बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२०

कर्मण्येवाधिकारास्ते मा फलेशू कदाचन | भाग (3)


मागील दोन लेखात आपण ' कर्मण्येवाधिकारास्ते ' यावर चर्चा केली.  कर्म करणे हा केवळ अधिकारच नाही तर  समाजव्यवस्थेत राहण्यासाठी आपण पार पाडावयाचे एक कर्तव्य आहे. त्यामूळे कर्म करण्याचा अधिकार अंमलात आणतेवेळी समाजव्यवस्थेला हानी पोहचणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. अन्यथा ते कर्म कुकर्म ठरते. आज ही आपण ज्याच्या त्याचा कर्माचे फळ असे आपण म्हणत असतो कारण आपल्या संस्कृतीत कुकर्म वा दृष्कृत्य हे पाप मानले जाते. आपल्याला जे हक्क संविधानातून मिळाले, त्याचा वापर आपण स्वैराचाराने केला तर न्यायालयाद्वारें वा पोलीस यंत्रणे तर्फे शिक्षा मिळते. चांगल्या कामाचे फळ चांगले, वाईट कामाचे फळ वाईट असा सिद्धांत पृथ्वीच्या उत्पत्ती पासून आहे. यालाच कर्माचा सिद्धांत(Theory of Karma) असे म्हटले जाते. यावर अनेक विचारवंतानी पुस्तके लिहीली आहेत. 
मा फलेषू कदाचन यावर चर्चा करताना थेअरी ऑफ कर्म आणि कुकर्म वा दुष्कृत्य या संबंधीची चर्चा केल्याशिवाय पुढे जाता येत नाही म्हणून चर्चेचा विस्तार वाढू शकतो हे प्रथम कबूल करतो.

फळाची आशा (फलाशा) न करता कर्म करणे शक्य आहे का असा प्रश्न आपल्या सारख्या सामान्यजनांना सतत पडत असतो. याचे कारण आजचे जग हे आर्थिक जगत आहे. देवाने दिले आहेत दोन कर, त्यातून काहितरी चांगले कर असा उपदेश घेऊनच आपण मानव म्हणून जन्म घेतला आहे. प्रथम कर्म करणे महत्वाचे की फलाशा न करणे महत्वाचे असा ही प्रश्न आपल्यासमोर उभा राहातो. तसे पाहता प्रथम कर्म करणे महत्वाचे मानावे लागते. कारण कर्म च फळांना जन्म देते. म्हणून कर्म न करता फळाची आशा करणे आजच्या व्यवहारी जगतात वेडगळपणाचे ठरते. कुरूक्षेत्रावर युद्ध सुरू करण्याच्या वेळी अर्जुनाची शोकग्रस्त अवस्था जितके दौर्बाल्याचे लक्षण समजले गेले, तसे आजच्या आर्थिक जगतात, जिथे पैसा हे विनिमयाचे साधन झाले आहे तिथे कर्म न करता फलाशा करणे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा अशी टिका सतत सहन करण्यासारखे आहे.

आजचे जग जसे आर्थिक शक्तीचे तसेच ते सामरिक शक्तीचे आहे. शस्त्रच जिथे व्यापारातील वस्तु बनली, त्यातून सारं व्यापार-जगत स्पर्धा नावाच्या शस्त्राचे बनले यात नवल ते काय ! कुठलिही वस्तु विकण्याजोगी आहे या कल्पनेतून व्यापार जगत शस्त्राहून वेगवान बनले. Survival of the fittest हा न्याय ठरला. स्पर्धेत टिकायचे असेल, तर टार्गेट (लक्ष्य) आले. उत्पादन क्षेत्र, असो वा सेवा क्षेत्र, सर्वत्र लक्ष्य (Target ) ठेवण्यात येऊ लागले. हे लक्ष्य पुरे करण्याकरीता विविध प्रकारच्या सवलती, सुख-सोयींचा (Incentives ) वारेमाप वापर होऊ लागला. त्यासाठी  Do not live in comfort zone; Low aim is crime;  Run With  the time; थांबला तो संपला, इत्यादी नियामावर व्याख्यानं देणारा मॅनेजमेट, मार्केटिंग गुरू समाज व्यवस्थेत आला. त्या व्यवस्थेला दोष देता येत नाही. कारण काळानुसार त्यांना व्यवस्थेत उतरणे भाग होते. त्यांच्या  व्याख्यानाचा फायदा ही होत असताना दिसतो. जीवनाचे एक ही क्षेत्र असे राहिले नाही कि जिथे स्पर्धा नाही.  कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, लघुउद्योग, कापड,  सेवा-उद्योग, औषधे, जीवनावश्यक वस्तू, माहिती व तंत्रज्ञान, चित्रपट, मनोरंजन, क्रिडा, इत्यादी सारी क्षेत्रं स्पर्धा नावाच्या अजगराच्या विळख्यात अडकली. स्पर्धेमुळे, लक्ष्य वाढले म्हणजेच Level of ambition वाढली. त्यातून अतिरिक्त सवलती, सुखसोयींची जी प्रलोभने ठेवलेली असतात ती आपल्या मनाचा, बुद्धीचा ताबा घेतात. त्यामूळे Level of satisfaction वाढते म्हणजे मन अतृप्त होत जाते. आज आपण अशा जगात राहतो, जिथे समाजबांधवात अप्रत्यक्ष रित्या राहणीमानाच्या निकषावरून श्रेणी व्यवस्था आली. पुष्कळदा प्रत्येक क्षेत्रात जी स्पर्धा निर्माण झाली आहे, त्यात जे यशस्वी होतात त्यांचे राहणीमान कालच्या पेक्षा आज कैकपटीने वाढलेले दिसते. त्यामूळे स्पर्धेत असलेले इतर समाजबांधवात राहणीमान उंचाविण्याची लालसा निर्माण होते. गरज नसलेल्या वस्तूंची खरेदी होत जाते, मग ती घरातील फर्नोचर बदलण्यापासून ते आपल्या मुलांना टाॅप ग्रेड शाळेत शिक्षण देणे, उंची वस्त्रे खरेदी करणें ,उच्च श्रेणीच्या हाॅटेल, माॅल, सिनेमा हाॅऊस मध्ये जाणे, उंची ब्रँन्डची मद्य घेणे, उंची गाडी-मोटार बाईक घेण्यापर्यंतचा चंगळवाद वाढत जात असतांना दिसतो. त्यामूळे स्पर्थेचे जे निकोप रूप असते तेच विद्रुप होत जाते. त्यातून मानसिक ताण-तणाव वाढण्याचे आजार वाढतात मग त्या आजारावर इलाज सुद्धा महागड्या रूग्णालयात पर्यंत पोहचते. त्यामूळे पैसा कमाविण्यासाठी कर्म करणे की कर्मे करून पैसा कमाविणे असे द्वंद्व आपल्या मनात सुरू होते, त्यातूनच हत्या, आत्महत्या, आणि मानसिक आजार यांचे प्रमाण वाढते. स्पर्धा निकोप राहीली नाही,  म्हणून शुद्ध विचार मनात ठेवून कर्म करणें जवळपास अशक्य झाल्याचे दिसत आहे.

मग उपाय कुठला ? मा फलेशू कदाचन हाच होय. वस्तुतः कर्म करीत असताना, त्याचे फल सोबतच समांतर रेषेत चालत असते. गहू पेरला की गव्हाचे पीकच रूजणार,  तांदळाचे नव्हे. रस्ता क्रास करताना हलगर्जीपणा केला की येणार्य गाड्या किंवा जाणार्या गाड्यापैकी एखादी गाडी आपल्याला ठोकर देणारच. अभ्यास नियमितपणे केला की परीक्षेत उत्तम रित्या पास होणारच. भितींवर चेंडू फेकला की तो आपल्याकडे परत येणारच. फरक हाच राहील की जसा जोर आपण लावला त्याच गतीने तो आपल्याकडे परत येतो. पुन्हा जितक्या सरळ रेषेत टाकाला असेल तितक्या सरळ रेषेत परत येणार. याचा अर्थ असा की फलाची गती, फलाचा आकार वा संख्यात फरक राहणार. या पाठीमागील कारण जन्मतः आपण जे गुण घेऊन येतो, ते सर्वामध्ये समप्रमाणात नसते हेच होय. म्हणून फलाचे प्रमाण ही विषम असते. फल कधी मिळणार ते ही कर्म निभावताना आपण किती वेळ घेतला, त्याच गतीने ते आपल्याकडे येणार. आपण केलेल्या कर्माची गती, संख्या, भिन्न असल्यामूळे काही लोकांना जस फल लौकर प्राप्त होते तसे आपल्याला लौकर प्राप्त होईलच असे नसते.  त्यामूळे आपल्या पेक्षा चांगले यश मिळाले, त्यांचा हेवा वाटणे, वा आपल्यापेक्षा कमी यश मिळणार्याबद्दल तुच्छता वाटणे वा आपल्या यशाबद्दल अंहकार उत्पन्न होत असतो.  ते टाळावयाचे असेल तर दोन गोष्टी करणे आवश्यक आहेत. एक फलाची आशा सोडून देणे. फलाची आशा केली की आपल्या कर्मातील एकाग्रता भंग पावते. त्यामुळे स्वाभाविक पणे आपली कर्म पार पाडण्यातील क्षमता घसरते. आपली क्षमता घसरली की फलाच्या निर्मिती वा गुणवत्तेत फरक पडत असतो. दुसरा उपाय म्हणजे आपले कर्म करताना शुद्ध विचार यावा. याचा अर्थ संपुर्ण समरसतेने कर्म पार पाडणे गरजेचे असते. त्यातून फलाची आशा न करता ही फलात चांगली भर पडते.

