व सत्याग्रह या शस्त्राच्या साह्याने ब्रिटीश राजवटीशी झूंज दिली तर कोणी हातात शस्त्रे घेऊन ब्रिटीश सरकारच्या अधिकारी वर्गाला यमसदनास पाठविले. 

एक तिसरा वर्ग असा होता की त्याने आपल्या बुद्धीच्या बळावर इंग्रज राजवटीला धक्के दिले. या तिसर्या वर्गात बहुतांशी शिक्षक वर्ग होता. या मार्गावर असलेल्या अनेक थोर पुरूषांनी आपल्या प्राचीन संस्कृतील साहित्य व ज्ञान भांडारचा अभ्यास करीत आपले धर्मग्रंथ व आपल्या संस्कृतीचा प्रसार जगभर केला.  या तिसर्या वर्गात अग्रणी स्थानावर स्वामी विवेकानंद होते. स्वामी विवेकानंद च्या पश्चात जगभरात आपल्या संस्कृतीचा प्रसार करण्याचे शिवधनुष्य लिलयाने पेलविले असे अध्यात्मिक गुरू म्हणजे डाॅ राधाकृष्णन. त्यांच्या व्यक्तीमत्वाचे वर्णन शब्दात मांडणे मला अशक्य होत आहे. मी इथे हिंदी पुस्तकात वाचलेले एक वाक्य मला आठवले ते असे आहे ' व्यक्तीत्वकी भी एक पहचान होती है , वह बिना शब्द और बिना भाषासे दुसरोंके अंतरमनको छू लेता है | 

शिक्षक दिवस हा शिक्षकांच्या कौतुकाचा एक विशेष दिवस आहे. शिक्षक दिवस साजरा करण्याची कल्पना एकोणीसाव्या शतकात अनेक देशांमध्ये रूजली. बहुतांशी स्थानिक शिक्षक किंवा शिक्षण क्षेत्रातील महत्वाचा टप्प्यावर योगदान दिले आहे अशा व्यक्तीचा सत्कार होतो. अनेक आंतरराष्ट्रीय दिवसापेक्षा हा दिवस अनेक देशात वेगवेगळ्या तारखेला होतो. आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन ५ ऑक्टोबरला साजरा होतो. तर आपल्या देशात डाॅ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवशी म्हणजे ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा होतो. 

डाॅ राधाकृष्णन यांचा जन्मदिवस कसा शिक्षक दिन साजरा होऊ लागला, याची एक छोटीसी कथा आहे. सन १९६२ ला डाॅ  राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती झाले, तेव्हा त्यांचे काही विद्यार्थी त्यांना भेटावयास गेले. त्यांनी ५ सप्टेंबरला डाॅ राधाकृष्णनचा दिमाखदार वाढदिवस साजरा करण्यासाठी परवानगी मागितली. तेव्हा डाॅक्टर राधाकृष्णन यांनी नम्रतेने नकार दिला. स्वतः शिक्षक असल्यामूळे देशातील तमाम शिक्षकांचा तसाच शिक्षण व्यवस्थेचं कौतूक व्हावे ही इच्छा प्रगट करून विद्यार्थ्यांना ५ सप्टेंबरला शिक्षक दिवस साजरा करण्यास सांगितले. त्यांच्या विद्यार्थ्यांचे समाधान झाले. तेव्हापासून ५ सप्टेंबरचा दिवस शिक्षक दिवस साजरा होऊ लागला. 

