रविवार, १५ नोव्हेंबर, २०२०

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? (भाग-२)

 क्रमशः भाग एकवरून ....

माणूस सामाजिक प्राणी मानला जातो ; याचा अर्थ तो मुलतः प्राणी असतोच की ; पण जो सामाजिक बनतो, त्याची वाटचाल देवत्वाकडे सुरू होत असते. सामाजिक म्हणजे घोळक्यात राहणे नव्हे. तसे तर पशू ही कळपात राहतात. सध्याच्या काळातील आघाडीचे सरकार म्हणजे कळप. माणूस म्हणजे देव व प्राणी मधला एक ताण होय. देवत्वाकडे जाण्याचा प्रयत्नाला सुरूवात झाली असे कधी म्हणता येईल? जेव्हा माणूस समाजाच्या हिताचे काहीतरी चांगले कार्य करू लागतो तेव्हा. म्हणजे  प्रत्येक जन्मात उत्तरोत्तर जीवन उन्नत करण्याचा प्रयत्न करतो तो खर्या अर्थाने सामाजिक बनतो. अशा अनेक जन्मातील पुण्याईची गंगाजळी घेऊन जो जन्मतो तो समाजाचाच बनतो. त्याचा दिनक्रम समाजाच्या कार्याने सुरू होतो आणि संपतो तोही सामाजिक कार्यानेच संपतो. त्याची इहलोकांची यात्रा संपेपर्यंत त्याचे समाज व देशकार्य सुरूच असते. तोच खरा कर्मयोगी. अर्वाचीनच नव्हे तर भारताच्या प्राचीन  इतिहासात ही राजकारणात फक्त लेखणी हे शस्त्र वापरून ज्यांनी समाज व देशासाठी पत्रकारीता, रूग्ण सेवा, शिक्षण संस्थेच्या द्वारे विद्यादान, स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वतःला झोकून घेत, कारावासात गेले आणि तिथे ही  गीतारहस्य सारखा ग्रंथ लिहून अध्यात्मिक क्षेत्रात अत्युच्च शिखर गाठले असा अद्वितीय कर्मयोगी म्हणजे लोकमान्य टिळक. लेखणी कशी असते याचे साधे उत्तर म्हणजे , ती एक सामान्य वस्तू. पण ती दुरदृष्टी असलेल्या व्यक्तीच्या हातात आली की ती लेखणी त्या व्यक्तीला विभूतीचे रूप देते.  प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगता यावे अशी व्यापक इच्छा ज्या व्यक्तीच्या नसानसात भिनते आणि त्यासाठी आपले जीवन खर्ची करते, तेव्हाच ती व्यक्ती आपल्या लेखणीतून किंवा वाणी द्वारें 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ' अशी सिंहगर्जना करू शकते. ती ही सामर्थ्यशाली ब्रिटीश सरकारच्या विरोधात. त्या सिंहगर्जनेत इतकी ताकद होती की देशभरातील अनेक युवकांनी प्रेरणा घेत टिळकांनी मांडलेल्या स्वराज्यरूपी यज्ञकुंडात उडी घेतली.

आज आपण काय पाहतो आहोत? 'आम्ही वाघ ' इतकी एकच पोकळ वल्गना अनेक वर्षे ज्यांच्या मुखातून ऐकत आलो आहोत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत आणि अप्रत्यक्ष रित्या सामना या वृत्तपत्राचे संपादक आहात. बरं सत्तेत कसे बसले? मागच्या दारातून. मग समाज यांना वाघ कसे मानणार? बरं 'आम्ही वाघ ' अशी पोकळ वल्गना  आपल्या शत्रूदेशाविरूद्ध असती तरी ती चालली असती. कारण यांना थोडीच शत्रुदेशांविरूद्ध लढाई उभारायची आहे. ती जबाबदारी केंद्र सरकारची असते आणि केंद्रात तर आता जे मोदी सरकार आहे, ते चीन सारख्या शत्रूदेशाच्या तोंडातले पाणी पळवित असल्याचे आपण पाहतो आहोत. पण मोदी सरकारचा द्वेष करण्याची इतकी सवय भाजपेतर सरकारला व पक्षांना लागली आहे की  मोदी सरकारने शत्रुदेशावर सर्जीकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला तरी त्याचे पुरावे मागितले. जणू काही ही नेतेमंडळी सीमेवरून लढलेले व सेनाधिकारी म्हणून निवृत्त झाली आहेत. काय यांचा हा तोरा ! त्यामूळेच भाजपेतर पक्षांचे नुकसान होत आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात काॅग्रेस सरकारने १९७५ साली आणिबाणी आणली होती, तेव्हा काही लोक बिळात लपले, काहीनी घाबरून आणिबाणीला पांठींबा दिला तर काहीं नी तत्कालीन पंतप्रधान व त्यांच्या पुत्राचे जोडे हातात घेतले. अशी मंडळी ज्यांचे पुर्वज आहेत असेच लोक आज  महाराष्ट्रात सत्तेत आहेत.  त्यामूळे गेली सहा वर्षे 'आम्ही वाघ ' असे काही कर्कश शब्दात  ऐकू येते, ती वाघाची डरकाळी नसून भितीने धास्तावलेल्या शेळीचे रडणे आहे, हे मतदारांनी २०१४ च्या लोकसभा व विधानसभा तसेच २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत भाजपाला मतें देऊन सिद्ध केले आहे.

लोकमान्य टिळकांच्या स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या सिंहगर्जनेचा खोलवर जाऊन अभ्यास केला तर त्यात जगभरातले राजकारण कसे असावे, राज्यकर्त्यांनी आपले आचरण कसे ठेवावे याचा एक वस्तुपाठ आहे. स्वतंत्रता ही प्रायः सर्व प्राणीमांत्राना हवीसी वाटणारी गोष्ट. स्वातंत्र्य,अन्न, निवारा आणि सुरक्षा या चार गोष्टी निश्चीत झाल्या की  निश्चींत झालेले मन विकासाकडे धावते. त्यातूनच त्याची अंगभूत  सृजनशिलता जागृत होते. याची जाणीव अध्यात्माचे गाढे अभ्यासक असलेल्या लोकमान्यांना असणे ही बाब तर स्वाभाविक होती.'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ' ही घोषणा अखिल मानवजातीच्या विकासाची दिशा दाखविणारे एक होकायंत्र आहे. हेच होकायंत्र महाविकास आघाडी सरकारने मोडण्याचे सत्र आरंभिले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? तर प्रत्येक व्यक्तीला व्यक्त होण्याचा अधिकार आहे. तसे पाहता प्रत्येक व्यक्ती प्रथम स्वतःशीच व्यक्त होत असते. प्रत्येक व्यक्तीचे एक स्वतंत्र ब्रम्हांड असते. तिच्याकडे अनेक अंगभूत गुण म्हणा वा कुशलता असते. आर्य चाणक्यांनी म्हटले आहे अयोग्यः पुरूषा नास्ती | त्या व्यक्तीला व्यक्त होणावर निर्बध घालू नका. मग त्यातूनच तिचा प्रवास विकासाच्या वाटेवर सुरू होतो. दुसर्यांशी व्यक्त होणे म्हणजे संवाद. मनमोकळ्या वातावरणात संवाद साधत अनेकांशी संवाद होत गेला की समाजातील प्रत्येक व्यक्ती परस्परात सुसंवाद निर्माण होऊन समाज एकजीव होतो त्याचेच नाव सामाजिक समरसता आहे. त्यातून समाजाचा जो विकास होतो तो चिरस्थायी ठरतो. लोकमान्य टिळकांच्या  स्वराज्याच्या कल्पनेत समाजातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य म्हणजे समाज व राष्ट्राच्या स्वार्वभौभत्वाच्या पायाच्या विटा आहेत. प्रत्येक देशात अशा लोकशाही कल्पनेची गुंफण घातली गेली की जगात शांती, ज्ञान, आणि विकासाचे राज्य निर्माण होऊ शकते. म्हणूनच पत्रकारांचे स्वातंत्र्य अबाधित राहणे आवश्यक आहे.  लोकमान्य टिळकांनी देश इंग्रजाच्या दडपशाहीत असताना सरकार विरूद्ध रोखठोक भूमिका मांडली होती. ते अत्युच्च शिखरावरील पराक्रमी संपादक होते. वाघाच्या चित्राचे कागद आपल्या अंगावर धरल्यानी कोणी संपादक वा नेता वाघ होत नाही. 

वाचक व श्रोत्यांच्या म्हणजेच जनतेच्या समोर सरकारच्या काळ्या कारस्थानांचे बाभाडे काढणार्या व्यवस्थेला चिरडून टाकण्याची भाषा वा व्यवहार तो ही  स्व- सरकारनेच सुरू केला तर स्वराज्य आणि परवशतात फरक तो काय राहीला? कार्तविर्यासारखे राजे महाराज जनतेची छळवणूक करू लागले,  तेव्हा अत्री ऋषीने प्रजेमध्ये जागृती निर्माण केली. त्या जागृतीत इतकी ताकद होती की भगवान विष्णूला सहावा अवतार घ्यावा लागला. भगवान परशूरामांनी मस्तवाल राजे-महारांजाना यमसदनास पाठवून पृथ्यी सतरा वेळा निःक्षत्रीय केली होती. या इतिहासापासून महाराष्ट्रातील विद्यमान सरकारने धडा घेत आपला व्यवहार सुधारयला हवा. कलियूगात भगवान परशुराम अवतरणार नाहीत पण त्यांची शक्ती चिरंजीवी आहे. ती कलियुगातील राजकारणात मतदारांच्या सद्विवेक बुद्धीत साठलेली असते. आपण प्रातः स्मरणात
           अश्वत्थामा बर्ली व्यासो हनुमंतच्च बिभिषणो |
           कृपा परशूरामाच्च सप्तैनै चिरंजीवीना ||
या प्रार्थनेत व्यक्तींची जी नावे आहेत, त्यांची प्रत्येकाची एक वृत्ती अशा सात वृत्ती चिरंजीवी आहेत.  यात अश्वत्स्थामा म्हणजे सुडाने पेटून राहण्याची वृत्ती. ती वृत्ती काळ बदलला तरी चिरंजीवी राहते आहे. अश्वत्स्थामाच्या आत्म्याला सूडबुद्धीमूळे मुक्ती मिळणार नाही असा जो शाप मिळाला होता त्याचा अर्थ असा आहे की सुडबुद्धीने व्यवहार करण्याची सवय लागली की ती जन्मोजन्मी टिकते. 

