मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१९

महाराष्ट्रातील सत्तेचा तिढा - भाग ३ शिवसेनेची कोंडी



सत्तेचा तिढा या नाटकासाठी काल सकाळ पासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅग्रेसच्या कलाकारांनी भरपूर तालीम करून आपआपल्या स्क्रिप्ट ही तयार केल्या होत्या. जवळपास शिवसेना-राष्ट्रवादी काॅग्रेसचे सरकार सत्तेवर येणार अशी बातमी संध्याकाळी सात वाजता झळकावयास सुरूवात झाली होती. शिवसेनेचे नेते राज्यपाल महोदयकडे लौकरच पोहचले होते. राजभवनाकडे सार्या मराठी जनतेचे लक्ष लागले होते. राजभवनावर पत्रकारांची गर्दी झाली होती. बहूतांश संपादक महाशयांनी भाजपाची खोड मोडली या अर्थाचे अग्रलेख तयारही केले असावेत. तेवढ्यात शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई सोबत राजभवनातून बाहेर पडले. पत्रकारांची उत्सूकता वाढली. पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेने सांगितले की आम्ही राज्यपाल महोदयाकडे (फक्त) सत्ता स्थापनेचा दावा मांडला आहे. तसेच संख्याबळाची यादी व पत्रे देण्यासाठी दोन दिवसाचा वेळ मागितला आहे. राज्यपाल महोदयाने शिवसेनेला वेळ वाढवून देण्यास नकार दिला आहे. त्यामूळे सत्तेचा तिढा या नाटकातला दुसरा अंक लौकर संपला. काल संध्याकांळी साडे सातला सत्तेचा तिढा या नाट्या चा तिसरा अंक सुरू झाला असेच समजून घेऊ या आणि आपली चर्चा पुढे रेटू या.

शिवसेनेकडे  राष्ट्रवादी काॅग्रेस व काॅग्रेस पक्षांकडून पाठींब्याचे पत्र आलेले नव्हते. राज्यपाल महोदयांना भेटून आल्यानंतर शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंनी काय झाले हे सांगताना बाजूला बसलेल्या सुभाष देसाईंच्या चेहर्यावर नाराजी दिसत होती. मागील अनेक लेखात मी वेळोवेळी मांडले आहे की उतावळेपणा शिवसेनेचा सर्वात मोठा दोष आहे,  तोच या नाट्यात नडलेला दिसतो आहे. उतावळेपणा एक वेळ क्षम्य ठरतो पण उथळ आणि उद्धठ स्वभावाचे दर्शन झाले की सर्वनाश होतो. उथळ आणि उद्धठ अशी शिवसेनेची प्रतिमा जी होत आहे त्याला फक्त संजय राऊत जबाबदार नसून खतरूड मनाचे उद्धव ठाकरें ही जबाबदार आहेत.  मालाड मढ येथील रिसाॅर्टवर असलेल्या आमदारांनी आवाज कोणाचा शिवसेनेचा   अशी गर्जना करीत संध्याकाळपासून सुरू केलेला जल्लोष अचानक थांबावा लागला. कारण आपलं सरकार स्थापन होत नाही ही दुःखद बातमी त्यांच्यापर्यंत पोहचली. पाठोपाठ संजय राऊत यांना लिलावती हाॅस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले ही बातमी ही थडकली. झी मराठी न्युज चॅनेलच्या ॲन्करने काॅग्रेसचे पाठींब्याचे पत्र आले नाही त्यामूळे त्यांचा तणाव वाढला असावा अशी पुस्ती जोडून शरद पवार  24×7 राजकारणी आहेत ते या वयातही कसे संयमी दिसतात हे नमूद करून संजय राऊतचा उतावेळपणा एक्सपोज केला. झी टीवीच्या ॲन्करने तसे करावयास नको होते पण बोलणार्यांचे तोंड कसे बंद करता येणार ? ते म्हणतील आम्ही संजय राऊतना सल्ला दिला असे म्हटले की त्यावरील चर्चा संपते. या ठिकाणी माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारींचे एक वाक्य आठवले. अटलबिहारीजी म्हणाले आहेत, बोलनेके लिए सिर्फ वाणीकी जरूरत होती है लेकीन मुहँसे अच्छे ढंगसे बात करनेके लिये वाणीके साथ विवेक की जरूरत होती है | वाजपेजींचा सल्ला सर्वांसाठी मोलाचा आहे. असो,  संजय राऊतांच्या तब्येतीत सुधारणा झाली ही चांगली  बातमी रात्री उशीरा आली. ते लौकर बरे होवोत अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून महाराष्ट्रातील महानाट्यात पुढे काय होणार यावर चर्चा करू या.

