राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार यांनी अलिकडे म्हटले की, " समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवरायांचे गुरू नव्हते." त्यावर समाज बांधवांनी कुठली ही प्रतिक्रीया दिली नाही. रामदास स्वामींच्या शिष्यांनीही काही गदारोळ केला नाही. यावरून समर्थ रामदास स्वामींनी समाजाला दिलेली राष्ट्रधर्माची शिकवण किती मजबूत आहे याचे प्रत्यंतर आले आहे. कोण्या वारकर्यांने शरद पवारांना हिंदू विरोधी म्हटले त्यावर ही समाज माध्यमातून गदारोळ दिसला नाही. ज्या कोणी वारकर्याने ते विधान केले त्यावर उलट शरद पवारांनी स्वतःहून प्रत्युत्तर दिले आहे. काय होते ते प्रत्युत्तर ? म्हणे, ' माझ्यावर टिका करणार्या वारकर्याला खरा वारकरी धर्मच समजला नाही.
वरील दोन्ही विधानावरून शरद पवारांना खरोखरीच राष्ट्रधर्म व वारकरी धर्म कळले आहेत का, की जाणून-बुजून शरद पवार त्याकडे दुर्लक्ष करतात असा प्रश्न पडतो. खरा वारकरी आपल्यावर टिका झाली तरी सुद्धा त्या टिकेवर उत्तर देत नाही. त्याला त्याच्यावर केलेल्या टिकेचे भान ही नसते. कारण त्याने ' हे विश्वची माझे घर ' असे मानलेले असते. शरद पवार हे मुलतः राजकीय क्षेत्रातील नेते आहेत. त्यामूळेच त्यांच्यावर कोण्या वारकर्यांनी केलेल्या टिकेवर त्यांनी उत्तर दिले. पण त्यांतून शरद पवार वारकरी धर्माचे व्याख्याते आहेत अशी समजूत थोडीच होणार ? शेवटी शरद पवार हे शरद पवारच होत.
' मराठा तितुका मेळावावा ' हा खरा महाराष्ट्रधर्म आहे. महाराष्ट्र धर्म म्हणजे महा राष्ट्रधर्म हाच खरा अर्थ आहे. मराठा या शब्दाचा अर्थ ' जो महाराष्ट्रात राहातो, ज्याची मातृभाषा मराठी आहे, व या देशावर जो काही परकीयांकडून आघात होईल त्याला सडेतोड उत्तर देत अटकेपार झेंडा रोवण्यासाठी सदैव तयार राहील तो मराठा !' आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांत रचना करण्याचे धोरण केंद्र सरकारने ठरविले तेव्हा संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीतून, महाराष्ट्र राज्याचा कलश हाती घेऊन आलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांना जेव्हा पत्रकाराने विचारले की हे मराठ्यांचे राज्य होईल का, त्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी
" हे मराठी भाषिकांचे राज्य आहे," असे समर्पक उत्तर दिले होते. ज्या यशवंतराव चव्हांणाना गुरू मानले त्या गुरूने दिलेल्या शिकवणीचा शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सत्तेसाठी जाणून-बुजून दुर्लक्ष केल्याची भावना महाराष्ट्रातील काही राजकीय अभ्यासक तसेच बहुतांश मतदारांच्या मनात आहे. म्हणूनच शरद पवार महाराष्ट्रात कधीही स्वबळावर सत्ता तर दूरच पण आपल्या राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाला मोठे यश मिळवून देऊ शकले नाहीत. स्वतःनीच रचलेल्या राजकीय खेळीमूळे शरद पवार देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकले नाहीत याबाबत कुणाचे दुमत नसावे. या संबंधी २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूक प्रचारकाळात 'शरद पवारांची माघार की हार ' या शिर्षकाच्या एका लेखात मी चर्चा केली आहे, त्यामूळे त्यावर अधिक चर्चा येथे नको करू या.
