शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

चित्रपट आणि समाजमन


आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली तरीही अधूनमधून नवीन चित्रपट येऊ घातला कि समाजातील एखाद्या वर्गाच्या भावना दुखावल्या जाण्याच्या घटना घडत असतात. त्यातून निषेध, चित्रपटाचं प्रदर्शन थांबविण्यासाठी थिएटरवर मोर्चा किंवा न्यायालयातून प्रदर्शन थांबविण्यासाठी याचिका दाखल होणं इत्यादी गोष्टी पाठोपाठ येतात. नंतर राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आपआपल्या सोयीनुसार अशा वादात उतरतात. एखाद्या चित्रपटाच्या निर्मीती नंतर वाद उद्भवला कि संबंधित वादी-प्रतिवादी पक्षामध्ये चित्रपट पाहून वादावर चर्चा होते आणि मग चित्रपटातील वादग्रस्त भाग, दृश्यं, संवाद वगळून वा बदल करून चित्रपटांचं थांबविलेलं प्रदर्शन सुरु होते हा आपला अनुभव आहे. मला प्रश्न पडतो तो हा कि एखादा चित्रपट वादाच्या भोवर्यात अडकू नये अशी दक्षता सुरवातीला का घेतली जात नाही?

सध्या हिंदी मधील राणी पद्मावती आणि मराठीतील दशक्रिया ह्या चित्रपटांवरून वाद उद्भवल्याचं पाहतो. ह्या दोन्ही चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाची परवानगी मिळाली असुन दशक्रिया चित्रपट रिलीज झालेला आहे तर राणी पद्मावती ह्या चित्रपटांचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. चित्रपट हे एक समाज प्रबोधनाचं माध्यम तसेच मनोरंजनाचं साधन आहे. चित्रपट निर्मीती हा एक व्यवसायही आहे. जरी ह्या व्यवसायाला उद्योगांचं स्थान दिलेलं नसलं तरी ह्या व्यवसायातील उलाढाल एखाद्या उद्योगा इतकी असतेच. आणि व्यवसायाचं गणित साभांळताना वितरण व्यवस्था, लोकांना चित्रपट भावला पाहीजे ह्यासाठी मार्केटिंग इत्यादी गोष्टी एखाद्या उद्योगाला साजेल अशा प्रकारच्या कराव्या लागतात. ह्या व्यावहारिक सत्याकडे कानाडोळा करून कोणीही ह्या व्यवसायात उतरत नसतो. सर्वसामान्यांमध्ये असा एक वर्ग आहे जो सर्व वाद-विवादापासून स्वतःला दुर ठेवीत असतो, आणि त्याच्या मनाचा कानोसा घेतल्यावर असं समजतं कि काही चित्रपट निर्माते मुद्दामहून वाद निर्माण होईल अशा प्रकारची व्यवस्था निर्मीती पातळीवर करतात, त्यातून चित्रपटाभोवती विनासायास उत्सुकता निर्माण होते आणि बाॅक्स ऑफिस वर मोठा गल्ला जमतो. अशी चर्चा समाजबांधवात होतच नाही असे कसे मानता येईल? तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काचा वापर बहुसंख्यांकाच्या भावनेला ठेच पोहचण्यासाठी उपयोग केला जातो, मग एखादं नाटक असो वा चित्रपट अशी बहुसंख्याकापैकी अनेकांची धारणा झालेली असते. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. 

समाज म्हणजे विविधता. व्यक्ती तितक्या प्रकृती हा निसर्ग नियमच समाजाचा पाया असतो. आणि  ह्या  नियमावलीतच 'दृष्टी तशी सृष्टी' हे तत्वही समावलेलं असते. त्यामुळे कुठलीतरी एक अशी शक्ती आहे जिचं नियंत्रण ह्या विश्वावर आहे तिचं स्वरूप ही विभिन्न वर्गाला, विभिन्न भासते म्हणा वा दिसते. आणि त्यातून धर्म, पंथ, वर्ग, देश निर्माण झाले. ही विविधता कितीही नैसर्गिक असली तरी एकूण मानव समाजाची प्रत्येक देशात जी विभागणी आहे त्यावर जालीम उपाय कुठल्याही देशाला अवगत झालेला नाही. आपआपल्या धर्माविषयी, देशाविषयी, राज्याविषयी, भाषेविषयी, समाजाविषयी, परंपरा व इतिहासाविषयी आदर आणि अभिमान प्रत्येक व्यक्तीला असतो. कुठल्याही  व्यक्तीचं एखाद्या विषयासंबंधीच  मत अथवा  विचार स्वतःला कितीही  उदात्त वाटला तरी  दुसर्या व्यक्तीसाठी घातक वा अपमानास्पद वाटू शकतो. ह्या सिध्दांतातील पहीला भाग व्यक्तीस्वातंत्र्य आणि दुसरा भाग सोयीनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा असा अर्थ काढणं हे ही लोकशाहीच्या मूल्यांशी सुसंगत असू शकत नाही.

