काल परवा दिल्लीचे आर्च बिशप अनिल काउटों ह्यांनी पुढील वर्षी देशात नवं, चांगलं, सर्वधर्मसमभावाचं सरकार यावे अशी प्रार्थना देशातील प्रत्येक चर्चमध्ये करण्याचे आवाहन केले आहे. दर शुक्रवारी उपवास करण्याचेही आवाहन केले आहे. आता शुक्रवारीच का असा प्रश्न त्यांना कोणी ख्रिस्ती बांधव विचारणार नाही. पण चाणाक्ष वाचकांना आर्चबिशपनी शुक्रवार का निवडला ह्याबाबतचं उत्तर ठाऊक झाले असणार. भारतातील राजकरण प्रत्यक्ष डोळ्यांनी ज्यांनी पाहीले आहे व पंतप्रधान मोदीचं कौतुक करणारे, बीबीसीचे जेष्ठ पत्रकार मार्क टुलीनी दोन वर्षापूर्वी एक भाकीत वर्तविले होते, ते असे आहे, " पंतप्रधान मोदींनी स्विकारलेल्या विकासाच्या मार्गावर विरोधी पक्ष नाना प्रकारे विघ्न घालण्याची कृत्ये करतील." त्याची प्रचिती भारतीयांना येऊ लागली आहे. परंतु ख्रिस्ती धर्मगुरू विरोधी पक्षांचं मदतनीस म्हणून काम करतील ते ही इतक्या उघडपणे असे वाटले नव्हते. आता तर २०१९ ची लोकसभा निवडणूक ही राजकीय लढाई नसून धर्म-युध्द ठरेल की काय अशी शंका येऊ लागली आहे. गुजरात मधील निवडणूकीत राष्ट्रवाद्यांचा पराभव करा असे आवाहन करण्याचे पत्रक आर्चबिशप थाॅमसनी केलं होतं ह्याचे स्मरण वाचकांना असणार असे गृहीत धरून ह्या विषयावर चर्चा करू या.
ख्रिस्ती धर्मगुरूनी जे आवाहन केले आहे त्यातून त्यांना तीन हेतू साध्य करावयाचे आहेत. मोदी सरकार पराभूत करणे हा पहिला हेतू. उपवासाठी शुक्रवार निवडून देशातील मुस्लीम ह्या अल्पसंख्याक समाजालाही खुष करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. म्हणजे मुस्लीम समाजानेही मोदी सरकारच्या विरोधात मते द्यावीत हा दुसरा हेतु. सर्वधर्मसमभावी सरकार यावे अशी जी इच्छा व्यक्त केली आहे त्यातून सर्व विरोधी पक्षांनी एकत्रितपणे मोदी व भाजपाशी टक्कर द्यावी हा तिसरा हेतू स्पष्ट होतो.
करोडो रूपये न्यूज चॅनेलमध्ये ओतून काही विदेशी कंपन्या आपल्या येथील तथाकथीत सर्वसमभावी विचारवंतांची सतत तळी उचलून धरण्याचं काम करीत आहेत. हिंदू हितवादी संघटनांच्या विरोधात सतत गलीच्छ प्रचार करीत आहेत. हा झाला गोबेल्स तंत्राचाच वापर. हिटलर आणि गोबेल ह्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारशैलीशी दूरान्वये संबंध नाही, तरी ही तथाकथीत सेक्यूलर मंडळी हमखास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यशैलीची तुलना हिटलरशी वा गोबेल्सशी करीत असतात. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. आणि हो ह्यांचे हिरो चर्चील आणि स्टॅलीन हे तरी कुठे शांतीदुत होते? परंतु ह्या सत्याचा सोयीस्कर रित्या विसर पडावा म्हणजे आपलं पुरोगामत्व सिध्द होते अशी ह्यांची समजूत.
