आज आपल्या नववर्षाचा पहिला दिवस. सर्वप्रथम आपल्या सर्वांना नवीन वर्ष सुखाचे आणि सुरक्षेचे जावो अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो. सन २०१७ च्या गुढी पाडव्याला 'प्रतिपदा संवादाची' असा लेख लिहून ब्लाॅगवर आपल्याशी संवाद साधण्यास सुरूवात केली. काल तीन वर्षे पुर्ण झाली. गेल्या तीन वर्षात विविध विषयावर एकूण ११७ लेखांद्वारें मी आपल्याशी संवाद साधला. सन १९७५ च्या आणिबाणी विरूद्धाच्या संघर्षात मी ओढलो गेलो म्हणून देशातील राजकीय स्थिती व व्यवस्था या विषयावरील लेखांची संख्या अधिक झाली हे मी मागे एका लेखात मान्य केले आहे. आपण खपवूनही घेतले त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. यंदाचा आपला होळीचा सण आनंदाने साजरा झाला. चीनमध्ये कोरोना व्हायरसने काही लोक मृत्यूमूखी पडले अशी बातमी ऐकली होती पण तो व्हायरस जगभर पसरेल व आपल्या दाराशी इतक्या झपाट्याने येईल अशी पुसटशी कल्पनाही आपण केली नव्हती. चीनमध्ये काय होत असते याबाबत सारं जग संभ्रमात असते. साहाजिकच आपण सार्यांनी फार गांभीर्याने घेतले नाही. स्वाईन फ्य्लू, बर्ड फ्ल्यू आले आणि गेले. तशाच पद्धतीने कोरोना व्हायरस जाईल अशी आपली समजूत होती. होळीचा सण साजरा करताना आपल्याला नवीन वर्षाचे स्वागत घरात बसून करावे लागेल असे मनात ही आले नव्हते.
एकदा भगवान गौतम बुद्धांचे शिष्यगण भिक्षा मागत असताना एका इसमाने त्यांच्या भिक्षा मागण्याच्या वृत्तीवर ताशोरे ओढले. त्याने भिक्षा तर दिलीच नाही पण बुद्धांच्या त्या शिष्यगणांवर शिव्या-शापाचा वर्षाव केला. संध्याकाळी ते आपल्या आश्रमात परतल्यानंतर त्यातील एका शिष्याने भगवान बुद्धाकडे त्या इसमाची तक्रार केली व म्हटले, " गुरूवर्य उद्या तुम्ही आमच्या सोबत या आणि त्या इसमाचा कडक शब्दात समाचार घ्यावा अशी माझी इच्छा आहे. भगवान बुद्ध उत्तरले, " बाळा, उद्याची बात उद्या करू या. पण हा विषय डोक्यातून काढू टाक आणि मला उद्या रात्रीच्या भोजनाच्या वेळे पर्यंत याबाबत काही विचारावयाचे नाही. त्या शिष्याने ती आज्ञा स्विकारली. दुसरा दिवस उगवला, गौतम बुद्ध स्वतः आपल्या शिष्यांसोबत भिक्षा मागायला निघाले. परंतु त्यांनी भिक्षेसाठी कालच्या मार्गाच्या विरूद्ध दिशाचा मार्ग पत्करला. दुपारचे साडेबारा वाजले तेव्हा एका झाडाखाली मिळालेली भिक्षा शिजवून जेवावयास बसले. बुद्धांनी काल ज्या शिष्याने एका इसमाची तक्रार केली होती त्याला आपल्या जवळ बसावयास सांगितले. जेवण झाले. थोडीशी वामकुक्षी करून पुन्हा भिक्षेसाठी बुद्ध व शिष्यगण निघाले पुढील प्रवासाला. पण निघताना बुद्धांचे कमंडलू जेवावयास बसलेल्या जागेवरच राहीले होते. बुद्धांनी विचारले, ' ते कमंडलू कोणाचे राहीले ? ' बुद्धांच्या बाजूला बसलेल्या त्याच तक्रार बहाद्दूर शिष्याने, त्वरीत उत्तर दिले, ' भगवान ते कमंडलू आपले आहे.' बुद्ध म्हणाले, ' असे होय ! मग ते घे सोबत आणि ठेव तुझ्याकडेच.' संध्याकाळच्या पाचच्या सुमारास पुन्हा एका झाडाखाली शिष्यगणासोबत बुद्ध विश्रामास बसले. एक बोधकथा ऐकिवली आणि निघाले आपल्या प्रवासास. त्यावेळी बुद्ध आपले कमंडलू घ्यावयाचे विसरले. पुन्हा त्यांनी प्रश्न केला, 'ते कमंडलू कोणाचे राहिले आहे? ' त्याच शिष्याने उत्तर दिले, गुरूवर्य ते आपलेच कमंडलू आहे. ' त्यावर गौतम बुद्ध त्याला म्हणाले, ' बर ते घे सोबत आणि कायमचे