रविवार, १० नोव्हेंबर, २०१९

महाराष्ट्रातील सत्तेचा तिढा व संभाव्य अस्थिरता (भाग २)



विधानसभेचा कार्यकाल संपला आणि तांत्रीक दृष्ट्या श्री देवेंद्र फडणवीसांनी परवा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, आणि लागलीच पत्रकार परिषद घेऊन सत्तेचा तिढा या नाटकाच्या दुसर्या अंकात रंगभूमीवर एन्ट्री घेतली. श्री देवेंद्र फडणविसांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिलेलं नव्हते हे प्रथम स्पष्ट केले. शिवसेना मोदींवर टिका करते, मग सत्ता हवी कशाला असे सूचक विधान केले. शेवटी युती अस्तीत्वात आहे असे ही म्हटले.  त्यानंतर श्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद  घेऊन भाजपा व फडणवीस खोटे बोलत आहेत, आम्ही ठाकरे घराणे खोटे बोलत नाही, असे म्हणत एक दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर शिवसेनेचा माणूस बसवेन असे वचन स्वर्गीय बाळासाहेबांना दिल्याचा त्यांनी उल्लेख केला. बाकी हिंदुत्व म्हणजे सत्य, राम मंदिर हा न्यायालयाचा निर्णय आहे,  राम मंदिर हा प्रश्न कुठल्या पार्टीला श्रेय घेण्याचा नाही इत्यादी संबंधीचे उद्धव ठाकरेंची वक्तव्यें स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या  थेअरीला छेद देत आहेत कि बाळासाहेबांच्या थेअरीला अनुसरून आहेत हा विषय शिवसेना पक्षांचा अंतर्गत आहे. त्याचा महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय अस्थिरतेशी काही संबंध नाही. तसेच उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर भाजपाने रामजन्मभूमी साठी उत्तर प्रदेशची सत्ता पणाला लावली होती, असे भाजपा नेते श्री सुधीर मनगुंटीवारानी दिलेल्या प्रत्युत्तरावर इथे चर्चा करण्याची गरज नाही. कारण मंदिर वही बनायेंगे हा विषय भाजपाच्या एजंडावर होता आणि त्यासंबंधी निवडणूक आयोगाने कधी आक्षेप घेतलेला नाही.  परवा एका बाजूला फडणवीस व उद्धव ठाकरेंच्या मुलाखती झाल्या तर दुसर्या बाजूला शिवसेना सकट विरोधी पक्षांची पुढील अंकाच्या तालीम साठी शरद पवारांच्या घरी बैठक झाली. त्या तालीमीचे  स्वरूप काय व कसे असेल, हे सध्या गुलदस्त्यात आहे .

