गुरुवार, २८ डिसेंबर, २०२३

लिबरल मंडळीचा प्रचार आणि विरोधी पक्षांचा व्यवहार (भाग -२)


आता आपण लेट्स-अप युट्युब चॅनेलवर ४ डिसेंबर रोजी राजकीय अभ्यासक हेंमत देसाई यांच्या मुलाखती वर चर्चा करणार आहोत. हेमंत देसाई हे मराठी माध्यमातील चॅनेल्सवर राजकीय अभ्यासक म्हणून अवतरत असतात. त्यांचे राजकीय घडामोडी वरील विश्लेषण लिबरल मंडळी सारखेच असते. अलिकडील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालासंबंधी हेमंत दैसाई यांनी केलेलं विश्लेषण थोडक्यात आपल्या समोर ठेवतो.

१) सुरवातीसच हेंमत देसाई यांनी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड च्या निवडणूकात काँग्रेसचा झालेल्या पराभवचे वर्णन अत्यंत त्वेषाने ' दारूण पराभव 'असे केले. विरोधी पक्षांनी ओबीसींच्या जनगणनेची केलेल्या मागणीची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  खिल्ली उडविली. ' मी किसान, गरीब आणि महिला यांचे कल्याण पाहतो. हाच माझा धर्म आहे. मी जात-पात बघत नाही.' हे पंतप्रधान मोदींचे जाहीर भाषणातले उद्गार हेमंत देसाईने स्वतः म्हणून दाखविले.
२) भारत जोडो कुठे आहे ? त्या यात्रेतून झालेला संपर्क टिकून राहावा यासाठी काही प्रयत्नच झाले नाहीत.
३) काँग्रेसला मध्यप्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड येथे घवघवीत यश कधीच मिळाले नाही.
४) भाजपाकडे ४० लाख समर्पित कार्यकर्ते आहेत. गुजरात पेक्षा ही मध्यप्रदेशमध्ये भाजपाची ताकद अधिक आहे. संघाचे आणि वनवासी कल्याण आश्रमचे कार्य गुजरात पेक्षा कितीतरी वर्षे अगोदर पासून मध्यप्रदेशात सुरू आहे.
५) अयोध्येत फुकट वारी करून देण्याची, सर्वत्र हनुमानाची मंदिरे, कौसल्यामातेची मंदिर बाधण्याच्या कमलनाथाच्या घोषणा हवेत विरल्या.
६) भाजपा संकल्प यात्रा काढणार
७) राजस्थान मध्ये सती जोहर मध्ये गेली पण सतीचे मंदिरे बांधली आहेत.
८) राजस्थान मध्ये एका हिंदुची निर्घूण हत्या. गेहलोतचे सरकार निष्क्रीय. भाजपाने फायदा घेतला.
९) राजस्थान मध्ये भाजपाने निष्क्रीय आमदारांना घरी बसविले.
१०) मोदींची इमेज व मोदींची गॅरेन्टी
११) गेहलोत यांच्या ओबीसी, आर्थिक दृष्ट्या गरीब, महिलांचा उत्कर्ष अशा रेवडी योजनांचा फज्जा उडाला
१२) महाराष्ट्रात तर मविआ सरकारची credibilty संपली आहे. 
१३) भाजपा पराभवाने खच्चीत होत नाही.
१४) आता तर काँग्रेसला इंडी आघाडीत अधिक जागा मागण्याची संधी हूकली आहे.
१५) राजकारण एकांगी होत आहे. ही धोक्याची सूचना आहे. लोकशाही संविधान धोक्यात आले आहे.
१६) गेहलोत आणि सचिन पायलट मधील वैर कमी करण्याची ताकद काॅग्रेस पक्षांच्या श्रेष्ठींकडे राहिली नाही. 

संपुर्ण मुलाखतीतुन तीन राज्यातील काँग्रेसचा दारूण पराभव हा जणू काही हेमंत देसाई यांचा स्वतःचा पराभव झाला की काय हे पदोपदी जाणवले आहे. मोदी, भाजपा व संघाची ज्यांना कावीळ झाली आहे अशापैकी हेमंत देसाई एक राजकीय अभ्यासक आहेत. विरोधी पक्षांची ओबीसीच्या जनजणनेच्या मागणीवर नरेंद्र मोदींनी जाहीर सभेत खिल्ली उडविली आणि ती पाहिली तेव्हा हेमंत देसाई गर्भगळीत झालेले असावेत असा माझा अंदाज आहे. लिबरल मंडळींचं एकच ध्येय असते ते म्हणजे हिंदू समाजाला वेगवेगळ्या जाती-पंथात विभक्त करणे. ही त्यांची राजकीय चाल तलवारीच्या एका फटक्याने ते ही जाहीर सभेत मोदींनी कापून टाकली. त्याच्या वेदना सर्वच लिबरल राजकीय अभ्यासकांना सहन कराव्या लागत असतील. भाजपाच्या संकल्पित संकल्प यात्रेने सर्व विरोधी पक्षांना संपुर्णपणे उखडून फेकून दिले जाणार असे चित्र हेमंत देसाईच्या यांच्या प्रतिक्रीयेतून स्पष्ट दिसले. नैराश्याने ग्रासलेले असुनही हेमंत देसाई यांनी शेवटी आपली लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल असा शेरा मारलाच. म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, तशातली ही गत. अशी गत फक्त हेमंत देसाईं, गिरीश कुबेर आणि कुमार केतकर यांचीच झाली आहे असे नाही. हिन्दी, इंग्रजी तसेच इतर प्रांतीय भाषेतील न्यूज चॅनेल्स आणि वृत्तपत्रातील लिबरल पत्रकार-संपादक मंडळीची हीच गत आहे. म्हणून त्या मंडळींनी चार राज्यातील निवडणूक निकालाचे जे विश्लषण केले आहे ते सादर न करता या भागाची समाप्ती करतो.

