फळाची आशा (फलाशा) न करता कर्म करणे शक्य आहे का असा प्रश्न आपल्या सारख्या सामान्यजनांना सतत पडत असतो. याचे कारण आजचे जग हे आर्थिक जगत आहे. देवाने दिले आहेत दोन कर, त्यातून काहितरी चांगले कर असा उपदेश घेऊनच आपण मानव म्हणून जन्म घेतला आहे. प्रथम कर्म करणे महत्वाचे की फलाशा न करणे महत्वाचे असा ही प्रश्न आपल्यासमोर उभा राहातो. तसे पाहता प्रथम कर्म करणे महत्वाचे मानावे लागते. कारण कर्म च फळांना जन्म देते. म्हणून कर्म न करता फळाची आशा करणे आजच्या व्यवहारी जगतात वेडगळपणाचे ठरते. कुरूक्षेत्रावर युद्ध सुरू करण्याच्या वेळी अर्जुनाची शोकग्रस्त अवस्था जितके दौर्बाल्याचे लक्षण समजले गेले, तसे आजच्या आर्थिक जगतात, जिथे पैसा हे विनिमयाचे साधन झाले आहे तिथे कर्म न करता फलाशा करणे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा अशी टिका सतत सहन करण्यासारखे आहे.
आजचे जग जसे आर्थिक शक्तीचे तसेच ते सामरिक शक्तीचे आहे. शस्त्रच जिथे व्यापारातील वस्तु बनली, त्यातून सारं व्यापार-जगत स्पर्धा नावाच्या शस्त्राचे बनले यात नवल ते काय ! कुठलिही वस्तु विकण्याजोगी आहे या कल्पनेतून व्यापार जगत शस्त्राहून वेगवान बनले. Survival of the fittest हा न्याय ठरला. स्पर्धेत टिकायचे असेल, तर टार्गेट (लक्ष्य) आले. उत्पादन क्षेत्र, असो वा सेवा क्षेत्र, सर्वत्र लक्ष्य (Target ) ठेवण्यात येऊ लागले. हे लक्ष्य पुरे करण्याकरीता विविध प्रकारच्या सवलती, सुख-सोयींचा (Incentives ) वारेमाप वापर होऊ लागला. त्यासाठी Do not live in comfort zone; Low aim is crime; Run With the time; थांबला तो संपला, इत्यादी नियामावर व्याख्यानं देणारा मॅनेजमेट, मार्केटिंग गुरू समाज व्यवस्थेत आला. त्या व्यवस्थेला दोष देता येत नाही. कारण काळानुसार त्यांना व्यवस्थेत उतरणे भाग होते. त्यांच्या व्याख्यानाचा फायदा ही होत असताना दिसतो. जीवनाचे एक ही क्षेत्र असे राहिले नाही कि जिथे स्पर्धा नाही. कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, लघुउद्योग, कापड, सेवा-उद्योग, औषधे, जीवनावश्यक वस्तू, माहिती व तंत्रज्ञान, चित्रपट, मनोरंजन, क्रिडा, इत्यादी सारी क्षेत्रं स्पर्धा नावाच्या अजगराच्या विळख्यात अडकली. स्पर्धेमुळे, लक्ष्य वाढले म्हणजेच Level of ambition वाढली. त्यातून अतिरिक्त सवलती, सुखसोयींची जी प्रलोभने ठेवलेली असतात ती आपल्या मनाचा, बुद्धीचा ताबा घेतात. त्यामूळे Level of satisfaction वाढते म्हणजे मन अतृप्त होत जाते. आज आपण अशा जगात राहतो, जिथे समाजबांधवात अप्रत्यक्ष रित्या राहणीमानाच्या निकषावरून श्रेणी व्यवस्था आली. पुष्कळदा प्रत्येक क्षेत्रात जी स्पर्धा निर्माण झाली आहे, त्यात जे यशस्वी होतात त्यांचे राहणीमान कालच्या पेक्षा आज कैकपटीने वाढलेले दिसते. त्यामूळे स्पर्धेत असलेले इतर समाजबांधवात राहणीमान उंचाविण्याची लालसा निर्माण होते. गरज नसलेल्या वस्तूंची खरेदी होत जाते, मग ती घरातील फर्नोचर बदलण्यापासून ते आपल्या मुलांना टाॅप ग्रेड शाळेत शिक्षण देणे, उंची वस्त्रे खरेदी करणें ,उच्च श्रेणीच्या हाॅटेल, माॅल, सिनेमा हाॅऊस मध्ये जाणे, उंची ब्रँन्डची मद्य घेणे, उंची गाडी-मोटार बाईक घेण्यापर्यंतचा चंगळवाद वाढत जात असतांना दिसतो. त्यामूळे स्पर्थेचे जे निकोप रूप असते तेच विद्रुप होत जाते. त्यातून मानसिक ताण-तणाव वाढण्याचे आजार वाढतात मग त्या आजारावर इलाज सुद्धा महागड्या रूग्णालयात पर्यंत पोहचते. त्यामूळे पैसा कमाविण्यासाठी कर्म करणे की कर्मे करून पैसा कमाविणे असे द्वंद्व आपल्या मनात सुरू होते, त्यातूनच हत्या, आत्महत्या, आणि मानसिक आजार यांचे प्रमाण वाढते. स्पर्धा निकोप राहीली नाही, म्हणून शुद्ध विचार मनात ठेवून कर्म करणें जवळपास अशक्य झाल्याचे दिसत आहे.
