बुधवार, २५ मार्च, २०२०

गुढी पाडवा-- आपल्या संस्कृतीमधील गोडवा



आज आपल्या नववर्षाचा पहिला दिवस. सर्वप्रथम आपल्या सर्वांना नवीन वर्ष सुखाचे आणि सुरक्षेचे जावो अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो.  सन २०१७ च्या गुढी पाडव्याला 'प्रतिपदा संवादाची' असा लेख लिहून ब्लाॅगवर आपल्याशी संवाद साधण्यास सुरूवात केली. काल तीन वर्षे पुर्ण झाली. गेल्या तीन वर्षात विविध विषयावर एकूण ११७ लेखांद्वारें मी आपल्याशी संवाद साधला. सन १९७५ च्या आणिबाणी विरूद्धाच्या संघर्षात मी ओढलो गेलो म्हणून देशातील राजकीय स्थिती व व्यवस्था या विषयावरील लेखांची संख्या अधिक झाली हे मी मागे एका लेखात मान्य केले आहे.  आपण खपवूनही घेतले त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. यंदाचा आपला होळीचा सण आनंदाने साजरा झाला. चीनमध्ये कोरोना व्हायरसने काही लोक मृत्यूमूखी पडले अशी बातमी ऐकली होती पण तो व्हायरस जगभर पसरेल व आपल्या दाराशी इतक्या झपाट्याने येईल अशी पुसटशी कल्पनाही आपण केली नव्हती. चीनमध्ये काय होत असते याबाबत सारं जग संभ्रमात असते. साहाजिकच आपण सार्यांनी फार गांभीर्याने घेतले नाही. स्वाईन फ्य्लू, बर्ड फ्ल्यू आले आणि गेले. तशाच पद्धतीने कोरोना व्हायरस जाईल अशी आपली समजूत होती. होळीचा सण साजरा करताना आपल्याला नवीन वर्षाचे स्वागत घरात बसून करावे लागेल असे मनात ही आले नव्हते.

आज संपूर्ण देशभर संचारबंदी आहे. कशासाठी तर, कोरोनो व्हायरसचा पराभव करण्यासाठी. म्हणजेच आपल्या जीवावर आलेले संकट परतावून लावायचे आहे. मग जी मंडळी कोरोना व्हायरसशी प्रत्यक्ष रणागंणात लढत आहेत त्यांना आपल्या वागण्याने, बोलण्याने, लिहीण्याने अडथळा निर्माण करणे हा एक प्रकारचा देशद्रोह ठरेल. गुढी पाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली असे आपले धर्मशास्त्र सांगते. याच दिवशी भगवान श्रीरामाचा रावणावरील विजय साजरा करण्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी घरोघरी गुढी उभारण्याची परपंरा सुरू झाली असे मानले जाते. असे म्हटले जाते की  " गुढी पाडव्याच्या दिवासापासून ते श्रीराम नवमीपर्यंत रोज चिमूटभर विभूती हातात घेऊन वा उदबत्ती लावून अकरा वेळा रामरक्षा पठण केल्यावर ती रामरक्षा सिद्ध होते. ती विभूती एक डब्यात साठवावी. ती रोज आपल्या कंठात लावली की भगवान श्रीराम सर्व संकटात आपले रक्षण करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिथे श्रीरामाच्या नावाचा जप वा स्तवन होत असते तिथे संकटमोचन रघुपतीप्रिय भक्त हनुमान ही उपस्थित राहातात." आजपासून देशात संचारबंदी आहे, त्यामूळे आपल्या दिनचर्यात बदल होणार आहे. त्यातून आपल्याला नैराश्य येऊ शकते. तर दुसर्या बाजूला कोरोनो व्हायसच्या फैलावाची भिती आहे. अशा वेळी श्रीरामरक्षाचा हा उपाय करावा. फक्त रामरक्षाचाच उपाय करावा असे नाही. आपण आपल्या इष्ट देवतेचा जप केला तरी आपल्यावर येणारे संकट टळते.  शिवाय या संचारबंदीच्या काळात येणारे नैराश्य नष्ट होऊन आपल्या आत्मिक शक्तीत वाढ होते. अशा प्रकारे रामरक्षा पठणाच्या वा इष्टदेवतेचा जपाच्या  प्रयोगावर कोणी टिका केली तरी त्याकडे दुर्लक्ष करावे. भगवान गौतम बुद्धाच्या चरीत्रातील एक कथा आपल्या समोर मांडतो. ती वाचल्यावर टिकाकांरावर दुर्लक्ष करण्याचे बळ आपल्यात निर्माण होते.