एक महान तत्वज्ञानी, सनातन संस्कृतीचे गाढे अभ्यासक, युनेस्कोचे माजी चेअरमन, बनारस हिंदु विद्यापिठाचे कुलगुरू, भारतीय संविधान समितीचे सदस्य, पहिल्या शिक्षण आयोगाचे अध्यक्ष, स्वामी विवेकानंद व स्वातंत्र्यवीर सावरकारांना आपले आदर्श मानणारे अलौकीक विद्वान, ऑक्सफोर्ड विद्यालयात प्राचार्य, तल्लक बुद्धी व स्मरणशक्ती दैवाजात प्राप्त झालेले महान विद्यार्थी व शिक्षक, फिलासाॅफी ऑफ रविंद्रनाथ टागोर, इथीक ऑफ वेंदात, दि रेगीन इन रिलीजन कन्टेमपररी अशा ग्रंथाचे महान लेखक, छोट्या छोट्या कथातून सनातन संस्कृतीचे दर्शन घडविणारे दशसहस्त्रेषू वक्ता, अमेरिका व युरोपमध्ये लोकप्रिय हिंदू नेता, पाश्चात्य व सनातन संस्कृतीचे खंदे समन्वयक आणि ----
        आचारः परम धर्मं |
        विद्या विनयेन शोभते |
        विद्या सर्वत्र पुज्यते |
        सा विद्या या विमुक्तये |
         वसुधैव कुटुम्बकम् |
इत्यादी सनातन संस्कृतीचे बोधवचने आपल्या आचरणात आणली अशा सनातनी अवतारी महापुरूषास माझे कोटी कोटी प्रणाम | 
        




 

बुधवार, ४ सप्टेंबर, २०२४

शिक्षक दिन - व्यापकता आणि महत्व (भाग-१ )

आज गुरूवार ५ सप्टेंबर २०२४ ! देशभरातील शाळांमध्ये तसेच काही स्वयंसेवी संस्थामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो. संत तुकाराम साल्वेस्टर मिशन प्रणित, मालाड (प) व विद्याप्रतिष्ठान पुणे संचलीत  आनंदराव पवार सरस्वती विद्यामंदिर वझिरा, बोरीवली (प) या शाळेची कार्यवाह म्हणून जबाबदारी मी सांभाळतो. दर वर्षी एसटीएस मिशनच्या शाळांचा ' शिक्षक दिन ' संयुक्त रित्या साजरा होत असतो. परंतु या वर्षी एसटीएस मिशन मालाड च्या सहकार्यावाह जोग मॅडम यांनी फोनवरून कळविले की या वर्षी शिक्षक दिनाचा कार्यक्रम स्वतंत्र रित्या आपआपल्या शाळेत साजरा करावा.  त्यांच्याशी फोनवर झालेल्या संवादातून या विषयावर लेख लिहीण्याची प्रेरणा मिळाली. 

शिक्षक दिनाचे महत्व या विषयावर लेख लिहणे म्हणजे शिवधनुष्य पेलविण्या इतके महाकठीण कार्य आहे याची जाणिव मला आहे. पण ' प्रयत्नांती परमेश्वर ' हा समर्थबोध लक्षात ठेवून माझ्या कुवतीनुसार मी लेख लिहावयास घेतला आहे. वाचक हो , शिक्षक दिनाचे महत्व मांडताना वैदिक काळातील गुरू-शिष्य परंपरा व गुरूपौर्णिमेचा उत्सव यावर चर्चा केल्याशिवाय हा लेख परिपूर्ण होणार नाही असे मला वाटते. म्हणून या लेखाच्या पहिल्या भागात  गुरू-शिष्य परंपरावर चर्चा मांडत आहे. 

आपल्या देशात प्राचीन काळी म्हणजे वैदिक काळात गुरकूलं होती. त्यातूनच पुढे महर्षी व्यासांच्या 
महानिर्वाणा नंतर त्यांच्या भक्तांनी आषाढी पौर्णिमेचा दिवस हा गुरू पुजन व त्यांच्या प्रती समर्पणाचा भाव समाजात युगानयुगे राहावा म्हणून एक मंच स्थापन केला. त्या मंचावरून सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत ही भावना जोपासून गुरू पौर्णिमा उत्सव साजरा होऊ लागला. तेव्हापासून त्या मंचाचे नाव व्यासपीठ या नावाने ओळखले जाऊ लागले. व्यासपीठ म्हणजे निवडणूकांचा प्रचारासाठी वापरले जाणारे मंच नव्हेत. या व्यासपीठावरून फक्त सांस्कृतिक कार्यक्रम ते ही आपल्या संस्कृतीला सुसंगत असावेत अशी जाणीव आपण ठेवावयास हवी, तरच त्याचे पावित्र्य अबाधित राहू शकते.

