बुधवार, ५ जून, २०२४

निसर्ग आणि मानवामधील ऋणानुबंध भाग--३

खळखळणारे झरे, अजस्त्र डोंगर, उंच उंच कडेपर्वत पाहिले की आपल्या मनात पावित्र्य साकार होते. त्यातूनच अनेक तत्वचिंतक निर्माण झाले. निसर्गाच्या कुशीत राहूनच महाकाव्ये फूलली. मानवी जीवनाचे प्रयोजन आपणांस ज्ञात झाले. आदिमानवा पासून ते आजच्या अत्याधुनिक माहिती व तंत्रज्ञानाच्या युगापर्यंतच्या आपल्या उन्नतीचे रहस्य या निसर्गाच्या दयेतच जडले आहे. सहनशिलता हा अलंकार तर गती हा जिचा स्थायीभाव आहे अशी नदी आपल्याला दातृत्वाचा संदेश देत वाहात असते. कोणासाठी? आपल्याच भल्यासाठी ना ! बारामाही शेती कुणाच्या बळावर आपण करतो?

हे पाहा पशू ! मनुष्याच्या सेवेला आणि सुखाला हवे तसेच विविध, हवे तितकेच बुद्धीमान ! वाळवंटातील  वाहन म्हणून त्या उंटास महिनोगणती पाण्यावाचून चालण्याची युक्ती परमेश्वरानी दिली आहे. तो घोडा किती चपळ ! त्याच्यावर स्वारी करून माणसाला रणागंणात त्याने सांभाळले. आज ही अनेक ठिकाणी आपल्या पाठीवर घेऊन किंवा टांगा ओढत तो घोडा माणसास एका ठिकाणा वरून दुसर्या ठिकाणी सुखरूप घेऊन जात असतो. त्याच्यात ती शक्ती व तितकीच समज निसर्गानेच त्याला प्रदान केली आहे 
ना ! ती पाहा गाय ! एका बाजूला सूके गवत खाते व दुसर्या बाजूने जीवनप्रद असे दुध देते. ती गाय स्वतः दुध पिते का? नाही. आपल्या संस्कृतीत तिचे नावच गोमाता ठेवले आहे. तिचा महिमा आपल्या सर्वांना ठाऊक आहे.

एक आंबा ! रसाने, स्वादाने, सत्वाने किती भरलेले ते देवफळ. ते इतके सुपिक की खाऊन झाल्यावर त्याचा भाटा रूजविला की वृक्ष होऊन प्रतिवर्षी हजारो आंबे लागावे असा क्रम वर्षानुवर्षे चालला आहे. बरं सगळे आंबे भाट्यासकट खाऊन टाकले तरी झाडाच्या फांद्यांच्यी कलमे करून रूजविली की आंब्याच्या निर्मीतीत खंड पडणार नाही अशी ही आणखिन सोय व व्यवस्था दयाळू निसर्ग देवाने केलेली ! एक बी पेरली की एका पिढीस सहस्त्रावधी फळे देणारी ही फळझाडे ! हे फणस, पपनस, नारळ, द्राक्षे, डाळींबे ! डाळींबे फोडले की त्यातून परमेश्वराचे कसब प्रगट होते. डाळींबीचा रंग च मोहक ! त्यातील दाण्याची किती उत्तम आणि 
आकर्षक मांडणी ! चव काही औरच ! डांळीबं तयार करण्याचा कारखाना विज्ञानाला काढता येईल का ?

गवतासारख्या उगव म्हणताच, उगवणार्या रूचकर बहुगूणी, विविध रसाने भरलेल्या शाकभाज्या फळभाज्या, यांचा तोटाच पडू देणार नाही, अशी मायाळू आपली भूमाता. ज्याचा गाभाच गोड आहे तो साखरेच्या पाकाने ओतप्रोत भरलेला ऊस देखील इतका पिकतो की त्याच्या मळेचे मळे नकोसे झाले तर प्राण्यानांही खाण्यास हरकत ठेवली नाही. ' बोरी भाबळी उगाच जगती '  असे आपण म्हणतो परंतु त्या भाबळीच्या खाली पाण्याचा स्त्रोत असतो. बरं धान्य, फळे शाकभाज्या देऊन भूमाता थांबते का ? आपल्या गर्भातून अनेक धातू, खनिजे, रसायने, आपणांस प्राप्त करून मानवी जीवनाला एक वेगळं परिमाण ही तिनेच दिले आहे. वेगवेगळ्या हवामानानुसार त्या त्या भागात राहणार्या माणसांच्या शरीर रचनेला साजेशी अशी पिके कशी देते हे फक्त तो सृष्टीचा नियंताच जाणो !