एकदा भगवान गौतम बुद्धांचे शिष्यगण भिक्षा मागत असताना एका इसमाने त्यांच्या भिक्षा मागण्याच्या वृत्तीवर ताशोरे ओढले. त्याने भिक्षा तर दिलीच नाही पण बुद्धांच्या त्या शिष्यगणांवर शिव्या-शापाचा वर्षाव केला. संध्याकाळी ते आपल्या आश्रमात परतल्यानंतर त्यातील एका शिष्याने भगवान बुद्धाकडे त्या इसमाची तक्रार केली व म्हटले,  " गुरूवर्य उद्या तुम्ही आमच्या सोबत या आणि त्या इसमाचा कडक शब्दात समाचार घ्यावा अशी माझी इच्छा आहे. भगवान बुद्ध उत्तरले, " बाळा, उद्याची बात उद्या करू या. पण हा विषय डोक्यातून काढू टाक आणि मला उद्या रात्रीच्या भोजनाच्या वेळे पर्यंत याबाबत काही विचारावयाचे नाही. त्या शिष्याने ती आज्ञा स्विकारली.  दुसरा दिवस उगवला, गौतम बुद्ध स्वतः आपल्या शिष्यांसोबत भिक्षा मागायला निघाले. परंतु त्यांनी भिक्षेसाठी कालच्या मार्गाच्या विरूद्ध दिशाचा मार्ग पत्करला. दुपारचे साडेबारा वाजले तेव्हा एका झाडाखाली मिळालेली भिक्षा शिजवून जेवावयास बसले. बुद्धांनी काल ज्या शिष्याने एका इसमाची तक्रार केली होती त्याला आपल्या जवळ बसावयास सांगितले. जेवण झाले. थोडीशी वामकुक्षी करून पुन्हा भिक्षेसाठी बुद्ध व शिष्यगण निघाले पुढील प्रवासाला. पण निघताना बुद्धांचे कमंडलू जेवावयास बसलेल्या जागेवरच राहीले होते. बुद्धांनी विचारले, ' ते कमंडलू कोणाचे राहीले ? ' बुद्धांच्या बाजूला बसलेल्या त्याच तक्रार बहाद्दूर शिष्याने, त्वरीत उत्तर दिले, ' भगवान ते कमंडलू आपले आहे.' बुद्ध म्हणाले, ' असे  होय ! मग ते घे सोबत आणि ठेव तुझ्याकडेच.' संध्याकाळच्या पाचच्या सुमारास पुन्हा एका झाडाखाली शिष्यगणासोबत बुद्ध विश्रामास बसले. एक बोधकथा ऐकिवली आणि निघाले आपल्या प्रवासास. त्यावेळी बुद्ध आपले कमंडलू घ्यावयाचे विसरले. पुन्हा त्यांनी प्रश्न केला,  'ते कमंडलू कोणाचे राहिले आहे? ' त्याच शिष्याने उत्तर दिले, गुरूवर्य ते आपलेच कमंडलू आहे. ' त्यावर गौतम बुद्ध त्याला म्हणाले, ' बर ते घे सोबत आणि कायमचे तुझ्याकडेच ठेव.' रात्री भोजनास बसताना पुन्हा त्या शिष्याला आपल्या शेजारी बसविले. भोजन झाल्यानंतर बुद्धांनी विचारले, माझे कंमडलू कोठे आहे, त्यावर त्याच शिष्याने उत्तर दिले, तुमचे कमंडलू माझ्याकडे आहे. तुम्ही संध्याकाळी मला देऊन टाकले आहे ना?' बुद्ध शांततेने म्हणाले, बाळा ते कमंडलू मी तुला दिले म्हणून ते कमंडलू तुझे झाले की नाही ? शिष्याने उत्तर दिले, ' हो गुरूवर्य ' . बुद्ध पुढे म्हणाले, ' त्या इसमाने काल ज्या शिव्या दिल्या होत्या, त्या मला दिल्या होत्या. पण मी त्या घेतल्या नाहीत. म्हणून त्या माझ्या झाल्या नाहीत. काल त्या इसमाने दिलेल्या शिव्या तु घेतल्या म्हणून तुझ्या मनात द्वेष उत्पन्न झाला आहे. ' त्या शिष्याने गुरूवर्याचे पाय धरले व क्षमा मागितली.  क्षमा मागण्याची वेळ येऊ नये अशी आपली वृत्ती व वाणी असावी. क्षमा करण्याचे बळ आपल्यात निर्माण होईल असे कार्य करावे. कारण आपल्या धरणीमातेच्या अनेक नावापैकी एक नाव आहे 'क्षमा.' हाच या कथेचा बोध असावा.

वस्तुतः देवाचा जप वा स्त्रोत्र म्हणण्याने आपल्या भोवती असणार्या नकारात्मक उर्जाचे वलय कापले जाते आणि आपल्या भोवती एक सकारात्मक उर्जाचे वलय तयार होते. विश्वात धन आणि ऋण उर्जा आहेत. हा आधूनिक विज्ञानाचा शोध आहे. आंब्याच्या झाडावरून कोकीळेची सनई वाजत असते तर दुसर्या बाजूला घुबड, वटवाघुळे इत्यादी पक्षी आपल्या कर्कश,  खेसकण्याच्या आवाजाने आपल्यात भिती व नैराश्य निर्माण करतात.  तसे कर्कश खेसकणे आपण आजच्या मुहूर्तावर सोडून देऊ या. आपल्या ऋषीमुनींनी सृष्टीची एक व्याख्या दिली आहे. 
' जी सृजन होते ती सृष्टी '. अशी व्याख्या देऊन ऋषीमुनीं थांबले नाहीत तर एक सुसंकृत समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. ऋषीमुनींनी दिलेली शिकवण आपल्या मेंदुतून  हृदयांत विसावू द्यावी. म्हणजे आपल्या संस्कृतीवर, देवदैवातांच्या मंदिरा बाबत टिका करण्यार्यांचे हृदय परिवर्तन होवो की न होवो पण 
' हे विश्वची माझे घर ' असे ज्यांनी मानले आणि आपल्या ज्ञानाने व मृदु स्वभावाने आपल्या जीवनात ते प्रत्यक्षात उतरविले अशा माऊलींची कृपा होऊन आपल्या हृदयात सदभावाचा झरा निर्माण निश्चितच होईल असे वाटते. अनेक वनस्पतीशास्त्रांच्या अभ्यासकांनी फळे, धान्य, भाजीपालांच्या रोपट्याची मशागत करतेवेळी उपनिषदांमधील प्रार्थना वा आपल्या संत साहित्यातील  अंभग वाचले तर त्यावेळी निर्माण होणारे फळे, धान्य व भाजीपाल्यात कुठच्याही प्रकारचे बाधक जीवाणू प्रवेश करीत नाहीत हे सत्य आहे असे मानले आहे. म्हणजे दुधी , वांगी, भेडी, अशा भाज्या व आंबा, फणस, संपरचंद, पपई इत्यादी फळे नासकी निघत नाहीत.  खगोलशास्त्राचे अभ्यासक मोहन आपटे यांनी ' मला उत्तर हवे ' अशा पुस्तकांत संगीताच्या आवडीने वा सानिध्यात रूक्ष वाटणार्या गणितासारख्या विषयात गती मिळते असे स्पष्ट मांडले आहे. अशी अनेक गुढे आपल्या पुर्वाश्रमींनी शोधली आहेत पण त्याची प्रसिद्धी त्यांनी केली नाही. कारण तसा विचार संन्यस्त वृत्तीच्या ऋषीमुनींच्या मनात येणार तरी कसा ?