दशक्रिया हा चित्रपट रिलीज झालेला आहे. लोकांनी पाहिला आणि पाहात ही आहेत. पुरोहित वर्गाचे म्हणणं असे आहे कि  चित्रपटातील एका संवादातून  पुरोहित  मंडळी अंत्येष्टी विधीच्या माध्यमाद्वारे समाजाला लुटत असतात, असे दाखविण्यात आले आहे. त्यामुळे पुरोहित वर्गाची जाणूनबुजून प्रतिमा डागळलेली आहे. तर निर्मात्याचं म्हणणं असे आहे की त्यात आक्षेपार्ह काही नाही, असे म्हणत पुरोहित वर्गाने चित्रपट पहावा, अशी सुचना केली आहे. ही बाब ABP न्यूज चॅनेलवरील चर्चेच्या कार्यक्रमातून समजली. जे सद्गृहस्थ त्या कार्यक्रमात पुरोहित वर्गाचे प्रतिनिधित्व करीत होते त्यांनी मुद्दा रेटत असं  म्हटलं  कि   पुरोहित  समाज सहिष्णु ,  असंघटीत, अल्पसंख्याक    असल्यामुळेच  निर्मात्याने   पुरोहित  वर्गाला  लुटारू दाखविण्याचं धाडस केलं आहे; समाजातील संघटीत असलेला घटकाचे दोष दाखविण्याचं धाडस निर्माते का करीत नाहीत?". मी प्रत्यक्ष टिव्ही वरील ABP न्यूज चॅनेल वरील शो पाहीला आहे. त्यातून पुरोहित वर्गांचं प्रतिनिधित्व करणार्या व्यक्ती ने जो मुद्दा मांडला त्यामध्ये तथ्य नाही असे म्हणायचं धाडस मी करू शकत नाही. चित्रपट निर्मीती हा जसा निर्मात्याचा व्यवसाय आहे तसा पौरोहित्य हा ही एक व्यवसाय आहे. हा युक्तिवाद पटण्यासारखा आहे. कारण आजच्या आर्थिक जगात फक्त सरकार काहीतरी फुकट देऊ शकते, बाकी कुणी नाही. प्रबोधनकारही आपल्या व्याख्यानाचं  मोठालं मानधन घेत असतात. विद्यार्थ्याचं, युवकाचं, जेष्ठ नागरिकासाठी समुपदेशन करणारे तज्ञही कमी मानधनात व्याख्यान देत नाहीत. (इथे मानधन हा शब्द वापरला जात असला तरी अर्थशास्त्रीय भाषेतील One man's expenditure is  another man's income हा सिद्धांत प्रत्येक आर्थिक व्यवहारास लागु होतो) समाज व्यवस्थेमध्ये जे काही काळानुसार बदल होतात ते स्विकारल्या शिवाय गत्यंतर नसते. प्रत्येकजण आपापल्या व्यवसायात नफ्याचं गणित ध्यानात ठेवत असतो. आणि ह्या कारणास्तव पुरोहित वर्गाचा आक्षेप खोडून टाकण्याचं धैर्य मी दाखवू शकत नाही. समाज व्यवस्थेतील दोष निवारण करतानाही सर्वच समाजबांधवात एकाच वेळेस एकमत होणे शक्य नसते. समाज सुधारणा ही निरंतर प्रक्रिया आहे. मानवी उत्क्रांतीच्या काळापासून जगभरच्या विविध संस्कृतीत दोष असुनही प्रत्येकास आपआपल्या संस्कृतीचा अभिमान असतो. तो वृथा कि रास्त ह्यावर कुठलेही न्यायालय निवाडा देऊ शकत नाही, फार तर ते आपलं मत दर्शविल. म्हणून सर्वच बाबतीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काचा उपयोग सावधपणे करणं उचीत असते. कारण चुकून त्या हक्काचा  हत्यार म्हणून वापर होऊ शकतो. आणि तसं होऊ नये असेच आपल्या देशाच्या घटनाकारांंना अभिप्रेत होतं. 

