गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०

कायद्याचे राज्य (भाग १)

देशातील स्वायत्त संस्था निकालात काढल्या जात आहेत, देशात असहिष्णूता वाढली आहे, अल्पसंख्याकांना दुय्यम दर्जाची वागणूक देण्याचे सत्र आरंभिलेले आहे, संविधान धोक्यात आले आहे,  शेतकर्यांना देशोधडीला पाठविण्याचे सत्र सुरू आहे, देश अंबानी व अदानींना विकला आहे, चीनने आपली जमीन गिंळकृत केली आहे, श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्य म्हणजे उच्च वर्णियांचे वर्चस्व स्थापन होत आहे, विरोधी पक्षांचे राज्य सरकर पाडण्याचे कारस्थान चालू आहे, निवडणूक आयोग, सीबीआय इत्यादी संस्था भाजपाच्या झाल्या आहेत, भ्रष्टाचाराच्या खोट्या केसेस लावून विरोधी पक्ष नेत्यांचे खच्चीकरण होत आहे, मोदी चोर है, अशा प्रकारची टिका केंद्र सरकारवर गेली सहा वर्षे होत आहे. इतकं स्वातंत्र्य असूनही विरोधी पक्ष आम्हाला 'आजादी हवी असे म्हणत गोरगरीब वर्गाला केंद्र सरकार आपल्यावर अन्याय करीत आहे असे फितवून आंदोलनाला उभे करीत आहे, तर कोणी आपला धर्मग्रंथ म्हणजेच कायदा असे फितवून गोर-गरीबांना उपोषणाला बसवित आहेत, कोणी धनधांडगे पण कागदावर शेतकरी म्हणून सरकार विरूद्ध आंदोलनाला बसविले जात आहेत.  महाराष्ट्र, पश्चीम बंगाल, पंजाब, आणि केरळ इत्यादी राज्यातील विरोधी पक्षांनी सत्तेच्या साह्याने केंद्र सरकारशी पंगा घेण्याचे सत्र अवलंबविले आहे. या पंग्याचे स्वरूप असे आहे की वादी-प्रतिवादी परस्परांवर कुरघोडी करण्यासाठी नावाजलेल्या वकिलांना भरमसाठ फी देऊन न्यायालयात दाद मागत आहेत. देशातील सांप्रत राजकीय स्थिती व  राजकीय पक्षांचे व्यवहार पाहाता, राजकीय पक्षांना परस्परांवर कुरघोडी करण्यासाठीच देशात न्यायालयीन व्यवस्था उभी झाली आहे का, ज्यांनी आपल्या देशाची घटना तयार केली, त्या महापुरूषांना अभिप्रेत असलेले हेच ते कायद्याचे राज्य आहे का, असे प्रश्न मनात उभे राहात असल्यामूळे यावर संवाद साधावा असे वाटले म्हणून हा लेख प्रपंच. या विषयाला सीमा नाही. जग सतत बदलत असते. कारण काळ बदलत असतो. बदल हा निसर्गाचा स्थायीभाव. त्यामूळे काळानुसार जशा मानवाच्या गरजा बदलत असतात तदनुसार समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्थाचे स्वरूप बदलत जाते. त्यामूळे नवीन सुधारीत कायदे आणण्याचे काम राज्यव्यस्थेला म्हणजेच सरकारला करावे लागते. म्हणून या विषयावरील चर्चा  राजकीय पक्षांच्या व्यवहारापूरता आपण  सिमीत  करणार असलो तरी आपली चर्चा लांबली जाणार आहे  हे विनम्रपणे आपल्या निदर्शनास आणतो. प्रथम या लेखाच्या शिर्षकाच्या संबंधीत एक छोटी कथा माझ्या वाचनात आली आहे, ती आपल्यासमोर सादर करतो.

एक खोटेगाव नावाचे गाव होते. तिथे एक गावदेवीचे मंदिर होते. त्या मंदिराला लागूनच रेल्वे स्टेशन असल्यामूळे भाविक आपल्या पायातील पादत्राणे न काढता मंदिराच्या गाभार्यात जाऊन गावदेवीचे घाईघाईने दर्शन घेत रेल्वेच्या गाडीने आपआपल्या नोकरी धंद्यासाठी शहराकडे जात असत. पंचक्रोशीतल्या इनामराव कोतवाल नावाच्या एका सद् गृहस्थाला ही गोष्ट खटकत होती. म्हणून त्याने संरपंचाकडे लेखी तक्रार नोंदविली. सरपंच म्हणाले, इनामरावजी अशा तक्रारी आजपावेतो पुष्कळ दाखल झालेल्या आहेत. पण काही फरक पडलेला नाही. आपलीच ही मंडळी ! किती समजावले पण पालथ्या घागरीवर पाणी ! काय करावे हेच मला कळेनासे झाले आहे. तुमची तक्रार दाखल करून घेतो आणि उद्या मंदिराच्या आवारात फळ्यावर लेखी आवाहन करतो." दुसर्या दिवशी मंदिराच्या आवारात सुवाच्च अक्षरात खालील प्रमाणे एक आवाहन लिहलेला फलक दिसला.
" भाविक हो, नमस्कार !
            आमच्या निदर्शनात आले आहे की, अनेक भाविक आपली पादत्राणे बाहेर न काढताच मंदिराच्या गाभार्यात जाऊन गावदेवीचे दर्शन घेत असतात. अशा सर्व भाविकांना विनंती करण्यात येते की, आपल्या गावदेवीच्या मंदिरातले पावित्र्य टिकविण्यासाठी देवीचे दर्शन घेण्यासाठी पादत्राणे मंदिराच्या बाहेरील पटांगणात काढून ठेवाव्यात आणि नंतर मंदिरात प्रवेश करावा. आम्हाला आशा आहे की, सर्व भाविक या विनंतीचा मान राखतील. धन्यवाद !
                                                  आपला नम्र ,
                                                       सरपंच  
दुसर्या दिवसापासून भाविक मंडळी आपआपली पादत्राणे बाहेर ठेवून देवीचे दर्शन घेऊ लागले. ज्या गावकर्याने तक्रार केली होती त्याला आनंद झाला. पण तो आनंद फार दिवस टिकला नाही. पंधरा-वीस दिवसानंतर पाहतो तर भाविक पादत्राणे बाहेर न काढता देवीचे दर्शन घेऊ लागले. मग त्या ग्रामस्थाने तहसिलदारकडे तक्रार केली. दुसर्या दिवशी मंदिराच्या आवारातील फलकावर तहसिलदाराच्या सहीचे एक पत्रक चिकटविलेले दिसले. त्या पत्रकातील भाषा ग्रामपंचायतच्या आवाहनासारखीच होती. फक्त सहीच्या खाली 'तहसिलदार' असे लिहले होते. काही दिवस भाविक आपली पादत्राणे बाहेर ठेवून देवीचे दर्शन घेऊ लागले. पण नंतर येरे माझ्या मागल्या हीच स्थिती. 

त्यानंतर इनामराव कोतवाल जिल्हाधिकार्याकडे गेले आणि त्यांनी तिथे तक्रार नोंदविली. पाच दिवसानंतर जिल्हाधिकार्यांच्या हुकूमाचे पत्रक घेऊन एक अधिकारी त्या मंदिरात हजर झाले. त्या अधिकार्यानी जिल्हाधिकार्याचे पत्रक फलकावर चिकटविले आणि स्वतः एक खुर्ची व टेबल ठेवून तिथे सकाळपासून ते रात्री नऊवाजेपर्यंत गस्त करीत राहू लागले. जिल्हाधिकार्याचे ते पत्रक म्हणजे ना विनंती होती ना आवाहन होते. ते पत्रक म्हणजे कडक इशारा होता. भाविकांनी आपली पादत्राणे बाहेर न काढता दर्शन घेतले तर त्यावर कडक कारवाई केली जाईल. खाली जिल्हाधिकार्याची सही व त्या सहीच्या खाली हुकूमावरून असे लिहलेले पाहाताच, सारे भाविक पादत्राणे बाहेर काढून देवीचे दर्शन घेऊ लागले. भितीने का असेना पण सारे भाविक जिल्हाधिकार्याचा आदेश पाळू लागले हे पाहून त्या तक्रारदाराचे समाधान झाले.  सहा-सात महिन्यानंतर त्याला  वेगळेच चित्र दिसू लागले. सारे भाविक त्या अधिकार्याच्या टेबलाखालून दहा रूपयाची नोट देत मंदिरात पादत्राणे न काढताच देवीचे दर्शन घेऊ लागले. इनामराव कोतवाल कपाळवार हात ठेवत म्हणाले, " हे भगवान ! पंचक्रोशीतल्या माझ्याच समाजबांधवानी बांधलेल्या गावदेवीचे दर्शन घेण्यासाठी पैसे द्यावे लागत आहे, मी काय करू आता? " पुन्हा ते जिल्हाधिकार्याकडे गेले व झालेला प्रकार सांगितला. तेव्हा ते जिल्हाधिकारी म्हणाले, " इमानराव कोतवालजी मला तुमच्या चिकाटीचे कौतूक वाटते. मी आता सदाशिव इनामदार नावाच्या अधिकार्याला पाठवितो. ते भाविकांना सुतासारखे सरळ करतील. तुम्ही निश्चींत राहा." 