सारांश असा की आज गुडी पाडवा. चांगल्या कार्याचा संकल्प करण्याचा, गुढी उभारण्याचा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. आपण प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करू या आणि संकल्प करू या ' बस फक्त एकच ध्येय आहे, ते म्हणजे कोरोनाचा पराभव करणे.' आपल्या संस्कृतीचा ठेवा डोळसपणे जपू या. जीवो जीवस्य जीवनम आणि जियो और जिने दो असे दोन संदेश सृष्टीने दिलेले आहेत. पहीला संदेश  प्राणीमात्रांसाठी आहे तर दुसरा संदेश मानवासाठी आहे. सृष्टी हसतपणे आपल्याला (मानव जातीला) सांगत आहे, " तुम्हीच पर्याय निवडा ' Choice is yours'. योग्य तो निर्णय घ्या. नाहीतर मानवजातीचा नाश होईल. तुम्ही नव्हता तेव्हा ही माझ्यासोबत मानवेतर प्राणी होते, वनस्पती जीवन होतं, झाडे, फुले, फळं होती.  पर्वत, डोंगर कपारी, नद्या सागर होते. तुमचा नाश झाल्यानंतर ही ते माझ्या सोबत राहणार आहेत. " 

आपली संस्कृती सर्वात प्राचीन आहे. आपले उत्सव ऋतुमानानुसार आहेत. उत्सवाच्या पाठीमागची कल्पना,  व भावना  ' समाज संघटीत व सुरक्षित राहावा ' अशी आहे. सांप्रतच्या स्थितीत आपण अंतःकरणातून सर्वत्र सकारात्मक दृष्टीने पाहु या. विजयश्री देवी हातात हार घेऊन आपली वाट पाहते आहे.

सोमवार, २३ मार्च, २०२०

मध्यप्रदेशमध्ये सत्तापालट! आता पुढे कुणाचा नंबर, महाराष्ट्र की राजस्थान ?



मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये २०१८च्या  विधानसभा निवडणूकीत भाजपाचा पराभव झाल्यावर देशातील भाजपेतर पक्षांना इतका आनंद झाला होता, की २०१९च्या लोकसभेच्या निवडणूकीत भाजपाचे पानिपत होणार हे गृहीत धरले. म्हणून विरोधी पक्षांमध्ये मनापासून आघाडी झाली नाही. युपीए मधील घटक पक्ष असो, वा डावे पक्ष असो या सार्यांनी आपआपल्या खासदारांची संख्या कशी वाढेल अशीच व्युहरचना करीत, निवडणूक लढले. त्यामूळे  लोकसभेच्या २०१९ निवडणूकीत त्यांचेच पानिपत झाले. महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड मध्ये भाजपाची पिछेहाट झाली तेव्हापासून तर भाजपेतर पक्षांना इतका गर्व झाला की, त्यांनी सीएएच्या विरोधात हिंसक आंदोलने सुरू केली. दिल्लीत भाजपाचा पराभव झाल्यावर विरोधी पक्ष लोकसभेच्या मध्यावधी निवडणूका घेण्याचे आव्हान देऊ लागले. पण मध्यप्रदेश मधील काॅग्रेसचे सरकार गडगडले आणि सार्या विरोधी पक्षांचे अवसान पुन्हा गळाले. अवसान गळाले म्हणून यांची कोल्हेकुई सुरू झालीच आहे. म्हणे, 'कोरोनो व्हायरसचे संकट असताना मोदींना फक्त विरोधी पक्षांची सरकार पाडण्यात रस आहे.' वस्तुतः इथे भाजपाचा संबंध येतोच कुठे? जे राजकारण झाले ते काँग्रेसचे हाय कमांड व ज्योतिरादित्य सिंधीया मध्ये ! देशावर कोरोनो व्हायरसचे संकट समोर असताना काॅग्रेसच्या श्रेष्ठींना मध्यप्रदेश मधील काॅग्रेस नेत्यांमधील भांडण सोडविता आले नाही हे बेपर्वाइचे तसेच अंहकाराचे लक्षण आहे. काॅग्रेसमध्ये आमच्या कुंटुंबाचा शब्द शेवटचा हेच दाखविण्यात काॅग्रेस हायकमांडांना शौर्य वाटत असेल तर त्यांना सल्ला द्यावयास काॅग्रेस मधील इतर जेष्ठ नेते पुढे कसे सरसावतील ? 

२०१४ पासून देशातील विरोधी पक्ष केंद्रातील मोदी सरकारला अनाठायी टिकेचे लक्ष्य बनवित असल्यामूळे पंतप्रधान मोदींचे आसन दिवसें दिवस बळकट होत जात आहे. त्यातूनच २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीत भाजपला मोठा विजय प्राप्त झाला. आजही मोदींची लोकप्रियता केवळ टिकूनच नव्हे तर वाढत जात आहे. म्हणून मध्यप्रदेशात मंत्रीपदावर असलेल्या काॅग्रेसच्या नेत्यांनी राजीनामा दिले, व ज्योतीरादित्यांसोबत भाजपाशी जवळीक साधली आहे. ' भाजपा आमचे राज्यातील सरकार पाडण्याचे काम करीत आहे ' असा विरोधी पक्षांनी कितीही टाहो फोडला तरी त्यांच्या टाहोचा आवाज मतदारांच्या कानीं पोहचत नाही. मध्यप्रदेश व राजस्थान मधील विधानसभेच्या निवडणूकीत भाजपा पिछाडीवर राहीला पण तुल्यबळ राहीलाच होता. ही वस्तूस्थिती काॅग्रेस पक्ष मानायला तयारच नाही. २०२४ च्या निवडणूकीतही मोदीच्या विजयावर आताच शिक्कामोर्तब झाल्यासारखे दिसत असल्यामूळे काॅग्रेस ( माता-पुत्र-कन्या-जावई च्या) पक्षात काॅग्रेसजन किती काळ राहतील हा प्रश्न काॅग्रेस व विरोधी पक्षांचे समर्थक संपादक, साहित्यिक मंडळींना पडत नाही, तो पर्यंत राष्ट्रीय स्तरावरील प्रमूख विरोधी पक्ष असलेल्या काॅग्रेसची घरघर थांबणार नाही. 