मग उपाय कुठला ? मा फलेशू कदाचन हाच होय. वस्तुतः कर्म करीत असताना, त्याचे फल सोबतच समांतर रेषेत चालत असते. गहू पेरला की गव्हाचे पीकच रूजणार, तांदळाचे नव्हे. रस्ता क्रास करताना हलगर्जीपणा केला की येणार्य गाड्या किंवा जाणार्या गाड्यापैकी एखादी गाडी आपल्याला ठोकर देणारच. अभ्यास नियमितपणे केला की परीक्षेत उत्तम रित्या पास होणारच. भितींवर चेंडू फेकला की तो आपल्याकडे परत येणारच. फरक हाच राहील की जसा जोर आपण लावला त्याच गतीने तो आपल्याकडे परत येतो. पुन्हा जितक्या सरळ रेषेत टाकाला असेल तितक्या सरळ रेषेत परत येणार. याचा अर्थ असा की फलाची गती, फलाचा आकार वा संख्यात फरक राहणार. या पाठीमागील कारण जन्मतः आपण जे गुण घेऊन येतो, ते सर्वामध्ये समप्रमाणात नसते हेच होय. म्हणून फलाचे प्रमाण ही विषम असते. फल कधी मिळणार ते ही कर्म निभावताना आपण किती वेळ घेतला, त्याच गतीने ते आपल्याकडे येणार. आपण केलेल्या कर्माची गती, संख्या, भिन्न असल्यामूळे काही लोकांना जस फल लौकर प्राप्त होते तसे आपल्याला लौकर प्राप्त होईलच असे नसते. त्यामूळे आपल्या पेक्षा चांगले यश मिळाले, त्यांचा हेवा वाटणे, वा आपल्यापेक्षा कमी यश मिळणार्याबद्दल तुच्छता वाटणे वा आपल्या यशाबद्दल अंहकार उत्पन्न होत असतो. ते टाळावयाचे असेल तर दोन गोष्टी करणे आवश्यक आहेत. एक फलाची आशा सोडून देणे. फलाची आशा केली की आपल्या कर्मातील एकाग्रता भंग पावते. त्यामुळे स्वाभाविक पणे आपली कर्म पार पाडण्यातील क्षमता घसरते. आपली क्षमता घसरली की फलाच्या निर्मिती वा गुणवत्तेत फरक पडत असतो. दुसरा उपाय म्हणजे आपले कर्म करताना शुद्ध विचार यावा. याचा अर्थ संपुर्ण समरसतेने कर्म पार पाडणे गरजेचे असते. त्यातून फलाची आशा न करता ही फलात चांगली भर पडते.