पुढे काय होणार यावर चर्चा करण्याअगोदर एक गोष्ट स्पष्ट दिसली आहे ती म्हणजे घराणेशाही पक्षांच्या टोळीत आज ही नेहरू-गांधी घराणेच शक्तीमान आहे. पवार व ठाकरे घराण्याचा मराठी बाणा दिल्लीतील काॅग्रेस नेत्यांसमोर नुसता वाकलाच नाही तर मोडून पडला आहे. शिवसेनेचं हिंदुत्व ही संपले व मराठी बाणा ही मोडला गेला आहे. त्यावर कितीही डागगुजी झाली तरी त्यात सुधारणा होण्यासाठी बराच अवकाश लागेल. शरद पवारांची ताकद ही कमी पडली असावी त्यामूळे काॅग्रेसचा पाठींबा मिळण्यात उशीर झाला असावा. शरद पवारांची ताकद दिल्लीपुढे कधीच दिसलेली नाही. फक्त त्यांच्या आश्रयाले असलेले साहित्यिक, संपादक मंडळींनी निर्माण केलेल्या ताकदीची ती सूज आहे हे पुन्हा सिद्ध झाले आहे.  मागील लेखात मी म्हटले आहे की काॅग्रेस इतक्या सहजा सहजी शिवसेनेला पाठींबा देणार नाहीत. भले काॅग्रेसचे महाराष्ट्रातील नेते व आमदार सत्तेत सामील वा सेनेला बाहेरून पाठींबा देण्यासाठी तयार असले तरी आपली शक्ती दाखविण्याची आयती आलेली संधी गांधी घराणे सोडणार नव्हतेच. पण उतावळीचा दुर्धर रोग झालेल्या शिवसेनेला कळत नाही त्यास भाजपाला दोष देण्यात काय अर्थ आहे ? 

रात्री उशीरा आलेली बातमी अशी आहे की राज्यपाल महोदयांनी राष्ट्रवादी काॅग्रेसला सत्ता स्थापण्यासाठी आमंत्रण दिले आणि तदनुसार अजित पवार राज्यपालांना भेटून आले.  त्यांना ही एक दिवसाचा वेळ मिळाला असल्याचे दिसते. कदाचित राष्ट्रवादी काॅग्रेसच्या सरकारला पाठींबा देण्याचा विचार काॅग्रेसने केला असावा. परंतु ही शक्यता आहे. कारण दिल्लीतील हायकमांडच्या दरबारात शरद पवाराचे नाही, जे चालते ते पृथ्वीराज चव्हाणांचे असणार. शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाण सरकारसंबंधी जी हिणकस लकव्याची भाषा केली होती त्याचे उट्टे काढण्याची संधी काॅग्रेसच्या हायकमांडने सोडली नसावी. दुसरे असे की शरद पवार हे आता पश्चीम महाराष्ट्रातील काही भागाचे नेते राहीले आहेत, त्यांना शिवसेनेसोबत सोयरीक करणे परवडते नव्हे तशी शरद पवारांची गरज ठरली आहे. काॅग्रेस तसे पाहता आजही राष्ट्रीय पक्ष मानला तर जातोच ना ! त्यामूळे हिंदुत्ववादी पक्षाला सरकार स्थापन करण्यास मदत करणे काॅग्रेसला झेपणारे नाही. इथेच उध्दव ठाकरेंची भली मोठी चूक झाली आहे. भाजपाच्या कोअर बैठकीतून आलेले सुधीर मुनगंटीवारांनी आम्ही Wait and Watch च्या भूमीकेत आहोत असे पत्रकारांना सांगितले. त्यातून भाजपा ऑऊट ऑफ रेस झालेला नाही हेच दिसते. मध्यंतरी काॅग्रेसचे अहमद पटेलांनी भाजपाचे नेते नितीन गडकरींची भेट घेतली होती. त्याबबत माध्यमांनी चर्चा केली नाही. असे असले तरी एक गोष्ट स्पष्ट दिसत आहे की राष्ट्रीय स्तरावरील भाजपा व काॅग्रेस आपआपली शक्ती वापरून शिवसेना व राष्ट्रवादी काॅग्रेसला जितंक वाकवता येईल तितकं वाकविण्याचा प्रयत्न करून मध्यावधी निवडणूकीला स्वतंत्र रित्या सामोरे जाण्याची तयारी करीत असावेत. 