मध्यप्रदेशचे लोण राजस्थान व महाराष्ट्रात ही पोहचेल असे दिसत आहे. महाराष्ट्रातही भाजपा-सेनेचा विजय झाला होता आणि तो ही मोदींच्या करिष्मा मुळेच. पण शिवसेनेला अवदसा आठवली आणि काॅग्रेस व राष्ट्रवादी सोबत शय्या केली. शिवसेनेला तात्पुरता लाभ झाला असला तरी तिचा पुढचा प्रवास खडतर आहे हे दिसू लागले आहे. वस्तुस्थिती अशी आहे की शिवसेना बिनधास्त असल्याचा आव आणत आहे. महाराष्ट्रातील काॅग्रेस पक्षातील नेते सोनिया गांधी व राहूल गांधीच्या अंहकारामूळे नाराज दिसत आहेत. ते काॅग्रेस सोबत राहतील की जातील अशा प्रश्नचिन्हामूळे शिवसेना चिंतेत आहे. म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अधून मधून मोदींची प्रशंसा करावी लागत आहे. महाराष्ट्रातील काॅग्रेसमध्ये उभी फूट पडण्या अगोदर शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार नसेल तर भाजपाकडे शिवसेनेचे आमदार आकृष्ट होण्याची शक्यता आहे. शिवसेना कमकुवत होईल. बाकी लोकसभेच्या मध्यावधी निवडणूका घेण्याचे भाजपाला आव्हान देणार्या शरद पवारांना बारामतीचा ही गड राखत येणार नाही. महाराष्ट्रात महाआघाडी सरकार स्थापन केल्यानंतर शरद पवार पंतप्रधानपदी बसण्याचे दिवसाढवळ्या स्वप्न पाहात आहेत.  त्यातच ते म्हणत आहेत की त्यांना इतर राज्यातील नेते भाजपा विरोधी आघाडी निर्माण करण्यासाठी बोलावित आहेत. ही निव्वळ थाप आहे. शरद पवारांची महाराष्ट्रात जितकी शक्ती आहे, त्याच्या दुप्पट ताकद भाजपेतर पक्षांची आपआपल्या राज्यात आहे. ते शरद पवारांना का व कशासाठी बोलावतील ? राष्ट्रीय स्तरावर पवारांचा काय मोठा प्रभाव आहे ?  सोनीयांनी जे खातें दिले ते  निमूटपणे दहा वर्षे चघळत बसले,  हे  इतर प्रांतातील स्थानिक पक्षांनी पाहिले आहे. खरोखरीच इतर प्रान्तीय पक्षातील नेते भाजपा विरूद्ध एखादी स्थिर आघाडीसाठी शरद पवारांना मार्गदर्शनासाठी बोलावित असते तर हरियाणातील काॅग्रेसने सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना का बोलाविले नाही , मध्यप्रदेशमधील कमलनाथांनी सरकार वाचविण्यासाठी शरद पवारांना बोलाविले का नाही ?

मध्यप्रदेश काॅग्रेसच्या हातून गेला. तिथे भाजपा सरकार स्थापन करणार हे निश्चीत झाले आहे. राजस्थान व महाराष्ट्रात ही भाजपा प्रणित सरकार स्थापन होणार आहे. प्रथम महाराष्ट्रात की राजस्थानात एवढाच काय तो प्रश्न राहिला आहे. या प्रश्नाचे उत्तर दोन्ही राज्यातील काॅग्रेस पक्षांतर्गत स्थितीवर अवलंबून आहे. मला वाटतं राजस्थानात लौकर सत्तांतर घडेल. याचे कारण असे की मध्यप्रदेश मध्ये कमलनाथ व दिग्विजयसिंगच्या प्रभावामूळे काॅग्रेसने जसे ज्योतिरादित्य सिधींयांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रयोग काॅग्रेसचे हाय कमांडने राजेश पायलट यांचे चिरंजीव सचीन पायलटचे खच्चीकरण केले आहे. काॅग्रेस आपल्या पायावर धोंडा मारून घेत आहे. उगीच त्यांच्या नेत्यांनी भाजपावर खापर फोडू नये. कर्नाटकात परस्पर विरोधात लढविलेले जेडीयु (एस) व काॅग्रेसला जनादेश होता का? तिथे सरकार स्थापन केले होते ते कुठल्या आधारावर ? मुळात आधार नव्हताच, मग त्यांचे सरकार पडले त्याचे खापर भाजपावर का फोडता ? शरद पवारने शिवसेनेला फितविले नाही असे म्हणत भाजपाने शिवसेनेला फसविले अशी भाषा भाजपेतर विरोधी पक्ष व त्यांचे मिडीयातील संपादक मंडळी, साहित्यिक, कलाकार, व ख्रिस्ती व इस्लाम धर्मगुरू कुठल्या तोंडाने बोलत आहेत ? निवडणूक पुर्व युती ज्या दोन पक्षांची होती त्यानांच लोकांनी निवडून दिले होते ना ? पण असा विचार महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत, संपादक महाशय, साहित्यीक, ख्रिस्ती व मुस्लिम धर्मगुरू करत नाहीत. कारण अर्थस्य पुरूषो दासः | महाविकास आघाडीचे सरकार जेव्हा कधी पडेल तेव्हा ही मंडळी भाजपाच्या नावाने शिमगा करणार. हा झाला लहान मुलांच्या खेळातील रडीचा डाव. भारतीय राजकारणात एक गोष्ट स्थिर होऊ लागली आहे ती म्हणजे, ' जहाँ है मोदी  तो सब है मुमकीन | जहाँ है भाजपा, वहाँ रहेगी सत्ता और  जिसका मंत्र है, सबका विकास, सबका विश्वास लेकीन ना किसीपर खास मेहरबान |

शनिवार, २१ मार्च, २०२०

कोरोनाशी लढत आणि आपण



परवा रात्री पंतप्रधान मोदींनी दूरदर्शनवरून कोरोनो व्हायरस संबंधीत देशाला उद्देशून भाषण केले. त्या भाषणात पंतप्रधानांनी देशाचे नागरिक म्हणून आपण काय खबरदारी घ्यावी हे सांगितले. देशातील डाॅक्टर्स, हाॅस्पीटल्स व तेथील स्टाफ, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारे, सर्वत्र डोळ्यात तेल घालून काम करणारे पोलीस यंत्रणादि सुरक्षा व्यवस्थतेतील कर्मचारी मंडळी गेले काही दिवस अहोरात्र मेहनत करीत आहेत त्यांचे कौतूक करून सामान्यजनांनी त्यांच्या बद्दल जाहिररीत्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा सल्ला दिला. येत्या रविवारी सर्व देशवासीयांनी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत घराच्या बाहेर न पडता एक प्रकारे स्वयंघोषित कर्फ्यू मानण्याचे आवाहन ही पंतप्रधानांनी केले आहे. आपण लोकशाही राज्यप्रणाली स्विकारली असल्यामूळे पंतप्रधानांनी जे आवाहन केले आहे त्याला सकारात्मक प्रतिसाद देणे आपले कर्तव्य आहे. देश जेव्हा जेव्हा संकटात असतो त्या त्या वेळी एक समाज म्हणून आपण प्रशासनाला चांगले सहकार्य करीत आलो आहोत. त्यामूळे कोरोनो व्हायरसने निर्माण केलेल्या संकटाला सुद्धा आपण एकजूटीने सामना करणार आहोत या बद्दल कोणाच्या ही मनात शंका नसेल. प्रश्न हा आहे की समाज म्हणून आपण जी एकजूट दाखविणार आहोत तिचे स्वरूप काय असेल हा आहे.