मराठ्यांचे राज्य, मराठ्यांचा इतिहास असे जे शब्दप्रयोग आपल्या बोलण्यातून येतात, त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा इतिहास प्रतिबिंबीत होत असतो. आपल्या देशात पश्चीम व वायव्य दिशेकडून आलेल्या सुलतानी व मोगलशाहीच्या आक्रमणातून स्थिर झालेल्या परकीय राजवटीने आपल्या धर्मावर, आपल्या संस्कृतीवर, आपल्या देवदेवातांच्या मंदिरावर, आपल्या समाजबांधवावर, माता-भगिनींवर केलेले अत्याचार व विध्वंसक धुडगुसीला सडेतोड उत्तर देण्याच्या पराक्रमाचा जो इतिहास आहे तोच तो मराठा धर्म. तोरणा किल्ल्यावर स्वराज्याचे तोरण बांधल्यापासून ते अटकेपार भगवा झेंडा फडकविण्याचा आणि नंतर मराठेशाहीच्या अखेरच्या पेशव्याचा ब्रिटीशाकडून पराभव झाल्यापर्यंतचा कालखंड हाच तो मराठाशाहेचा इतिहास. त्या संपूर्ण इतिहासात झालेले विजय व पराजय हे एक समाज म्हणून स्विकारण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि असा विचार करून समाजाला एका सुत्रात बांधण्याचे जे काही रचनात्मक कार्य केले जाते त्याचेच नाव आहे राष्ट्रवाद वा राष्ट्रधर्म. परंतु आपण लोकशाही राज्यप्रणाली स्विकारल्यानंतर, राजकीय पक्ष, निवडणूका व मतदान या गोष्टी ओघाने आल्या व त्यातूनच निवडणूका जिंकण्यांसाठी जाती-पातीमध्ये भेदभाव उत्पन्न करण्याचे शाॅट कट्स जन्माले आले, आणि दुर्दैवाने तेच आपल्या बहुपक्षीय लोकशाही व्यवस्थेचे स्वरूप बनले. त्यासाठी आपण मतदार म्हणून ही तितकेच जबाबदार आहोत.
अलिकडे शिवसेनेचे संजय राऊत ही इतिहासाचे दाखले देत असतात. त्यावर आदित्य ठाकरेंनी ' इतिहासापासून शिकत पुढे जावयाचे, इतिहास उरकून काढू नये ' अशी प्रतिक्रीया देत संजय राऊत यांना समज दिली. अर्थात तशी समज संजय राऊतानां त्यांनी दिली कारण आपण स्वतः या महाराष्ट्राचे युवराज आहोत या अहंकारातून. पण त्याच युवराजाने शरद पवार यांनी इतिहास उरकून नव्हे तर खोटा इतिहास मांडला त्यावर काही भाष्य केले नाही. कारण शरद पवारांच्या मेहनतीने आपले पिताश्री मुख्यमंत्री व आपण मंत्री झालो आहोत ही भावना जपावयाची होती. पण या भावनेत कृतज्ञता वा आदर व्यक्त होण्याऐवजी सत्तेसाठी शरद पवारांचे दास्यत्व स्विकारल्याचे दर्शन अधिक झाले. व्यक्ती एक पण दोन व्यक्तींच्या एकाच धर्तीच्या वक्तव्यावर भिन्न व्यवहार ! कुठे एकाला समज व सापत्न व्यवहार व दुसर्याला आदर द्यावयाचा वा त्याचे दास्यत्व स्विकारयाचे. यालाच आपल्या येथे राजकारण म्हटले जाते. श्री शरद पवारांनी समर्थ रामदास स्वामी संबंधी जे वक्तव्य केले त्याबद्दल आश्चर्य वाटले नाही. शरद पवार एक व्यावसायिक राजकारणी आहेत. त्यामूळे समाजातल्या जाती-जमातीत भेद कसा उत्पन्न होईल असे भाष्य करीत ते इतिहास मांडत असतात. ज्या दिवशी शरद पवारांनी समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत असे भाष्य केले त्याच दिवशी एबीपी माझा चॅनेलवरून संध्याकाळी समर्थ रामदास स्वामी हेच छत्रपती शिवरायांचे गुरू होते हे पुराव्यसकट टिव्हीवरून दाखविले. शरद पवार उघडे पडले. पण सुंभ जळला तरी पीळ जात नाही हेच खरे. त्यामूळे शरद पवारांनी कोण्या एका वारकर्याच्या टिकेला उत्तर दिले. शरद पवारांची विश्वासर्हता इतकी कमी झाली आहे की, ज्या वारकर्याने शरद पवारवर टिका केली त्याचा बोलाविता धनी सुद्धा शरद पवारच असावेत असे म्हटले तरी ते खरे वाटू शकते. शेवटी त्या वारकर्याला वारकरी धर्मच समजला नाही असे जाहीर कार्यक्रमात बोलून शरद पवारांनी काय साधले ते फक्त शरद पवारच जाणो.