बुधवार, २७ डिसेंबर, २०२३

लिबरल मंडळींचा प्रचार आणि विरोधी पक्षांचा व्यवहार (भाग १ )



या लेखाच्या शिर्षकाचे नाव थोडसं चमत्कारी वाटते पण तसे काही नाही. व्यवहार या शब्दाचा अर्थ सामान्यतः व्यापार व त्यातून होत असलेली पैशाची उलाढाल असा आहे. तसे पाहता सरकार साठी निवडणूका या खर्चीक असतात. राजकीय पक्षांना ही प्रचार करण्यासाठी पैसा लागतो. उद्योगपती अधिकृतपणे राजकीय पक्षांना आर्थिक मदत करीत असतात. त्या बदल्यात ते सरकार कडून आपल्या उद्योगासाठी सोयी व सवलती घेतात. हा व्यवहार स्वातंत्र्य लढ्याच्या काळापासून सुरू आहे. तसेच जगभरातील लोकशाही देशात ही असा व्यवहार होत असतो. मतदारांना आपल्याकडे यावे या हेतूने पैशाचे प्रलोभन सर्वच राजकीय पक्ष करीत असतात. हे एक आपल्याला न पचलेलं सत्य. जगभरातील सर्व लोकशाही देशात हे कटु सत्य वावरत असते फक्त त्याची वावरण्याच्यी पद्धत भिन्न असू शकते. थोडक्यात पैशाची उलाढाल राजकरणात ही असतेच की. राजकारणातला व्यवहार म्हणजे काय या संबंधीतली चर्चा कधी न संपणारी आहे. कारण आज केलेली चर्चा पुढल्या दहा वर्षात बदलेली असू शकते. कारण काळानुसार तसा बदल अपरिहार्य असतो. 

आजच्या घडीला राजकारणतला व्यवहार म्हणजे " राजकीय पक्षांचे वर्तन. म्हणजेच नेते आणि कार्यकर्त्यांच्या चालण्या बोलण्यातले तारतम्य; सोबत पक्षाच्या विचारसरणीनुसार आमदार खासदार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी राबवलेली कार्यपद्धत ; लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्याचे आधुनिक पद्धतीने प्रशिक्षण करून राष्ट्रीय पातळीपर्यंत इतर पक्षांहून अधिक समर्पित व सांघिक भावनेचं उत्कट दर्शन मतदारांना व्हावे यासाठी घेतलेले कष्ट; काळानुसार अचूक पद्धतीने स्पर्धक पक्षांवर कुरघोडी ठरू शकतील अशा राजकीय चालीची रचना करणे. मग त्या रचना कृतीत उतरविण्यासाठी थेट राष्ट्रीय अध्यक्षापासून ते बुथ पातळी वरील कार्यकर्त्यांचे प्रयत्न, प्रचार करताना मतदारांची नाडी ओळखून हवा तयार करणे, पक्षात एकच शिर्षस्थ नेता व त्याच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी निर्माण केलेली सक्षम यंत्रणा, आणि पक्ष सत्ताधारी असेल तर पक्षाच्या निवडणूक जाहिरनाम्यानुसार दिलेली वचनं बहुतांशी पाळली आहेत आणि बाकी राहिलेल्या वचनांची गॅरेन्टी इत्यादी गोष्टींची मतदारांना होत असलेली खात्री,  सत्ताधारी पक्षाने कल्याणकारी योजना पुर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे केलेला आटोकाट प्रयत्न, त्यातून मतदारांनी दिलेली दाद, निवडणूका जिंकल्याच्या नशा पासून दूर राहण्याची नेते आणि कार्यकर्त्यांनी जपलेली संकृती,    देशाची सुरक्षतता, विकास, कायदा व सुव्यवस्था इत्यादी बाबतीत कटीबध्दता, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा स्वाभिमान गहाण न ठेवता  भारतियांची 'जगभर शांतता नांदावी' या भावनेची कदर करीत रचलेले परराष्ट्रीय धोरण इत्यादींचा समावेश म्हणजे राजकीय पक्षाचा व्यवहार." 

मी वर नमुद केलेली राजकीय पक्षांच्या व्यवहाराची व्याख्या म्हणा वा व्याप्ती संबंधीत दुमत असू शकते . या ठिकाणी भ्रष्टाचारा पासून दूर राहण्याच्या वृत्तीचा मी उल्लेख केला नाही. याचे कारण असे की आपण इथे राज्यव्यवस्था कशी असावी या विषयावर चर्चा करीत नाही. दुसरे असे की निवडून आलेले खासदार, आमदार, नगरसेवक, स्थानिक संस्थांचे लोकप्रतिनिधी आपआपल्या सभागृहात शपथ घेत असतात. आता त्या शपथेची किती इमान राखतात हा एक स्वतंत्र विषय आहे. तरीही राजकीय पक्षांच्या प्रमुखाने या बाबत दक्ष राहावे आहे अशी अपेक्षा असते. त्यातल्या त्यात ज्या पक्षातील नेते व लोकप्रतिनिधींचे कार्य स्वच्छ आहे त्या पक्षाला निवडणूकात अधिक यश मिळते. जसे कर्म तसे फल हा निसर्ग नियम आपले काम चोख करीत असतो. 

