बुधवार १५ जानेवारी २०२० देशात सर्वत्र मकर संक्रातीचा उत्सव साजरा झाला. आपल्या संस्कृतीतील तो एक महत्वाचा सण. हा सण जवळ येऊ लागला असताना मनात काहीतरी लिहावे अशी ऊर्मी आली होती. काय करावे ? ब्लाॅगवर गेल्या वर्षी मकर संक्रान्तवर लेख पब्लीश केला असल्यामूळे मी त्यावर लिहणे टाळले. मकर संक्रान्त नंतर होळी. होळी नंतर गुडी पाडवा म्हणजे नववर्षप्रतिपदा हा सण जवळ येत आहे हे ही लक्षात आले. मग वर्षभरातील आपले सर्व उत्सव डोळ्यासमोर येऊ लागले आणि प्रश्नांची एक शृंखला उभी राहीली. सणवार--उत्सव केव्हा सुरू झाले, त्यांचे रचनाकार कोण आहेत, सणवार साजरे करण्यामागे काही तत्वें आहेत का? इत्यादी प्रश्नानंतर माझे मन थेट सृष्टीच्या उत्पत्तीपाशी येऊन थबकले. तसे होणे ही स्वाभाविकच म्हटले पाहीजे. कारण असे की उत्सव-सणवार फक्त मानव साजरा करतो आणि मानव जात सृष्टीच्या उत्पत्तीनंतरच निर्माण झाली हे त्रिकालातीत सत्य आहे. मानवाची हळूहळू उत्कान्ती होत, सुरक्षा कारणास्तव मानव समूहाने राहू लागला व नंतर समाज निर्माण झाला. समाजातील लोकांच्या परस्पर देवाण-घेवाणातून आणि व्यक्ती तितक्या प्रकृती या नियमानूसार जगभरात भिन्न पण स्थिर संस्कृती आकारास आल्या, असे इतिहास सांगतो. आपल्या सणवार-उत्सवासंबंधीत प्रश्नांची उत्तरे शोधावयाची असतील तर या विश्वाच्या उत्पत्तीवर ढोबळ मानाने चर्चा करणे गरजेचे वाटते. (या संबंधीची सविस्तर माहितीसाठी कृपया ब्लाॅगवरील ईशावास्यम इदं सर्वम् हा लेख वाचावा) म्हणून प्रथम त्यावर चर्चा करू या मग आपल्या उत्सवासंबंधीच्या पंरपंरेकडे वळू या.
विज्ञान म्हणते, बिंग बँग (मोठा स्पोट) झाला व त्यातून हे विश्व निर्माण झाले. या बाबत दूमत असण्याचे कारण नाही. पण तसा स्पोट का झाला, याबाबत आपण आज ही अनभिज्ञ आहोत. विज्ञान म्हणते हे विश्व अपघाताने निर्माण झाले तर आपले अध्यात्म सांगते, की विश्वाचा जन्म होण्याअगोदर काही तरी अस्तित्वात होते, म्हणून म्हणून सृष्टीची निर्मिती ही ईश्वराची लीला आहे. विज्ञान म्हणते तेजातून विश्व निर्माण झाले, आपले अध्यात्म म्हणते देव हा सृष्टीचा निर्माता आहे. देव हा शद्ब संस्कृत भाषेतला व त्याचा अर्थ ' तेज 'असा होतो. आजचे विज्ञान म्हणते When nothing was in existence in the universe, time was there in the Universe आपल्या समाजास विज्ञानानी मांडलेले हे सत्य हजारो वर्षापुर्वी पासून ज्ञात होते असे मानले जाते. ऋग्वेदात म्हटले आहे, " त्यावेळी ना सत्य होते ना असत्य, ना दिवस होता ना रात्र, ना पृथ्वी होती ना अंतरिक्ष, ना मृत्यू होता ना जीवन. सर्वत्र अंधकार , अंधकारच होता. त्याचेच नाव काळ वा महाकाळ असे म्हटले जाते. त्याचेच नाव शीव. त्या शीवतत्वास वाटले की आपण एकटे आहोत आता आपण अनंत होऊ या आणि पुढे त्यातून ते