नाना प्रकाराचे, नाना आकाराचे किटक पक्षी ही माणसास काहीतरी शिकवण देत असतात. ते ही जणू विद्या व कलेचे उपासक आहेत. भिंतीवर जाळे विणत असतांना अनेक वेळा अपयशी होऊन शेवटी टोकाला पोहचून यश मिळविणार्या कोळ्यापासून इंग्लंडचा पराभूत झालेल्या राजाला प्रेरणा मिळाली आणि आपल्या शत्रूचा त्याने पराभव करून गमाविलेले राज्य परत मिळविले. मुंग्या, मधमाश्या अशा किटकांडून दिर्घोद्योग व परस्पर समन्वय राखत जीवन कसे जगावयाचे याचा पाठ आपण शिकतो. अनेक पशू-पक्षी व किटकांच्या हालचाली, किंकाळ्यातून भूकंपाची पूर्व सूचना देत असतात. पण सर्वांभूती लीन व्हावे अशी संताची शिकवण आपण पाळतो कुठे ?

दुपारचे ऊन मी मी म्हणत असते तेव्हा आपल्याला मायेने सावली देणारे वृक्ष म्हणजे निसर्गातील जणू संत च ! दिवसा प्राणवायू सोडून रात्री कार्बनडाॅय ऑक्साईड शोषून घेणारे वृक्ष म्हणजे ईश्वराने याच्चवत प्राणीमात्रांचे जीवन जगण्यास जन्मास घातलेले परोपकारी महाॠषीच की ! कसलाच अंहकार नाही.
      वृक्ष फार लवती फलभरे |
      लोबंती जलद घेऊन नीरे ||
      थोर गर्व न करी वैभवाचा | 
      हा स्वभाव उपकाराचा || वृक्षवेलींचे नव्हे तर संपूर्ण सृष्टीतील याच्चवत घटकांचे औदार्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच राहिले नाहीत. निसर्ग मानवाची भूक भागवितो, तहान शमवितो, वायूलहरींनी श्रमपरिहार करतो.अन्न वस्त्र आणि निवारा देतो. चौसष्ट विद्या व कला शिकवितो. कवी वडस्वर्थ म्हणतो, " Nature is greatest storehouse of wisdom apart from being source of etarnal happiness." (निसर्ग केवळ ऐहीक सुखाचा एक स्त्रोत नसून शहाणपणाचा एक खजिना आहे) पण----

आपणच ऐहीक सुखाच्या नादी लागून पर्यावरणाचा र्हास करीत आलो आहोत. महात्मा गांधीजींनी म्हटले आहे की " माणसांच्या गरजांची पूर्तता करण्याइतकी क्षमता निसर्गात निश्चीत आहै. पण लालसा पूर्ण करू शकणार नाही." आपण या सृष्टीचा एक छोटासा घटक आहोत. परंतु हे विश्व, ही सृष्टी आपली नव्हे. मानव नव्हता त्याच्या कितीतरी हजारों वर्ष सृष्टी होती व आपण नसणार तेव्हा ही असणारच. आपण विश्वाचे मालक नव्हतो व नाही. असलोच तर थोड्या अंशी विश्वस्त ! ही भावना सतत बाळगून आपले वर्तन ठेवणे म्हणजेच स्वतःपासून पर्यावरणाची जागृती सुरू करणे होय. अन्यथा " मानवाचा मूलभूत विकास झाल्याशिवाय वैज्ञानिक प्रगती मानवाच्या पचनी पडणार नाही "  असे जे भाकीत प्रख्यात विचारवंत बर्टाड रसेल यांनी केले आहे ते खरें ठरू शकते.
--------------------------------------------               
             पर्यावरण प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे. जगातील सारे वृक्ष माझे बांधव आहेत. त्या वृक्षांवर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या निसर्ग सौंदर्यांचा मला अभिमान आहे.
या निसर्गातील गोष्टींचा पाईक होणाच्या पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. माझ्या देशातील वृक्षांचा, नद्यांचा, भूमीतील सर्व घटकाचा मी मान ठेवीन व त्यांचा अपव्यय होणार नाही याची काळजी घेईन. माझा देश व त्यातील नैसर्गिक घटक यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्याची वृध्दी व  संरक्षण हे माझे आद्य कर्तव्य आहे.
---------------------------------------------
                  कविता
           निसर्ग आणि मानव 

