रविवार, १८ एप्रिल, २०२१

आचारः परमो धर्म आचारः परमं तपः|


प्रथम आपणांस नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या !  गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ' संवाद प्रतिपदेची ' हा लेख लिहून मी ब्लाॅगवरील लिखाणाला सुरूवात केली. आपल्याशी संवाद साधता साधता चार वर्षे पुर्ण झाली. या चार वर्षात आपण सकारात्मक प्रतिसाद दिला, योग्य त्या सुचना ही दिल्या, त्यातून मला अधिकधिक प्रेरणा मिळत गेली. त्यासाठी मी आपले सर्वांचे मनःपुर्वक आभार मानतो. आपणांस तसेच आपल्या परिवारातील सदस्यांना आणि आप्तजनांना या वर्षात सुख आणि चांगले आरोग्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. 

गेल्या वर्षीचा गुडी पाडवा आपण लाॅकडाऊन मध्ये साजरा केला. कोरोनाच्या महामारीतून आपण बाहेर पडतो आहोत अशी चिन्हें दिसत असताना पुन्हा लाॅकडाऊन करावा लागणार असे महाराष्ट्र सरकारने अलिकडे सुतोवाच केले होते. म्हणून येऊ घातलेल्या लाॅकडाऊनचे स्वरूप कसे असेल, किती दिवसाचा असेल याबाबत सर्वत्र चर्चा आणि सोबत कोरोनाची भिती अशा वातावरणातच यंदाचा ही गुढी पाडवा घरातच साजरा झाला. 

महाराष्ट्र सरकारने २ मे पर्यंत लाॅकडाऊनची घोषणा केली आणि लाॅकडाऊनचे स्वरूप ही स्पष्ट झाले.  लाॅकडाऊन संबंधी 'राजा कालस्य कारणम् ' असे समजून सत्ताधार्यांना दोष देणे हे सोपे काम असते. मग ते महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या दृष्टीने असो वा केंद्र सरकारवर टिका करणार्या विरोधी पक्षांच्या दृष्टीने. त्यावर अधिक चर्चा केल्याने काही साध्य होणार नाही. म्हणून तो विषय बाजूला ठेवणे हेच शहाणपणाचे आहे. लोकशाहीतला राजा कोण ? उत्तर आहे प्रजा. म्हणजे आपण सारे जण. सार्वजनिक ठिकाणी जी पथ्थें आपण पाळायला हवी होती ती पाळली नाहीत. राजकारणी मंडळीने ही शंभर टक्के पथ्थे पाळली आहेत असे कुठे दिसले आहे ? म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भव वाढला यात राव आणि रंक सारेच जबाबदार आहेत असेच धरू या. जगभरातील इतर देशांतही याहून वेगळे चित्र नाही. या कोरोना संकटात राजकिय मंडळीच्या आचरणा विषयी काही म्हणावे तर एक वाक्यप्रकार आठवतो तो म्हणजे 
' घरोघर मातीच्या चुली. '

सृष्टीला सृजन करण्याची जबाबदारी विधात्याने मानवावर सोपविली आहे. कारण त्याने फक्त मानवालाच बुद्धी दिली आहे. बुद्धीमूळे सारासार विचार करता येतो. त्याचेच नाव विवेक आहे. स्कंद पुराणात गुरूःर्एको विवेकः असे म्हटले आहे. माणसाचा पहिला गुरू स्वतःचा विवेक असतो.  याचा अर्थ असा नव्हे की गुरू-शिष्य परपंरेला छेद दिला गेला. प्रत्येक क्षेत्रात आपल्यासाठी जो गुरू असतो तो आपल्यासाठी साक्षात ब्रह्मा, विष्णु, महेश असतो. गुरू जे काही आपल्याला मार्गदर्शन देतो ते आत्मसात करण्यासाठी आपली गुरूवर भक्ती असली पाहीजे. जेव्हा अंतःकरणात गुरू बद्दल भक्ती तयार होते किंवा विश्वास वाटतो त्या क्रियेलाच विवेक म्हटले जाते. मनुस्मृतीत एके ठिकाणी म्हटले आहे,
        आचारः परमो धर्म आचारः परमं तपः |
        आचारः परमं ज्ञानम् आचारात् किं न साध्यते ||