पाच दिवसानंतर ते सदाशिव इनामदार नावाचे सिनियर अधिकारी आपल्या दोन शिपायांना घेऊन गावमंदिरात डेरेदाखल झाले. मंदिराच्या आवारात मंडप उभा केला. मंदिरात येणार्या महिला भाविकांसाठी व पुरूषांसाठी दोन स्वतंत्र रांगा लागतील अशी व्यवस्था केली. आपआपली पादत्राणे काढून ठेवण्यासाठी व्यवस्था उभी झाली. स्वतः इनामदार अधिकारी जातीने लक्ष देऊ लागले. भाविकांना मग ते सरपंच असोत वा तहसिलदार सर्वांना रांगेत उभे राहून आपला क्रमांक आल्यावरच पादत्राणे काढून देवीच्या मंदिरात प्रवेश मिळू लागला. तक्रारदार इनामरावांना आनंद झाला. दोघा-चौघां ग्रामस्थांनी इनामदार साहेबांना लांच देण्याचा प्रयत्न केला पण ते बधले नाही. उलट त्यांनी त्या भाविकांना अर्ध्या दिवसासाठी पोलीस कोठडीची शिक्षा दिली.  आपआपल्या कामधंद्यासाठी शहराकडे जाणारे सारे भाविक उशीर होऊ नये म्हणून सकाळी लौकर उठू लागले आणि मंदिरात देवीचे दर्शन घेऊ लागले. एकंदरीत गावकर्यांत शिस्त आली.

चैत्र महिना सुरू झाला. गावदेवी मंदिराचा वार्षिक उत्सव दिवस उजाडला. भल्या पहाटे भाविकांची देवीच्या दर्शनासाठी मोठी रांग लागली.  ' भाविक हो, सुप्रभात नमस्कार ! आपले सहर्ष स्वागत आहे; चप्पला बाहेर काढा;  स्टॅन्डवर ठेवा, आणि पुढे पुढे चला, गप्पा मारू नका, असे आवाहनाची टेप सतत सुरू होती. भाविक पुरूष व महिलांच्या खांद्यावर असलेल्या बालक-बालिकांचे ही चपला बाहेर काढावे लागत होते. पण कोणी नाराजी व्यक्त केली नाही.  एका भाविकाचा क्रम लागला. तो अणवाणीच होता. तो घाईने मंदिरात जाऊ लागताच एका हवालदाराने त्याला अडविले, आणि म्हणाले, " अहो काका चप्पल बाहेर काढा आणि मगच दर्शनासाठी आत जा." ते भाविक काका म्हणाले, 'अहो हवालदार , मी चपला घातलेल्याच नाहीत." त्यावर हवालदार म्हणाले," तुमचे हे उत्तर चालणार नाही. तो बोर्ड वाचा, काय लिहले आहे ; चपला बाहेर काढून मंदिरात जा; असेच आहे ना ?"  तेवढ्यात तिथे इनामदार साहेब आले. त्यांनी हवालदारांना विचारले, " काय झालं आहे ? "  तर हवालदार म्हणाला, " हे काका चप्पल बाहेर न काढताच दर्शन घेण्यासाठी आत जात आहेत. " त्यावर इनामदार साहेब त्या काकांना म्हणाले,  "अहो काका, नियम सर्वांना सारखा आहे." त्यावर ते भाविक काका म्हणाले " मी चपला घालून आलेलो नाही. मग मला प्रवेश का देत नाहीत? " इनामदार साहेब म्हणाले तुम्ही घरी जा, चपला घालून या, चपला इथे स्टँन्डवर ठेवा मग देवीचे दर्शन घ्या. " त्यावर ते काका म्हणाले, अहो साहेब, मीच तो इनामराव कोतवाल,  ज्याने तुमच्या मोठ्या साहेबाकडे इथले पुष्कळ भाविक चपला न काढताच दर्शन घेतात त्यासंबंधीची तक्रार नोंदविली आहे. त्यासाठी ग्रामपंचायत, तहसिलदार आणि तुमच्या मोठ्या साहेबांच्या कार्यालयात माझ्या चार-पाच खेपा झाल्या आहेत." त्यावर इनामदार साहेब म्हणाले, " याचा
अर्थ तुम्हाला इथल्या अनेक भाविकांपेक्षा कायदा अधिक चांगला कळतो आहे. म्हणून मी सांगतो आहे, तुम्ही घरी जा किवा येथे जवळच चपलांचे दुकान आहे तेथून चपला विकत घ्या आणि दर्शनासाठी या. या पलिकडे मी काही करू शकत नाही." इनामराव कोतवालने आपल्या कपाळावर हात ठेवत वर आकाशाकडे पाहात सर्व भाविकांच्या साक्षीने म्हणाले, " हे देवा, जिल्हाधिकार्याने इथे पाठविलेले पहिले अधिकारी, लोकांना, 'काय द्यायचे ' आहे याचा  विचार करा,  तसे पैसे द्या आणि मग देवीचे दर्शन घ्या  असे म्हणत असत. आणि आता आलेले इनामदार साहेब फक्त  ' कायद्याचे ' काय तेवढेच बोलतात. लोकशाही अशीच असते का? "

मित्रहो,  ही कथा मूळात छोटीसी आहे. त्यातील पात्रांना नावे देऊन मी रंगविली आहे. ही कथा काॅग्रेसचे सर्वात सनदशीर आणि अभ्यासू असे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री  कैलासवासी बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगिळांनी कुठल्यातरी कार्यक्रमात सादर केली होती. ती मी २५-३० वर्षापुर्वी  दै लोकसत्तेत वाचलेली आहे. कायद्याची भाषा  सामान्यजनांना समजत नसली तरी  साम, दाम, भेद आणि दंड ज्यांच्याकडे आहे अशांना ती अवगत असते. इंग्रजीत म्हटले जाते ' A smile speaks every language त्याच प्रमाणे राजकारणात ' An influential man speaks every language असेच समजावे. सनदी अधिकारी, राजकीय नेते,  वकील,  मिडीया, आणि जागोजगी असलेले अंडरवल्ड जगतातील मंडळी इत्यादींचे कायदा फारसे काही बिघडवू शकत नसतो. म्हणून कायद्याचे राज्य या विषयावर चर्चा म्हणजे कायदा या विषयासंबंधी कमी पण मध्यस्थांचे व्यवहार आणि वर्तन यावर अधिक चर्चा असते हे गृहीत धरून आपल्याला चर्चा करावी लागणार आहे. तुर्तास आज मी इथेच थांबतो. 

रविवार, १३ डिसेंबर, २०२०

बंगालची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे?


आपल्याला स्मरत असेल की गेल्या वर्षी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिबीआयचे पथक चिटफंडसंबंधीत बंगालच्या डीजीओकडे चौकशी करण्यासाठी गेले होते. तेव्हा डीजीओने त्यांची मानहानी केली होती. सीबीआय अधिकारी बंगालमध्ये चौकशी करावयास आल्याच्या निषेधार्थ 
' संविधान बचाओ ' असे पोस्टर्स झळकावून खुद्द बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी धरणाला बसल्या होत्या. थोड्या अवधीत डीजीओ महाशय ते ही तिथे आले आणि मुख्यमंत्र्यासोबत धरणाला बसले. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने बंगालच्या सरकारला फटकारले. या संबंधीत ७ फेब्रवारी २०१९ '  बंगालमधील बखेडा ' या शिर्षकाचा लेख मी पब्लीश केला होता. बंगाल मध्ये परवा भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डावर झालेला हल्ला टि व्ही चॅनेल वरून पाहिल्यानंतर ' भाजपाशी म्हणजे पंतप्रधान मोदींशी म्हणजेच पर्यायाने केंद्र सरकारशी भांडण ' करण्यासाठीच तृणमूल काॅग्रेसला पश्चीम बंगालमध्ये सत्तेवर बसविले आहे की काय असे वाटू लागले आहे.

परवा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाच्या कारची तोडफोड करीत तृणमूल काॅग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारे हल्ला केला, तिथे तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी ज्या घोषणा केल्या त्या संबंधीची अधिकृत प्रतिक्रीया पश्चीम बंगालचे राज्यपाल महोदयांनी टिव्ही चॅनेलवरून दिली. आपण सर्वांनी पाहिली आणि ऐकली. माननीय राज्यपाल महोदयांनी स्पष्टपणे म्हटले की " बंगाल मधील राज्यकारभार संविधानाचे उल्लघंन करीत चाललेला आहे आणि अशा प्रकारच्या घटनेची लाज वाटते. ' इथे बंगाल मध्ये बाहेरच्या लोकांना स्थान नाही ' अशा प्रकारची भाषा वापरणे म्हणजे भारतीय राज्यघटनेलाच आव्हान दिल्यासारखे आहे. मी माझा अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला आहे."

