सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१९

महाराष्ट्रातील सत्ता स्पर्धा -- भाजपाचा सर्जिकल स्ट्राईक



आताचा भाजपा हा वाजपेयी-अडवाणीचा नाही याची विरोधकांनी सतत आठवण ठेवावी असे मी मागील लेखात म्हटले होते. पण विरोधी पक्ष आपआपला सत्तेचा वाटा वाढविण्यात इतके गुंग झाले होते की राजकीय अस्थिरता, शेतकर्यांच्या समस्यांचे त्यांना भान राहीले नाही. नेमकी हीच वेळ साधून भाजपाने विरोधकांवर  सर्जिकल स्ट्राईक केला. हा सर्जिकल स्ट्राईक महाराष्ट्रावर होता असे उद्धव ठाकरे म्हणत असले तरी भाजपा-सेनेला मतदान केलेल्या सामान्यजनांना हा सर्जीकल स्ट्राईक विरोधी पक्षावर विशेषतः सेना व राष्ट्रवादी काॅग्रेसवर आहे असेच वाटत असावे. परवा सकाळी साडेआठ वाजता श्री  देवेंद्र फडणवीस आणि श्री अजित पवार ह्यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याची बातमी कळली, तेव्हाच अजित पवारांनी घरभेदी केली असावी असे मी ताडले आणि तसेच झाले असल्याचे रितसर टिव्हीवरून दिसले. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचे पाठबळ असताना पाकिस्तानवर दोनदा सर्जीकल स्ट्राईक करणार्या मोदी सरकारची नीती देशांतर्गत राजकारणात ठकास महाठक राहणार, हे गृहीत धरल्यामूळे  महाराष्ट्रातील विरोधी पक्षांवर केलेल्या सर्जीकल स्ट्राईक संबंधी मला बिलकूल आश्चर्य वाटले नाही. फक्त इतक्या लौकर ते महाराष्ट्रातील भाजपा विरोधकांना असा धक्कातंत्र देतील असे वाटले नव्हते. 

शरद पवारांनी युतीतील शिवसेनला फूस भरून भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्याची चाल केली ती चाणक्यनीती मानायची पण मोदी सरकारने खेळलेली चाल ही लोकशाहीचा गळा घोटल्यासारखी आहे असा आकडतांडव का करावा ? तमाम भाजपा विरोधकांचा संताप समजण्यासारखा आहे. पण शिवसेनेने जनादेशाचा मान न राखता विधानसभेत हरलेल्या पक्षांच्या सहाय्याने सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केले त्यातून भाजपा समर्थक व युतीला मतदान करणार्या सामान्यजंनाना संताप किती आला असेल असा विचार भाजपा विरोधकांनी लक्षात घेतला आहे का ?  विरोधी पक्षांची भूमिका व त्यांची राजकीय खेळी काय असावी याबाबतचा विचार बाजूला ठेवू पण सोशल मिडीयावर शिवसेना, राष्ट्रवादी काॅग्रेस व काॅग्रेस पक्षाच्या समर्थकांनी आपले सरकार स्थापन होत आहे असे दिसू लागताच आसूरी आनंद उपभोगलाच ना ! आनंद आणि आसूरी आनंद यात फरक असतो. तो लक्षात घेतला नाही की दुःखद बातमी आली की यातना भीषणच असतात. हा सृष्टीचा नियम आहे.  

प्रश्न नैतिकतेचा आहे , या बद्दल माझ्या मनात बिलकूल किंतू नाही. पण नैतिकतेचा प्रश्न महाविकास आघाडीला ही विचारला जावा असाच आहे की. आपल्या देशातील राजकारणाची पातळी घसरली ती इंदिरा गांधीच्या काळापासून हे आपण जाणत आहात त्यासंबंधीचा इतिहास मी एका लेखात मांडला आहे. म्हणून त्यावर अधिक चर्चा करण्याची गरज नाही. भ्रष्टाचारी अजित पवारांची सोबत भाजपाने कशी घेतली ? हा सर्वांच्या मनात घोळत असणारा प्रश्न असेल . पण या प्रश्नाचं उत्तर महाविकास आघाडी कडून प्रथम घ्यावयास हवे. परवा अजित पवार भाजपा सोबत गेले म्हणून भ्रष्टाचारी व महाआघाडीत होते तेव्हा ते स्वच्छ होते असे शिवसेनेने मानले ते योग्य कसे काय ठरते ? भाजपाने आपल्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी केला म्हणून या प्रश्नाचं भांडवल विरोधक वापरतील हे स्वाभाविक आहे. पण त्याच बरोबर 'आपल्या महाआघाडीत असे कितीतरी भ्रष्टाचारी नेते आहेत याकडे लक्ष द्या ' असे भाजपाकडून उत्तर आले की ते ही तितकेच स्वाभाविक मानावयास हवे. घराणेशाहीच्या पक्षांतील भाऊबंदकी हेच तसे पाहता सर्वात महत्वाचे  कारण महाराष्ट्रातील सध्याच्या सत्ता पेचप्रसंगात दडलेले आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद पटकावून राज ठाकरे यांनी केलेल्या बंडाचा धडा शिकविण्याची घाई झाली आहे. तर दुसरीकडे पवार घराण्यात अजित पवारांना सापत्न वागणूक मिळत असल्याची भावना आहे.  शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडले हे केवळ सत्तेसाठी असे मानता येत नाही. कारण तेव्हा शिवसेना सत्तेच्या जवळपास ही नव्हती. बाळासाहेबांच्या वार्धक्यात मातोश्रीमध्ये राज ठाकरेंना राजकीय निर्णय-प्रक्रीयेत जाणून-बूजून दूर ठेवले जात होते. अजित पवारांना तसाच अनुभव राष्ट्रवादी काॅग्रेस मध्ये येत राहीला आहे. त्यामूळे अजित पवारांनी बंड केले. ठाकरे घराणे व पवार घराणे फुटल्याचे अनेकांना अतीव दुःख झाले असावे पण त्यावर इलाज काही नाही. शेवटी आपली लोकशाही घराणेशाहीच्या विळख्यातून सुटत नाही तो पर्यंत राजकीय मंचावर होणार्या अशा घरभेदीच्या घटनेने आपल्याला होणारे दुःख आपणच पचवायाचे  हाच पहीला व शेवटचा उपाय आहे.