कदाचित राजकीय पक्षाचा व्यवहाराची जी मी व्याख्या केली ती भाजपाच्या व्यवहाराची आहे असे आपल्याला वाटत असावी. त्याबद्दल माझा आक्षेप नाही. पण ती वस्तुस्थिती आहे. सतत भाजपा जिंकत असेल तर त्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न प्रथम लिबरल मंडळींनी करावयास हवा आहे. कारण विरोधी पक्ष लिबरल मंडळींच्या तत्वज्ञानालाच सर्वेसर्वा  राजकीय व्यवस्थेचं आदर्श माॅडेल मानत आहेत. 

मी पत्रकार नाही आणि राजकीय अभ्यासक ही नाही. मी राज्यशास्त्राचा पदवीधर ही नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल की मला या लेखाची सुरूवात करण्याची प्रेरणा अलिकडील पाच राज्यांच्या निवडणूकांच्या निकालाचे लिबरल मंडळींनी केलेलं विश्लेषण ऐकल्यानंतर मिळाली. तसे पाहता  सन १९८९ पासून म्हणजेच भाजपाची वाढ होऊ लागल्या पासून  या लिबरल मंडळींनी हिंदुत्व, राष्ट्रवाद, महात्मा गांधीची हत्या करणारी ही मंडळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छुपा एजंडा, इत्यादी मुद्यांवर भाजपाला घेरत असताना मी यांना पाहिले आहे, ऐकले आहे आणि यांचे लेख, विश्लेषण वाचत आलो आहे. भाजपाच्या ताकदीत वर चढत गेलेला ग्राफ ही वाचला आहे आणि अनुभवला ही आहे. त्यातून राजकीय चाल रचण्यात भाजपा वरचढ झालेला दिसतो तर लिबरल मंडळी विसाव्या शतकापासून मांडत आलेले तत्वज्ञान आणि त्यावर आधारीत कृतीचा आग्रह करीत आहेत. या लिबरल मंडळींच्या विचारसरणीचा तसे पाहता विरोधी पक्षांना म्हणजे इंडी नावाच्या आघाडीतल्या पक्षांसाठी लोकसभेच्या निवडणूकांत फायदा होत नाही असे २०१४ पासून दिसत आहे.

मागील लेखाचा शेवट करतांना मी म्हटले होते की,  "आता माझ्याकडे अधिक काही लिहावे असे राहीले नव्हते म्हणून मी थांबलो." तरी ही राजकीय लेख लिहावयास बसलो आहे. म्हणतात ना, सुंभ जळले तरी पीळ काही जात नाही हे सत्य मला ही लागू आहे. हे मी नाकारीत नाही. पण मला आपल्या देशात खरोखरी द्विपक्षीय राजवट असावी असे वाटते. पण भाजपा व संघाचा द्वेष विरोधी पक्ष जितका करीत आहेत, त्याहून अधिक जहरी द्वेष ही लिबरल मंडळी इलेक्ट्रानिक्स, प्रिन्ट आणि सोशल मिडीयावर ओकत आहे. दोन राजकीय शक्ती आमने सामने असल्या तरी सहमतीचा बिंदु शोधता येतो. पण या लिबरल मंडळींची भुमिका सतत टोकाची राहिली आहे. म्हणून या संबंधीत सविस्तरपणें व्यक्त व्हावे असे वाटले. या लेखात लिबरल मंडळींनी पाच राज्यातल्या निवडणुकांच्या निकालाचे जे विश्लेषण केले आहे त्यांच्या पैकी दोन अभ्यासकांच्या प्रतिक्रीया केंद्र स्थानी ठेवून या लेखाची मांडणी करीत आहे. म्हणून या लेखाची  व्याप्ती दोन ते तीन भागा पर्यंत वाढेल हे प्रांजळपणे कबूल करतो. कृपया ही मालिका आपल्या देशातील राजकीय पक्षांच्या व्यवहाराशी निगडीत आहे. कुठल्याही दोन वा तीन राजकीय विचारप्रणालीचा तौलानिक अभ्यास केला आहे आणि त्यावर चर्चा करीत आहे असे मुळीच नाही. तितकी माझी कुवत नाही हे आपणास ठाऊक आहे.