यंदाच्या दसर्या मेळाव्यात शिवसेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ' आम्ही वाघ ' असे म्हणत त्यांनी अर्णव गोस्वामी, माजी मुख्यमंत्री श्री देवेद्र फडणवीस,  देशाचे गृहमंत्री  श्री अमित शहा, आणि पंतप्रधान मोदी यांना हा इशारा दिला. आपल्या पंतप्रधानाची शक्ती जागतिक नेत्यांना कळली आहे. ती कळण्यासाठी परदेश दौरे करावे लागणार नाहीत. आता शिवसेना नेते ज्यांच्या मांडीवर बसून राज्याचा कारभार करीत आहेत त्या शरद पवारांना पंतप्रधानपदी असलेल्या नेत्याची शक्ती काय असते हे विचारून पाहावे. सुडाच्या भावनेने पंतप्रधान नरसिंहरावांना आव्हान देण्याचे सत्र तत्कालीन संरक्षण मंत्री शरद पवारांनी सुरू केले होते. बस पंतप्रधान नरसिंहरावांनी शरद पवारांना केंद्रातले संरक्षणमंत्री पदावरून हटविण्याचे ठरविले.  मुबंई बाॅम्ब स्पोटाच्या निमित्ताने ' तुम्हाला महाराष्ट्रात परत जावयाचे आहे ' अशी विनंती पंतप्रधान नरसिंहरावांनी संरक्षण मंत्री शरद पवार यांना केली. ती शरद पवारानीं आव्हानत्मक भाषेत म्हणे नाकारली.  त्यावेळी नरसिंरावांनी  " ठिक है तो मैं अपने गृहमंत्री शंकरराव चव्हाणजीके हातोंमे ही महाराष्ट्र राज्यका कारोबार सौपता हूँ | " असा इशारा देताच शरद पवार मुकाट्याने महाराष्ट्रात परत आले. हे तर जाऊ द्या, नरसिंहराव पंतप्रधान पदावर नव्हते पण माजी पंतप्रधान व काॅग्रेसचे माजी अध्यक्ष या नात्याने त्यांनी श्रो सितराम केसरींकडे काॅग्रेसचे अध्यक्षपद जावे अशी इच्छा काॅग्रेस वर्कींग कमिटीत केली. तेव्हा शरद पवार केसरींच्या विरूद्ध काॅग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीला उभे रहीले. काय झाले? शरद पवारांचा दारूण पराभव. तेव्हा पासून शरद पवारांची ताकद पश्चीम महाराष्ट्रापूरती सिमीत झाली. शरद पवार यांना शिवसेनेने गुरू मानले तर तो त्यांचा प्रश्न. पण शरद पवार कधीच राष्ट्रीय स्तरावर शक्तीशाली नेते गणले गेले नाहीत. याचे कारण ते राजकीय जगात विश्वासू म्हणून गणले गेले नाहीत. नरसिंहरावांना जसे शरद पवारांनी आव्हान देऊन चूक केली तशीच चूक उद्धव ठाकरे मोदींना आव्हान देऊन करीत आहेत. यात उद्धव ठाकरेंची वैयक्तिक राजकीय शक्ती क्षीण होत जाईल. मग शिवसेनेला तरी काय भविष्य राहील?  आणखिन एक चूक उद्धव ठाकरें यांनी केली ती म्हणजे भाजपाला हिंदुत्वाची शिकवणी देण्याची.

सन्माननिय मुख्यमंत्री साहेब, आपण भाजपाला हिंदुत्वाची व्याख्या शिकविणे म्हणजे एखाद्या टिटवीने आपल्या चोचीने सागराचे जल मोजण्याचे काम हाती घेण्यासारखे आहे. भाजपातील बहुतांश नेते व कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून बालपणापासून संस्कार घेतलेले आहेत.  भारतीय राजकारणात लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदार संघातील मतदारांसमोर आपल्या कामाचा अहवाल ठेवण्याच्या प्रथेचे श्रेय भाजपाकडे जाते. मतदारांच्या समोर आपल्या कार्याचा अहवाल सादर करणे म्हणजे 'आम्ही करून दिखविले 'अशी नाक्यानाक्यावर पोस्टर्स लावून जाहिरात करणे नव्हे. तसे असते तर स्वबळावर आपल्याला सत्ता मिळाली असती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व क्षेत्रातील महान कार्याची नुसती जंत्री पाहिली तरी बावनकाशी सोन्याप्रमाणे चमकणार्या हिंदुत्वाने आपले डोळे दिपून जातील. संघाचे हिंदुत्व समजण्यासाठी संघाच्या शाखेत जावे लागेल. जीवन कसे जगावे याचे बाळकडू संघाच्या शाखेत मिळते. हिंदुत्व विचार प्रत्यक्षपणे समाज जीवनात कसा आणता  येईल असा एक अभ्यासक्रम असतो. त्याचे प्रशिक्षण स्वयंसेवकांना दिले जाते. शिवसेनेत अभ्यास आणि प्रशिक्षण याला स्थानच नाही. संघाच्या स्वयंसेवकांनी आपल्या प्रपंचावर तुळसी पत्र ठेवून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सेवा प्रकल्प उभे केले आहेत. अनेक भटक्या विभूक्त जमातींच्या जीवनाला स्थैर्य दिले, व्यसनांच्या आहारी गेलेल्या समाजबांधवांच्या जीवनात भक्तीचा मळा फुलविला, रूग्णांच्या वेदनांवर रूग्णालय उघडून मायेची फूकंर घातली, आश्रम शाळा व संस्कार केंद्र  उघडून वनवासी बांधवांच्या जीवनात तमसो मा ज्योतिर्गमय ही प्रार्थना प्रत्यक्षात उतरविली. कृषी, संगीत, कला, उद्योग,  बँका, लघुउद्योग, ग्राहक, वन औषधे निर्मिती इत्यादी क्षेत्रात सहकाराच्या तत्वावर संस्था उभारून, आपल्या संस्कृतीतील जीवनमूल्यांच्या आधारे  रोजगार निर्माण करून अर्थव्यवस्थेला गती आणण्याचे काम संघ व भाजपाची मंडळी करीत आहेत. आपले सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीनी आत्मनिर्भरतेचा नारा दिला आहे कारण ते मूलतः संघाचे प्रचारक आहेत. उद्ववजी, आपण ब्राह्मणाचे हिंदुत्व अशी शेलकी लावून भाजपा आणि पर्यायाने संघावर टिका करता म्हणून सांगु इच्छीतो की प्रथम आपल्या हिंदुत्वाची व्याख्या काय आहे ती तरी मांडा. शिवसेनेने कार्यकर्त्यांना हिंदुत्व विचारसरणी आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षण घेतल्याचे ऐकीवात नाही. शिवसैनिकांसाठी दोन सत्राचे एक दिवस  प्रशिक्षण शिबीर आयोजीत करा. जिथ ठेवाल, तिथे दोन सत्रे तुमच्या मार्गदर्शानाचे होऊ द्या. आम्ही येतो ऐकावयास. आमच्या ज्ञानात भर होईल.  तुम्ही आता मुख्यमंत्रीपदावर विराजमन आहात ना, तर संघाचा प्रत्येक क्षेत्रात फडकत असलेला सेवाधर्माच्या ध्वजाचे दर्शन घ्या, संघाच्या शाखेत जाऊन पाहा. इतकेच नव्हे तर आजच्या काळात आपल्या वाढत्या धार्मिक उत्सवांची संख्या पाहून अपुरा पडणार्या पुरोहीत वर्गाचे क्लासेस उभारून तिथे सर्व जाती-जमातींना पौराहित्याचे शिक्षण देण्याची जी व्यवस्था आहे ती संघाच्या पुढाकाराने सुरू आहे. तिथे सवड काढून जावे.

संघ स्वतः प्रकल्प उभे करीत नाही. संघाचे स्वयंसेवक त्यांना मिळालेल्या संस्काराच्या बळावर अनेक क्षेत्रात आपल्या परीने अशी कार्ये करीत आहेत. त्यातील काही कार्यें खरं म्हणजे सरकारने करायला हवीत. पण आमचा संघ हा समाजाचा आणि देशाचा आहे, हीच भावना स्वयंसेवकांच्या मनात खोलवर रुजलेली आहे. त्याचेच नाव आहे हिंदुत्व. सरकारी व खाजगी मालमत्तेचे नुकसान करणे म्हणजे हिंदुत्व नाही. रत्नागिरीत नारायण राणेंचे समर्थक व शिवसेनेचे समर्थक आपआपसात भांडण करीत मारामारी व शेवटी समाजबांधवाचे रक्त सांडतात तेव्हा हिंदू म्हणून दुःख होत असेल तर ते खरे हिंदुत्व. संघाचे हिंदुत्व साता समुद्रापलिकडे पोहचलेले आहे. बाकी नैसर्गिक आपत्तीत पडलेल्या देशबांधवांना अर्धी विजार घालून संघाचे स्वयंसेवक मदत करीत असताना धर्म जात भाषा असा भेदभाव न पाहता मदत करतात. हे आपण न्यूज चॅनेलवरून पाहाता आहात. बरखा दत्त सारखी वाम पंथीय संपादिका कोरोनाच्या आपत्तीत रूग्णांना मदत करताना शिवसैनिक कुठे  दिसत आहेत का हे पाहण्यासाठी वस्ती वस्तीत  फिरल्या तेव्हा त्यांना सर्वत्र संघाचे स्वयंसेवक दिसले. सन्माननिय उद्धवजी, आपली दृष्टी फोटोग्राफरची असल्याने आपणांस संघाच्या हिंदुत्वाचे दर्शन चांगले होईल अशी आशा आहे.