मी बोरीवली राहावयास आलो ते लग्नाच्या अगोदर. आमच्या ऑफीसमधील एक जेष्ठ सोबती मुळचे उत्तराखंड मधील. त्यांची मुले ही मोठी झाली होती. त्यांची बदली मुबंईत झाली होती पण राहावयास एकटेच आले होते. एकाच ऑफीसमध्ये आणि एकाच काॅलनीत राहात असल्यामूळे आमची मैत्री झाली होती. एक दिवस तेच म्हiणाले की " मै आपको खाना कैसा बनायें, यह सिखानेके लिए आज रातको आठ बजे आपके घर आता हूँ |" ते माझ्या घरी आले. मी सामान कुठे ठेवले आहे ते दाखविले आणि ऑफीस मधून परत येते वेळी भिजविलेले छोले आणले होते तेही दाखविले. स्वैपांक बनविताना ते माझ्याशी गप्पा ही मारत होते. तासा भरात चांगल्या बटर रोटी, छोले मसाला, आणि सोबत थोडा भात, डाळ व कोशिंबिरने भरलेले दोन ताट घेऊन ते हाॅल मध्ये आले. मी पहीला घास तोंडात घातल्यानंतर माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले " रावतजी बहोत बढीया खाना बनाया है | " तर ते म्हणाले, " इससे अच्छा बन सकता था लेकीन मै हमारे गाॅवके घरमे बनाया हुआ मसाला यहाँ लानेको भूल गया | " जेवल्यानंतर गप्पा गोष्टी झाल्या. जुन्या हिंदी चित्रपटातील टेपरेकार्डवरून गाणी ऐकली. नंतर ते त्यांच्या घरी गेले . मला प्रश्न पडला की रावतजीने माझ्याच घरातला मसाला, तेल, मीठ आणि पीठ वापरून रोटी आणि चना मसाला,डाळ, कोशिंबीर इत्यादी पदार्थ इतके चवदार कसे बनविले? विचार करता उत्तर मिळाले. ते असे आहे," रावतजी एक चांगले आचारी आहेत. सततचा प्रयत्न करीत करीत त्यांनी स्वैपांक बनविण्यात प्राविण्य मिळविले असावे. पण ही उत्तरे तशी पाहता नेहमीची. थोडा विचार केल्यानंतर लक्षात आले की ऑफीसमधून बाहेर पडल्यानंतर ते माझ्या घरी स्वैपांक करण्यासाठी येणार आहेत असे म्हणाले होते. मला चांगल जेवण बनवून देण्याची उदात्त भावना त्यांच्या मनात रूजली होती. त्यामूळे स्वैपाक बनविताना ते पूर्णपणे समरस झाले होते." कर्म करताना आपल्या मनात शुद्ध विचार असला आणि त्यात परोपकाराची भावना असली की आपले कर्म उच्चतम श्रेणीचे बनते. आपण जेव्हा केव्हा एखादे कर्म पार पाडतो व यश मिळते तेव्हा आपली मानसिक स्थिती चांगली असते. असे आपण अनुभवत ही असतो.

आपल्याला घर बांधावयाचे असेल, किंवा फ्लॅट घ्यावयाचा असतो, तेव्हा भले ते परोपकारी कर्म नसते पण अनेक अडचणीचा सामना करत करत अवाढव्य वाटणारी आपली इच्छा पूर्ण होते. नंतर आपल्या हातून हे काम कसे पुर्ण झाले याचे आपल्यालाच आश्चर्य वाटते. जेव्हा आपण ध्येयावर लक्ष ठेवतो व  त्या पलिकडे दुसरा कुठलाही विचार मनात उभा राहात नसतो, तेव्हा आपली आत्मीक शक्ती उंचावलेली असते. म्हणजे आपले ध्येयच आपला गुरू बनतो. म्हणजेच भगवंताचे अधिष्ठान आपल्या कर्मासोबत असते. भले असे कर्म स्वार्थ प्रेरीत असले तरी घरासाठी पंखे, फर्निचर इत्यादी वस्तु जेथून खरेदी करतो त्या व्यापाराकडे असलेले गरीब डिलीवरी बाॅयनां, छोटीशी आर्थिक भेट दिली तर त्यातून ही परोपकार होत असतो. अशा जाणिवेतून आपल्या कर्माचे रूपातंर थोड्या प्रमाणात का होईना पण ते निष्काम कर्मात होत असते. मनात शुद्ध विचार ठेवण्यात सातत्य टिकविणे आवश्यक असते, ते आपल्याला जमत नाही. इथेच भगवंताने ' मा फलेषु कदाचान ' का म्हटले आहे हे लक्षात येते.  फल इच्छा काबूत ठेवण्याचं काम फार जिकरीचे असते. हे खरे असले तरी ते अशक्यप्राय नसते. एक सामान्य दुध व लोणी विकणारा खेडूत आपले कर्म कसे शुद्ध विचाराने ठेवतो आणि त्यातून त्याचा फायदा कसा झाला होता या संबंधी एक छोटीसी कथा आहे, ती मांडतो म्हणजे आपण मनात शुद्ध विचार आणू शकतो हे पटेल. ती कथा सादर करतो आणि आपण लेखाच्या शेवटाकडे जाऊ या.

एका गावात एक गवळी होता. दोन म्हशी व दोन गाईचे पालनपोषण करीत छोटासा दुधदुभत्याचा धंदा करीत होता. गावापासून पाच किलोमिटर अंतरावर असलेल्या तालूक्याच्या ठिकाणी तो दुध व लोणी एका व्यापाराला विकत असे. त्या पैशातून तो त्याच व्यापाराकडून किराणा माल विकत घेत असे. एके दिवशी हा गवळी आपले दुध व लोणी जमा करण्यासाठी व्यापाराकडे गेला असता व्यापारी म्हणाला, की उद्यापासून तुमचे दुध व लोणी आम्ही घेणार नाही. तो  गवळी गयावया करून बोलला, " शेठजी आपण माझे दुध व लोणी बंद करू नका. मग मी किराणा माल कसा घेणार? दोन म्हशी आणि दोन गाई खरेदी केल्याचे कर्ज अजून फिटले नाही." त्यावर व्यापारी म्हणाला, " तु नेहमी मला फसवित आला आहेस. तुझे लोणी किलो पेक्षा कमी असते, असे म्हणतच व्यापाराने गवळीने आणलेले लोणी तराजूत ठेवले, तो गवळी पाहातो, तर खरच एक किलोपेक्षा लोणी कमी दिसले. इतर गिर्हाइकांच्या समोरच गवळीचा व्यापाराने पाणउतारा केला. इतर गिर्हाइकांनी त्या गवळीला लबाडी करतोस का असा दम दिला. तेव्हा तो गवळी रडतच म्हणाला, " शेठजी माझ्याकडे  किलोचेच काय पण पाव किलोचे वजनमाप नाही. मी तुमच्याकडून घेत असलेल्या एक किलो डाळ  पिठ किंवा  साखरेच्या पिशवीतच एक किलोचे लोणी भरत असतो. म्हणून मी  कृपा करून सांगतो' माझे दुध व लोणी घेण्याचे बंद करू नका.' एव्हाना तिथे उपस्थित असलेल्या गिर्हाईकांना व्यापाराची लबाडी कळली. त्यांनी लबाड व्यापारालाच दम दिला आणि गवळीला आपल्या सोबत घेतले व तेथील डेअरीच्या दुकानात गेले. झाला प्रकार सांगितला व त्या गवळ्याचे दुध व लोणी विकत घेतले व त्या गवळ्याला रोख पैसे दिले सोबत, एक गाळणी व एक किलोचे मोजमापन दगड ही दिले. नंतर तेथील एका  दुसर्या वाण्याच्या दुकानातून तो गवळी आपले रेशन भरू लागला. पहिला व्यापारी सचोटीने धंदा करत नव्हता हे उघड झाले व धंदा ही बसला. शेवटी तो दुसर्या ठिकाणी गेला तो कायमचाच. सचोटीने व समरसतेने आपले कर्म पार पाडणारा गवळी भोळा-बाबडा, अशिक्षित पण आपला व्यवसाय सचोटीने करतो. त्यामूळे त्याचे नुकसान होत असे हे त्याच्या लक्षात आले नाही. पण त्याला फसविणार्या व्यापाराला शिक्षा मिळाली आणि नंतर त्या गवळीला न फसविणारा व्यापारी मिळाला आणि डेअरीवाला ही मिळाला. आज ही गवळी,  शिंपी, लोहार, व्यापारी, शेतकरी  गावागावात आहेत. आपल्या नियत कर्मातून ही ईश्वराची अनुभूती मिळते. आपल्या शेतात काम करीत असताना भजन, अभंग, भारूडे, भक्तीगीत गाणार्या शेतकर्यांच्या शेतातून भेंडी, वांगी इत्यादी भाजीपाला चांगल्या प्रतीचा मिळतो आहे. असे विज्ञानाने ही मान्य केले आहे. अशाच निर्मळ मनाचे संत सावता माळी म्हणतात,
            कांदा, मुळा भाजी | अवघी विठाई माझी ||
तर बहीणाबाई म्हणतात,.
        ऊठ, ऊठ माझ्या जीवा काम पडले आहे अमाप |
              काम करता करता पाहा देवाजीचं रूप ||

आपल्या कर्मालाच ईश्वर मानणे ही एक मोठी तपस्या आहे. शुद्ध विचार ठेवून कर्म करणारे लोक समाजात होते व आजही आहेत. मित्रहो, कथेतील त्या व्यापाराचे काय झाले हे आपण पाहिले. त्याला चंबूगवाळे का आवळयला लागले? याचे उत्तर आहे, 
"यश मिळविणे सोपे नसते हे मान्य पण ते कोणाच्या तरी तुलनेत असते. कोणाचे तरी जाणता अजाणता शोषण केलेले असते. शिवाय ते यश पचविणे कठीण होऊन बसते. समाधान मिळविणे महाकठीण असते. कारण त्यासाठी मनाची परवानगी लागते." मनाची परवानगी कशी मिळविता येते, त्यासाठी निश्चयात्मक बुद्धी चा उपयोग कसा करावयाचा या संबधीत भगंवताने गीतेत काय मांडलय त्यावर आपण पुढे कधीतरी स्वतंत्र रित्या चर्चा करणार आहोत. त्यामूळे इथेच कर्मण्येवाधिकारास्ते मा फलेषू कदाचन यावरील लेखमाला समाप्ती करतो.

                         जय योगक्षेमं ! ( Lic)
                          जय योगेश्वर !

शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२०

कर्मण्येवाधिकारास्ते मा फलेशू कदाचन | (भाग२)


मागच्या लेखात भौतीक दृष्ट्या कर्माची व्याख्या काय आहे यावर आपण चर्चा केली. आपण कर्मावर जी काही चर्चा केली ती चित्रपट सृष्टीतील स्पर्धा व त्यातून कलाकारांना येणारे नैराश्य व आत्महत्या, हत्यांचे वाढते प्रमाण या अनुषंगाने केली. चित्रपट क्षेत्र हे फक्त उदाहरण म्हणून घेतले. तसे पाहता प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आहे. या जीवघेणीवर मात कशी करता येईल हे फक्त कर्म कशा पद्धतीने पार पाडता यावर अवलंबून असते. कर्म बंधनातून सुटका म्हणजे मोक्ष प्राप्ती. त्यासाठी कर्म पार पाडताना आपल्या मनातला विचार शुद्ध असावा लागतो. अशा कर्माला यज्ञ असे नाव आहे. इथ पर्यंत आपली चर्चा झाली आहे.