प्रथम लोकसत्ताचे संपादक गिरीष कुबेर हे बीबीसी न्युज चॅनेलवर झालेल्या त्यांच्या मुलाखतीत ते काय म्हणाले आहेत ते पाहू या. 
१) काँग्रेसला एका राज्यातील विजयानंतर सुस्ती येते. तर भाजपा व्यावसायिक राजकारण खेळते.
२) काँग्रेसचे राहूल गांधी फूलटाईम काम करीत नाही. तर भाजपा मधील दोन नंबरचे नेते अमित शहा छत्तीसगड आणि मध्यप्रदेश मध्ये ठाण मांडून काम करीत असतात.
३) काँग्रेस राज्यस्तरावरील नेत्यांना  विश्वासात घेत नसते. तर भाजपा स्थानिक नेत्यांना गतिमानता देते.
भाजपाने मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मधील शिवराज चौहान, राजमाता वसुंधरा राजे, आणि रमणसिंग यांना तिकीट देण्यासाठी थोडा उशीर केला पण नंतर त्यांचा योग्य तो सन्मान ही केला. भाजपा आपल्या राजकारणात सतत लवचिकता ठेवते. काँग्रेसला राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट या दोन नेत्यांमध्ये समेट घडवुन आणणे जमले नाही. 
४) भाजपा शेवटच्या क्षणापर्यंत लढत असते. भाजपाला ॲन्टी इनकम्बन्सी नसते. कारण कल्याणकारी योजना कार्यन्वीत झाल्याशिवाय आमदार खासदारांना आराम वा विश्रांती मिळत नसते. या शिवाय भाजपा कडे सशक्त केंद्रीय सत्ता आहे. विरोधी पक्षांच्या रेवडी योजनांचा बोजवारा वाजतो. उदाहरण तेलंगणातील केसीआरांच्या योजना हवेतच विरल्या. भाजपा योग्य ठिकाणी भावनिक राजकारण ही खेळते.
५) भारताच्या उत्तर भागात खासदारांची संख्या अधिक असते तर दक्षिण भागात संख्या कमी असते.
६) भाजपा आपल्या रेवडी योजनाला धर्माची जोड देत असते. भाजपाकडे हिंदुत्व, राष्ट्रवादी चेहरा आहे.
७) मध्यप्रदेश मध्ये काँग्रेस जिंकणार असे वाटले होते. पण कमलनाथने संपुर्ण प्रचार हेलीकॅप्टर वापरून केला. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादवांना काडीची ही किंमत कमलनाथनी दिली नाही. 

गिरीष कुबेर यांचे विश्लेषण मी  थोडक्यात मांडले आहे. वरवर त्यांनी भाजपाच्या संघटन शक्तीचं कौतुक केलं आहे. ते तसे त्यांनी केले यासाठी की विरोधी पक्षांपैकी एखादा पक्ष विशेषतः काॅग्रेस ने संघटन शक्ती वाढवावी अशी इच्छा ते व्यक्त करत असावेत. एरवी राजकीय विचारसरणी संबंधीत काही काळानुसार बदल करावा असा सल्ला कोणताही लिबरल राजकीय अभ्यासक इडीतील घटक पक्षांना देत नाही. कारण ती सारी मंडळी आपल्या वैचारीक कुंपणातून बाहेर पडण्याची शक्ती गमावून बसले आहेत. म्हणूनच गिरीश कुबेर यांनी भाजपा प्रचारात हिंदुत्व, मोदीचा चेहरा, रेवडी योजनाला धर्माची जोड देणे, इत्यादी बाबी ठळकपणे ठेवल्या आहेत. गिरीशजीने भाजपाकडे राष्ट्रवादाचा चेहरा आहे असे म्हटले आहे पण भाजपाला अपेक्षित असलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादावर जरा ही भाष्य केले नाही. इथेच भाजपा आणि समस्त विरोधी पक्ष, व त्यांची समर्थक लिबरल मंडळीमध्ये भली मोठी तेढ आहे. दक्षिण भारतात लोकसभेच्या जागा कमी आहेत असे म्हणत गिरीश कुबेर, यांनी अप्रत्यक्ष रित्या कुमार केतकर यांच्या 'भाजपा राष्ट्रीय पक्ष नाही ' या भाष्याला समर्थन दिले आहे असे दिसते. 

कुमार केतकर हे आजपावेतो नेहरू-गांधी घराण्याची पुजा करीत आले आहेत. या घराण्यातील प्रत्येक व्यक्ती देशाच्या उच्च स्थानी विराजमान होण्यासाठी जन्मले आहेत अशी त्यांची धारणा आहे. राजापेक्षा भाट अधिक राजनिष्ठ अशी कुमार केतकरांची प्रकृती आहे. इंडी नावाच्या आघाडीतील घटक पक्षांना राहूल गांधीचे नेतृत्व मान्य होणार नाही. तसेच काँग्रेसचा उत्तरेकडील तीन राज्यांच्या पराभवा मूळे इडी आघाडीत काँग्रेसला वर्चस्व मिळण्याची संधी हुकली आहे. म्हणून केतकरांच्या भाष्यावर अधिक चर्चा न करता लेखाचा भाग १ ची समाप्ती इथे करतो.

बुधवार, ६ डिसेंबर, २०२३

देशाच्या राजकीय पटांगणावरील सेमीफायनल सामन्याचा निकाल

 


गेल्या ऑगस्ट २३ तारखेनंतर आज मी प्रथमच ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या समोर संवाद करण्यासाठी आलो. तो लेख अराजकीय होता. मात्र २० जुलैचा लेख राष्ट्रवादी काॅग्रेसमध्ये उभी फूट पडली त्या संबंधित होता. त्या नंतर देशाच्या आणि जगाच्या राजकीय पटंगणावर अनेक घटना घडल्या आणि घडत ही आहेत. तरी ही मी लेख लिहले नाहीत. याचा अर्थ मी अन्य क्षेत्रात व्यग्र होतो असे नाही. आपल्या देशातील राजकारणाचं स्वरूप सन २०१४ पासून 'जैसे थे' असेच राहिले आहे. म्हणून विरोधी पक्षांवर टिका करण्यातही फारसा अर्थ राहीला नाही अशी माझी समजुत झाली आहे. ती चार राज्याच्या विधानसभा निवडणूकीच्या निकालातून खरी ठरली आहे. विरोधी पक्ष सततच्या चुकांची दुरूस्ती करू इच्छीत नाहीत हे पुन्हा स्पष्ट झाले. जुलै पासून मला जी सवड मिळत होती तिचा उपयोग मी जागतिक राजकारणाचा अभ्यास करण्यासाठी करू लागलो आहे.                                        चार राज्यांच्या निवडणूकाच्या प्रचाराची धामाधूम मी पाहिली नाही. मोदी सरकार उलथून पाडण्याची किंवा भाजपाला पर्ययाने मोदींना पुन्हा सत्तेवर येऊ द्यावयाचे नाही असा चंग जगातील सर्वात श्रीमंत असे जाॅर्ज सोरास महाशय व शक्तीवान पण दृष्कृत्यें करणार्या लिबरल लाॅबीनी बांधला आहे. त्यामुळे चार राज्यातील विधानसभा निवडणूका २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकाची सेमी फायनल मॅच असे मानले गेले. त्या चार राज्यातील निवडणूकापैकी तीन राज्यात भाजपाने प्रचंड विजय मिळविला. त्यामुळे लिबरल लाॅबीची फजिती झाली. त्या फजिती संबंधित चर्चा करावी असे मला वाटले म्हणून हा लेख प्रपंच. 