तिथे दिल्लीत शेतकर्यांच्या आंदोलनात  डाव्या पक्षांच्या व नक्षलवाद्यांच्या घोषणा ऐकून ते आंदोलन शेतकर्यांच्या मागण्यासाठी आहे की देशविरोधी कृत्यें करणार्या माओवादी नेत्यांच्या सुटकेसाठी आहे हे समजेनासे झाले आहे. सुश्री ममता बॅनर्जी त्याच डाव्या पक्षांना निवडणूकीत पराभव करून बंगालमध्ये सत्तेवर आल्या. पण ममता बॅनर्जींची राज्यकारभाराची रीत, त्याच डाव्या पक्षांच्या आणि नक्षलवाद्यांसारखी हिंसक झालेली दिसते. परवाची घटना अत्यंत बेजबाबदारीची व अट्टल गुन्हेगारी स्वरूपाची होती. तरीही बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या कि " केंद्र सरकारला पश्चीम बंगालच्या कारभारात दखल घेण्याचे अधिकार नाहीत." महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे कंगना राणावटच्या ऑफीसवर कारवाई करून जी भाषा वापरली, तशीच भाषा ममता बॅनर्जी वापरत आहेत. कंगना राणावटच्या ऑफीस वरची कारवाई आणि रिपब्लीक टिव्ही न्यूज चॅनेलचे सर्वेसर्वा अर्णव गोस्वामी वरील कारवाई मुळे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारवर कडक ताशोरे ओढले तसेच पश्चीम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या सरकारवर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यातील सीबीआय च्या अधिकार्यांची मानहानी केल्याबद्दल ताशोरे ओढले होते. ममता बॅनर्जींचा कारभार तानाशाही पद्धतीचा आहे हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. कालच्या घटनेनंतर केंद्र सरकारने पश्चीम बंगाल राज्याचे मुख्य सचिव आणि डीजीओना तातडीने दिल्लीत बोलाविले आहे. केंद्र सरकारचा हा आदेश ममता बॅनर्जीनी धुडकावून लावला आहे. त्यामूळे पश्चीम बंगालमधील सरकार बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू होईल का यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

केंद्र सरकार  जानेवारी २०१९ च्या घटनेनंतर ही पश्चीम बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट आणू शकले असते. परंतू केंद्र सरकारने तशी कारवाई केली नाही. जर त्यावेळी केंद्र सरकारने राष्ट्रपतीची राजवट आणली असती तर लागलीच येणार्या लोकसभेच्या निवडणूकीत ममता बॅनर्जींना सहानुभूती मिळाली असती आणि भाजपाला तिथे लोकसभेच्या निवडणूकीत जोरदार टक्कर देता आली नसती. लोकसभेच्या निवडणूकीत भाजपाने ममता बॅनर्जीना असा तडाखा दिला, की तसा तडाखा देणे काॅग्रेस व डाव्या पक्षांच्या आघाडीला कधी जमले नाही. ममता बॅनर्जींच्या पायाखालची वाळू  गेल्या वर्षापासूनच सरकत आलेली आहे. त्यामूळे येनकेन प्रकारे ते केंद्र सरकारला उसकावीत असतात. जेणे करून केंद्र सरकारकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट आणली की ' बंगालमधील लोकांचे स्वातंत्र्य हिसकावून घेतले असा टाहो फोडत ' चार महिन्यानंतर येणार्या विधानसभेच्या निवडणूकीत ममता बॅनर्जीना प्रचार करावयाचा आहे. अलिकडे शेखर गुप्ता जे डाव्या विचारसरणीचे संपादक आहेत त्यांनी आपल्या नेहमीच्या Cut the Clutter शो मध्ये म्हटले आहे की
" देशात नरेंद्र मोदीशी टक्कर देऊ शकणारा एकही नेता नाही. फार तर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमिंदरसिंग आणि बंगालच्या ममता बॅनर्जी आपआपल्या राज्यात मोंदीचा अश्वमेघ रोखू शकतात."  याच शेखर गुप्तांनी २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीच्या निकालाचे परिक्षण करतांना म्हटले आहे की ".पंतप्रधान मोदीचें वय, त्यांची कार्यपद्धत, त्यांची शारिरीक, मानसिक व बौद्धिक क्षमता तसेच लोकांची नस ओळखून त्यांना मंत्रमुग्ध करण्याची हातोटी व राजकीय डावपेचांच्या पर्यायांची मुबलक उपलब्धता पाहता, नरेद्र मोदी २०२९ च्या लोकसभेच्या निवडणूकीत ही भाजपाला विजय मिळवून देत सर्वात अधिक काळ भारतिय जनतेच्या हृदयात स्थान मिळविणारे एकमेव पंतप्रधान ठरतील." डाव्या विचारसरणीचें पत्रकार व संपादक मंडळी राजकिय अभ्यासात फार तरबेज असतात. पण २०१९च्या लोकसभेच्या निकालानंतर तसेच बिहारच्या निवडणूकीतही मोदींची जादू चालली हे पाहून शेखर गुप्ता, राजदीप सरदेसाई, बरखा दत्त इत्यादी मंडळींनी आपली शस्त्रेच खाली ठेवली आहेत. डाव्या व लिबरल पत्रकार व संपादकांची अशी असहायता मांडत असताना मला साम्यवादी विचारसरणीच्या एका युवक पत्रकाराची जीवनकथा आठवली. ती कथा, भले थोड्या प्रमाणात विषयांतर झाले तरी आपल्या समोर सादर करावीसी वाटते. ती कथा सादर करून आपली चर्चा पुढे रेटू या. 
' रेटू या ' असा शब्द प्रयोग केला, याचे कारण ती कथा वाचून कदाचित आपले मन  कथेत इतके रमेल की बंगालच्या सद्यस्थिती संबंधींतल्या या चर्चेत रस उरणार नाही.

नॅशनल हॅराल्ड वृत्तपत्र संस्थेत  बालकृष्ण मेनन नावाचा एक तरबेज, उच्चविद्याभूषित, अनेक विषयांवर, अनेक भाषांवर आणि कलेत ही प्रभुत्व असलेला युवक पत्रकार होता. त्याला तिथल्या संपादकाने काशीतल्या आश्रमात काय चालते याची खडानखडा माहिती आश्रमातल्याच लोकांच्या सानिध्यात राहून काढावयाची अशी मोठ्या जोखिमेची जबाबदारी दिली होती. तो युवक आपल्या कामावर रूजू झाला. तल्लख बुद्धी आणि अभिनयाची कला अवगत असल्यामूळे आश्रमात केवळ प्रवेशच नव्हे तर त्याला तिथे राहण्याचा ही परवाना मिळाला. आठवड्यातून वा पंधरवड्यातून एकदा तो आपल्या दिल्लीतील संपादक बाॅसला माहिती पुरवित होता. काही वर्षे गेली. नंतर त्या युवकाचा फोन येणे बंद झाले. 

एक दिवस नॅशनल हेराॅल्डच्या कार्यालयात एक  दाढी-मिशा वाढविलेला संन्यासी आला. संपादक महाशयाला आश्चर्य वाटले. पण आपण बालकृष्ण मेननला हेरगिरी करण्यासाठी पाठविल्याचे बिंग फुटले असावे आणि हा काशीतील संन्यांसी कबूलीजबाब घेण्यासाठी आला असावा, या भितीने संपादकाच्या छातीत धडकी भरली. त्या संन्याशाने नमस्कार केला, आणि संपादक महाशयांना विचारले," मला ओळखलत का?" संपादक महाशय म्हणाले, " क्षमा असावी महाराज, मी आपल्याला ओळखले नाही." तेव्हा त्या संन्याशाने उत्तर दिले, " मी पत्रकार बाळकृष्ण मेनन." संपादक महाशय आनंदाने उद्गारले, " अरे वा वा छान ! हुबेहूब काशीतला संन्यासीच दिसतो रे ! काय सगळी माहिती आणली आहे ना? " त्यावर त्या संन्याशाने 'हो आणली आहे .' असे म्हणत दोन्ही बाजूस काहीतरी लिहलेला एक मोठा कागद संपादक महाशयांकडे दिला. संपादक महाशयांने वाचावयास सुरवात केली पण वेगळचं काहीतरी दिसले. तो कागद त्या पत्रकाराचा राजीनामा होता सोबत राजीनाम्याचे विस्तृत कारण होते. खाली सही होती.
                ---- बाळकृष्ण मेनन उर्फ स्वामी चिन्मयानंद.
ज्याच्या नावाने पुढे स्वामी चिन्मयानंद मिशन नावाची सेवा संस्था उभी राहिली. वाचक हो वर नमूद केलेली वामपंथीय संपादक मंडळी साधूसंत होणार नाहीत. कारण त्यांना भरपूर पगार मिळतो आणि सुविधा ही मिळतात. आता आपण आपल्या मूळ चर्चेकडे वळू या.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी  सन २०१९ च्या जानेवारी महिन्यात जो राजकीय डाव मांडला होता तोच डाव त्यांनी आता विधानसभेच्या निवडणूकीच्या अगोदर का मांडला या संबंधीचे मला बिलकूल आश्चर्य वाटले नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे ही असाच खेळ मांडत आहेत. त्या संबंधी मागे दोन भागाच्या लेखात सविस्तर लिहले आहे. एकदा मेंदूत कुठल्या तरी, घटने विषयी वा व्यक्तीविषयी मनात द्वेष शिरला की डोके ठिकाणावर राहात नाही. तसेच ममता बॅनर्जीचे होत आहे. चिटफंडासंबंधी चौकशी करावयास आलेल्या सीबीआयच्या टीमचा  निषेध नोदविण्यासाठी धरणाला बसून काय उपयोग झाला? त्यावेळी पंतप्रधान मोदी बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट आणू शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही. कारण लौकरच लोकसभेच्या निवडणूका येऊ घातल्या होत्या. ममता बॅनर्जीकडे लोकसभेच्या निवडणूकीत मोदींशी टक्कर देण्यासाठी हातात मुद्दा नव्हता. त्या मोदी सरकारला राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी उसकावीत होत्या. पण पंतप्रधान मोदींनी पश्चीम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावली नाही.  त्याचा फायदा भाजपाने  लोकसभेच्या तब्बल अठरा जागा पटकावित ममता बॅनर्जीच्या तोंडात फेस आणला. परवाची घटना टिव्ही चॅनेल वरून पाहिल्यानंतर तृणमूल काॅग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेतला हे स्पष्ट झाले आहे आणि तेथील राज्यपाल महोदयांनी टिव्ही चॅनेलवरून बंगाल मधील राज्यकारभार संविधानानुसार चाललेला नाही असे मांडले आहे. त्यामूळे बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट आणली जाईल असे अनेकांना वाटते. पण पंतप्रधान मोदी राष्ट्रपती राजवट आणण्यापेक्षा गेल्या वर्षी प्रमाणेच राजकीय लढाईच सुरू ठेवण्याची शक्यता आहे.  राजकीय पातळीवरील लढाईत जशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची दमछाक केली तशीच दमछाक ते ममता बॅनर्जींची ही करतील. याचा अर्थ जे पी नड्डावर झालेल्या हल्ल्यासंबंधीत तेथील स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन तेथील पोलीस कचेरीत किंवा दिल्लीत  फौजदारी तक्रार नोंदवतील. राज्यपालांना त्याची प्रत देऊन बंगाल सरकारला अडकावून ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. नंतर न्याय मिळण्यासंबंधीत बंगाल सरकार बद्दल खात्री पटली नाही की सीबीआय चौकशी व सर्वोच्च न्यायालय अशी ती लांबलचक खेळी खेळत विधानसभेच्या निवडणूकीला सामोरे जातील. तसे पाहता ममता बॅनर्जींकडे विधानसभा निवडणूकीतील प्रचारात मोदी विरोधात मांडता येईल असा मुद्दा नाही. म्हणूनच त्या सैरभैर झाल्या आहेत.  ममता बॅनर्जीनी  पुन्हा एक दोनदा हाणामारीचे हत्यार भाजपा कार्यकर्त्यावर उगारले तर तेच पंतप्रधान मोदी कदाचित शेवटचा घाव मारून पश्चीम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावतील असे दिसते.  त्याची कारणे अशी आहेत ----
१) राष्ट्रपती राजवट लावून पश्चीम बंगालमध्यें निवडणूका अगोदर पश्चीम बंगालला आर्थिक पॅकेज देण्याची संधी मिळू शकते.
२) राष्ट्रपती राजवटीतील काळात बंगालमधील गुंडगिरीला चाप लावू शकतील वा तिथला कारभार सुरळीत ठेवण्याची संधी मिळेल. तसेच तिथल्या कारभारातील आर्थिक घोटाळ्याची पुर्ण  चौकशी करून ती माहिती उघड करता येईल.
३) बंगालच्या मतदारांना  ' तुमची राक्षसी राजवटीतून मुक्तता केली आहे. तुम्ही मला साथ द्या. मी बंगालमधील प्रत्येक नागरिकाचं जीवन सुखी बनवील ' असे भावनिक आवाहनयुक्त भाषण प्रचार सभेत करण्याची संधी का सोडावी ?
४) राष्ट्रपती राजवटीत जसे काश्मीरी जनतेसाठी ज्या योजना आखल्या तशा बंगालमध्ये आणण्याची सुवर्णसंधी ते गमाविणार नाहीत.
५) पंजाब व महाराष्ट्रातील सरकार, केंद्र सरकार विरूद्ध असहकार पुकारणे चालूच ठेवणार आहेत. त्यांना ही बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट आणून इशारा देणे शक्य होईल. तसेच शेतकर्याच्या आंदोलन ज्यांनी हायजॅक केलं आहे अशा डाव्यांना पर्यायाने चिनी लाॅबीला इशारा देण्याचे काम फत्ते करतील.
६) सर्वात महत्वाची कारणें चार आहेत :---
i) राष्ट्रपती राजवट आणण्याचे कारण म्हणजे राज्यपालांनी तसा अहवाल सादर केलेला असावा. त्या विरोधात ममता बॅनर्जीने आव्हान दिले तरी ते वाया जाईल.
ii) बिहारमध्ये मिळविलेल्या विजयाने मोदींचा आत्मविश्वास वाढला असेलच.
iii) पश्चीम बंगालमधील भाजपाची स्ट्रॅटेजी आखणार्यांनी केलेल्या ग्रांऊड सर्वेतून पश्चीम बंगालमध्यें भाजपा सत्तेवर येईल असा रिपोर्ट हातात आला असावा.
iv) भाजपाच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या कल्पनेला सर्वत्र पाठींबा मिळत आहे.

मोठमोठ्या राजकीय अभ्यासकांनाही मोदी-शहा जोडीच्या राजकारणाचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. मी तर एक सामान्य माणूस. त्यामूळे मी दोन्ही पर्यांया कडे भाजपाची दृष्टी कशी असू शकेल हे माझ्या परीने मांडले आहे. सर्व विरोधी पक्षांना गुंगी सारखे राजकीय खेळीच्या गोळ्या देत चीतपट करणार्या मोदी-शहा जोडीने भारतीय राजकारण बदलून टाकले आहे याबाबत तरी दूमत नसावे

गुरुवार, १० डिसेंबर, २०२०

मुक्काम पोस्ट चेन्नईवरून-- तामिळनाडूतील निवडणुका निमित्ताने



सुपरस्टार रजनीकांतनी तामिळनाडूतील आगामी विधानसभा निवडणूकीत आपल्या पक्षाचे उमेदवार उभे राहतील असे अलिकडे स्पष्ट केले. त्यामूळे सर्वसामान्यांपासून ते सिनेजगत, मिडीया, राजकीय अभ्यासक आणि विविध राजकीय पक्षात या विषयावर चर्चा सुरू झाल्या आहेत. आपल्या देशात कितीही आर्थिक मंदी आली तरी, तीन क्षेत्रातल्या लोकांना मंदीची फिकीर नसते. ती क्षेत्रं म्हणजे राजकारण, मिडीया,आणि मनोरंजन सोबत जाहिरात. जाहिराताची गरज पहिल्या तीन क्षेत्रांना लागते. उद्योग क्षेत्राला जाहिराताची गरज असतेच पण तिथे मंदीचा प्रभाव पडतो तेव्हा जाहिरातीवरील खर्चात थोडीफार काटछाट होत असते. पण मंदी आहे म्हणून जाहिरातीवरील खर्चात काटछाट करू नका असा सल्ला देण्यात जाहिरात कंपनी यशस्वी होतातच. कारण उद्योग क्षेत्र म्हणजे ग्राहकोपयोगी वस्तूंची निर्मितीचे क्षेत्र. ग्राहक मंडळी मंदीच्या काळात बातम्या, चित्रपट सिरियल्स, संगीत कला नृत्य इत्यादी कार्यक्रम टिव्हीवरून अधिक वेळेसाठी पाहात असतात. म्हणून उद्योग क्षेत्रातील लोकांना जाहिराती बारा महिने द्याव्याच लागतात.  राजकारणातल्या आणि सिनेसृष्टीतल्या मंडळींना प्रसिद्धीची गरज असते. त्यातील काही राजकारणी नट (आम्ही सुद्धा नट आहोत हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची फेमस कबूली) आणि काही सिनेसृष्टीतील राजकारणी मंडळी विविध घटनांवर प्रतिक्रीया देऊन आपले मनोरंजन करीत असतात. काही राजकारणातील मंडळी प्रतिक्रीया अशाच प्रकारे देत असतात की ते विनोदी नटच आहेत असे वाटते.  काही राजकीय मंडळी खलनायकांची भूमिका पार पाडतात.  चित्रपट जगतातील काही मंडळी, प्रत्यक्ष राजकारणात आली आहेत पण ते फक्त डायलाॅग चांगले म्हणतात. चित्रपट सृष्टीतील काही मंडळी प्रत्यक्ष राजकारणात नसतात पण राजकीय
 घटनेवर प्रतिक्रीया देतात ती डी गँगच्या, वा नक्षलगँगच्या आदेशातून. मग ते जावेद अख्तर सारखे गीतकार असो, तीन खान ट्रायो, सारखी हिरो मंडळी. नासीर हूसेन सारखी नट मंडळी, शबाना आझमी सारख्या नट्या असोत. काही मिडीयाचे मालक व त्यांची संपादक मंडळी थेट डी गँग आणि नक्षलगँगच्या आदेशावरू प्रतिक्रीया देतात. सारांश काय तर ही मंडळी सतत व्यग्र असते पण प्रसिद्धी मिळण्याच्या धडपडीत. प्रसिद्धीतून पैसा व पैशातून प्रसिद्धी हे एक सुत्र आहे. या सुत्राचा उपयोग करण्यासाठी देशातील व राज्यातील सत्तेची जरूरी नसते, फक्त विदेशी न दिसणार्या शक्तीची साथ किंवा आशिर्वाद असला की काम फत्ते होत असते. त्यामूळे रजनीकांत सारख्या सुपरस्टारच्या पत्रकार परिषदेवर चर्चा होणे , रंगणे, विविध राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यात शाब्दिक चकमकी घडण्यात  विशेष असे नवीन काही नाही. 