मूलतः हिंदू समाजा इतका सहिष्णु समाज ह्या भूतलावर नाही. ज्यांचा इतिहास धर्माच्या श्रेष्ठत्वावरून रक्त सांडल्याचा आहे, अशांनी जागतिक इतिहासाची पाने वाचावीत. कुठल्या भूमीवर क्रुसेडेस झाली आहेत आणि कोणांमध्ये झाली आहेत हे ही समजू शकेल. झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागे करता येत नाही. असे म्हटलं जातं हे खरेच आहे. पण तसे म्हणणे ह्या लेखाच्या विषयाबाबतीत संदर्भहीन झाले आहे. कारण ह्या सर्वांचं झोपेचं सोंगच २०१४ च्या सार्वत्रिक निवडणूकीत उघडं पडलं. तेव्हा पासून गेली चार वर्षे ह्या हिंदुत्व विरोधी मंडळींची झोपच उडाली आहे. म्हणून आता जागेपणीच ख्रिस्ती आणि मुस्लीम धर्मगुरूंच्या मार्फत पत्रके काढण्याच्या उद्योगाला लागले आहेत. नरेद्र मोदी सत्तेवर येईपर्यंत 'जो चल रहा है उसे चलने दो, हमें सत्तासे मतलब!' अशी भावना काँग्रेस आणि मित्रपक्षामध्ये बळावत गेली होती. तिला 'सबका साथ सबका विकास' ह्या घोषणेमुळे जबरदस्त फटका बसला आहे. ह्याचं शल्यं त्यांना सलत असावं. ह्याबद्दल दुमत नाही. ही स्वाभाविक बाब आहे. परंतु वाकड्या वाटेने जाऊन ना यश मिळणार, ना शांती. हे ह्यांनी पक्कं ध्यानात ठेवावे.
काँग्रेसला सत्तेच्या नशेची सवय ब्रिटिशांच्या काळात लागली होती. ह्या विषयासंबंधीचा तपशील 'न्यायमूर्ती चेलमेश्वर ह्यांची निवृत्ती आणि राजकारण' ह्या लेखात मी दिलेला आहे. सत्ता टिकविण्यासाठीच 'फोडा आणि झोडा' ही ब्रिटीशांची नीती काँग्रेसने प्रत्यक्ष अनुभवली होती. तिचाच वापर काँग्रेस राज्यकर्त्यांनी सतत केला. सोनिया गांधींच्या काळात तर काँग्रेसने हिंदूचं खच्चीकरण केलं आणि हेच मुख्य कारण काँग्रेसचं संसंदेतील संख्याबळ ४४ पर्यंत खाली येण्यामागे आहे. उगीच राहूल गांधींना बळीचा बकरा बनविण्यात काही अर्थ नाही. भाजपा सोडून इतर सारे पक्ष काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नेत्यांनीच स्थापन केलेले असल्यामुळे काँग्रेसप्रमाणेच हे पक्षही आपआपल्या नेत्यांच्या मालकीचे झाले आहेत. अल्पसंख्याकांच्या मतासाठी कुठल्याही थराला जाण्याची तयारी ह्या सर्व पक्षांच्या प्रत्येक वयोगटातील नेत्यांची आणि कार्यकर्यांचींही होत आहे. उदाहरणं द्यायचे म्हटले तर पुष्कळ आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड ह्यांनी इशरत जहाॅला कसे सनदशीर मार्ग अवलंबिणारी सौजन्यशील काॅलेज युवती गौरविले होते हे आपण पाहीले आहे. गेली चार वर्षे मोदींच्या समर्थकांची रोज टर उडविणे हा एकमेव अजेंडा यांचा झालेला आहे. आपआपल्या पक्षातील सर्वोच्च नेत्याच्या शेंबड्या मुलाचे पाय धरायला लाज न वाटावी अशी मानसिकता तयार झालेल्या ह्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रथम आपण स्वतः भक्त आहोत का मानसिक गुलाम ह्याचा शोध घ्यावा. ख्रिस्ती धर्मगुरूंना राजकीय स्थितीसंबंधी काळजी वाटत असेल तर त्यांनी एकजात सर्व विरोधी पक्षांमधील घराणेशाहीवर उपायाचा डोस विरोधी पक्षांना द्यावा. त्या पक्षांमध्ये लोकशाहीची बीजे रूजविण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे आपल्या देशाच्या लोकशाहीची चिंता उरणार नाही. त्या निमित्ताने अनिल कऊटा सारख्या धर्मगुरूकडून खरे राष्ट्रीय आणि ईश्वरी कार्य घडेल. वस्तूतः कोणतीही व्यक्ती समाजापेक्षा मोठी नाही तसेच परमेश्वराहून तर नाहीच अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिकवण आहे. म्हणून संघाने भगवा ध्वज हा गुरू मानला. मतभेद असले तरी इतर पक्षांनी भाजपा आणि संघाचा इतक्या पराकोटीचा द्वेष का ठेवावा? काँग्रेस सोडून सर्वच पक्षांनी भाजपासोबत सत्ता उपभोगली आहे. असे असूनही भाजपाला नमविण्यासाठी ख्रिस्ती धर्मगुरूंची मदत घ्यावी आणि त्यांनीही खुशाल देशबांधवांना आदेश द्यावेत, ह्या इतकी आपल्या लोकशाहीची घोर विटंबना कोणती असू शकते? त्यातून एक मोठा धोका दिसू लागला आहे. त्या धोक्याचं स्वरूप नक्षलवादी आणि दशहतवाद्यांच्या धोक्यापेक्षा टीचभरही कमी नाही. त्या धोक्याचं गोंडस नाव आहे सर्वधर्मसमभाव.
