गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१९

सुप्रिम कोर्टाचा निकाल व महाराष्ट्राची स्थिरतेकडे वाटचाल



आताच महाराष्ट्रात नवीन सरकार अस्तित्वात आले. नवीन सरकारचे हार्दिक अभिनंदन ! सुप्रिम कोर्टाने मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी देवेंद्र फडणवीस सरकारला बुधवारी २७ नोव्हेंबरला पोर्टेम सभापतीच्या अध्यक्षतेखाली विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचा निकाल दिला. त्याबद्दल न्यायपालिकेचे कौतूक करावे तितके कमी आहे. वस्तुतः आपल्या देशात न्यायपालिका आणि कार्यपालिका मध्ये आपआपल्या अधिकारासंबंधी सुप्त स्पर्धा आहे असे ऐकीवात येत असते. मात्र महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या निर्णयात पक्षपात होता असा आरोप विरोधकांनी केला होता तरी पण आपल्या निकाल पत्रात न्यायालयाने त्यासंबंधी काही भाष्य केले नाही ही बाब उल्लेखनीय आहे. 

केंद्रातील काॅग्रेस व मित्र पक्षांच्या राजवटीत  तसेच अनेक राज्यातील  प्रादेशिक पक्षांच्या व साम्यवादी पक्षांच्या राजवटीत संविधानाची मूलभूत तत्वे पायाखाली तूडवून भाजपावर अन्याय केल्याच्या घटना झालेल्या आहेत. आजही बंगाल व केरळ राज्यात होत असतांना दिसत आहेत. म्हणून महाराष्ट्रातील सत्ता स्पर्धेत भाजपाने केंद्रातील सत्तेच्या ताकदीवर  राजकारणातील सत्तेच्या स्पर्धेत खुमखूमी दाखविण्याचे वर्तन केले ते भाजपाला शोभेसे नव्हते अशी चर्चा भाजपामध्ये ही झाली असे ऐकू येते. त्यामूळे विरोधकांनी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर टिका केली ती रास्त आहे असे समजून त्यातून भाजपानेही धडा घ्यावयास हवा.

पण इतके दिवस सत्ता वाटपात वेळ घालविला होताच मग ३० तारखेपर्यंत महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते थांबले असते तर त्यांचा आपल्या आमदारांवर विश्वास होता हे सिध्द झाले असते. बहूमत सिध्द करण्याएवढे संख्याबळ असून न्यायालयात ही मंडळी गेल्यामूळे  विरोधी पक्षांनी आपल्या आमदारांना बंधिस्त व दामदाटी करून विजय मिळविला आहे अशी आशंका निर्माण झाली होती त्याचे निराकरण करणे तसेच पडून राहीले आहे.  ही बाब महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते , कार्यकर्ते व समर्थकांनी लक्षात ठेवावयास हवी. तसेच ज्या मोदींचा ही मंडळी द्वेष करत आले आहेत त्या मोदींच्या ' सबका साथ सबका विकास ' या टॅग लाईन मधील विकास शद्ब देशातील शिवसेना सकट (जी शिवशाहीच्या शद्बाचा केवळ उच्चार करते) छोट्या मोठ्या तमाम विरोधी पक्षीयांच्या नेत्यांच्या नुसता मुखीच नाही आला तर आज शिवसेनासकट सर्वच विविध पक्षांच्या आघाडीच्या नामकरणात आला हे प्रांजळपणे त्यांनी मान्य करण्याचा मोठेपणा दाखवयास हवा असे वाटते. 