आपले स्वतःचे आचरण हा महान धर्म आहे. दुसर्या एके ठिकाणी आचरः प्रथम धर्मः इत्येतद विदुषां वचः असे मी वाचले आहे. म्हणजेच आचारण हा अखिल मानव जातीचा पहिला धर्म आहे. आचरण एक तप आहे. आचरणातून ज्ञान प्राप्त होते याचा अर्थ आचरण हेच खरे ज्ञान आहे. संत महंतानीं लौकीक दृष्ट्या शैक्षणिक पदवी घेतली नव्हती तरी त्यांनी अजरामर असे साहित्य निर्मीती केली. त्यांचे साहित्य शाळा-महाविद्यालयीन आणि पीएचडीच्या अभ्यासक्रमात असते. आचरणाने आपण साध्य करू शकणार नाही अशी एक ही गोष्ट जगात नसते. म्हणून आचरण हा महान धर्म ठरतो. धर्म हा प्रथम आणि शेवटी ही धर्मच असतो. आपण आपले आचरण वेडेवाकडे ठेवले की तो अधर्म ठरतो. म्हणून सदाचरण हे मानवी जीवनमूल्य जन्मास आले. कोरोनाची साथ फैलावली ती चीन मधून असे म्हटले जाते. ते खरे असो वा नसो शेवटी चीन मध्ये ही माणसेच राहतात ना. तेथील राजकर्त्यांना आपले आर्थिक साम्राज्य वाढविण्याची दुर्बुद्धी झाली असावी हा एक तर्क काढला गेला आहे. याचे कारण चीनच्या सत्ताधार्यांबद्दल बहुतांश देशांना अविश्वास वाटतो. अविश्वास हा सदाचारणाच्या अभावात जन्मतो. म्हणून आपले आचरण दुसर्यांना विश्वासनिय वाटायला हवे. तसे न घडले की तो अधर्म ठरतो.

आपल्या धर्मशास्त्रात आचरणाला पहिला धर्म म्हटले आहे. कारण आपली धर्माची व्याख्याच व्यापक आहे. माताधर्म पिताधर्म, पतीधर्म, पत्नीधर्म, पुत्रधर्म, बंधुधर्म, कूळधर्म, ग्रामधर्म,  पंथधर्म, उपासना धर्म  शेजारधर्म, ग्रामधर्म, समाजधर्म,  राजधर्म, राष्ट्रधर्म, विज्ञानधर्म, वैश्वीकधर्म असे वाढत आपआपल्या कर्मापर्यंत पोहचते. मग निष्काम कर्मा पर्यंत जाऊ लागते. तेव्हा आपली मती कुंटते. तसे पाहता हाच मानव धर्म असे वाटते. पण तेवढ्यावर आपला आचार धर्म थांबत नाही. याच्चवत सर्व प्राणीमात्रात सुद्धा मी आहे. चल-अचल वस्तूत मी आहे असे भगवान श्रीकृष्णाने अर्जनुला गीतेत सांगितले आहे. याचा अर्थ आपले आचरण सृष्टीधर्मानुसार आहे की नाही इथपर्यंत ती व्याखा वाढते. याचा अर्थ हा विषय फार व्यापक आहे. म्हणून या विषयावर पुढे टप्प्या-टप्प्याने स्वतंत्र रित्या चर्चा करू या. कोरोना  महामारीच्या संदर्भात गेल्या वर्षी 'आपण एकशे पाच ' अशा शिर्षकाचा तसेच आणखिन चार लेख ब्लाॅगवर पब्लीश केले आहेत. त्यामूळे या लेखाचा विस्तार वाढवित नाही. तसे पाहता लेख लिहणे यात सुद्धा एक प्रकारचा आचार धर्म आहे. वक्त्याने आपले भाषण श्रोत्यांना कंटाळा येईल इतपर्यंत वाढवू नये तसेच लेखाच्या विस्ताराला ही सीमा असणे गरजेचे आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंनी एके ठिकाणी म्हटले आहे की ' एखाद्या लेखकाने आपली पत्नी आजारी असेल तेव्हा तिच्याकडे दुर्लक्ष करून लेखनात मग्न होणे हा त्यावेळी स्वच्छंद ठरू शकतो.'  सारांशाने ' अती तिथे माती ' हाच सर्व क्षेत्रातला आचार धर्माचा मंत्र आहे असे वाटते. आपल्या आहार-विहारापासून प्रत्येक क्षेत्रातले आचरण शुद्ध आणि संयमीत असावे असे आपल्या साधु-संतानी म्हटले आहे. 