एक तेजोमय असे चैतन्य निर्माण झाले. त्याच तेजोमय चैतन्याचा एक अंश म्हणजे आपल्याला प्रकाश देणारा तो सूर्य. सूर्याला तेजोमय चैतन्याचा अंश असे म्हटले याचे कारण या ब्रह्मांडात अनेक सुर्यमाला आहेत असे विज्ञान म्हणते तसेच भगवान श्रीकृष्णानेही कुरूक्षेत्रावर आपल्या अनंत विभूती आहेत व त्याचे वर्णन करणे प्रशस्त नाही असे सांगत फक्त प्रमूख विभूती अर्जूनाला कथन केल्या आहेत. त्यातलाच तो (ज्योतिषाम् रवीःअंशुमान् |) सूर्य. आपण त्याला सूर्यनारायण मानतो व पूजा करतो. कारण पृथ्वीवर जी काही जीवसृष्टी निर्माण झाली ती सूर्यप्रकाशामूळे. पुढे क्रमाक्रमाने सृष्टी उत्क्रान्त होत गेली. सृष्टीचा जन्म म्हणे करोडो अब्ज वर्षापूर्वीचा आहे. सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा आहेत. एक धन उर्जा व दुसरी ऋण उर्जा. ऋण उर्जेमूळे पाणी, खतें, प्रकाशाची गरज न लागता आपोआप काटेरी झुडपें वाढत असलेली आपण पाहातो. पण फळे, भाजीपाला, धान्य इत्यादीची निर्मितीसाठी उर्जा, पाणी, खतें इत्यादीची गरज लागते. जी सृजन होते ती सृष्टी. आपल्याला उपयोगी न पडणार्या काटेरी झुडपांना जमीनीतून उखडून फेकावी लागतात. कारण ती मानवाला आवश्यक असणार्या अन्न निर्मितीत मोठा अडसर निर्माण करतात. विधात्याची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे मानव. त्याला ईश्वराने शक्ती, मन व बुद्धी इत्यादी गोष्टी दिल्या आहेत. म्हणूनच सृष्टीला सृजन करण्याचे कार्य मनुष्य प्राण्यावर आले असावे. संस्कृती म्हणजे मानवाची होत गेलेली उत्कान्ती. ह्या सृष्टीत सर्वात पहिली प्रगत संस्कृती आपल्या येथे वेदकालात होती असे अनेक पाश्चात्य व पौर्वात्य विचारवंतानीही मान्य केले आहे. म्हणजेच सृष्टीला सृजन बनविण्याचा शुभारंभ आपल्या ऋषीमूनींनी केला असे म्हणणे ना चूकीचे ठरते ना आत्मप्रौढीचे.
वैदिक काळाचा इतिहास सांगतो की कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमद्गनी, वशिष्ठ, अगस्ती इत्यादी ऋषीमूनींनी प्रातःकाळीचे ईशवंदन पासून प्रातःविधी, दंतमंजन, स्नान इत्यादी शरीरधर्माची कर्में, अन्न, वस्त्र, निवारादि मूलभूत गरजा भागविण्यासाठी लागणारी श्रमसाधना व उपभोग करणे, शेती, वाणीज्य,इत्यादी व्यवसाय व कुटीरोद्योगाचे ज्ञानार्जन व त्यासाठी लागणारी अवजार्यांची निर्मिती, सूरक्षासाठी विविध हत्यार्यांची निर्मिती, युद्धनीती, पाककला, योगशास्त्र, नृत्य, संगीत, इत्यादी कला आपआपल्या आश्रमातून शिकविले व समाजाला सुसंस्कृत केले. भारताच्या पश्चीम व पश्चमोत्तर कश्यप ऋषीनीं, अत्री व जमदग्नी ऋषीनीं मध्य भारत, आर्यावर्तमध्यें भृगू, उत्तरपुर्वेस विश्वामित्र, वसिष्ठ,तर दक्षिणेस अगस्तींनी समाजाला सुसंस्कृत बनविण्याचे कार्य केले असे वैदिक संस्कृतीच्या इतिहासातून वाचल्याचे आठवते.