सामान्यतः पावसाने कहर केला असेल आणि अचानकपणे समुद्राला आलेल्या भरतीमूळे शहाराच्या सर्व भागात पाणी तुंबले असेल तर अनेक प्रवाशांना जवळपासचे समाजबांधव आपल्या घरात आश्रय देतात. नदीला पुर आला असेल इतर आसपासच्या जिल्ह्यातील लोक मदत करतात. भुंकपासारखी आपत्ती असो वा मोठा रेल्वे अपघात असो वा दशहतवाद्यांनी केलेल्या बाॅम्ब हल्यातील जखमी झालेले समाजबांधवाच्या मदतीला समाज म्हणून आपण एकजूटीने धावत जातो.  शहर व ग्रामीण भागात आजही आगीत होरपळलेल्या वा अचानक आजारी पडलेल्या समाजबांधवासाठी आपण शेजारधर्म पाळून मदत करतो. भले आपण चंगळवादी दुनियेत राहातो आणि त्यात थोडेसे वाहात जात असलो तरी आपली संवेदनशिलता शाबूत आहे याबाबत दुमत नाही. पण कोरोना व्हायरसने निर्माण केलेल्या दशहतीला सामोरे जाताना तीच संवेदनशिलता, तोच भावूकपणा काबूत ठेवावा लागेल. आपल्याला सध्याच्या कोरोना व्हायरसशी जी लढत द्यावयाची आहे, ती जितके शक्य होईल तितकी आपल्या घरात बसूनच द्यावयाची आहे. वेळ पडल्यास शासकीय कर्मचारी व डाॅक्टर मंडळींना सहकार्य करण्यासाठी सरकारने आपल्यापैकी काही जणांना प्रत्यक्ष रणागंणात उतरावयास सांगितले तर तशी तयारी सुद्धा ठेवावी लागेल. समाज म्हणून एकजूटीने बाहेर पडून प्रत्यक्ष मदतीला धावण्याची पारंपारिक पद्धत येथे दुरोपयोगी ठरेल हे आपण सारे जाणत आहोत. त्यासाठी आपल्याला कमालीचा संयम पाळावा लागणार आहे. लग्न, साखरपुडा, वाढदिवस, यात्रा, धार्मिक सण, इत्यादी सारे कार्यक्रम रद्द करावे लागतील. कोरोनाची लागण आणि त्यातून होणार्या प्रादुर्भावाचे स्वरूप आपल्याला एव्हाना ठाऊक झाले आहे. आपला देश कोरोनाने केलेल्या आक्रमणाच्या दुसर्या स्टेजवर आहे. म्हणून आपल्याला प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावयाचे आहे. त्यासाठी जितकं विलग राहाता येईल तितका प्रयत्न करावयाचा आहे. तसा प्रयत्न करणे म्हणजे एक प्रकारे आपल्या हातून देशसेवा घडते असेच मानावे.

हा प्रयत्न करीत असताना पहीला अनुभव येईल तो म्हणजे आपले लहरी मन स्थिर करणे जड जाईल. कारण संपुर्ण दिनचर्या बदलावयाची आहे.  मनात अनेक विचाराचं काहूर माजलेलं असणार . काम-धंदा बुडाला, आर्थिक नुकसान होणार, रजा कापली जाईल, आपलं कोणी नातेवाईक परदेशात असेल त्यासंबंधी चिंतेने त्रस्त होणार, इत्यादी अडथळे निर्माण होणार. त्यासाठी योगाभ्यास करावा लागेल. ते जमत नसेल तर थोडा वेळ इष्ट देवतेचा जप करावा. म्हणजे मन स्थिर होईल. मन स्थिर झालं की सृजनतेकडे वळेल. सृजनता ही एक अशी शक्ती आहे की ती आसक्ती आणि विरक्ती मधील परमावधी गाठण्यास आपल्या अवयवांना मदत करते. भले आपण सामान्यजन असू पण 'ज्याची वंदावी पाऊले अशा ईश्वरनिष्ठांची ही भूमी आहे ' असा अभिमान आपल्यात निर्माण होऊ शकतो. त्यातूनच आपल्यावर आलेल्या जबाबदारीचे भान येईल. हाॅटेल्स, माॅल्स, पर्यटन स्थळे, चित्रपटगृहे, बंद झाल्याने आपल्या मनोरंजनाच्या संधी हुकतील. ते ही फार तर एक दोन आठवडे. पण त्या आपल्या प्राथमिक गरजा नव्हेत. आजच्या या व्यापारी व स्पर्धेच्या युगात आर्थिक मंदीचे स्वरूप प्राणावर बेतण्या इतके मारक ठरते असे मला वाटत नाही. आपण स्वतःहून वाढविलेल्या चंगळवादाला लगाम घालण्याची  एक इष्ट आपत्ती म्हणजे कोरोना व्हायरसची दशहत समजू या. शेवटी चंगळवाद म्हणजे विकास नाही. चंगळवाद म्हणजे आधुनिकता नाही, आधुनिकता म्हणजे आपल्या संस्कृतीतील मूल्यें फेकून देणे नव्हेच.  शेवटी ' Econimics is a science of human bhevaiour between scare means and unlimited needs ' असेच अर्थशास्त्राचे आधुनिक काळातील जनक ॲडाम स्मिथने म्हटले आहे.  उत्पन्न वजा खर्च म्हणजे बचत नव्हे. उत्पन्न वजा बचत म्हणजे खर्च करणे हे आपल्या जीवनाचे सुत्र आहे. आपल्या संस्कृतीत अर्थशास्त्राची व्याख्या अनादि काळापासून अशीच मांडलेली आहे. असेच कौटील्याने मांडले आहे. हेच महात्मा गांधीजी, जनसंघाचे नेते (म्हणजे आजच्या भाजपाचे) स्वर्गीय पंडीत दिनदयाळ उपाध्याय, व समाजवादी नेते स्वर्गीय डाॅक्टर राम मनोहर लोहीयांनी मांडले आहे. ' खर्च कमी करा, काही दिवस कळ सोसा व आपला जीव वाचवा ' हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावयाचे आहे. देशावर दुष्काळाचे संकट आले असता स्वतःहून एक दिवस उपवास स्विकारलेल्या सर्वात सनदशीर पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्रींचा हा देश आहे. महाभारतकालीन विदुराचा हा देश आहे. मध्ययुगीन काळातील आर्य चाणक्याचा हा देश आहे, याचे स्मरण आपण करावे. संपूर्ण मानवजातीवर आलेले हे संकट टाळावयाचे असेल तर पंधरा दिवसासाठी आपण स्वतःहून आपल्याच घरात स्विकारलेला कारावास व थोडाफार उपवास समजावा. कदाचीत आपल्याला हे आव्हान स्विकारणे कठीण वाटेल पण अशक्य नाही.