बाळपणीचा काळ जणू निसर्गाची सकाळ | आप्तस्वकीयांचा प्रेमाने जीवनाला वळण लावण्याचा काळ ||
गृहस्थाश्रमीचा काळ जणू निसर्गाची दूपार | कष्टाने प्रपंच मांडून आनंद लुटावा अपार || वानप्रस्थाश्रमींचा काळ जणू निसर्गाची संध्याकाळ | प्रपंचाचा फेटा सोडून विरक्त जगण्याचा काळ ||
निसर्गात जशी रात्र तसाच जीवनाला अंत | निसर्गाच्या कूशीत पुन्हा विसावण्यात कसली खंत ||
--------------------------------------------
           पर्यावरण घोषवाक्ये

१) प्रदुषणाचा धोका 
    अणूयुध्दापेक्षा मोठा |
२) करा वृक्षावर माया
    मिळेल थंडगार वारा |
३) पाण्याविना नाही प्राण
    पाण्याचे महत्व तू जाण |
४) पाणी अडवा पाणी जिरवा
    जीवन बागेत हिरवळ फूलवा |
५) धरती मातेच ऋण 
     फेडू या करून वृक्षरोपण |
६) निसर्गाचा नाश 
     म्हणजे मानव जातीचा नाश |
 ७) नसेल वृक्ष
     तर जीवन रूक्ष |
 ८) वनीकरणाचा अविष्कार 
      अन् दुष्काळाचा बहिष्कार |
 ९) रक्षावया पर्यावरण
     हाती घ्या वनीकरण |
१०) पर्यावरण का रखे ध्यान
        तभी देश बनेगा महान |
११) हर औद्योगिक प्रतिष्ठान
       प्रदूषण की ओर दे ध्यान |
१२) वृक्षोंकी रक्षा
      मानवी सभ्यताकी रक्षा |
१३) अंगणी लावा एक तूळस
        प्राणवायूचा होईल कळस |
 १४) राखा पर्यवरणाचा समतोल
         जाणा वृक्षरोपणाचे मोल |
१५) हवे शुद्ध अन्न, पाणी व हवा 
      तर माती अडवा पाणी जिरवा |
१६) करू या चराई बंदी , कुर्हाड बंदी
     पर्यावरणासाठी ही शेवटची संधी |
---------------------------------------------



 

 

निसर्ग आणि मानव मधील ऋणानुबंध भाग - २

मनुष्याला सुख देण्यासाठीच कोण्या दयाळू देवाने ही सृष्टी निर्माण केली अशी प्रबळ निष्ठा मानवाच्या मनात उभी राहिली आणि ति ही निसर्गाच्या पाठिंब्यानेच.मानव आणि पशू मध्ये सर्वात महत्वाचा फरक म्हणजे माणसाला बुद्धीचे वरदान लाभले आहे. पशुपक्ष्यानांही मेंदू असतो. आपल्याला काय हवे आहे याची जाणीव पशूपक्ष्यांना असतेच पण ते मिळविण्यासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न करणे हे फक्त माणसाचे वैशिष्ट्य आहे. सिंह वाघ इत्यादी पशू बलवान खरेच ! परंतू उद्या लागणारे अन्न ठेवण्यासाठी फ्रिजचा शोध लावला नाही. सृष्टीच्या निर्मितीपासून पशूपक्ष्यांची स्थिती जशी आहे तशीच आहे. वाघ व सिंह सारख्या पशूनीं आपल्या डावपेचात सुधारणा केलेली नाही. 