मानवी जीवन सुसंस्कृत व्हावे यासाठी अनेक ऋषीमुनींनी प्रचंड तपस्या, चिंतन केले. त्यातून उपनिषदे, स्मृती, श्रुती, ब्राह्मण्यके, आरण्यके, पुराणे, निर्माण झाली. सृष्टीला सृजन बनवायचे असेल तर ते कार्य सृष्टीच्या सौंदर्याला धक्का न लावता करणे गरजेचे असते याबाबत ऋषीमुनींच्या दुरदृष्टीत साम्य आढळते. पुढे सृष्टीत ठराविक वेळेला होणार्या बदलांना ऋतुमान म्हणण्यात आले. मग कालगणना अस्तित्वात आली त्यातून तिथी व पक्ष निर्माण केले गेले. प्रकाश म्हणजे रोशनी, म्हणजेच उत्साह(जीवन) व अंधकार म्हणजे नैराश्य (मृत्यू) या संकल्पनातून दिवसातील प्रकाशमय( Brighter) वेळेसाठी शुद्ध पक्ष व अंधकारमय (Darker) वेळेसाठी कृष्ण पक्ष असे संबोधण्यात येऊ लागले. ऋतुमानावरील चिंतन करतेवेळी आपल्या ऋषीमुनींनी शरीरधर्म कसा सांभाळावा यावर चिंतन केले असावे. त्यातूनच ' शरीरमाद्यम् खलू धर्मसाधनम् ' या वचनाचा उद्घघोष झाला. धर्म, अर्थ, काम, मोक्ष इत्यादी कार्यें शरीराद्वारे पार पाडायची असतील तर शरीर निरोगी राहणे आवश्यक असते. त्यातून ऋतुमानानूसार आहार-विहारा संबंधी नियम करण्यात आले असावे. आजचे विज्ञान ही स्थलकालनुसार आहार घ्यावा असे सांगते. ऋतुकालानुसार आहार-विहाराचे नियम पाळले तर शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढतेच पण सोबत ज्या ऋतुत जे जमिनीत पिकते ते खाल्ले तर निसर्गाच्या नियमाशी सुसंगत असते. त्यातून पर्यावरणाची हानी होऊ द्यावयाची नाही हे ध्येय ही साध्य करता येते.
आपल्या संस्कृतीत व्यक्ती व कुटूंब, कुटूंब व समाज, समाज व राष्ट्र, राष्ट्र व जग इत्यादीसंबंधीचा विचार जो केला आहे, तो फार व्यापक आहे. उपनिषदातील प्रार्थना तसेच सुभाषितांचा अभ्यास केला की आपल्या ऋषीमुनींच्या बुद्धीची व समाजहिताची त्यांची तळमळ पाहता आपण आवाक होऊन जातो. समाज व्यवस्था कशी असावी यावर चिंतन करीत असता चातुर्वण्यम मया सृष्टी गुणकर्मविभागशः या शाश्वत सत्याची प्रचीती ऋषीमूनींना झाली असावी. प्रत्येक व्यक्ती जन्माला येते ती स्वतःचा वर्ण घेऊन. वर्ण व्यवस्थेचा अर्थ म्हणजे, प्रत्येक व्यक्तीला एक स्वतंत्र अस्तित्व आहे, व आपल्या रूचीनुसार, कूवतीनुसार, प्रकृतीनुसार वा बालवयात झालेल्या संस्कारातून ती आपले कर्माचरण म्हणजे व्यवसायाची निवड करते हे मान्य करणें होय. (वर्ण व्यवस्थेसंबंधी अधिक माहिती साठी कृपया चातुर्वण्यम् मया सृष्टी गुणकर्मविभागशः'हा ब्लाॅगवरील लेख वाचावा) वर्ण व्यवस्थेला जाती व्यवस्था मानणे, भेदाभेद व उच-नीचता मानणे म्हणजे सृष्टीत जी विविधता आहे , तिच्या स्वरूपालाच किंवा अस्तित्वालाच धोका निर्माण करणे होय. हाच विचार आपले शास्त्रकार, संत-महात्मे, महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक,आचार्य विनोबा भावे, स्वातंत्र्यवीर सावरकर, पंडीत दिनदयाळ उपाध्याय, साने गुरूजी, इत्यादी थोर पुरूष, पांडूरंगशास्त्रीजी, प्राध्यापक शिवाजीराव भोसले, प्रा राम शेवाळकर, प्र ग सहस्त्रबुद्धे सारखे प्रवचनकार, भारतीय अध्यात्माचे मेरूमणी स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ, व स्वामी दयानंद सरस्वती तसेच अनेक समाज सुधारक, कवी, साहित्यिक, व धर्मगुरूनीं मांडल्याचे त्यांच्या जीवन चरीत्रातून व त्यांच्या साहित्यातून दिसते.