श्री रजनीकांत यांनी ३१ डिसेंबर २०१७ साली पत्रकार परिषद घेऊन राजकारणात भाग घेणार असे जाहीर केले होते. लोकसभेच्या निवडणूकीत ते भाग घेणार नव्हते हे ही त्याच पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले होते. तामिळनाडू मधील निवडणूका २०२१ साली येणार होते हे २०१७ ला आपल्या सार्यांना ठाऊक होतेच की.  तरीही मिडीयातील सुत्रधार राजकीय अभ्यासकांना प्रश्न विचारतात, " आपको नही लगता है की रजनीकांतने राजनीतीमे प्रवेश लेने मे देर कियी है ? " आता प्रश्नाचे उत्तरच ज्यात सामावले आहे अशी पद्धत प्रश्न विचारताना अवलंबवली जाते, तेव्हा उत्तर प्रश्नकर्त्यांच्या मनातलेच येणार हे स्वाभाविक आहे. सुत्रधार असा प्रश्न कुठल्या पक्षाच्या प्रवक्त्याला, किंवा राजकीय अभ्यासकाला विचारतात हे जर नीट विचार करून पाहीले तर यातही राजकारणच दिसेल. तामिळनाडूतील राजकारणाचे स्वरूप डीएमके विरूद्ध एडीएमके असेच कित्येक वर्षे राहिले आहे. या दोन्ही पक्षाचे राजकारण द्रविडीयन थेअरीवर चालत आले आहे. त्यामूळे राष्ट्रीय स्तरावरील हिंदुत्व विचारसरणीचा प्रभाव पडू नये, या कारणा साठी डाव्या विचारसरणीचे  विचारवंत, इतिहासकार, संपादक, साहित्यिक, सिनेसृष्टीतील डाॅन इत्यादी मंडळी आणि इसाई व मुस्लीम धर्मगुरूंच्या लाॅब्या स्वातंत्र्यपूर्वापासूनच जाणीव पूर्वक केलेल्या आहेत. या लाॅब्यांना पैसा कोठून मिळतो हे जगजाहीर आहे. केरळ, बंगाल, काश्मीर, महाराष्ट्र आन्ध्र,झारखंड, ईशान्य भारतातील राज्यें इथे ही असाच प्रकार घडत आलेला आहे. त्यामूळे अडचणीत न येणारा प्रश्न भाजपेतर (विरोधी) पक्षांच्या प्रवक्त्यांना विचारला जातो. चर्चा सत्रात भाजपाचा एक प्रवक्ता असतो. बाकी आठ जण वरील लाॅबीतील असतात. ते सारे जण उत्तर देतात ते असे आहे, " रजनीकांतने बहूत देर कियी है, और रजनीकांतकी क्रेज रही नही है | उनके पास समय भी कम है | और दुसरी बात यह है की, तामिळनाडूमें  द्रविडीयन राजनिती है और रजनीकांतकी स्पिरीच्युअल पाॅलिटीक्स चल नही पायेगी | " यापैकी काही प्रवक्ते तामिळ अस्मिताची बाजू सरस ठरेल असे मांडतात. काही जण रजनीकांत हे मोदी - शहा ह्या फॅसीस्ट नेत्यांचे चेले आहेत असे मांडतात. जेव्हा अशा प्रकारे चर्चा सत्र बघायला मिळते तेव्हा ती चॅनल्स कोणती ते ही आपण जाणताच. एकंदरीत मिडीया असे दाखविल की भाजपा व रजनीकांतची डाळ शिजणार नाही. हवा डिएमकेचीच आहे आणि डीएमकेच सत्तेवर येईल असे सर्वत्र दाखवतील. अशाच पद्धतीने बिहारचे निवडणूकपुर्व चित्र एनडीएच्या विरूद्ध दाखविले होते. निकाल काय लागला, हे आपण पाहीलच आहे.

अर्थात बिहार म्हणजे तामिळनाडू नव्हे हे मी शंभर टक्के खरे मानतो . पण बिहार मध्ये भाजपा २०१४ पुर्वी नगण्यच होता की ! ' सुपरस्टार रजनीकांतचा राजकारणात प्रवेश ' या शिर्षकाचा लेख १ जानेवारी २०१८ ला मी पब्लीश केला आहे. त्यात ब्रॅन्ड क्रिएटींग एक्स्परटने जे म्हटले आहे ते आपल्यासमोर पुन्हा ठेवतो " रजनीकांतने दो साल पहले ही राजनैतिक पार्टी बनानेकी तैयारी कि है | बूथ लेवलपर उनके फॅन्सके क्लब मेंबर्सकोही चुना है | " याचा अर्थ रजनीकांत गेल्या तीन वर्षापासून आपल्या ठिक-ठीकाणाच्या फॅन्स क्लब च्या संपर्कात आहेत.

डीएमके आणि एडीएमके या दोन्ही पक्षांना तामीळनाडूतील जनता आलटून पालटून सत्तेवर बसवित आली आहे. ते ही ॲन्टी इन्कम्बन्सीतून. अशाच प्रकारचे मतदान करून तेथील जनता कंटाळली नसेल असा अंदाज आपण किती काळ बांधू शकतो ? इंग्रजीमध्ये असे म्हटले जाते,You can not fool all the people at all the time. मला वाटते कि डीएमके आणि एडीएमके या दोन्ही पक्षांना Law of marginal diminishing utility चा नियम अनुभवयास येईल. कारण तिथे रजनीकांत चा पर्याय उपलब्ध झाला आहे. पण डीएमके पक्षाला फटका अधिक बसेल की ज्याचे सरकार आहे त्या एडीएमकेला हा एक कूट प्रश्न आहे. एडीएमके सत्तेवर आहे म्हणून डीएमके एडीएमकेवर घणणघाती टिका करेल. पण अशी टिका करूणानिधीच्या गैरहजेरीत, आणि करूणानिधीचे पुत्र अलगिरी व त्याचे कार्यकर्ते भाजपावासी झाल्यामूळे किती फळ देईल याबद्दल डीएमकेचे वर्तमान सर्वेसर्वा स्टॅलीनच सांशक असावेत. या शिवाय डीएमकेच्या सोबत काॅग्रेस आहे, जी बिहार मधील निवडणूकीत महाविकास गठबंधनसाठी एक liability ठरली. म्हणजे डिएमके व डिएमकेचे घटक पक्ष जितकी भाजपावर टिका करील ती उलटी अंगावरच येईल. पण भाजपा जी काही टिका काॅग्रेसवर करेल तितका डीएमकेवर नेगेटिव्ह परिणाम घडू शकेल.

तामिळनाडूतीलच नव्हे तर दक्षिण भारतातल्या जनतेला चित्रपटाची क्रेझ आहे आणि आवडत्या नटाला व नटीला देव-देवताचे स्थान देत असतात. रजनीकांतला तसे स्थान मिळाल्यामूळे त्यांच्या प्रभावाचा परीणाम मतदानावर किती होईल यावर निकाल अवलंबून आहे. डीएमके आणि एडीएमके पक्ष रजनीकांतच्या स्पिरिच्युअल बेसड् पाॅलिटीक्सच्यावर जोरदार टिका करणार असले तरी रजनीकांत तामिळ अस्मिताच्या परिघातच राहून प्रचार करतील. त्यामूळे डीएमके आणि एडीएमके कडे जे अस्त्र आहे ते निकामी ठरण्याची शक्यता अधिक आहे. 

भाजपाचा आणि पंतप्रधान मोदींच्या प्रभावासंबंधी बहुतांश मिडीया वर्ग फारशी दखल न घेण्याच्या मनस्थितीत असले तरी भाजपाकडे गमाविण्यासारखे काही नाही. पण भाजपा सोबत असल्यामूळे एडीएमकेला फायदा होऊ शकेल. अलिकडे अमित शहाचे तामिळनाडूत झालेले स्वागत पाहता, आणि एडीएमकेशी युती असल्याने,  करूणानिधीचे सुपूत्र अलगिरी व त्यांचे कार्यकर्ते भाजपात आल्यामूळे अंदाज  पारंपारिक पद्धतीने काढून निकालाचे संभाव्य आकडे चूकीचे ठरू शकतील. ते किती प्रमाणात चूक ठरतील हे आता सांगणे कठीण आहे. भाजपा बिहारमध्ये जसा जेडीयु सोबत राहिला तसा इथे एडीएमके सोबतच राहील. त्यामूळे डिएमके, काॅग्रेस व डाव्या पक्षांवर टिका करण्याची एडीएमकेची व भाजपाची पद्धत सारखीच राहील. पण बिहारमध्ये लोकजनशक्तीच्या पासवान यांनी फक्त जेडीयुवर टिका केली तसला पक्षपात करणार नाहीत. कदाचित ते त्या दोन्ही प्रादेशिक पक्षावर फारशी टिका करणार नाहीत. माझ्या तर असा अंदाज आहे की, रजनीकांत Vibrant Tamilnadu, Developed Tamilnadu या टॅग लाईन वर प्रचार करतील. नव्या ढंगातील तामिळ अस्मिता सादर करीत विकास हाच मुद्दा मांडून प्रचाराचा नारळ फोडतील.