राष्ट्रवादी काॅग्रेस मधील कौटुंबिक वादात अजित पवारांची हार होताच त्यांनी  परवा कोर्टाचा निकाल आल्यानंतर  स्वतःचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर आपल्याकडे संख्याबळ नसल्याने फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन आपण सरकारचा राजीनामा द्यावयास जात आहोत, हे जनतेला जाहीर केले. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंगासारखं जनता पार्टीचे सरकार पाडून  त्यांनी सत्ता काबीज केली नव्हती. म्हणून ते जाहीर रित्या राजीनामा देण्याचे धाराष्ट्य करू शकले. अजित पवार स्वतःहून बंड करून फडणवीसांकडे आल्यामूळे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने अजित पवारांच्या बंडाला तात्काळ पाठींबा देऊन सरकार स्थापन केले. पण सरकार स्थापन करण्याची रीत वापरण्यामध्ये चूक झाल्यामूळे  भाजपाची नाच्चकी झाली. करावे तसे भरावे हा सृष्टीचा नियमच आहे. ह्याच नियमाचा तडाखा अजित पवारांच्या बंडाने शरद पवारांनाही बसलाच की. भाजपाने सत्ता स्थापन करण्याबाबतची जी रित  वापरली या संबंधीची जी टिका झाली त्यात फक्त भाजपाकडून राजकारणात नैतिकतेचा आग्रह करण्यात येतो हे सत्य नाकारता येत नाही. असो. एकंदरीत  राज्यातील अस्थिरता संपली ही चांगली गोष्ट आहे, त्याचे मनापासून स्वागत आहे. आपल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी सरकार स्थापण्याच्या निर्णयासंबंधी बोलताना, अजित पवारांनी सहकार्याची हमी दिल्यानंतर राज्यात तीन-चार पक्षांच्या सरकार पेक्षा दोन पक्षांचे सरकार अधिक स्थिर राहू शकते हीच भावना ठेवून सरकार स्थापन केले होते हे स्पष्ट केले. हे स्पष्ट करताना त्यांचा कुठेही मानसिक गोंधळ दिसला नाही  त्या अर्थी घाईने सत्ता स्थापन करण्याचा दोष फडणविंसापेक्षा भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे अधिक जातो असे मला वाटते. शिवसेनेने जनादेशाची प्रतारणा केली ह्याचा पुनरूच्चार फडणवीसांनी केला त्यात गैर काही नाही. तसेच सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडणून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले हे ही यथोचीत आहे. 

राज्यातील अस्थिरतेला बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उध्दव ठाकरें यांची मुख्यमंत्री पदाची लालच हेच प्रमूख कारण आहे. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला परंतु बाळासाहेबांची इच्छा स्वबळावर विधानसभेवर भगवा फडकावयाचे स्वप्न अधूरे राहणार असे दिसते. भगवा गेला व स्वबळाची गुर्मी ही संपली. आता ते पुढे गुर्मीत वागणार नाहीत अशी  खात्री झाली आहे. कारण दोन पक्षांच्या युतीचे नव्हे तर चार-पाच पक्षांच्या सरकारचे प्रमूख झाले आहेत ते ही जनादेशाची प्रतारणा करून. तरीही भाजपावर सडकून टिका करण्याची तयारी दर्शवित आहेत पण आघाडीचे सरकार चालवितांना त्यांना त्यासाठी वेळ मिळेल का ही शंका आहे. तसा वेळ न मिळणे हेच त्यांच्यासाठी योग्य ठरेल. कारण आतापर्यंत सत्तेत राहून ही  विरोधी पक्षांची भूमिका घेण्याची सवय जडलेल्या उध्दव ठाकरेंना सरकारच्या कारभाराची ॲप्रेन्टीसशिपची गरज आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाली त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व अनेक शुभेच्छा !  

नवे सरकार सत्तेवर आले आहे तरी सत्ता संघर्ष संपेल असे नाही. न्यायलयाचा चोवीस तासात बहूमत सिध्द करा असा निर्णय येऊनही जर अजित पवाराकडे राष्ट्रवादी पक्षांचे  दोन तृतीयांश आमदारांचे बळ असते तर फडणवीस व अजित पवारांचा विजय झाला असता. मग अशा वेळी न्यायालयाच्या निर्णयाला अर्थ राहीला ही नसता. याचा अर्थ आपल्या राजकीय व्यवस्थेत दोष आहे याकडे दुर्लक्ष करता येत नाही. तो दूर करण्यासाठी निवडणूक पूर्व यूती वा आघाडी संबंधी रितसर पुरावा निवडणूक आयोगाकडे देणे बंधनकारक ठेवण्याचा कायदा अस्तित्वात येणे गरजेचे आहे. म्हणजे निवडणूक निकालानंतर आपल्या मनाला येईल तसे वागण्याची राजेशाही वृत्तीचा बिमोड होऊन लोकशाही बळकट होण्यास मदत होईल. या बाबतीत सर्व पक्षीय सहमती होऊन तसा कायदा आपली संसद आणेल, तो भारतिय लोकशाहीचा सूदीन ठरेल.