शरद पवार सध्या सतत काही ना काही वक्तव्यें करताना दिसत आहेत. त्या पाठीमागे दोन करणें आहेत. त्यातील पहीले कारण म्हणजे पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमीत शहांनी, तीन तलाक, ३७० कलम, सीएए च्या माध्यमातून राष्ट्रवादाचे जे आव्हान उभे केले आहे, त्याला तोंड कसे द्यावयाचे या विंवचनेत शरद पवार पडले आहेत. फार मोठे कष्ट उपसून (की दुष्कृत्यें करून ) महाराष्ट्रात उभे केलेल्या सरकारातील शिवसेना व काॅग्रेस या घटकांमध्ये तणाव वाढून सरकार पडेल की काय ही भिती त्यांना सतत सतावीत आहे. महाविकास आघाडीच्या सरकार मधील महत्त्वाची खाती शरद पवारांच्याच पक्षाकडे आहेत. म्हणूनच विद्यमान सरकार टिकावे अशी इच्छा इतर दोन्ही पक्षांपेक्षा शरद पवारांची दांडगी दिसते. अलिकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 'आम्ही भविष्यात भाजपासोबत जाणार नाही असे कोठे म्हणतोय ' असे वक्तव्य करून या सरकारबाबत ते किती निष्ठावान आहेत हे कळून येते. त्यांना फक्त एकदा तरी मुख्यमंत्री व्हावयाची इच्छा होती ती पुरी झाली आहे बाकी शिवसेनेचा बादशहा तर राहणार आहोतच याहून अधिक मोठा वडीलोपर्जीत वारसा मिळण्याचे समाधान कुठे आहे. तर दुसरीकडे थोरात, अशोक चव्हाण व अधून-मधून पृथ्वीराज चव्हाण इत्यादी काॅग्रेस नेते ही शिवसेनेला इशारा देताना दिसत आहेत. हे सरकार पडले तर अधिक नुकसान शरद पवारांच्या पक्षाचे आहे. हे शरद पवार जाणून आहेत म्हणून सारा महाराष्ट्र जाती-जमातीत विभागला जावा असे राजकारण खेळण्याचे धोरण शरद पवार आखत आहेत. त्यातला सर्वात सोयीचा प्रकार म्हणजे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद उरकून काढणे हा होय. तसे पाहता, शरद पवारांची ती जुनीच खोड आहे. सध्या ती अधिक तीव्र झाली आहे इतकाच काय तो फरक. शरद पवारांचा राजकारणातील संधीसाधूपणा, जातीय कार्ड खेळण्याच्या सवयीचा, व फळापासून दारू बनविण्याची हौस इत्यादी संबंधी महाराष्ट्राचे जेष्ठ संपादक स्वर्गीय माधव गडकरींनाही वैताग आला होता. त्या वैतागातून त्यांनी लोकसत्तेतून
' काॅग्रेसचा प्रवास - साबरमती ते बारामती ' अशा शिर्षकाचा लेख लिहून शरद पवारांना समज दिली होती.
दुसरे कारण असे आहे की आज ना उद्या अजित पवार हे वेगळा पक्ष काढणार आहेत हे शरद पवारांना उमगले आहे. कारण एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत हा घराणेशाहीच्या तत्वावर जन्म झालेल्या राजकीय पक्षाला मिळालेला शाप असतो. अजित पवार यांचा मराठा समाजावर मोठा प्रभाव आहे मग सुप्रिया सुळेचं काय हा प्रश्न शरद पवारांना सतावीत असणारच. म्हणून शरद पवारांनी शिवसेनेशी सलगी वाढविलेली दिसते. त्यातून शिवसेनेला फायदा किती व नुकसान किती याचा विचार करण्यापेक्षा सुप्रिया सूळेंना शिवसेनेच्या माध्यमातून ओबीसी समाजात समर्थन वाढविण्याच्या विचाराला (म्हणजेच स्वार्थ साधणे ) शरद पवारांनी प्राधान्य दिले आहे. मग अजित पवारांना राज ठाकरेंशी संधान बांधावे लागेल. शेवटी महाराष्ट्रात सरकार भाजपा प्रणित आघाडीचे येवो वा शिवसेनाप्रणित आघाडीचे असो, पवार व ठाकरें घराणे राजकीय दृष्ट्या सुरक्षित राहू शकतील असा बेरकी हिशोब डोळ्यासमोर ठेवून शरद पवार आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात जातीय तेढ वाढतील अशाच राजकीय खेळी खेळण्याचा संभव आहे.