सन २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूका लढविणार नाही, असे रजनीकांतनी २०१७ च्या वर्ष अखेरीस घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. याचे स्मरण आपणास आहे. लोकसभेच्या निवडणूका न लढता त्यांनी एकूण पाच गोष्टी साध्य केल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत

१) पहिली गोष्ट म्हणजे  तामिळनाडूतील राजकीय पक्षांची वैचारिक बैठक प्रांतीय हिताशीच अधिक निगडीत असल्याने उगीच लोकसभेच्या निवडणूकीत हात पोळून का घ्यावेत ही सोयीची राजकीय चाल स्विकारली. ती सफल झाली.
२) राजकारणातील श्रीगणेशा पारंपारिक तामिळी प्रथांचे अनुकरण करीत आपल्या लोकप्रियतेचा उपयोग फिल्मी स्टाईलने कुठल्याही दबावा विना करता येणं शक्य व्हावे हा हेतू साध्य झाला.
३) एआयडीएमकेला २०२० पर्यंतचा सत्ताकाळ पूर्णपणे वापरण्यापासून आपण अडथळा निर्माण करून एआयडीएमकेला समर्थन करणार्या तामिळीयांचा रोष ओढवून घेण्याचे रजनीकांतला टाळावयाचे होते. तो हेतू ही साध्य झाला.
४) डीएमके आणि एडीएमके या दोन्ही पक्षापासून निवडणूकीच्या प्रचारात समान अंतर ठेवणे त्यांना आता सोपे जाईल आणि टिका करताना दोन्ही पक्षांनी तामिळी जनतेचे काय भले केले असे म्हणत स्वतःच्या पक्षाचा जाहीरनामा सादर करण्याची योग्य ती संधी साधता येईल  हा हेतू साध्य झाला आहे.
५) देशभर पंतप्रधान मोदी, मोदी सरकार, भाजपा आणि संघाला मिळणार्या पांठींब्याला आपण आव्हान करीत आहोत असा चूकीचा संदेश देशभरातील स्वतःच्या चाहत्यापर्यंत जाऊ नये. उलट मोदी,भाजपा व संघाला जो जनमताचा पाठींबा मिळतो त्याचा आपल्या पक्षाला लाभ मिळण्याची सोय करावी हा हेतू साध्य झाला आहे.

टाईम्स नाॅऊ या न्युज चॅनेलवर रजनीकांत ची पत्रकार परिषद संपल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आर्थिक विषयावरील तज्ञ श्री गुरूमुर्ती यांच्याशी टाईम्स नाऊ चॅनलवर तामिळनाडूतील एकूण राजकीय स्थिती आणि येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकी संबंधीत प्रश्नोत्तराचा कार्यक्रम झाला. तेव्हा गुरूमुर्तीने प्रांजळपणे  म्हणाले की  " रजनीकांत माझ्याकडून सल्ला घेत असतात पण निर्णय घेण्याचे काम त्यांचे आहे. मी सल्ला देतो हेच काम करतो.  बाकी रजनीकांतच्या निर्णय प्रकीयेत मी हस्तक्षेप करीत नाही." गुरूमुर्ती पुढे एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की की " रजनीकांतने वापरलेला स्पिरीच्युअल बेस्ड पाॅलिटीक्स हा शब्द तामिळनाडूत सर्रास वापरण्यात येतो.  तो हिंदुत्व या शब्दाचा समान अर्थी शब्द आहे. त्यामूळे रजनीकांत यांचा पक्ष निवडणूक पुर्व वा निवडणूकीनंतर एनडीएचा हिस्सा होऊ शकतो. "

तामिळनाडूतील राजकारणाचे दोन बाॅस डाॅ करूणानिधी आणि सुश्री जयललीताच्या निधनानंतर विधानसभेची ही पहिली निवडणूक आहे. त्यामूळे डीएमके आणि एडीएमके या दोन्ही पक्षांची ताकद क्षीण झालेली असावी. दुसरे असे की डीएमके आणि एडीएमकें या  दोन्ही जुन्या पक्षांना आपले मत देऊ इच्छीत नाही,असा बर्यापैकी संख्याचा मतदार आहे. तो रजनीकांतकडे आकृष्ट होऊ शकतो. एकंदरीत रजनीकांत मुळे तामिळनाडूतील राजकारण घुसळून निघेल आणि हे घुसळून निघतांना डिएमके व एडीएमके ची दमछाक होईल पण त्यांचे किती नुकसान होईल या संबंधीचा अंदाज प्रत्यक्ष प्रचाराला गती आल्यावर मांडू या.

रविवार, ६ डिसेंबर, २०२०

आनंदवनातील दुःखद घटना आणि सामाजिक संस्थासंबंधीच्या व्यथा व उपाय

वीस पंचवीस वर्षानंतर दिवाळी सणासाठी गावी गेलो होतो. सोमवार ३० नोव्हेंबरला बोरीवलीत परतलो. संध्याकाळी पुजनीय बाबा आमटेच्या आनंदवनाच्या  सिईओ डाॅ शितल आमटे यांची आत्महत्या अशी बातमी ऐकली. क्षणभर विश्वास बसेना. मुळात अकस्मात मृत्यूच्या बातमीवर विश्वास बसत नाही. त्यात सेवाधर्मातील अग्रणी संस्थापैकी आनंदवनाच्या डाॅ शितलजींची आत्महत्या ! अनेकांना दुःख झाले. घटना दुर्दैवी पण तितकीच गंभीर अशी. आतापर्यंत गवगवा होत असणार्या समाजकारणात घडलेली भूकंप सद्दश ही घटना. देशाच्या राजकीय मंचावर उठसूठ भूकंप होत असतात. खरं म्हणजे पत्रकार व संपादक मंडळी पक्षांतरासारख्या गोष्टींना भूकंपाची संज्ञा का देतात हाच प्रश्न पडतो. राजकारणात या घटना नित्याच्या झाल्या आहेत, सदा मरे त्याला कोण रडे अशा धर्तीच्या त्या घटना. परंतु सामाजिक संस्थेतील एका अग्रणी संस्थेच्या सिइओ डाॅक्टर शितल आमटेंच्या आत्महत्येची जी कारणें ऐकू आली, त्यावर विश्वास ठेवणे जड जात आहे. कारण स्वर्गीय बाबा आमटेंनी निर्माण केलेले आंनदवन म्हणजे कुष्ठरोगाच्या रूग्णांचा या भूतलावरील स्वर्ग आहे. म्हणूनच या बातमी संबंधी संवाद कसा साधावयाचा हा माझ्यासमोर पेच उभा राहीला आहे, हे प्रथम प्रांजळपणे कबूल करतो.

स्वर्गीय बाबा आमटेंनी कुष्ठरोग्याच्या जीवनात जो आनंद निर्माण केला, ते कार्य शीव धनुष्य उचलण्याइतके महाकठीण होते. भारतियांची कुष्ठरोगांसबंधी असलेल्या मानसिकतेवर आधूनिक विज्ञानशास्त्राच्या आधारे एक हाती मिळविलेला तो  एक मोठा विजय आहे. जीवनात वैज्ञानिक दृष्टीकोन स्विकारून ' कुष्ठरोग ना मागील जन्माचे पातक, ना संसर्ग रोग ' हे सिद्ध झालेले प्रात्यक्षिक म्हणजे त्यांनी उभारलेले आनंदवन. त्यामूळे त्यांचे ते कार्य त्यांच्या कुंटुंबियांच्या तिसर्या पिढीपर्यंत प्रेरणा देणारे ठरले. पण ही प्रेरणा कुठे कमी पडली असावी? समाजसेवेचे व्रत नसानसात भिनलेल्या, उच्चविद्याविभूषित, संयमी व सद्भभावी डाॅ शितल आमटे यांच्या अकाली व अकल्पनीय रित्या देवाघरी जाण्याने आपल्या समाजाला भूतकाळात नेहमीच पराभवाच्या खाईत लोटत असलेला, राजकीय सत्तास्पर्धेतून निर्माण झालेला गृहकलह वा घरेभेदीपणा, समाजकारणात आणि तो ही सेवा क्षेत्रात घुसून समाजालाच विळखा घालील कि काय अशी भिती वाटू लागली आहे.

बाॅलिवूड मधील सिने कलाकार सुशांतसिंगच्या मृत्युचे कारण आत्महत्या आहे असे महाराष्ट्रच्या गृहमंत्र्यांनी काहीही चौकशी झाली नसताना लागलीच जाहीर केले. त्यावरून वादळ उठले व त्यांसंबधीत चौकशी सुरू आहे. त्यावर आपण चर्चा केलेली आहे आणि पुढे ही आपल्याला करावी लागेल. पण त्या निमित्ताने आत्महत्येची संख्या वाढत का जात आहे यावर मतप्रदर्शन करतांना मी म्हटले होते की, आजच्या स्पर्धेच्या युगात Level of ambition आणि Level of Satisfaction यामधील सुवर्णमध्य साधणे गरजेचे आहे. पण शितल आमटे ह्या बाॅलीवूडमधील कलाकार नव्हत्या. त्यांनी स्वंयस्पूर्तीतून समाजकार्यात ओढून घेतले होते. तिथे दुसर्या संस्थेशी कुठलिही स्पर्धा नव्हती. मग शितल आमटेंनी आत्महत्या का केली असावी? यावर चर्चा सुरू झालेली आहे आणि अनेकांनी आपले मतप्रदर्शन ही केलेले आहे.