युतीतील दोन्ही शिर्षस्थ नेत्यांच्या परवाच्या पत्रकार परिषदेतून सत्तेचा तिढा हा फक्त मुख्यमंत्रीपदासाठी आहे हे स्पष्ट झाले आहे. मागील लेखात मी म्हटले होते की, भाजपा महाराष्ट्रातील सत्तेवर पाणी सोडण्याचा जुगार खेळू शकते. त्यासाठी भाजपाकडे जे तीन मार्ग आहेत, ते ही तिथे दिले आहेत. श्री देवेंद्र फडणवीसांनी सत्ता हवी कशाला असे जे म्हटले आहे ते फार महत्वाचे आहे. त्यातून दोन अर्थ प्रतीत होत आहेत. पहिला अर्थ असा आहे की शिवसेना महायुतीच्या सत्तेत राहून मोदीवर टिका करणार असेल तर शिवसेनेने विरोधात बसावे. दुसरा अर्थ असा आहे की आतापर्यंत सत्तेत राहून शिवसेनेने मोदीवर केलेली टिका भाजपाने सहन केली, पण आता पुढे सहन करणार नाही,  त्यासाठी भाजपा सत्तेवर पाणी सोडावयास तयार आहे. कालच्या पत्रकार परिषदेत श्री फडणवीसांचा आत्मविश्वास उठून दिसला, तर दुसरीकडे श्री उद्धव ठाकरेंना केविलवाण्या स्वरात बाळासाहेबांच्या स्वप्नाचा आडोसा घ्यावा लागला. २०१४ पासूनच्या भाजपा-सेनामधील कलगीतुरा संबंधीच्या अनेक लेखात मी म्हटले आहे की आताचा भाजपा वाजपेयी- अडवाणींचा नाही. तसेच उद्धव ठाकरे  बाळासाहेब होऊ शकणार नाहीत, हे ही मी म्हटलेले आहे. पण सारे विरोधी पक्ष भाजपा वाजपेयी-अडवाणीचा नाही इतकेच सत्य स्विकारीत आहेत. ते ही २०१४ च्या लोकसभेच्या निवडणूकीतील दारूण पराभव झाल्यापासून, कारण त्यांना सोयीचे म्हणून. वाजपेयीचे सरकार एक मताने पाडणार्यांनी राजकारणातील शुचीतेचे ढोंग घेऊ नये. आपण स्वतः यंशवतराव चव्हाण नाहीत, आपण बॅरिस्टर नाथ पै नाहीत, आपण डाॅ राम मनोहर लोहिया नाहीत, आपण इंदिरा गांधी नाहीत, हे सत्य स्विकारून आपल्यात बदल करू इच्छीत नाहीत, अशी ही विरोधी पक्षांची नेतेमंडळी. स्वर्गीय बाळासाहेबांच्या नंतर शिवसेनेच्या मर्यादा स्पष्ट होत गेल्या आहेत. श्री उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांनी शिवसेनेचा कार्याध्यक्ष केल्यापासून शिवसेनेचा  कारभार कशा रीतीने होऊ लागला ह्या बाबतची माहिती जनतेपर्यंत तर सोडाच पण शिवसेनेच्या नेत्यांपर्यंत आलेली नाही.  या संदर्भात निखील वागळेंच्या मॅक्स महाराष्ट्र व आवाज मराठीचा यांना दिलेल्या मुलाखतीच्या विडीओतील दोन वाक्ये फारच बोलकी आहेत. निखिल वागळे म्हणतात, " उद्धव ठाकरेंना बाळासाहेब कळलेच नाही. बाळासाहेब दिलदार होते."  निखिल वागळे ह्यांचे उद्धव ठाकरे संबंधीचे दुसरे वाक्य " उद्धव ठाकरे हा खुतरूड मनाचा माणूस आहे."  निखिल वागळे, भाजपाचे मित्र नाहीत उलट भाजपाचे कट्टर शत्रू आहेत. २०१४ सालच्या विधानसभा निवडणूकीतल्या प्रचार काळात भाजपा- सेनेतील कलगीतुर्यावर निखिल वागळेंनी लोकमत चॅनलवरून शिवसेनेलाच पाठींबा दिलेला आपण पाहीला आहे. २०१४ला शिवसेना एकाकी नव्हती. भाजपा एकाकी होता. शिवसेना, राष्ट्रवादी, काॅग्रेस, मनसे इत्यादी सारे पक्ष मोदी-शहावर सडकून टिका करीत होते आणि सर्व मराठी चॅनेल्स, व वृत्तपत्रे मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंना पंसती मिळत आहे असे चित्र  रंगवित प्रसारीत करीत होते. इतके करूनही शिवसेना ६३ वर अडकली. शरद पवारांनी निवडणूकीचा पुर्ण निकाल यावयाच्या अगोदर भाजपाला बिनशर्त पाठींबा दिला होता. तरीही शिवसेनेला सत्तेत भागिदारी देऊन भाजपाने सरकार बनविले. शरद पवाराने न मागता दिलेल्या पाठींब्यावर भाजपाने चलाखीने पाच वर्ष मौन पाळत शरद पवारांची विश्वासअर्हता हळूहळू कमी करीत ठेवली. शरद पवारांना आताच्या निवडणूकीत अपेक्षित यश न मिळण्यापैकी हे ही एक कारण होते. आता ह्याच पवारांच्या साथीने शिवसेना सरकार स्थापन करू इच्छीत आहे. शिखर बँकेतील घोटाळ्याची टांगती तलवार जी राष्ट्रवादी व काॅग्रेसच्या नेत्यांवर आहे त्यापासून सुटका करून बाळासाहेबांचे स्वप्न श्री उद्धव ठाकरे पुर्ण करणार असतील तर त्यांना आपण अडविणारे कोण?