आता माध्यमात  चर्चा होत आहे की भाजपाला सरकार स्थापण्यासाठी अधिक अवधी दिला. या आरोपात फारसे तथ्य नाही. निकाल लागल्यानंतर आमचा मुख्यमंत्री होणार असा घोषा  शिवसेनेचा होता. म्हणजे शिवसेनेने शरद पवारासमवेत  आधीच या नाट्याची तालीम करून घेतली असावी, अशी समजूत जनसामान्यांची झाली होती. तसाच अर्थ राज्यपाल महोदयांनी गृहीत धरला असावा. बिचारे शिवसेनेचे व राष्ट्रवादी काॅग्रेसचे समर्थक जल्लोषातच वावरत राहीले. त्यांची फार मोठी निराशा झाली. राज्यपालांच्या भुमिकेबद्दल विरोधी पक्षांनी किती आक्रोश केला तरी त्याचा राज्यपालांना मिळालेल्या  घटनात्मक अधिकारांवर परीणाम होईल असे  वाटत नाही. तसा आक्रोश भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये तीन वेळा करावा लागला आहे. भारतीय राजकारणात राज्यपालांच्या भूमिके संबंधी जी सांशकता निर्माण होते त्याला मतदार म्हणून आपण जो अधांतरीत कौल देतो तो ही तितकाच जबाबदार आहे. आपली लोकशाही बहूपक्षीय असल्यामूळे असे घडते असे मानून सत्तेचा तिढा हे नाटक पाहात बसणे या पलीकडे आपण काही करू शकत नाही. जाता जाता एक आठवण विरोधकांना करून द्यावीसी वाटते ती ही की काही राजकीय चाली करण्याअगोदर आताचा भाजपा हा वाजपेयी-अडवाणीचा नाही हे पक्के ध्यानात ठेवले तर बरें. निदान आपल्या बावळटपणाचे प्रदर्शन होण्याचे तरी टळेल.

३ टिप्पण्या:

  1. सुंदर, शिवसेनेची परिस्थिती "न घरका न घाटका" अशी झाली आहे व त्यास आपण म्हटल्या प्रमाणे उध्दव हेच जबाबदार आहेत. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद ! शिवसेनेची तसेच मनसेची मानसिकता राजेशाही प्रकारात मोडते. निवडणूका लढवायाच्या नाहीत आणि लोकप्रतिनिधी ॲक्ट ची झंझट ठेवायची नाही.त्यामूळे नगरसेवक वा आमदार (लोकप्रतिनिधी ) ह्या नात्याने उन्हा-तान्हात, पावसात, थंडीच्या गारठ्यात लोकांकडे जाण्याची जबाबदारी झटकावयास सोपे जाते. कशीही बेभान वक्तव्ये करण्याची हौस करायला सोपे जाते कारण विधानसभेचे कायदे ठाकरे कुंटुबाला लागू होत नाहीत.त्यातून सर्वाना फाट्यावर मारण्याची घाणेरडी सवय ठाकरे कुटुंबियांना जडली. मग प्रशासन काय असते, लोकशाहीतील जीवनमुल्यें काय आहेत हे ठाकरे कुटूंबियाना कसे माहीत पडणार? उतावेळपणा, फटकळता हे रोग ह्या मंडळींना जडले. या घराण्याचा उद्योगधंदा कुठला ? त ना शेती ना कारखाना . मग पैसा कोठून आला ? बस राजेशाहीचे तनखे घेणे हाच धंदा. मराठी माणसास ह्यांनी काय दिले आहे? आता यांना
    शहाणपण येतंय का ते पाहू या. शेवटी कुत्र्याचं शेपेट नळीत घातले तरी वाकडेच राहते. धन्यवाद !

    उत्तर द्याहटवा
  3. अगदी बरोबर म्हात्रेजी.पाहुया आज सुप्रीम कोर्टात काय घडतय. नमस्कार.

    उत्तर द्याहटवा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...