उद्धवजी, आपण संकुचित राजकारणासाठी आणि आपल्या पुत्र लोभाने महाराष्ट्राचा धृतराष्ट्र बनू नका. आपल्या पिताश्री प्रमाणे दिलदार व्हा. त्यांनी समाजकार्याचा वसा घेतला होता त्याचे रोज स्मरण करीत जा. आपल्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करू नका, मुख्यमंत्री म्हणजे राज्याचा मुख्य तसेच प्रगल्भ असलेला प्रथम नागरिक असतो. त्याचे कार्य समाज बांधवांचे साथीच्या रोगापासून, भूकेने व्याकूळ होत समाज बांधवाचं मृत्यूच्या दारात जाण्यापासून, राज्याची तिजोरी भ्रष्टाचाररूपी भस्मासुराकडे जाण्यापासून, कधी मुसळधार तर कधी कमी असे पर्जन्यमान होत असल्यामूळे पीचत चाललेल्या शेतकर्यांचे नैराश्यापासून, माता-भगिनीचे दृष्ट लोकांपासून, धर्माचे अधर्मापासून  युवकांचे बेकारी मुळे आलेल्या नैराश्या पासून, आणि साधू-संताचे दुष्टांपासून रक्षण करणे हे मुख्यमंत्री म्हणून आपले आद्य कर्तव्य आहे. ते कर्तव्य पार पाडत राहा. तसे जमत नसेल तर तुमच्या कारभाराचा बाभाडे काढून मतदार राजाला जागृत करणार्या पत्रकार, व संपादकांचा छळ करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. हाच लोकशाहीच्या चौथ्या स्थंभाचा खरा अर्थ आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सांघिक भावनेने चालते. तिथे सर्वत्र सुसंवाद असतो. तिथे सर्व कार्य सहमती, सहकार व समरसता या त्रिसूत्रानुसार चालते. अशा कार्याचे प्रत्यक्ष दर्शन आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी व लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी घेतले आहे आणि या दोन विभूतींने संघाची प्रंशसा केली आहे. हा इतिहास जरूर वाचा आणि सध्या ज्या पुरोगामी, गांधीवादी मंडळी समवेत आपण बसत आहात, त्यांना ही वाचावयास द्या. आपण मुख्यमंत्रीपदाचा भार स्विकारल्यापासून राज्यात जे द्वेषाचे वातावरण सुरू झाले आहे, ते सुधारण्यासाठी leading from the front या न्यायाने आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. अन्यथा एक अकार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून आपले नाव महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या इतिहास कोरले जाईल. तसे होणे टाळावयाचे असेल तर लौकर भानावर या आणि शुद्ध मनाने राज्यकारभार चालवा ही नम्र विनंती.

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? (भाग-१)

 

आपल्या महाराष्ट्रातील मविआ सरकारचा कारभार पाहून सरकारचे  डोके ठिकाणावर आहे का असा विचार असंख्य मतदारांच्या मनात येत आहे. त्याचे प्रत्यतंर अर्णव गोस्वामीच्या पाठीमागे उभे राहण्याची जी सह्यांची मोहीम सुरू झाली आहे तिला जनसामान्यांचा दर दिवशी वाढत असलेल्या प्रतिसादावरून येत आहे. केवळ अर्णव गोस्वामीचा छळ होत आहे म्हणून या लेखाचे प्रयोजन नाही. आम्ही रोखठोक ,आम्ही वाघ, आमची भाषा मराठी, आम्ही मराठी लोकांचे हितचिंतक, आमची मुंबई अशा घोषणाबाजी करून राजकारणात ज्या मंडळीने गेली कित्येक वर्षे  एक नाटक कंपनी सुरू केली आहे, अशांनी सुडाचे राजकारण सोडून जरा सबूरीचे, सभ्यतेचे, शुचीतेचे राजकारण करावे हे या लेखाचे प्रयोजन आहे.

हा लेख लिहीण्याचा विचार मनात आला तेव्हा महाराष्ट्र सरकारच्या कामाची पद्धत, त्यातून आलेले अपयश,  सरकारची हम करें सो कायदा ही वृत्ती,  विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्या संबंधीचे सरकारचे दुटप्पी धोरण, इत्यादी बाबीवर चर्चा करताना, ब्रिटीश राजवटीतील लोकमान्य टिळकांची पत्रकार व संपादक म्हणून भूमिका,  ' स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क '  या सिंहगर्जनेचा व्यापक अर्थ (विद्यमान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी  दसर्याच्या मेळाव्यात शिवसैनिकांसमोर केलेल्या वाघाच्या डरकाळीशी तुलना करून काढलेला) आणि १९७५ सालची आणिबाणी इत्यादी विषयांना स्पर्श करता करता लेखाचा विस्तार होईल असे वाटले. म्हणूनच या लेखाचे दोन भाग करावे लागत आहे हे प्रांजळपणे मान्य करतो.  लेखाची सुरूवात अर्थातच गेली सहा वर्षे नव्हे तर गोध्रा हत्याकांडा नंतर सतत विरोधी पक्षांनी (पुर्वीचे दिल्लीतील सत्ताधार्यांनी ) टिकेचे लक्ष्य केलेले, व अनेक खोटे-नाटे आरोप करीत ज्यांचावर केसेस दाखल केल्या, भूकेपोटी तासन तास उलटतपासणी घेत  छळ केला, आणि आज ही तसाच मानसिक त्रास ज्यांना विरोधी पक्ष सकाळ पासून ते रात्री झोपेपर्यंत देत आहेत असे बिहारमधील निवडणूकीतले मॅन ऑफ द मॅच विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या राजकारणातील स्थानासंबंधीचे थोडेसे प्रास्ताविकाने करतो.

देशाच्या राजकारणात एखाद्या राजकीय नेत्याला विकास पुरूष म्हणून उपाधी मिळण्याचा सर्वात पहीला मान मिळाला तो विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच.  गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव देशभर प्रसिद्ध झाले. याचे कारण गुजरात मध्ये वाढत्या उद्योगाला लागणारा  कामगार वर्ग देशभरातून आलेला होता. त्या कामगारांच्या कुटुंबियानां आपआपल्या मुलातर्फे गुजरातवरून मनीआर्डरने किंवा मनी ट्रान्सफरच्या नवीन तंत्राद्वारें दर महिन्याला येणार्या पैशामूळे ' अच्छे दिन आयेगे ' या आश्वासानात दम वाटला व तो दम अजूनही आहे. स्वच्छ, पारदर्शक व गतिमान प्रशासनच्या बळावर प्रगतशील गुजरातचे नाव जगभर पसरले होतेच. इतर विरोधी पक्षांचे मुख्यमंत्री झोपा काढीत होते तेव्हा मुख्यमंत्री मोदी दिवसभर उसंत न घेता काम करीत होते. म्हणून भाजपाने पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदीचे नाव जाहीर करताच लाट निर्माण झाली. हे यश मिळविण्यात अनंत अडचणी युपीए सरकराने निर्माण केल्या तरी ते डगमगले नाहीत. आज ही विरोधी पक्ष हेच काम करीत आहे. आपले मविआ सरकार या कामात अग्रेसर आहे. मुखीं उदारमतवादी व पुरोगामीच्या गोष्टी आणि सरकारचा कारभार मात्र दळभद्री  याहून आपल्या मराठीचिया नगरीतील समाजाची अधिक नामुष्की कोणती असू शकेल? आजच्या घडीला ज्या राज्यात भाजपेतर पक्षांचे सरकार आहेत त्यातील सर्वात कुठल्या सरकारचा  पाठीचा कणा अधिक वाकल्यामूळे कुबड्याचे सरकार म्हणता येईल तर ते म्हणजे दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार होय. 

पाठीचा कणा वाकला की शरीर कुबडे होते. चालताना पाय वाकडे पडतात ; पाय वाकडे पडण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीराचा तोल सांभाळता येत नसल्यामूळे ; शरीराचा तोल सांभाळण्याचे काम मेंदू करतो ; मेंदूत घाण साचली की तो ठिकाणावर राहात नाही. पाठीच्या कणा म्हणजे मेंदूतून मानेच्या पाठीमागून थेट शरीराच्या मुलाधार चक्रा पर्यंत पोहचणारा स्नायू. अथर्वशिर्षामध्यें गणपतीचे वर्णन ' त्वम मुलाधारोस्थितीसी नित्यम् ' असे आहे. शरीरात गणपतीची शक्ती म्हणजे बुद्धी. तसेच ते मूलाधारचक्र. बुद्धी अस्थीर झाली की,जे अपगंत्व येते ते एखाद्या अपघाताने येणार्या अपंगत्वापेक्षा कैक पटीने अधिक असते. मेंदु अस्थिर होतो तेव्हा आपले डोके ठिकाणावर राहात नाही.