अनेक पशूपक्षी अतिशय सुंदर दिसतात. त्या सौदंर्यासाठी ते स्वतः कोणताही जाणीवपूर्वक प्रयत्न करीत नाहीत. चपळ खारीचे धावणे, थबकणे, वळून पाहणे, गोंडेदार शेपूट उभारणे इत्यादी सारं मोहक असते. हरिणाचे डोळे, सशाचे पांढरे शुभ्र, मऊ मखमली अंग, मोराचा विविध गडद रंगानी नटलेला पिसारा, वाघाचे पट्टेदार धिप्पाड शरीर, हत्तीचे पांढरे शुभ्र दात, लांब सोंड आणि डौलदार चाल या सर्व गोष्टी सुंदर असतात. पण कोणाला ? मनुष्याला. पशुपक्ष्यांच्या दृष्टीने त्यांचे ते फक्त अवयव आहेत. पशूपक्ष्यांना परमेश्वरांने ना दिली विकासाची दृष्टी, ना सौंदर्याची अभिरूची ! परंतु त्यांना तसेच ठेवण्यामागे विधात्याच्या योजना मधील प्रयोजन काय असावे ? याचा मानवाने अभ्यास करून आपली उन्नती निसर्गातील समतोल राखून सृष्टीला अधिक सुंदर बनविणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. ते पार पाडणे यालाच पर्यावरणाचा समतोल असे म्हणतात. पर्यावरण म्हणजे जमीन, पाणी, हवा, तसेच सर्व प्राणीमात्रांचा-सजीवांचा एकमेकांशी असलेला नैसर्गिक संबंध जपणे होय. 

मनुष्याच्या सुखसोयी साठी त्या दयाळू देवाने या सृष्टीची रचना किती ममताळूपणे केली आहे पाहा ! हा सूर्य, हा समुद्र, किती प्रचंड महाभूतें ! पण मनुष्याच्या सेवेस त्यांना देखील देवाने सज्ज ठेवले आहे. दुपारी तहान तहान करीत खेळून दमून मूले येतात आणि आई सकाळीच माठात ठेवलेले गार पाणी आपल्या बाळांना देते. तितक्याच मायेने हा सूर्य उन्हाळ्यात नद्या सुकून जाण्याआधिच समुद्रात असताना तोंडी धरवेना असे खारट पाणी आकाशाच्या विस्तीर्ण सरोवरात गोड आणि गार करून वर्षा ऋतूत आपणांस पोहचवितो. बरं समुद्राचे पाणी गोड करण्याच्या धाधंलीत सारा समूद्र गोड होऊन मनुष्यास मीठ मिळणे बंद करीत नाही. नाहीतर सारा संसार अळणी व्हावयाचा ! ज्याच्या तेजाने सारी जीवसृष्टी अस्तीत्वात आली, तो सूर्य किती नम्र आहे ! सकाळी तुम्ही उठा अगर उठू नका  तुमच्या आमच्या दाराशी, खिडक्यापाशी नम्र पणे उभा असतो. बरं तो ही वेळवर ! किती वक्तशीरपणा ! तुम्ही त्याला नमस्कार करो वा ना करो ! सर्वांना सारखाच प्रकाश देणार, सर्वांना सारख्याच वाटा दाखविणार ! अशा चैतन्यमय सूर्याला उगवतेवेळी आपण नमस्कार करणार नसू, तर चक्रीवादळात पावसाने थैमान घातलेल्या वेळी ईश्वराची याचना करण्याचा आपणांस काय तो अधिकार ! 

हा पाहा समूद्र ! आहे अथांग ! परंतू आपल्या मर्यादा ओलांडीत नाही. मर्यादा पाळणे हा गूण सागरकडून शिकावा ! व्यापकतेचा गर्व जसा त्याला नाही, तसाच आकाशाला ही नाही. आपण ज्या काही बर्या-वाईट कृती करतो त्या सगळ्या ते आपल्या उदरात सामावून घेते. आपले आजच्या नित्याचे मित्र रेडीओ, टिव्ही, संगणक, इन्टरनेट मोबाईल यांचा जन्मदाताच मूळी ते आकाश आहे. आकाशाची विशालता मोहक की चंद्राचे चांदणे मोहक, की लुकलुकणार्या तारकांचे सौंदर्य 
मोहक ? ते आकाश क्षणभर आपल्या  मनाची चलबिचल करते पण नंतर मान वर करून त्या आकाशाकडे पाहिले की क्षणभरात आपले मन असे काही स्थिर करते की त्यातून आपली बुद्धी आणि दृष्टी व्यापक होत जातात. मग आपोआप मन शांत होते. 