मुलतः आपल्या देशाच्या संस्कृतीत सर्वधर्मसमभाव, निधर्मी, सेक्युलर असे शब्द अस्तित्वातच नव्हते. कारण आपल्या इथे सहिष्णुता हा शब्द प्रचलीत होता व आहे. इंग्रजीमध्ये टाॅलरन्स ह्या शब्दाची कल्पना एन्सायक्लोपिडीया आॅफ रिलीजन अॅन्ड एथिक्समध्ये स्पष्ट केले आहे की, 'एखाद्या मताबद्दल नापंसती असली तरी काही प्रमाणात आणि काही अटी घालून स्वातंत्र्य देणे.' या उलट सहिष्णुतेची आपली कल्पना फारच व्यापक आहे. संग्रामसिंह चौधरी म्हणतात "सर्व प्राणीमात्रांमध्ये दुसर्याचे सुखदु:ख आपलेच आहे असे मानून एकत्वाची अनुभूती घेणे म्हणजे सहिष्णूता आणि अभयभावना होय." भारतीय संस्कृतीत सहिष्णुता आणि विचार स्वातंत्र्य भारताच्या अध्यात्मानेच निर्माण केले आहे." डाॅ. अॅनी बेझंट ह्यांनी हिंदूंच्या धर्म संस्कृतीस जगातील सर्व धर्माचा मूळ स्त्रोत म्हणून मानावे असा विचार मांडला आहे. त्या पुढे म्हणतात की इतर धर्मीयांनी तसे मानले तर हिंदू सारखी सहिष्णूता त्यांच्यातही येऊ शकेल. परंतु अॅनी बेझंटचा सल्ला आपण मानला नाही. कुठे त्या सौजन्यशील, उच्चविद्याविभूषित डाॅ. अॅनी बेंझट आणि कुठे सोनिया गांधी! सर्वधर्मसमभाव हा शब्द घटनेच्या परिच्छेदात इंदिरा गाधींच्या कारकिर्दीत घातला गेला. त्यामुळे सर्व धर्म समान आहेत असे अहिंदूना खूष करावयास म्हणावयाचे आणि हिंदू धर्मात सर्वात अधिक सहिष्णूता असे म्हणत हिंदूना खुष करावयाचे असे धोरण काँग्रेसने अवलंबिले. त्यामुळे झाले असे की एका बाजूला हिंदू समाजाची अतिसहिष्णुता आणि दुसर्या बाजूला इतर धर्मातील (इतर म्हणजे आपल्या भूमीच्या बाहेर ज्यांचा उगम झाला आहे असे इस्लाम आणि ख्रिस्ती) टाॅलरन्स समान म्हणून तोलले जाऊ लागले. हा दिडदांडूचा तराजू म्हणजे आजच्या तमाम तथाकथीत पुरोगामी मंडळीचा सर्वधर्समभाव. परंतु तो विकृत स्वरूपात आहे हे सांगणार कोण? अल्पसंख्याकांच्या मतांच्या लालसेत सारासार विचार करण्याची शक्ती ह्यांनी गमाविली आहे ना!