श्री महेशजी काळे यांची या संदर्भातील सोशल मिडीयावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्या पोस्ट चे शिर्षक ' सामाजिक कार्याच्या प्रेरणा पुन्हा तपासून पाहाव्यात ' असे आहे. ती पोस्ट सर्वांनी वाचावयास हवी.  ती पोस्ट इतकी अभ्यासू वृत्तीतून आकारास आली आहे की स्वर्गीय बाबा आमटेंच्या आनंदवनात घडलेल्या दुर्दैवी घटनेवर अधिक काही लिहावे असे शिल्लक राहीले नाही. डाॅ शितल आमटेंच्या संबंधी काळे यांनी गौरवोद्गार काढले आहेत. बाबा आमटेच्या निधनानंतर बाबांनी निर्माण केलेल्या एका प्रकल्पाला त्यांच्या घरात समातंर प्रकल्प अस्तित्वात आला आहे असे म्हटले आहे. याचा अर्थ हाच आहे की  बाबा आमटेंच्या कटुंबिंयातच स्पर्धा सुरू झाली असल्याचे कळते. हे सत्य मांडतांना श्री महेशजी काळेंना अतिव दुःख झाल्याचे त्यांच्या शब्दातूनच दिसून येते. या ठिकाणी मला माझे मन सांगते, की  " जसे अट्टल गुन्हेगाराच्या उलट्या काळजाच्या एका कोपर्यात सत्प्रवृत्तीची इवलिशी ज्योत निर्माण होते,  तद्वत ज्यांच्या नसानसात सेवा वृत्तीची ज्योत तळपती आहे असे बाबांच्या कुटुंबियांच्या मनात बदलत्या परिस्थितीत इवलिशी स्वार्थी वृतीचा शिरकाव झाला असावा. त्या उलट्या काळजाच्या गुन्हेगाराला क्षमा व्हावी असे आपले मन इच्छीत असते की नाही? याही पुढे जाऊन स्वतःला लिबरल म्हणवून घेणारे विचारवंत त्याला माफी मिळण्यासाठी हिंसक अंदोलनही करण्यास मागे पुढे पाहात नाहीत. म्हणून आमटे कुटुंबियात घडलेल्या घटनेमूळे त्या कुटुंबांची बदनामी होईल असे वक्तव्ये करण्याचे हितचिंतकांनी टाळावे. बाबा आमटेच्या आनंदवनात जी काही चूक घडली असेल ती समाजाने पदरात घ्यावी आणि बाबा आमटेंच्या कुटुंबियांनी बाबांचे कार्य बांबाच्या प्रतिष्ठेला शोभेल अशा प्रकारे सुरू ठेवावे हीच आजच्या घडीची गरज आहे."

बाबा आमटें स्वर्गवासी झाल्यानंतर त्यांच्या कार्याला आणि संस्थांना रोडवत चाललेला आर्थिक मदतीचा ओघ, वाढता खर्च, मिडीयांतर्फे स्वर्गीय बाबा आमटेंच्या कार्याला मिळत असलेला ग्लॅमर इत्यादी कारणांचा ही उहापोह श्री काळे यांनी केला आहे. स्वर्गीय बाबा आमटेच्या कार्यावर पराकोटीचा आदर व्यक्त करीत त्यांनी उभारलेला सामाजिक कार्याचा डोलारा कोसळू नये अशी प्रार्थनाही केली आहे. महेश काळेंनी आपल्या पोस्ट मध्ये जे मांडले आहे, त्यातून सामाजिक संस्था म्हणजे आपल्या समाज- जीवनाचा आधार आणि तो टिकला पाहिजे अशी तळमळही व्यक्त केली आहे. ते पुढे म्हणतात की , " अर्थप्राप्ती, कुटुंबाचे हित, आणि प्रतिष्ठा या प्रेरणा समोर ठेवूनच मनुष्य कुठले तरी कार्य करीत असतो. पण आपल्या येथे आणखिन कुठे लिखीत स्वरूपाची नसली तरी आपल्या साधू-संतानी, महापुरूषांनी आपल्या कृतीतून एका  प्रेरणेचे दर्शन समाजाला घडविले आहे. " आपल्या संस्कृतीतील समाज सेवेच्या पाठीमागे असलेल्या या अलौकीक अशा प्रेरणेचे वर्णन अधिक स्पष्ट होण्यासाठी त्यांनी राजा रंतीदेवचा एक श्लोक दिला आहे, तो खालील प्रमाणे आहे,
          न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुर्भवम् |
          कामये दुःखताप्तातां प्राणिनाम् अर्तिनाशनम् ||
(अर्थ- मला राज्य, स्वर्ग किंवा पुनर्जन्माची इच्छा नाही, तर दुःखितांचे दुःख दूर झाले पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे)

श्री महेश काळेंनी योग्य ठिकाणी, योग्य तो अर्थबोध होणारा, योग्य तो श्लोक आपल्यासमोर ठेवला याबाबत त्यांचे कौतूक करावे तितके कमी आहे. अर्थात ' कामये दुःखताप्तातां ' अशी इच्छा सर्वसामान्यांनी धरावी असे महेश काळेंना अपेक्षित असली तरी तसा ते आग्रह करीत आहेत असे सूचीत होत नाही. पण निदान सेवा धर्माचे प्रकल्प राबविणार्यांची इच्छा मात्र दुःखितांचे दुःख दूर करणे हीच असावी असा त्यांचा आग्रह आहे. म्हणूनच त्यांनी तो श्लोक आपल्या समोर ठेवला असे मला वाटते.  कारण जर का समाजकारणाला राजकीय व्यवस्थेप्रमाणे किड लागली तर सामान्यजनांचा समाजव्यवस्थेवरचा विश्वास उडेल. मग पुढे ती तर अराजकतेची नांदी ठरू शकते. म्हणून समाजातील सज्जन शक्ती सतत जागरूक असणे गरजेचे आहे असे मला वाटते. मग या सज्जन शक्तीला जागरूक कसे करावे, कोणी करावे, सरकारने केलेले कायदे तोकडे पडतात  कि कायदे राबवणारी यंत्रणा भ्रष्ट आहे , अशा यंत्रणेत विदेशी पैसा, शक्ती घूसल्या आहेत, आणि त्यांच्याकडून येणार्या  पैशाची, प्रतिष्ठेची नशा चढू लागली आणि त्यातून स्पर्धा, वाद, कलह होऊ लागले, आणि मग असहायतेने कोणी आत्महत्या केली तर तो एक प्रकारें घरभेदीपणाच की नाही  इत्यादी प्रश्नांची शृखंला समोर उभी राहते. शेवटी या सर्वांचे उत्तर एका वाक्यात मांडायचे असेल तर एक वाक्य माझ्या वाचनात आले आहे तेच समर्पक ठरते. ते असे आहे, ' The progress of the nation or for that matter of any society or community in general is far less depend  upon the form of it's institution rather than character of it's own men.' आनंदवनातील दुर्दैवी घटनेचे आपल्या राज्यातील सरकारला सोयरसूतक आहे की नाही हेच अजून स्पष्ट झाले नाही. त्यावरून माझ्या वाचनात आलेले ते वाक्य किती सत्यतेशी जूळत आहे हे आपल्या ध्यानात आले असणारच !

सामान्यतः हाव मग ती कशाची का असेना त्याकडे मानवी मन चटकन धावते. पण तेच त्याचे मन सहजा सहजी त्याग करण्यास तयार नसते. कारण उपभोगाइतकी त्यागाची प्रवृत्ती स्वाभाविक नाही. माणसाला चांगले बनवावे लागते. तो तसा बनला, तरी त्याचे चांगूलपण टिकवावे लागते. पण त्यासाठी पूरक अशी सामाजिक परिस्थिती निर्माण करणे हे सर्व काळी, सर्व क्षेत्रातल्या नेत्यांचे काम असते. पण नेते  म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते फक्त राजकीय क्षेत्रातलेच. त्यापैकी बहुताशांनी राजकीय पक्षच आपल्या घराण्यातील वारसांच्या दावणीला बांधले आहेत. सहकार क्षेत्रातील बँका, पतपेढ्या, साखर कारखाने, शेतमाल, दुध डेअर्या, पासून ते विविध खते, पशुखाद्याच्या, अन्न-धान्य पुरविणार्या संस्था सहकाराच्या नावाखाली लुटल्याची उदाहरणे बरीच आहेत. तिथेही त्यांचे वारस मालक झालेले दिसतात. अशा शेंबड्या मुलानांही आम्ही त्यांच्या बापजाद्यांच्याप्रमाणे  देवघरात बसविले. म्हणूनच ध्येयवादी महात्म्यांच्या स्पूर्तीतून आणि त्यागातून निर्माण झालेल्या संस्था एकतर लयास गेल्या किंवा त्या निव्वळ नफेखोरीचे अड्डे बनले. कारण संस्था संस्थापकाचा ध्येयवाद ती चालविणार्या पुढल्या पिढीच्या आचरणात उतरत नाही. संस्थेचा उज्वल ध्येयवाद बहुधा एका पिढीभरच टिकतो. कारण दुसर्या पिढीला तो हिणकस झाल्याशिवाय राहात नाही. बाबा आमटेचे कुटुंबीय एक अपवादात्मक उदाहरण आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक जीवनाच्या काही संस्थाच्या तीन पिढ्यांचा इतिहास पाहिला तर पहिल्या पिढीची ध्येयाची पताका कधीच उडून गेलेल्या दिसतात. मग क्षेत्र कुठलेही असो. आता तर हा दुबळेपणा लपविण्यासाठी 'संस्था जगली पाहीजे' हे एक सूत्र संस्थाचालकांनी चतुराईने वापरण्याची सुरूवात केलेली दिसते. क्रिडा आणि मनोरंजन क्षेत्रातील लोकांनाही आम्ही  देवत्व बहाल केले. याच्यांपैकी कितीजणांनी कोरोना संकट निवारण्यासाठी आर्थिक मदत केली? या क्षेत्रातील लोकांनी सुद्धा राजकीय नेत्यांप्रमाणे बेनामी मालमत्ता निर्माण केली नाही का? अशा मंडळींचा बेटींग, अन्डरवर्ल्ड लोकांशी मिलीभगत आहेच ना ! अशाच नेते मंडळीना व सेलेब्रटींना समाजातील महाजन वर्ग म्हणून प्रशस्तीपत्रके मिळू लागली असताना प्रवाहपतीत असलेल्या सामान्यजनांनी कुठल्या मार्गाने जावयाचे? या संबंधीत पत्रकार व संपादक मंडळींकडून काही अपेक्षा ठेवावी तर अशी उरली सुरली आशा कधीच मावळली आहे. कारण हीच मंडळी वरील नेतेमंडळी व तथाकथीत सेलेब्रटींचे दलाल आहेत हे उघड होत आहे. 