आपल्या देशातील सारी संत-मंडळी, गुरूदेव नानक आणि बुद्ध-महावीरांसारखे देवादिक मंडळी, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, महात्मा गांधीजी, आचार्य विनोबा भावे, पंडीत दिनदयाळ उपाध्याय, स्वाध्याय प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोलवलकर गुरूजी, प्राध्यापक प्र ग सहस्त्रबुद्धे, साने गुरूजी, प्राचार्य शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर, आफळेबुवासारखे किर्तनकार, प्रा सु ग शेवडे सारखे प्रवचनकार, श्री श्रीरवि शंकर, शंकर अभ्यंकर सारखे अध्यात्मिक गुरू अशी एक लांबलचक यादी होईल. त्यांची नावें आणि छोटासा परिचय करावयाचा म्हटले तरी एक मोठा ग्रंथ होईल. ' तेथे कर माझे जुळती ' अशा ईश्वरनिष्ठाची मांदियाळींची ही आपली भूमी. आपला देश  'आचरण ' या विषयाची शिकवण सार्या जगाला देश देऊ शकतो. पण आपले दुर्दैव म्हणा  की आपल्या कर्मदारिद्र्यपणा मुळे विख्यात लेखक ह ना आपटेंना पडलेला ' पण लक्षात कोण घेतो ' हा प्रश्न आपण आजच्या कोरोना संकटात ही अनुत्तरीत ठेवला आहे.

ईशावास्यम् इंद सर्वम् | असे आपण मानतो. म्हणजे चराचर सृष्टीत ईश्वर सामावलेला आहे. मनुष्य हा निसर्गाचाच एक भाग. जसा मनुष्य उत्क्रांत होत गेला तसा या सृष्टीतल्या प्रत्येक जीवाला उत्क्रान्त होण्याची प्रेरणा मिळत असावीच.  आपण अनंत औषधोपचार शोधले पण प्रत्येक जीवजंतूत ही प्रतिकार शक्ती निसर्गानियमाने वाढत असावी. अनेक जीवजंतू नवीन रूपे घेत असावीत. त्यामूळे त्यावरील लस शोधण्यात आणि तयार करण्यात अवधी लागतो. उत्पत्ती, स्थिती, लय या तीन अवस्था आहेत हे सर्वांना मान्य झालेले शाश्वत सत्य आहे. माल्थस नावाच्या अर्थशास्त्रीने  रोगराई, दुष्काळ, अतिवृष्टी, भूकंप, महापूर इत्यादीतून होणारी जिवीत हानी हे निसर्गाच्या खेळी आहेत असे आपल्या Theroy of Population या ग्रंथात मांडले आहे. आज कोरोना तर पुढे भविष्यात नवीन जीवजंतु येणार, जीवजंतु ही नवनवीन रूपे धारण करणार हे गृहीत धरूनच आपले आचरण ठेवणे गरजेचे ठरते. चौर्यांशी योनीतून मनुष्य देह प्राप्त होत असतो असे म्हटले जाते. त्यावर विश्वास ठेवावा की नाही हा प्रश्न महत्वाचा नाही. पण इतर प्राण्यांपेक्षा आपण वरचढ आहोत हे तर खरे आहे. 'नरेची केला नर किती हीन'  की 'नराचा नारायण ' व्हावयाचे असे दोन पर्याय ईश्वराने म्हणा वा सृष्टीने आपल्या समोर ठेवले आहेत. पर्याय आपण निवडावयाचा आहे. पण ईश्वर नसला तर काय करायचे ? तो आहे असे मानावयास पुरेसा पुरावा नाही. पण आशेची एक बाब आहे. अनेक महापुरूषांना गूढरम्य अनुभव आले. नामजपामूळे मनाला शांती मिळते असा अनुभव आपणास आलेला असतोच. योगासने, दीर्घ श्वसन यामूळे लागणारी झोप  व प्राप्त होणारे आरोग्य अनेक जन्मी लाभले तरी हवेसे वाटेलच. आजारात सुख नाही आणि अज्ञानात आनंद नसतो. व्यसन आणि मोह तर विघातक. त्या वाटेने जाऊ नये. असे म्हटले जाते की माणूस हा केवळ दोन पायावर खांबा सारखा उभा आहे. तर इतर प्राणी चार पायांवर उभे असतात. पृथ्वीतलावर आढळणारी गुरूत्वकर्षाणाची ओढ माणसाच्या सरळ शरीरस्थितीमुळे त्याच्या वाटेला अधिक येते. तिचा प्रभाव कमी पडावा या साठी माणसाने अधून मधून बसावे किंवा सरळ आडवे व्हावे. शवासन ही एक सहजस्थिती आहे. या आसनात गुरूत्वाकर्षणाची शक्ती मुक्त होते. माणूस खाली ओढला जात नाही. हृदयावर कामाचा ताण कमी पडतो. रक्ताभिसरणासाठी त्याला अधिक बळ वापरावे लागत नाही. त्याला थकवा किंवा ग्लानी येण्याची शक्यता कमी असते म्हणून योगाचार्य म्हणतात की शवासन मृत्यूला मागे लोटते. जे योगासने करतात, दीर्घश्वसन करतात अशांना  कोरानो सारख्या संकटापासून भय कमी असते. आपल्या आहारात चरबी युक्त पदार्थ नसावेत. सर्वात महत्वाचे पथ्य म्हणजे प्रमाणाबाहेर विचार करू नये. महत्वाकाक्षेंचे मजले कमी करावेत. इत्यादी खबरदारी आपण बहुतांश डाॅक्टर मंडळी, योगाचार्य, आयुर्वेदिक वैद्यांकडून ऐकत आलो आहोत. ' शरीरमाद्य खलु धर्मसाधनम ' असे म्हटले आहे ते सदैव लक्षात ठेवून आपला आहार - विहार, बाबत सजगता बाळगावी. 