काळ कसा बदलतो ते पहा. सन १९९८ ला दैनिक लोकसत्तेत माझा  'सर्वधर्म समभाव व राजकीय पक्षांचा व्यवहार ' या शिर्षकाचा लेख संपादकीय म्हणून प्रकाशित झाला होता. त्या काळात केंद्रात राजकीय अस्थिरता होती. म्हणून देशाच्या आर्थिक स्थिरते साठी राजकीय पक्षात मतैक्य व्हावे या शिर्षकाचा मी लिहलेला एक छोटा लेख दै लोकसत्तेत पब्लीश झाला होता. नंतर लोकप्रभात या साप्ताहीकात 'अल्पसंख्यांक कोणाला म्हणावे ' या शिर्षकाचा माझा लेख प्रकाशित झाला.  सन १९९१-९२ साली  'आयुर्विमा क्षेत्रात  स्वदेशीचं महत्व ' हा १५०० शब्दाचा लिहलेला माझा लेख अर्थ वृत्तान्त पुरवणीत छापून आला होता. अर्थात हे सर्व लेख माझे परम मित्र, आर्थिक गुंतवणूक सल्लागार व अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे श्री विनायक कुळकर्णी यांच्या सहाय्याने छापून आले होते.   दै लोकसत्तेचे संपादक बदलले गेले आणि माझ्या लेखांना स्थान मिळेनासे झाले. सन १९७५ ला देशात आणिबाणी लावून वैचारीक स्वातंत्र्य छाटले गेले होते त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सरकारच्या विरोधात लढा उभारला गेला त्यात अग्रणी स्थानावर राहीलेले दै लोकसत्ता आज लिबरल अभ्यासकांचे हातचे बाहूले झाले आहे. माझे वृत्तपत्रात लेख छापून येण्याचा मार्ग बंद झाला तरी मी लेखन चालू ठेवले होते. त्यात राजकीय, सामाजिक तसेच अध्यात्मिक विषयावर ही लेख आहेत. त्यातील तत्कालीन राजकीय घटनावरील लेख ऑउट ऑफ डेट झाले आहेत असे नाही. कारण त्या घटनांना ऐताहासिक महत्व कायम असते. म्हणून सामाजिक विषयाच्या लेखांसोबत ते लेख ही मी जपून ठेवले आहेत. योग्य त्या वेळी ते ब्लाॅगवर प्रकाशित करीत राहणार आहे.                                                          आजच्या Digital युगात आपल्या सर्वसामान्यांना ही व्यक्त होण्यासाठी (ज्याला सोशल मिडीया मानतो अशी) blog, whatsapp,Twiter  इत्यादी माध्यमें अस्तित्वात आल्यामुळे जगभरातील कुठल्या ही देशातील कुठल्याही घटनां किंवा राजनैतिक विषयांवर नेगेटिव नॅरेटिव मांडून तेथील सरकार उलथुन पाडण्याची प्रचंड शक्ती असलेल्या लिबरल लाॅबीचा भारतीय खेळपट्टीवर पराभव होत आहे. जेव्हा सोशल मिडीया शक्तीशाली नव्हती अशा काळात अटल बिहारी वाजपेयींचे सरकार लिबरल लाॅबीने दोन वेळा पाडले होते. तिसर्यांदा निवडणूका झाल्यानंतर वाजपेयी सरकार विजयी झाले आणि पाच वर्षाचा काळ ते सरकार टिकले. पण २००४ च्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी लिबरल लाॅबीने मिडीया द्वारे नेगेटिव्ह नॅरेटीव मांडून वाजपेयी सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश आले. पण नरेंद्र मोदी यांचे सरकार दोन टर्म पुर्ण केलेलं युपीए नावाचं काॅग्रेस प्रणित आघाडी सरकारचा गलथान, मुस्लीम धर्जिणा,  प्रचंड भ्रष्टाचाराने माखलेला असा कारभार आणि खोटा-नाटा भगव्या दशहतवादाचे भूत उभे करण्याचे महापाप केल्यामुळे  जनतेच्या मनात प्रचंड असंतोषातून उदयास आलेलं आहे. याचं स्मरण जनतेला आज ही आहे. ही बाब लिबरल लाॅबीच्या ध्यानांत येत नाही. बरं दोन-तीन राज्यात काॅग्रेस सत्तेवर आली तरी त्या राज्यातील जनता लोकसभेच्या निवडणूकीत मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना व विकासाचे प्रकल्प पूर्ण करण्याची धमक पाहून भाजपाला मतें देते. या शिवाय मोदी सरकारच्या कार्याची स्तुती करणारी सोशल मिडीयावरील यु ट्युब चॅनेल्स, ब्लाॅग्ज सोबत मेन मिडीयातील चॅनेल्स आणि वृत्तपत्रांची संख्या वाढत आहे.                                                                    कोरोना नंतर आर्थिक मंदीच्या तडाख्याची झळ लागू नये म्हणून ज्यांचा व्यवसाय शस्त्रास्त्रे विकण्याचा आहे अशी बडी राष्ट्रे जगात काही तरी कुरापती काढून  युद्ध खेळतील वा खेळवतील असा अंदाज मी रशिया आणि युक्रेन मधील युद्ध सुरू होण्याच्या अगोदर एका लेखात मांडला होता. तसेच सांप्रत काळात महायुद्धापेक्षा आर्थिक महासत्तेची प्रचंड लालसा व त्यातूनच विकसनशील व अविकेसित देशात आपली हुकमत व आपल्या विचारसरणीचा प्रसार वाढावा म्हणून तेथील सरकार उलथुन पाडण्याचा उद्योग बडी राष्ट्रे करू लागली आहेत हे सत्य मी सतत मांडत आलो आहे. सन २०२४ च्या निवडणूकीत मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये असा चंगच काही बड्या राष्ट्रांनी बांधला आहे हे ही आपण जाणत आहात.                                                