बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

मृत्यु सुशांत पण महाराष्ट्र सरकार का अशांत ?

दिनांक २० मे रोजी ब्लाॅगवर महाराष्ट्रातील राजकारण या विषयासंबंधी लेख पब्लीश केला आहे. त्यात मी  म्हटले आहे की " जीव सामान्य नागरिकाचा का असेना तो अमूल्य असतो. त्यात भेदभाव करणे म्हणजे लोकशाही मुल्यांची प्रतारणा करणे होय. आपल्या देशाच्या संविधानाने चोरालाही मारण्याचा हक्क कोणाही व्यक्ती वा समाज समूहाला दिलेला नाही. तरीही पालघरला दोन साधूंची हत्या होते तीही कोरोनाच्या महामारीमूळे जमाव बंदी असताना. नंतर दिशा सॅलियनचा अनैसर्गिक मृत्यु , पाठोपाठ आपल्या येथील बाॅलीवूड नावाने ओळखल्या जाणार्या फिल्म-जगतात ज्याने स्वतःच्या मेहनतीने नाव कमाविले, त्या सुशांतसिंग राजपूताचा झालेला अनैसर्गिक मृत्यु.  इत्यादी घटनेतून महाराष्ट्र सरकारच्या गृहखात्याची निष्क्रियता वा चलाखी स्पष्ट झाली आहे. चलाखी शब्द वापरला याचे कारण आपल्या राज्याचे गृहमंत्री श्री अनिल देशमुखाने, सुशांत राजपूताच्या मृत्युसंबंधीचा तपास सुरू करण्याअगोदरच ' सुशांतने आत्महत्या केली ' असे वक्तव्य केले. तर त्यांचे बाॅस शरद पवारांनी " एका कलाकाराचे प्राणाचे मूल्य काय ते मोठे असे म्हणत, २० शेतकर्यांच्या आत्महत्येसंबंधी मिडीया का लक्ष घालत नाही असा उलटा प्रश्न उभा केला आहे. या शिवाय शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून संजय राऊत या विषयावर एकतर्फी अग्रलेख लिहितात आणि एका पाठोपाठ एकतर्फी व्टिट ही करीत असतात. अलीकडच्या काळात शरद पवार व संजय राऊत सतत काही तरी वाद उत्पन्न करीत असताना दिसत आहेत. या ठिकाणी ज्ञानपीठ विजेते वि स खांडेकर यांच्या एका पुस्तकातील प्रस्तावनेत म्हटलेले बोल आठवले आहेत. ते असे आहे. " तत्त्वबोधासाठी जगात फारच थोडे लोक वाद करतात. अहंकाराच्या समाधानासाठी, विद्वत्तेच्या प्रदर्शनासाठी, पूर्वग्रहाचे प्रिय असणारे पोकळ डोलारे सांभाळण्यासाठीच या जगात वाद उत्पन केले जातात आणि हिरीहिरीने लढविले जातात ! मनुष्य मुख्यतः आत्मपूजक आहे. सत्यपूजक नाही."  वि स खांडेकरांचे निधन १९७६ ला झाले. त्यामूळे आणिबाणीच्या कालखंडाविषयीची त्यांची मतें समजू शकली नाहीत. पण ते शरीराने १९७६ पर्यंत ताठ असते तर त्यांनी ' सत्तेचा व संपत्तीचा माज ' या गोष्टीमूळे  ही वाद उत्पन्न केले जातात हे वाक्य जोडले असते. सुशांतसिंग राजपूताच्या मृत्यु संबंधीत संशयाची सुई महाराष्ट्रातील सरकारमधील मंत्र्यावर व सत्ताधारी पक्षाकडे जी वळालेली दिसत आहे, त्यासंबंधीचा दोष मिडीया तसेच सर्वसामान्यांना देण्यात काही अर्थ नाही. कारण या केसमध्ये शिवसेना, व राष्ट्रवादी पक्षाला इतकं गुंतवावे का लागत आहे, ही केस बंद करण्याची घाई ही मंडळी का करीत आहेत, यातच सारं काही दडलंय आहे. अर्थात संपूर्ण चौकशी होऊन न्यायालयात सुशांतचा मृत्यू हा आत्महत्येचा प्रकार नसून ती हत्या आहे हे सिद्ध होईपर्यंत आपण वाट पाहात बसणे यातच शहाणपण आहे. जगभरातील अनेक कवी व अध्यात्मिक गुरूंनी मृत्यु म्हणजे चिरकाल विश्रांती असे वर्णन केले आहे. त्या अर्थाने मृत्यू सुशांत पण महाराष्ट्र सरकार, सुशांतसिंग राजपूताच्या मृत्युने का अशांत झाले असा प्रश्न आपल्या सर्वांना सतावत आहे. म्हणून हा लेख प्रपंच.

नुकताच सुप्रिम कोर्टाने सुशांतसिंगच्या मृत्युसंबंधीचा तपास सिबीआयकडे सुपूर्त करण्यास हरकत घेतली नाही. असा निकाल देऊन  महाराष्ट्र सरकारने सुशांतसिंगचा मृत्यू अपघाती  म्हणून जी नोंद केली त्यासंबंधी कोर्टाने फटकारले आहे. मुळातच सुशांतसिंगच्या मृत्युनंतर महाराष्ट्र सरकार जे  फक्त अशांत होते त्यात आणखिन भर झाली असून महाराष्ट्र सरकार सैरभैर होण्याची शक्यता वाढली आहे.

सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यु संदर्भात शरद पवारांनी जे वक्तव्य केले त्या संबंधी आश्चर्य वाटण्याची गरज नाही. कारण ते हाडामासाचे राजकीय नेते आहेत. ज्या २० शेतकर्यांच्या आत्महत्याकडे मिडीयाने दुर्लक्ष केले आहे असा प्रश्न आज शरद पवार उपस्थित करीत आहेत, त्या प्रश्नांवर राजकीय व्यवस्थेनेच उत्तर द्यवयाचे असते आणि हे शरद पवारांना ठाऊक नाही असे जनता कशी गृहीत धरणार?  महाराष्ट्रातले सध्याचे मविआ सरकारचा जन्मदाता शरद पवार आहेत. मविआ सरकारने शेतकर्यांची आत्महत्या रोखण्यासाठी छोटीशी जरी उपाययोजना केली असती तरी मिडीयाने शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे अभिनंदन केलेच असते.