बहूपक्षीय लोकशाही हे ही एक आपल्या देशाच्या लोकशाहीचे वैगूण्य आहे. बहूपक्षीय राज्यव्यवस्थेमध्ये मतदारांची पक्षीय विभागणी होऊन आधीच जातीव्यवस्था असलेल्या आपल्या देशात एक नवीन पक्षीय जात  वस्ती-वस्तीत निर्माण झालेली दिसते. प्रत्येक वस्तीत आपआपल्या घरावर भिन्न राजकीय पक्षांचे झेंडे व त्यांच्या नेत्यांचे फोटो दिसतात. आम्ही अमूक पक्षांचे, आम्ही तमूक पक्षांचे अशी भाषा गावा-गावात ऐकावयास मिळते व थोडासा वादविवाद झाला की  त्याचे पर्यावसन मोठ्या भांडणात होते. मग आपल्याच समाजबांधवांचे, देशबांधवांचे रक्त सांडले जाते. असे किती वर्षे सुरू राहणार ?  

आपल्या येथील घराणेशाही पक्षांची सद्दी संपणे आवश्यक आहे. कारण घराण्यातील सत्ता स्पर्धा हे ही राजकीय अस्थिरता निर्माण करत असते हे आपण घराणेशाही पक्षांच्या इतिहासातून अनूभवत आलो आहोत. महाराष्ट्रातील सध्याचा पेचप्रसंग निर्माण करण्यातील मोठा वाटा दोन राजकीय घराण्यातील नेत्यांचा आहे. बहुतांश घराणेशाही पक्षातील नेत्यांचे वर्तन इतिहासातील लहरी महमद तुघलका सारखे  असते. राजकारणात ते कधी पलटी मारतील याचा भरवसा देता येत नाही. दुर्दैवाने अशा नेत्यांच्या या वृत्तीचा गौरव होतो हे ही भूषणावह नाही. महाराष्ट्रातील सध्याच्या सत्ता पेचप्रसंगात पवार घराण्यातील वाद उघड झाला आहे आणि तो थांबेल असे मला वाटत नाही. ठाकरे घराण्यात उध्दव-राज यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता, त्यावेळी अनेक जेष्ठ राजकीय अभ्यासकांनी त्यावर मार्मीक उत्तर दिले होते ते असे आहे, ' एका म्यानात दोन तलवारी राहात नाहीत.' तेच उत्तर पवार घराण्यातील सत्ता स्पर्धेला लागू पडते. पण राजकीय अभ्यासक घराणेशाही संबंधी ना चिंता व्यक्त करतात ना शरद पवारावर टिका करतात. यापाठीमागे अर्थस्य पुरूषो दासः हेच कारण आहे. त्यामूळे शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना मिळालेल्या यशाच्या श्रेणीच्या अनेक पटीने कौतूक होत आहे असे मला वाटते. नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात संपूर्ण गुजरात भाजपामय केला. त्यातून ते देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. पण बाळासाहेब ठाकरे व शरद पवार स्वबळावर महाराष्ट्रातील एक हाती सत्ता घेऊ शकले नाहीत तसेच आपआपल्या पक्षांच्या खासदारांची संख्या वाढवू शकले नाहीत. मतदार जागृत होत आहे म्हणूनच काॅग्रेस, राष्ट्रवादी काॅग्रेस व शिवसेनेला महाराष्ट्रातील सत्तेत आज एकमेकांसमोर वाकावे लागलेले दिसत आहे. सत्ता स्थापन करण्यात त्यांना यश मिळाल्याचा त्यांना आनंद होणे नैसर्गिक आहे .पण या तिन्ही पक्षांची  वाढ खुटंली आहे ह्याची खात्री त्यांना ही पटली आहे. म्हणजे घराणेशाही पक्ष उतरंडीला लागले आहेत. यावरून आपली लोकशाही प्रगल्भ होत आहे हे दिसते.