नेमक्या अशा वेळी रशिया आणि युक्रेन मध्ये सुरू असलेल्या युद्धात मोदी सरकार रशियाच्या समर्थनासाठी पुढे आले. त्यानंतर इजरायल आणि हमास मध्ये युद्ध  सुरू झाले. तेव्हा भारताने इजरायलला समर्थन दिले. रशिया- युक्रेन युद्धात अमेरिका व नाटो देशांना आपण दुखाविले. इजरायलचे समर्थन करून आपण मुस्लीम देशांना दुखविल्यामुळे आपल्या देशातील लिबरल लाॅबीचे चमचेगिरी करणारे पत्रकार व संपादक मंडळीं मोदी सरकारवर टिका करू लागले. आपला देश जगात एकाकी पडला आहे अशी अफवा पसरविण्यासाठी गल्ली-बोळातील डाव्या विचारसरणीच्या टपोरी मुलांनी सुद्धा आपल्या ज्ञानाची (वस्तुतः अज्ञानाची) तलवार पाजळयला सुरूवात केली. नेमक्या याच वेळी चार विधानसभा निवडणूकाचा प्रचार सुरू झाल्यामुळे, राहूल गांधीच्या भारत जोडो यात्रेमुळे संघ व भाजपाचे नफरतीचे राजकारण आता उघडे पडणार आणि चार ही राज्यात भाजपाचा दारूण पराभव होणार अशी आशा काॅग्रेस व तिचे समर्थक मिडीयातील मंडळींना लागली. आपल्या देशातील लिबरल लाॅबी चालवित असलेल्या पत्रकार व संपादक मंडळीकडून होणार्या टिकेवर सडेतोड आणि सत्य ती उत्तरे देण्याची अद्यावत यंत्रणा भाजपाने ही उभी केली आहे. तसेच काही यु ट्युबवरील इंग्लीश  हिन्दी आणि मराठी चॅनेल्स तटस्थेने माहिती देत आहेत. या सर्वांचा उपयोग मी गेल्या एप्रिल पासून करू लागलो आहे. त्यामुळे  मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येईल या संबंधित मी निंश्चीत आहे.                                                                    इजरायल आणि हमास मधील युद्ध तात्पुरता का असेना पण थांबलेले दिसते. तसे पाहता ते दोन देशातील युद्ध बिलकूल नाही. हमास या दशहतवादी संघटनेने इजरायलवर हल्ला केल्यानंतर स्वरक्षणासाठी इजरायलने केलेला तो प्रतिकार आहे.  इजरायलने हमासाचा खात्मा केला तरी तिसरे महायुद्ध होईल असे संभवत नाही. याचे कारण कुरापत काढणारा इराण स्वतः इजरायल समोर आलेला नाही. आपली हत्यारें कितपत उच्च दर्जाची आहेत या संबंधीची चाचणी इराणला करावयाची होती असे मला वाटते. दुसरे कारण असे आहे की अरबियन देश उघडरित्या हमासच्या पाठीमागे असली तरी त्यातील काही देश खाजगीत अमेरिका आणि काही देश चीनला हे युद्ध थांबवावे अशी विनंती करीत आहेत. अमेरिका आणि चीन या देशांची ' सांगता येत नाही आणि सहन होत नाही ' अशी अवस्था झाली असावी असा माझा अंदाज आहे. तथापी या युद्धा संबंधीत लष्कर व जागतिक राजकारणातील, अनेक देशाच्या परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक हे युद्ध थांबेल असे ठामपणे मांडत नाहीत.                                                                                    इस्लामी दशहतवादी संघटनांना अमाप पैशाचा वाटप करून जगभर अशांतता निर्माण करण्याची खाज  लिबरल मंडळीला जडली आहे. ही खाज फक्त काही इस्लामी देशांनाच जडली आहे असे नाही. अमेरिका, चीन, रशिया व कॅनडा इत्यादी देशाच्या नेत्यांना आणि तेथील पत्रकार मंडळीला ही जडली आहे. इस्लामी दशहतवादी संघटनांचा दशहत हा धंदा झाला आहे. त्या संघटनांचे नेते आणि त्यांची मुलें पॅलेस्टाईन मध्ये राहात नाहीत. ती मंडळी ऐषारामाचे जीवन जगत आहेत. पाकिस्तान व कतार सारखे देश हे दलालीचे काम करीत आहेत. या दोन्ही देशातील राजकीय नेते ही करोडपती आहेत. पैशाची लालच आणि धार्मिक गुरूच्या शिकवणीतून इस्लामी दशहतवादी रक्तपिपासू झाले आहेत. त्यांच्यावर युनोचा धाक काल ही नव्हता व आज ही नाही. स्वतः इराण आर्थिक बंधनात अडकला आहे त्यामुळे तो आणखिन बंधने वाढवून घेईल असे वाटत नाही. कारण तेथील नेत्यांना ऐषारामी जीवन जगण्याची नशा आहे. ते स्वतः व आपल्या कुंटुबियांना रस्त्यावर कधीच आणणार नाहीत. 

जगभरातील लिबरल पत्रकार मंडळींना माध्यमांद्वारें राजकीय घटनांवर मग त्या घटना कुठल्याही देशातील असो, त्यासंबंधी केवळ नेगेटिव्ह नॅरेटिव्ह मांडण्यासाठी लाखो - करोडो रूपये मिळत असतात. त्यांतूनच ते ऐषारामी जीवन जगत आहेत. ऐषारामात जगण्याची इच्छा झाली की मग आपल्या मालकांनी जसे लिहावयास सांगितले तसे लिहीले किंवा म्हटले की काम फत्ते. मग सर्वत्र प्रकाशझोतात राहण्याचा आटापाटा सुरू होतो. त्यानंतर ऐषारामाची सवय जडते. सवयीच्या पुढली पायरी म्हणजे नशा. आपल्या देशातील लिबरल मंडळी ही याच गोत्रातील आहेत. जगभरातील शोषण नष्ट करावयाचे आहे अशी भाषा करणारी हीच ती मंडळी. पण मुलतः ती जगातील सर्वात नराधम जमात.

ऑगस्ट महिन्यात इजरायल व हमास मधील सुरू झालेल्या लढाई बाबतचे दैनिक वृतान्त आणि त्यासंबंधीत जगभरातील विशेषतः अमेरिका, रशिया, चीन, भारत , युरोपियन देश आणि अरेबियन देशातील राजकीय नेते, राजकीय अभ्यासक, लष्करी तज्ञ आणि मिडीया काय म्हणत आहेत हे मी ऐकतो आहे. त्यातून  जे काही मला उमजले ते सत्य मी वरती मांडले आहे. लेखाचं शिर्षक आपल्या देशातील चार राज्याच्या निवडणूकां संबंधित आहे, पण तरी ही इजरायल व हमास मधील युद्धाचा विषय मी इथे मांडला. याचे कारण असे आहे की आपल्या देशातील  विरोधी पक्ष आणि त्यांची समर्थक मिडीया सन २०१४ पासून स्वतःला लिबरल म्हणवत भाजपा, मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर खोटे-नाटे आरोप करीत जनतेला भडकाविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजपा, पंतप्रधान मोदी, व संघाच्या पाठिशी बहुतांश मतदार  ठामपणे उभा आहे. चार पैकी तीन राज्यात भाजपाला यश मिळाले आहे याचे मला बिलकूल आश्चर्य वाटले नाही. कारण जगात जी अशांतता आहे त्याला कारणीभूत असलेली वर नमुद केली आहे त्या नराधम जमातीचे साहाय्य आपल्या देशातील विरोधी पक्ष उघडपणे घेत आहेत. त्याबद्दल ही जनतेत असंतोष आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या  सांप्रत जगात आपल्या देशातील बहुतांश मतदार देशाचे संरक्षण आणि परराष्ट्र धोरण कसे आहे या मुद्यावर ही मतदान करू लागला आहे. यावर विरोधी पक्षांचे लक्ष जात नाही. पंतप्रधान मोदींनी इजरायलच्या प्रतिकाराचे समर्थन केले. कारण दशहतवाद्यांची झळ जगात भारता इतकी दुसर्या कुठल्या ही देशाला पोहचली नाही. पण चार राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात आपल्या येथील विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदींवर टिका करावयास सुरूवात केली. पंतप्रधान मोदींनी पॅलेस्टाईनच्या हक्काचे ही समर्थन केले आहे. मुळात पॅलेस्टाईन अस्तित्वात नव्हतेच पण इजरायल अस्तित्वात होते. जगातल्या पाशवी वृत्तीच्या राक्षसांनी इजरायल व भारतीय जनतेला सर्वात अधिक त्रास दिलेला आहे. यावर विरोधी पक्षांची नेते मंडळी सतत मौन पाळतात. पण हिटलर वर टिका करतात कारण त्यांना चर्चील आणि स्टॅलीन यांची शांततेचे दूत म्हणून जगाच्या इतिहास कोरून ठेवायाचे होते. तसे त्यांनी केले. पण काळ बदलला आणि या लिबरल मंडळीच्या घराचे वासे ही फिरू लागले आहेत.