यज्ञ म्हणजे निष्काम कर्म.  शुद्ध विचार ठेवून कर्म करणे हा एक स्वतंत्र विषय आहे. म्हणजे ज्ञानयोग व भक्तीयोगावरही चर्चा करून शेवटी योग म्हणजेच कर्म हाच संपूर्ण गीतेतला महत्वपूर्ण बोध आहे. इथपर्यंत आपल्या चर्चेचा प्रवास होईल असे दिसते. असे असले तरी आपण सामान्यजन मंदिरात, सत्य नारायणाच्या पुजेनंतर  व घरी नित्य होणार्या पुजेनंतर देव-देवतांच्या आरत्या म्हटल्यानंतर शेवटी देवा पुढे जी प्रार्थना करतो त्यात सहजपणे यज्ञाची वा निष्काम कर्माची व्याखा खालील प्रमाणे गात असतोच --
     "कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा  बुद्ध्यात्मनः वा
       प्रकृतीस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै 
       नारायणायेति समर्पयामी ||२|| "
(अर्थ - काया,वाचा,मन,इंद्रियें,अगर आत्मा यांच्या प्रवृत्तीने वा स्वभावानुसार जे काही आपण करतो ते सर्व परात्पर नारायणाला समर्पण करावे.) भले, आपण निष्काम रित्या कर्म पार पाडू शकत नसलो तरी निदान त्यावरील चर्चेचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण श्रीकृष्णानेच गीतेतील सहाव्या अध्यायात अर्जुनाला उपदेश केला आहे --
उद्धरेत आत्मनः आत्मानम् न आत्मानम् अवसादयेत
आत्मे एव हि आत्मनः बन्धुः आत्मा एव रिपुः आत्मनः
(अर्थ-- मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वतःची अधोगती होऊ न देता, स्वतःचा उद्धार केला पाहिजे. मन हे बद्ध जीवाचा मित्र तसेच शत्रूही आहे.) 

खरे स्वातंत्र्य मनाचे किंवा बुद्धीचे नसून आत्म्याचेच आहे. म्हणून आपल्यासारख्या सामान्यजनांनी त्यावरील चर्चा  करावयास शास्त्राधारे काही अडथळा नाही. उलट तसा प्रयत्न करणे ही भगवंताची भक्ती होय. आणि तशी चर्चा करताना रसभंग होईल अशी न्यूनता ही बाळगू नये. कारण भगवंत भावाचा भूकेला असतो. याशिवाय कर्मापासून पलायन ईश्वरानेच निषिद्ध मानले आहे.  म्हणूनच हातातून शस्त्र खाली ठेवून शोकग्रस्त झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने गीतोपदेश दिला. व पु काळे म्हणतात, त्याप्रमाणे आपण सारे अर्जुन ! आपण स्वतःला सामान्यातले सामान्य अर्जुन मानू आणि  निष्काम कर्मयोगा वरील चर्चा  पुढे कधीतरी स्वतंत्रपणे करू असा संकल्प सोडू या. 

समर्थ रामदास स्वामींनी  ' प्रपंच ते भाग्य, परमार्थ ते वैराग्य ' हा मंत्र दिला आहे. त्यातील  प्रपंच हा भाग आपल्या वाटेला आला आहे. तो निभावत असताना, परमार्थ साधण्याचा प्रयत्न करीत राहील्यास आपला प्रपंच भाग्यमय बनविता येऊ शकतो, हे समर्थांनी मनाचे श्लोक आपल्या समोर ठेवून तद्नुसार आचरण करण्याच्या उपदेशातून दिला आहे. जीवनात जे काही दुःख वाटेला येते ते आपल्या कर्मातून येते. त्यातील काही दुःखे मागच्या जन्मातील ही असू शकतात. म्हणून समर्थानी म्हटले आहे,
                   जनीं सर्व सूखी असा कोण आहे |
                    विचारें मना तूंची शोधूनी पाहें ||
                    मना त्वांचि रे पूर्वसंचित केले |
                    तयासारिखें भोगणे प्राप्त झालें ||
आणि पुढे उपदेश देतात,
                     मना मानसीं दुःख आणू नको रे |
                     मना सर्वथा शोक चिंता नको रे ||
                     विवेकें देहेबुद्धि सोडूनि द्यावे |
                     विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी ||
रामदास स्वामीचा हा चार ओळीचा उपदेश, आजच्या स्पर्धेच्या युगात समाधानाची पातळी कशी नियंत्रणात आणता येईल हे सांगत, एक प्रकारे आजच्या गतीमान जीवनात येणारा मानसिक ताण व त्यातून होणारा शारिरीक आजारावरचा रामबाण उपायच ठरतो.  यावर आपण ' मा फलेशू कदाचान ' या भागात चर्चा करू या. आपल्या सर्वच संतांनी जो देह झिजविला तो आपल्या कल्याणासाठीच. त्यांचे कार्य, साहित्य व आचरण यातून ज्ञानयोग, कर्मयोग व भक्तीयोगाच्या संगमाचे विलोभनिय दर्शन झाले आहे. परमेश्वर जगातील सर्व घडामोडीचा कर्ता करविता आहे. तथापी त्याच्याकडे निर्दयपणाचा वा पक्षपाताचा दोष येऊ नये म्हणून तो ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फल देतो.

आता आपण कर्माचा अधिकार यावर चर्चा करू या. भगवान श्रीकृष्णाने कर्म करणे हा आपला अधिकार आहे असे स्पष्ट सांगितले आहे. आजच्या लोकशाही राज्यप्रणालीचे हे एक महत्वाचे मूल्य आहे. आपल्या देशाच्या प्राचीन इतिहासात राजेशाही होती तर काही ठिकाणी गणतंत्रप्रणाली ही होती. यादवांचे राज्य हे एक गणतंत्र होते. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने कर्म करणे हा  'अधिकार 'आहे  हा शब्द वापरला असे वाटत नाही.  त्यांनी चातुर्वण्यम मया सृष्टी गुणकर्मविभागशः असे जे म्हटले आहे, त्या सत्याला अनुसरून कर्म हा अधिकार अशी मान्यता दिली आहे. अधिकार या शब्दाचा गीतानुरूप अर्थ स्वभावजन्य कृती. म्हणजे निसर्गतः मानवाला तो अधिकार प्राप्त झाला आहे. त्या अधिकाराचा उपयोग न करणे म्हणजे निष्काम कर्म असा अर्थ काढू नये. कारण मानव म्हणून जन्म झाला तेव्हा सृष्टीच्या त्रिगुणानुसार मनुष्याची जी विभागणी झाली आहे, त्यातून त्याला कर्माचा अधिकार मिळालेला आहे.  तो वापरात आणायला हवाच म्हणून कर्म हे एक कर्तव्य पण आहे. आणि कर्तव्य निभावताना वैयक्तीक जीवनातील  जय-पराजय, लाभ-हानी, याचा विचार न करता ते पार पाडावयास हवे. असे म्हटले जाते की आपली प्राचीन वैदिक संस्कृती सहजीवनाचं एक माॅडेल होते. सहजीवनात प्रत्येक जण आपले कर्म जबाबदारीने पार पाडत असे. कारण प्रत्येक वर्णाचे काम इतर वर्णांच्या कामाला पूरक असे.  सोबत सर्व प्राणीमात्रांच्या जीवन चर्येला आणि पर्यावरणाला धोका व अडथळा निर्माण न करण्याची काळजी घेतली जात असे. म्हणजेच निसर्गाचे चक्र अखंडीत चालतं ठेवण्याची व्यवस्था होती. असे असले तरी सत्ता स्पर्धा तेव्हा ही होती. प्रत्येक युगात मानवी जीवनाच्या व्यवस्थेत दोष ही असतात. म्हणून जे इतिहासात जमा झाले आहे, त्यातील चांगलं व शाश्वत आहे व दिर्घकाळ आपल्याला मार्गदर्शन मिळेल ते जपून ठेवावे आणि कालानुसार बदलत जाणे हेच हिताचे असते. त्यामूळे गतम न शोचम्  हेच हितकारक ठरणारं असते.

प्रकृती वा सृष्टी , सत्व रज तम या त्रिगुणांनी भरलेली असल्याने कलीयुगातील  माणसाला आपला अधिकार, आपल्या हक्कासंबंधीचे आकर्षण वा प्रिती म्हणा अधिक  असते. शिवाय त्या अधिकाराचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक असते. कारण  Bad ideas swiftly conqure human brain and mind too. तो ही सृष्टीचा नियम आहे. काटेरी झुडपे विना मशागत, खत तसेच सुर्यप्रकाशाच्या अभावात ही वाढत असतात. जी सृजन होते ती सृष्टी, आणि ती सृजन करण्याची जबाबदारी मानवावर आहे. म्हणून कर्म पार पाडताना जबाबदारीचे भान सतत ठेवावे. असाच संदेश आपल्याला साधूसंतानी भक्तीच्या मार्गाने दिला आहे. कर्म हे भगवान विष्णूच्या म्हणजेच श्रीकृष्णाच्या संतुष्टासाठी करावे अशी भावना ठेवणे गरजेचे आहे आणि तसे कर्म उच्च कोटीचे असते. आपण जबाबदारी नीट न पाळली की त्याची वाईट फळे भोगणे क्रमप्राप्त आहे.  यालाच Theory of Karma  असे मानले जाते. साध्या व सोप्या भाषेत ' पेरिले तसे उगवते '  'करावे तसे भरावे ' हेच होय. आपण जे द्याल तेच आपल्याकडे परत येते. या संबंधीची एक घडलेली हकीकत श्रद्धेय स्वामी सुखबोधानंद यांनी आपल्या पेरिले तसे उगवते या विषयावर ' मन रिलॅक्स प्लीज ' या पुस्तकात सांगितली आहे. ती इथे थोडक्यात मांडणे आवश्यक आहे असे वाटते. कारण आपले जीवन प्रत्येक जन्मात उन्नत करीत जाणे हा एक मोक्षाकडे जाण्याचा मार्ग आहे.  म्हणजेच प्रत्येक जन्मात पुण्याचा संचय करणे हे होय. त्यासाठी परोपकार हा सर्वोत्तम उपाय आहे. महर्षी व्यासांनी अठरा पुराणे लिहीली पण त्यात मानवी जीवनाचे प्रयोजन केवळ दोन वचनात मांडले आहे ते खाली दिले आहे आणि आपल्या सर्वांना परिचीत आहेत.
        ' परोपकाराय पुण्याय पापाय परपिडनम् | ' 
पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, मोक्ष, पुनर्जन्म या कल्पना कोणी मानो की न मानो पण इत्यादी कल्पनांमूळे कर्माच्या अधिकाराचा वापर संयम व सद्भावनेने करण्यासाठी आवश्यक ती मानसिक तयारी होत असते, हे ही नसे थोडके. आता आपण त्या कथेकडे वळू या.
                     पेरिले तसे उगवते |
श्री ह्यूज फ्लेमिंग या स्काॅटिश शेतकर्याने एकदा मदतीकरिता कुणीतरी धावा करीत असल्याचे ऐकले. एक छोटा मुलगा कमरेपर्यंत चिखलात रूतला होता आणि सुटकेसाठी धडपडत होता. फ्लेमिंगने त्या मुलाचे प्राण वाचविले. दुसर्या दिवशी अत्यंत रूबाबदार पोशाख केलेली एक कुलीन व्यक्ती फ्लेमिंगकडे आली आणि म्हणाली," तुम्ही माझ्या मुलाचे प्राण वाचविले. तुमच्या या सद्कार्याकरिता मला तुम्हाला बक्षिस द्यावयाचे आहे. " त्यावर फ्लेमिंगने उत्तर दिले, " छे, छे, त्या कामाच्या मोबदल्यात मी बक्षिस स्विकारू शकत नाही. ते तर माझे कर्तव्यच होते." फ्लेमिंगच्या जवळच त्याचा मुलगा बाजूला बसलेला होता. त्या घरंदाज व्यक्तीने पृच्छा केली, " हा तुमचा सुपुत्र होय ?" फ्लेमिंगने होकारार्थी मान हलविली. सदिच्छेच्या भावनेतून त्या घरंदाज व्यक्तीने फ्लेमिंग च्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली.