शेवटी पंधरा दिवसासाठी चांगल्या सवयी स्विकारयला मन तयार झाले की आपोआप कोरोनोचा पाडाव झाल्यानंतर एक सुजाण नागरिकत्वाच्या ज्या काही कसोट्या आहेत त्या आपण पार केल्याचा आपल्याला आपलाच अभिमान वाटेल. आपणच आपले प्राण वाचविल्याचा एक स्वर्गीय आनंद अनुभवयास येऊ शकेल.  फिजूल खर्च टाळणे, वाईट सवयींवर बंधन घालणे, सार्वजनिक व वैयक्तीक स्वच्छतेचे भान येणे, अशा अनेक चांगल्या गोष्टीं आपल्या अंगवळणी पडतील. आपल्यापेक्षा खालच्या स्तरावरील राहणीमान असलेल्या आपल्या समाजबांधवांकडे पाहावे. त्यांना आपल्यापेक्षा खडतर तपस्या करावयाची आहे. ते सुद्धा कोरोनशी लढत देणार आहेत. त्यांना आपण आपले मानू या. त्यातूनच एक सशक्त समाज म्हणून आपण नवी उभारी घेण्यासाठी सज्ज होऊ शकतो. प्रत्येक घटना राजकीय विचारसरणीच्या चष्म्यातून पाहावयाची जी सवय आपल्याला लागली आहे, तिचे आपोआप उच्चाटन होईल. राजकीय पक्ष निर्माण होतील व जातील; नेते येतील व जातील; सेलेब्रटी होतील व जातील ; पण समाज हाच आपल्या सर्वांचा आधार आहे. आपला देशच आपला आधार आहे. आणि हो , शेवटी धरणीमाता म्हणजे पृथ्वीवरच आपल्याला जगावयाचे आहे व धरणीमातेत विलीन व्हावयाचे आहे हेच जीवनाचे शाश्वत सत्य आहे. दोन आणखीन शाश्वत सिद्धांत कुठल्यातरी इंग्रजी मासिकातून माझ्या वाचण्यात आले आहेत, त्यांची मला वेळोवेळी आठवण होत असते ते इथे मांडतो आहे, आणि नंतर थांबतो. There are some eternal principles which never change even the time changes. One of them is 
" When there is a conflict between an individual and group, the group's intrest must prevail. When there is comnflict between group and organisation then organisation's intrest must prevail and When there is conflict between organisation and nation, the nation's intrest must and must prevail at any cost."आणि दुसरा सिद्धांत आहे,
" Success comes to those who plan their work and excute the plan with self confidence and determination."

मंगळवार, १७ मार्च, २०२०

कोरोना व्हायरसचा धोका आणि नमस्ते इंडीया



कोरोना व्हायरसची साथ जगभर पसरत आहे. प्रथम चीन मध्ये या जीवघेण्या रोगाची लागण सुरू झाली. चीनमध्ये एक पक्षीय राजवट आहे. ती ही साम्यवादी पक्षाची. तिथे माहिती व प्रसारण मंत्रालयावर सरकारचे नियंत्रण असते. तिथे सेन्साॅरशिप असल्यामूळे तेथून प्रसारीत झालेल्या बातमीवर जगभरातल्या लोकांना सतत संभ्रम पडत असतो. म्हणून कोरोना व्हायरस वर अनेक प्रतिक्रिया ऐकू येतात. कोणी म्हणतात कोरोना म्हणजे चीनने आपल्याच नागरिकांवर रासायनिक शस्त्राचे केलेलं प्रात्यक्षिक आहे तर कोणी म्हणतं अमेरिका व चीनने आपल्या फार्मासिटीकल कंपनीचा व्यापार वाढावा या हेतूने संगनमताने केलेलं एक कारस्थान आहे. याचा अर्थ असा आहे की एखाद्या रोगाची साथ निर्माण करून त्यावरील औषधे तयार करणे हा एक व्यवसाय झाला आहे असे मानावयाचे की काय?  यात किती सत्यता आहे, हे पडताळून पाहण्याची सोय नसल्यामूळे अशा प्रकारच्या शंका-कुशंका, अफवा, निर्माण होत आहेत का? एक गोष्ट स्पष्ट आहे की आजचे जग अनिश्चतेच्या रोगाने ग्रासले आहे, त्यावर सध्या तरी उपाय नाही. कारण हे कलीयुग आहे. आजच्या जगाची स्थिती गुरू चरीत्रात वर्णन केलेल्या स्थितीशी जुळते. पण सारं काही दैवावर सोडून देण्यात जीवनाचे सार्थक नसते. म्हणून आपण कोरोनाच्या बाबतीत प्रशासनाला सहकार्य करायला हवे. त्यातील एक भाग म्हणून सोशल मिडीयाचा वापर या घडीला सुज्ञपणे करू या व कोरोनो विषयीची आपली चर्चा पुढे रेटू या. 