ब्रिटीश सरकारने देशातील प्लेगच्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी जनतेची केलेली छळवणूक ' रोगापेक्षा उपाय अधिक भयावह ' ठरत जात होते. ब्रिटीश अधिकारी कसली ही तपासणी न करता दिसला पेंशट की तो प्लेगचाच, असे समजून धरपकड चे सत्र सुरू केले. ते पाहून लोकमान्य टिळकांची आग मस्तका पर्यंत पोहोचली.  दुसर्या दिवशी लागलीच आपल्या केसरी मधून ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ' असा ठणकावणीच्या भाषेत अग्रलेख लिहीला. समाजावर होणार्या अन्यायासाठी कायद्यानुसार ब्रिटीश सरकारशी दोन हात करण्याची पद्धत म्हणजे अग्रलेख. पण आपण पडलो गुलाम. आपल्याला कारावास भोगावा लागणार हे ठाऊक असूनही टिळकांनी पत्रकार, संपादकांच्या भुमिकेला न्याय दिला याला म्हणतात पत्रकारीता. नाहीतर आमची आजची पत्रकारीता. सामना वृत्तपत्रात कोरोना संबंधी बातम्या कमी, कारण महाराष्ट्रातले सरकार आपल्या बापाचे मग टिका करावयाची नाही. शेतकर्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष. वादळी पावसाच्या तडाख्यांत सापडलेल्याबद्दल सहानुभूती व्यक्त करावयास वेळ नाही. लाॅकडाऊन बाबतीत निर्णय घेण्यात पक्षपात. जेथून काही द्रव्य हाती येते का असा हिशोब मांडून धोरण आखले जात आहे. जोडीला एक मोठं काम हाती घेतलं आहे. फक्त मोदी सरकारवर वर टिका करणे  आणि मोदी सरकारच्या कार्याची महती सांगणार्या संपादक, चॅनेल्सशी भांडण करण्यात हे सरकार गुंतले आहे. तरी स्वतःची रोखठोक म्हणत पाठ थोपटून घेण्याची खाज ही सुटत नाही. लोकशाही राज्यातील पत्रकारिता ही अशी असावी काय?  पुर्वीच्या राजेशाहीतील ही आधुनिक भाट मंडळी. पण तिथे निदान राजा व भाट भिन्न व्यक्ती होत्या. पण महाराष्ट्रातल्या घराणेशाही पक्षात राजा ही तोच व पत्रकार ही तोच. संपादक ही तोच. म्हणजे राजाचा भाट ही राजाच. म्हणून वाटते कुठच्याही राजकीय पक्षाला वर्तमानपत्राच्या व्यवसायाचे लायसन्स मिळता कामा नये.

आज महाराष्ट्रातील मविआ सरकारला कोरोनाच्या साथीवर नियंत्रण आणण्यात इतर राज्याच्या तुलनेत यश फारच कमी मिळाले आहे.  कोरोनाच्या साथीच्या सुरवातीला (फर्स्ट स्टेजला) दिल्लीतील एम्सच्या एका अधिकार्याने पत्रकार परिषदेत म्हटले होते की  " कोरोनो साथीत जे काही ५ टक्के रूगण दगावले आहेत त्यातील काही जेष्ठ नागरिक तसेच काही रूग्णाला रूग्णलयात उशीरा दाखल केल्यामूळे होत आहे." कोरोनाचा संसर्ग  शिघ्र गतीने होत असल्याने कोरोना बाधीत रूग्णाला काॅरन्टाईनवर (विलगीकरण ) ठेवणे हा वैद्यकीय उपचाराचा एच भाग आहे असे केंद्र सरकारकडून वारंवार सांगितले जात होते. पण विलगीकरण करण्याचा उपाय समाजाला पचायला जड जात होता. जुन्या काळात कुष्ठ रोग्यासंबंधीची जी मानसिकता होती त्या मानसिकतेचं पुनरागमन झाल्यामूळे कोरोनाची लागण झाली तरी त्याची माहिती दडविण्याचे प्रकार घडले जात होते. पण नंतर केंद्र सरकारने या रोगाची भिती बाळगू नका, कोरोनाच्या बाधेसंबंधीची माहिती दडवू नका, असा संदेश वारंवार दिला गेला आणि मग कोरोना रूग्ण स्वतःहून रूग्णालयात दाखल होऊ लागले. पण ९० टक्के कोरोना रूग्णांना हाॅस्पीटलात जागा नाही असे उत्तर ऐकायला मिळते, मग दुसर्या हाॅस्पीटलाचा शोध. तिथे ही तसेच उत्तर. जिथे मिळाला प्रवेश ते खाजगी हाॅस्पीटल. बस लुटारूंची सोय झाली असेच म्हणू या. रूग्णाची बिलं सरासरी तीन ते चार लाखाच्या पलिकडे. खरें रूग्ण किती आणि किती रूग्ण लूटले गेले याचा शोध कोण घेणार? त्यांच्या वतीने आवाज कोण उठविणार ? पत्रकार व संपादक मंडळीनीच शोध  घ्यायला हवा आणि आवाज उठवयाला हवा ना ! पण
' India wants to know ' असा स्पष्टपणे सरकारला जाब विचारणार्या अर्णव गोस्वामीचा या ना त्या प्रकारे ठाकरे सरकार छळ करीत आहे. म्हणूनच कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या सुपूत्राचे सुशांतसिह राजपूतच्या आत्महत्येसंबंधीत काहीतरी धागेबंधे असावेत का अशी शंका जनमानसात उत्पन्न झालेली दिसते. लोकशाहीमध्ये लोकांच्या मनात येणार्या शंकेला साक्षात ब्रम्हदेव ही बंदी आणू शकत नाही, आणि त्यांच्या शंकेचे सत्ताधार्यांना निरसन करता आले नाही की मग सत्ताधारी पक्षाला उतरती कळा लागते. तसे पाहता मविआ चे घटक पक्ष सत्ताधारी नाहीतच. जनतेने लाथाडलेल्या पक्षांनी चोरून सत्ता मिळविली आहे. सत्ता म्हणजे संपत्ती. स्वतःच्या कष्टाने कमाविलेली संपत्ती आणि चोरून आणलेली संपत्ती यात फरक असतो. चोरून आणलेली संपत्ती आपल्या मनाला टोचत असते. सतत भिती वाटते. त्यातून सहज प्रवृत्तीचे रूपातंर विकृतीत होत जाते.

अट्टल गुन्हेगाराच्या उलट्या काळजाच्या कोपर्यातही कुठेतरी जशी  माणूसकीची इवलिशी मंद ज्योत तेवत असते, तशी संवेदनशिलता, सत्ताधारी पक्षात असावी की नाही? निदान मुख्यमंत्र्यांत तरी असावी की नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री विसरून जावे व देशाचे पंतप्रधान आहेत हे समजून काम केले पाहिजे अशी खोचक टिका तुम्ही करीत होतात ना आणि आजही करीत आहात ना? पंतप्रधान मोदी आपल्या वडीलांनी काढलेल्या पक्षांचे राजकीय वारस म्हणून राजकारणात आलेले नाहीत. स्वतःच्या मेहनतीने ते भाजपाचे सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करीत पंतप्रधानपदावर विराजमान झाले आहेत. म्हणून अर्णव गोस्वामीच काय, राजदिप सरदेसाई आणि शेखर गुप्ता सारखे विरोधी विचारसरणीची संपादक मंडळी ही मान्य करतात आणि म्हणत आहेत ' Today there is no leader in India who can match with Mr Narendra Modi.'  पण हे सांगून उपयोग काय 
होणार ? ऐकण्यार्याचे डोके ठिकाणावर असले पाहिजे की नाही ?

माणसाचे डोके ठिकाणावर नसले की त्याचा प्रवास विकृतीकडे सुरू होतो. माणूस तीन वृतीचा बनलेला असतो. त्या तीन वृत्तीचे नावे आहेत. संस्कृती, प्रवृत्ती आणि विकृती. सृष्टीच मूळी तीन गुणांची बनलेली आहे. त्या तिन्ही गुणांच्या वैशिष्ट्यांतून वृत्तींची निर्मिती झाली असावी. सत्व गुणाने संस्कृती,  राजस गुणाने प्रवृत्ती तर तम गुणाने विकृती. मूलतः माणूस जन्मतःच सहज प्रवृत्तीचा असतो. सहज प्रवृत्तीतून सततच्या प्रयासाने, संस्कृतीकडचा (सत्वाकडे) प्रवास करता येतो. पण त्यासाठी प्रवृत्तीवर संस्कार घडवावे लागतात. उपनिषधात म्हटले आहे,  ' संस्कारः एकमेव धनम् न क्षीणं जायते | ' पण प्रवृत्तीवर संस्कार घडले नाही तर विकृतीच्या म्हणजे अधोगतीच्या वाटेवर जाणे आले. नंतर मग तुम्ही कितीही संस्कार करावयाचा प्रयत्न केला तरी त्याचा फायदा होत नाही. सत्ताधिशांच्यातील विकृती हातातील सत्तेमूळे पाशवी वृत्ती होते. जागतिक इतिहास हेच सांगतो. अशा स्थितीत माणूस पोहचला कि म्हटले जाते ' विनाशकाले विपरित बुद्धी.'  महाराष्ट्रातले वर्तमान सरकाराची कारस्थानें पाहाता या सरकाराचा प्रवास विनाशाकडे सुरू झालेला दिसतो.

माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधीनी न्यायालयाचा निर्णय झुगारून स्वतःची सत्ता वाचविण्यासाठी १९७५ साली देशात आणिबाणी आणली, अभिव्यक्ती स्वातंत्र्य खलास केले, बळजबरी लोकांना कारावासात पाठविण्याचे सत्र सुरू केले होते. तेव्हा सर्वोदयवादी जयप्रकाश नारायणांच्या मुखांतून   ' विनाशकाले विपरीत बुद्धी ' हेच वाक्य बाहेर पडले होते. शेवटी जयप्रकाश नारायणाच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या जनता पक्षाने १९७७ सालच्या निवडणूकीत श्रीमती इंदिरा गांधीचा तसेच त्यांच्या सरकारचा पराभव केला.