मी बोरीवली राहावयास आलो ते लग्नाच्या अगोदर. आमच्या ऑफीसमधील एक जेष्ठ सोबती मुळचे उत्तराखंड मधील. त्यांची मुले ही मोठी झाली होती. त्यांची बदली मुबंईत झाली होती पण राहावयास एकटेच आले होते. एकाच ऑफीसमध्ये आणि एकाच काॅलनीत राहात असल्यामूळे आमची मैत्री झाली होती. एक दिवस तेच म्हiणाले की " मै आपको खाना कैसा बनायें, यह सिखानेके लिए आज रातको आठ बजे आपके घर आता हूँ |" ते माझ्या घरी आले. मी सामान कुठे ठेवले आहे ते दाखविले आणि ऑफीस मधून परत येते वेळी भिजविलेले छोले आणले होते तेही दाखविले. स्वैपांक बनविताना ते माझ्याशी गप्पा ही मारत होते. तासा भरात चांगल्या बटर रोटी, छोले मसाला, आणि सोबत थोडा भात, डाळ व कोशिंबिरने भरलेले दोन ताट घेऊन ते हाॅल मध्ये आले. मी पहीला घास तोंडात घातल्यानंतर माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले " रावतजी बहोत बढीया खाना बनाया है | " तर ते म्हणाले, " इससे अच्छा बन सकता था लेकीन मै हमारे गाॅवके घरमे बनाया हुआ मसाला यहाँ लानेको भूल गया | " जेवल्यानंतर गप्पा गोष्टी झाल्या. जुन्या हिंदी चित्रपटातील टेपरेकार्डवरून गाणी ऐकली. नंतर ते त्यांच्या घरी गेले . मला प्रश्न पडला की रावतजीने माझ्याच घरातला मसाला, तेल, मीठ आणि पीठ वापरून रोटी आणि चना मसाला,डाळ, कोशिंबीर इत्यादी पदार्थ इतके चवदार कसे बनविले? विचार करता उत्तर मिळाले. ते असे आहे," रावतजी एक चांगले आचारी आहेत. सततचा प्रयत्न करीत करीत त्यांनी स्वैपांक बनविण्यात प्राविण्य मिळविले असावे. पण ही उत्तरे तशी पाहता नेहमीची. थोडा विचार केल्यानंतर लक्षात आले की ऑफीसमधून बाहेर पडल्यानंतर ते माझ्या घरी स्वैपांक करण्यासाठी येणार आहेत असे म्हणाले होते. मला चांगल जेवण बनवून देण्याची उदात्त भावना त्यांच्या मनात रूजली होती. त्यामूळे स्वैपाक बनविताना ते पूर्णपणे समरस झाले होते." कर्म करताना आपल्या मनात शुद्ध विचार असला आणि त्यात परोपकाराची भावना असली की आपले कर्म उच्चतम श्रेणीचे बनते. आपण जेव्हा केव्हा एखादे कर्म पार पाडतो व यश मिळते तेव्हा आपली मानसिक स्थिती चांगली असते. असे आपण अनुभवत ही असतो.
आपल्याला घर बांधावयाचे असेल, किंवा फ्लॅट घ्यावयाचा असतो, तेव्हा भले ते परोपकारी कर्म नसते पण अनेक अडचणीचा सामना करत करत अवाढव्य वाटणारी आपली इच्छा पूर्ण होते. नंतर आपल्या हातून हे काम कसे पुर्ण झाले याचे आपल्यालाच आश्चर्य वाटते. जेव्हा आपण ध्येयावर लक्ष ठेवतो व त्या पलिकडे दुसरा कुठलाही विचार मनात उभा राहात नसतो, तेव्हा आपली आत्मीक शक्ती उंचावलेली असते. म्हणजे आपले ध्येयच आपला गुरू बनतो. म्हणजेच भगवंताचे अधिष्ठान आपल्या कर्मासोबत असते. भले असे कर्म स्वार्थ प्रेरीत असले तरी घरासाठी पंखे, फर्निचर इत्यादी वस्तु जेथून खरेदी करतो त्या व्यापाराकडे असलेले गरीब डिलीवरी बाॅयनां, छोटीशी आर्थिक भेट दिली तर त्यातून ही परोपकार होत असतो. अशा जाणिवेतून आपल्या कर्माचे रूपातंर थोड्या प्रमाणात का होईना पण ते निष्काम कर्मात होत असते. मनात शुद्ध विचार ठेवण्यात सातत्य टिकविणे आवश्यक असते, ते आपल्याला जमत नाही. इथेच भगवंताने ' मा फलेषु कदाचान ' का म्हटले आहे हे लक्षात येते. फल इच्छा काबूत ठेवण्याचं काम फार जिकरीचे असते. हे खरे असले तरी ते अशक्यप्राय नसते. एक सामान्य दुध व लोणी विकणारा खेडूत आपले कर्म कसे शुद्ध विचाराने ठेवतो आणि त्यातून त्याचा फायदा कसा झाला होता या संबंधी एक छोटीसी कथा आहे, ती मांडतो म्हणजे आपण मनात शुद्ध विचार आणू शकतो हे पटेल. ती कथा सादर करतो आणि आपण लेखाच्या शेवटाकडे जाऊ या.