तो चंद्र पाहा ! श्रीमंताच्या महालावर प्रकाश देतो तसेच गरीबांच्या चंद्रमोळी झोपड्यांनाही चंदेरी मुलामा ठेवतो. गरीब श्रीमंत असा भेदभाव आहे का त्याच्याकडे ? चंद्राच्या उमळत्या कला पाहा, की प्रचंड ग्रहगोलांची परिभ्रमणे पाहा ; साधा रिमझीम पडणारा पाऊस असो;  की उकळता धातूरस फेकणारा ज्लालामुखीचा स्पोट असो; गवतावर फूल उगवणे असो की समुद्राची भरती ओहटी असो ही सर्वत्र प्रंचड कल्पनाशक्ती असलेल्या ईश्वराने तयार केलेली सुव्यवस्था आहे. सारे ग्रह एकाच आकाराचे नाहीत पण आपआपल्या कक्षातच नियम पाळून भ्रमण करत असतात. अनियमीत जीवन म्हणजे स्वतंत्रता नव्हे. स्वतःच्या मनाला अशी बंधने स्वतःच निर्माण करावीत व ती कसोशीने पाळायची हाच शाश्वत निसर्ग नियम आहे. त्यातच पर्यावरणातील समतोल राखण्याची शक्ती असते. 
                                       क्रमशः--

निसर्ग आणि मानवामधील ऋणानुबंध भाग - १

आज ५ जून जागतिक पर्यावरण दिन. शाळांना उन्हाळ्याची सुटी आहे. असे असले तरी शाळा सुरू झाल्यानंतर आमच्या शाळेत (स्वर्गीय आनंदराव पवार सरस्वती विद्यालय, वझिरा नाका, बोरीवली (प) मुंबई ) दरवर्षी पर्यावरण दिन साजरा होत असतो. त्या निमित्ताने या खेपेस पर्यावरण विषयांवर विद्यार्थ्यांसोबत प्रश्नोत्तर पद्धतीतून पारायण करण्याचे ठरविले आहे. ही प्रेरणा मला कोठून आली आणि पारायण हा शब्द या ठिकाणी वापरावा अशी बुद्धी कशी झाली हे ईश्वरालाच ठाऊक. पण त्यातूनच मला काही वर्षापुर्वीची एक गोष्ट आठवली. ती इथे प्रथम मांडतो.

माझ्या एका मित्राचे रेसाॅर्ट आहे. काही वर्षापुर्वी मे महिन्यातच एके दिवशी त्याचा फोन आला. त्याने फोनवरून त्याच्या रेसाॅर्टमध्ये पर्यावरण दिन साजरा करावयाचे ठरविले असल्याकारणाने चार-पाच दिवसात पर्यावरणावर एखादा लेख पाठविण्याची विनंती केली. मी पाचव्या दिवशीच माझा प्रदिर्घ लेख मित्राकडे पोहचता केला होता. ही गोष्ट आठवली तेव्हाच माझ्या लक्षात आले की मी मित्राला पाठविलेल्या  लेखाची झेराॅक्स काॅपी फाईलमध्ये आहे. पुष्कळदा आपण लिहीलेला लेख आठवला तरी तो तसाच पुन्हा लिहता येत नाही हे मी अनुभवत असतो. तो लेख पब्लीश झालेला नसल्यामूळे जागतिक पर्यावरण दिनोत्सवाच्या निमित्ताने ब्लाॅगवर पब्लीश करण्याची संधी मी साधून घेत आहे. संधी अशासाठी म्हणतो की विचार करून लेख लिहीण्यासाठी वेळ अपुरा पडणार हे जाणवले.  म्हणून पुर्वी लिहलेल्या लेखाची झेराॅक्स काॅपी समोर ठेवून सॅमसंग नोट्सवर उतारून घेत आहे. लेख मोठा असल्याकारणाने सॅमसन नोट्सवर उतारून घेण्यात, एडीट करण्यासाठी व पब्लीश करण्यासाठी  ही वेळ लागणार याची जाणीव ठेवून त्याचे तीन भाग करून पब्लीश केला एवढाच काय तो बदल केला आहे.