( कृपया भाग २ वाचावा ) 

बिहार निवडणूक निकाल -- अजूनही आहे मोदी लाट



बिहार राज्याच्या विधानसभा निवडणूकाचा निकाल लागला. अत्यंत चुरशीच्या लढाईत रालोआचा विजय झाला. सन २०१४ पासून देशातील प्रत्येक राज्याची विधानसभा, विधान परिषद, लोकसभेच्या पोट निवडणूका वा राज्यसभेच्या निवडणूकांना इतकं महत्व आले आहे की राजकारण म्हणजे समरांगण झाले आहे की काय अशी शंका येते. याचे कारण सार्या विरोधी पक्षांना प्रत्येक राज्यात  मोदीचा पराभव व्हावा अशी इच्छा आहे. पण ही इच्छा म्हणजे तोळामासाची तब्येत असलेल्या माणसाने धडधाकट कुस्ती पहेलवानला चीत करण्याची इच्छा बाळगण्यासारखी आहे. पण त्यांना हे कळतंय कुठे?  की कळते पण वळत नाही अशी स्थिती आहे का? आपल्याला ही आता समजेनासे झाले आहे. बिहारमधील निवडणूक निकालासंबंधीचे भाष्य सविस्तर रित्या मागील लेखात दिले असल्यामुळे या लेखात बिहारच्या निकालाचे विश्लेषण मांडण्याची गरज नाही. त्या ऐवजी बिहारच्या निवडणूकाच्या निकालाचे संक्षिप्त वर्णन मांडून हा लेख आटोपता घेणार आहे.   

बिहारच्या निवडणूकीत भाजपा सत्तेवर न येण्याची सर्वात भलीमोठी आशा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सामनाचे संपादक बाळगून होते. तसेच त्यांना रिपब्लिक न्यूज चॅनेलचे अर्णव गोस्वामींना सुप्रीम कोर्ट जामीन नामंजूर करेल अशी दुसरी महत्वाची आशा होती. एक तिसरी मिणमिणती आशा होती की कुठेतरी भाजपाची हिंदुत्वाची मतें आपण कापू. पण बिहारी जनतेने शिवसेनेला नोटा पेक्षा ही मोठा वेटो वापरला. शिवसेनेच्या या तिन्ही आशा मंगळवारी १० नोव्हेबंरला फोल ठरल्या. या विषयावर एक स्वतंत्र लेख सोबत प्रसिद्ध केल्यामूळे त्यावर इथे चर्चा नको करू या.  प्रथम सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि लेखाच्या विषयाकडे वळतो.

देशावर कोरानाचे संकट आल्यानंतर  बिहार राज्याच्या विधानसभाची झालेली निवडणूक ही पहिली होती. म्हणून मतदानाची टक्केवारी किती होणार हा एक यक्ष प्रश्न होता. पण बिहारी जनतेने निर्भयतेने मतदान केले. त्याबद्दल तसेच  स्पष्ट जनादेश दिल्याबद्दल अभिनंदन !  दुसरा प्रश्न हा होता की नितीशकुमारची लोकप्रियता घसरली आहे का? ती घसरली आहे पण विरोधी पक्षांनी आशा केली होती, तितकी घसरली नाही. तिसरा प्रश्न मोदी लाट ओसरली आहे का? या प्रश्नाचे  बिहार जनतेने चोख उत्तर दिले आहे. चौथा प्रश्न होता तो हा की नितीशकूमार पुन्हा मुख्यमंत्री होतील का? या प्रश्नाचे उत्तर होय असे हे मी नमूद केले होते. त्यावर  भाजपाने पत्रकार परिषदेत शिक्कामोर्तब केले आहे.

निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर ज्या पक्षाची, ज्या गठबंधनाची हार होते त्यांनी खोट्या सबबी कितीही सांगितल्या तरी सर्व मतदार आपआपल्या दैनंदिन जीवनगाडी हाकलण्यात गर्क होतात. ते खोट्या सबबी  ऐकत नाहीत. निवडणूकीच्या निकालाने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे ती म्हणजे पंतप्रधान मोदीची लोकप्रियता कमी झालेली नाही. तेजस्वी यादवने आपला ठसा निर्माण करण्यात यश मिळविले, पण मी मागील लेखात म्हटल्याप्रमाणे फक्त मुस्लीम व यादव हा फार्मूला घेण्याने निवडणूकीतील यशाला मर्यादा पडतात हे अनुभवास आले. जेडीयूची घसरण होणार आणि भाजपा सर्वात मोठा पक्ष होईल असे मी म्हटले होते. त्यातील जेडीयुसंबंधी माझा अंदाज खरा ठरला. सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजपाचा मान हूकला असला तरी भाजपाचा स्ट्राईक रेट आरजेडी पेक्षा सरस आहे.

पहिल्या फेरीचे मतदान झाल्यानंतर बिहार निवडणूकीचा जनादेश खंडीत निकाल स्वरूपाचा राहील असे मी म्हटले होते. मी लेख लिहीला होता तेव्हा पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभांची सुरूवात झाली होती आणि त्यांच्या भाषणांने सर्व चित्र पालटू शकते असे राजदिप सरदेसाईच्या वक्तव्याला मी दुजोरा दिलेला आहे. बिहारच्या निवडणूकीच्या प्रचार काळात आयपीएलची स्पर्धा सुरू होती. त्यामूळे बिहाराच्या निवडणूक निकालाचे क्रिकेटच्या परिभाषेत वर्णन करावेसे वाटते. 
"पंतप्रधान मोदी म्हणजे क्रिकेट खेळात एक हाती विजय मिळवून देणारा महान फलंदाज वा एक हाती विजय मिळवून देणारा महान गोलंदाज आहे, त्यांनी अनेक सामने एकहाती मिळवून दिले आहेत.  कागदावर गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही बाबतीत एखादी टिम, ज्याच्यांशी लढाई आहे अशा टीमपेक्षा कमकवूत आहे असे वाटते पण त्या टिम मध्ये एक हाती विजय मिळवून देणारा खेळाडू असेल तर उगीच अंदाज बाधण्यात अर्थ नाही". महागठबंधनाचा मोठा विजय होणार असे ज्या न्यूज चॅनेल्सनी म्हटले होते त्यांना ही माझे हे म्हणणे पटेल. पंतप्रधान मोदी विजयाचे शिल्पकार मानले जात असले तरी बिहारचे  मुख्यंमत्रीपद श्री नितीशकुमारांकडे  ठेवण्याचा भारतीय जनता पक्षांचा निर्णय झाला आहे. यावरून भाजपाने एकाच स्ट्रोकमध्ये दोन गोष्टी साध्य केल्या आहेत.  त्यातील पहिली गोष्ट म्हणजे बिहार मधील विभिन्न दलीत समाजात ज्यांचे स्थान मसीहा स्वरूप आहे, अशा नितीशकुमारांचा सन्मान केला आणि  महाराष्ट्रातल्या आपल्या माजी मित्राला अनुल्लेखाने डिचविले आहे. 

बिहारमध्ये मोदी यांची जादू कायम राहीली ही काॅग्रेस व मित्र पक्ष तसेच इतर प्रांतीय पक्ष विशेषतः शिवसेना आणि तृणमूल काॅग्रेससाठी आणि डाव्या पक्षांसाठी अतिशय चिंतेची बाब आहे. वस्तुतः सार्या विरोधी पक्षांच्या चिंता वाढण्यास ते स्वतः जबाबदार आहेत. पंतप्रधान मोदीच्या कारकिर्दित  काश्मीरमधील ३७० कलम, जम्मू काश्मीर आणि लडाख असे विभाजन व तो प्रदेश केंद्र शासित ठेवणे,  तीन तलाक, सीसीए, श्रीराम मंदिर, शेती इत्यादी विषय जे भाजपाचे खास मानले जातात त्यासंबंधीच्या बिलांचे कायद्यात रूपातंर झाले आहे. तसेच पाकिस्तान व चीन सारख्या देशांना जशास तसे उत्तर देण्यासाठी सामरिक दृष्ट्या सक्षम करण्याची आणि परराष्ट्रनीतीत आवश्यक तसा खंबीरपणा आणण्याची जनतेची इच्छा मोदी सरकारने पूरी केली आहे. खरं म्हणजे या सर्व  विषयांवर भारतीय जनतेने मोदी सरकारला दुसर्यांदा केंद्रात सत्तेवर बसविले हे एक प्रकारे सार्वमत झाले आहे. 

बिहारमधील निवडणूकीत मोदींच्या नावावर मतें मिळाली आहेत ती राष्ट्रीय प्रश्नांची मोदी सरकार ज्या पद्धतीने उकल करते त्यावरील संमतीची ती मते आहेत. म्हणून केवळ भारतातील राजकारण व्यक्ती भोवती फिरते असे म्हणून जनतेचा अवमान करणे टाळण्याची गरज आहे. मोदींचा करिष्मा आहेच पण सोबत मतदार राष्ट्रीय सुरक्षा नीती व देशाची परराष्ट्र  नीती हे विषय ही राज्याच्या विधानसभेच्या निवडणूकीत मुद्दे मानू लागले आहेत. ही बाब निवडणूकीच्या निकाला संबधीत सर्वे करण्यार्या कंपन्यांनी तसेच विरोधी पक्षांनी ही लक्षात घेणे गरजेचे आहे असे मला वाटते. म्हणून तमाम  विरोधकांनी आणि त्यांच्या समर्थक संपादक, व विचारवंतानी भाजपा व संघा बद्दलची जी सूड वा द्वेष भावना आहे ती काढून टाकावी  आणि भाजपा व संघ मांडत असलेला सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या सिद्धांतावर स्वतःहून अभ्यास करून समान नागरिक कायद्या बाबत चर्चा करावी. बदलत्या जगाबरोबर चालत जाणे हे आवश्यक आहे. पण ' आपण सारे एक देश ' म्हणून चालत जाणे हे त्याहून अधिक आवश्यक आहे. राजकीय पक्षात सहमती व सौदार्य निर्माण झाले की आपोआप  
' एक देश एक भावना'  या न्यायाने अनेक तंटे मिटतील. त्यामूळे अर्थव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा, उत्पादन, शेती, शिक्षण, आरोग्य, रोजगार, इत्यादी विषयाबाबत सहमतीने धोरण आखली जाण्याची पद्धत रूढ होईल. तसे झाले तर भारत एक सर्वात प्रगल्भ लोकशाही तसेच महासत्ता होऊ शकते. बिहार मधील निवडणूकीच्या निकालाचा अर्थ व बोध छोटा दिसत असला तरी फार गहन आहे. त्या संबंधीत सविस्तर चर्चा या लेखा सोबत महाराष्ट्र सरकरच्या कारभारासंबधीत लेख पब्लीश केले आहेत त्यात केली आहे. शेवटी महाराष्ट्र सरकार आज केंद्र सरकारशी संघर्ष करण्यात अग्रेसर असल्याने त्या सरकारचा व्यवहार व कारभार हा एक प्रकारे भाजपेतर पक्षांच्या मानसिकेतेचं प्रातिनिधक स्वरूपच आहे. म्हणून ते लेख भले विस्ताराने मोठे आहेत तरी आपण वाचावे अशी विनंती करून आपली रजा घेतो.

सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०

बिहारमध्ये काय होणार ?


बिहार राज्यातील विधानसभेच्या निवडणूकीतला पहीला टप्पा पार पडला. २०१५च्या विधानसभेत पहिल्या टप्यात ५४ टक्के मतदान झाले होते तितकेच मतदान यावेळी झाले. त्यामूळे नितीशकुमारांच्या विरोधात जी असंतोषाची लाट आहे असे ज्या न्युज चॅनल्सनी आपल्या सर्वेत म्हटले होते ते फारसे समाधानी नसावेत. पण त्याचबरोबर ज्या न्युज चॅनेल्सनीं एनडीएला बहूमत मिळेल असे म्हटले आहे, त्यांना ही आपला अंदाज चुकण्याची शंका आली असणार.  मतदानाची टक्केवारी कमी झाली नाही असे कळताच क्षणाचाही विलंब न लावता तिथे नितीशकुमाराच्या नेतृत्वाखाली एनडीए चे सरकार असूनही, काही चॅनेल्स मोदी-शहांची जोडी दाखवत भाजपाच्या छातीत धडधड वाढली अशी ही हेडलाईन्स देऊन मोकळी झाली आहेत. भाजपाच्या तसेच मोदी व शहाच्या द्वेषाने काही न्यूज चॅनेल्स कशी सैरभैर झाली आहेत त्याचे हे एक मुर्तीमंत उदाहरण आहे.

प्रथम बिहारमध्ये भाजपाची स्थिती काय आहे व निवडणूक निकालानंतर काय राहील हे पाहू या. २०१५ सालच्या विधानसभेच्या निवडणूकीत भाजपाचा महाआघाडी पुढे पराभव झाला होता. त्यामूळे भाजपाला गमाविण्यासारखे सध्या तरी काही नाही. पश्चीम बंगालमध्ये भाजपाने काॅग्रेस व डाव्या पक्षाची जागा घेतली आहे तसेच ओरिसात नवीन पटनाईक किती वेळ तग धरणार याचा अंदाज बांधून भाजप मुसंडी मारू शकेल आणि पंजाब मध्येही भाजपा अकाली दल आणि काॅग्रेस पुढे आव्हान उभे करू शकेल असे मी एका लेखात मांडले आहे. पण बिहार हे एकमेव हिंदी भाषिक राज्य आहे जिथे  जाती-पातीच्या गणितामूळे भाजपाच्या ताकदीला व वाढीला मर्यादा आहेत हे मी वेळोवेळी मांडत आलो आहे. त्यामूळे भाजपाला कमी जागा मिळाल्या आणि विरोधकांना आनंद झाला तरी भाजपाला फारसे वाईट वाटणार नाही. कारण भाजपा बिहारबाबत पुढच्या विधानसभेच्या दिशेने आखणी करीत असावी. सध्या बिहारमध्ये जितके राजकीय पक्ष, जितक्या आघाड्या, तितके राजकीय अभ्यासकांचे 
यु ट्युबवर चॅनेल्स कार्यरत आहेत. श्री राजदिप सरदेसाई सारखा संपादक लल्लनटाॅप वरील सौरव द्विवेदीच्या चॅनेल्सवरून आपले मत मांडत आहेत. यावरून तेथील  निवडणूक प्रचाराचे स्वरूप लक्षात येते. 

बिहारमध्ये काॅग्रेसला गळती लागल्यापासून लालूप्रसाद यादव सारखा सर्वसामान्य समाजवादी कार्यकर्ता मुख्यमंत्री बनल्यानंतर तेथील अनेक खेडूतांना राजकारणात आपले करिअर करण्याची हाव सुटली आणि त्यातून छोटे छोटे पक्ष निर्माण झाले. ते आज तागायत तग धरून आहेत. तथापी या सर्व छोट्या छोट्या जातीय समूहाच्या आधारे निर्माण झालेल्या पक्षांची ताकद विधानसभेच्या निवडणूकापूरता मर्यादीत राहते हे २०१४ व २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीच्या निकालाने सिद्ध झाले आहे. काल-परवाच लल्लनटाॅपवर राजदिप सरदेसाईनी मान्य केलं की बिहारमध्ये आज ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता शाबूत आहे. त्यामूळे भले नितिशकूमारांच्या लोकप्रियतेला आहोटी लागली असली तरी नरेंद्र मोदींची लोकप्रियता आणि झंझावती प्रचारात भाजपाला आघाडी मिळवून देईल असे काहीय राजकीय निरीक्षकांचे मत आहे. असे असुनही भाजपाने नितिशकुमारांशी सलगी केली ही बाब आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना खटकते, आणि त्यांनी ती दसर्याच्या शुभ दिवशी शिमगाच्या थाटात मांडली. वस्तुतः उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात व केंद्रात भाजपा समवेत सत्तेत असूनही भाजपावर खालच्या पातळीवर वरून टिका करीत आले आहेत. त्यामूळे श्री उद्धव ठाकरेंना मोदीं व फडणवीसाच्या दरबारात जो मान मिळत होता, त्याबद्दल अनेक भाजपा कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत होते. स्वर्गीय बाळासाहेबांच्या हयातीत शिवसेनेचे संख्याबळ विधानसभेत भाजपाशी युती करून जेमतेम ७० पर्यंत राहिले होते, याचे भान उद्धव ठाकरेंनी ठेवले नसल्यामूळेच भाजपा महाराष्ट्रात शिवसेनेच्या दुप्पट बळकट झाला. परंतु बिहारमध्ये कर्पूरी ठाकूर, डाॅ राम मनोहर लोहियांच्या जीवनशैलीतून तयार झालेल्या जार्ज फर्नानडीस व नितिशकुमारांनी भाजपा समवेत आपल्या नात्याची कदर ठेवलेली आहे. नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार केल्यानंतर नितिशकूमारांनी भाजपाशी संगत सोडली पण त्यानंतर त्यांनी शहाणपणा दाखविला. पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत मोदींशी टक्कर देऊ शकणार नाहीत हे त्यांनी खुल्या मनाने मान्य केले आणि भाजपाशी जुळवून घेतले. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची अवस्था बैलासारखी छाती फुगविणार्या अहंकारी बेडकी सारखी करून ठेवली. त्यामूळे त्यांना देशस्तरावरील राजकारण म्हणजे विहीरीतील पाण्यात उड्या मारणार्या  बेडक्यांचा खेळ वाटतो. त्यावर अधिक काही बोलणे उचीत नाही. श्री निखील वागळे हे काही भाजपाचे समर्थक पत्रकार नाहीत पण ते स्पष्टपणे म्हणतात, "बाळासाहेबांचा खरा वारस राज ठाकरेंच आहेत. बाळासाहेब दिलदार होते. उद्धव ठाकरे तुसड्या स्वभावाचे आहेत." याची प्रचिती शिवसेनेच्या नेत्यांनाही आली आहे.

श्री नितीशकुमार निवडणूक निकालानंतर भाजपाच्या सोबत राहतील का? हा एक चर्चा करावी असा दुसरा प्रश्न. अर्थात भाजपाच्या धुरीणांना असा प्रश्न पडला नसेल असे समजून आपण चर्चा करणे निरर्थक आहे. नितिशकुमारांचे वय पाहाता व त्यांची मजल पाहता भाजपा त्यांना शेवटची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची देण्याचा मोठेपणा दाखविल असे मला वाटते. राजकारणतला शहाणपणा म्हणतात तो हाच होय. नितीशकुमारांनी पंधरा वर्षे मुख्यमंत्रीपद भुषविले असल्यामूळे भले ॲन्टिइंबन्सीचा फॅक्टर असला तरी आज  त्यांनी मतदारांमध्ये स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे, त्यांनी मर्जीत असलेल्या सर्व जातीजमाती नेत्यांचा एक ग्रुप व अनेक कार्यकर्त्यांचे नेटवर्क उभे केलेले आहे. आपल्या पक्षाचे स्वरूप घराणेशाहीत केले नसल्यामूळे ते भारतीय राजकारणात वलयंकीत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. अशा वलयांकीत नेत्याच्या समर्थक मंडळीना खुष ठेवणे ही भाजपाची प्राथमिकता आहे. कारण याच मंडळींच्या साथीने भाजपाने बिहारमध्ये आपली स्पेस वाढविण्याचे ठरविले आहे असे वाटते. बिहारमध्ये निवडणूक प्रचाराचा मागोवा घेत असलेले इंडीयन एक्सप्रेसचे सहाय्यक संपादक श्री संतोषसिंग ज्यांचे JP TO BJP हे बिहारमधील राजकीय इतिहासा संबंधी पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे, त्यांचे ही मत असेच आहे. त्याचाच भाग म्हणून बिहारमध्ये दिवंगत राजकीय नेत्यांच्या तिसर्या पिढीतील युवक- युवतींना तिकीट दिले आहेत. मग ती वाजपेयी सरकारातील  माजी केंद्रीय मंत्री व जेडीयुचे नेते, उच्च विद्याविभूषित कै दिग्विजयसिंगांची मुलगी, नामांकीत शूटर श्रेयसी सिंग असो वा भागलपूर मधून रोहीत पांडे,असो. पहिल्या लिस्टमध्ये भाजपाने भभुआ येथून प्रथमच महिला रिंकी रानीला, शाहपूर मधून मुन्नीदेवी, कटोरियातून निक्की हिम्ब्रुम, वरसालीतून अरूणादेवी सारख्यांना तिकीट देऊन भाजपाने महिलांचा गौरव केला आहे. यावरून भाजपाने २०२५ च्या विधानसभेच्या निवडणूकीचा विचार केलेला दिसला आहे. याबाबत राजदिप सरदेसाईनी  ललनटाॅप चॅनेलवरील चर्चेत सौरव द्विवेदी समोर खुल्या मनाने भाजपाचं कौतूक केले आहे.