गेल्या तीन दशकापासून अनोळखी तापाच्या ज्याला इंग्रजीत  Unknown Fever असे म्हटले जाते, त्याची साथ अधून-मधून येत आहे. या विश्वात सर्वात अनाकालनीय गुढ म्हणजे हे विश्व होय असे विख्यात शास्त्रज्ञ आर्कमिडीजने म्हटले आहे, ते तंतोतंत पटते. या ब्रह्मांडात काय काय दडले आहे ते आपण सारे काही शोधले आहे अशा भ्रमात आपण राहू नये. पण  विश्वातील रहस्यें शोधण्याचा प्रयत्न सुरू ठेवणे गरजेचे आहे. त्याचे नाव विज्ञान होय. आधूनिक वैद्यकशास्त्राने अनाकलनीय तापावर वेळोवेळी तातडीचे औषधोपचार शोधून अनोळखी रोगजंतूचा संसर्ग थाबविण्यात यश मिळविल्याचे आपण अनुभवले आहे. म्हणून विज्ञानाची कास धरण्यात शहाणपण आहे. पण विज्ञानाची कास धरणे म्हणजे चंगळवाद नव्हे. आपण काय खावे, किती खावे, किती मौज करावी, यावर बंधने घालणे आवश्यक आहे हे ही वैद्यकीयशास्त्र आपल्या नजरेत पदोपदी आणत असते. थोडेसं पाठीमागे वळून पाहिले तर काय दिसते, जेव्हा वैद्यकशास्त्र फारसे प्रगत झाले नव्हते, तेव्हा आहार-विहारमध्ये पथ्य पाळणे हा एक उपचार होता. तरीही मृत्युचा दर Death rate  घसरला नव्हता. माणसाचे आयुर्मान कमी होते. हा झाला मध्ययुगातील मानवाचा इतिहास. वैद्यकशास्त्र जस जसं प्रगत होत गेलं, तसतसे अनेक आजारावर लस, औषधे, सर्जरी इत्यादी उपाय उपलब्ध झाले आणि माणसाचे आयुर्मान वाढत गेले. पण या ठिकाणी हे ही लक्षात घेणे आवश्यक आहे ते म्हणजे अकस्मात मृत्युंच्या घटना तसेच एकाच वेळी व एकाच पद्धतीने होणार्या मृत्युंची संख्या अधिक होते आहे. असें का ? यावर आजचं वैद्यकीय शास्त्र समाधानकारक उत्तर देताना दिसत नाही. एक सत्य असे आहे की सृष्टीतील प्रत्येक जीवाची  उत्क्रान्ती होत असते. त्यामूळे ॲन्टीबायोटीक औषधें जितके परीणामकारक व्हावयास हवेत तसे अनुभवयास येत नाहीत. शिवाय ॲन्टीबायोटीक औषधांचा साईड इफेक्ट होतो त्याचे काय करावे हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. म्हणूनच  उत्क्रान्तीचा मक्ता फक्त मानवाकडे आहे असे आपण जे समजतो ते चुकीचे ठरते. वैद्यकीय क्षेत्रात औषधे तयार करताना प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, पर्यावरण इत्यादी शाखांच्या अभ्यासकांना ही सामील करून घ्यावयास हवे. तसे घडत नाही. त्यामूळे सृष्टीतील संतुलन बिघडते. शेवटी सृष्टीचे संतुलन बिघडणे हे ही नैसर्गिक आहे कारण उत्पत्ती, स्थिती, व लय ही सृष्टीचे वैशिष्टें आहेत या सत्यापाशी आपण येऊन पोहोचतो.  नव-नवीन जंतुचा वाढत जाणारा संसर्ग व त्यातून होणारे मृत्यू हे आधूनिक वैद्यकशास्त्राच्या समोर फार मोठे आव्हान निर्माण झाले आहे. याचे कारण नव-नवीन जंतुची होणारी उत्पत्ती रोखण्याचे काम आधूनिक विज्ञान करू शकत नाही. म्हणूनच  पर्यावरणवादी कार्यकर्ते चंगळवादी जीवनशैलीला दोष देत असतात. पर्यावरणाचा अभ्यास हा ही आधूनिक विज्ञानाचाच भाग असल्यामूळे पर्यावरण चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यावर दुर्लक्ष न करणे हे हितावह ठरते. पर्यावरणाचा होणारा र्हास थांबविण्याचा प्रयत्न करणे ही संपूर्ण मानव जातीची जबाबदारी आहे. पण त्याबाबत विकसीत देश आणि विकसनशील-अप्रगत देशांत सहमती होतांना दिसत नाही. शस्त्रात्रे निर्माण करून त्याचा व्यापार हेच जर प्रगतीचे लक्षण व उत्पन्नाचा एकमेव मोठा स्त्रोत मानण्याची मानसिकता प्रगत देश सोडणार नाहीत तो पर्यंत अनोळखी रोगांचे आक्रमण मानव जातीवर अधून-मधून होत राहणार असे दिसते. जागतिक पातळीवर युनो एक संस्था कार्यरत आहे, पण तिथे ही प्रगत राष्ट्रांना मिळालेला (वेटो) अधिकार मानवजातीच्या समस्या सोडविण्यात अडसर ठरतो. बरं त्यातही एक गोम अशी आहे की पर्यावरणवादी सुद्धा शास्त्रज्ञांनी ओके केलेल्या उर्जाप्रकल्पाला नाहक विरोध करीत असतात. तिथे अनेक लाॅब्या आहेत. पर्यावरणवादी होणे हा एक व्यवसाय होतो आहे की अशी शंका उत्पन्न होते. असे असले तरी WHO ह्या संस्थेचा कारभार बर्यापैकी समाधानकारक आहे. अर्थात तिथेही बलशाली देशांच्या फार्मासिटीकल कंपन्याच्या लाॅब्या असव्यात असेच दिसते. आज जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळेतून मानवाच्या विभिन्न शारिरीक आजारावर  विभिन्न औषधोपाचारांचा शोध घेतला जातो व निर्मिती होते याबाबत दूमत नाही. त्यात ही व्यापारी वृत्तीचा प्रभाव आहे पण तो ही राहणार आहे त्यासंबंधी खल करण्यात काही अर्थ नाही. कारण आपले अध्यात्म सांगते की,  ज्ञान, शौर्य, व्यापार व सेवा ही वैशिष्टे प्रत्येक व्यक्तीत असतात आणि त्यातून स्वार्थ  कोणालाही सुटला नाही. सत्ता स्पर्धेतून शस्त्रस्पर्धा वाढते. शस्त्रस्पर्धेतून युद्धे होतात. युद्धातून वा शस्त्राच्या चाचणीतून प्रदूषण वाढते आणि प्रदूषणातून रोगराई पसरते. मग आपल्याला हताश होण्यापलिकडे पर्याय राहात नाही. माल्थस नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने थेअरी ऑफ पापूलेशन च्या ग्रंथात युद्ध होणे, रोगराई होणे, चक्रीवादळ, महापूर, भूकंप, अवर्षण इत्यादी संकटातून पृथ्वीवरील प्राणीमांत्राचा भार कमी होतो असे म्हटले आहे. फार दूर कशाला जावे, सातशे वर्षापूर्वी आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटले आहे,
     युद्धकारण पृथ्वी वरती | विषवायू पसरेल ||
     असंख्य जीव ते विषवायूने | प्राणासी मुकतील ||
     युद्धकारणे पृथ्वीवरती | प्रदुषण पसरेल ||
     अनेक दशके या परिणामे | मानव त्रासवेल ||
     रोग-खुजी निकृष्ट अशी | प्रजोत्पत्ती होईल ||
     पृथ्वावरचे व्यवहार सारे | बंद होऊनी पडतील ||