मी ब्लाॅगवर लिखाण सुरू केल्यानंतर ज्या वाचकांनी माझे कौतूक केले त्यापैकी माझ्या एका मित्राने सत्तेचा तिढा या लेख मालिकेतील लेख वाचून मला परवा एका मेसेज मधून सल्ला दिला की, "  मित्रा, तु संघाचा स्वयंसेवक आहेस, तर तुझ्या कडून राजकिय अभिनिवेशात एका पक्षाची बाजू घेऊन लिखाण करणे अपेक्षित नाही."  माझ्या मित्राच्या सल्ल्याचे मी स्वागत केले व त्याला माझे प्रामाणिक उत्तर Whatsapp वर मेसेज द्वारा पाठविले. ते वाचून त्यांनी लाईक केले. मी संघाचा एक सामान्य स्वयंसेवक आहे, आणि त्याच  नात्याने उत्तर दिले आहे. याचा अर्थच असा आहे की संघात वैचारिक स्वातंत्र्य आहे. त्यासाठी संघाकडून परवानगी घ्यावी लागत नाही. तिथे ना व्यक्ती पुजा, ना घराणेशाही. तिथे फक्त संघभावना आणि राष्ट्र प्रथम.  माझे ते संपूर्ण उत्तर या लेखाचा विस्तार वाढेल हे माहीत असूनही ब्लाॅगर या नात्याने नम्रपणे आपल्या समोर ठेवून या  लेखाची समाप्ती करतो.

" गेल्या पाच वर्षात अनेक ग्रुपवरून मला भाजपेतर  पक्ष व त्या पक्षांच्या नेत्यासंबंधीचे तसेच भाजपा व भाजपा नेत्या संबधीचे टिकात्मक स्वरूपातील कार्टून (मेसेज) येत आहेत. मी त्यावर कुठलीच प्रतिक्रीया देत नाही. भ्रष्टाचार सर्वच पक्षातले नेते कमी अधिक प्रमाणात करीत असतात आणि त्यास भाजपा अपवाद नाही. म्हणून भ्रष्टचार व एकूण राजकीय व्यवस्थेतील वैगूण्यावरील विनोद वा व्यंगचित्रे स्वरूपातील पोस्टला मी लाईक करतो. एक मात्र निश्चीत की मी आपल्या राज्यव्यवस्थेतील  घराणेशाही पक्षांवर टिका करतो. दुर्दैवाने भाजपा व साम्यवादी पक्ष सोडले तर बहूतांश पक्ष घराणेशाही स्वरूपाचे असल्यामूळे माझे लिखाण सर्वच राजकीय पक्षांसाठी टिकात्मक वाटू शकते हे मला मान्य आहे. साम्यवादी पक्ष हिसेंवर आधारीत क्रान्ती वर विश्वास ठेवतात, म्हणून मी टिका करतो. साम्यवाद ही चीन व रशियात रूजलेली विचारसरणी आहे. ती विचारसरणी वाईट व त्याज्य आहे असे मी मानीत नाही पण आपल्या येथील साम्यवाद्यांचे प्रेरणास्थान रशिया व चीनमधील सत्तेवर असलेले नेते नसावेत अशी माझी धारणा आहे. त्यातही ही सृष्टी विवधतेने नटली आहे, म्हणून कायदे करून ते ही व्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने घालून, आम जनतेला देशाच्या राज्यव्यवस्थेत किंचितसा ही सहभाग न देता, एक पक्षीय राजवटीतून वर्गरहीत समाज निर्माण करणे हे निसर्गाच्या नियमाविरूद्ध आहे असे मला वाटते. सविस्तर माहीतीसाठी  माझ्या ब्लाॅग वरील  चातूर्वण्यम मया सृष्टी गुणकर्मविभागशः  हा लेख कृपया वाचावा. ज्या दिवशी भाजपा हा राष्ट्रीय स्तरावर वा कुठल्याही राज्य पातळीवर घराणेशाहीचे रूप घेईल तेव्हा मी भाजपा विरूद्ध तिखट लिखाण करीन. आजच्या घडीला भाजपा मध्ये लोकसभा, विधानसभा, व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत काही घराण्याच्या वारसांना तिकीट वाटप होत असते पण देश पातळीवर वा राज्यपातळीवर वा जिल्हा स्तरावर कुठल्या एका घराण्याच्या चरणी भाजपा वाहिलेला नाही, हाच माझ्या दृष्टीने संघ या शद्बाचा अर्थ.  माझ्या मते 
" सामूहीक नेतृत्व व सामूहिक शहाणपण व सहकार जिथे आहे तो संघ. अर्थात भाजपामध्ये ही संघ भावना कमी होऊ लागली आहे म्हणून भाजपाची महाराष्ट्रात घसरण झाली आहे. आज ही जातीवाद आपल्या देशात अस्तित्वात आहे हे दुर्दैव.  काही ठिकाणी, वर्ष प्रतिपदाच्या दिवशी शोभायात्रा काढल्या जातात त्या ही ज्ञाती संस्थाद्वारे काढल्या जातात ते ही मला पटत नाही. ज्या ज्या घटनात राजकीय पक्षाने आपआपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला आहे तिथे तिथे मी राजकीय अभिनिवेशावर लगाम घालण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणा दाखल  देशभक्ती ही नारेबाजीत नव्हे ती असावी अंतःकरणात,  चित्रपट व समाजमन,  मुक्काम पोस्ट भीमा-कोरेगाव येथून , इत्यादी असे लेख कृपया वाचावेत व जरूर प्रतिक्रीया द्याव्यात मी आपले स्वागतच करीन. "