भाजपाचे संख्याबळ नितीशकुमार यांच्या पक्षापेक्षा कमी राहीले तर ठरलेल्या फार्मुल्यानुसार मुख्यमंत्रीपद नितीशकुमारां कडे जाईल. पण जेडीयु पक्षाच्या आमदारांची संख्या भाजपाहून अधिक असून दोन्ही पक्षांना सरकार स्थापन करणे शक्य नसेल तर एलजीपीची मदत घेण्याचे काम भाजपाकडे येईल. अशा वेळी भाजपा मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवून एलजीपीला उपमुख्यमंत्रीपद देईल आणि  नितीशकुमारांना केंद्रात महत्वाचे मंत्रीपद देऊन त्यांचा सन्मान करील. त्रिशंखू स्थितीत नितीशकुमारांकडे आरजेडी सोबत जाण्याचे स्वातंत्र्य असले तरी भाजपाच्या उदारपणामूळे त्यांना अडचणीचे ठरेल तसेच त्यांची राजकारणातील कारकिर्द कायमची कलंकीत होऊन जाईल. भाजपाने त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ठरवून एक प्रकारे त्यांची गोची ही करून ठेवली आहे. जर नीतीशकुमार आरजेडीसोबत गेले तर भाजपाने महाराष्ट्रात शिवसेनेला जाऊ दिले तसे नितीशकुमारांना जाऊ देईल. पण भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या तरी ही  नितीशकुमार आरजेडीसोबत गेले आणि सरकार स्थापन केले तर बिहार सरकार कडे महाराष्ट्रातील सरकार प्रमाणे केंद्र सरकारशी भांडण करण्याचे हेच एकमेव काम राहील. जसे सध्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याकडे आले आहे. याचे कारण प्रान्तातील आघाडी सरकार घटक पक्षांतील हेवेदाव्यामूळे सदैव दुबळे राहिल्याचा इतिहास आहे. भाजपाचे संख्याबळ जेडीयु पेक्षा अधिक असेल आणि सरकार स्थापन होत असेल तर भाजपा नितीशकुमारांना मुखमंत्रीपद देईल. कारण उद्धव ठाकरें प्रमाणे नितीशकुमारांनी सभ्यता सोडून भाजपावर आणि मोदींवर टिका केलेली नाही. तसेच बिहार संबंधीचा विचार करता भाजपा नजिकच्या फायद्यावर लक्ष ठेवून राजकारण करीत नाही. हे मी सुरवातीलाच मांडले आहे. एकंदरीत आपली चर्चा जर आणि तर या दोन शब्दावर फिरत असल्याची पाहता, पहिल्या चरणाचे मतदान झाल्यानंतर आतापर्यंत ठोस व स्पष्ट निकाल देणार्या बिहारमधील विधानसभेच्या निवडणूकाचा ठोस अंदाज बाधणे प्रथमच अशक्य झाले आहे हे प्रांजळपणे बहुतांश तटस्थ राजकीय अभ्यासक मान्य करताना दिसत आहेत.

बिहारमध्ये काॅग्रेस पुरस्कृत आघाडीला काय भवितव्य असू शकेल हा एक तिसरा चर्चा करण्यासारखा प्रश्न आहे. या प्रश्नाचे पहिले व शेवटचे उत्तर म्हणजे तिथे काॅग्रेस प्रणित आघाडी नसून तेजस्वी यादव प्रणित आघाडी आहे. या उत्तरा भोवतीच विरोधी पक्षाच सारं राजकारण फिरतं आहे. तेजस्वी यादवांनी आपल्या उद्धव ठाकरेंपेक्षा अधिक शहाणपणा दाखविला आहे. भाजपावर व पंतप्रधान मोदीवर  टिका न  करता ते फक्त नितीशकुमाराच्या कारभारावर टिका करीत प्रचार मोहीम राबवित आहेत. त्यातच आपल्या पिताश्रींना १९९० साली मुख्यमंत्री पदावर भाजपानेच बसविले होते हा इतिहास स्मरणात ठेवल्याची जाण ते खाजगी रित्या प्रचारात दाखवित असावेत. असा अंदाज बाधण्याचे कारण असे की, त्यांचे पिताश्री सध्या जेलमध्ये आहेत आणि त्यांना जेलची हवा खाण्याची वेळ जनता दलाचे पंतप्रधान देवेगौडाने आणली हे त्यांना ठाऊक आहे. उत्तरेकडील बहुतांश राजकीय नेते जे अधिकतर प्रान्तीय स्तरावरच वावरतात, अशांवर  भ्रष्टाचारासंबंधीत खटले असल्यामूळे , ते केंद्रातील सत्तेशी जुळवून घेतात. त्याच्यांच पावलावर पाऊल ठेवून सत्तेत आल्यावर केंद्राशी पंगा न घेण्याचे तेजस्वी यादवने आधीच ठरविले आहे. दुसरे असे की बदलत्या काळाचे भान ठेवून बहुतांश प्रादेशिक स्तरावरील पक्षांचे नेते (अपवाद ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे) पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेची ताकद समजून चूकले आहेत. आंध्र प्रदेशातील एकेकाळचे काॅग्रेसचेच नेते पण आपल्या वडीलांच्या वारस हक्काचा उपयोग करून स्वतःचा पक्ष काढला असे मुख्यमंत्री जगन रेड्डी पंतप्रधान मोदींशी सलगी करताना आपण पाहतो आहोत. काश्मीरचे ३७० कलम, तीन तलाख, सीसीए, कृषी बिल, इत्यादी संबंधीचे धाडसी निर्णय घेण्यात प्रांतीय स्तरावरील पक्षांनी पंतप्रधान मोदींना भक्कम पाठींबा दर्शविला हे आपण पाहीले आहे. पण इतर विरोधी पक्ष मोदी सरकार वर संविधानातील संघराज्य कलम मोडीत काढत असल्याचा आरोप करीत आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अधिकारांसंबंधी सध्या सिबीआयच्या कार्यकक्षा संदर्भात  डाव्या व लिबरल विचारसरणीच्या कायदेपंडीतांनी व विचारवंतांनी जो उहापोह मांडला आहे, त्यावर सर्वसामान्य जनता फारसा रस घेत नाही. स्वातंत्र्यानंतर बहुतांशी पंतप्रधानपदावरील व्यक्तीची लोकप्रियता ही त्यांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर वरच अवलंबून असते हे सिद्ध झाले आहे. विशेषतः स्वर्गीय इंदिरा गांधी व विद्यमान पंतप्रधान मोदींच्या बाबतीत ठळकपणे दिसून आले. स्वर्गीय पंडीत जवाहरलाल नेहरूची व लालबहादूर शास्त्री, भले छोटीशी कारकिर्द असली तरी त्यांची लोकप्रियता आपण अनुभवली आहे. कायदेतज्ञ भले आपले संविधान अध्यक्षीय लोकशाहीचे नाही, आपली संसदिय प्रणाली आहे असा उपदेश देत असले तरी प्रत्यक्ष व्यवहारात जनता काय मानते हीच बाब अंतिम ठरलेली आपण अनुभवले आहे व सध्या अनुभवत आहोत हे माजी साॅलीसिटर हरी अणेनी सुद्धा मान्य केले आहे. मोदी सरकारने कायदा धाब्यावर बसविला आहे आणि आपली मनमानी केल्याचे एक ही उदाहरण सापडत नाही. सध्याच्या जगात ताठपणाने मिरवायचे असेल तर आपल्या शत्रूदेशांवर जरब बसविणे गरजेचे आहे आणि जनतेची मागणी तीच आहे आणि तेच कार्य मोदी सरकार करीत आहे. त्यामूळे आपल्या देशाच्या  संरक्षण व परराष्ट्रनीती संबंधीच्या धोरणात शिवसेना, तेलगू दसम व तृणमूल पक्षांप्रमाणे नाक खुपसून इतर प्रान्तीय पक्ष आपला दिडशहाणपणा दाखवित नाहीत. चीन व पाकिस्तान संबंधीत पंतप्रधान मोदींचे धोरण इतर प्रांतीय स्तरावरील पक्षांना आणि जनसामान्यांना भावले आहे. हा एक असा विषय आहे ज्याचा राज्याराज्यातील विधानसभा निवडणूकीत सध्या फॅक्टर बनतो आहे.  हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सांस्कृतिक तरीही वास्तवतेचं भान असलेल्या राष्ट्रवादाचा व सर्वसमावेशक हिंदुत्वाचा बदलत्या इलेक्टोरेट संदर्भातील विजय आहे. पण हे सत्य तथाकथीत पुरोगामी संपादक, विचारवंत व मिडीया मान्य करीत नाहीत. आणि त्यांच्याच भरवशावर काही  भाजपेतर पक्ष (सध्या त्याच्या सोबतीली बसलेली शिवसेनाही) आपली राजकीय वाटचाल करतात. म्हणून निवडणूकीत त्यांची पिछेहाट होत आहे. थोडासं विषयातंर झाले पण प्रातींय स्तरावरील निवडणूकीत राष्ट्रीय समस्या व त्याचे निराकरण हा मुद्दा येऊ लागला आहे तसेच उठसूठ लिबरल लाॅबीतली शेंबडी पोरं देशाच्या पंतप्रधानावर टिका करीत आहेत. म्हणून या विषयाचा उल्लेख करावा लागला. असो. आपण पुन्हा बिहारकडील आरजेडी व एलजीपी या पक्षांची व्यूहरचना कशी आहे याकडे वळू या.

