बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

महाराष्ट्रातील सत्तेचा तिढा व संभाव्य अस्थिरता



विधानसभेच्या निवडणूकीचा निकालानंतर बारा दिवस होऊन गेले तरीही महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात आलेले नाही. ज्या युतीचा विजय झाला आहे त्या युतीतील  दोन्ही पक्षात सत्ता वाटपावरून भांडण वाढलेले दिसत आहे. त्यामूळे काॅग्रेस व राष्ट्रवादी काॅग्रेसला आनंद होणे  स्वाभाविक आहे.  अवकळी पावसाने शेतकर्यांवर ओढवलेल्या आपत्तीची ह्या दोन्ही पक्षांना होत असलेली काळजी ही दिखाऊ असली तरी विरोधी पक्ष म्हणून सत्ताधारी पक्ष गोंधळात असतो तेव्हा फायदा घेण्याची संधी साधणे हे राजकारणात गैर नाही. पण पिण्याच्या  पाण्याच्या टंचाई वरील उपाय सुचविताना स्वतःच्या लघुशंकेचा उल्लेख अजित पवारांनी सत्तेवर असतेवेळी केला होता ह्याची आठवण शेतकर्यांना असणारच. म्हणून तर जीवाचे रान करून ही शरद पवारांना अपेक्षित यश मिळाले नाही. काॅग्रेसच्या जागा वाढल्या ह्याचे कारण राष्ट्रीय पातळीवर आजही काॅग्रेस मुख्य विरोधी पक्ष असल्यामूळे भाजपा सरकारच्या कारभारावर जी काही मतदारांमध्ये नाराजी असते तेव्हा काॅग्रेसला फायदा होतो हे साधं समीकरण आहे.

गेले बारा दिवस सत्तेची माळ युतीतील पक्षांच्या गळ्यात पडणार की विरोधी पक्षांना सत्तेत भागिदारी मिळेल असे तर्क -वितर्क काढले जात आहेत.  राजकारणात काही ही घडू शकते हे वाक्य प्रत्येक न्यूज चॅनेलवरून आपल्या कानीं पडते आहे. असे असले तरी भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असल्यामूळे कुठल्या तरी  एका विरोधी पक्षासोबत (विशेष करून राष्ट्रवादी काॅग्रेस) सत्तेचा वाटप करून तो पक्ष सत्तेवर बसणार नाही हे तर स्फटिका इतके स्वच्छ आहे. मग महाराष्ट्रातील सत्ता स्थापण्यात जी दिरंगाई रूपी अस्वच्छता आणली आहे ह्याला जबाबदार युतीतला शिवसेना पक्ष आहे हे ही स्फटिका इतके स्वच्छ आहे. पण हे सत्य महाराष्ट्रातील राजकीय विश्लेषक स्विकारीत नसल्याचे दिसत आहे. बहूतांश प्रिन्ट व ईलेट्राॅनिक्स (विशेषतः मराठी भाषिक) मिडीया भाजपा आणि शिवसेना ह्या दोघांतील भांडणासंबंधी भाजपाला दोष  देताना दिसत आहे. कारण भाजपा केंद्रात सत्तेवर आहे. केवळ सत्तेत नाही तर सर्व विरोधी पक्षांचे भाजपाने कंबरडे मोडले असल्यामूळे मिडीयातील लोकांना सत्तेच्या परीघाभोवती मिरवायाची आणि ऐषरामाची संधी हूकली आहे. म्हणून महाराष्ट्रातील सत्तेसंबंधी काहीही तर्क-वितर्क मांडून भाजपाला आरोपाच्या पिंजर्यात मिडीया मांडताना दिसत असल्याचे आश्चर्य वाटत नाही. मुंबई सारख्या शिवसेनेच्या बालकिल्ल्यात महापालिकेत शिवसेनेइतक्या जागा मिळवून सत्तेसाठी सेनेची अडवडणूक केली नाही ह्यासंबंधीचे भाजपाचे कौतूक मिडीयाने का केले नाही, व शिवसेनेला भाजपाच्या या उदारपणाची जाणीव मिडीया का करून देत नाही ह्यावरून मिडीया पक्षपाती आहे हे दिसत आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपाची कोंडी केली आहे असा समज करून ज्यांना आनंदाच्या उकाळ्या होत आहेत अशा मंडळींना केंद्रातील भाजपाची सत्ता नडत आहे. विरोधी पक्षांना व शिवसेनेला पूरक वातावरण निर्माण करण्याचे काम मिडीया करीत आहे.  भाजपा शांततेने सारी चर्चा ऐकत आहे. मुख्यमंत्री पद भाजपा सोडणार नाही. कारण फडणविसाच्या नेतृत्वाखाली भाजपाने निवडणूक लढविली आहे. हे माहीत असूनही शिवसेनेने भाजपावर सुरू केलेली टिका अव्यवहारी आहे. त्यामूळे जी काही चर्चा मिडीयात होत आहे ती शिवसेनाभोवती होत आहे. कारण शिवसेना राजकारणात उतावेळपणा करीत आलेली आपण पाहात आहोत. शिवसेनेचा हा उतावेळपणा जर मतदाराने चांगला मानला असता तर शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून मतदारांनी पसंती दिली असती. ' हीच वेळ आहे ' ह्या टॅग लाईनला ही मतदारानी प्रतिसाद दिलेला दिसला नाही. शिवसेनेने फडणवीस सरकारवर सत्तेत राहून इतकी टिका करून लोकसभेची निवडणूक शिवसेनेने स्वतंत्र रित्या का लढविली नाही?  
खिशात राजीनामे घेऊन फिरतो आहोत अशी सेना मंत्र्यांच्या दार्पोक्तीची सोशल मिडीयावर टर उडविलेली आपण अनुभवली आहे. मागील लेखात मी म्हटले आहे की महाराष्ट्राच्या निवडणूकीतील निकालाच्या आकड्यानी सर्वच पक्षांना निराश केले आहे. पण ही निराशा शिवसेना व राष्ट्रवादी काॅग्रेसला अधिक जाणवत आहे. महाराष्ट्रात भाजपाला अडकून ठेवणे ही ह्या दोन पक्षांची तातडीची निकड दिसत आहे. त्यापाठीमागचे कारण शिखर बँकेंतील घोटाळा हे आहे. केंद्र सरकारची भ्रष्ट्राचार विरोधी कारवाईची सुरू झालेली मोहीमे मूळे सेना-राष्ट्रवादी मध्ये जवळीक वाढताना दिसत आहे. म्हणून सध्या सत्तेसंबंधी तर्क-वितर्क मांडून जी चर्चा होत आहे ती ही या दोन पक्षाभोवती फिरत असताना दिसत आहे. त्यातून शिवसेना-राष्ट्रवादी सत्तेत येणार व काॅग्रेस बाहेरून पाठींबा देईल ही शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात तसे घडले तर ते कर्नाटकात जेडीएस व काॅग्रेसने स्थापन केलेले सरकार असेल. कर्नाटकात हरलेले पक्ष काॅग्रेस व जेडीएस होते. महाराष्ट्रात दोन्ही काॅग्रेस व शिवसेना असे तीन पक्षांचे सरकार आले तर  ते किती काळ टिकेल या प्रश्नांचे निश्चीत उत्तर भाष्यकार देऊ शकतात का? ते सरकार सदैव अस्थिरच राहणार आहे. कारण बाहेरून पाठींबा देणारा काॅग्रेस आपले अस्तित्व टिकाविण्याची दक्षता घेत राहील, आणि काॅग्रेसचा तो हक्क कोणी नाकारू शकत नाही.