बाकी लोकशाहीचा गळा घोटला, छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र, रात्रीचा खेळ चाले इत्यादी वाक्यें उद्धव ठाकरे , शरद पवार व अहमद पटेल यांच्या सारख्या घराणेशाही पक्षांच्या नेत्यांच्या मुखी शोभत नाहीत. बिहार मधील  सत्तेसंबंधीतला तिढ्याच्या वेळी रात्री-अपरात्री प्रशासन चालविले गेल्याचे उदाहरण आपल्या समोर आहे. आतंकवाद्यासाठी रात्री कोणी न्यायालय उघडले?, अफझल गुरूला फाशी दिवसा दिली असती तर काय बिघडत होते? १९७५ साली इंदिरा गांधीच्या सरकारने मध्यरात्री आणिबाणीची घोषणा करून राष्ट्रपतीची वटहुकूमावर सही सकाळी घेतली होती, इत्यादी प्रकरणे आज यु ट्युबवरून समाज पाहत आहे. म्हणून कालच्या राजकीय भूकंपावरच अधिक चर्चा करणे उचीत आहे.

कालच्या राजकीय भूकंपाची घटना लोकशाहीला पुरक की मारक यावर चर्चा करताना,  युती म्हणून मतदारासमोर जाऊन मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी आणि काॅग्रेस सारख्या हरलेल्या पक्षांशी शिवसेनेने केलेली आघाडी ही लोकशाही मूल्यांशी पुर्णपणे विसंगत आहे याबाबत दूमत नसावे. शिवसेनेने केलेल्या गद्दारीवर काहीही भाष्य न करता  सत्ता स्थापनेत आपण असमर्थ आहोत असे नम्रपणे राज्यपालांना कळवून त्यानंतर भाजपाचे नेते, आमदार व कार्यकर्त्यांनी पाळलेला संयम निश्चीतच कौतुकास पात्र आहे. सत्तेच्या प्रलोभनाला भीक न घालता निवडून आलेल्या भाजपा आमदारांनी आपल्या पक्षाच्या निर्णयावर दाखविलेली निष्ठा यातून भाजपामध्ये इतर पक्षापेक्षा अनुशासनता उच्च श्रेणीची आहे हे सिध्द होते. भाजपाकडे सरकार म्हणून विकासाचे मुद्दे होते. सरकार म्हणून सुरू केलेले प्रकल्प व कल्याणकारी योजना होत्या. शिवाय  मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार होता. 

दुसरीकडे महाविकासाचे स्वरूप कसे असणार,  किमान समान कार्यक्रम कसा असेल,  शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार की राष्ट्रवादी पक्षाचा, काॅग्रेस बाहेरून पाठींबा देणार  कि सत्तेत सहभागी होणार, काॅग्रेसच्या अटी काय आहेत इत्यादी प्रश्नाभोवतीचं मिडीयातील चर्चेचं गुर्हाळ मतदारांना, पिडीत शेतकर्यांना भावले आहे,  सरकार स्थापन करण्यासाठी आपण अजून हवा तितका वेळ घ्या अशी जनभावना झाली आहे, आणि भाजपाला दणका द्यावा अशी जणू काही ही श्रींची इच्छा आहे अशा थाटात  विरोधी पक्ष वावरत राहीले. त्यामूळेच  सत्तेच्या खेळात विरोधकांवर विशेषतः शिवसेना व राष्ट्रवादी काॅग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक करण्याची संधी व धमक भाजपाला मिळाली. आता पर्यंत चाललेल्या सत्तेच्या सामन्यात विरोधकांनी भाजपा वर मात केलेली दिसत होती पण कालच्या सर्जिकल स्ट्राईकामूळे विरोधकांची मानसिक शक्ती क्षीण करण्यात भाजपाने यश मिळविले आहे असे दिसते. शेवटी कुठल्याही युध्दात मानसिक शक्तीच कामी येते.