पुढे काही वर्षे लोटली. फ्लेमिंगचा सुपुत्र पुढे सर अलेक्झांडर फ्लेमिंग झाला, ज्याने पेनिसिलीनचा शोध लावला. काही वर्षानंतर त्या कुलीन व्यक्तीचा सुपुत्र जिवघेण्या न्युमोनियाने  आजारी पडला. तेव्हा त्या मुलाचे प्राण कुणी वाचविले? तर ती होती ' पेनिसिलीन ' ची लस ! त्या कुलीन व्यक्तीचे नांव होते " लाॅर्ड रॅन्डाॅल्फ चर्चिल " आणि न्युमोनियाने मृत्यूच्या दारात उभे  होते ते त्यांचे सुपुत्र, ज्यांनी दुसर्या महायुद्धात विजय मिळवून दिला ते इंग्लडचे पंतप्रधान ' सर विन्स्टन चर्चिल ! ' 

मित्र हो, परोपकार करण्यासाठी जो कर्माचा अधिकार मानवाला मिळाला आहे, तो विश्वाची अलिखीत संविधान ज्याने तयार केले आहे त्या विधाताच्या राज्यातून मिळालेला आहे. जगाला दुष्टांच्या अत्याचारापासून वाचविण्यासाठी अर्जूनाला ईश्वराच्या दरबारातून मिळालेला शस्त्र चालविण्याचा परवानाचा, त्याने जय-पराजय, लाभ - हानीचा विचार न करता वापरावा यासाठीच गीताचा जन्म झाला. स्वातंत्र्यानंतर लागलीच पाकिस्तानने काश्मीर बळकाविण्यासाठी हल्ला केला होता, त्यावेळी अंहिसाचे पुजारी आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीनी, पाकिस्तान जर जुमानत नसेल तर युद्धशिवाय पर्याय नाही असे म्हणत काश्मीरमध्ये लष्कर पाठविण्याची संमती दिली होती. आजही आपल्या न्यायालयातील न्यायाधिशांना गुन्हेगारांना जन्मठेप किंवा मरेपर्यंतची फाशीची शिक्षा देण्याचा अधिकार आपल्या देशाच्या संविधानाने दिला आहे त्याची अंमलबजावणी करणे हे पापकर्म ठरत नाही. न्यायधिशांचा तो स्वधर्म आहे. तो अधिकार आहे. पण लोकमान्य टिळक, सावरकर, भगतसिंग, आझाद, मदनलाल डिंग्रा इत्यादींना शिक्षा केली ती दुष्ट ब्रिटीश राजवटीने. कर्मयोगी व गीतारहस्य म्हणजे कर्मशास्त्र असा उपदेश देणार्या लोकमान्य टिळकांनी न्यायालयातच ब्रिटीश सरकारला सुनावले आहे, " न्यायधिश महोदय, आपल्या न्यायालयातून मला न्याय मिळाला नाही, पण देवाच्या दरबारात मला न्याय मिळेल. मी कारावासात असलो तरी मी स्विकारलेले कार्य जोमाने वाढेल व आमचा देश लौकरच पारतंत्राच्या बेड्या तोडून चक्काचूर करेल."  झालेही तसेच. लोकमान्य टिळकांचे स्वप्न १५ऑगस्ट १९४७ साली पूर्ण झाले.

युद्ध होऊ नये त्यासाठी शिष्टाई करावयास गेलेल्या श्रीकृष्णाने कौरवांकडून पांडवासाठी फक्त पाच गावे  मागितली. ती मागणी सुद्धा दुर्योधनाने फेटाळून लावली.  तेव्हा श्रीकृष्णाकडे युद्धाशिवाय पर्याय राहिला नव्हता. ऐन युद्धाला सामोरे जाण्याच्या वेळी अर्जून शोकग्रस्त झाला म्हणून तस्मात् उत्तीष्ठ कौतेंय युद्धाय कृतनिश्चयः हा सल्ला श्रीकृष्णाने अर्जूनाला दिला. काही पाश्चीमात्य विचारवंत व दुर्दैवाने आपल्या येथील काही विचारवंतानी श्रीकृष्णाने अर्जूनाला युद्ध करण्यासाठी प्रवृत्त केले असा आरोप करतात. गीतोपदेश संपल्यानंतर शेवटी श्रीकृष्णाने अर्जुनाला काय म्हटले आहे हे पाहू या. त्यातून श्रीकृष्णावर आरोप करणार्या विचारवंतांना उत्तर मिळू शकेल तसेच कर्म हा आपला अधिकार आहे हे ही स्पष्ट होईल. आणि मग अधिकारयुक्त कर्तव्यावरील या चर्चेला विराम देऊ या.
         इति गुह्यतमं शास्त्रम् इदम् उक्तम् मयानघा |
         एतत् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृत्यः भारत ||

(अर्थ - हे निष्पाप अर्जुना ! हा वैदिक शास्त्रांचा परमगुह्य गाभा आहे ;आणि तो मी तुला सांगितला आहे. जो कोणी हे जाणेल तो बुद्धिमान होतो आणि प्रयत्नांद्वारे सिद्ध होतो.) यावरून असेच दिसते की श्रीकृष्णाने अर्जूनाला फक्त उपदेश दिला पण अर्जुनाला स्वतःचा विवेक व स्वतःची बुद्धी वापरून युद्ध करावे की करू नये याबाबतचा निर्णय घेण्यास सांगितले. त्या अर्थी कर्म हा आपला अधिकार व कर्तव्य आहे आणि त्यावरील फलदोषाला आपण स्वयं कारणीभूत असतो. श्रीकृष्णाने अर्जुनाच्या अधिकारात ना हस्तक्षेप केला ना जबरदस्ती केली. कारण ज्याच्या त्याच्या कर्माची फळे ज्याला त्यालाच भोगावी लागतात. असाच उपदेश महर्षी नारदांनी वाल्या कोळीला सांगितला. तो त्याने ऐकला व रामायण या महान ग्रंथाची निर्मिती केली. सारांशाने म्हणता, आपल्या कर्माच्या अधिकारावर ईश्वर सुद्धा कात्री आणू शकत नाही, आणि आपल्याला ही कर्मापासून पलायन करता येत नाही. त्या कर्माची बरे-वाईट फळे, ईश्वराने सृष्टीच्या निर्मिती सोबत ठेवली आहेत. तेच सत्य होय. त्यावर पुढील भागात चर्चा करू या.

रविवार, ४ ऑक्टोबर, २०२०

कर्मण्येवाधिकारास्ते मा फलेशू कदाचन | (भाग १ )

 


भगवद्गीतेचा मी काही मोठा अभ्यासक नाही. माझी बुद्धी तशी यथातथाच. म्हणून माझी गीतेवरील श्रद्धा बौद्धिक प्रामाण्यावर आधारलेली नाही. ती भोळी भाबडीच. मागे मी ५ मे २०१८ ला  तस्मात उत्तीष्ठम् कौंतेय युध्दनिश्चयः | व ३ जूनला चातुर्वण्यम् मया सृष्टी गुणकर्मविभागशः| या दोन श्लोकांवर चर्चा केली आहे. तब्बल दोन वर्षानंतर मी भगवद्गीतेतील एका श्लोकावर चर्चा करावयास बसलो आहे. यावरूनच सिद्ध होत आहे की मी अध्यात्म क्षेत्रातला एक सामान्यातला अति सामान्य असा विद्यार्थी आहे.

अलिकडे ' मृत्यु सुशांत पण महाराष्ट्र सरकार का अशांत' या लेखात चंदेरी दुनियात आपलं नशीब उजळ्याचे स्वप्न पाहात मुबंईत आलेल्या युवक-युवतींची कशी फसगत होते, त्यातील अनेक जण नैराश्याच्या गर्तेत कसे जातात यावर चर्चा करीत ' सध्याच्या युगात प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आहे म्हणून कुठेतरी Level of ambition and level of satisfaction यामध्ये सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न करणें गरजेचे आहे.' असे मी म्हटले आहे. मी एलआयसीत विकास अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतांना,  एजंटांशी व्यवसाय वृद्धीच्या संदर्भातील चर्चेत अनेक वेळा वरील वाक्यावर भर देत असे. या वाक्यावर भर देण्याचा माझा दृष्टोकोण स्पर्धेच्या नशेत आपल्या आरोग्याची हेडसांळ होऊ नये असाच होता व आज ही तसाच आहे. कारण शरीर माद्यं खलू धर्मसाधनः हा ऋषीमूनीनी दिलेला सल्ला मानावा हा हेतू होता. शरीराची हेडसांळ झाली की आजारपण येते. त्यातून औषधोपचाराचा खर्च, अशक्तपणा येतो आणि सक्तीची विश्रांती येते. त्यामूळे व्यवसायासाठी उपलब्ध असलेला वेळ निष्कारण खर्ची पडतो. शेवटी Time is money किंवा Time is the best  natural resources, the God has given to the man हे विसरता येत नाही.' समय बहुमूल्य है, पर जीवन अमूल्य है' असे वाक्य राष्ट्रीय महामार्गावर लिहीलेले असते, ते तर त्रिकालातीत सत्य आहे यावर माझी श्रद्धा आजही कायम आहे. पण Level of ambition and level of satisfaction मधील सुवर्णमध्य काढा असे फक्त बोलायला सोपे आहे हे सतत जाणवते. हिंदीमधील प्रख्यात साहित्यीक प्रेमचंदजीचे एक वाक्य आठवते, ' दुसरोंको उपदेश देना कितना सहज और सरल है ! ' ते मला ही लागू पडते याची जाणीव मला एलआयसीच्या सेवेत असतानाच होत असे. ती आज ही कायम आहे.