कसे वागायचे, काय खावे, काय खाऊ नये हे ठरविण्याचे स्वातंत्र्य आपल्याकडे आहे. पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. आकाशात स्वच्छंदपणे विहार करणारे पक्षी, रानावनात काही बंधने नसताना फिरणारे पशू पाहून आपल्याला वाटत असते की पशू-पक्ष्यांच्या जीवनात खरे स्वातंत्र्य आहे पण ते तितकेसे खरें नाही. आपल्याला काय हवे आहे याची जाणीव पशूपक्ष्यांना ही असते. पण जाणीवप्रमाणे प्रयत्न करून मिळविणे हे फक्त मानवालाच जमते. पशुपक्ष्यांचे जीवन सामुदायिक असते तर मानवाचे जीवन सामाजिक असते. जसे आपल्या शरीरात हृदयापासून प्रत्येक अवयवात रक्ताचे अभिसरण चालू असते तसे व्यक्ती आणि समाज, समाज आणि राष्ट्र यामध्ये वैचारीक अभिसरण होत राहणे गरजेचे असते. तोच  स्वतंत्रताचा खरा अर्थ आहे. ब्रह्मांडात अनेक ग्रह आहेत. त्यांचे आकारमान आणि गुरूत्वाकर्षण, गती, कक्षा सारं काही भिन्न आहे. पण ते ही आपल्या कक्षा सोडून फिरत नाहीत. बंधनातच स्वातंत्र्य शोभून दिसते. Ever viligance is the price we are paying for liberty असे कोण्या इंग्रजी समाजशास्त्रज्ञाने म्हटले आहे. ते सतत ध्यानात ठेवणे गरज असते. आपल्या शरीराच्या रचनेत ही बंधनाचे धागे असतातच. म्हणूनच पथ्ये पाळणे गरजेचे असते. समाज असो वा देश असो फक्त स्वातंत्र्यावर जगत नसतात. प्रत्येक समाजाला आणि देशाला अनेक अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाच्या संकटांना सामारे जावे लागते. शेवटी समाज जगला, देश जगला तर आपल्या स्वातंत्र्याला अर्थ आहे. म्हणूनच नागरिकतत्व जपून वापरणे आवश्यक आहे. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते  आपल्या पुर्वाश्रमींच्या हाल अपेष्टा व त्यांच्या त्यागातूनच मिळाले आहे. खरें म्हणजे देशातील थोर पुरूषांनी लोकशाही प्रणाली स्विकारल्यामूळे आपले मत माडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे. त्यामूळेच तर आपला परस्पर संवाद होतो आहे. म्हणून सारे स्वातंत्र्यवीर मग ते अहिंसा मार्गावरील असोत वा सशस्त्र क्रान्ती मार्गावरील, तसेच देशाच्या घटना समितीवरील सर्व तज्ञ मंडळी  इत्यादींचे आपल्यावर अनंत ऋण आहेत. मी जे काही इथे मांडले आहे ते अनेक महापुरूषांनी आपल्याला त्यांच्या जीवनगाथेतूनच सांगितले आहे. ही  जाणीव ठेवून कोरोनाशी या निकराच्या लढाईच्या समयीं  'समाज आणि देश प्रथम' असे ध्यानात ठेवून सरकारने घालून दिलेले नियम पाळून आपले आचरण शुद्ध ठेवण्याच्या संकल्प सोडू या. यातच आपल्या सर्वांचे हित आहे. 

४ टिप्पण्या:

  1. नमस्कार । आपकी लेखनी एकदम सटीक है महात्रे जी । पढने के बाद अच्छी लगती है।

    उत्तर द्याहटवा
  2. म्हात्रेजी,
    नमस्कार.अतिशय ज्वलंत विषयावर आपले,समयोचित,सटीक व ससंदर्भ, परिपुर्ण विवेचन व योग्य मार्गदर्शन वाचले. नेहेमी प्रमाणे,आपला व्यासंग, अनुभव व संयमित भाषाशैलीचा सुंदर नमुना आहे. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...