तुझ्याकडेच ठेव.' रात्री भोजनास बसताना पुन्हा त्या शिष्याला आपल्या शेजारी बसविले. भोजन झाल्यानंतर बुद्धांनी विचारले, माझे कंमडलू कोठे आहे, त्यावर त्याच शिष्याने उत्तर दिले, तुमचे कमंडलू माझ्याकडे आहे. तुम्ही संध्याकाळी मला देऊन टाकले आहे ना?' बुद्ध शांततेने म्हणाले, बाळा ते कमंडलू मी तुला दिले म्हणून ते कमंडलू तुझे झाले की नाही ? शिष्याने उत्तर दिले, ' हो गुरूवर्य ' . बुद्ध पुढे म्हणाले, ' त्या इसमाने काल ज्या शिव्या दिल्या होत्या, त्या मला दिल्या होत्या. पण मी त्या घेतल्या नाहीत. म्हणून त्या माझ्या झाल्या नाहीत. काल त्या इसमाने दिलेल्या शिव्या तु घेतल्या म्हणून तुझ्या मनात द्वेष उत्पन्न झाला आहे. ' त्या शिष्याने गुरूवर्याचे पाय धरले व क्षमा मागितली. क्षमा मागण्याची वेळ येऊ नये अशी आपली वृत्ती व वाणी असावी. क्षमा करण्याचे बळ आपल्यात निर्माण होईल असे कार्य करावे. कारण आपल्या धरणीमातेच्या अनेक नावापैकी एक नाव आहे 'क्षमा.' हाच या कथेचा बोध असावा.
वस्तुतः देवाचा जप वा स्त्रोत्र म्हणण्याने आपल्या भोवती असणार्या नकारात्मक उर्जाचे वलय कापले जाते आणि आपल्या भोवती एक सकारात्मक उर्जाचे वलय तयार होते. विश्वात धन आणि ऋण उर्जा आहेत. हा आधूनिक विज्ञानाचा शोध आहे. आंब्याच्या झाडावरून कोकीळेची सनई वाजत असते तर दुसर्या बाजूला घुबड, वटवाघुळे इत्यादी पक्षी आपल्या कर्कश, खेसकण्याच्या आवाजाने आपल्यात भिती व नैराश्य निर्माण करतात. तसे कर्कश खेसकणे आपण आजच्या मुहूर्तावर सोडून देऊ या. आपल्या ऋषीमुनींनी सृष्टीची एक व्याख्या दिली आहे.
' जी सृजन होते ती सृष्टी '. अशी व्याख्या देऊन ऋषीमुनीं थांबले नाहीत तर एक सुसंकृत समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. ऋषीमुनींनी दिलेली शिकवण आपल्या मेंदुतून हृदयांत विसावू द्यावी. म्हणजे आपल्या संस्कृतीवर, देवदैवातांच्या मंदिरा बाबत टिका करण्यार्यांचे हृदय परिवर्तन होवो की न होवो पण
' हे विश्वची माझे घर ' असे ज्यांनी मानले आणि आपल्या ज्ञानाने व मृदु स्वभावाने आपल्या जीवनात ते प्रत्यक्षात उतरविले अशा माऊलींची कृपा होऊन आपल्या हृदयात सदभावाचा झरा निर्माण निश्चितच होईल असे वाटते. अनेक वनस्पतीशास्त्रांच्या अभ्यासकांनी फळे, धान्य, भाजीपालांच्या रोपट्याची मशागत करतेवेळी उपनिषदांमधील प्रार्थना वा आपल्या संत साहित्यातील अंभग वाचले तर त्यावेळी निर्माण होणारे फळे, धान्य व भाजीपाल्यात कुठच्याही प्रकारचे बाधक जीवाणू प्रवेश करीत नाहीत हे सत्य आहे असे मानले आहे. म्हणजे दुधी , वांगी, भेडी, अशा भाज्या व आंबा, फणस, संपरचंद, पपई इत्यादी फळे नासकी निघत नाहीत. खगोलशास्त्राचे अभ्यासक मोहन आपटे यांनी ' मला उत्तर हवे ' अशा पुस्तकांत संगीताच्या आवडीने वा सानिध्यात रूक्ष वाटणार्या गणितासारख्या विषयात गती मिळते असे स्पष्ट मांडले आहे. अशी अनेक गुढे आपल्या पुर्वाश्रमींनी शोधली आहेत पण त्याची प्रसिद्धी त्यांनी केली नाही. कारण तसा विचार संन्यस्त वृत्तीच्या ऋषीमुनींच्या मनात येणार तरी कसा ?
आपली संस्कृती सर्वात प्राचीन आहे. आपले उत्सव ऋतुमानानुसार आहेत. उत्सवाच्या पाठीमागची कल्पना, व भावना ' समाज संघटीत व सुरक्षित राहावा ' अशी आहे. सांप्रतच्या स्थितीत आपण अंतःकरणातून सर्वत्र सकारात्मक दृष्टीने पाहु या. विजयश्री देवी हातात हार घेऊन आपली वाट पाहते आहे.