आता दुसर्या शक्यतेचा विचार करू या. भाजपा महाराष्ट्रातील सत्तेवर पाणी सोडू शकण्याचा जुगार खेळू शकते. ह्याचे कारण हातात असलेली केंद्रातील भक्कम सत्ता. महाराष्ट्रातील सत्तेवर पाणी सोडण्याचे तीन मार्ग भाजपाकडे आहेत. त्यातील पहीला मार्ग म्हणजे राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून दिलेली संधी घेऊन अल्पमताचे सरकार स्थापन करावे आणि आमदारांच्या अंतरमनाला आवाहन करण्याचा फार्स करावयाचा. सोबत शिवसेनेला गद्दार म्हणून शिक्का मारण्याचा प्रचार करेल. शिवसेनेला गद्दार म्हणून शिक्का घेऊन मिरविणे फार जड जाईल. कारण आपल्या देशात कोणी मानो वा ना मानो पण हिंदुत्व आणि सर्वधर्मसमभाव असे मतदारांचे धृविकरण झालेले आहेच. त्यातच रामजन्मभूमीसंबंधी खटल्याचा निकालाने धृविकरणात भर पडणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील राजकारणातील  मोदींच्या उदयामूळे देशातील विधानसभेच्या निवडणूकीतील मतदानावर धृवीकरणाचा प्रभाव वाढू लागला आहे.  मुळात शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे नंतर एक प्रकारचे एक सॅच्यूरेशन आले आहे. जी काही सेनेला मतें मिळत आहेत ती ही बाळासाहेबांच्या जाज्वल हिंदुत्वामूळे. राष्ट्रीय स्तरावर मोदी नावाचा हिंदू हृदयसम्राट म्हणून उदय झाल्यावर शिवसेनेच्या जून्या कार्यकर्त्यांच्या घरात मोदीकडे आकृष्ट झालेले नवमतदार आहेत. काॅग्रेस, राष्ट्रवादी काॅग्रेस तसेच देशभरातील अनेक स्थानिक पक्षांच्या बाबतीत असे घडले आहे व घडत आहे.