प्रत्येकामध्ये असलेल्या गुणाचा उपयोग समाजहितासाठी करता येईल, अशी समाजव्यवस्था ऋषीमूनींनी उभी केली. या संदर्भातील वचन सुपरिचीत आहे, ते पुढील प्रमाणे आहे --
अमन्त्रम् अक्षरं नास्ति नास्ति मूलम् अनौषधम् |
अयोग्यः पुरूषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः ||
एक ही मंत्र असा नाही की त्यात अक्षर नाही, एक ही वनस्पती अशी नाही की जिच्यात औषधी गुण नाही. तसेच एक ही व्यक्ती अशी नाही की जी सर्वथा अयोग्य ठरते. वानवा असते ती फक्त योग्य ती योजना करून तिचा उपयोग करून घेणार्यांची. सर्वानी एकाच प्रकाराच्या कामाची वा व्यवसायाची अभिलाषा धरली तर मात्र संघर्ष व अनावास्था ओढवते. आजकाल आपण ते अनुभवत आहोत पण त्यावर इथे चर्चा नको करू या.
अयोग्यः पुरूषो नास्ती ह्याचा अर्थ समाजातील प्रत्येक व्यक्तीकडे कसली तरी क्षमता असतेच. एकदा का या सिद्धांतावर श्रद्धा ठेवली की प्रत्येक व्यक्तीचा समाजासाठी उपयोग करून घेता येतो असे आपल्या ऋषीमुनींचे म्हणणे असे. आपल्या ऋषीमुनींना आप्त असे संबोधले जाते. आप्त म्हणजे आपपरभाव नसणे. ऋषीमुनींमध्ये कोणाविषयी फाजील प्रेम नसे व द्वेष ही नसे. सर्वांच्या बद्दल समान रूपाने कल्याणकारी भावना त्यांच्या हृदयात पाझरत असे. स्पटिकमणी प्रमाणे मातीचे ढेकूळ प्रतिबिंब ग्रहण करू शकत नसले तरी ते सर्वथा निरोपयोगी नसते. फूलाफळांच्या कलमासाठी तसेच घराची भिंत बांधण्यासाठी उपयोग होतो ह्याची प्रात्याक्षिके सर्व ऋषींनी आपआपल्या गुरूकूलात करून दाखविली व समाजाला सज्ञान केले. म्हणूनच साने गुरूजी, प्राध्यापक प्र ग सहस्त्रबुद्धे सारखी विद्वान मंडळीनी त्यांचा ' प्रयोग करणारे ऋषी ' असा गौरव केला आहे. तसेच आधूनिक वैज्ञानिकांचा ही त्यांनी आधूनिक ऋषी म्हणून गौरव केला आहे हे आपल्याला विसरता येत नाही. शेवटी ज्ञानाची कास म्हणजे ईश्वराचे ध्यानच की. असो. पुढे समाज कुठल्या माध्यमातून एकत्र येऊ शकतो यावर ऋषीमूनींनी खल केला असावा. सर्वसाधारणतः दैनंदिन प्रपंचाच्या रडगाण्यातून समाजात मरगळ येत असते. समाजात नवा जोश वेळोवेळी निर्माण व्हावा, समाजबांधवाच्या परस्पर भेटीगाठी व्हाव्यात व एकोपा निर्माण व्हावा त्यातून उत्सव व सणवाराची रचना ऋषीमूनींनी केलेली दिसते.