पर्यावरणाचे महत्व, पर्यावरणाची हानी व उपाय  या विषयाच्या जागृतीच्या दृष्टीने द्यावी लागणारी आकडेवारी,  स्वार्थ- सत्ता - संपत्ती बाबतचा  मानव्याचा हव्यास आणि त्यातून ऐषारामी जीवनाची लागलेली गोडी अशा सवयीमूळे अनेक प्रकारच्या गरजा वाढल्या व त्यासाठी अनेक यंत्राची सतत वाढत जाणारी निर्मितीत होत असलेली वाढ, वाढता साम्राज्यवाद, शस्त्रांत्रे निर्मितीची देशोदेशी सुरू असलेली स्पर्धा, वाढते औद्योगिकरण, टोलेजंग इमारती, वृक्षतोडी,  बेफिकीरपणे व बिनधास्त नैसर्गिक संपत्तीची सुरू असलेली उधळण इत्यादी संबंधीची माहिती व त्यातून वाढत चाललेले, वायू-जल-ध्वनीचे प्रदुषण इत्यादी गोष्टींचा उल्लेख या लेखात नसल्यामूळे हा लेख आपल्या पसंतीस पडेल असा नाही म्हणजेच Avarage आहे हे मी प्रांजळपणे कबूल करतो. 

या विषयावरील लेख, पुस्तके वाचली आहेत. या विषयावर स्वयंसेवी संस्थातर्फे आयोजित केले जाणार्या अभियानात मी अधून-मधून भाग घेतो. या विषयाचा मी तज्ञ वा अभ्यासक नाही. तरीही अलिकडे  गेल्या जानेवारी महिन्यात सेक्रेटरीयल कामासाठी आमच्या शाळेत उपस्थित असताना एका वर्गात माध्यमिक विद्यार्थ्यांचा पर्यावरणाचा तास सुरू असताना मला छोटसं भाषण देण्यासाठी एका शिक्षकाने आमंत्रीत केले. मी छोटसं भाषण केलं. एवढाच काय तो माझा पर्यावरण विषयाशी असलेला संबंध. याबाबत मला खंत आहे. म्हणून थोडाफार जाणीवपुर्वक प्रयत्न सुरू करावा अशी इच्छा झाली. म्हणून मागे लिहलेला पण पब्लीश न केलेला लेख तीन भागात विभागून आपल्यासमोर ठेवतो आहे.

पर्यावरण या विषयाची व्याप्ती विश्वाचे गूढ उलकण्यापर्यंत पोहचते. माहिती व तंत्रज्ञानाच्या क्रान्तीने जग जवळ आले आहे या बाबत दुमत नाही. पण भौतिक विज्ञानाच्या दृष्टीने हे जग दिवसें दिवस प्रसरण पावत आहे. त्यामूळे पर्यावरण या विषयाची व्याप्ती वाढतच राहणार आहे. 

विख्यात भौतिक वैज्ञानिक आईनस्टाईन यांनी म्हटले आहे की, 
' या विश्वात सर्वात अनाकालनीय गोष्ट कुठली असेल तर हे विश्वच होय.' पुढे एके ठिकाणी ते म्हणतात, Imagination is more important than knowldge. (ज्ञाना पेक्षा कल्पनाशक्ती अधिक महत्वाची असते)  मानवाला कल्पनाशक्ती व स्मरणशक्तीचे वरदान निसर्गाकडून झाले आहे. मानवाच्या ज्ञानाच्या शाखांत होणारी वाढ ही त्याला प्राप्त झालेल्या कल्पनाशक्ती तून होत असते.

मानव व प्राण्यांमध्ये असलेला महत्वाचा फरक म्हणजे माणसाला बुद्धी प्राप्त झाली आहे. फूल उमलण्याची क्रिया ही सहज असते. तसेच कल्पनाशक्ती व स्मरणशक्ती या निसर्गदत्त जाणिवा आहेत आणि त्या माणसांमध्ये परिपूर्ण आहेत. मूलतः आपली ज्ञानेंद्रियेच नव्हे तर आपलं सारं शिरीर पंचमहाभूतांचे बनलेले असते. या विश्वातील याच्चयावत वस्तूजात या पंचमहाभूतांतील कोणत्या तरी एक वा अधिक गुणाचेंच बनलेले असते. 

या विश्वाच्या उत्पत्ती सबंधित अनेक जणांनी संशोधन केले ते ही निसर्गाच्या सानिध्यात राहूनच.  मानवाने जी काही प्रगती केली त्या यशामागील खरे गमक मानव व निसर्ग मधील असलेला स्नेह म्हणा वा ऋणानुबंध हेच आहे. या संबंधित एक कथा सादर करतो.

एकदा चैतन्यरूपी ईश्वराला आपण अनेक व्हावे असे वाटले. त्यातूनच  एक शक्ती निर्माण केली. नंतर त्या शक्तीदेवीतून मिळालेल्या प्रेरणा तून महाकाय पंचमहाभूतें निर्माण केली. त्यांच्या चेहर्यावर आलेला आनंद व तेज पाहून शक्ती देवतेने विचारले, 'आज आपण फार खुषीत दिसत आहात, कारण सांगा की !  ईश्वराने उत्तर दिले. ' मी आज महाकाय अशी पंचमहाभूतें निर्माण केली आहेत.'  नंतर पंचमहाभूतांची वैशिष्टे व त्यांच्यी कार्ये व परस्पर समन्वय कसा असेल हे ही सांगितले आणि ईश्वर झोपी गेला.पण-

एका तासात त्याला जाग आली. तेव्हा शक्ती देवीने प्रश्न केला, ' आता कुठले काम काढले आहे ? ' त्यावर ईश्वर म्हणाला, केवळ पंचमहाभूतें निर्माण करून मला शांती मिळत नाही. माझे काम अपुरे आहे असे म्हणत घराबाहेर पडला. नंतर -- विविध वृक्ष, वेली ची निर्मिती करून आणि त्यावर विविध रंगी- बेरंगी फूले उमविली. त्या वृक्षांवर विविध आकार, व रंगाची अमृतमय फळे निर्माण केली. व्वा ! आता तर  सृष्टी चांगली सजवली आहे. असे स्वतःशीच बोलत  ईश्वर घरी परतला. शक्तीदेवतेने विचारले ' आज कुठली कामें केली ' असा प्रश्न विचारला. त्यावर ईश्वराने सृष्टी कशी सजवली आहे याचे उत्तर देऊन झोपी गेला.  आज ईश्वराला गाढ झोप लागली आहे असे शक्तीदेवीला वाटले खरे, पण लिगलीच ईश्वराला जाग आली. शक्ती देवीला अंतर्ज्ञानातून कळले की ईश्वराने हातात घेतलेल्याल्या कामात त्रुटी राहिल्या असाव्यात म्हणून त्या त्रुटीचे स्वरूप विचारले. त्यावर ईश्वर म्हणाला ' सृष्टी सजली आहे पण सृष्टीत हालचाल दिसत नाही.' ती निर्माण करण्यासाठी मी बाहेर जात आहे असे म्हणत ईश्वर बाहेर पडला. 
  
नंतर ईश्वराने विवाध आकाराचे, रंगाचे, जलाशयात राहणारे प्राणी, पाणी आणि जमिनीवर चालणारे प्राणी निर्माण केले. फक्त जमिनीवर राहणारे व चालणारे असे दोन पायाचे व चार पायाचे, विविध आकाराचे, रंगाचे,  विविध चाल असणारे, प्राणी निर्माण केले.  नंतर विविध आकाराचे जमिनीवरून  सरफटत चालणारे प्राणी निर्माण केले. नंतर रंगी-बेरंगी विविध आकाराचे,  विविध प्रकारचे आवाज, कुंजन करीत आकाशात स्वैरपणे विहार करणारे, आकर्षक व मोहक असे पक्षी निर्माण केले. आज ईश्वराने प्रचंड मेहनत घेतली. ईश्वराचा एक दिवस म्हणजे एक युग असते. ईश्वर आनंदाने घरी परतला. शक्ती देवीला आजच्या कामाचा तपशिल देताना ईश्वराचा आनंद ओसांडून वाहात होता. नंतर ईश्वर झोपी गेला. पण--- 