भाजपाकडे महाराष्ट्रातील सत्तेवर पाणी सोडून देण्याचा जो  दुसरा मार्ग आहे त्यावर चर्चा करू या. महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्यांचा आधार प्रमाण म्हणून भाजपा जनतेला सांगेल की आम्ही सत्ता स्थापनेचा विचार सोडून सशक्त विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचे ठरविले आहे. शिवसेनेला सत्तेची गरज वा इच्छा जबर आहे. पण शिवसेना सांगू शकते की भाजपाने आमच्याकडे प्रस्ताव ठेवला नाही म्हणून आम्ही राष्ट्रवादी काॅग्रेसची साथ घेऊन सरकार स्थापन केले. पण शिवसेनेचा हा प्रतिवाद लोकांना फारसा रूचणार नाही. कारण राष्ट्रवादी काॅग्रेसची प्रतिमा मलीन झालेली आहे. भले काॅग्रेस पेक्षा अधिक जागा मिळाल्या असल्या तरी राष्ट्रवादी पेक्षा  काॅग्रेसला महाराष्ट्रात पसंती अधिक आहे. ही बाब काॅग्रेस सतत मनात ठेवून आपले पत्ते टाकत राहील. आपला जम पुन्हा बसावा यासाठी काॅग्रेसचे प्रयत्न होत राहणार त्यातून शिवसेनेच्या संभाव्य सरकारला हादरे बसत राहणार आहेत. ते सरकार कोसळले तर  अवकाळी पावसामूळे शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानाचे गांभीर्य न दाखविल्यामुळे राजकीय पक्षाच्या व्यवहाराबद्दल जनतेत रोष निर्माण होऊन मध्यावधी निवडणूकीत भाजपा व सेनेला जबर फटका बसू ही शकतो. ही जाणीव ठेवून भाजपा व शिवसेना नेते  सामोपचाराने समेट करतील का हे आज उद्या पर्यंत कळेल.

भाजपाकडे सत्तेवर पाणी सोडण्याचा तिसरा मार्ग जो आहे तो कलम ३५६ मधून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची संधी. पण हा मार्ग भाजपा स्विकारेल असे ठाम सांगता येत नाही. कारण ह्या बाबतचे न्यायालयीन निकालाचा इतिहास पाहता भाजपा स्वतःसाठी अडचण निर्माण करेल असे दिसत नाही. 

राहता राहीले दोन प्रश्न. एक भाजपा इतर पक्षात फूट पाडून विश्वासदर्शक ठराव पास करून सत्ता राखेल का?  आणि दुसरा आहे भाजपा आणि शिवसेनेत समेट होऊन सरकार अस्तित्वात येईल का?  पहील्या प्रश्नाचे उत्तर ठामपणे नाही असे म्हणवत नाही. कारण भाजपा हा ही राजकीय पक्ष आहे. शिवाय केंद्रात भाजपाची सत्ता २०२४ नंतरही राहणार असे दिसत असल्यामूळे इतर पक्षातील नेत्यांची भाजपाकडे जाण्याची फॅशन जी सुरू आहे ती तशीच पुढे चालू राहील. भाजपातील आमदार फोडण्याचे काम शरद पवार करू शकत नाहीत. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चड्डी संबंधी शरद पवाराने केलेली टवाळी. शरद पवारांच्या पक्षातून आलेल्या भाजपाच्या आमदाराना पवारांनी फोडायचा प्रयत्न केला तर पवारांवर निष्ठा राखून असलेले आमदार नाराज होतील.  शरद पवारांची अशी स्थिती आहे, तिथे संजय राऊतची काय डाळ शिजणार ? म्हणे आमच्याकडे १७५ आमदार आहेत. संजय राऊत जे काही बेताल वक्तव्ये करीत आहेत ते ऊद्धव ठाकरेंची परवानगी विना करीत आहे असे समजण्याची गरज नाही. त्यामूळे शिवसेनेत असंतोष आहे. भाजपाची केंद्रातील सत्ता शिवसेनेच्या नेत्यांनाही भुलवित आहे त्यामूळे असे नेते भाजपात जाऊ शकतात. पण भाजपा मधील आमदार सेनेत जाणार नाहीत एवढे निश्चीत. 