स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पुजनीय पांडुरंगशास्त्री उर्फ दादा आठवले यांनी आपल्या संस्कृती पुजन या पुस्तकात महर्षी व्यासांच्या कार्याची महती एका वाक्यात मांडली आहे ती अशी आहे ---
" व्यक्तीचा मोक्ष आणि समाजाचा उद्धार या दोन्ही आदर्शाकडे अभेद दृष्टीने पाहणार्या, अभ्युदय व नि:श्रेयस या दोहोंचा समन्वय साधणार्या अध्यात्म पारायण अशा व्यासाइतका अधिक योग्यतेचा समाजशास्त्रज्ञ कोणी झाला नाही. त्यांचे वैदिक व लौकिक ज्ञान एवढे अमर्याद होते की सर्व लोकांनी कृतज्ञतापूर्वक म्हटले की व्यासोच्छिष्टं जगत सर्वम आणि व्यासवाणी (महाभारत) सारं विश्वस्य."
गुरू पौर्णिमेच्या उत्सवावर ब्लाॅगवर गुरूवार दिनांक २८ जुलै २०१९ ला मी लेख लिहीला आहे. तो ही आपण वाचावा कारण त्यावरूनच या विषयाची व्याप्ती लक्षात येईल. परंतु तो लेख हिंदी भाषेत आहे. म्हणून त्या लेखातील काही भाग संक्षिप्त रित्या मी मांडत आहे. 

विख्यात महाकवी कालिदासांनी म्हटले आहे की, उत्सव प्रियः खलू मनुष्यः| उत्सव साजरे करणे ही माणसाची स्वाभाविक वृत्ती आहे. जगातील सर्वच देशात आपआपल्या संस्कृती व धार्मिक श्रद्धा व परंपरा नुसार उत्सव साजरे होत असतात. अर्थात या उत्सवामध्यें स्वाभाविक रित्या विभिन्नता असते. परंतु गुरू-शिष्य परंपरा सर्वच देशात आढळते. आपल्या देशात जसे वसिष्ठ- श्रीराम, सांदिपनी-श्रीकृष्ण, शुक्राचार्य-जनक, रामानंद-कबीर, रामकृष्ण परमहंस- स्वामी विवेकानंद, समर्थ रामदास- शिवाजी इत्यादी गुरू-शिष्य जोड्या आहेत, तशाच जोड्या साॅक्रेटीस-प्लेटो, प्लेटो-ऑरिस्टोटल, मार्कस्- लेनीन, इन्सेन-शाॅ इत्यादी विदेशात आहेत. असे असले तरी गुरू-शिष्यांची परंपरा व गुरू पुजन उत्सावाचा जनक आपला भारत देश आहे. आपण म्हणाल ते कसे काय ? तशी कबूली अनेक पाश्चिमात्य विचारवंतानीच दिली आहे. जर्मन विचारवंत शाॅपेनहावर म्हणाले आहेत की ' उपनिषादासारखे उच्च व उदात्त तत्वज्ञान व मानवी जीवनाचे समग्र दर्शन जगाच्या पाठीवर कुठेच नाही.' 