लागोपाठ दोन विधानसभा निवडणूकीत जीवाचे रान करूनही शरद पवारांच्या पक्षाचे साठ हून अधिक आमदार निवडून आले नाहीत. संसदेत सुद्धा राष्ट्रवादीची संख्या नगण्य आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन करूनही भाजपाचे आमदार गळाला लागले नाहीत. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाचे स्थान अबाधित आहे आणि जोवर दिल्लीत भाजपाचे सरकार आहे तोवर महाराष्ट्रातही भाजपाचे तेच स्थान अबाधित राहणार हे ही दिसते आहे. दिल्लीत वाजपेयीचे सरकर होते त्यावेळी जो मान शरद पवारांना होता तो ही आता मिळेनासा झाला आहे. युपीए मधील मुख्य पक्ष काॅग्रेस गोंधळलेल्या अवस्थेत आहे. इतर प्रादेशिक पक्षांचे नेते आपआपल्या राज्यात शरद पवारांच्या महाराष्ट्रातील ताकदीपेक्षा अधिक सरस आहेत. त्यामूळे शरद पवारांची फार मोठी पंचाईत झाली आहे. मग ' जायें तो जायें कहाँ 'अशी स्थितीत शरद पवारांना महाराष्ट्रातच ठाण माडंण्या पलीकडे दुसरा पर्याय तरी कुठे आहे. म्हणूनच महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यावर शरद पवारांनी, कुठलेही सरकार दरबाराचे पद नसताना भीमा-कोरेगाव प्रकरणात आपले नाक खुपसले. मोदी सरकारने एका झटक्यात शरद पवारांचे प्रयत्न हाणून पाडले. भीमा-कोरेगाव प्रकारणाचा तपास एनआयए कडे सोपवून शरद पवारांना त्यांनी महाराष्ट्रातच जखडून ठेवले. शरद पवारांना इथे महाराष्ट्रात भले कोणी चाणक्य मानो पण आपल्या उभ्या हयातीत शरद पवारांना दिल्लीच्या राजकारणात वजन प्राप्त करता आले नाही. तसे पाहता चाणक्याची वा छत्रपती शिवाजी महाराजाची उपमा कुठल्याही विद्यमान राजकीय नेत्याला देऊ नये. कारण चंद्रगुप्ताला राज्यसिंहासनावर बसवून स्वतः झोपडीत राहणारा चाणक्य पुन्हा जन्माला आलेला नाही. शिवाजी महाराज तर आपल्या सर्वांचे दैवतच आहे. ( या संबंधीची विस्तृत माहिती शिवमहाराज्यभिषेक दिन या शिर्षकाच्या तीन भागातील लेखांत मी दिली आहे) सारांश काय तर, चाणक्य काय, शिवाजी महाराज काय हे जन्माला यावे लागतात. त्यासाठी ब्रिटीश राजवटीत लिहलेल्या आपल्या देशाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात आपल्या पुर्वाश्रमींच्या पराक्रमाचा, त्यागाचा, विद्ववत्तेचा, समावेश करावयास हवा, आणि तो इतिहास आत्मीयतेने शिकवला जावयास हवा. उगीच आपआपल्या आवडत्या विद्यमान नेत्यांना चाणक्य वा शिवाजी महाराज म्हणून पदवी देण्यात काय आनंद मिळतो, देव जाणो !
अति सुंदर प्रस्तुति व पूर्वालोकन
उत्तर द्याहटवाधन्यवाद संजयजी !
उत्तर द्याहटवावस्तुनिष्ठ समर्पक व परखड विवेचन म्हात्रेजी, जाणत्या राजाचं काय ?
उत्तर द्याहटवाधन्यवाद बिवलकरजी!
उत्तर द्याहटवा