सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

अस्थिर अफगणिस्तान आणि भारत (भाग २)


अफगणिस्तानातल्या घडामोडीसंबंधी भारतात मतभेद असणे यात वावगं काही नाही. पण केवळ विरोधासाठी विरोध तो ही केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयात अशी भूमिका घेऊन विरोधी पक्ष काय साधत आहेत? भारत सरकारने अफगाणिस्तान संबंधीत बदलत्या जागतिक राजकारणाच्या समिकरणांचा अंदाज घेऊन जून महिन्यातच तालिबानाशी चर्चा केली आहे. ज्याने रशियाला अफगणिस्तान मध्ये शह देण्यासाठी तालिबान उभा केला, पोसला आणि नंतर त्याच अमेरिकाने तालिबानशी तह केला तर भारताने तालिबानशी संपर्क का करू नये, इतकं स्पष्टपणे पण अप्रत्यक्ष रित्या अमेरिकेलाही सांगू शकणारी अशी राजकीय कूटनीतीचा भारताने अवलंब केला. अमेरिकाने पाकिस्तानचा  पर्याय न स्विकारता कतार या देशाला मध्यस्य स्विकारून त्याच्यी राजधानी दोहा येथे अमेरिकाने तालीबानशी तह केला. तिथेच श्री एस जयशंकर भारताचे परराष्ट्र मंत्र्यांनी दोन खेपा मारल्या आहेत आणि कतारचे परराष्ट्र मंत्र्यांनी तालिबानला भारताशी चर्चा करावयाची असे सागितले. तेव्हाच  तालिबानचे अब्दूल गनी तसेच झलमय खालीलजाद यांच्याशी आपल्या परराष्ट्रमंत्रीची भेट झाल्याचे ऐकिवात आहे.  मागच्या लेखात मी म्हटले आहे की लोकशाहीवादी अमेरिका सतत  राजेशाही आणि लष्करशाही असलेल्या सौदी अरेबिया आणि लष्करशाहीच असलेल्या पाकिस्तानशी घट्ट मैत्री करीत आली आहे. तर भारत सुद्धा नव्या समिकरणानुसार आपले धोरण आखू शकतो. पण झालं काय १५ ऑगस्टच्या घटनेनंतर बड्या राष्ट्रांनी अफगण संबधी  प्रतिक्रीया दिली नव्हती, त्या अगोदरच आपल्या येथील काही मिडीया हाऊस भारतावर काय परीणाम होतील यावर चर्चा करू लागले. आजच्या घटकेला आपल्या सरकारने अफगणिस्तानात असलेल्या भारतियांना सुखरूप परत आणणे याच गोष्टीवर प्राधान्य दिले आहे. आणि हेच वारंवार न्यूज चॅनेलवर आपण पाहिले, ऐकले आहे. आजतक सारख्या चॅनेलांनी अमेरिकाने अफगणिस्तानात काय वाट लावली आहै यावर चर्चा सुरू केली आणि भारताने अमेरिकेचं ऐकून अफगणिस्तानात गुंतवणूक केली असा प्रचार सुरू केला. हा केवळ उतावीळपणा नसून  मोदी सरकार विरूद्ध जनमत भडकविण्यासाठी काही मिडीया हाऊसचा वापर करीत डाव्या आणि पुरोगामी नेत्यांनी आखलेला एक कावा आहे. हे क्लेशकारक आहे.

मुलतः तालिबानने अफगणिस्तानातील ३ लाख प्रशिक्षीत सैनिकाचं अद्यावत शस्त्रास्त्राने परिपुर्ण असलेल्या लष्काराचा पराभव करून इतक्या झटपट काबूल ताब्यात घेतल्याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असताना आपल्या इथे सोशल मिडीयावर अमेरिकेवर टिका करताना अमेरिकाने पंतप्रधान मोदींना ही उल्लू बनविले अशी टिका केली. प्रथम दर्शनी तालिबानने अमेरिकेला उल्लू बनविले असावे किंवा अफगणिस्तान सरकार मधील काही नेत्यांनी किंवा लष्करातील अधिकार्यानी तालिबानशी संगनमत केलं असावे. अशा अनेक शंकाचं काहूर राजकीय अभ्यासकाच्या मनात माजले आहे.  म्हणून आपल्या  हाती आलेल्या आणि ऐकलेल्या वृत्ताचं लागलीचं आपल्या मिडीयाने विरोधी पक्षाच्या राजकीय फायद्याचं विश्लेषण करणे हे योग्य नव्हे. पाकिस्तानची मिडीया जणू काय पाकिस्तानने अफगणिस्तान जिंकल्याचा जल्लोष करत आहेत हे आपण पाहीलं आहे.  गेल्या ५० वर्षापासून जागतिक स्तरावरील राजकारण अफगणिस्तानात राजकीय सत्ता कोणाच्या ताब्यात राहावी या एका मुद्याभोवती फिरतं होतं पण ते होतं फक्त अमेरिका आणि रशिया भोवती. परंतु आता भारत काय भूमिका घेणार आहे याकडे जगाचे लक्ष लागले आहे.  त्याची कारणें खालील प्रमाणे आहेत --