सध्या सुशांतसिंगच्या आत्महत्येसंबंधी जी चर्चा होत आहे, त्या पाठीमागील दुसरे कारण म्हणजे मुंबई पोलीसांनी आजपावेतो  सुशांतच्या अनैसर्गिक मृत्युसंबंधी  FIR दाखल केलेली नाही. मग पोलीस दल  तपास तरी कसला करीत आहेत, हा प्रश्न सामान्यजनांना पडला आहे. सिबीयाला विरोध करावयाचा, व बिहारमधून तपास करण्यासाठी आलेल्या पोलीसांचे क्वारनटाईन करण्यातच मुंबई पोलीसांचा वेळ बरबाद झाला. सुशांतसिंगचा मृत्यू खरोखरीच आत्महत्याने झाला असेल तर राज्य सरकारने या केसबाबतचा तपास सीबियाकडे वर्ग करायला हवा होता. त्यामूळे अगोदरच कोरोनाच्या महामारीशी टक्कर देऊन थकल्या-भागलेल्या मुंबई पोलिसांवर या नसत्या उठाठेवेतून अधिकचा ताण पडला नसता. केवळ  फिल्मी दुनियातील मित्रांसोबत मुख्यमंत्र्याचे पुत्र, जे राज्याचे पर्यावरण मंत्री आहेत, ते आदित्य ठाकरें एका पार्टीला उपस्थित राहिल्यामूळे ते आरोपी ठरत नाहीत. इतकं साधं ज्ञान महाराष्ट्र सरकारमधील भल्या, भल्या मंत्र्यांना व पोलीस अधिकार्यांना नसेल हे संभवत नाही. कदाचित आज आदित्य ठाकरे जात्यात आहेत, पण आपण सूपात आहोत या जाणीवाने ही बडी मंडळी बिथरली असावी. जर का आदित्य ठाकरे निर्दोष असतील तर ही केस सिबायलाच काय, बिहार राज्याच्या पोलीसाकडे वर्ग केली तरी ते निर्दोषच सुटतील असा आत्मविश्वास  मुख्यमंत्र्याने व्यक्त करून सिबीयकडे हा तपास सोपविला असता तर मुख्यमंत्र्यांची शान वाढली असती व अनायसे भाजपाला कोंडीत पकडण्याची एक मोठी संधी प्राप्त झाली असती. पण तसे नसावे. सीबीआय तर्फे चौकशी करण्यास केलेला विरोध हे ही एक कारण आहे, ज्यामूळे सुशांतसिंगच्या मृत्यू सबंधीत संशयाची सुई राज्य सरकार मधील नेत्यांवर जात आहे. जेव्हा राज्य सरकार सीबीआय चौकशीस विरोध करते तेव्हा केंद्रातील सत्ताधारी पक्ष आपले राजकीय डावपेच खेळते असे म्हणत राहावयाचे व सुशांतच्या मृत्यूबाबतच्या चौकशी फार्स उरकायला वेळ मिळेल, आणि  या प्रकरणातून आपली सुटका व्हावी हाच उद्देश राज्य सरकारचा होता, असे आज जवळपास सिद्ध झाले आहे. अर्थात जिथे आपल्या पक्षाचे सरकार नसते तेथील राज्य सरकारच्या कारभारातला गोंधळ, हलगर्जीपण वा पक्षपाती व्यवहाराचा फायदा केंद्र सरकार घेण्याचे सोडत नसते, हे ही तितकेच खरें आहे. शेवटी क्षेत्र कुठलेही असो, राजकारणापासून ते मुक्त नसते हे मोठे सत्य.

राजकारणात काम करणार्या मंडळीची दुनिया, चंदेरी दुनिया आणि मिडीया नावाच्या दुनिया मध्ये सत्ता, लोकप्रियता, पैसा, इत्यादी गोष्टींची कमालीची स्पर्धा असते. या तिन्ही क्षेत्रात मैत्री, सत्प्रवृत्ती, नैतिकता, इत्यादी जीवनमुल्यें बहुतांश वेळा आभासी व दिखाव्या स्वरूपाची असतात. कोणाला पटो वा न पटो बाॅलीवूडमध्ये  कोणाची चलती चालावी, तिथे कुणाला बरबाद करावयाचे, इत्यादी बाबी त्या सिनेउद्योगात जो पैसा गुंतवितो तोच ठरवितो. हा पैसा बेनामी असतो व त्याचे सुत्रधार माफीया असतात. त्यांचे निवासस्थानं देशात तसेच देशाच्या बाहेरचे असू शकतात. त्यामूळे प्रशासनाला या क्षेत्रात भरीव बदल करण्यात अनेक अडचणी असू शकतात. पण काश्मीरचे ३७० कलम रद्दबादल करणारे मोदी सरकार काही तरी मार्ग काढून या सिनेउद्योगाला माफीयांच्या तावडीतून सोडतील अशी आशा धरू या. 

काल परवा  टाईम्स नाऊ चॅनेलवर अनुपम खेर यांची मुलाखत सुरू होती. ॲन्करने अनुपम खेर यांना प्रश्न विचारला की, आप हिरो बननेके काबील थे, तो भी आपको, हिरोका रोल क्यों नही मिला, इसकी वजह क्या हैं? यावर उत्तर देताना अनुपम खेर यांनी उत्तर दिले ते असे आहे, ' मैंने साईड ॲक्टरकी भुमिका को स्विकार करके यश, शौनत हासील की है | मुझे हिरोका रोल न मिलनेका दुःख भी नही है | निर्माता, दिग्दर्शकोंने दिया हुआ मौका और दर्शकोंने दिया हुआ प्यार यह मै संपत्ती मानता हूँ | " याचा अर्थ असा आहे की आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक क्षेत्रात Level of ambition and Level of Satisfaction यामधील सुवर्णमध्य गाठण्याची कला अवगत करणे आवश्यक असते. हा एक आजच्या युगाचा मंत्र आहे असे समजून पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी या गोष्टीने भारावलेल्या युवकांनी तो मंत्र सतत जपायला हवा असे वाटते. ॲन्करने पुढे सुशांतसिंगच्या मृत्युसंबंधी विचारले तेव्हा अनुपम खेर यांनी ' कुछ तो गडबड है ' असे सूचक विधान केले. सिनेजगतातील इतर कोणाची ही अधिकृत प्रतिक्रीया आली नाही. याचा अर्थ आपल्या येथील सिने-जगत पडद्यावर, किंवा अवार्ड फन्क्शन मधून दिसते तसे नाही याची खात्री पटते.

कुछ तो गडबड है असे अनुपम खेर यांनी म्हटले आहे तीच भावना सुशांतसिगच्या फॅन्सना आणि कुटुंबियांना वाटत आहे. रिया चक्रवर्ती नावाची मुलगी सुशांतच्या जीवनात कशी येते व नंतर तिला त्याच्या पैशाचा, व संपत्तीचा मोह कसा सुरू होतो, त्यातून तिने सुशांतच्या जुन्या नोकराना काढून टाकण्यापासून ते तांत्रीकाची मदत घेणे , सुशांतला विशिष्ट औषधाचा डोस देण्याची सुरूवात कशी केली इत्यादी संबंधीची जी माहिती बाहेर येते त्यावरून सुशांतसिंगचा मृत्यु हा आत्महत्येचा प्रकार नसावा असेच वाटते. गळफास लावून सुशांतसिंगने आत्महत्या केली असेल तर तशा प्रकारचे पुरावे दिसत नाही. ना तिथे पंख्याला जाडजूड दोर बांधलेला दिसला ना टेबल वा खूर्ची सापडली. सुशांतसिगच्या मानेमागील भागात खोलगट भाग दिसणे, गळफासामुळे जीभ बाहेर येते तसे झाल्याचे न दिसणे,  त्याच्या शवाची ॲब्मील्युन्स बदलणे, सुशांतसिंगचे शव नजिकच्या लिलावती हाॅस्पीटल ऐवजी कूपर हाॅस्पीटल जिथे ठाकरे घराण्याचा प्रभाव आहे तिथे पोस्टमार्टम होणे,  रिया चक्रवतीने महेश भटशी, सलमानखानच्या वकीलाशी केलेला संपर्क, सुशांतसिंगच्या डेथ सर्टिफीकेटमध्ये मृत्युची वेळ नसणे, सुशांतचा बँक बॅलन्स कमी होत जाणे अशा अनेक गोष्टी बाहेर येत आहेत, ज्यावरून सुशांतसिंगला पद्धतशीरपणे मारण्यात आले आहे, असा अंदाज बांधता येतो. सुशांतसिंगचा मृत्यू हे एक मोठे कथानक बनत आहे ज्यावरून पुढे मागे चित्रपट निघू शकेल. त्यात आदित्य ठाकरे व त्याचा मित्र दिपेश सावंत, रियाचा भाऊ, सॅम्युयल मिरांडा, दिशा सॅलीयाॅन इत्यादींच्या भूमिका वठवणारे  कलाकार शोधावे लागतील. जस जसा तपास पुढे जात राहील तशी नावें वाढण्याची शक्यता आहे. कारण सुशांतला रियाने सुरू केलेला औषधाचा डोस हा नोव्हेंबर २०१९ पासूनचा आहे असे ऐकीवात आहे. कदाचित हे प्रकरण आदित्य ठाकरेंना ठाऊक असू शकते, आणि कधीतरी हाताबाहेर जाऊ शकते हे ही आदित्य ठाकरेंना समजले असेल. त्यामूळेच या प्रकरणातून आदित्य ठाकरेंना वाचविण्यासाठी शरद पवारांशी संगनमत करून मविआ सरकार आकारास आणले गेले असावे. तेव्हाच आदित्याला मंत्रीपदाचे कवच देण्याचे निश्चीत केलेले असावे. बाकी बाळासाहेबांना शिवसेनेचा मुख्यमंत्री देण्याचे आश्वासन दिले होते हे कारण निव्वळ स्टंटच  होता.

आपल्या येथे जशा राजकारणात लाॅब्या आहेत तशाच, डावी विचारसरणी,  जिहादी, पाक पुरस्कृत  दशहतवाद, नक्षलवाद, इत्यादींचा  सिने-जगतावर  प्रभाव आहे. त्याची कारणें स्वातंत्र्यपुर्व काळापासून पुढे चालत आलेली आहेत. म्हणूनच बाॅलिवूडमधील चित्रपटात नेहमी नायकाचा शेजारी अल्पसंख्याक दिखविला जातो आणि तो नायकाच्या सगेसोयर्या पेक्षा उदार व मदतगार दाखविला जातो. विदेशी पैसा, हवालाद्वारे येणारा पैसा, काळा पैशाने आपला सिनेउद्योग त्रस्त आहे. कदाचित सुशांतसिंगच्या अकाली, अनैसर्गिक मृत्युच्या तपासातून बाॅलिवूड मधील काळी बाजू ऊजेडात येऊ शकेल. असे असले तरी आपल्या समाजाला सिनेनट व नट्या, क्रिकेटर्स तसेच राजकीय नेत्यांना सेलिब्रटी मानण्याची जी ओढ आहे तिच्यामूळे अनेक क्षेत्रात बदल करण्याचे सामर्थ्य असलेल्या समाजाची गती मंदावते, हे ही नाकारता येत नाही. त्यामूळे पैसा, प्रतिष्ठा, आणि प्रभुत्व यांच्या अमर्याद मोहाने माणुसकी विसरलेला समाजाचा वरच्या थराचे ( इलाईट ग्रुपचे) राज्य सर्वत्र सुरू राहते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये हेच घडत आलेले आहे. त्यातूनच सुशांतसिंगला एक तर संपविला असेल वा आत्महत्या करण्यासाठी उद्युक्त केले गेले असावे. त्या संबंधीचे सत्य न्यायालयाच्या निकालातून आपल्याला कळेल.  सिने-जगतातील मंडळी व राजकारणातील मंडळीचा परस्पर जो संबंध आहे, तो नवा नाही. पण त्यातून विलासराव देशमुखाचे मुख्यमंत्रीपद गेले होते, हा अलीकडचा इतिहास नजरे समोर येतो तेव्हा  शरद पवार यांच्या नातवाने (अजितदादा पवार यांचा मुलगा पार्थ ) सुरू केलेला संघर्ष व बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचा सिनेसृष्टीतला हाय प्रोफाईल पराक्रमातून महाराष्ट्र सरकार जे अशांत आहे ते कायम स्वरूपाच्या स्मशान शातंतेत जाईल अशी शक्यता वाढली आहे. 

सुशांतसिंग एक हुषार व आपल्या भावी जीवनाची रितसर नियोजन आखणारा कलावंत होता हे त्याच्या डायरीतील नोंदीतून समजते. त्याने शिक्षण क्षेत्रात काही विद्यार्थ्यांना मदत देऊन प्रोत्साहन दिले आहे.  त्यामूळे तो डीप्रेसनमध्ये जाण्याची शक्यता नव्हतीच हे पटते. त्यासाठी मानसशास्त्राचा अभ्यास असणे गरजेचे नाही. तो गुणी होता. फिल्म इंडस्ट्रीमध्ये आमुलाग्र बदल करण्याच्या प्रयत्नात होता हे सुशांतच्या डायरीतून स्पष्ट झाले आहे. त्याने डायरीत मांडलेल्या कल्पना ऐकल्या की तो एक दूरदृष्टीचा कलाकार होता हे मान्य करावे लागते. " कलेची निर्मिती कोठल्याही विषयाच्या संपूर्ण ज्ञानातून किंवा निव्वळ बौद्धिक जाणीवेतून  होत नाही. कलेचा उगम बुद्धीत नसून तो भावना व कल्पना यांच्या अपूर्व संगमात आहे. विख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईनने एके ठिकाणी म्हटले आहे की, Imagination is more important than knowledge.  ज्ञाना पेक्षा भावना व कल्पनाशक्ती महत्वाची असते. भावना कुठल्याही अनुभूतीच्या आत सळसळणार्या मानवी जीवनाचे दर्शन देत असते. म्हणूनच  Portrait in a Mirror या इंग्रजी  चित्रपटाचा नायक म्हणतो,
' धार्मिक मनुष्य जी मनःशांती संपादन करू शकतो, तो काही अष्टपैलू पंडीत असतो म्हणून नव्हे; तर त्याच्या अंगी उत्कट श्रद्धा असते म्हणून ! कलावंताचे तसेच असते. तो सर्वज्ञ असला पाहिजे असे मुळीच नाही. पण आपल्या कलादृष्टीद्वारे होणार्या जीवनदर्शनावर त्याची निष्ठा असली पाहिजे. ' अशी शुद्ध बावनकाशी निष्ठा असलेला सुशांतसिगच्या रूपात एक उमदा कलाकार आपण गमाविला आहे. त्यामूळे त्याच्या मृत्युबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत असल्याचे दिसत आहे. शेवटी जन्म आणि मृत्यु या दोन गोष्टींचा अधिकार ईश्वराने आपल्याकडे दिलेला नाही. पण त्यात सत्तेच्या, पैशाच्या, स्पर्धेच्या, अहंकाराच्या बळावर हस्तक्षेप करून कुटील कारस्थानाने  एखाद्याची जीवनयात्रा संपवितात ते नराधमच असतात. त्यांचे ते शौर्य नसून कौर्य आहे. त्यांना त्यांच्या पापाची किंमत मोजावी लागेलच अशी आशा व्यक्त करतो. आज सुप्रीम कोर्टाने सुशांतच्या मृत्यु संबंधीत सीबीआयला चौकशी करण्यासंबंधी याचीकेचा निकाल जाहीर केला व तो सुशांतसिगचे कुटुंबिय व फॅन्सच्या बाजूने दिला आहे. या केस मधील हा पहीला पाडाव होता तो जिंकला आहे. नंतर गुंतागुंताने भरलेली ही केस उभी राहील. आपल्याला फार वाट पाहावी लागेल हे ओघाने आलेच. सुशांतसिंगच्या कुटूंबियांना न्याय मिळो आणि सुशांतसिंगच्या आत्म्यास शांती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून या लेखाची समाप्ती करतो.
                             
                             हरि ओम ! 

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

राजकारणातले असामान्य असे लोकमान्य


आज शनिवार १ ऑगस्ट २०२० भारतीय असंतोषाचे जनक, स्वातंत्र्यसूर्य लोकमान्य टिळक यांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने लोकमान्य टिळकांचे अष्टपैलू गुण, प्रचंड विद्वत्ता, जाज्वल्य राष्ट्रभक्ती, समाजाबद्दलची त्यांची असीम आत्मियता,  राजकारण- शिक्षण- समाजकारण - प्रबोधन आणि धर्मजागरण इत्यादी क्षेत्रातील त्यांचे अतूल्य कार्य व ते करीत असताना स्थितप्रज्ञ वृत्तीने भोगलेला कारावास व हालअपेष्टा इत्यादी संबंधीच्या स्मृती जागविण्याचा उपक्रम अनेक स्वयंसेवी संघटना व संस्था तसेच वृत्तपत्रे, नियतकालीकांनी सुरू केला आहे. त्याबद्दल या सर्व मंडळीचे कौतूक करावे तितके कमी आहे. आज आपला देश कोरोना रूपी नागाच्या विळखात अडकल्यामूळे आपली अर्थव्यवस्था जी कोलमडली आहे, अशा वेळी, लोकमान्य टिळकांचा स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण, हा चतुःसुत्रीचा मंत्र आणि त्यांनी दिलेला
पुनश्च हरी ओम असा स्पुर्तीदायक नारा निश्चीतच देशाला आत्मनिर्भराच्या दिशेने वाटचाल करण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो. या उपक्रमात मी ही सामील व्हावं असा आग्रह माझे परम मित्र श्री प्रमोदजी  बापट यांनी केला. मी तात्काळ होकार दिला खरा पण लागलीच जाणवू लागले की,  लोकमान्य टिळकांच्या चरीत्रातील एखादा प्रसंग लिहणे म्हणजे टिटवीने आपल्या चोचीने महासागराचे जल मापन करण्यासारखे आहे. पण त्यातून एका युगपुरूषाच्या स्मारकाच्या चरणी लीन झाल्याचे समाधान मिळणार आहे म्हणून हा लेख प्रपंच.

आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येक नेत्याचे , क्रान्तीकारकाचे योगदान बहुमूल्य आहे. म्हणूनच आपण सर्व स्वातंत्र्यसेनानींची जंयती वा पुण्यतिथी साजरी करतो. आचार्य अत्रे हे एक उत्तुंग व अष्टपैलू व्यक्तीमत्व. त्यांनी आपल्या एका पुस्तकात विद्यार्थी दशेतील आठवणी सांगताना लिहले आहे की  "आम्हां मित्रामध्यें एक असा बोली करार ठरला होता की आमच्यापैकी ज्याला कोणाला लोकमान्य टिळकांचे दर्शन झाले तर त्याने सर्वांना चहा द्यावा. आचार्य अत्रेंना लोकमान्य टिळकांचे दर्शन झाले तेव्हा त्यांनी मित्रांना चहा दिला होता. अत्रेंनी पुढे लिहले होते, '' मला तर एक दिवस लोकमान्य टिळकांचे दर्शन इतक्या जवळून झाले होते की मी त्यांच्या करकरीत उपरणाला हाताने स्पर्श केला तेव्हा मला स्वर्ग दोन बोटे उरला होता." लोकमान्य टिळकांच्यात असलेल्या तेजाचे आचार्य अत्रेंना विद्यार्थी दशेपासून अप्रूप वाटत असे. ते आपल्या त्याच पुस्तकात लोकमान्य टिळकांच्या अंत्ययात्रेचे वर्णन करताना म्हणतात, " लोकमान्य टिळकांच्या अंत्ययात्रेला लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेले लोकांचे चेहरे जणू आपला आधार हरवल्यासारखे सुतकी दिसत होते." पुढे ते स्पष्टपणे मांडतात की," त्यावेळी सडसडीत बांध्याचे मोहनदास करमचंद गांधी राष्ट्रीय सभेचा नेता म्हणून भाषणाला उभे राहीले, तेव्हा लोकमान्य टिळकांच्या इतकं ओजस्वी व तेजस्वी नेतृत्व राष्ट्रीय सभेला पुढे मिळेल अशी आशा मावळली." अत्र्यांनी लोकमान्य टिळकांच्या मृत्युचे वर्णन ' स्वातंत्र्यसूर्याचा अस्त ' अशा शब्दात केले आहे. आपल्या देशाच्या अर्वाचीन इतिहासात सूर्याची उपमा प्रथमच मिळालेली अशी राजकरणात कार्यरत असलेली पहिली विभूती लोकमान्य टिळक होय. या बाबत दूमत होऊ नये. भारतीय जनता लोकमान्य टिळकांना दैवत मानत असत. याचे कारण ते जनतेला आपले दैवत मानत असत. आचार्य अत्र्यांनी लोकमान्य टिळकांचे वर्णन भारताचे स्वातंत्र्यसूर्य असे केले ते उचीतच होते. वस्तूतः सूर्य कधी मावळत नसतो. आपली पृथ्वी स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरत असते म्हणून दिवस व रात्र चे चक्र सुरू असते. सूर्यनारायण अनादि काळापासून तेजाने तळपळत आहे. तो जीवसृष्टीला आपल्या प्रकाशातून जन्म देतो पण त्या सूर्याला त्याबद्दल उपकाराची भावना शिवत नाही. तो आपल्या प्रकाश देण्याच्या कर्मात इतका समरस होतो की तो प्रकाश देतो हे ही विसरून गेलेला आहे. आपला स्वतःचा मूलगा प्लेग मध्ये दगावला असताना, सारं दुःख विसरून प्लेगच्या साथीने पछाडलेल्या समाजबांधवांच्या सेवेसाठी लोकमान्य टिळक दिवसरात्र अविरतपणे झटत राहीले हे कसले द्योतक मानावे? असे सेवाव्रत राजकारणात दिसते तरी का? महाराष्ट्रात कोरोनाचे आक्रमण तीव्र होत असताना आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरें  घरातून बाहेर ही पडत नाहीत पण सल्ला देण्याचे तेवढे काम नेटाने करीत आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत पक्षांतर्गत लढाईचा तमाशा मांडत आहेत. रशियातील श्री निकीता ख्रुश्चेव्ह पक्के खूनशी राजकारणी पण त्यांनी एके ठिकाणी  म्हटले आहे, ' Politicians are the same all over. They promise to build a bridge even where there is no river. '

लोकमान्य टिळक राजकारणात होते पण  ते राजकारणी नव्हते असे सतत वाटते. स्वराज्य हे त्यांचे ध्येय होते. ते आपल्या ध्येयात इतके समरस झाले की ते ध्येयच स्वराज्य लढ्यातील त्यांचे गुरू ठरले असावेत. त्यांनी आपल्या जीवनात जे उद्योग केले ते राजकीय पटलावर केले असे वाटत असले तरी मुख्यतः स्वातंत्र्यलढ्यातले योद्धा म्हणूनच त्यांनी आपले सारे आयुष्य वेचले. स्वामी विवेकानंदांना योद्धा संन्यासी असे गौरविले जाते तसेच लोकमान्य टिळक म्हणजे प्रपंच थाटून ही परामर्थ करणारे संन्यासी योद्धाच की. या ठिकाणी सुप्रसिद्ध समाजसेविका भारती ठाकूर यांनी आपल्या नर्मदा परिक्रमा या पुस्तकात भारतीय संस्कृतीसंबंधी यथोचित वर्णन केल्याची आठवण होते. त्या लिहीतात, " भारतीय संस्कृती जीवन परायण आहे. समग्र जीवनाचा बिनशर्त आणि संपूर्ण स्विकार हे भारतीय संस्कृतीचं मूलतत्व आहे. त्यात पलायानवाद नाही. घरदार सोडून, जबाबदारी सोडून अरण्यात जा, गिरीकंदरात जा आणि मग त्या जीवनात सार्थकता आहे असा त्याचा अर्थ नाही. अध्यात्म म्हणजे तरी काय? जाणलेलं सत्य जगणं म्हणजे अध्यात्म. जगण्याचं कर्म हीच आत्मसाधना. रोजचं जीवन हेच साधनेचं क्षेत्र आणि तेच खरे साधनेचे क्षण. प्रपंचात राहून परमार्थ करणं हीच  खरी तपस्या." लोकमान्य टिळकांचा प्रपंच देशभर व्यापला होता. प्रपंचात राजकारणाला स्थान नसते. फक्त कर्म हेच जीवन  असते. देशकार्यासाठी वाट्याला आलेल्या कारावासातही त्यांची कर्मभक्ती जरापण खंडीत झाली नाही. त्यांच्यातील असामान्य स्थितप्रज्ञ वृत्तीतून ते गीतारहस्य सारखा महान ग्रंथ लिहू शकले असावेत असे वाटते. महात्मा गांधीजींनी गीतारहस्य या ग्रंथावर अभिप्राय देताना म्हटले की " गीतेवरील टिळकांची टिका हीच त्यांचे शाश्वत स्मारक होय. स्वराज्याची लढाई फत्ते झाल्यानंतरही तें टिकूनच राहील. तेव्हा देखील टिळकांचे निष्कलंक चारित्र्य आणि गीतेवरील त्यांची महान टिका यामूळे त्यांची स्मृती चिरप्रेरक राहील. त्यांच्या हयातींत किंवा आता सुद्धा टिळकापेक्षा अधिक व्यापक किंवा सखोल शास्त्रज्ञान कोणाचेंही सापडणे शक्य नाही. गीता आणि वेद यांतून निर्माण होणार्या प्रश्नांचे टिळकांनी केले त्यापेक्षा जास्त व्यवस्थित संशोधन कोणींही केले नाही. अगाध विद्वत्ता, अमर्याद स्वार्थत्याग व आजन्म देशसेवा यामूळे जनता जनार्दनाच्या हृदयात टिळकांनी अद्वितीय स्थान मिळविले आहे."

लोकमान्य टिळकांच्या चरीत्रात असे अनेक दाखले मिळू शकतात की त्यावरून त्यांच्या जीवनाचे ध्येय फक्त राष्ट्रसेवा होते. म्हणूनच ते सच्चे राष्ट्रवादी ठरले. लेखाच्या विस्तारभयाने सारेच दाखले इथे देता येत नाहीत. पण त्यांच्या विद्यार्थी दशेपासून ते मृत्युपर्यंतचा सारा प्रवास राष्ट्रभक्तीरूपी ज्योतीच्या प्रकाशाने झळाळलेला होता. त्यांच्यी बालवयात दिसून आलेली कुशाग्र बुद्धी आणि करारीपणा, स्थंभीत करणारा होता.  विद्यार्थी दशेतच बाळ गंगाधर टिळक आपल्या वर्गशिक्षकाला ठणकावून उत्तर देतो '' मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही व मी मार खाणार नाही. '' असे खणखणीत उत्तर देणारा विद्यार्थी ब्रिटीश राजवटीला हादरून सोडणार हे नियतीनेच ठरविले होते. बाळ मॅट्रीकला असताना त्यांच्या वडीलांचे निधन झाले. एवढा मोठा आघात पण बाळ गांगरला नाही. शांतपणे त्याने आपला अभ्यास चालू ठेवला. मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण झाला. " माझी शिकण्याची इच्छा होती पण ती तशीच राहीली. पण तुला खुप शिकलेला पाहून मी ती भागविणार आहे. " आपल्या  पिताश्रीचे हे बोल बाळच्या अंतःरकरणात सतत प्रेरणा देत होते. म्हणून आपल्या नातेवाईकांचा "नोकरी कर, घर व संसार सांभाळ " असा उपदेश पाळत नव्हता. तो स्पष्टपणे उत्तर देत होता, " मी स्काॅलरशिप मिळविन, व उच्च शिक्षण घेईनच घेईन. एके काळी आपल्या देशात सोन्याचा धूर निघत होता. दुधातुपाच्या नद्या वाहात होत्या. तिथे आज अठरा विश्वे दारिद्य्र आले आहे. आणि साहेबांच्या इंग्लंडात जिथे लोखंड आणि दगडी कोळसा या पलीकडे काहीही पिकत नाही, तिथे आज भरभराट व समृद्धी आहे. ज्यांनी ही स्थिती केली त्यांची मी चाकरी करू म्हणता? आपल्या आईचे रक्त पिणार्या दुष्ट नराधमांची मी नोकरी करू म्हणता? छेः ! ते कदापि शक्य नाही. मला त्यांना हाकलून द्यावयाचे आहे. आपल्या भारतमातेला मला स्वतंत्र करावयाचे आहे. तिच्या सेवेत मला आयुष्य वेचावयाचे आहे. चाकरी करीन ती फक्त भारतमातेची करीन, विद्यादेवीची करीन. पोटासाठी शत्रूची चाकरी करीन अशी कधी कल्पनाही मनात आणू नका. " बाळचे असे उद्गार ऐकून त्याला उपदेश करायला आलेले नातेवाईक हळूच काढता पाय घेत. पण जाताना आपआपसांत बोलत होते, 'पोर छांदिष्ट आहे, कोणाचे ऐकणार नाही.' ते खरे हो, पण या अचाट कल्पना ! कोठे आपण आणि कोठे इंग्रज ! केवढे त्यांचे साम्राज्य ! काय अचाट त्यांचे सामर्थ्य ! पण हे  मात्र खरे, एवढ्या वयात केवढी ही उंच झेप या बाळची ! बोलण्यात किती कणखरपणा ! जशी काही सिंहगर्जनाच !

मॅट्रीकची परीक्षा नुकताच उत्तीर्ण झालेला हा बाळ राष्ट्रीय शिक्षणाच्या शाळा काढणार, स्वराज्यसाठी समाजाची एकता स्थापना करण्यासाठी धर्म जागृती करणार, स्वदेशीची चळवळ उभारणार, युवकांना प्रेरणा देणार, ब्रिटीश सत्तेशी झुंजणार, शेतकरी, कष्टकारी, मजूर, गोरगरीबांना मार्गदर्शन करणार ही सर्व कार्ये नियतीने टिळकांकडून करून घ्यावयाचे ठरविलेले होते. म्हणूनच नियतीने  साहित्य क्षेत्रात व नीतीशास्त्रात जागतिक पातळीवरचे अत्युच्च स्थान  लोकमान्य टिळकांना पटकाविण्यापासून वंचित केले असावे अशी अंतःकरणातील भावना गीतारहस्य ग्रंथावरील अभिप्राय देताना महर्षी  योगी अरविंद यांनी व्यक्त केलेली आहे. त्यावरूनच असे वाटते की  लोकमान्य टिळक राजकारणात होते पण राजकारणी नव्हते. ते आसक्ती आणि विरक्ती मधील परमावधी गाठणारे युगपुरूष होते.

रॅन्डसाहेबांच्या खूनानंतर चहूकडे नाकेबंदी झाली. पटाईत गुप्त पोलीस बोलाविण्यात आले. कसून शोध सुरू झाला पण मारेकरी सापडले नाहीत. तेव्हा सरकारने लोकांचा छळ वाढविला. धरपकड, धमक्या, निरनिराळ्या प्रकारें दडपशाही करायला सुरूवात केली. तेव्हा टिळकांनी केसरीत "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का" असा अग्रलेख लिहून भारतीय जनतेची बाजू अगदी सरळ आणि स्पष्टपणे मांडली. पाठोपाठ " राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे " असा दुसरा लेख लिहिला. आपल्याला कारावास भोगावा लागला तरी त्यांना पर्वा नव्हती. त्यांना भारतीय जनतेवरील अत्याचार पाहवत नव्हता. लेखणी हे शस्त्र वापरणारा अर्वाचीनच नव्हे तर भारताच्या प्राचीन इतिहासातही लोकमान्य टिळकासारखा योद्धा नसावा असे वाटते.

छत्रपती शिवाजी महाराज हे टिळकांचे प्रेरणास्थान होते. त्यामूळे त्यांनी ब्रिटीश सरकार विरूद्धच्या ज्या राजकीय चाली खेळल्या त्यात  निर्भयता दिसत होती. राजकीय किंवा राजकारणातील व्यक्ती बहूतांश आपल्या प्रतिमेला जपतात. म्हणजे एका परिने भित्रे असतात. टिळकांनी, १८९७ च्या सुमारास  केसरीच्या एका अंकात " शिवाजी उद्गार " या नावाची एक कविता प्रसिद्ध केली होती. 
"स्वर्गातून शिवाजी महाराज भारतातील स्थिती पाहात आहेत. आपण पेरलेले गुण त्यांना कुठेच दिसत नाहीत. सगळीकडे दुर्गुणच दुर्गुण दिसतात. हे पाहून त्यांना फार दुःख होते. इंग्रजांना ही ते सांगतात की, मी सुरत लुटली तेव्हा तुम्हाला धक्का लावला नव्हता याची जरा आठवण ठेवा." असा त्या कवितेतील आशय होता. त्याच अंकात शिवाजी उत्सवातील, टिळकांच्या भाषणातले एक वाक्य लिहले होते की, " म्लेच्छांना येथे राज्य करण्याचा ताम्रपट कोणी दिलेला नाही." सरकारने टिळकावर राजद्रोहाचा आरोप ठेवला. टिळकांच्या काही मित्रांनी माफी मागण्याची कल्पना मांडली. टिळकांनी स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले," राज्ये फुकट मिळत नसतात. त्या करीता बलिदान करावे लागते." टिळकांच्या जाज्वल्य राष्ट्रभक्तीतून साकार झालेले अग्रलेख लोकांच्या हृदयाला साद घालीत असत. देशाच्या सर्व प्रातांत टिळकांच्या भाषणांचा कार्याचा प्रभाव पडत गेला. कुशाग्र बुद्धीचे टिळक जनतेशी संवाद वा भाषण करताना अंतःकरणातून बोलत असावेत. त्यांची ओघवती हृदयस्पर्शी भाषेतील मातृभूमीची भक्ती व ब्रिटीश सरकारवर कडाडून प्रहार करण्याच्या पद्धतीतून अनेक युवकांनी टिळकांनी स्वराज्यरूपी मांडलेल्या अग्नीकूंडात उडी मारली आणि सशस्त्र क्रान्तीचा मार्ग स्विकारून यश ही मिळविले. स्वराज्य, स्वदेशी, विदेशी मालावर बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुःसुत्रीचे देशभर जाळे विणले गेले. बंगालच्या फाळणीविरूद्ध त्यांनी केलेली जागृती इतकी ताकदवान ठरली की सरकारला बंगालची फाळणी रदबादल करावी लागली. टिळक बोले देश डोले अशी स्थिती देशभर झाली होती. जनतेच्या सुखदुःखात ही ते सहभागी होत असत. कामगार असो, मजूर असो, शेतकरी असो की छोटा व्यापारी जिथे जिथे सरकारने अन्याय केला असेल तर ते केवळ अग्रलेख लिहून थांबत नसत तर ते प्रत्यक्ष दुःख निवारण्यासाठी लोकात जात असत. म्हणून त्यांना तेल्याबोळाचे टिळक अशी उपाधी मिळाली. म्हणूनच साम्यवाद्यांनाही टिळक आपलेसे वाटत होते.

लोकमान्य टिळक धर्मभिमानी होते. पण हिंदू समाजातील दोष नाहीसे व्हावेत या मतावर ही ते ठाम होते. अन्यथा त्यांची आगरकरांशी इतकी घनिष्ठ मैत्री जडलीच नसती. राजकीय सत्ता पदरात पाडून घेतल्याशिवाय सामाजिक सुधारणा होतील पण त्या स्थायी स्वरूपाच्या ठरतील का या बद्दल ते सांशक असावेत. दुसरे कारण असे होते की ब्रिटीश सरकार आपली सत्ता मजबूत करण्यासाठी फोडा आणि झोडा हे तंत्र वापरणार हे टिळकांच्या लक्षात आले होते. स्वराज्य प्राप्ती हेच ध्येय जनतेपुढे ठेवले तर सारा भारतीय समाज लौकर एकजिनसी होऊ शकतो असा दुर्दम्य आशावाद त्यांच्याकडे होता. ते खर्या अर्थाने लोकमान्य असल्याने जनतेची नाडी तेच सर्वात चांगल्या रितीने ओळखत होते. इंग्रज सरकारला हे माहीत होते म्हणूनच त्यांना कारावास इतर काॅग्रेसच्या पुढार्यांपेक्षा अधिक काळ भोगावा लागला. त्यांना काही सवलती इंग्रज सरकारने दिल्या पण तो पर्यंत त्यांची तब्येत ढासळली होती. म्हणून गोर्या लोकांबद्दल चांगले मत मांडणार्यांनी एक सत्य लक्षात घ्यावयास हवे होते की पहील्या महायुद्धानंतर इंगलंडच्या अर्थव्यवस्थेला झटके बसले होतेच. त्यातच लोकमान्य टिळकांचा फार मोठा प्रभाव क्रान्तीकारकांवर होता. सारे गोरे अधिकारी लढवय्ये व धाडसी होतेच असे नाही. क्रान्तीकारी आपला गेम करू शकतात या भितीने इंग्रज अधिकारी त्रस्त झालेले होतेच.

इतिहासाचा आढावा घेतल्यास असे दिसून येते की, १९०५-०७ च्या काळात टिळकांनी कलकत्यात केलेल्या भाषणात काॅग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष दादाभाई नवरोजींना ही इंग्रजासंबंधी भ्रमनिरास झाला होता असे म्हटले होते. इतकेच नव्हे तर दादाभाई सारख्या नेमस्त नेत्यांने  ' आपण परस्पर गळे कापणार नाहीत पण हे परकीय आपले गळे कापणार आहेत. आपला सत्यनाश होणार अशी निराशजनक भाषा त्यांच्या मुखातून येऊ लागली ' हे ही टिळकांनी आपल्या भाषणात विशद केलं. याच सभेत टिळकांनी एक सत्य घटना ऐकवली. महाभारतात पांडवानी कृष्णाला एक तडजोड घडवून आणण्यासाठी पाठविले. पण पांडव व कौरव दोघेही तडजोड अयशस्वी झाली तर परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपआपली शक्ती संघटीत करीत होते.' यालाच राजकारण म्हणतात. तुमची मागणी सरकारने फेटाळली तर तुम्ही संघर्ष करण्यासाठी तयारीत आहात काय? तशी तुमची तयारी असेल तर तुमची मागणी नाकारली जाणार नाही. पण संघर्षाची तयारी ठेवली नाही तर मात्र तुमची मागणी नाकारली जाईल यात काहीच शंका नाही- कदाचित कायमचीच. आपल्याकडे काही शस्त्रे नाहीत. पण असण्याची गरज ही नाही. आपल्याकडे अस्त्र आहे. चांगले राजकीय अस्त्र. ते म्हणजे बहिष्कार. लोकमान्य टिळकांची दूरदृष्टी व राष्ट्रभक्ती असामान्य होती. त्यांच्या त्या भाषणाने समाज प्रभावित झाला होता. म्हणून राष्ट्रीय सभेतील जहाल गटाचा म्हणजे लोकमान्य टिळकांचा मार्ग देशासाठी अधिक भला ठरला असता, असे अनेक इतिहासकारांनी व राजकीय अभ्यासकांनी आपले मत नोंदविले आहे.

लोकमान्यांच्या काळात हिंदूना जातीय मानण्यात आले नव्हते. त्यामूळे त्यांनी शिवजयंती उत्सव व गणोशोत्सव राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरे करण्यास प्रारंभ झाला. त्यांनी लखनौ करार करण्यात चूक केली असे काही लोक मानतात. पण त्यावेळी त्यांनी हे स्पष्ट सांगितले होते की, " यापेक्षा काहीही अधिक दिले जाणार नाही. तो करार मुस्लीमांनी नाही पाळला तर त्यावर कारवाई करायला हवी." अशी जाणीव टिळकांनी त्यांना दिली होती. पण दुर्दैवाने लोकमान्य टिळकांची इहयात्रा संपली,  तशी स्वातंत्र्यलढ्याची ज्योत ही क्षीण झाली. पुढचा सारा इतिहास आपण सारे जाणतो. जगभरात निर्माण होत असलेल्या विविध राज्यप्रणाली व विचारधाराची लागण आपल्या देशाला झाल्याने विविध राजकीय पक्ष अस्तित्वात आले. प्रांतीय बोर्डावरील निवडणूका व अंतर्गत स्पर्धेमूळे ब्रिटीश सरकारला फोडा व झोडा ही नीती अवलंबविणे अधिक सोपे झाले असे दिसते.

गांधींजीच्या ठायी महात्मा होण्यासारखी वैशिष्टे होती. पण त्यांच्याकडून भगवद् गीतेचा चुकीचा अर्थ लावला गेला असावा. त्यातून  शत्रुमित्रसमभावाच्या नावाखाली मुस्लीमांचे तुष्टीकरण अथवा संतुष्टीकरण सुरू झाले. मग मजल देशविभाजनापर्यंत गेले. मुस्लीमाची तुष्टीकरण करण्याची परंपरा स्वातंत्र्यानंतर ही सुरूच राहिली. इथे हे नमूद करावेसे वाटते की प्रत्यक्ष महात्मा गांधीजींनी (संदर्भ दिल्ली डायरी २६-९-१९४७ ) म्हटले आहे की, जर पाकिस्तानला स्वतःची चूक समजून सुधारणा करावयाची नसेल तर युद्धाशिवाय दुसरा मार्ग नाही.

मुस्लीम राष्ट्रनिष्ठ नेत्यांस महत्व दिल्यास व अराष्ट्रीय प्रवृत्तीच्या नेत्यांस नगण्य केले गेल्यास मुस्लीम समाज हिंदु संस्कृतीत सामावला जाईल . ज्या संस्कृतीने शक, हुण, कुशान या आक्रमकांनाही सामावून घेतले त्या संस्कृतीस आपल्याच समाजातील बाटलेल्या अथवा बाटवलेल्या हिंदुच्या वंशजांस सामावून घेणे बिलकूल अशक्य नाही. केवळ हिंदु संस्कृतीचे कैवारी सत्तेवर आल्यास होऊ शकते असे डाॅ वि वा देशपांडेनी आपल्या राष्ट्रधर्म जागवावा या पुस्तकात शेवटी निष्कर्षाच्या प्रकरणात आशावाद व्यक्त केला आहे.  केंद्रात आता राष्ट्रवादी विचाराचे भाजपाचे सरकार आहे म्हणून डाॅ वि वा देशपांडेचा आशावाद खरा ठरू शकेल अशी अपेक्षा ठेवू या. 

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...