पण हे उत्सव साजरे करताना सृष्टीच्या सौंदर्याची हानी होता कामा नये अशी दक्षता पाळावी म्हणून ऋतुनुसार उत्सवाची रचना करण्यात आलेली दिसते. पृथ्वीच्या स्वतःभोवती व सूर्याभोवतीच्या भ्रमणातून होणारे बदल म्हणजेच ऋतू होत. प्रत्येक ऋतुचे एक आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे आणि त्या वैशिष्ट्यात दोष नसतात. जे दोष आपल्याला जाणवतात त्याचा दोष सर्वस्व सृष्टीचे पुत्र म्हणून आपल्याकडेच अधिक असतो. आपला व्यवहार सृष्टीच्या नियमानुसार होत नसतो. आपल्या येथील प्रत्येक सणवाराची रचनाच मूळी सृष्टीच्या नियमानुसार आहे. त्याच्या पाठीमागे केवळ धार्मिक तत्व नसून वैज्ञानिक तत्वं, समाजशास्त्रीय व शरीरशास्त्रीय तत्वं आहेत. मकर संक्रान्तीच्या उत्सवाचे उदाहरण वानगी दाखल घेतले तर आपल्याला हे पटू शकते. हजारो वर्षापासून संक्रान्त म्हणजे सुर्याचे उत्तरायण म्हणजे सुर्यप्रकाश पृथ्वीवर अधिक वेळेसाठी असतो, म्हणजे दिवस मोठे, म्हणजे उत्साह अधिक हे आपण जाणत आलो आहोत. तो एक सण म्हणून आपण साजरा करीत आहोत आणि आधूनिक विज्ञानाने त्याला खगोलशास्त्रीय घटना म्हणून मान्यता दिली आहे हे आपल्या वैदिक ऋषीमूनींचा एक प्रकारे मोठा सन्मानच आहे. म्हणूनच आपण उत्सव साजरे करतो ते केवळ कर्मकांड न राहता आपले ऋषीमुनी व सृष्टीसंबंधी कृतज्ञता व्यक्त करण्याचे ती एक कर्तव्य भावना ठरली व तिचे पालन आजतागायत सुरू आहे. जसा जागतिक योग दिन समजला जाऊ लागला, तसाच मकर संक्रान्तीला ही जागतिक संक्रान्त दिवस समजला जावा अशी मागणी आपण केली तर ती सांप्रादायिक ठरेल असे वाटत नाही. गेल्या वर्षीच्या मकर संक्रान्त वर एक लेख लिहीला आहे. त्यामूळे अधिक काही सांगत नाही पण जाता जाता मकर संक्रान्ती उत्सवाच्या पाठीमागील समाजशास्त्रीय तत्वाची जाणीव करून देणारी एक कथा आठवली आहे, ती देऊन या लेखाची समाप्ती करतो.
मकर संक्रान्तीला पतंग उडविण्याच्या खेळाची ही गोष्ट आहे. एक पिता-पुत्र जोडी पतंग उडविण्याची मजा लुटत असते. हवा चांगली वाहात असल्यामूळे पंतग चांगल्या उंचीवर पोहचले होते. मुलाला पंतग आणखिन उंचीवर जावयास हवे असते. म्हणून तो पिताश्रीला म्हणतोय, बाबा, पतंग अजून वर जाऊ द्या की '. बाबाने उत्तर दिले, 'बाळा आपल्याकडील धागा संपला आहे. आता पतंग आणखिन वर कसे जाणार? मुलाने विचारले, ' बाबा पतंग धाग्यामुळेच वरती जाते ना !' बाबा म्हणाले, ' होय.' त्यावर मुलगा म्हणाला, बाबा, आता धागा तोडला तर पतंग आणखिन वर जाईल की नाही ! बाबा म्हणाले, हो.' मग मुलाने हट्ट धरला, बाबा धागा तोडा व जाऊ द्या पतंग आणखिन वर.' त्याच्या बाबाने धागा तोडला. पतंग वार्याच्या वेगाने आणखिन वर वर जाऊ लागले, मुलाने आनंदाने टाळ्या वाजविल्या. पण थोड्याच वेळात ते पतंग वार्याच्या गतीने धाडकन खाली आले, फाटले व एका झाडावर लटकले. मुलगा हिरमूसला. उद्या आपण नवीन पतंग आणू की असे म्हणत बाबाने त्याचे सांत्वन केले. घरी परतत असताना बाबाने आपल्या मुलाला सांगितले, " बाळा, वरवर जाणे गमतीचे व आनंदाचे असते. उंचावर पोहचणे म्हणजे आपली उन्नती, भरभराट. भरपूर पैसा, बंगला, गाडी असे ऐश्वर्य. पण आपल्याला त्या ऐश्वर्याचा गर्व झाला की आपण आपल्याच माणसाला तुच्छ लेखतो, आपण नाती-गोती विसरतो, समाज, स्वदेश, स्वभाषा, संस्कृती तुच्छ लेखतो. आपण बंध सोडतो व आपण आपल्याच हवेत वाहातो आणि शेवटी त्या पतंगसारखे खासकन खाली पडतो, फाटतो व लटकून राहातो. पंतगाला जसा दोराचा बंध असतो तसाच आपल्या जीवनात आपल्या आई-वडीलांचा, आप्त-मित्र मंडळीचा, समाजाचा, देशाचा बंध असतो. तो तोडावयाचा नसतो. बरोबर आहे ना ! मुलाला आपल्या वडीलांचे म्हणणे पटते व उत्तर देतो 'बाबा यु आर ग्रेट !'
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा