रविवार, १५ सप्टेंबर, २०१९

आपण व आपली दैवते (बुद्धी देवता) भाग १


दर वर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाचे न चुकता आगमन होत असते. श्री गणपती बाप्पा जसे येतात तसे परत ही जातात ; वर्षानुवर्षे ही परंपरा सुरू आहे ; कुठे खंड पडत नाही ; कुठे गौरीसोबत परत जातात तर कुठे अनंत चतुर्दशीला जातात. अनंत चतुर्दशीला विराट जनसमुदायाच्या उत्साहाच्या उधाणात सार्या सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचे विसर्जन होत असते. गणपतीच्या  विसर्जन यात्रेत 'गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लौकर या' अशी आर्त विनवणी आपण करतो. कारण काय तर त्या मंगलमुर्तीच्या सहवासाला आपण पारखे होत आहोत अशी उचंबळून येणारी जाणीव. गणपतीचे विसर्जन झाले की आपल्या  घरातील लाडकी व्यक्ती परगावी गेल्यावर जी स्थिती आपल्या मनाची होते तशी स्थिती होत असते. गणपतीच्या विसर्जनानंतर एक दोन दिवस मनाला रितेपणं आल्यासारखं वाटतं. पण एक दोन दिवसानंतर ते बुद्धीचे दैवत आपल्या मनाला अलगद आपल्या कर्माच्या वाटेवर आणून सोडते आणि आपलं दैनंदिन जीवन सुरू होते.

स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, पांडूरंग शास्त्रीजींच्या शद्बात गणपती विसर्जन (मग तो भाद्रपद चतुर्थीचा असो वा माघी चतुर्थीचा असो)  म्हणजे " जे सान्त आहे त्याला अनंतात, साकाराला निराकारात, व सगुणाला निर्गुणात विलीन करतो. साकार भगवान मूर्तीत आहे तर निराकार भगवान सर्वत्र व्यापून राहिलेला आहे. जीवनातही व्यक्तीपूजेपासून सुरूवात करून तत्वपूजेत त्या आरंभाचे आपण पर्यवसान केले पाहिजे. शेवटी आपण तत्त्वच प्रमाण मानले आहे. सारांश गणपतीचे विसर्जन, म्हणजे विराट पूजेचा आरंभ. म्हणजेच सर्वत्र भगवान पाहणे होय."  समाजवर निरपेक्ष प्रेम करावे अशा अर्थाची  Whatsapp वर एलआयसीतील एका मित्राने अनंत चतुदर्शीला एक पोस्ट पाठविली होती. ती अशी आहे,  The act of Visarjan teaches you to let go of something u love deeply. Visarjan teaches you to surrender to faith over intellect. It also teaches us what we love we may have to leave, so love unconditionally. शास्त्रीजीं प्रमाणे सर्वात देव पाहणे आपल्यासारख्यांच्या आवाक्याच्या पलिकडे असले तरी गणेशोत्सवाच्या काळात कमीत कमी आपण सारे एक आहोत, आपण सारे बंधू आहोत ही भावना गणेशोत्सवात वृद्धीगंत होत जाते. मग आपोआप सर्वांशी प्रेमाने व गुण्यागोविंदाने राहण्याचा प्रयत्न आपल्याकडून होत असतो. त्यामूळे हा उत्सव सर्वत्र  शांतपणे पार पडतो. हा त्या मंगलमूर्तीच्या सहवासाचा परिणाम होय. मग तो घरातला गणेशोत्सव असो वा सार्वजनिक मंडळाचा. आपले सारे सणवार उत्साह निर्माण करणारे आहेत ह्यात बिलकूल शंका नाही. तरी गणेशोत्सवाचा थाट जागृती निर्माण करणारा आहे असे जाणवते. अबाल-वृद्धांपर्यंत समाजातल्या सर्व थरातल्या वर्गाला मंगलमूर्तीची भूरळ वा मोहिनी पडत असते. आपल्या घरात, गावात,  सोसायटीत, काॅलनीत आराध्य दैवताचा वावर असतो ही भावना आपणास आपोआप सत्कर्माकडे घेऊन जाते. त्यामूळे आपले चंचल मन व्यापक बनते. मन व्यापक झाले की ते स्थिर होते. त्यामूळे आपल्यातला विवेक जागृत होऊन बुद्धीचा बहुतांशी सदुपयोग होतो. इथे सर्रास या शब्दाऐवजी बहुतांशी हा शद्ब वापरला आहे,  ह्याचे कारण आपल्या धार्मिक उत्सवात काही अनिष्ट प्रथा शिरत आहेत. काही त्रूटी आहेत. काळानुसार त्या दूर करून काही सुधारणा करण्यास तसेच पर्यावरणासंबंधीची खबरदारी घेण्यास वाव आहे ही बाब नाकारता येत नाही. तसे पाहता इतर धर्मियांच्या सणवारात काही ना काही दोष असतातच. परंतु त्याबाबत आपण काही विचार मांडला तर आपल्या येथील तथाकथित सेक्यूलरीस्ट विचारवंत, संपादक मंडळी आपल्याला हिंदू दशहतवादी असे लेबल चिकटवयास तयार असतात. त्यावरील उत्तर राजकीय स्वरूपाचे असल्याकारणाने इथे देणे अनुचित आहे. म्हणून त्याबाबत या ठिकाणी न बोलणे हेच इष्ट ठरते.


पुजनीय पांडूरंग शास्त्रीजींनी गणेश चतुर्थी ह्या विषयावरील आपल्या लेखात म्हटले आहे की, "अध्यात्मिक दृष्ट्या असे मानले जाते की आपल्या इंद्रियाचा एक गण आहे. ह्या गणाचा पती मन आहे. कोणतेही कार्य सिद्धीस न्यावयाचे असेल तर आपला हा गणपती (म्हणजे आपले मन) ठिकाणावर असला पाहिजे. म्हणून गणपतीला प्रथम पूजण्याचा अर्थ असा आहे की, कार्याच्या प्रारंभापूर्वी मनाला शान्त व स्थिर करायचे ज्याच्यामूळे काही विघ्ने उभी न व्हावीत व कार्य सुखरूपपणे पार पडावे." म्हणून श्री गणेशाला बुध्दीची देवता म्हणतात. पहील्या पुजेचा मानही गणपतीचा असे आपले धर्मशास्त्र सांगते. प्रत्येक शुभ कार्यात त्याचेच प्रथम पूजन होते. विवाहाचा प्रसंग असो, वा लक्ष्मी पूजनाचा, कोनशिलाचा असो, वा कुंभ स्थापनेचा समारंभ असो; मंदिरात भगवंताची प्राणप्रतिष्ठापना करायची असली तरी प्रथम पूजन गणपतीचेच. गणपतीची मूर्ती नसली तरी सुपारीचा गणपती बनवावा लागतोच. ओंकाराला पदार्थ सृष्टी मध्ये आणावयाचे काम गणपतीच्या मूर्तीने केले आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजाने म्हटले आहे,
             अकार चरणो युगल | उकार उदर विशाल |
              मकार महामंडल | मस्तकाकारें |
' अ ' कार म्हणजे गणपतीने घातलेले पद्मासन,  ' उ ' कार म्हणजे विशाल पोट आणि ' म ' म्हणजे त्याचे मस्तक. अशी रसमय कल्पना ज्ञानेश्वर माऊलीने केलेली आहे. ज्ञानेश्वर माऊली, लोकमान्य टिळक, पांडूरंग शास्त्रीजी सारख्या विभूतींनी गणपती बाप्पांच्या उत्सवाचे आपल्या समाज जीवनातले महत्त्व जाणले होते.  त्यावरून तरी असे म्हणावेसे वाटते की श्रीगणेशाला बुद्धीची देवता का म्हटले जाते ह्याबाबत कोणाची शंका नसावी. पांडुरंगशास्त्रीजींने एके ठिकाणी म्हटले आहे की "आपल्या पुराणांची भाषा भावगर्भित तशीच लक्षणा व रूपके यांनी भरलेली असते. बुद्धिशाली माणसाने स्वतःची बुद्धी कसाला लावून भावगर्भित अर्थ शोधून काढून आनंद प्राप्त करून घ्यावयासा असतो आणि बालबुद्धीने ती गोष्ट वाचून आनंद प्राप्त करावयासा असतो. "

एखाद्या शूभकार्याचा आपण प्रारंभ करतो तेव्हा पुष्कळदा प्रारंभ ह्या शब्दाऐवजी कार्याचा श्रीगणेशा केला असे म्हणण्याचा प्रघात आहे. ह्याचा अर्थच असा आहे की बुध्दीची उपासना केल्याशिवाय कुठेचेही कार्य तडीस जात नाही.  म्हणूनच म्हटले जाते,  Action without vision never get succeeded. विचारपूर्वक कृती केल्यानेच कार्यात यश मिळते. जे लोक आपल्या कार्याची नीट आखणी करून त्यानुसार आपल्या आत्मविश्वासाच्या बळाने संपुर्णतः झोकून कार्य करतात त्यांना यश मिळते, असे अनेक विचारवंताचे मत आहे. ते खरे आहे. त्यावरून आपण असे म्हणू शकतो की ' बुध्दी म्हणजे, कार्याची प्रथम आखणी करणे. तदनुसार आत्मविश्वास व निश्चयाच्या बळावर कार्य तडीस नेण्याची शक्ती.' पण शक्ती अजमाविल्याशिवाय कार्य तडीस कसे जाणार ? Vision without action is of no use. म्हणून नियोजन, आत्मविश्वास, निश्चय  आणि कर्तव्य-तत्परता ह्याचा समूच्चय म्हणजे बुद्धी असावी. अध्यात्मात तीन शक्ती महत्वाच्या मानल्या जातात. त्या म्हणजे इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. म्हणजे मन, बुद्धी व श्रम. म्हणजेच भक्तीयोग, ज्ञानयोग व कर्मयोग. काहींचे असे म्हणणे आहे की बुद्धी म्हणजे विचार करण्याची शक्ती. विचाराचा प्रारंभ वा उगम मनातून होत असतो. परंतू मन म्हणजे काय, आपल्या शरीराच्या कुठच्या भागात असते, त्याची शल्यचिकित्सा करता येते का, याबाबत आधूनिक विज्ञान ठोस उत्तर देऊ शकलेले नाही. पण ते चंचल असते हे सर्वांनी मान्य केलेलं आहे. ते स्थिर राहण्यासाठी प्राणायाम, ध्यान, साधना, योगाभ्यास तसेच वैद्यकीय शास्त्रातील ॲलोपथी, आयुर्वेदीय, होमोयोपथी, इत्यादी शाखांनी उपाय ही शोधले आहेत. काळाचा महीमा असा आहे की आज मानवाने आर्टीफिसीयल इन्टीलिजेंन्सचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. परंतु  बुद्धीची ठोस व्याख्या करता आली असावी का ह्याबाबत आपण सांशक आहोत. तरीही आधूनिक विज्ञानाने आयक्यू IQ  नावाची संज्ञा शोधून काढलेली आपण पाहतो. ती ही जमेची बाजू आहेच की. इमोशनल कोशन्स ह्या संकल्पनेवर चिकित्सा होत आहे हे आधूनिक विज्ञानाचे चमत्कार आहेत. असे अनेक वैज्ञानिक चमत्कार मानवाने केले आहेत, ते आपल्यात विराजमान असलेल्या बुद्धीच्या जोरावरच ना ! आपल्याकडे असलेल्या बुध्दीच्या सामर्थ्याने आपण बुद्धीचे ही दोन प्रकार मानले आहेत. एक सुबुध्दी आणि दुसरी दुर्बुध्दी. तसेच गुणाचेही  सद्गगूण व अवगूण; वृत्तीचे  दुष्टवृत्ती व सत्प्रवृत्ती ; आपल्या कृतीचे चांगले-वाईट, किंवा पाप-पुण्य असे प्रकार मानले आहेत. 

मानव आणि इतर प्राणीमात्रात सर्वात महत्वाचा फरक हा आहे की आपल्याकडे बुद्धी आहे. ह्या बुद्धीच्या जोरावर मानव इतर प्राण्यापेक्षा अति प्रगत, अति शक्तीमान ठरला आहे. सर्वशक्तीमान कोण तर तो ईश्वर ! मानव सर्वशक्तीमान आहे असे मानता येत नाही. कारण आपण सृष्टी निर्माण केलेली नाही. तसेच आज विज्ञानाच्या आधाराने आपल्याला जे काही विश्वासंबंधी ज्ञान प्राप्त झाले ते ही एका कणाएवढेच असावे कारण आपल्या सुर्यमालेसारख्या अनेक सुर्यमाला आहेत हे विज्ञानाचे म्हणणे आहे. फार तर इतर प्राण्यांपेक्षा मानव शक्तीमान ठरला आहे असे म्हणावे. आणि तसे  सिद्ध झाले ही आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेली बुद्धी ही एक प्रकारे आपल्या मध्ये विराजमान असलेल्या ईश्वराचे एक छोटे  स्वरूप आहे. म्हणजेच बुद्धी ही एक देवता आहे असे मानले तर ते पोथीनिष्ठ ठरते असे होत नाही. आपल्याला हे पटते, पण  सार्यांनांच हे पटते असे नाही. काहींना देव- दैवते हा शब्द खटकतो. ते ही स्वाभाविक आहे म्हणा.  गेली काही वर्षे मला ही माझ्यात थोडक्या प्रमाणात असलेली बुद्धी स्वस्थ बसू देत नव्हती. बुद्धीचा देव ही कल्पना खरोखरीच वेडगळ असावी का ? सारे काही वैज्ञानिक पातळीवरून पडताळून पाहता येते का? त्यातून मानवी जीवनाचे प्रयोजन काय आहे हे शोधता येते का, मानवा समोरील आव्हाने, समस्या ह्यावर समाधानकारक उत्तरे मिळून ह्या पृथ्वीवर शांती आणि सुखाचे नंदनवन साकारले जाणार का असे अनेक प्रश्न मनात उभे राहात आले आहेत. शालेय जीवनात प्रत्येक इयत्तेत भाषा विषयाच्या प्रश्नप्रत्रिकेत 'विज्ञान वरदान की शाप '  ह्या विषयावर निबंध लिहीण्याचा प्रश्न असायचा. त्यावेळी निबंधाच्या रेडीमेड पुस्तकाच्या व गुरूजन वर्गाने दिलेल्या मुद्याच्या आधारावरून निबंध लिहीत असे. ह्या गोष्टीची आज आठवण अशासाठी होते की ,विज्ञान वरदान की शाप असा प्रश्न कुठल्याही परीक्षेसाठी जर विचारला जातो तर  विज्ञान हे जसे दैवत आहे, तसे ते पिशाच्च ही आहे, हे जगभरातल्या सर्वच शिक्षण संस्थांनी मान्य केले आहे असे दिसते. वरदान म्हणजे देव-देवता आणि शाप म्हणजे पिशाच्य. मग दैवत ह्या शब्दाला हरकत का असावी. देव-देवता, पंथ, उपासना, सांप्रदायिकता--पुरोगामीत्व, विकास-मागासलेपणा, प्रगती-अधोगती, धर्म-अधर्म, पाप-पुण्य, अध्यात्म- भौतिकवाद, विज्ञानवाद इत्यादी विषय बौद्धीक पातळीवरचे मानले जातात. या विषयाचा आवाका फार मोठा आहे. त्यात आपण पडलो सामान्य कुवतीचे, म्हणून तर आपण सामान्यजन. पण चर्चा व संवाद करायला आपल्याला कोणी अडविणार नाही हे तर खरे आहे. आजच्या युगाने सोशल मिडीया द्वारें आपल्याला दिलेली मौलिक संधी का सोडावी हा विचार करून यावर चर्चा व संवादा द्वारे लेख मालिका सुरू करावी असे ठरविले आहे. पुढल्या एक दोन आठवड्यात 'ओम नमोजी आद्या, देवा तूंची गणेश, सकळार्थमतिप्रकाश, तसेच हें शब्दब्रह्म अशेष, तेचि मूर्ती सुवेष ' असे ज्ञानेश्वरीच्या सुरवातीस माऊलीने म्हटले आहे. त्यापासून चर्चेला सुरूवात करू या. नंतर  बुद्धी व बुद्धीचे प्रकार, मन व बुद्धी , बुद्धी व श्रद्धा, बौद्धिक पातळी, अध्यात्म, बुद्धीप्रामाण्यवाद, इत्यादींचा आपल्या जीवनावर कसा प्रभाव पडतो तसेच विविध क्षेत्रातील तज्ञांची मतें काय आहेत ह्यावर आपण टप्प्या-टप्प्याने पुढे चालत राहू या. तुर्तास आज इथेच थांबू या.

रविवार, १ सप्टेंबर, २०१९

इम्रानखान व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ


मंगळवार दिनांक २७ आगस्ट २०१९ रात्री घरी परतल्यावर टिव्ही ऑन केला तर NewsX चॅनेलवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान ह्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंबंधी केलेल्या वक्तव्यावर चर्चा सत्र सुरू होते. चर्चा सत्रातील सर्व मान्यवरांनी इम्रानखानच्या वक्तव्यावर कडक ताशोरे ओढले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपाला देशवासियांनी एकजुटीने विरोध करावा असे मत मांडले. एकूण चर्चेचा सुर व स्वरूप पाहून समाधान वाटले. प्रथम इम्रानखान ह्यानी त्यांच्या देशाला संबोधन करताना, काय म्हटले आहे ते पाहू या. इम्रानखानने म्हटले की, ' काश्मीर मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गुंडगिरी सुरू केली आहे ; मोदी सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एजंडा राबवित आहे ; राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदूची फॅस्टीट संघटना आहे.' इतर न्यूज चॅनेलवर इम्रानखान यांच्या वक्तव्यावर चर्चा सत्र झाले की नाही ह्या संबंधीची मला कल्पना नाही. पण बुधवारच्या मटा मध्ये इम्रानखानच्या वक्तव्यासंबंधी साधी बातमी ही नव्हती. बहूतांश प्रिन्ट मिडीया आणि इलेट्राॅनिक्स मिडीयाने इम्रानखानच्या या वक्तव्याची दखल घेतली नाही, म्हणून हा लेख प्रपंच.

प्रथम आपण इम्रानखान यांनी असे वक्तव्य का केले असावे यावर चर्चा करू या. एकंदरीत जम्मू आणि काश्मीर राज्यातील ३७० आणि  ३५ अ कलम हटविल्यानंतर पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. भारताने बालाकोट वर एअर स्ट्राईक करून पुलवामा वर केलेल्या हल्ल्याचा बदला घेतला. भारत असा काही बदला घेईल असे पाकिस्तानला वाटले नाही तसेच आतंरराष्ट्रीय समुदायाला ही वाटले नाही. आतापर्यंत सहिष्णूता आणि विश्वशांतीच्या स्वप्नात रमलेल्या भारताच्या ओळखीची सवय जडेलेले सारे जग खडबडून जागे झाले. पाकिस्तान तर गोंधळलेल्या स्थितीत गेला. काय करावे असा प्रश्न पाकिस्तानला सतावू लागला. आंतरराष्ट्रीय मंचावर दशहतवाद्यांचा खात्मा झाला पाहीजे असे सतत मांडत राहण्याची भारताच्या नीतीने  सार्या जगाला आपलेसे करून घेतल्या मुळे बड्या देशाची भारतावर डोळे वटारण्याची हिम्मत झाली नाही. पण पाकिस्तानची मात्र जगभर नाच्चकी झाली. युद्धनीतीमध्ये असे म्हटले जाते की ' शत्रूला प्रथम बेसावध करून गाठायचे म्हणजे त्याला गोंधळात टाकावयाचे. मग आपोआप शत्रूमध्ये अस्वस्थता निर्माण होते. अस्वस्थतेतून शत्रू पक्ष अस्थिरतेकडे सरकतो मग शत्रू आपोआप दिशाहीन होतो. पाकिस्तानात गोंधळाची, अस्वस्थेची, अस्थिरतेची स्थिती झाली असतानाच भारत सरकारने जम्मू आणि काश्मीर राज्यातील कलम ३७० व कलम ३५ अ तडकाफडकी हटवून दोन्ही प्रेदशाचा ताबा आपल्याकडे घेतला. काश्मीरचे स्वतंत्र अस्तीत्व संपले आहे. तिथे भारतीय संविधान लागू झाले आहे. तेथे कुठल्याही स्थानिक पक्षांची चाललेली मनमानी पुढे सुरू राहणार नाही. आता काश्मीरमध्ये काही ऊठाठेव वा आगळीक केली तर तो भारताच्या सार्वभौमत्वा वर हल्ला मानण्यात येईल. त्यावर भारत पाकिस्ताला सडेतोड उत्तर देईल आणि सोबत देशांतर्गत अलगावाद्यांच्या कारवाया मोडीत काढू शकेल. एका अर्थाने भारताने आपली जम्मू व काश्मीर संबंधीची  भूमिका फक्त पाकिस्तानलाच नव्हे तर सार्या जगापुढे मांडली आहे. वाचकांना ठाऊक असेलच की पाकचे पंतप्रधान इम्रानखान यांचा अलिकडे अमेरीकेचा दौरा झाला तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इम्रानखान समवेत झालेल्या चर्चेत काश्मीर प्रश्नात अमेरिका मध्यस्थी करावयास तयार आहे असे आश्वासन दिले होते. ते हवेत विरण्याच्या आत जी ७ च्या निमित्ताने फ्रान्स येथे झालेल्या संयुक्तिक पत्रकार परिषदेत  ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्न हा भारत व पाक ह्या दोन देशामधील आहे हे स्पष्ट केले. स्पष्ट केले असे म्हणण्या ऐवजी स्पष्ट करावे लागले असेच मानू या. हा भारताच्या परराष्ट्र नीतीचा, अतंर्गत व बाह्य सुरक्षा नीतीचा विजय आहे हे सार्यांना मान्य करावे लागते.

जम्मू आणि काश्मीर राज्यासंबंधी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाने एका दगडात अमेरिका व पाकिस्तानला बेजार करून टाकले. असे ऐकीवात आहे की इराणचे पंख छाटण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानच्या भूमीची गरज होती. इतकेच नव्हे तर तालीबानचा सतत द्वेष करीत आलेल्या अमेरिकेने, पाकिस्तानला  तालिबान संघटनेची मदद घ्यावी अशी आज्ञा ही दिली होती. मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीर राज्यातील कलम ३७०, व कलम ३५अ तडकाफडकी रद्दबदल करून पाकिस्तानालाच जखडून ठेवले. अमेरिका व इराण ह्याच्यात जो काही दुरावा निर्माण झाला आहे त्याबाबत भारताची भूमिका स्पष्ट आहे. ती म्हणजे भारत अमेरिकेच्या सांगण्यावरून नाचणार नाही. अफगणिस्तानात अमेरिकेने केलेल्या लष्करी कारवाईत भारताने वाजपेयीचे सरकार असताना अमेरिकेला लष्करी साहाय्य देण्याचा तसेच आपल्या भूमीचा वापर करण्यासंबंधी स्पष्ट नकार दिला होता. काश्मीर मधील कलम ३७० व कलम ३५  रद्द झाले असल्यामूळे  जम्मू आणि काश्मीर प्रश्नासंबंधी चर्चा करायची म्हटले तर पुन्हा १९४७ च्या पुर्वपदावर जावे लागेल. म्हणजे पाकिस्तानने बळजबरीने हिसकवलेला पाक व्याप्त काश्मीर भारताला परत करावा अशी अट टाकूनच भारत चर्चा करेल आणि ती ही द्विपक्षीय स्वरूपाचीच राहील. तसेच वेळ पडल्यास पाकव्याप्त काश्मीर लष्करी बळावर घेण्याचा पर्याय ठेवू शकतो असे अप्रत्यक्ष रित्या जगाला कळविले आहे. ह्या बाबत युनोचा ही हस्तक्षेप चालू शकणार नाही. म्हणून भारत सरकारचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवित असल्याचा आरोप इम्रानखानने केला आहे.  शेवटी जिहादी मनोवृत्तीच्या लोकांना सर्वत्र जिहादच दिसतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर इम्रानखानने केलेला आरोप म्हणजे स्वतःच्या देशातील जिहादी मनोवृत्तीच्या विरोधी पक्षांच्या आरोपातून आपली सुटका करण्यासाठी जिहादी मनोवृत्तीच्याच इम्रानखानने केलेली ही कवायत आहे. या पलिकडे इम्रानच्या वक्तव्याला फारसा अर्थ नाही.