तेजस्वी यादवांच्या आरजेडी पक्षाने नितीशकुमाराच्या पक्षाविरूद्ध अधिकाधिक उमेदवार उभे केले आहेत. त्यामूळे आरजेडीचा प्रचाराचा भर  नितीशकुमाराच्या कारभारातील उणीवांवर दाखविण्यावरच आहे.  लोकांमध्यें असलेल्या थोड्याफार नाराजीचा ते फायदा उठवित आहेत. त्यातही ते नितीशकुमाराप्रमाणे वयोमान झालेले उमेदवार नाहीत. त्यामूळे तिथले युवक लालूंच्या काळातील जंगल राज संबंधी तेजस्वी यादवाला का शिक्षा करावी अशी आपल्या संस्कृतीतील मूल्यांची स्वाभाविकपणे कास धरीत असावेत. आरजेडीने पंतप्रधान मोदींवर आणि भाजपावर तिखट टिकेचा भडीमार  न करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्यामूळे भाजपा तेजस्वी यादवावर टिका करीत नाही. ते थेट लालू यादवांच्या जंगल राज पेक्षा नितीशकुमाराची कारकीर्द चांगली असा प्रचार करीत आहेत. पंतप्रधान इंदिरा गांधीच्या दुर्दैवी हत्येनंतर राजीव गांधीच्या विरोधात बोलण्यासारखे भाजपाशी काही नव्हते. अर्थात तेव्हा राजीव गांधीना सहानुभूतीतून मतें मिळाली. तसा काही फायदा तेजस्वी यादवाना मिळण्याची शक्यता बिलकूल नाही. कारण लालू यादव हयात आहेत. परंतु आपल्या वयाचा फायदा घेण्यात तसेच केंद्र सरकारशी विरोधासाठी विरोध करण्यासाठी पंगा न घेण्याच्या धोरणामुळे तेजस्वी यादव, महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरेंपेक्षा निश्चीतच अधिक प्रगल्भ दिसतात.  जो फायदा इंदिरा गांधीच्या मृत्युनंतर राजीव गांधीना निवडणूकीत मिळाला तसा फायदा एलजेपीच्या कै रामविलास पास्वनाचा मुलगा चिराग यादव घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. भले त्यांनी एनडीएशी काडीमोड घेतला असला तरी ते स्वतः पंतप्रधान मोदींचा हनुमान म्हणवित प्रचार करीत आहेत. ते ही तेजस्वी यादव प्रमाणे नितीशकुमारांच्या कारभारावरच टिका करीत आहेत. एक मात्र खरे आहे की नितीशकुमारांनी भ्रष्टाचार केला असेल वा नसेल पण त्यांचे वाढते वय बिहार मधल्या प्रचारात आडवे येत आहे. त्याचा फायदा आरजेडी व एलजीपीला कसा विभागून मिळतो यावर तेथील निवडणूकीच्या निकालाचे चित्र अवलंबून आहे.

आरजेडीचे तेजस्वी यादव व एलजेपीचे चिराग यादव हे दोन्ही उमेदवार भाजपाच्या विरोधातले असून भाजपावर जाणीवपुर्वक  तिखट टिकेचा भडीमार करीत नाहीत. त्यामूळे या दोघांमध्ये भारतीय जनता पक्षांशी विशेषतः पंतप्रधान मोदींशी जवळीक साधण्यात अंतर्गत स्पर्धा असू शकते आणि तसे असेल आणि कोणालाही बहूमत न मिळाले तर बिहारमधील सत्ताकरणाची सारी सुत्रे पंतप्रधान मोदींच्या हाती येऊ शकतात. श्री तेजस्वी यादव आणि चिराग पास्ववानने दाखविलेल्या शहाणपणातून हे दोन्ही युवा नेते बिहारमध्ये आपल्या वडीलांच्या वारसाने प्राप्त झालेल्या हक्काच्या पुढे जाऊन स्वतःची प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करीत आहेत हे कौतुकास्पद आहे आणि याबाबत राजकीय अभ्यासकांमध्ये दुमत होईल असे वाटत नाही. आपले उद्धव ठाकरें येथे कमी पडतात, कमी पडतात असे म्हणण्यापेक्षा त्यांचा अहंकार आडवा येत असावा हेच सत्य होय आणि त्यामूळे त्यांची अवस्था मोदीवर टिका करून करून थकल्या भागल्या चंद्राबाबू नायडू सारखी होऊ शकते. ज्याचे त्याचे कर्म आणखिन काय?

बिहारमध्ये साम्यवादी व काॅग्रेस पक्षाचं कस काय चाललंय हा एक स्वतंत्र विषय असला तरी यांचे अस्तित्व नगण्य झाले आहे.  जेएनयुत तुकडे गँगने केलेला धुडघूसचा सुत्रधार कन्हैय्या कुमार बिहारातला असल्यामूळे बिहारमध्ये या दोन्ही पक्षांची सद्दी संपली. दिल्लीतील शाहीनबागमधील आंदोलन, नंतर झालेली दंगल, चीन व पाक तसेच सीसीए काश्मीर इत्यादी संबंधीची या दोन्ही पक्षांची भुमिका दिर्घ काळासाठी  महागात पडेल असेच दिसते. त्यामूळे काॅग्रेस आणि साम्यवादी पक्षांचा जनाधार सर्वत्र अल्पसंख्यांकां पूरता मर्यादित राहू लागला आहे. आरजेडीने पारंपारीक यादव व मुस्लीम मतदारांचा उघडपणे आधार घेतल्यामूळे अल्पसंख्याकांची मते जी काही काॅग्रेस व साम्यावादाच्या पारड्यात पडत होती ती कमी झालेली आहेत. अर्थात आरजेडीने यादव व मुस्लीम मतांचा आधार घेतल्यामूळे इतर म्हणजे ओबीसी, इबीसी तसेच छोट्या छोट्या दलीत जमात आजच्या घटकेला तेजस्वी यादव सोबत किती टक्के जाईल हे काठीण्य पातळीवरील गणित आहे. या शिवाय मुस्लीम व यादवांची मतें जेडीयु,, एलपीजे,आणि अनेक छोटया पक्षांना ही मिळत असतात.

आरजेडी प्रणीत महाआघाडीत सारं काही आलबेल नाही. तिथे ही धुसपूस चालू आहे. उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांची होणार्या निवडणूकीत भाजपाने नऊ जागा जिंकू शकत असताना आठच जागेवर उमेदवार घोषित करून बसपाला एक जागा भाजपाच्या पाठींबामूळे मिळू शकेल. तिथे अखिलेश यादव बसपाचे आमदार फोडण्याची तयारी करीत असतानाच भाजपाने  मायावतीसाठी राज्यसभेची एका जागेची  व्यवस्था केली. त्यामूळे ऐन मोक्याच्या वेळी बिहारमधील बिएसपीला मानणार्या मतदारांचा कल भाजपाकडे झुकू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की, आरजेडी पुरस्कृत आघाडीतील घटक पक्षांची एक ओरड ऐकू येत आहे ती म्हणजे 'आमच्या वाटेला आरजेडीने  निवडून येण्यास कठीण मतदारसंघ दिले आहेत.'  त्यामूळे विविध सर्वेतून एनडीए व महागठबंधन यांच्यामधील मतांचा जो पाच टक्क्याचा अंदाज दाखविला आहे, तो आरजेडी व मित्र पक्ष कोठून भरून काढणार? शिवाय ओवीसी व बिएसपी मिळून एक चौथा मोर्चा स्वतंत्रपणे निवडणूक लढवित आहे. त्यामूळे विरोधी मतांची विभागणी होणारच व त्याचा फायदा सत्ताधारी पक्षांना विशेषतः भाजपाला होऊ शकतो.

एकंदरीत राजकीय वातावरण पाहाता बिहारच्या विधानसभेची वाटचाल सध्या म्हणजे पहिल्या चरणाचे मतदान आधाराभूत मानले तर त्रिशंकू अवस्थेकडे जात आहे असे दिसते.  शिवाय तेथील निवडणूकीतला प्रचार हा भाजपा विरोधी होताना दिसत नाही उलट तो डावे व पुरोगाम्यांना ज्यांच्या बद्दल सहानुभूती आहे अशा नितीशकुमारांच्या विरोधी दिसत आहे. त्यामूळे ती मंडळी फारशी प्रचारात उत्साही दिसत नाही आणि हेच भाजपाने जेडीयुशी केलेल्या व्यवहारवादी युतीचे यश आहे. पंतप्रधान मोदींच्या प्रचारसभा नुकताच सुरू झाल्या आहेत आणि शेवटच्या घटकेपर्यंत एकूण चित्र पालटण्याची त्यांची हातोटी काय करामत करते ते पाहण्यासाठी निकालाच्या दिवसाची प्रतिक्षा करू या.

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...