आपल्या देशात नागरिकांना स्वतःच्या धर्माचे पालन करण्याचं स्वातंत्र्य आहे . माझी समजूत अशी आहे की स्वातंत्र्यानतंर काँग्रेसने राजकीय फायद्यासाठी मुद्दामहून नागरिक ह्या शब्दाचा अर्थ मतदार म्हणून केला. त्यातूनच अल्पसंख्यांक हा एक समाज आपोआप निर्माण झाला. एकदा का एखाद्या समाजात अल्पसंख्याकांची निर्मीती झाली की लोकशाही प्रणालीमध्ये अशा अल्पसंख्याकांकडे मतपेटी म्हणून पाहण्याची दुर्बुध्दी निर्माण होत असते. तसेच आपल्या देशात घडत आले. पुर्वी फक्त इमाम मंडळी मुस्लीम बांधवांनी विशिष्ट पक्षासाठी म्हणजे काँग्रेससाठी मतदान करा असा फतवा निवडणूकीत काढीत असत. परंतु आता ख्रिस्ती धर्मगुरूही त्याच वाटेने प्रवास करीत आहेत. फरक इतकाच की आता फतव्या ऐवजी पत्रक आणि काॅग्रेस ह्या पक्षाऐवजी इतर सर्व भाजपातेर पक्षांना मतदान करा असे चलाखीने म्हटले आहे. म्हणजे विरोधकांनी एकत्र या. इतकी राजकीय चलाखी करणार्या आर्चबिशपनी कृपया आपला पवित्र झब्बा खाली उतारावा आणि सार्या विरोधी पक्षांच्या आघाडीचं नेतृत्व स्विकारून सरळ राजकीय मैदानात उतरावे. हेच क्षेत्र त्यांच्या मानसिकतेला शोभणारं आहे.
आपल्या देशात हजारो वर्षापासून गुण्यागोविंदाने राहण्याची परंपरा आहे. कूण्या राजाला प्रजेने सूळावर चढविल्याचे वाचनात आलेलं नाही. शक-हूण आले, व इथल्या मातीशी समरस झाले. जे कोणी आज अल्पसंख्यांक म्हणून गणले जातात ते आणि बहूसंख्यांक, म्हणजेच हिंदू समाज गावागावात, शहरा-शहरात परस्पर सहकार्याने व्यवसाय करतात; परस्परांच्या सुखदुःखात सामील होतात. केवळ सत्तेसाठी समाजाची विभागणी का करावी? जे अल्पसंख्याक आहेत ते तर ह्याच भूमीतले. जन्मले येथेच. त्यांची जन्मभूमी व कर्मभूमी पिढ्यान पिढ्या भारतभूमीच राहीली व राहणार. परकीय आक्रमणातून उपासना बदलली गेली असेल, तरी संस्कृती तर भारतीयच राहणार. मग त्यांना अल्पसंख्याक का मानावे? इतर देशात अल्पसंख्याक कोणाला म्हटले जाते हे पाहून आपल्या येथे त्या विषयाची मांडणी करणे उचीत नाही. मला वाटतं जे परकीय नागरिक इथे शिक्षणासाठी तसेच व्यवसायासाठी इथे आले आहेत, अशांनाच फक्त अल्पसंख्याक मानणे उचीत ठरेल. अल्पसंख्याकाचा दर्जा हा देशाच्या लोकसंख्येच्या विधीलिखीत टक्यापेक्षा अधिक नसावा. ह्या कलमाकडेच काँग्रेसने जाणूनबुजून दुर्लक्ष केले. एकदा का आपण सोयी सवलती द्यावयास सुरवात झाली की मग सवय बनते. अधिक सवलतीची मागणी होत जाते. हळूहळू हिंदू समाजातील विविध संप्रदायात व अध्यात्मिक गुरूंच्या शिष्यवर्गात ही स्वतंत्र अस्तीत्व आणि सवलती मागणीचं लोण पसरत जाऊ शकते. आपआपल्या उपासनेचं स्वातंत्र्य उपभोगताना देशाच्या स्वातंत्र्याकडे कानाडोळा करण्याचं पाप आपल्या हातून घडू नये ह्यासाठी प्रथम प्रार्थना करा. मोदींच्या राजवटीत इस्लाम आणि ख्रिस्ती बांधवांना उपासनेत अडथळा झाल्याचं एकही उदाहरण नाही. उलटपक्षी ही मंडळी सार्या विरोधी पक्षांच्या हातातले बाहूले बनले आहेत त्यातून मोदी सरकार विरूध्द नसत्या कुरापती काढीत असतात. ज्या रोहींग्याचा कैवार ह्या पुरोगामी मंडळीनी घेतला त्यांची दुष्टकृत्ये आता उघड होत आहेत. नव्याण्णव हिंदूना ठार मारणार्या आणि हिंदू बायका पोरांचा छळ करणार्या रोहीग्यां संबंधी सहानुभूती दाखवित त्यांना भारतात आश्रय द्यावयाचा आहे मग त्या लोंढ्यात काही आतंकवादी तसेच वहाबी विचारसरणीच्या लोकांना अभय मिळण्याचा धोका असला तरी चालेल! हे केवळ हातातून गेलेली सत्ता मिळविण्यासाठी आहे. सत्तेवर पुन्हा येण्यासाठी लोकांसाठी विधायक काम करण्यासाठी उन्हतान्हात कष्ट करावयाचे नाही. फक्त देशात जात-पात आणि धर्माच्या आधारे लोकांमध्ये वैमनस्य निर्माण करण्याचा शाॅर्टकट स्विकारणे हेच ह्यांचे ध्येय.