परवा पासून सुरू झालेल्या दुसर्या अंकात श्री देवेद्र  फडणवीसांनी बाजी मारली की श्री उद्धव ठाकरेंनी,  याबाबतचे विश्लेषण  राजकीय अभ्यासक, व मिडीया आपआपल्या सोयीने करू लागले आहे  तेच आपण  टिव्हीवर पाहात आहोत. परवा शरद पवारांनी कर्नाटक मध्ये भाजपाने सरकार स्थापन कसे केले ह्याचा  उल्लेख केला. पण कर्नाटकात हरलेल्या काॅग्रेस व जेडीएसने कशी सत्ता काबीज केली होती ह्याचा उल्लेख ते करीत नाहीत. तशाच पद्धतीने  शिवसेना  शरद पवार व काॅग्रेस या पराभूत झालेल्या पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे दिसते. तरीही एकंदरीत  'सत्तेचा तिढा ' मधील दुसर्या अंकातील पहील्या भागात भाजपा नेते आक्रमक रित्या व आत्मविश्वासाने मिडीयाला सामोरे जाताना दिसले. आणि त्यांनी अलगद चेंडू उद्धव ठाकरे कडे पास ऑन केला आणि आम्ही दुसरे पर्याय पाहू असे वाक्य त्यांच्याकडूनच जाहीर रित्या वदवून घेतले. आता यात कोणा पत्रकाराला वा राजकीय अभ्यासकाला उद्धव ठाकरेचे ते उत्तर रोखठोक  वाटत असेल तर तो त्यांच्या स्वभावाचा गुण. एकंदरीत फडणविस व उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीनंतर,  महाराष्ट्राचा मुख्यमंत्री घराणेशाही पक्षांच्या टोळीतला हवा आहे की लोकांच्या पसंतीचा हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकीय क्षितीजावर प्रथमच दिसू लागला आहे.

२ टिप्पण्या:

  1. म्हात्रेजी,सर्व महाराष्ट्र सध्याच्या राजकारणावर श्वास रोखुन लक्ष ठेऊन असावा. जरी शिवसेनेला अखेरच्या क्षणी उपरती झाली असती तरी,फडणवीसांचा द्वीतीय काल पहिल्या पेक्षा अधिक खडतर झाला असता. राज्याच्या प्रगतीसाठी तरी त्यांना संधी हक्काने मिळायलाच हवी होती. आता उध्दवना मुख्यमंत्री पद मिळत का व मिळाल तर त्याची किती किंमत मोजावी लागते-विश्वासार्हते शिवाय- हे बघायला मिळेल. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  2. बिवलकरजी, आपण योग्य निदान केलं आहे. उद्धव ठाकरेंची तारांबळ कशी उडते ते पाहावयास मिळेल. शिवसेना पुरस्कृत सरकार जन्मते कसे,व बाळसे धरण्या अगोदर कर्नाटकातील जेडीएस व काॅग्रेस सरकार सारखी अवस्था होणार आहे. भाजपा कर्नाटका सारखे सरकार स्थापन न करता राष्ट्रपती राजवट व नंतर मध्यावधि निवडणूका येण्याची वाट पाहील. कारण भाजपाला प्रचारात शिवसेनेला गद्दार म्हणून लेबल चिकटविण्याची सोडावयाची नाही. हीच ती खेळी आहे सत्तेवर पाणी सोडण्याची. धन्यवाद !

    उत्तर द्याहटवा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...