आपल्या देशात ब्रिटीशांच्या राजवटीतले दोन खलनायकांनी आपल्या प्राचीन संस्कृतीचे कौतूक केले आहे. ज्याने बंगालच्या फाळणीचं बीज रोवले असे लार्ड कर्झन यांनी एका मेजवानीत ' आम्ही ब्रिटीश लोक जंगलात राहात होतो तेव्हा भारतात गुरूकुलं होती अशी कबुली दिली आहे. दुसरे खलनायक आहेत ते मेकाॅले ! मेकाॅले हे त्यावेळी ब्रिटीश पार्लमेंटचे सदस्य होते. त्यांच्या सल्ल्यानुसार ब्रिटीश सरकारने आपल्या संस्कृती व धर्मशास्त्राचे सारे ग्रंथ जाळून आपल्या देशाच्या इतिहासाचा अभ्यासक्रमच बदलून टाकला व आपल्याला वैचारीक (शैक्षणिक) व मानसिक दृष्ट्या इंग्रजी शिक्षणाचे गुलाम बनविले. मॅक्सम्युलर नावाचा जर्मन विचारवंत हा मेकाॅलेचा मित्र होता. त्याच्याच मार्गदर्शना खाली मेकाॅलेनी आपले सारे ज्ञानभाडांर मोडीत काढले. तेच मॅक्सम्युलर नंतर  म्हणाले आहेत की, ' मी माझ्या अनुभवाच्या जोरावर शाॅपेनहावरांनी हिंदू संस्कृती संबंधीत जे गौरवास्पद उद्गार काढले आहेत त्याच्याशी सहमत आहे.' अमेरिकन इतिहास तज्ञ व विचारवंत विल ड्युरांट म्हणतात,        ' मनाची विशुद्धता, परिपक्वता आणि व्यापकता या तीन मुल्यांचा अद्भूत संगम घडवून सहिष्णूताचे पालन कसे करावयाचे हे फक्त हिंदु संस्कृतीकडून शिकता येते. काही काळ भारतात ब्रिटीशांच्या राजवटीत काॅग्रेसच्या अध्यक्षा असलेल्या डाॅ ॲनी बेंझट यांची तर हिंदु संस्कृतीवर अपार निष्ठा होती. त्यांनी म्हटले आहे की  'जगातील सर्व देशांनी हिंदु संस्कृती ही आपली जननी मानली तर जगात सहिष्णूता व बंधुत्वाचे वातावरण निर्माण होऊ शकेल.'

गुरू-शिष्य परंपरेतूनच मानव जातीचा सास्कृतिक आणि लौकीक दृष्ट्या विकास झाला आहे. या विश्वाच्या जन्मापासून भूतलावरील पशू-पक्षी व इतर प्राणीमात्र आजही त्याच अवस्थेत आहेत. याचे कारण त्या विधात्याने मानवाला दिलेली बुद्धी प्राणिमात्रांना प्रदान केली नाही हेच होय. मानव हा सामाजिक प्राणी मानला जातो. तो समाजात राहतो. तर पशू-पक्षांचे जीवन सामुदायिक असते. आपल्याला काय हवं आहे याची जाणीव पशू-पक्ष्यांना ही आहे. पण ते मिळविण्यासाठी त्यांच्याकडे मानवा सारखी बुद्धी नाही. पक्षी आपल्या पिल्लांना आकाशात भरारी मारणे शिकवत नाहीत. तसेच सिंह वाघा सारखे हिस्त्र पशू आपल्या बछड्यांना शिकार कशी करावी हे शिकवत नाही. ते अन्न मिळवतात व खाऊन टाकतात. दुसर्या दिवसासाठी लागणारे अन्न साठवून ठेवण्यासाठी त्यांच्यापाशी रेफ्रीजेटर नाहीत. त्यांच्याकडे बुद्धी असती तर ते मानव जातीला डोईजड झाले असते. याचा अर्थ असा आहे की पशू-पक्ष्यांचे जीवन निसर्गाच्या नियमाच्या आधीन आहे. मानव जातीला आकाशातून प्रवास करण्याची प्रेरणा पक्ष्याकडून मिळाली; पाण्यात पोहण्याची कला माणसाला जलचर प्राण्यापासून प्राप्त झाली. समुद्रात दुरवर प्रवास करण्यासाठी बोटी निर्माण करण्याचे ज्ञान अवगत झाले. आपल्या चार पायावर भरधाव वेगाने धावण्यार्या पशूकडून मानवाने चार चाकांची वाहने निर्माण केली. जमिनीवरून सरपटणार्या प्राण्यामूळे माणसाला डोंगरावरून सरपटत जाणारी रेल्वेगाडीची प्रेरणा मिळाली. वृक्ष-वेली, छोटेमोठ्या किटकांपासून ते महाकाय पंचमहाभूतांच्या उदारतामूळे मानव पुष्कळ काही शिकला आहे. 

या उदारतेचं भान वैदिक काळातल्या ऋषीमुनींना होते. म्हणून ऋषीमुनींनी ऋतुनुसार आहार ठेवावा, जितकं पचेल तितकंच अन्न घ्यावे, महिन्यातून एक दिवस तरी उपवास करावा असे सांगत अनेक धार्मिक उत्सवाची निर्मिती केली. निसर्गातील चराचर सृष्टीत ईश्वर सामावलेला आहे. त्या सृष्टीतली उदारता अनुभवून ऋषीमुनींनी अनेक बोधवाक्यें आपल्या समोर ठेवली आहेत. त्यातील दोन मी इथे मांडतो आहे -   

ईशावास्यम इदं सर्वं यत्किच्च जगत्यां जगत | तेन त्यक्तेन भुज्जीथाः मा गृधः कस्यचित् धनम् || (अर्थ - या जगात जे जे काही आहे त्या सगळ्यात ईश्वराचा वास आहे. तेव्हा ते आपले नसून ईश्वराचे आहे असे समजून त्या सर्वाचा उपभोग घे. (पण कशाचाही लोभ धरू नको.) या बोधवाक्यातला उपदेश संपूर्ण मानव जातीसाठी आहे. संपूर्ण मानव जात हव्यास सोडून काटसरीत जीवन जगली तर हवा, पाणी, उर्जा, इंधन, जमीन इत्यादी महत्वाच्या घटकाची वानवा पडणार नाही आणि विश्वात शांतीचे राज्य येईल. 

दुसरे बोधवाक्य असे आहे--
'अयं बन्धुरयन्नेति गणना लघु चेतसाम् 
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ||
(अर्थ -- हा माझा बंधू आहे आणि तो नाही असा हिशोब संकुचित किंवा क्षुद्र बुद्धीचे लोक करतात. परंतु उदार-उच्च चारित्र्याचे लोक संपूर्ण पृथ्वी म्हणजेच वसुधा हेच एक कुटुंब आहे असे मानतात. आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी ही म्हटले आहे 
' हे विश्वची माझे घर | ऐसी मति जयाची स्थिर | किंबहुना चराचर | आपणची जाहला || 
 अनेक शिक्षण संस्थानी ' वसुधैव कुटुम्बकम् हे बोधवचन स्विकारले असले तरी त्यातील प्रमुख आणि महत्वाचे उदाहरण म्हणजे पुणे येथील सिम्बाॅयोसिस ( Symbiosis) या जगद्वविख्यात शिक्षण संस्थेचे होय. भारतिय विद्यार्थींबरोबरच बहुसंख्येने येणार्या परदेशी विद्यार्थ्यांनी आदराने स्विकारले आहे. दक्षिण मुंबईतील एस् एन् डी टी महिला विद्यापिठाच्या गीतात (प्रार्थनात)  ' विश्व है परिवार, भारत घर हमारा है सामावून घेतले आहे. वाचक हो अनेक शिक्षण संस्था तसेच सांस्कृतिक संस्थानी आपल्या संस्कृतील अनेक बोधवचने स्विकारली असली तरी ' विद्या ' या शब्दावर सर्वात अधिक बोधवचने वैदिक संस्कृतीत आढळलेली दिसून येतात. 

वाचक हो शिक्षक दिन हा उत्सव अलिकडचा आहे. एका परीने हा उत्सव गुरू-शिष्य परंपरेची पुढील आवृत्ती आहे. म्हणून या लेखाच्या भाग-१ चा विस्तार वाढला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून या लेखाची समाप्ती करतो. 



 










दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...