शेवटी श्रीमद्भगवद्गीतेतील अध्याय २ श्लोक क्रमांक ४७
' कर्मण्येवाधिकारास्ते मा फलेषू कदाचन '  या श्लोकात वरील प्रश्नाचे उत्तर सापडते का ते पाहू या असे ठरले. म्हणून हा श्लोक चर्चा करण्यासाठी निवडला. प्रयत्न करणे हे आपल्या अधिकारात आहे असे भगवंताने म्हटले आहेच की !  शिवाय या श्लोकावर चर्चा करणे हे काही दृष्कृत्यं तर मूळीच नाही. मग भय कसले? इथेच चर्चेला सुरूवात करणार होतो पण लक्षात आले की, भय आहे पण ते लेखाचा विस्तार वाढेल यासंबंधीचे. म्हणून या चर्चेचे छोटे  भाग करता येतील का असा विचार केला तेव्हा उत्तर सापडले. या श्लोकाचे भाग पाडता येतात हे ध्यानात आले.  कर्मण्येवाधिकारास्ते यावर प्रथम चर्चा केली की पहिले दोन भाग होतील. मग मा फलेषू कदाचन याकडे वळता येईल.  प्रत्येक कार्याला निवृत्ती आणि प्रत्येक जीवाला मृत्यु हे अंतिम सत्य योगेश्वराने सांगितले आहेच, म्हणून लेखात काही त्रूटी राहिल्या तर त्या परम योगेश्वराकडे सोपवितो. 

प्रथम कर्म म्हणजे काय  यावर चर्चा करणे आवश्यक आहे. प्राथमिक शाळेत असताना आम्हाला मराठीच्या पुस्तकात मी कोण? असाच काहीसा धडा होता आणि त्यात खालील वाक्ये व प्रत्येक वाक्या समोर माणसाचे चित्र. पण प्रत्येक वाक्याच्या समोरच्या माणसाचे चित्र भिन्न दाखविलेले होते.
१)चाक फिरवितो गरागरा मडकी बनवितो भराभरा मी कोण?
२)कापड घेतो, कात्रीने कापतो, दोरा घेतो, कपडे शिवतो मी कोण?
3) लाकूड घेतो, करवितेने तुकडे करतो नंतर ते तुकडे जोडतो, टेबल खुर्ची कपाट बनवितो मी कोण?
पुढे, अशाच प्रकारची प्रश्नात्मक वाक्ये व प्रत्येकाच्या समोर  दाखविलेल्या चित्रावरून त्याचा वर्ण वा व्यवसाय ओळखावयाचा. एकंदरीत कुंभार, शिंपी, सुतार, लोहार, शेतकरी, या सर्वांची कामे कोण कोणती आहेत हे बालवयात समजले होते आणि स्मरणात ही आहे. पण कर्म हा शब्द कुठे काही कोणाच्या वाट्याला वाईट प्रसंग आल्यावर ' हे ज्याच्या त्याचा कर्माचे फळ, भोग आता ' अशी वाक्ये समज आल्यावर सर्वत्र ऐकू येऊ लागली.  तेव्हा कर्म याचा अर्थ समजला. पण वाईट कृत्य इथपर्यंतची ती मजल. आणखिन समज वाढली आणि पुढे भगवद्गीता अर्था सकट वाचायला लागल्या नंतर कर्माचा व्यापक अर्थ थोड्या फार प्रमाणात समजू लागलो.

सोप्या व साध्या शब्दात, कर्म म्हणजे आपल्या पोटापाण्यासाठी प्रत्येक मनुष्याने केलेला उद्योग. हे उद्योग भिन्न भिन्न असतात. त्यालाच आपल्या संस्कृतीत वर्णव्यवस्था असे म्हटले जाते. ही जातीव्यवस्था नव्हती. त्यात दोष निर्माण झाले. हे मान्य पण समाजबांधवात प्रयत्न पुर्वक  समरसतेचा भाव जागृत करीत राहिलो तर कालाऔघात ते दोष निघून जाऊ शकतात. त्यावर स्वतंत्र चर्चा केलेला ' अस्पृशता एक बडी भूल ' २९ आक्टोबर १९१८ ला पब्लीश केलेल्या लेखात वाचता येईल. असो. 

शालेय पुस्तकातील त्या धड्यावरून कुंभाराचे कर्म  मडकी बनविणे, शिंपीचे कर्म कपडे शिवणे, हे बालपणापासून मनात ठसले आहे ते आज ही पुसले गेले नाही ही सुद्धा त्या योगेश्वराचीच कृपा. प्रत्येक माणसाला कर्म हे जन्मतः चिकटलेले असते. सुताराचा मुलगा सुतार बनतो, शेतकर्यांचा मुलगा शेतकरी होतो, वाण्याचा मुलगा वाणी, डाॅक्टराचा मुलगा डाॅक्टर अशी लांबलचक यादी बनेल. आजच्या विज्ञानाने माणसाच्या शरीराच्या जीन्सचा अभ्यास केल्यावरून ही यादी तयार झाली असे आपण मानतो.  ते खरे आहे. व्यवसायावरून आडनाव ही जोडले गेल्याची उदाहरणे विद्यमान आहेत. व्यवसायिकांच्या पितरांच्या पिढ्या म्हणजे मुळ कूलपुरूषापर्यंत आपण मागे गेलो तर आपल्या लक्षात येते की व्यवसायाची दृष्टी ही सृष्टीतूनच प्राप्त झालेली असते. चातुर्ण्यम् मया सृष्टी गुणकर्मविभागशः या लेखात मुलतः सृष्टी विविधतेने नटली आहे तसेच Imbalance is the feature of universe या शाश्वत सत्यावरच या विश्वाचा प्रचंड पसारा सुस्थितीत आहे, असे मांडले आहे. त्या विश्वाचा आपल्या कल्पनेपलिकडे असलेला पसार्याचे वैशिष्ट असे आहे की पंचमहाभूतांचे स्वरूप भिन्न; सर्व ग्रहांच्या कक्षा, गती, आकार, गुरूत्वाकर्षण भिन्न आहे. तरीही तो पसारा सुस्थितीत आहे. आपण तो लेख वाचू शकता. एकंदरीत वर्गरहीत समाजव्यवस्था ही कल्पना फक्त कागोदपात्री राहते. बळजबरीने वर्गरहित समाज निर्माण करणे हे निसर्गालाच मानवणारे नाही. हा मुद्दा पटविण्यासाठी मी त्या लेखात सविस्तर लिहले आहे. तरी इथे सारांश रूपाने मांडले की व्यक्ती तितक्या प्रकृती, जशी दृष्टी तशी सृष्टी  इत्यादी Laws of nature वरून कर्म म्हणजे काय या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहचण्यास मदत होईल असे वाटते.