१)अफगणिस्तानात भारताने निखळ मित्रत्वाच्या नात्यातून प्रामाणिकपणे विकास प्रकल्प उभे केले आहेत. याबद्दल अफगाणिस्तानी जनता कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. अफगणिस्तानाचा इतिहास आपल्या वैदिक काळ तसेच रामायण महाभारत कालीन इतिहासाशी संबंध जोडलेला आहे. भले पानिपतच्या तिसर्या लढाईच्या कटू आठवणी असल्यातरी नव्याने निर्माण झालेल्या मैत्रीचे वजन मोठे आहे.

२) अफगणिस्तान आणि पाकिस्तानाच्या मधली सिमा रेषा (ड्युरांट लाईन ) आहे,  ती ब्रिटीश राजवट होती तेव्हा ब्रिटीश अधिकारी ड्युरांटने तयार केली आहे.  त्या रेषाच्या आधारे अफगणिस्तानातील पठाण रहिवाशांचा बराचसा भाग पाकिस्तानात गेला आहे. तो भाग अफगणिस्तानाला हवा आहे. त्यासाठी अफगणिस्तान पाकिस्तान ऐवजी भारताशी मैत्री हिताची मानतो.

३)अनेक राजकीय अभ्यासकांचे मत आहै की २०२१ चा तालिबान बदलला आहे आणि ते खरं असू शकते. कारण तालिबानच्या प्रवक्ताने भारताने सुरू केलेले प्रकल्प अफगाण लोकांच्या भल्या साठी केलेले असल्यामूळे भारताला ते प्रकल्प पुरे करण्यात तालीबान आडकाठी करणार नाही असे जाहिर केले आहे.

४) सर्वात अति महत्वाचं कारण असे आहे की २५-३० वर्षापुर्वी रशियाच्या सहकार्याने भारताने सामरिक दृष्ट्या अत्यंत मोक्याची ठिकाणी म्हणजे अफगाणिस्तानाल्या नाॅर्दन अल्याॅयान्सचा वरच्या भागावर म्हणजे मध्य आशियातील आजच्या ताजिकीस्तानात भारताने एक स्टॅटेजीक फारकोन नावाची एअरबस तयार केली आहे. या एअर बसचे ऑपरेशन फक्त भारताचे हवाई दल करते. तेथूनच थोड दुर अंतरावर आपल्या देशाच्या मालकीचा आयनी विमानतळ आहे. अफगणिस्तानातील भारतियांना भारतात गाजियाबाद येथे आणले ते आयनी एअर पोर्ट वरूनच आणले.  हा प्रदेश पुर्वीचा युएसएसआर म्हणजे रशियाचा होता. आज ही ताजिकीस्तान सरकार रशिया जे म्हणेल तेच करणार आहे. कारण ताजिकीस्तान स्वतंत्र देश असला तरीही त्याच्या संरक्षणाची जबाबदारी रशियाने घेतली आहे. भारतात काॅग्रेसचे सरकार असो वा भाजपाचे आपल्या देशाने रशियाशी नाळ पक्की घट्ट केली आहे. ताजिकीस्तानाच्या सिमा चीन पाकिस्तान, अफगणिस्तान आणि इराण या देशांच्या सीमांना लागून आहेत.  फारकोन नावाची एअर बस  आशियातील सर्वात उंच पहाडावर  आहे. त्यात भारताचे हवाई दल जगातले एक सक्षम मानले जाते. सामरिक दृष्ट्या अत्यंत मोक्याचा हा प्रदेश म्हणजे नाॅर्दन अलायन्स. हा प्रदेश अमेरिकेला आणि तालिबानला ही जिंकता आले नाहीत. आज तेथूनच सध्याचे कार्यवाहू राष्ट्राध्यक्ष अमरूल्ला सालेन तालिबान आणि पाकिस्तानशी लढत देत आहे. अर्थात या लढ्यासाठी सालेन यांना भारताचे समर्थन असावे.  अफगणिस्तानात अमरूल्ला सालेह हे आपल्या देशात अजित डोवल जसे एनएसएचे काम पाहातात तसेच अफगणिस्तानात त्यांनी काम पाहिले. या शिवाय त्यानी अशरफ गनीच्या मंत्रीमंडळात गृह खाते सांभाळले आहे. नार्दन ॲलीयन्स चा संस्थापक  अहमदशाह  मसूद हा  तालीबान आणि पाकिस्तानचा कट्टर विरोधक होता. एकदा त्याच्यावर हल्ला झाला होता. त्यावेळी भारताने त्याला अफगणिस्तानातून विमानने आयिनी विमानतळावर आणून तिथे उपचार केले आणि मग पुन्हा अफगणिस्तानात नेऊन ठेवले. आता ते हयात नाहीत पण त्यांचा मुलगा अहमद मसूर, अफगणिस्तानातील अमरूल्ला सालेनच्या सोबत आहे. यावरून लक्षात येते की तालिबान आणि पाकिस्तानला लढाई सोपी नाही. भारत देश सातत्याने दशहतवादाला विरोध करीत आहे. तेच धोरण आपला देश पुढे रेटत राहील. वेळ पडल्यास आक्रमतेने दशहतवादाला सणसणीत प्रत्युतर ही देईल. पण डिप्लोमासीतून आपलं कार्य सफल होत असेल तर तोच मार्ग मोदी सरकार स्विकारेल असे वाटते.