राहता राहीला प्रश्न काॅग्रेसचा. काॅग्रेस पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरील पक्ष असल्यामूळे त्या पक्षाला शिवसेनेला पाठींबा देण्यासाठी वेळ लागणार होताच. पण काॅग्रेसने केलेली दिरंगाईच अजित पवारांनी निमित्त मानले व  काका मला वाचवा, असे उद्गार न काढता काका मी तुम्हालाच सोडतो असे म्हणून शरद पवारांना खच्ची करून टाकले. इतका मोठा राजकीय भूकंप अजित पवारांनी एकट्याने घेतला नसावा, कदाचित हे कारस्थान शरद पवारांनी रचलेले असावे, असा काही राजकीय अभ्यासकांचा होरा आहे.यावरून शरद पवारांची विश्वासहर्ता किती ठिसूळ आहे हे स्पष्ट होते. शरद पवार व उध्दव ठाकरेंनी निवडणूकीच्या अगोदरच सत्ता स्थापन करून भाजपाला दणका द्यावा असे ठरविले होते हे काॅग्रेस हायकमांडने जाणलेले असावे. निवडणूकीत सेना व राष्ट्रवादी काॅग्रेसला चांगले यश मिळून दोन्ही पक्षांच्या आमदारांची संख्या बहूमत मिळण्याइतकी असती तर शरद पवारांनी काॅग्रेसला ही मोडीत काढले असते हे न समजण्याइतकी काॅग्रेस श्रेष्ठीच्या राजकीय जाण ची दिवाळखोरी झालेली नाही. म्हणून काॅग्रेसने महाआघाडीत आपले हात का पोळून घ्यावे अशी दक्षता पाळत पाठींबा देण्यासाठी दिरंगाई केली. शिवाय परवाच्या  शरद पवार -उध्दव ठाकरेंच्या संयुक्त पत्रकर परिषदे पासून काॅग्रेस दूर राहीली असावी. तथापी  काॅग्रेसने शिवसेने सोबत जाण्याचा निर्णय घेतला हे ही नैतिकतेशी फारकत घेण्यासारखेच आहे की. काॅग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षात महाआघाडी संबंधी असंतोष आहे, तो फक्त सध्या दिसत नाही इतकेच. वेळ येईल तेव्हा तो दिसेल. कारण राजकारण हे असेच असते. पण त्यासाठी फक्त भाजपाला दोष देऊ नका अशी माफक अपेक्षा जनसामान्यांची आहे हे सत्य पुरोगामी संपादक व विचारवंतानी लक्षात ठेवावे असे मला वाटते.

आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले आहे. आज निकाल भाजपाच्या बाजूने आला नाही आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी बेकायदेशीर ठरविला गेला तरी महाविकास आघाडीला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामूळे दोन्ही पक्षकारांची शक्ती वा दाव्यांची परीक्षा विधिमंडळाच्या पटलावर होईल. तो पर्यंत भाजपा व महाविकास आघाडी मधील व्टिटर, खोटे विडीओ, अफवा इत्यादी साधनाद्वारें सुरू झालेली लढाई बघत बसू या.

४ टिप्पण्या:

  1. म्हात्रेजी! ज्वलंत विषयावर तुमच मतप्रदर्शन अप्रतिम, विषेशतः नैतिकता घराणेशाहीव लोकशाही प्रथा यावरील परखड टिपणी. पण जे सामान्य मतदारास समजते तर ते टिव्ही चॕनलना कळु नये याचे आश्चर्य वाटते. शेवटी उद्याचा कोर्टाचा निर्णय व प्रत्यक्ष फ्लोअर टेस्ट होईपर्यंत काही गृहित धरण्यात अर्थ नाही.धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद ! महाविकास आघाडीकडे ठोस १६२ संख्याबळ असेल तर कोर्टात जाण्याची गरज का पडली व सरकार बरखास्त करून २४ तासाच्या अवधीत विश्वासदर्शक ठराव मागण्याचा हट्ट का करावासा वाटतो? कोर्ट तसा निर्णय देऊ शकणार नाही ही जाणीव महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे पण आपआपल्या पक्षांच्या आमदारांकडून फितूरी टाळण्यासाठी दबाव व्हावा म्हणून कोर्टबाजी व परेडबाजी करीत आहेत.

    उत्तर द्याहटवा
  3. अति सुंदर विश्लेषण । पण एक खरं आहे विरोधी पक्षांचा मानसिक हार् झाली आहे ।

    उत्तर द्याहटवा
  4. धन्यवाद !महाआघाडीवाल्यांच्या मानसिक शक्तीवर प्रहार भाजपाने केला आहे तो ही शरद पवाराने आपल्या हयायतीत विरोधकांसाठी वापरलेल्या औषधाचा वापर करूनच.

    उत्तर द्याहटवा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...