पहीले उदाहरण आपण भूमातेचं घेऊ या.  या पृथ्वीवर माणूस जन्माला येण्या अगोदर पर्वत, नद्या, जंगल, डोंगर वृक्ष वेली उगवलेल्या असाव्यात.  जमिनीतून अन्न मिळते हे ज्यांच्या लक्षात आले, त्यांना बी-बियाणे पेरून तांदूळ, गहू इत्यादीचे पीक काढण्याची बुद्धी लाभली ते शेतकरी झाले. ज्यांनी जमिनीत पावसाचे पाणी मुरते हे लक्षात आले त्यांनी विहीरी खणल्या. हे खोदकाम करताना जिथे जमिनीतून खनीज कोळसा धातू इत्यादी वस्तु आढळल्या तेव्हा त्यांच्या बुद्धितून खाण उद्योग (माईनिंग), लोखंड, हिरे, स्टील घडविणारे व्यवसायी बनले.  भाताचे पिक काढले की ते साफ करावेसे वाटले ते साफसफाईच्या उद्योगात शिरले. म्हणजे भात -गहू गिरण्याचा व्यवसाय करणार्यांचा वर्ग निर्माण झाला. माणसाच्या गरजोपयोगी वस्तूंची निर्मिती सुरू झाली की, वाटप व्यवस्था आली, ग्राहक तयार झाले मग विक्री आली.  वाटप, विक्रीचा विचार वा कल्पना मनात ज्यांच्या मनात रूजल्या ते ट्रक ओनर्स, व्यापारी झाले. ज्यांना डोंगर नद्या, पर्वत, पाहून मनात मुर्तीमंत पावित्र्य साकारले ते तत्वज्ञानी, कवी, लेखक मंडळी म्हणून नावारूपास आली.  प्रत्येक व्यक्तीत बुद्धीची पातळी तसेच कल्पना शक्ती भिन्न स्वरूपाची असते. ही सृष्टीचीच करामत.म्हणून  जशी दृष्टी तशी सृष्टी. पण या ही अगोदर जशी बुद्धी तशी दृष्टी हा ही एक नैसर्गिक नियम असावा. कारण डोळ्यांनी आपण जे पाहातो ती नजर असावी जेव्हा बुद्धीची साथ मिळाली की दृष्टी बनते. म्हणजे सामान्यजनांकडे असते ती. त्यापुढची दुरदृष्टी. तिथे फार मोठे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यावर महाजनांपासून ते महामानव, ऋषीमुनी, महर्षी, देवर्षी, विभूती, अवतारी पुरूष मग प्रत्यक्ष ईश्वराची रूपे विराजमान असतात. बुद्धीमत्तेचं हे एक विश्व.  पण याचा अर्थ असा नाही की जन्मतः दृष्टहीन समाजबांधवांना बुद्धी वापरता येत नाही. दिव्यांग समाजबांधवात इतर इंद्रियात शक्ती निसर्गच जन्मतः अधिक देत असतो. ते स्पर्शाने तसेच अव्यक्त शक्तीतून ही सृष्टीचे चित्र रेखाटत असतात. सर्व मानवजात एकाच कल्पनेने व एकाच पद्धतीची बौद्धिक पातळीची असती तर मानवी जीवन प्रगत झालेच नसते. विख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईनचे एक वाक्य मला फार भावले आहे, ते वाक्य असे आहे, Imagination is more important than knowldge. अगदी ईश्वराची कल्पना भिन्न असल्यामूळे धर्म सांप्रदाय निर्माण झाले. आपल्या आकाशगंगेतील  सुर्य एकच आहे. पृथ्वी एकच आहे. पृथ्वी कधीपासून स्वतःभोवती व सुर्याच्या भोवती फिरू लागली याचे खास ज्ञान मानवाला झाले असे म्हणता येत नाही. आपण अनुमान काढले आहे. त्यातून दिवस-रात्र चक्रानुसार आपण आपल्या सोयीसाठी  पौर्वात्य व पाश्चीमात्य देश  अशी जगाची विभागणी केली की नाही. पण हे सर्वभेद म्हणजे सृष्टीचे सौंदर्य आहे. ' मेळवूनिया पंचमहाभूताचा मेळ, अंबे त्वा रचिला ब्रम्हांड गोळ ' अशी अंबामातेची आपण स्तुती करतो, त्या अंबामातेच्या विविध रूपातली ही विविधता आहे. पण त्यात मेळ आहे. सुर्य म्हणजे तेज. समुद्राच्या (आप) पाण्याची वाफ करतो, आकाशात ती वाफ साठली जाते. ते आकाश एक पंचमहाभूत,  त्या समुद्राच्या पाण्याचे वाफेचं  ढगात रूपातंर करताना खारट पणा काढते. कसे ते फक्त ईश्वरालाच ठाऊक. मग वायु त्या ढगांना घुसळवितो आणि वर्षा ऋतूत पिण्यायोग्य जलाचा वर्षाव होतो. जमीन ( पृथ्वी- धरणीमाता ) पाणी घेते व आपल्या अन्न देते. पंचमहाभुतांमध्ये परस्पर सहकार वा कोआर्डीनेशन विराजमान असेल तर मानवजातीत भिन्न व्यवसाय वा विभिन्न रूप, बुद्धी , भाषा भिन्न असली तरी सहकाराच्या तत्वावर मानवी जीवन संघर्ष रहीत राहू शकते. मुंबईतील हिर्याचे बाजार केंद्र म्हटल्या जाणार्या पंचरत्न इमारतीच्या दर्शनी भागावर एक वाक्य कोरल ' Path of co-operation is so narrow that an individual and the society can not walk on it.' इथे थोडसं विषयातंर झाले पण ते आवश्यक होतं त्यामूळे कर्म म्हणजे काय तर स्वधर्म इथपर्यंत आपण पोहचलो. स्वधर्म म्हणजेच भौतिकदृष्ट्या प्रकृतीच्या (सृष्टीच्या) गुणांच्या (सत्व, रज, तम) प्रभावाखाली मनुष्याच्या मानसिक व शारीरिक स्थितीला अनुसरून आलेले कर्म. स्वभावतः उत्पन्न होणार्या कर्मात प्रवृत्तं होण्याची क्षमता असा ही अर्थ निघतो.  म्हणूनच श्रीकृष्णाने अर्जूनाला पुढे ' स्वधर्में निधनं श्रेयः परधर्मो भयावहः' असा उपदेश तिसर्या अध्यायात ३५ व्या श्लोकात केला आहे.

आपण या भागातील  कर्माचा अर्थ, जगाचे व्यवहारी रूप डोळ्यासमोर ठेवून काढला आहे. पण भगवान श्रीकृष्णाने  अध्याय ३ मध्ये  यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्भबन्धनः असे म्हटले आहे. भगवान श्रीविष्णूला संतोष मिळावा म्हणून जे कर्म केले जाते त्याचे नाव यज्ञ आहे. ते तू कर असे म्हटले आहे. असे न केले तर(अन्यत्र) ती कर्मे भौतिक जगात बद्ध करतात. म्हणजे चांगल्या व वाईट, दोन्ही प्रकारच्या कर्माना आपआपली फळे असतात. वर चौथ्या परिच्छेदात, ' मग भोग आपल्या कर्माची फळे असे सर्वत्र ऐकू येते ' असे जे मी  म्हटले आहे, तिथेच आपण परत आलो आहोत.  आपल्या चर्चेने वर्तुळ पूर्ण केले आहे. म्हणजे ही चर्चा थांबविण्याची वेळ आली आहे असे वाटते. कारण आपली चर्चा भले अध्यात्मिक विषयावरील असली तरी त्यातील गोडी  Law of diminishing utility नुसार कमी होत जाईल. म्हणून इथे थांबाव असे वाटले. पण त्या अगोदर माझ्या वाचनात आलेली एक कथा जिचे शिर्षक ' कर्म ' आहे ती सादर करून या लेखाची समाप्ती करतो.
               --- कर्म ---
एकदा एक राजा हत्तीवर बसून आपल्या राज्यात निरीक्षण करण्यास फिरत होता. फिरता फिरता एका गावातील दुकानासमोर राजा थांबला. प्रधानाला बोलावून म्हणाला, ' का कोण जाणे मी या दुकानदाराला कधी पाहिले नाही पण मला या दुकानदाराला फाशी द्यावे असे वाटते. प्रधान बुचकळ्यात पडला. तो काही बोलायच्या अगोधरच राजाची स्वारी पुढे निघून गेली होती. प्रधानाने ते दुकान बघून ठेवले. दुसर्या दिवशी प्रधान त्या दुकानापाशी जातो. दुकानात त्या दुकानदारा शिवाय कोणी नव्हतं. प्रधानाने आसपासच्या गावकरी मंडळीशी चौकशी करता तो चंदनाचा व्यापारी असल्याचे समजले. प्रधान त्या दुकानात जातो. दुकानदाराकडे सुवर्ण वर्णाचे सुगंधी वासाचे उच्च प्रतिचे चंदन होते. मात्र कोणी खरेदीदार नसल्याने तो वैतागला होता. चौकशी करता कळले की लोक नुसते दुकानात येतात वास घेतात आणि दर ही न विचारता निघून जातात. म्हणतात ना, ' रिकामे मन सैतानाचे घर ' मग काय त्या दुकानदाराला बर्याच वेळा राजाला मरण यावे असे वाटत होते. राजा वारला की परिसरात दुसरे चंदनाचे दुकान नसल्याने राजाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मोठ्या प्रमाणात चंदनाची खरेदी होईल आणि चार पैसे हातात येतील.

आपल्या राजाला त्या अनोळखी दुकानदाराला का फाशी द्यावी असे वाटत होते याचा उलगडा झाला. प्रधानाने थोडे चंदन खरेदी केले व राजमहलात परतला, आणि राजा दरबारात येण्याअगोदर प्रधानाने ती चंदनाची पुडी सिंहासनाच्या समोर ठेवली. राजाने ती पुडी उघडून पाहिले तेव्हा राजा त्यातील सुवर्ण वर्णाचे चंदन व त्याच्या सुगंधाने मोहीत झाला. राजाने प्रधानाला विचारले '' कोठून हे चंदन आणले? ' प्रधानाने त्या दुकानदाराचे नाव व गावाचं नाव व रस्त्याचे नाव म्हणजेच, काल रस्त्यात पाहिलेल्या दुकानाचे नाव सांगितल्यावर राजा म्हणाला  ' अरेरे, काल मला उगीच त्या दुकानदाराला फाशी द्यावीसी वाटती. राजाने प्रधाना मार्फत त्या दुकानदाराला सुवर्णमुद्रा दिल्या. हळू हळू राजा आपल्या भेटीला येणार्या अनेक लोकांना चंदनाची भेट देऊ लागला. त्यामूळे त्या दुकानातून मोठ्या प्रमाणात चंदन खरेदी करू लागला. आता त्या दुकानदाराला राजा दिर्घायु होवो असे वाटू लागले. राजा व दुकानदाराशी चांगली मैत्री झाली.

आपल्या मनात इतरांविषयी चांगले विचार व दयाळूपणा आणला तर इतरांच्या ही मनातून ही चांगल्या भावना आपल्या पर्यंत येतात व आपला उत्कर्ष होतो.आपण जे देतो तेच परत आपल्याकडे येते. मग कर्म म्हणजे काय,  विचार हेच खरे कर्म. 

आपल्याला ही कथा आवडली असावीच. जसा विचार तसा आचार व जसा आचार तसा आपल्या जीवनाला आकार येत असतो. त्यातून निरपेक्ष भावनेने कर्म करणे शक्य होत असावे. मला वाटतं, हेच ते उच्च कोटीचे कर्म असावे जे श्रीकृष्णाने अर्जूनाकडून यज्ञ अपेक्षिले होते.

               जय योगक्षेमं |
                जय योगेश्वर ||

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

विरोधी पक्ष असहाय्य तर मोदी सरकार स्वयंप्रेरित


बाॅलीवूड मधील कारभार हा समांतर अर्थव्यवस्थेतून चालविला जातो आणि तिथला कारभार हा देशाच्या सार्वभौमत्वला आव्हान दिल्यासारखा ठरत असेल तर केंद्र सरकार सुशांतसिंगच्या संशयास्पद मृत्यूच्या निमित्ताने खोलवर जाऊन माहिती काढण्याचे प्रयत्न करू इच्छीत असणार अशी शक्यता मागच्या लेखात मी वर्तविली होती. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार ड्रग्ज माफीयांचा शोध घेण्यासाठी  सुशांतसिंगच्या आसपास वावरणार्या सर्वांच्या नार्को टेस्ट्स झाल्या. एनसीबीने आपला मोर्चा सारा खान, दिपिका पदूकोण सारख्या सिनेतारकांकडे वळविला. त्यावरून केंद्र सरकार ड्रग्ज माफीयांचा कसून शोध घेऊ लागले आहे हे स्पष्ट झाले आहे. त्यामूळे देशाचे राजकारण जे दोन महिलाभोवती फिरत होते त्याची व्याप्ती वाढती आहे. सुशांतसिंगच्या मृत्यु तपासातून दिशा सालियनच्या मृत्युचे धागेदोरे सापडल्याची बातमी आली आहे. सुशांतसिंगचा मृत्यू तपास कार्य कुठपर्यंत आला आहे याबाबत सीबीआय तर्फे अधिकृत बातमी आलेली नाही. त्यावर न्युज चॅनेल्सवरून  राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांची आरोप-प्रत्यारोपांच्या  फैरी झाडल्या जात आहेत. एम्स मधून फाॅरेन्सिक रिपोर्ट संबधीचा अहवाल हाती आलेला नाही असे एम्सच्या अधिकार्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. सीबीआयने लागलीच रिपोर्ट दिला असता तर  
" इतक्या लौकर सीबीआयने रिपोर्ट दिला म्हणजे खोटा रिपोर्ट आधीच तयार केलेला होता. सीबीआय स्वायस्त राहीलेली नाही." अशी ओरड विरोधी पक्षांनी केली असती. सामान्य समज अशी आहे की सारे पुरावे नष्ट करून सुशांतसिंगच्या मृत्यूच्या तपासात ६५ हून अधिक दिवस एफआयआर न दाखल केलेल्या केसचा मुळापासून शोध घेऊन अहवाल तयार करण्यास वेळ लागणारच की ! इतके तारतम्य मविआच्या समर्थक मिडीयाने व कार्यकर्त्यानी बाळगावयास हवे की नाही ? ज्या पद्धतीने एनसीबी, ईडी, व सीबीआयने तपास सुरू केलेला पाहता, सुशांतसिंगच्या मृत्युबाबतचे सत्य बाहेर येईलच पण त्याहून अधिक महत्वाचे म्हणजे ड्रग्ज माफीया, व बाॅलीवूड मधील डाॅनगिरी या संबंधीचा जो तपास सुरू होत आहे त्यामूळे देशातले राजकारण ढवळून निघेल अशी चिन्हे दिसत आहेत. त्यामूळे या प्रकरणाला वेगळे वळण लागणार आहे असे गृहीत धरून जस जशा गोष्टी बाहेर येत जातील तस तशा  प्रिन्ट इलेट्राॅनीक्स व सोशल मिडीयावर चर्चासत्रांच्या मालिका सुरू झालेल्या दिसू लागतील. आपण ही सारेजण त्यात ओढले जाणार आहोत. त्या अनुषंगाने आपल्यासोबत प्राथमिक संवाद साधावा म्हणून हा लेख प्रंपच.

प्रथम महाराष्ट्र सरकार जे फक्त अशांत होते, ते कसे सैरभेर होऊ लागले आहे  यावर चर्चा करू या. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची शिवसेना नेता व सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक श्री संजय राऊत याच्यांत अलिकडे एका हाॅटेलमध्ये गुप्त बैठक झाली. त्या बैठकीसंबंधी मिडीयातील संपादक मडंळी तसेच राजकीय अभ्यासक वेगवेगळे अंदाज बांधू लागले आहेत. ही भेट होती की संजय राऊतांनी स्वतः  फडणवीसांची भेट मागितली होती का यावर ही चर्चा होत आहे. श्री फडणवीस आणि राऊत यांच्या भेटीत काय घडलं, काय ठरलं हे तर सध्या तरी गुलदस्त्यातच राहील असे वाटते. पण त्यातून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की, आता  महाराष्ट्राच्या राजकारणाची सुत्रे शरद पवारांकडून ती देंवेंद्र फडणविसांकडे येऊ लागली आहेत.श्री फडणवीस व राऊत यांच्यात भेट झाल्याचे कळल्यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. पाठोपाठ काँग्रेसचे अध्यक्ष श्री बाळासाहेब थोरात हे ही मुख्यमंत्र्यांना भेटले. महाविकास आघाडीचे सरकार कधी पडणार याची भाजपा एखादा चातक पक्षी पावसाची वाट पाहात असतो, तशी वाट पाहात आहे अशी जी टीका मविआ सरकारचे समर्थक संपादक महाशय व मविआचे कार्यकर्ते करीत होते ती सारी मंडळी तोंडघशी पडल्याचे दिसते. अर्थात ती मंडळी हे सत्य मान्य करणार नाहीत हा भाग वेगळा. मविआ आघाडीचा संजय नावाचा सेनापती, एका ब्राम्हण नेत्यांच्या दारात याचना करण्यासाठी गेल्यामूळे, राजाची नेमणूक फडणवीस करू लागले आहेत अशी राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी जातीयवादी  टिका करणार्या मविआ सरकारचा जाणता राजा ही गोंधळून गेल्याचे दिसत आहे.  बिहारमधील निवडणूका जिंकण्यासाठी सुशांतसिंगच्या मृत्युचा तपास सीबीआय कडे दिला या आरोपाचा ही फुगा फुटला. वस्तुतः बिहारमधील निवडणूका जिंकण्यासाठी सुशातसिंगच्या मृत्युचा तपास सिबीआयकडे देण्याची गरज भाजपाला नव्हतीच. कारण बिहारमधील काँग्रेस मृतावस्थेत आहे. आरजेडीचे श्री लालू यादव कारावास भोगत आहेत. पंतप्रधान श्री  मोदींच्या लोकप्रियतेला ग्रहण लागण्याची बात तर दूरच राहिली, उलट एक हाती सत्ता जिंकण्याची मोदींची ताकद आजही शाबूत आहे, असे श्री शेखर गुप्तासारखे डाव्या विचारसरणीचे पत्रकार ही मान्य करतात. बिहारचे मुख्यमंत्री श्री नितीशकुमारांना हे फार लौकरच कळले होते. म्हणून ज्यांच्यासोबत सत्तेसाठी शय्या केली होती अशा काँग्रेस व राजदला धक्का देत नितीशकुमारांनी भाजपाच्या पाठींब्यावर आपलं मुख्यमंत्रीपद राखले. म्हणजे वारा वाहातो तशी पाठ फिरवून संधीसाधूगिरी केली नितिशकुमारांनी. पण काही मिडीयातील मंडळीनी भाजपावर केद्रातील सत्तेचा दुरूपयोग केला अशी टिका केली. महाराष्ट्रात युतीधर्म शिवसेनेने पाळला नाही, पण टिका झाली भाजपावर. आता मविआ मध्ये आघाडी धर्माची वाट लावण्याची कृती प्रथम कोण करणार या प्रश्नातले रहस्य संपले आहे. कारण तिन्ही घटक पक्ष म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काॅग्रेस व काॅग्रेस या पैकी  कोणीही आघाडी धर्म मोडू शकतो. तिन्ही पक्ष आपआपल्या सोयीचा व फायद्याचा अभ्यास करीत आहेत. पण राजकारणाची सुत्रे पंतप्रधान मोदींच्या हातात अलगद येऊन पडली आहेत. त्यामूळे सेना व राष्ट्रवादी मध्ये भाजपाशी जवळीक साधण्यासाठी स्पर्धा लागलेली दिसू शकेल. हे पाहता महाराष्ट्रातील काॅग्रेस नेत्यांनी सत्तेवर लाथ मारून आपलाच पक्ष भाजपाचा सच्चा विरोधक आहे असे दाखवून महाराष्ट्रातील आपले संघटन मजबूत करण्याकडे लक्ष देणे हितकारक ठरेल. कारण शिवसेनेशी सत्तेत भाग घेतल्यामूळे काॅग्रेसचा एक वर्ग नाराज आहे. ते काहीही असले तरी मविआ सरकारच्या तिन्ही घटक पक्षात परपरस्परांविषयी अविश्वास आहे हे काही लपलेले नाही. त्यातून महाराष्ट्र सरकार गडगडले तरी पुरोगामी संपादक मंडळी भाजपा वरच टिका करील. 

आज देशभर विरोधी पक्षांची जी दुरावस्था झाली आहे त्याचे खरे कारण डाव्या पक्षांपेक्षा अधिक डावे बनण्याची इतर विरोधी पक्षांना लागलेली चटक हे होय. मी चटक हा शब्द का वापरला याचे कारण राजीव गांधी फाऊन्डेशनला चीन देशाकडून भरघोस मदत मिळाली आहे हे उघडकीस आल्यामूळे इतर छोटे-मोठे राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय पक्षांना चीनी पैशाची हाव झालेली असणारच, कदाचीत मदत मिळाली असावी. अशी चटक लागलेल्या पक्षांच्या कळपात, जे हिंदूच्या देवांची चेष्टा करून बसले असे श्री संजय राऊत आणि आम्हांला ब्राह्मणी हिंदुत्व पटत नाही असे म्हणणारे  श्री उद्धव ठाकरे या दोघां नेत्यांमूळे शिवसेनेचाही समावेश झाला आहे. शिवसेना किंवा राष्ट्रवादी पक्षाला गोंजारून राजकारणात काही ही होऊ शकते असे बोल मराठी मतदारांच्या मुखातून बाहेर येऊ नयेत याची भाजपाने खबरदारी घेणे योग्य ठरेल. शेतीविषयक बिलाच्या पाठींब्यासाठी नवीन पक्ष एनडीएत सामील होण्याची चिन्हे दिसताना २०१९ चा भाजपा वर नमूद केलेली खबरदारी घेण्याची म्हणा वा राजकीय धक्कातंत्र अमंलात आणण्याची शक्यता अधिक आहे. याची चाहूल अकाली दल एनडीएतून बाहेर पडला त्यावर भाजपाने केलेल्या सपशेल दुर्लक्षातून दिसते.

भारतीय राजकारणात १९६७-६८ साली आघाडी सरकारच्या कल्पनेचे सारे श्रेय समाजवादी नेते डाॅ. राम मनोहर लोहीया व जनसंघाचे तत्कालीन अध्यक्ष पंडीत दिनदयाळ उपाध्याय यानां जाते.  पुढे मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखालील जनता पार्टीचे सरकार, विश्वनाथ प्रतापसिंगच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार, देवेगौडा, गुजराल, चंद्रशेखर इत्यादी पंतप्रधानांची सरकार का पडली याचे कारण भाजपेतर पक्षांनी आघाडी धर्म पाळता नाही. परंतु भाजपा मग तो वाजपेयी-अडवाणीच्या काळातील असो वा मोदी-अमित शहांच्या  विद्यमान काळातील असो त्याने आघाडी वा युती धर्म प्रामाणिकपणे निभाविलेला आहे. रामजन्मभूमी, जम्मू आणि काश्मीर मधील ३७० कलम, समान नागरी कायदा इत्यादी आपले मुद्दे भाजपाने बाजूला ठेवले होतेच की. हे ही एक कारण आहे ज्यामूळे इतर विरोधी पक्षांतील नेते भाजपात प्रवेश करताना अधिक संख्येने दिसत आहेत. महाराष्ट्र म्हणा वा बिहार या दोन्ही राज्यात भाजपा प्रबळ बनत चालला आहे याचे कारण भाजपाने स्वार्थी वृत्तीने ना नितिशकुमारांचा खांदा वापरला ना बाळासाहेबांचा खांदा वापरला. महाराष्ट्रात युती सरकारच्या काळात शिवसेनेने सत्तेत राहून ही मोदी सरकारवर टिका केली तरी श्री देवेंद्र फडणवीस च्या नेतृत्वाखालील भाजपाने संयम दाखविला हे आपण पाहीलं आहेच. त्यामूळेच जसा बिहार मधील समाजवादी नावाचा पक्ष नामशेष झाला तसाच शिवसेना पक्ष स्वतःच्या कर्माने नामशेष होण्याच्या मार्गावर दिसला तर त्यात आश्चर्य वाटू नये. सांप्रत स्थितीत महाराष्ट्रात  शिवसेना व राष्ट्रवादीला आणि बिहारमध्ये नितीशकूमारांना भाजपाचा आधार हवासा आहे. भाजपा नितीशकुमारांना प्रेमाने वागविण्याच्या मनःस्थितीत आहे पण शिवसेनेला आता हिंदू मतांमध्ये भाजपा भागिदार करून घेईल असे वाटत नाही. हिंदू हिताचे कार्य तर सोडाच पण मराठी हिताच्या कामांकडे ही स्वर्गीय बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेनेने दुर्लक्ष केले आहे. 

सुशांतसिंगच्या संशयास्पद मृत्युनंतर बाॅलीवूड जगतचे खरे रूप उजेडात येऊ लागले आहे. त्यामूळे मला असे वाटते की बाॅलीवूडचा काळा बुरखा फाडून सफाई करत, करत बाॅलीवूडचे होलीवूड होण्याची गरज आहे असे जनमानस तयार करून पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातील मविआचे घटक पक्षांचे कंबरडे मोडतीलच पण आपल्या  आत्मनिर्भर भारताच्या कल्पनेत चित्रपट क्षेत्राचा ही समावेश करतील. चित्रपट निर्मीतीला इंडस्ट्रीचा दर्जा देऊन एक रेग्यूलरी अथाॅरिटी ठेवून संपूर्ण कारभार व व्यवहार पारदर्शक करण्याचे कार्य भारताच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि सामरिक सुरक्षेच्या दृष्टीने अतिआवश्यक बनले आहे. ड्रग्ज माफीयांना पकडण्यासाठी सुरू केलेली मोहीम, सीबीआय, इडी, आयटी इत्यादीं एजन्सीने सुरू केलेला धडाका, हे आता राजकारणातले निव्वळ नाटक राहीले नाही. हे भारतावर पैशाच्या जोरावर मानवी हक्क, महिला हक्क, पर्यावरण, सेवा, इत्यादीच्या नावाखाली बनावट नोटा, ड्रग्ज, शस्त्रात्रे, हिंसा, आंदोलने, धर्मातंर, युवकांचा बुद्धीभेद, लव जिहाद इत्यादी दुष्यकृत्यें करणार्या अनेक लाॅब्या,व  अमेरिकेतील जार्ज सोरोसची द ओपन सोसायटी फाॅऊन्डेशन्स इन इंडिया,  इंग्लडमधील ॲम्नेस्टी इंटरनॅशनल  इंडीया सारख्या अनेक मोठ्या, अनेक छोट्या, रजिस्टर्ड, नाॅन रजिस्टर्ड अशा ३१ लाख एन्जीओने लादलेल्या युद्धाचा खात्मा करावयाचा आहे. या कारवाई दृष्टीने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणणे किंवा आमदार फोडून सरकार पाडणे इतकं क्षुल्लक काम मोदी सरकार करील असे वाटत नाही. काळाच्या रेट्यातच ते आपोआप पडेल. वरील विवेचनात अकाली दलाची एनडीए तून एक्झीटचा उल्लेख केला आहे, त्यावर आता थोडी चर्चा करून लेखाच्या शेवटाकडे जाऊ या.

भाजपा प्रणित एनडीएचा घटक पक्ष अकाली दलाने शेती विषयक बिलास विरोध केला आणि एनडीए मधून  बाहेर पडला आहे. त्याबाबत फारशी चर्चा झाली नाही. याचे कारण अकाली दल पंजाब पूरता सिमीत आहे. मोदी सरकारने अकाली दलाच्या निर्णयास फारसे महत्व दिले नाही. याचे पहीले कारण आहे, पंजाबमधील विधानसभा निवडणूकीत अकाली दलाचा दारूण पराभव झाला आहे.  दुसरे कारण, मोदी सरकारकडे संसदेत धडधाकट बहूमत आहे. तिसरे कारण असे की एनसीबीने ड्रग्ज माफीया विरोधात सुरू केलेल्या मोहिमेत अकाली दलाला अडचणीत टाकण्याची संधी हाती आलीच आहे तर तिचा वापर करीत भाजपा 
' ड्रग्जको ना बोलो और पंजाब बचाओ ' किंवा Say No to Drugs and Save Panjab अशा घोषणा देत अभिनव चळवळ हाती घेऊ शकते. जम्मू आणि काश्मीर मध्ये पीडीपीशी युती करून सत्तेत सहभागी होऊन भाजपाने काश्मीर खोर्यातील प्रशासन, पोलीस कारभार, अलगावादी व त्यांना मिळणारा पैसा, स्थानिक टोळ्या, पाक पुरस्कृत दशहतवाद्याचें अड्डे इत्यादीची सारी माहिती हाती घेतली आणि योग्य वेळी तेथील सत्तेला लाथ मारली. तशीच पद्धत  भाजपा पंजाबमध्ये जम बसविण्यासाठी राबविणार असे दिसते. पण हे करताना भाजपा घाई करणार नाही. ड्रग्ज माफीयांचे पंजाबमध्ये जिथे जिथे अड्डे आहेत ज्यात अकाली दलाच्या नेत्यांचीही भागिदारी आहे, ते उडविले जातील. ही कृती अखिल भारतीय स्तरावरील असेल हे कर्नाटकातील कारवाई वरून एव्हाना सार्या विरोधी पक्षांच्या लक्षात आले असणारच. त्यामूळे पंजाब मधील अकाली दल व काॅग्रेसला हाताची घडी व तोंडावर बोट ठेवून पाहात बसावे लागेल. अकाली दल हा पक्ष पुर्णपणे बादल घराण्याच्या ताब्यात गेला असल्यामूळे अकाली दलातील असंतुष्टांची मदत भाजपा घेईल. पंजाब काँग्रेसचे बळ हे सोनीया गांधी व राहूल गांधीचे नाही. ते आहे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंहाचे. पंजाबमध्ये नवज्योत सिंधू व मुख्यमंत्री अमरिंदरसिंह मध्ये जो छत्तीसचा आकडा निर्माण झाला आहे त्यावर भाजपाचे बारकाईने लक्ष आहेच.  काँग्रेस अंतर्गत दुफळीचा फायदा भाजपाला होईल. सोबत ॲन्टी-ड्रग्ज चळवळीतून भाजपाला जो जनतेचा पाठींबा मिळेल तो ही जमेस धरला तर भाजपा पुढील विधानसभा निवडणूकीच्या वेळी पंजाबमध्ये शक्तीशाली बनलेला पहावयास मिळेल.  शेतमाल खरेदी- विक्रीवर बादल घराण्याची असलेली मक्तेदारी मोडण्यात नवीन कायद्याचा अत्यंत खुबीने वापर भाजपातर्फे केला जाईल. महाराष्ट्रातही शेतमालासंबंधीच्या दलालांची मक्तेदारी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांची विशेषतः सुप्रिया सुळेंची म्हणजे शरद पवारांची आहे. बहुतांश प्रांतात स्थानिक पक्षांच्या नेत्यांच्या हातात शेतमाल विक्रीची मक्तेदारी आहे. तीच मोडून टाकण्याचे कार्य मोदी सरकार देशभर हाती घेईल यात कुठलाही संदेह नाही. संसदेत शेतीविषयक बिले पास झाली आहेत. विरोधकांनी गोंधळ घातला पण आपण शेतकर्यांच्या हितासाठी हा गोंधळ घातला असा संदेश शेतकर्यांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी पार पाडण्यात नेहेमी प्रमाणे विरोधी पक्ष कमी पडणार आहेत. त्यातही भाजपेतर सार्या पक्षांच्या नेत्यांविरोधात भ्रष्टाचार, बेनामी संपत्ती, विदेशी फंडीग, देशाशी फितूरी, गुन्हेगारी, आयकर, फेरा, असे अनेक खटले कोर्टत दाखल झालेले आहेत. त्यामूळे ते असहाय्य आहेत. 

काँग्रेस संसदेतील प्रमूख विरोधी पक्ष आहे. पण तो पक्ष  चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा मांडलिक झाल्याचे चित्र उभे आहे, ते कधी पुसले जाणार? त्यामूळे वेळोवेळी चीन द्वारें आपल्या देशाच्या सीमावर होणारी आगळीक मुळे  काँग्रेसचेच नाव अधिकाधिक बदनाम होत आहे. चीनच्या आगळिकेला भारत सडेतोड उत्तर देऊ शकतो असे सामरिक विषयाचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. तसेच एकंदरीत चीनला एकाकी टाकण्याचे जे प्रयत्न जागतिक पातळीवरून दिसत आहेत तो एक मोठा अडसर चीन समोर आहे. चीनने कुठे आगळिक केली की राहूल गांधी पंतप्रधान मोदीवर व्टिटरवरून टिका करतात. त्यातून काँग्रेसचा जनाधार  खंगावत आहे याची फिकीर काँग्रेसलाच पडलेली नाही. देशातील प्रमुख विरोधी पक्ष दिशाहीन झाला आहे. इतर सारे प्रांतीय पक्षांचे स्वरूप घराणेशाहीत झाले आहे. त्यामूळे नवा मतदार प्रांतीय अस्मीतेला राष्ट्रीय स्तरावरील निवडणूकीत फारसा प्रतिसाद देण्याच्या स्थितीत नसतोच. एकंदरीत सुशांतसिंगच्या मृत्यूच्या तपासातून जे राजकारण सुरू झाले आहे ते, ड्रग्ज माफीया, हवाला माफीया, बाॅलीवूड माफीया, एन्जीओ माफीया, दाढीवाले माफीया, सफेद झग्गेवाले माफीया, डावे माफीया, शेतमाल दलाल-माफीया, ढोंगी सर्वधर्मसमभावी माफीया, ढोंगी प्रान्तीय  माफीया, इत्यादींचे अड्डे नेस्ताबूत करीत पुढे सरकत जाईल असे वाटते. कारण राज्यशास्त्राच्या अभ्यासात म्हटले आहे की  When government machinery fails, judiciary becomes proactive and when opposition party is helpless, the  ruling party becomes proactive.

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...