इंटरनॅशनल कम्युनिटीची अफगणिस्तानात 
अशरफ अली सरकार आणि तालीबान या दोन्ही पक्षाने एकत्र बसून सरकार चालावे अशी इच्छा असावी. हाच हेतू अमेरिकाने डोळ्या समोर ठेवून  दोहा इथे करार केला आहे असे वाटते. ते खरे ही असावे. पण तालिबान उलटा फिरला आहे. आता अमेरिका काय करेल यावर सर्वांचे डोळे लागले आहेत. अमेरिका आणि रशिया काय, या दोन्ही देशांचे अफगणिस्तानात हात पोळून निघाले आहेत. तरीही तालिबानच्या हालचाली आणि कृत्यांसंबंधी या दोन्ही बड्या राष्ट्रांना विचार करावा लागणारच आहे. कारण दोहोपैकी कोणाला ही इंटरनॅशनल कमिन्यूटीचा विश्वास गमाविता येणार नाही. भारतासंबंधी इन्टरनॅशनल कम्युनिटीचं मत चांगले आहे. म्हणून युनोच्या पुढाकाराने  भारत, इराण, पाकिस्तान, तुर्की, सौदी अरेबिया, युएई  चीन आणि युरोप मधील काही प्रमूख देशांना ही  सोबत घ्यावे लागेल. अशा वेळी फक्त चर्चा आणि विचार नसेल. त्यात प्रत्येक देशांच्या प्रामुख्याने रशिया, अमेरिका भारत, पाकिस्तान, चीन इत्यादी देशांच्या राजकीय चाली आणि हितसंबंधाचा कस लागेल असे दिसते.

दुसर्या महायुद्धानंतर अमेरिका आणि रशिया या दोन बड्या देशांना जगावर केवळ आपलेच प्राबल्य रहावे या ईर्शेतून शीत युद्ध सुरू झाले होते. अफगणिस्तान एक असा देश आहे की,  तिथे तेलाचा फार मोठा साठा आहे. तिथे अमाप खनिज संपत्ती आहे. त्याची लालसा अमेरिका आणि रशियाला झाली. तब्बल ५० वर्षात प्रथम रशिया आणि नंतर अमेरिकेच्या वर्चास्वात असूनही अफगणिस्तानात काही ही बदल दिसला नाही. काही आधूनिकता, प्रगती तिथे दिसत नाहीत.  तेथील लोकांच्या काही पिढ्या हत्यार वापरण्यातच गेल्या. काही पिढ्या जन्माला येतानाच डोळ्यासमोर  रायफेल्स, गन्स आणि बाॅम्ब गोळे पाहात वाढल्या आहेत. अन्न, पाणी, कामतृप्ती, अग्नी- वीज या मानवाच्या अनादी काळापासूनच्या गरजा राहिल्या आहेत. पुढे  वस्त्र, निवारा, सुखसोयी, आणि पुढे उपयोगी वस्तुची लालसा निर्माण झाल्या. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असा असमतोल प्रत्येक बाबतीत या सृष्टीत ठायी ठायी आहे. यातूनच प्रत्येक बाबतीत स्पर्धा आली आणि त्यातून भांडण आणि पुढे युद्ध. अशा या दोन विकृतीचा भूलोकात प्रादुर्भव निर्माण झाला. त्यालाच आधुनिक काळात उपभोगी व साम्राज्य विस्ताराची भूक असे नाव आहे. अमेरिका आणि रशियात जे शीतयुद्ध सुरू होते  त्यामागे फक्त त्यांचा स्वार्थ या पलिकडे दुसरे कारण दिसत नाही. शेवटी जो पर्यंत स्वार्थ आहे तो पर्यंत शठं प्रती शाठ्यंम हाच सृष्टीचा नियम टिकून राहणार. या नियमाचे महत्व भारतातल्या विद्यमान सरकारला चांगले ठाऊक आहे, असे निवृत्त मेजर जनरल एस पी सिन्हाने यु ट्यूबवरील चॅनेलच्या मुलाखतीत म्हटले आहे.  त्यावर आपण विश्वास ठेवून या समयी आपण सर्वजण केंद्र सरकारच्या पाठीशी उभे राहू या.

अस्थिर अफगणिस्तान आणि भारत. ( भाग १)


तालिबानाने ज्या पद्धतीने अफगणिस्तानाचा ताबा घेतलेला आहे, त्यातून जागतिक राजकीय रंगमंचावर सुरू झालेलं महानाट्य कसे वळण घेत राहील या बाबत जगभरातील राजकीय अभ्यासक संभ्रमात पडलेले दिसतात. राजकीय रंगमंचावरील नाट्य मग ते एखाद्या देशांतर्गत असो वा जागतिक रंगमचावरील असो त्याचे कथानक सतत फिरतं असते, त्यामूळे आपण सामान्यजन संभ्रमात पडत असतो. वर्तमान जागतिक  राजकीय रंगमंचावरील नाट्यातील कलाकार विशेषतः अमेरिका, रशिया, भारत, पाकिस्तान, करात, चीन, सौदी अरेबिया, इंग्लड इत्यादी  देश आपआपल्या सोयीच्या चाली खेळत असतात. काही असे देश आहेत की त्यांच्याकडे गमाविण्यासारखे काही नसते. अशा देशांच्या (विशेषतः नाॅर्थ कोरीया आणि पाकिस्तान)  नेत्यांच्या चाली जगासाठी धोक्याच्या असतात. कारण बडी राष्ट्रे अशा देशांना आपले प्यादे बनवित आहेत. त्यातूनच त्यांच्याकडे संहारक शस्त्रे हाती आली आहेत. आधीच ही माकडं आहेत. त्यात त्यांना शस्त्ररूपी दारू दिली तर किती ते माजतील याचा अंदाज करता येत नाही.

टिव्ही चॅनेलवरून अफगणिस्तानात होऊ घातलेल्या सत्तापलटासंबंधीचे दृष्य दिवसागणिक भिन्न होत असल्याचे दिसत आहे. वर्तमान स्थिती अशी आहे की नार्दन ॲलियन्स तालिबानशी जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत आहे. या शिवाय अफगणिस्तानात तालिबान विरूद्ध जनअंदोलन सुरू झाले आहे. त्यामूळे  तालिबालने अफगणिस्तानात संपूर्ण सत्ता काबीज केली आहे असे अधिकृत रित्या स्पष्ट झालेले नाही. एक गोष्ट स्पष्ट झालेली दिसते ती म्हणजे ज्या अमेरिकेने अलिकडे तालिबानशी तह केला आणि सुखासुखी आपण परतलो आहोत असे समाधान मिळण्याची आशा धरली होती, ती सपशेल मोडीत निघाली. तालिबानने आपला नंगानाच सुरू केल्यामूळे त्याच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना अफगणिस्तान सरकारची बँक खाती गोठवावी लागली.  तालिबानाची तुलना कुठल्या तरी चॅनेलवरून आपल्या पुराणातील भस्मासुराशी केलेली पाहिली आणि ऐकली. भगवान शंकराने दिलेल्या वरदानातून प्राप्त झालेल्या शक्तीतून ज्या तर्हेने भस्मासूर शेवटी शंकरालाच भस्मसात करायला जातो आणि शंकराला प्राण वाचविण्यासाठी पळावे लागले तद्वत तालिबान अमेरिकेवर उलटला आहे.

जेव्हा अमेरिका अफगणिस्तानातून आपला पाय काढतो आहे असे कळल्यानंतर जगभर अफगणिस्तानाच्या भविष्यातील वाटचाली संबंधी चर्चा होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात माझ्या एका मित्राचा फोन आला होता. तो भाजपा समर्थक आहे. त्याने मला सांगितले, " आमच्या Whatsapp ग्रुप वरील लोक सांगत आहेत की आपल्या देशाने अफगणिस्तानात इतकी गुंतवणूक कशाला केली ? ही जमातच हलकट आहे. हे पंतप्रधान मोदींना ठाऊक नव्हते काय ? तुला काय वाटतंय? " माझ्या मित्राला माझ्याकडून समर्पक उत्तर हवे होते. मी त्याला सांगितले की ,तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी एका लेखा द्वारे देईन असे म्हटले. आणि फोन खाली ठेवला. मग विचारचक्र सुरू झाले. १५ ऑगस्टला अफगणिस्ताना जे घडलं आणि अजूनही घडत आहे त्यासंबंधी लेख लिहावयास बसलो. लेखात प्रधमतः माझ्या मित्राच्या प्रश्नाचे उत्तर देणे मला भाग आहे. त्यामूळे या लेखाचा विस्तार वाढेल म्हणून दोन भाग करीत आहे. ते दोन्ही भाग ही दिर्घ आहेत  हे ही नम्रपणे  मान्य करतो. पण अफगणिस्तानातल्या सध्याच्या घडामोडीवर आपल्या देशातील सरकार, विरोधी पक्ष, मिडीया तसेच सामान्यजन काय म्हणतात  या संबंधी चर्चा  दोन्ही लेखात मांडली असल्यामूळे स्वतंत्र लेख लिहण्याची गरज सद्य स्थितीत तरी भागली आहे.

सोशल मिडीयावर  पंतप्रधान मोदींवर टिका कोण करीत आहेत हे प्रथम जाणून घेऊ या. बहुतांशी ही मंडळी भाजपा आणि संघ विरोधी असते. आपल्या तालूक्याचा, जिल्ह्याचा इतिहास आणि भूगोल माहित नाही अशी माणसे जागतिक स्तरावरील घडामोडीवर मोठमोठ्या चर्चा करीत असतात. मुस्लीम समाजाचं लांगूनचालन करणार्या पक्षांची ही कार्यकर्ते-मंडळी. पण अधून मधून हिंदुत्ववादी विचार आपल्या मुखातून वापरतात.  हे फक्त यांच नाटक असते.  हिंदू-मुस्लीम भाई भाई असा घोष करणार्या याच मंडळींनी भाजपाने डाॅ अब्दूल कलामांना  राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी नाव घोषित केलं तेव्हा आपली नाकं मुरडत, भाजपा कसला हिंदुत्व वादी पक्ष? असे सोयीचे  उद्गार काढले होते. ' अयोध्येत श्रीरामाचं मंदिर कशाला हवं आहे , त्या ऐवजी तिथे एक अत्याधुनिक  मोठ हाॅस्पीटल बांधावे ' अशी पोस्ट सुमारे चाळीस वर्षे अधुन मधून याच मंडळींनी केवळ हिंदु समाजाचा अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माणच्या बाबतीत बुद्धीभेद व्हावा ह्या हेतूने  whatsapp वर व्हायरल केली. ' मंदिर वहीं बनायेंगे पर तारीख नही बतायेंगे ' अशी संघ-भाजपाची टिंगल करणारी हीच ती मंडळी. या टिकेत सुद्धा राम मंदिराचा प्रश्न भाजपाने फक्त मतासाठी हाती घेतला आहे असे दाखविण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते करीत होते. जेव्हा श्री राम मंदिरा संबंधी न्यायालयाचा निर्णय आला आणि पंतप्रधान मोदी भूमी पुजनेला अयोध्येत गेले, तेव्हापासून हीच मंडळी ' राजीव गांधींनीच राम मंदिराचा शिलान्यास केला होता ' अशी भाजपाच्या कार्यकर्त्यांना आठवण करून देऊ लागले. भाजपा कार्यकर्त्यांना हा इतिहास ठाऊक आहे. त्याची आठवण करून देण्याची गरज नाही. काॅग्रेस आणि काॅग्रेसच्या मित्रपक्षांनी अयोध्या इथे ना हाॅस्पीटल बांधल, ना श्रीराम मंदिर. काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या सत्ताकाळात अधूनमधून हिंदू हिताचं केवळ नाटक करीत, मुस्लीम समाजाला सोयी सवलती द्यावयाच्या आणि एक गठ्ठा मतें घ्यावयाची हेच धोरण राबविले गेले.  अयोध्येत श्री राम लल्लाचे टाळे उघडले ही घटना याच धोरणाचाच भाग होय. कारण तलाक पिडीत शाहबानो प्रकरणात काॅग्रेसने मुस्लीम लोकांना खुष करण्यासाठी शहाबानोवर मोठा अन्याय केला होता. मग हिंदू समाजाला खुष करण्यासाठी राम लल्लाचे टाळे उघडले आणि हिंदू समाजाला अयोध्येतल्या विवादीत स्थळी  रामलल्लाची पुजा करण्यासाठी  परवानगी दिली.  पण  अयोध्येत राम मंदिरासाठी काही प्रयत्न केले नाहीत. उलट न्यायालयातही काॅग्रेस नेते मंडळी मुस्लीम समाजाची वकालत करीत राहीले. अशा पक्षांच्या सत्ताकाळात ज्या कार्यकर्त्यांचे  आर्थिक, औद्यगिक, व्यापार संबंधीत हितसंबंध जपले गेले आहेत,अशी मंडळी सोशल मिडीयावर मोदी सरकारवर टिका करीत असते पण सोबत हिंदू हिताचं नाटकं ही करतात. या नाटकाचा भाग म्हणून मोदी सरकार अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या सोबत गेले आहे. त्यामूळे देशाची वाट लागली अशी बोचरी टिका वाम पंथीय आणि पुरोगामी विचारवंत करीत आहेत..

माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधीनी सन १९७१ मध्यें पुर्व पाकिस्तानातील मुस्लीम बांधवांवर पाकिस्तान सरकारने जेव्हा अत्याचार सुरू केले तेव्हा लष्करी आणि प्रंचड आर्थिक मदत दिली, आणि बांगला देश निर्माण झाला. तेव्हा भारतीय जनसंघाने (म्हणजे आताचा भाजपा) काॅग्रेसवर टिका केली नाही. उलट अटलबिहारी वाजपेयींनी इंदिरा गांधीना दुर्गा देवीची उपमा दिली. हा फरक आहे भाजपा आणि काॅग्रेस तसेच तिचे मित्र पक्षांच्या नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांच्या मानसिकतेचा !  बांगला देशाच्या निर्मितीत झालेला आर्थिक बोजा काॅग्रेस सरकारने अनेक वर्षे आपल्या सारख्या जनसामान्यांच्या करातून वसूल केला. त्यासंबंधी भाजपाने टिका केली नाही. इतकी मदत करून ही शेवटी बांगला देशाचं स्वरूप इस्लामी राज्य म्हणूनच झाले आहे की नाही ? असंख्य बांगला देशीय नागरिकांनी आपल्या देशात घुसखोरी करून वास्तव्य केलं आहे. अनैतिक धंदे करीत आहेत. फुकटाचे रेशन, वीज, पाणी आणि घरें घेऊन राहात आहेत. हाआपल्या देशाच्या तिजोरीवरील ताण आहे की नाही. इतकं असूनही ही मंडळी हिंदु समाजा बद्दल द्वेष करीत आहेत. सन १९७१ चे ते भांडण मुस्लीम समाजातंर्गत होते कि नाही ? आताचं अफगणितातील भांडण धर्मांध मुस्लीम आणि सामान्यजन मुस्लीम याच्यातीलच आहे. सन १९७१ वेळी  संघ आणि जनसंघीय मंडळींनी, ' हा पाकिस्तान देशाचा अंतर्गत मामला आहे, आपल्या देशाने त्यात कशाला पडावे, आपण आपल्या सिमेवर लष्कर बंदोबस्त ठेवून मजा पाहात बसू या.' असे म्हणत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीना विरोध केला नाही. उलट पंतप्रधान इंदिरा गांधीनी पाकीस्तान विरोधी लष्करी कारवायीचा जो  निर्णय घेतला, त्याला भक्कम पाठींबा दिला होता.

जागतिक स्तरावरील डावपेच हे पुष्कळदा माणूसकी, व्यापारवाढ आणि बड्या राष्ट्रामधील सत्तेच्या स्पर्धेचं स्वरूप कसे असेल त्यावरून आखावे लागतात. चीन मध्ये चारी बाजूनी समृद्धी आली आहे असे नाही. तरीही  चीन अनेक देशात गुंतवणूक करून त्यांना आपले मांडलिक बनवितो. तेथील प्रजेची आणि आपल्या प्रजेची ही चीन पिळवणूक करतोच आहे. पण ते सत्य  बाहेर येत नाही. तेथील सत्ताधार्यांचं राहणीमान  राजेशाहीची थाटाचं असते. चीनने इतर देशात जी गुंतवणूक केली आहे अशा देशांना चीनचा कावा समजला आहे. म्हणून श्रीलंकाने भारताशी संबंध सुधारले आहेत. काय भलं झालं चीनचं तिथे केलेल्या  गुंतवणूकीचं? ब्राझील आणि पाकिस्तान बाबतही चीनला असाच अनुभव येईल असे दिसते. तरीही आपल्या येथील विरोधी पक्षांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना चीन मधील सरकारचं भारी कौतूक आहे. मोदी सरकारने चीनच्या अरेरावीला लगाम घातला आहे. डोलोकाम आणि लडाख येथे केलेल्या घुसखोरी संबंधी सडेतोड उत्तर भारताने दिले याचे यांना शल्य असावे का? "

गेल्या सात दशकात चीन आणि पाकिस्तान बाबत आपल्या देशाचे इतकं कणखर धोरण अनुभवास आले नाही. मोदी सरकारने काश्मीर मधील ३७० कलम नष्ट करून काश्मीर मधला दशहतवाद बंद केला. काश्मीर मधील आधुनिक राजेशाही मोडीत काढली आणि प्रशासनतला भ्रष्टाचार मोडून खर्च कमी केला. पाकिस्तानचा आवाज बंद केला. आज जर का काश्मीर मध्ये कलम ३७० अस्तित्वात असतं तर काय परीणाम झाले असते याचा विचार विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्याने करावयास हवा. दोनदा सर्जीकल स्ट्राईक करून ही पाकिस्तानची आपल्या देशावर हल्ला करण्याची हिंमत झाली नाही ते ही अमेरिकेचं लाडकं बाळ म्हणून पाकिस्तान मिरवत असताना. हा मोदी सरकारचा पाकिस्तानाच्या बाबतीतला कडक धोरण राबविल्याचा विजय आहे. या धोरणाला 'क्वालिटी ऑफ डेटरन्स 'ची म्हणजेच भारताने प्रतिकाराची गुणवत्ता वाढविली आहे अशा शब्दात परराष्ट्र धोरणाचे विश्लेषक डाॅ शैलेंद्र देवळकराने साप्ताहिक विवेकच्या २८ जूलैच्या अंकात आपल्या लेखात वर्णन केलं आहे. या लेखाचं शिर्षकच मुळी ' भारताच्या परराष्ट्र धोरणाचा विकास ' असे आहे. ज्यांना देशाच्या परराष्ट्र धोरणासंबंधित रस आहे अशांनी हा अंक ऑन लाईनवरून वा विकत घेऊन अवश्य वाचावा. याच अंकात  श्री चंद्रशेखर नेने यांचा 'अस्थिर अफगणिस्तान,' साप्ताहिक विवेकचे माजी संपादक  श्री रमेशजी पतंगे यांचा 'कम्युनिस्टांची शंभरी' तसेच डाॅ दिनेश थिटे यांचा 
' बौद्ध धर्माचा सेवक- डाॅ शामा प्रसाद मुखर्जी ' हे लेख ही वाचण्यासारखे आहेत. हे सारं इथे मांडायचं कारण की देशाचं परराष्ट्र आणि संरक्षण धोरणासंबंधीत काही गुपीतं असतात. त्यामूळे केवळ बातम्याच्या आधारावर तर्क काढून सरकारवर टिका करताना भान सांभाळणे आवश्यक असते.

(कृपया या विषयावरील पुढील चर्चाकरीता सोबत जोडलेला भाग २ पाहा)

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...