आपल्या देशात सज्जन माणसे कमी आहेत असे नाही. आजही असंख्य प्रामाणिक आत्मे कोणत्याही मोहाला बळी न पडता आपले कर्तव्य पार पाडीत आहेत. शहाणी माणसे ही थोडी थोडकी नाहीत. तसेच सेवा परमो धर्मः या तत्वाचे पालन करीत  काम करणारी माणसे ही असंख्य आहेत. पण ते अलग अलग पडली आहेत. त्यातील काही आपल्या पायापुरते पाहात आहेत तर काहींना मार्ग सापडला आहे पण पुढची दिशा सापडत नाही. काही जणांची परोपकाराय पुण्याय पापाय परपिडनम् या महर्षी व्यासांच्या उक्तीवर प्रचंड श्रद्धा आहे. पण आपण समाजासाठी काही  करू शकतो असा आत्मविश्वास नाही. असे ते लोक, म्हणजे विखूरलेले तेजःकण आहेत. अशा सर्व सत्प्रवृत्त लोकांनी समाजधर्माच्या म्हणा वा सेवा परमो धर्मः या ब्रीदवाक्याने प्रेरीत होऊन सांघिकतेने आपले बळ वाढविले तर असत् प्रवृत्तीचा पराभव होऊ शकतो. जीवन म्हणजे एखाद्या व्यक्तीचे  किंवा एखाद्या कुटुंबाचे जगणे नव्हे. ते सार्या समाजाचे जगणे आहे असा विचार म्हणजेच सामाजिक समरसता. म्हणजेच देशाचे सार्वभौमत्व होय. जेव्हा आपण सार्वभौम आहोत असे म्हणतो त्यातून आपण संघटीत आहोत असा ही अर्थ अभिप्रेत असतो. " देशाची, समाजाची उन्नती ही तिथे राज्यप्रणाली कुठली, सरकार कुठच्या विचारसरणीचे आहे, इत्यादी राज्यशास्त्रीय नियमांपेक्षा तेथील याच्चवत प्रत्येक नागरिकाच्या चारित्र्यावर अधिक अवलंबून असते." मग चारित्र्यवान नागरिक कसे घडवावयाचे?  एखाद्या महात्मा वा महामानवाच्या जीवनचरीत्राच्या पारायणातून हवा तसा परीणाम हाती लागत नाही. ही वस्तुस्थिती आहे. तसेच काळ इतका बदलला आहे की एखादी व्यक्ती कितीही ज्ञानी आदर्शवादी, परोपकारी कर्तबगार, शक्तीमान असली तरी ती व्यक्ती संपूर्ण देशाला वा जगाला मार्गदर्शन करीत दशांगुळे वर उरेल असे संभवत नाही हे सत्य आहे. त्यामूळे समाजापुढील आणि पर्यायाने देशापुढील समस्या संघटीत शक्तीनेच सुटू शकतील. म्हणतात ना ' संघौ शक्ती कलियुगे | '  हे शंभर टक्के पटते.

श्री महेश काळेची ती पोस्ट  बोरीवलीतील परांजपे नगरात राहणारे माझे परम मित्र श्री श्रीधर साठेंनी मला फारवड केली आहे. श्रीधर साठे यांचा ही व्यासंग फार मोठा आहे. ते ही सतत समाजसेवेत व्यस्त असतात. त्यांनी ती पोस्ट मला फारवड केली, त्या सोबत त्यांनी  त्यांची छोटीसी प्रतिक्रीया दिली आहे, ती अशी आहे, 
"आपल्या संस्थेबद्दल आपुलकी असावी पण स्वामित्व नसावे. अर्थात संघ परिवारातील अनेकनेक संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते आपुलकीने काम करतात. पण संघाने कोणत्याही संस्थेचं व्यवस्थापन वा रूपांतर हे वैयक्तिक किंवा कौटुंबिक मालमत्तेत होऊ दिले नाही. हां काही जण कौटुंबिक मालमत्तेत ट्रस्टचा मुखवटा चढवून तसा आभास निर्माण करतात. पण अशा संस्थाना संघ परिवार आपल्या पंखाखाली कधीच घेत नाही. संघाच्या धुरीणांनी किती खोल विचार केलाय ना !"

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या सेवा संस्थेतील आजपावेतो कुठल्या ही संस्थाची मालकी कोणा व्यक्तीच्या वा त्याच्या वारशांच्या मालकीची झाली नाही हे जे श्रीधरजी साठेंनी म्हटले आहे ते सत्य आहे. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भर चारित्र्यवान नागरिक बनविण्यावर अधिक आहे. म्हणून बालवयात संस्कार होण्यासाठी शाखेत थोर, त्यागी महापुरूषांच्या कथा सांगितल्या जातात. शिवाय बलोपसना तसेच घोष वादन, एकल गीत, सांघिक गीत गावयाचे शिक्षण शाखेत दिले जाते.  विविध प्रकारचे शारिरीक व बौद्धिक खेळ शिकविले जातात. ते ही मुफ्तपणे. संघात प्रवेश घेण्यासाठी ना प्रवेश फाॅर्म आहे, ना कुठली अट. त्यामूळे मानवी जीवनातील सर्वश्रेष्ठ अशी  दान व त्याग ही जीवनमूल्यें बाल स्वयंसेवक आपसूक आत्मसात करतात. मग पुढे हे बाल स्वयंसेवक मोठे झाल्यावर स्वतः पुढाकार घेऊन सेवा प्रकल्प उभे करतात. कारण त्यांच्यातील सदगुणांची निकोप वाढ झालेली असते. सदगुणी मनुष्य या जगात सुखी होईलच असे नाही. किंबहुना मनुष्याचा आत्मा जितका अधिक विकसित, तितके त्याचे दुःख अधिक ! पण हा आत्मा सुखी नसला तरी इतरांना सुखी करण्याच्या कामी तो सतत झटत असतो; कारण त्याच्या भावविश्वात केवळ स्वतःच्या सुखाच्या इच्छांनाच स्थान असते असे नाही. त्याच्या सुखाशी ज्यांचा काडीइतका संबंध नाही, अशा जीवनाला उपकारक असणार्या सर्व गोष्टींना त्यात स्थान असते.

संघ या शब्दाचा अर्थ म्हणजे सांघिकतेने समाजसेवा व देशसेवा करणारी संस्था. संघ म्हणजे ' मी ' ने 'आम्ही ' त  कायम स्वरूपात सामील होणे . म्हणून तिथे रूसवे फुगवे दिसत नाहीत. संघ कधीही सेवा प्रकल्पाची आपलीच मक्तेदारी आहे असे मानत नाही. इतर सेवा संस्थाना संघ कमी लेखीत नाही. उलट स्वयंसेवकांना सर्व समाजसेवी संस्थांमधून सेवा धर्म निभावा असा सल्ला देत असतो. नव्हे तशी शिकवण स्वयंसेवकांच्या नसनसात भिनलेली असते. कोरोनाच्या साथीत अनेक देवालये व इतर सहकारी आणि सेवा संस्थाच्या सोबत संघाने कार्य केले आणि अजूनही सुरू ठेवले आहे.  सन २०२५ च्या विजया दशमीला संघाची जन्मशताब्दी साजरी होणार आहे. त्यासाठी संघ विविध कार्यक्रम आयोजित करणार आहे. समाजातील सर्व स्तरावरील भेद, विवाद, भिडस्तपणा जाऊन समरसतेची श्रीमंती नांदावी असा प्रयत्न संघाचा राहील. त्यातून सांघिक शक्ती वाढीस लागेल आणि अंती आपला देश समर्थ बनण्याचे उद्दीष्ट संघ साकार करेल अशी आशा बाळगून मी आपली रजा घेतो.

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...