दिल्लीस्थित ख्रिस्ती आर्चबिशपंना माझं सांगण आहे की व्हॅटीकनचे सर्वोच्च पोपमहाराज नव्या वर्षाच्या प्रथम दिनी जगाच्या शांततेसाठी प्रार्थना करीत असतातच की! तुम्ही पोपमहाराजाहून मोठे कधी झालात? उगाच लहान तोंडी मोठा घास घेऊ नका. राजकीय स्थितीसंबंधीच्या वक्तव्याचा प्रार्थनेत समावेश करू नका. असे उपद्व्याप केले की सावरासावरी करावी लागते. शिवाय सावरा-सावरी करूनही बहूसंख्यकांकडून तिखट प्रतिक्रीया येणार. म्हणून राजकीय व्यवस्थेसंबंधी मते व्यक्त करताना समाजामध्ये कलह निर्माण होणार नाही अशी दक्षता घ्या. समाज बदलला आहे हे ध्यानात ठेवा. देशभक्ती आणि देवभक्ती यात अंतर असू शकते याचा विसर पडू देऊ नका. देवभक्तीचा उपयोग देशभक्तीकरता होत असेल तरच देवभक्तीला प्रोत्सहान देणे योग्य ठरते. पहीले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरूंनीही मदुराई येथील काँग्रेस अधिवेशानात आयुष्याच्या अखेरीस हे सत्य मान्य केल्याचे वाचनात आले आहे. महात्मा गांधीजींना जेव्हा एका ख्रिश्चन माणसाने विचारले, "तुम्ही सर्व धर्म समान मानता, तर मग तुम्ही ख्रिश्चन का होत नाही?" त्यावर गांधीजींनी उत्तर दिले की, "हिंदू धर्म काही अधिक सांगतो." मग ते अधिक काय असावे? ह्याचं उत्तर खालील प्रमाणे आहे.
'हिंदू समाज, आपला धर्मच परमात्म्याने दाखविलेला एकमेव मार्ग मानत नाही आणि त्यासाठी सबंध जगात तोच एक मार्ग प्रचलीत व्हावा हे उद्दीष्ट तर मुळीच मानत नाही. मुळात धर्म या शब्दाची संज्ञाच सत्य, प्रेम, न्याय ह्यांवर आधारलेली आहे. उपासना पध्दतीवर नाही आणि म्हणूनच भारत जगातील सर्वाधिक सहिष्णु देश म्हणून गणला जातो.' महात्मा गांधीजींना हिंदु धर्मात अधिक जे अभिप्रेत आहे ते हेच होय.
राज्य आणि धर्म यातील नेमके संबंध मांडताना वेणीप्रसाद आपल्या पीएचडी ग्रंथात म्हणतात "What the state or government can do is to ally itself with the forces of good to bring about the conditions favourable to morality and to repress outward immoral conduct". सार्या विरोधी पक्षांनी सत्ता उपभोगली आहे. त्यांनी स्वतःचं आत्मपरिक्षण करून आपण वेणीप्रसादाने मांडलेल्या सिध्दांता प्रमाणे राज्यकारभार केला आहे का? करणार आहोत का? आपलं वर्तन असे राहणार आहे का? इत्यादी प्रश्न स्वतःशीच प्रामाणिकपणे विचारावे. त्यातून उत्तर मिळेल. त्यावर चिंतन करावे. मग २०१९ च्या सार्वत्रिक निवडणूकीला सामोरे जावे. ह्यातच त्यांचं आणि देशाचं भलं आहे.