आता आपण इम्रानखान यांनी संघावर केलेल्या आरोपांची आपल्या देशांतर्गत राजकीय स्थितीवर काय परीणाम झाले आहेत आणि काय होतील यावर चर्चा करू या. इम्रानखानने संघावर केलेल्या आरोपाला भारत सरकारने कवडीची ही किंमत दिली नाही. आपल्या कडील संघ व भाजपा द्वेष्टे वर्तमानपत्रे व इलेट्राॅनिक्स मिडीयाने इम्रानखानने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टिकेची साधी बातमी ही दिली नाही. भारत सरकारने इम्रानखानच्या वक्तव्याकडे केलेलं दुर्लक्ष आणि आपल्या देशातील विरोधी पक्षांनी इम्रानच्या वक्तव्याकडे केलेलं दुर्लक्ष ह्यात जमीन आस्मानाचा फरक आहे. समजा मटा, लोकसत्ता, लोकमत इत्यादी वर्तमानपत्रे, व एनडीटिव्ही सारख्या न्यूज चॅनेलनी इम्रानखानने संघावर केलेल्या टिकेची बातमी जर दिली असती तर त्या वर्तमान पत्राच्या तसेच न्यूज चॅनेलच्या संपादकांना वाचक आणि श्रोते ह्यांनी म्हटले असते, की ' तुम्ही सुध्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अशाच शब्दात गेली नव्वद वर्षे टिका करीत आहात ना ! तुम्ही इम्रानखानचे सगे सोयरेच आहात की !' आपली कुंचबणा होऊ नये म्हणूनच ह्या मंडळींनी इम्रानखानने संघावर केलेल्या टिकेला प्रसिध्दी देण्याचे टाळले आहे. आपली कातडी वाचविण्याच्या नादात इम्रानखानने त्यांच्या भारतातील (राहूल गांधी सिताराम येचूरी, मणीशंकर अय्यर, शरद पवार लालू मुलायम ममता बॅनर्जी इत्यादी मंडळी) हितचिंतकांनाच अडचणीत आणले आहे. इम्रानखानने संघावर टिका केल्यानंतर विरोधी पक्षांची मंडळी व मिडीयातील त्यांचे भाट मित्र चूपचाप बसले आहेत. त्यांचेच शब्द इम्रानखानने त्यांच्या घशात लोटले आहेत. म्हणून त्यांची तोंडे बंद आहेत. इम्रानखानने संघावर केलेल्या आरोपाचा आपल्या येथील तथाकथीत पुरोगामी मंडळींनी निषेध नोंदविला असता तर ते अप्रत्यक्षरित्या संघाचे समर्थक ठरले गेले असते. बरं चुप राहूनही या मंडळींचा फायदा झाला, असेही नाही. कारण चूप राहिल्याने देशवासियांना संदेश काय पोहचला, तर हाच की 'राष्ट्रप्रेमी संघापेक्षा यांना इम्रानखान पंसद पडला आहे. आपल्या देशातील विरोधी पक्षांची स्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे.'

बुधवारी २८ आगस्ट च्या दिवशी पत्रकार परिषद चालू असताना, पाकचे पंतप्रधान इम्रानखान सैरभैर झालेले NewsX च्या कॅमरामनने अचूक रित्या दाखविले. त्यावरून पाकिस्तान किती दिशाहीन झाला असावा ह्याचा अंदाज येऊ शकतो. पाकिस्तान सोबत अमेरिका ही काश्मीर संबंधी हतबल झालेली दिसते. भारतावर दादागिरी अमेरिकाही करू शकत नाही. पण काही तरी केले पाहीजे व करावेच लागते याचेच नाव आहे राजकारण. मग ते देशांतर्गत हो वा जागतिक पातळीवरचे असो. भारतात संघाला विरोध करणारी मंडळी आहेच. त्यातच कलम ३७० व ३५ अ  हटविल्याच्या विरोधात कोर्टात याचीका ही दाखल झाल्या आहेत. हीच सोय समजून इम्रानखानने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टिका केलेली दिसते. म्हणून इम्रानखानचा बोलाविता धनी अमेरिका, चीन तसेच मुस्लीम आतंकवादी संघटना, आएएस, पाक लष्कर आणि आपल्या येथील राहूल गांधी, मणीशंकर अय्यर, केरळचे डावे मंडळी तसेच ख्रिस्ती आणि मुस्लीम धर्मगुरू, अनेक विदेशी कंपनीच्या मदतीने सुरू असलेले एनजीओ इत्यादी असू ही शकतात.

इम्रानखानचा बोलविता धनी कोणी का असेना, पण संघावर इम्रानखानने जी टिका केली आहे ती आपल्या देशातील विरोधी पक्ष संघावर टिका करतात त्या धाटणीची आहे. इथेच पाणी मुरतयं अशी देशातील बहूतांश मतदारांची भावना आहे आणि अशी भावना २०१४ पासूनच झालेली आहे म्हणून तर विरोधी पक्षांना सलग दोनदा दारूण पराभव स्विकारावा लागला. आपल्या देशांतर्गत राजकारणाचे असे स्वरूप येण्यामागे विरोधी पक्षांचे धोरण कारणीभूत आहे. पाकिस्तानचे विरोधी पक्ष स्वतःच्या देशहिताची बूज राखून व्यवहार करतात. पुलवामा येथे भारतीय जवानांना दशहतवाद्यांतर्फे मारले तेव्हा त्यांनी मानवतावादी भूमिका घेऊन इम्रानखानवर टिका केली नाही पण बालाकोटवर दशहतवाद्यांचे अड्डे भारताने उडविले त्याबद्दल इम्रानखानवर कडक ताशोरे ओढले. दशहतवाद्यांवर केलेला हल्ला हा आपल्या देशावरच हल्ला असे पाकमधील विरोधी पक्ष मानतात. ह्यातून आपल्या येथील विरोधी पक्ष व त्यांचे पाठिराखे पत्रकार, संपादक आणि स्वयंभू विचारवंत काहीतरी बोध घेतील असे वाटले होते. पण निराशाच पदरी आली. सुंभ जळाला तरी पीळ काही जात नाही ना !