या खेपेस अर्ध्या तासातच जाग आली म्हणून शक्ती देवीने विचारले, 'आज झोपमोड लौकर कशी झाली ? यावर उत्तर देतांना ईश्वराच्या चेहर्यावर तणाव दिसत होता. तरी ही त्याने उत्तर दिले,  " देवी मी अतिशय सुंदर अशी सृष्टी निर्माण केली आहे हे खरेच; या सृष्टीत हालचाल करणारे  अनंत पशू पक्षी निर्माण करून सृष्टीत movment आणली. पण मला आता या सृष्टीची देखभाल करणारा, improvment करणारा प्राणी निर्माण करावयाचा आहे. हे काम महा कठीण आहे. जी सृजन होते ती सृष्टी. पण ती लागलीच सृजन होत नसते. तिला टप्याटप्यात अधिक सुंदर करणारा, तिचे सरंक्षण करणारा, व ज्याला सौंदर्याभिरूची असेल, असा बुद्धीवान प्राणी निर्माण करावा लागेल. तो प्राणी केवळ बुद्धीवान होऊन भागणार नाही. तो सृष्टी संबंधी सेन्सिटीव्ह असावयास हवा. सृष्टीची भक्ती करणारा असावा तसेच तो माझा शोध घेण्याचा (म्हणजे सतत माझे नामस्मरण करणारा) प्रयत्न करणारा असा जन्मास घालावयाचा आहे, असे  म्हणत ईश्वर घराच्या बाहेर पडला. प्रचंड मेहनत केल्यानंतर ईश्वराने सर्वात शक्तीमान, सर्वात बुद्धीमान, गुणी, असा प्राणी जन्मास घातला त्याचे नाव आहे मानव. 
  
वाघ, सिंह, हत्ती इत्यादी ताकदवान प्राणी असोत, वा आकाशात उडणारे पक्षी असोत, वा जलाशयात राहणारे जलचर प्राणी वा जमिनीवरून चालणारे व  सरपटणारे प्राणी असोत, वा जमिनीवरील सर्वात चपळ असे प्राणी असोत, माणूस आपली कार घेऊन चित्यापेक्षा अधिक वेगाने धावू शकतो. माणूस रेल्वे गाडीतून जमिनीवरून सरपटत प्रवास तो ही अधिक वेगाने करतो. माणूस जलाशयातून बोटीने प्रवास करतो. जलाशयात वा समुद्रात खोलवर असणार्या प्राण्यासोबत आपल्या पाणबूडीतून प्रवास करतो. आकाशात भरारी घेणार्या पक्षांप्रमाणे माणूस विमानातून प्रवास करतो. ताकदवान पशूपेक्षा यंत्राच्या साह्याने माणूस मोठाल्या इमारती बांधू शकतो, मोठाले वजनदार ब्रिज बांधू शकतो. सारांश मनुष्य ही ईश्वराची सर्वोत्तम निर्मिती आहे. माणसावर निसर्गाची कृपा आहे. 

वैदिक काळा पासून आपल्या संस्कृतीत ईशावास्यम इदं सर्वम् (चराचर सृष्टीत ईश्वर असतो) असे म्हटले जात आहे. वृक्षवेली आम्हां सोयरे असे तुकाराम महाराज म्हणाले आहेत. पर्यावरणासंबंधी आपल्या संतमहंतानी आपआपल्या साहित्यातून निसर्गाची निगा म्हणजेच चराचर सृष्टीला अधिकाधिक सृजन बनविण्याचे कार्य ईश्वराने मानवाकडे सोपविले आहे असा उपदेश केला आहे. निसर्ग सुद्धा ईश्वराचेच रूप. म्हणूनच आपण निसर्गाला ही देव समजून त्याची पूजा करतो. अवकाशातील ग्रह-तारे नक्षत्रांची ही आपण पुजा करतो. आप,तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी या पंचमहाभूतांची ही आपण पुजा करतो. आपल्या संस्कृतीत ऋतुमानानुसार उत्सवांची व सणांची मांडणी केली आहे. त्या पाठीमागचा हेतू हाच की त्यायोगे निसर्गातील प्रत्येक घटकात समन्वय व्हावा, सतत समतोल राहावा आणि कुठल्याही नैसर्गिक संपत्तीला ओरबडून काढण्याचे व्यसन न लागावे इतकीच किमान अपेक्षा ईश्वराला त्याच्या सर्वात लाडका अशा अपत्याकडून आहे. 
                                      क्रमशः--










दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...