आता दुसर्या प्रश्नाकडे वळू या. सत्तेसाठी भाजपा आणि शिवसेनेत समेट होऊ शकेल का?  शेवटी हे राजकारण आहे. सत्ता कोणाला नको असते ? भाजपाने ही समेट करण्याचा प्रयत्न करावयास हवा आणि तसा तो मोठ्या भावाला साजेसा ही ठरू शकतो. तसा समेट होईल अशी आशा थोडी का असेना पण आहे. कारण हे भांडण संघाच्या दरबारात गेले आहे व ती जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीवर सोपविली जाण्याचे ऐकीवात  आहे. समेट कसाही झाला तरी शिवसेनेने जो तमाशा मांडला आहे त्या संबंधीचा दोष शिवसेनेकडे अधिक राहील असे दिसते. 

सारांशाने असे म्हणता येईल की सध्या आपला महाराष्ट्र नव्वदच्या दशकातील उत्तरप्रदेश सारखी राजकीय अस्थिरता अनुभवीत आहे. ही अस्थिरता दहा वर्षे ही टिकू शकते. हळू हळू ह्या अस्थिरतेतून महाराष्ट्रात पुढे मागे जास्तीत जास्त दोन ते तीन पक्ष अस्तीत्वात राहतील पण केंद्रस्थानी भाजपा राहणार. राष्ट्रवादी काॅग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील अस्तित्व संपेल. जर काॅग्रेसने राज्य स्तरावर राष्ट्रवादी काॅग्रेसला अधिक जागा देण्याची तयारी दाखविली तर महाराष्ट्रात दोन्ही काॅग्रेसची आघाडी बराच काळ टिकू शकेल. महाराष्ट्रातील या अस्थिरतेला भाजपा-सेना दोघेही जबाबदार असले तरी दोन्ही काॅग्रेसची मदत घेण्याची शिवसेनेने दाखविलेली तयारी शिवसेनेच्या मनगुटीवर बसलेले भूत ठरेल व ते शिवसेनेला ताठ उभे राहू देईल असे वाटत नाही. त्यामूळे शिवसेनेला सतत स्पर्धक राहीलेला मनसे बळकट होण्याची शक्यता आहे.  शिवसेनेने आक्रमक राज ठाकरेंची मदत घ्यावी, असे मानणारा एक मोठा गट आहे. त्या आधारे सेना-मनसे भविष्यात एकत्र येऊ शकतात असे मानले जात आहे.  इतर छोटे-मोठे पक्ष ह्या तीन प्रमूख राजकीय प्रवाहाच्या वळचणीला लागलेले असतील त्यात फायदा कोणत्या आघाडीला राहील हे आता सांगता येणार नाही. शेवटी ही सारी जर तर ची भाषा आहे, राजकारणात काही ही होऊ शकते. ह्याचा विसर न पडू देता या लेखात महाराष्ट्रातील राजकीय स्थितीसंबंधी भाष्य केले आहे आणि त्यातले सारे काही आपल्याला भावेल अशी माझी अपेक्षा व धारणा ही  नाही.

४ टिप्पण्या:

  1. म्हात्रेजी फारच सुंदर,चपखल व सडेतोड विश्लेषण! विशेषतः दुसर्या शक्यते संदर्भात. संजय राऊतांची बेताल बडबड शिवसेनेला भोवणार नक्की. पवार बिन चिपळीचे नारद असले तरी त्यांना दोष देता येणार नाही, विशेषतः आज त्यांनी पत्रकार परीषदेत दाखला दिलेली उध्दव ठाकरे उक्ती " युतीत २५ वर्ष सडलो" आणी एकत्र लढलो.

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद ! देशातल्या कुठच्याही राज्यात मोदी सरकारचे दुरगामी व देशहिताचे आक्रमक धोरणाचा प्रभाव पडत राहणार म्हणून स्थानिक पक्षांच्या वाढीला लगाम बसलेला जाणवणार आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. महाराष्ट्र के हित में सेना को जिद्द छोड़ कर भाजपा के साथ आना चाहिए । भविष्य में सेना को अपनी इस करनी का खामियाजा भुगतना पड़ेगा । अति सुंदर विश्लेषण ।

    उत्तर द्याहटवा
  4. धन्यवाद ! शिवसेनामें गये पचीस तीस सालसे युवकोंको प्रेरणा देनेवाला ना कार्यक्रम किया, ना काॅलेज नही खुलवायाँ ना नौकरीयाँ की बढानेका प्रोजेक्ट बनाये, ना उनको ग्राम पंचायतसे लेकर विधानसभा तक टिकट मिला | नतीजा यह हुआ की सेनाके जान देनेवाले युवकोकी दो पिढीयाँ बरबाद हुई वह भी शराबकी आदतसे | अब शिवसेना सिर्फ बुढे नेताओकी रह गयी है और चुनावका प्रचार भाडेपे चलता है | शिवसेना कभी पचंवन और पैसठ सिटोके आगे नही गयी, अब आगे विधायकोंकी संख्या कम होती जायेगी |

    उत्तर द्याहटवा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...