दरम्यान पंतप्रधान मोदींनी कतार ला सरळ केले आणि चीन, अमेरिका, तुर्की देशांची फिकीर बाळगली नाही. पाकिस्तानला त्यांनीच तयार केलेल्या विषाचे डोस पाजायला सुरूवात केले असल्याचे ऐकीवात आहे. ते खरे आहे की नाही यावर विचार करण्याची गरज नाही. कारण जिथे चीन सारख्या देशाला चूपचाप बसविले आहे तिथे पाकिस्तान ' किस पेड की मूलीं !' तरीही विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या जिभेवर मुस्लीम समाजाच्या मताच्या चवीची हाव काही केल्या सुटत नाही. मुलतः जगभरातील  लिबरल मंडळी लिबरल नाहीच. ती एक extrimist टोळी आहे. काँग्रेस पक्ष त्या extremist टोळीच्या चरणी लोंटागण घालीत आहे. सन २०१४ पासून सुरू झालेला हा सिलसिला आजही कायम आहे. मोदी सरकारचा सर्व क्षेत्रातातला कारभार जनहिताचा व राष्ट्र हिताचा आहे हे बहुतांश मतदारांना वाटत आहे. हे सत्य मी ब्लॉगवर सतत मांडत आलो आहे. 

भाजपाने सन २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषीत केले, तेव्हा  केंद्रात युपीएचे सरकार होते. निवडणूक संपल्यानंतर मी दै मुबंई सकाळ मध्ये पाठविलेला ' लोकसभा निवडणूक २०१४  शोध व बोध ' हा संपादकीय लेख प्रकाशित झाला होता. त्या बद्दल दै मुंबई सकाळच्या संपादकांचे जीमेल वरून आभार ही मानले. त्या निवडणूकीच्या प्रचाराच्या धुलवडीत महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रताप आसबेंचा ' मोदी नावाचा जाहिरतीचा चेहरा ' असा लेख आला होता. त्यावर प्रत्युत्तर म्हणून मी मटाकडे लेख पाठविला होता पण छापून आला नाही. तो ही वेगळ्या शिर्षकाने योग्य वेळी प्रकाशित करीन. सन २०१४ च्या निवडणूकीत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंगचा चेहरा कमकुवत ठरला. त्यात ही ते नामधारी पंतप्रधान होते. प्रत्यक्ष सरकार काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी सरकार चालवत होत्या. त्यावेळी कधी नव्हता इतका प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. त्याचे स्मरण जनतेला आज ही आहे. मोदींनी पंतप्रधान या नात्याने देशातील बहुतांश राज्यात विकासाचे प्रकल्प सुरू केले आहेत. त्यातील बहुतांश प्रकल्प जलद गतीने पुर्ण करून दाखविले आहेत. म्हणून ' मोदी म्हणजे गॅरेन्टी ' ही टॅग लाईन तीन राज्यातल्या लोकांना चांगलीच भावली असे दिसते. 

ज्यावेळी देशातील इतर राज्यातील मुख्यमंत्री झोपा काढत होते तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदींनी वायब्रन्ट गुजरात असा नारा देत, अहो रात्र मेहनत करून गुजरातला उद्योगाची हब बनविले. गुजरात राज्याला देशातील सर्वात विकसीत राज्य म्हणून असा दर्जा मिळवून दिला. विकासाचे गुजरात मॉडेलवर सतत टिका करणे, त्यांना मौतका सौदागर, एक चायवाला, चौकीदार चोर आहे, पाकवर केलेला सर्जिकल स्ट्राईक खोटा आहे, रॅफेल घोटाळा आणि अलिकडे पनौती अशी लेबलं राहून पंतप्रधान मोदीं हुकूमशहा आहेत असा अपप्रचार करण्यात विरोधी पक्ष आणि त्यांचा समर्थक मिडीया गुंतला आहे. केवळ गुंतला असता तर चालले असते पण त्यातच विरोधी पक्ष रमत आहेत. विरोधी पक्षांनी राजकारणाचं रूपांतर चिखलात केले आहे. त्या चिखलात विरोधी पक्षांचे नेते मंडळी अधिकाधिक रूतून जात आहेत. त्यांच्या सोबत त्यांचे  कार्यकर्ते, आणि समर्थक पत्रकार व संपादक मंडळी सुद्धा रूतत आहे. मी या खेपेस निवडणूक प्रचाराच्या ना सभा पाहिल्या, ना इलेट्रॉनिक्स मिडीया तर्फे रस्त्यावर, चौकात, व मतदारांच्या वस्तीत जाऊन घेत असलेल्या मुलाखती पाहील्या. निवडणूक प्रचार काळात आणि निवडणूकीनंतर सुद्धा मी ना ओपिनियन पोल पाहिले, ना राजकीय अभ्यासकांची चर्चा पाहिली. कारण निवडणूका हा लोकशाहीच्या गळ्यातील दागिना राहीला नाही. त्याला प्रत्येक प्रान्तात निर्माण झालेले घराणेशाही पक्ष, डावे पक्ष,  राजकारणात घराणेशाहीला जन्म देणारा काँग्रेस पक्ष आणि देशातील अनादी काळापासून चालत आलेल्या सनातन संस्कृतीची हेटाळणी करणारे विरोधी पक्षांचे नेते मंडळी व लिबरल नावाची भुतें जबाबदार आहेत.                                                          चार राज्यातील निवडणूका च्या निकालाने सन २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकात भाजपाला व मोदी सरकारला विजय मिळणार आहे हे अधोरिखीत झाले आहे. प्रश्न भाजपाला किती सहजपणे आणि किती मोठ्या प्रमाणात विजय मिळेल हाच उरला आहे. यापेक्षा इथे अधिक काही लिहीण्याचे उरले नाही. म्हणून मी इथे थांबतो. 

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...