" अलीकडे सोशल मिडीयावर जेष्ठ साहित्यीक श्री मधु मंगेश कर्णिक यांनी भाजपा व शिवसेनेच्या हिंदूत्वा संबंधी केलेली तुलना व्हायरल झाली आहे. श्री मधू मंगेश कर्णिक यांनी म्हटले आहे  की, ' शिवसेनेचं हिंदुत्व आपल्या अंगावरील शाल सारखं आहे, नको असेल तेव्हा बाहेर काढून ठेवायचं पण भाजपचं हिंदुत्व आपल्या शरीरावरील त्वचे सारखं आहे. ते आपल्या अंतिम श्वासासोबत राहते.' हाच धागा पकडून माझ्या बुद्धीच्या कुवतीनूसार हिंदु शद्बाची व्याख्या जसी कळली आहे ती इथे मांडत आहे.'' ही माझी मातृभूमी, पितृभूमी आहे अशी भावना ज्याच्या रोमारोमात आहे, इथली मूठभर माती हातात घेतल्यानंतर ज्याच्या डोळ्यात भक्तीचे अश्रू दाटतात , राम-कृष्ण विवेकानांदिचें चरीत्र वाचून जो नतमस्तक होतो , छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, गुरू गोविंदसिहं इत्यादींचे पराक्रमाच्या कथा वाचून ज्याची छाती अभिमाने ताठ होते, गंगायमूनादि समस्त नद्या, व  हिमालय सह्याद्री सारखे पर्वत पाहून ज्याच्या काळजात मुर्तीमंत पावित्र्य साकार होते, या भूमीतील सर्व ऋषीमूनी, संत महात्मे, सर्व भाषा, परंपरा,  साहित्यिक, शास्त्रज्ञ,  स्वातंत्रसंग्रामातील अंहिसा व क्रान्तीचा मार्ग स्विकारून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे सर्व थोर पुरूष,  समाजसेवक, समाजसुधारक, इत्यादी बद्दल ज्याच्या मनात नितांत आदर आहे, या भूमीतील कुठल्याही प्रान्तात नैसर्गिक आपत्ती आली की जो  जात-पात- भाषा-धर्म असा भेदभाव न करता समाजबांधवाच्या मदतीला धावून जातो,  वनवासी, गिरीजन, हरिजन आदिवासी, भटके जमात, दलीत- पिडीत, रूग्ण, गरीब-निरीक्षर, अनाथ-पोरके, शेतकरी-कष्टकरी, इत्यादीसाठी विविध सेवा प्रकल्प उभारतो वा अशा प्रकल्पात मदत करतो तो हिंदू. मग तो रामाची पूजा करो वा रहीमची, येशूची करो वा कोणाची ना करो."