एका गावात एक गवळी होता. दोन म्हशी व दोन गाईचे पालनपोषण करीत छोटासा दुधदुभत्याचा धंदा करीत होता. गावापासून पाच किलोमिटर अंतरावर असलेल्या तालूक्याच्या ठिकाणी तो दुध व लोणी एका व्यापाराला विकत असे. त्या पैशातून तो त्याच व्यापाराकडून किराणा माल विकत घेत असे. एके दिवशी हा गवळी आपले दुध व लोणी जमा करण्यासाठी व्यापाराकडे गेला असता व्यापारी म्हणाला, की उद्यापासून तुमचे दुध व लोणी आम्ही घेणार नाही. तो गवळी गयावया करून बोलला, " शेठजी आपण माझे दुध व लोणी बंद करू नका. मग मी किराणा माल कसा घेणार? दोन म्हशी आणि दोन गाई खरेदी केल्याचे कर्ज अजून फिटले नाही." त्यावर व्यापारी म्हणाला, " तु नेहमी मला फसवित आला आहेस. तुझे लोणी किलो पेक्षा कमी असते, असे म्हणतच व्यापाराने गवळीने आणलेले लोणी तराजूत ठेवले, तो गवळी पाहातो, तर खरच एक किलोपेक्षा लोणी कमी दिसले. इतर गिर्हाइकांच्या समोरच गवळीचा व्यापाराने पाणउतारा केला. इतर गिर्हाइकांनी त्या गवळीला लबाडी करतोस का असा दम दिला. तेव्हा तो गवळी रडतच म्हणाला, " शेठजी माझ्याकडे किलोचेच काय पण पाव किलोचे वजनमाप नाही. मी तुमच्याकडून घेत असलेल्या एक किलो डाळ पिठ किंवा साखरेच्या पिशवीतच एक किलोचे लोणी भरत असतो. म्हणून मी कृपा करून सांगतो' माझे दुध व लोणी घेण्याचे बंद करू नका.' एव्हाना तिथे उपस्थित असलेल्या गिर्हाईकांना व्यापाराची लबाडी कळली. त्यांनी लबाड व्यापारालाच दम दिला आणि गवळीला आपल्या सोबत घेतले व तेथील डेअरीच्या दुकानात गेले. झाला प्रकार सांगितला व त्या गवळ्याचे दुध व लोणी विकत घेतले व त्या गवळ्याला रोख पैसे दिले सोबत, एक गाळणी व एक किलोचे मोजमापन दगड ही दिले. नंतर तेथील एका दुसर्या वाण्याच्या दुकानातून तो गवळी आपले रेशन भरू लागला. पहिला व्यापारी सचोटीने धंदा करत नव्हता हे उघड झाले व धंदा ही बसला. शेवटी तो दुसर्या ठिकाणी गेला तो कायमचाच. सचोटीने व समरसतेने आपले कर्म पार पाडणारा गवळी भोळा-बाबडा, अशिक्षित पण आपला व्यवसाय सचोटीने करतो. त्यामूळे त्याचे नुकसान होत असे हे त्याच्या लक्षात आले नाही. पण त्याला फसविणार्या व्यापाराला शिक्षा मिळाली आणि नंतर त्या गवळीला न फसविणारा व्यापारी मिळाला आणि डेअरीवाला ही मिळाला. आज ही गवळी, शिंपी, लोहार, व्यापारी, शेतकरी गावागावात आहेत. आपल्या नियत कर्मातून ही ईश्वराची अनुभूती मिळते. आपल्या शेतात काम करीत असताना भजन, अभंग, भारूडे, भक्तीगीत गाणार्या शेतकर्यांच्या शेतातून भेंडी, वांगी इत्यादी भाजीपाला चांगल्या प्रतीचा मिळतो आहे. असे विज्ञानाने ही मान्य केले आहे. अशाच निर्मळ मनाचे संत सावता माळी म्हणतात,
कांदा, मुळा भाजी | अवघी विठाई माझी ||
तर बहीणाबाई म्हणतात,.
ऊठ, ऊठ माझ्या जीवा काम पडले आहे अमाप |
काम करता करता पाहा देवाजीचं रूप ||
आपल्या कर्मालाच ईश्वर मानणे ही एक मोठी तपस्या आहे. शुद्ध विचार ठेवून कर्म करणारे लोक समाजात होते व आजही आहेत. मित्रहो, कथेतील त्या व्यापाराचे काय झाले हे आपण पाहिले. त्याला चंबूगवाळे का आवळयला लागले? याचे उत्तर आहे,
"यश मिळविणे सोपे नसते हे मान्य पण ते कोणाच्या तरी तुलनेत असते. कोणाचे तरी जाणता अजाणता शोषण केलेले असते. शिवाय ते यश पचविणे कठीण होऊन बसते. समाधान मिळविणे महाकठीण असते. कारण त्यासाठी मनाची परवानगी लागते." मनाची परवानगी कशी मिळविता येते, त्यासाठी निश्चयात्मक बुद्धी चा उपयोग कसा करावयाचा या संबधीत भगंवताने गीतेत काय मांडलय त्यावर आपण पुढे कधीतरी स्वतंत्र रित्या चर्चा करणार आहोत. त्यामूळे इथेच कर्मण्येवाधिकारास्ते मा फलेषू कदाचन यावरील लेखमाला समाप्ती करतो.
जय योगक्षेमं ! ( Lic)
जय योगेश्वर !