भाजपाला तसेच ज्या पक्षांनी ३७० व ३५ अ कलम हटविण्याच्या संदर्भात राज्यसभेत पाठींबा दिला आहे अशा सार्या पक्षांच्या बद्दल जनसामान्यांमध्ये एक प्रकारचा आदर निर्माण झालेला दिसतो. ह्याचा अर्थ नजिकच्या भविष्यात देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अभिप्रेत असलेली सांस्कृतिक  राष्ट्रवादाची संकल्पना मूळ धरू लागल्याचे दिसू लागेल. संघाला अस्पृश मानणार्या विचारवंतांची वाटचाल वैचारिक रित्या दिवाळखोरीच्या मार्गावर सुरू झालेली ठळकपणे दिसू लागेल. नक्षलवादी, डाव्याच्या इतर संस्था, मदरेसातून धार्मीक उन्माद शिकविणारे मौल्लवी वर्ग, निवडणूकीत राष्ट्रवाद्यांचा पराभव करण्याचे पत्रक काढणारे काही अतिशहाणे ख्रिस्ती धर्मगुरू, इत्यादींचे कंबरडे नजिकच्या काळात मोडले जाईल असे दिसत आहे. मेवाणी, कन्हैय्या, हार्दिक पटेल सारख्या जातीय द्वेष पसरविण्यारांना त्यांची जागा दाखविली जाईल,  भ्रष्टाचारी राजकीय नेत्यांची अब्रू वेशीवर टांगली जाईल. प्रतिष्ठीत, विचारवंत, राजकीय अभ्यासक म्हणून गणलेली गेलेली काॅग्रेस व डाव्या पक्षांची पिल्लावळांची नशा उतरवली जाईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इम्रानखानच्या वक्तव्यावर काही प्रतिक्रीया देईल असे वाटत नाही. कारण आजवर संघ आपल्यावर होणार्या टिकावर सतत दुर्लक्ष करून देश व समाज हिताय कार्यें करूनच उत्तर देत आलेला आहे. तसेच ३७० व ३५ अ संबंधीत सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून सरकार सकट सर्वांनी संयम राखावा असा सल्लाही संघाने दिला आहे. संघ प्रथम राष्ट्राचेच हित पाहतो, सत्ता कोणाची ही असू द्या. केंद्रातील मोदी सरकार मध्ये अनेक मंत्री संघाचे स्वयंसेवक आहेत. खुद्द आपले पंतप्रधान तर संघाचे प्रचारक होते. त्यामुळे केंद्र सरकार संघाने दिलेला सल्ला मानेल आणि सतत संयम राखून जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख संबंधीचे धोरण सर्वसमावेशक ठेवील व सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास ह्या धोरणातून जनसामान्यांना दिलासा देईल असा विश्वास वाटतो. आणखिन एक गोष्ट स्पष्ट दिसते ती ही की , ३७० व ३५ अ कलम हटविल्याच्या निर्णयावर चर्चा अधून मधून होत राहील व  प्रत्येक वेळी काॅग्रेस व मित्र पक्षांचे नेते दिशाहीन झालेले पाहावयास मिळालेले दिसतील. तशी अवस्था येणे आपल्या लोकशाहीच्या वाटचालीच्या दृष्टीने अयोग्य आहे, पण  बुडत्याचा (आपल्या देशातील संघ-भाजपा द्वेष्टे राजकीय पक्ष व पुरोगामी पत्रकार, संपादक व पुरोगामी विचारवंत इत्यादींचा) पाय खोलात जातो ना ! आपण काय करू शकतो?
मञ

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...