" परवा शिवसैनिकांनी भाजपा कार्यकर्त्यांना डिचविण्यासाठी भाजपाच्या कार्यालयासमोर धिंगाणा घातला. विजयाच्या उन्मादात भाजपा कार्यकर्ते असे कृत्यं करीत नाहीत आणि केले असतील तर ते क्वचीत. भाजपा अनेक वर्षे विरोधी पक्षात होता. त्यावेळी भाजपाने सरकार विरोधी अनेक आंदोलने छेडली. पण  भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करण्याचा धुडगूस केलेला नाही. रामजन्मभूमी च्या मुक्तीसाठी भाजपाच्या व संघाच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती केली,  लाठीमार झेलला, कारावास भोगला व बलिदानही केले. रामजन्मभूमीचा निकाल लागला पण विजयाचा उन्माद केला नाही.  जो फरक सामना व तरूण भारत मध्ये आहे, जो फरक मार्मीक व साप्ताहीक विवेक आहे तोच फरक शिवसेनेचे कार्यकर्ते व भाजपा- संघाच्या कार्यकर्त्यांत आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांपेक्षा संघाचे स्वयंसेवक अनेक पटीने निरपेक्ष आहेत, हे जग जाहीर आहे. कारण संघ एक सांस्कृतिक संघटना आहे. संघ स्वयंसेवकांच्या मनात हिंदुत्व विचाराची शक्ती क्षीण होईल असा विचारच शिवला जात नाही मग समाजाची एकंदर शक्ती क्षीण होईल असे कृत्य करणें अशक्यच. भाजपाने शिवसेनेशी मैत्री टिकविण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. पण शिवसेना स्वतःहून भाजपा पासून फार दूर गेली आहे व जिथे गेली आहे, तिथे तिची वाढ होणे अशक्य आहे. हे एका परीने भाजपाच्या पथ्यावर पडणार आहे. कारण महाराष्ट्रातला हिंदुत्व विचाराचा राजकीय क्षेत्रातला भागीदार पक्ष आता राहीला नाही.  साप्ताहीक विवेक व तरूण भारत भाजपाची मुखपत्रे नाहीत.  जिथे जिथे भाजपाचे नेते चूकतात तिथे भाजपावर  प्रखर टिका केलेली असतेच. भाजपाचे सरकार नव्हते त्या काळात ही संघाचे काम जोमाने सुरू होते व भाजपाची सत्ता गेली तरी ही तितक्यात जोमाने सुरू राहणार आहे. कारण संघ म्हणजे सततचा धगधगता यज्ञकूंड आहे. हे सत्य समाजाने स्विकारले आहे. म्हणूनच माझ्या लिखाणात भाजपावर टिका कमी दिसली तर माझ्या मित्रांना थोडेफार खटकते. हा माझा दोष मी प्रांजळपणे स्विकारतो. माझ्या एका लेखात  राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ मधील विधानसभेच्या निवडणूकीत पराभव का झाला यावर भाजपावर टिका केलेली आढळेल. या तिन्ही राज्यात दहा ते पंधरा वर्षे सत्तेपासून वंचीत राहीलेल्या काॅग्रेस पक्षातील राज्यस्तरीय नेते व कार्यकर्त्यांनी चिकाटी व संघटन शक्तीच्या जोरावर विजय मिळविला त्याबद्दल मी माझ्या लेखात भरभरून कौतूक केले आहे. तो लेख वाचून संघ विचारावर टिका करणार्या माझ्या दुसर्या एका जिवलग मित्राने Perfect असा प्रतिसाद दिला आहे. त्याच लेखात  लोकसभेच्या २०१९च्या निवडणूकीत या तिन्ही राज्यात भाजपा पुन्हा अप्रतिम यश मिळवेल असे मी भाकीत केले होते. पण तसे भाकीत मी भाजपाच्या प्रेमापोटी नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला देशभरातून प्रतिसाद मिळतो त्या आधारावरच केला आहे."

" संघ विचाराला आज समाजात मान्यता वाढत आहे त्या पाठीमागे  निस्सीम त्यागी वृत्तीने  समाजाची सेवा करण्याचे अपार कष्ट व ते ही अविरतपणे संघ घेत आहे हे कारण आहे. पण हे सत्य विरोधी पक्ष लक्षात घेऊ इच्छीत नाहीत. भाजपा मध्ये संघ स्वयंसेवकांची संख्या अधिक असल्यामूळे भाजपाला फायदा होत असावा. पण तेच ध्येय ठेवून संघ आपले कार्य करीत नाही. संघाचे कार्य १९२५ पासून सुरू आहे. रात्रीच्या प्रशांत समयी दंव पडत असतांना त्यांचा यत्किंचित आवाज कोणाला ऐकू येत नाही परंतु सकाळी उठून पहावे तर त्या दंवाच्या थेंबानी सर्व फुले प्रफुल्ल आणि विकसित झालेली आढळून येतात, असेच संघाचे कार्य ही  गाजावाजा न करता अत्यंत शांतपणे होत आलेले आहे. समाजबांधवांची मनें विकसित करण्याचे व त्यांना चिरसुख देण्याचे ते कार्य आहे. देश सशक्त बनविण्याचे ते कार्य आहे. भाजपाची घटना वेगळी आहे. तो एक राजकीय पक्ष आहे. माझ्या तारूण्यात  अपघाताने मला राजकारणात जावे लागले कारण तो काळ सन१९७५ सालच्या आणिबाणीचा होता. सात-आठ वर्षे भाजपाचे काम केले असल्यामूळे भाजपाला झूकते माप माझ्या लेखात मिळत असेल तर ते स्वाभाविक समजावे."

" महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट एका रात्रीत उठवून फडणवीस व अजित पवारांचा शपथविधी उरकला त्यावर मी टिका केली नाही. याचे कारण अशी कारस्थाने भाजपाच्या विरोधात प्रत्येक राज्यात  विरोधी पक्षांनी केलेली आहेत. त्याची परतफेड करणे उचीत नाही पण आपल्या राजकीय व्यवस्थेत उचीत व अनुचीत यातील सीमा संपली असल्याने राजकारणात ती सहज प्रवृत्ती मानली गेली आहे. राजकारणात नैतीकतेचा आग्रह फक्त भाजपाकडून घेतला जातो,  हे कुठल्या न्यायात बसते? आपल्या येथे अनेक पक्ष आहेत व अनेक चॅनेल व वृत्तपत्रे असतात. सार्यांच पक्षांची मिडीयाशी सलगी आहे .व सारे पक्ष भाजपा विरोधात आहेत त्यामूळे भाजपावर टिकेचा भडीमार अधिक असतो पण प्रत्यक्षात भाजपाने सर्वात मोठ्या पक्षांचे स्थान पटकाविले आहे ते मतदारांच्या पाठींब्यामूळे.  शेवटी लोकशाही राज्यप्रणाली मध्ये राजकीय पक्षाची विश्वासहर्ता जनाधाराने मोजली जाते ही बाब स्विकारावी लागते.  त्यामूळे ही भाजपावर माझ्याकडून कमी टिका होत असावी हे ही मी मान्य करतो. जगभरातील मिडीया मग प्रिन्ट असो वा इलेट्रानिक्स येनकेन प्रकाराने राजकीय घडामोडी आपआपल्या राजकीय विचासरणीचे वा आपल्या हितसंबंधाचे चष्मे डोळ्यावर लावूनच विश्लेषण करीत असतात. त्यात मी तर एक ब्लाॅगवर लिहीणारा सामान्य नागरिक. मी काही धर्मराज युधीष्ठर नाही. इतके समजून घ्यावे."

असो, काल महाराष्ट्रातील नवनिर्वाचीत आमदारांनी शपथ घेतली. आज नवीन सरकार अस्तित्वात आले. त्या सरकारला एकच सांगणे आहे की इतका काथ्याकूट करून सत्तेवर बसणार आहात, तर पाच वर्षे अत्यंत तिखट शद्बात भाजपा सरकारवर टिका करण्याची सवय जडली आहे ती आपण सोडावी व तसाच सल्ला आपल्या कार्यकर्त्यांना देत राहा. शिवाजी पार्कवर शपथग्रहण केली आहे, तर १९७७ साली जनता पार्टीचा शपथविधी महात्मा गांधीच्या समाधीस्थळावर होऊन ही ते कोसळले. तसा कटू अनूभव महाराष्ट्राच्या वाट्याला न देता जनसामान्यांचा कैवार घेऊन पाच वर्षे स्थिर सरकार द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. नवीन सरकारला हार्दिक शुभेच्छा !
                        
                          वंदे मातरम् !

३ टिप्पण्या:

  1. आपल विवेचन मुद्देसुद आहे, पण या सर्व घडामोडी आनाकलनीय आहेत, पक्षीय आभिनीवेष वगळताही पुष्कळ प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. परंतु या मुळे महाराष्ट्र एका समर्थ मुख्यमंत्र्याला/राजवटीला मुकला हे भीषण सत्य. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...