ज्या देशात ज्ञानेश्वर महाराज जन्मले व समाधिस्त झाले त्याच भारत देशात सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे आणि अशा पेंशटची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकाचा मृत्यु ही झाला आहे. कोरोनाची लागण झालेले बहुतांश पेंशट विदेशवारी करून आलेले नागरिक असल्याचे दिसतात. म्हणजे कोरोनो हा आयात झालेला रोग आहे. पण त्याचा फैलाव सर्वत्र होऊ शकतो. म्हणूनच राष्ट्रीय, प्रान्तीय, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पातळीवरून आरोग्य खात्यातर्फे काही सूचना, उपायाबाबत माहीती दिली जात आहे. त्याला आपण एक समाज म्हणून सकारात्मक प्रतिसाद द्यावयास हवा. ज्यांना या साथीच्या रोगावर राजकारण करावयाचे त्यांच्यापासून ही आपण दोन हात दूर राहीले पाहीजे. आपले दुर्दैव असे आहे की देशातच नव्हे तर जगाच्या कोपर्यात काही ही घडले,  त्यावर सुद्धा राजकीय पोळी भाजून घेण्याची अनिष्ट प्रथा देशातल्या राजकीय व्यवस्थेत रूजली आहे. त्याला काही अंशी आपण मतदार म्हणून ही जबाबदार आहोत. शेवटी समाज म्हणजे काय?  आपणच सारे मिळून बनला आहे ना ! समाज आहे म्हणून तर राजकीय व्यवस्था आहे. राजकीय व्यवस्था आहे म्हणून तर प्रशासन अस्तित्वात आहे. Goverment is the machinery of the state हे सत्य जाणून आपण सार्यांनी प्रशासनाला मदत होईल असे जे जे शक्य आहे ते सर्वोतपरी करावे. सकारात्मक व्यवहार म्हणजे सदाचारच की. हा संतजनांनी दिलेला सल्लाच. तो आपण पाळावा. कारण संतवाणी, सृष्टीची वाणी आहे म्हणून ती ईश्वर वाणी आहे.

सार्क संस्थेचे आपले शेजारील सर्वच देश कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी एकत्र आले आहेत. या बाबतचा पुढाकार आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीने घेतला हे आपण टि व्ही चॅनेलवरून पाहीले आहे. त्याबद्दल सार्क देशाच्या प्रमुखांनी आपल्या पंतप्रधानांचे अभिनंदन करून धन्यवाद दिले आहेत. प्रगत देशात ही कोरोनोची लागण झालेले रूग्ण आढळत आहेत. तरीही काॅग्रेसचे नेते राहूल गांधी पंतप्रधान मोदीवर टिका करण्यासाठी सरसावलेले दिसल्याचे पाहीले, तेव्हा काॅग्रेसच्या या युवराजाची कींव कराविशी वाटली. मला वाटतं, उद्या राहूल गांधी कोरोनोचे संकट ही पंतप्रधान मोदीनी निर्माण केले आहे असा आरोप करू लागतील. शेवटी एखाद्या विषयीचा मत्सर डोक्यात शिरला की माणूस वायफळ बडबड करीत राहातो ज्याला आधूनिक मानसशास्त्रात हिप्नोटीझम(वशीकरण) म्हटले जाते, तसेच काहीतरी राहूल गांधी बाबत घडले असावे.  सार्क परिषदेच्या विडीओ काॅन्फरन्समध्ये अनुपस्थित राहीलेल्या पाकचे पंतप्रधान इमरान खान बाबतही तसेच काहीतरी घडले असावे. असे अनूमान काढावे लागले याचे कारण अलीकडे राहूल गांधी व पाकचे पंतप्रधान इम्रान खानच्या भारतातील घडोमोडी वरील भाष्यें सारखीच असतात.

जगातील बहूतांश देश कोरोना नावाच्या विषाणूशी परस्पर सहकाराच्या जोरावर लढत देण्यासाठी सज्ज झाले आहेत. एक खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या संस्कृती मधील परस्पर दोन्ही हात जोडून नमस्कार करण्याची पद्धत इतर देशांना भावली आहे, हे टिव्हीवरून पाहायला मिळाले. या बद्दल आपल्याला अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. पण त्याचे भांडवल करण्याचा मोह टाळावयास हवा. कारण आपल्या नमस्ते मध्ये ' ईश्वर जसा माझ्या हृदयात वसला आहे तसाच तो समोरच्या व्यक्तीत आहे, ईश्वर चराचर सृष्टीत सामावलेला आहे ' अशी व्यापक भावना आहे. म्हणून ' सर्वेत्र सूखीनः सन्तू, सर्वे सन्तू निरामयाः ' अशी  प्रार्थना करून  कोरोनाशी लढाई करण्यासाठी एकजूटीने प्रयत्न करणे हेच आजच्या घडीला आपले सर्वात महत्वाचे कर्तव्य आहे, व ते पार पाडणे हीच आपली प्राथमिक व आत्यंतिक गरज आहे.

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...