मग चित्रपटासंबंधीच्या वादात निवाडा कोणी द्यावा? अर्थात सेन्सॉर बोर्डाने. सर्वच चित्रपटांविषयी वाद उद्भवतात असे आपल्याला अनुभवयास आलेले नाही. ह्याचा अर्थ एकतर बहुतांश चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या संमंतीस खरे उतरलेले असतात आणि तेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखून. दुसरे असे की काही चित्रपट पब्लिक डोमेन मध्ये येण्या अगोदरच सेन्सॉर बोर्डाकडून सुचवलेले बदल स्विकारून प्रदर्शित होत असतात. काही वेळा सेन्सॉर मंडळाला एखाद्या चित्रपटातील  दृष्यावर, गाण्यावर किंवा संवादांवर समाजाच्या एखाद्या गटाचा आक्षेप येईल असा अंदाज येतोच असे नाही. किंवा आला तरी चित्रपट निर्मात्याशी असलेल्या सलगी मुळे, वा त्या निर्मात्याचं समाजातील स्थान, व्यवसायातील अनुभव, यश इत्यादी कारणांमुळे आक्षेपार्ह भाग आहे कि नाही हे पाहण्याची तसदी सेन्सॉर बोर्डावरील मंडळी घेत ही नसावीत. आणखीन एक शक्यता म्हणजे सेन्सॉर बोर्डावरील मंडळीकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलं जाण्याची. ह्याचं कारण व्यवस्था. व्यवसाय म्हणा वा उद्योग ह्या संबंधीचे परवाने हे सरकारकडून प्राप्त होत असतात. आणि जगातल्या प्रत्येक देशात मग राजवट कुठल्याही प्रकारची असो Vested Intrest always play the final role; मग राजकीय पक्ष एकमेकांवर Crony Capitalists किंवा पक्षपाती  असा आरोप करीत का असेना; सर्वच घोडे बारा टक्के. म्हणून मला वाटते कि भली- मोठाली रक्कम गुंतवून अपार कष्ट उपसून निर्माण केलेल्या चित्रपटातील कुठला भाग आक्षेपार्ह ठरू शकतो हे निर्माता आणि दिग्दर्शक ह्या द्वयींना अंदाज येत असतो, तेव्हाच तो भाग वगळला तर चित्रपट वादात अडकणारच नाही. जर कथा, पटकथा, संवाद, पार्श्वसंगीत, नृत्य, कलाकारांचा अभिनय इत्यादी अंगाने चित्रपट सुंदर असला तर बाॅक्स ऑफीस वर यशस्वी होत असतो की . 

राणी पद्मावती हा चित्रपट रिलीज व्हावयाचा आहे तर दशक्रिया हा चित्रपट मी पाहिलेला नाही. तरी मी हा लेख लिहित आहे. परंतु हा माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे म्हणून नाही. वाचकांनी कृपया माझ्या ब्लॉग वरील   'स्वतंत्रता आणि आपण ' तसेेेच 'पराधीन आहे जगती पुुत्र मानवाचा'  हे लेख वाचावेत. मी  नम्रपणे  सांगतो कि राणी पद्मावती ह्या चित्रपटासंबंधीच्या याचिकेवर सन्माननीय न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाकडे जावे असा आदेश दिल्यावर तसेच ABP न्यूज वर श्री प्रसन्न जोशी ह्यांनी अंत्यत संयमीत रितीने हाताळलेल्या दशक्रिया ह्या चित्रपटाभोवतीच्या वादंगा संबंधी चर्चेचा कार्यक्रम पाहिल्यानंतर मला हा लेख लिहिण्याची ऊर्मी आली. दशक्रिया ह्या चित्रपटासंबंधी मी इतकंच सांगु इच्छितो कि सध्या मृत्युनंतर देहदान करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना महाराष्ट्रातही प्रतिसाद मिळू लागला आहे. आणि त्यातही पुरोहित वर्ग ज्या समाज घटकात मोडत आहे, त्या घटकातील लोकांनी ही देहदान केलेलं आहे. काळानुसार बदल स्वीकारण्याची तयारी समाज दाखवित आहे, भले धिम्या गतीने असेना का! हे ही चित्रपट निर्मात्यांनी ध्यानात ठेवले असते तर बरे झाले असते. पुरोहित वर्गाचा आक्षेप "समाजाची लूट ते करतात" असा संवाद चित्रपटात दाखविला आहे, ह्यावर आहे. असे एकंदरीत दिसते. बदलत्या काळानुसार समाजातील श्रध्दा, पंरपंरा , ह्यात बदल सुचविणे ही वेगळी गोष्ट आहे, परंतु एकूण हिंदु समाजातील सर्वच टाकाऊ प्रथेला फक्त पुरोहित वर्गाला जबाबदार धरणं ह्याचा अर्थ सारा समाज बुरसटलेल्या विचाराचा मानला असेच ओघाने येते की. आजच्या युगात माझी कोणी लूट करतोय ह्यात माझा दोष आहेच ना! ABP न्यूज चॅनेल वर झालेल्या कार्यक्रमात दशक्रिया चित्रपटाचे बहुधा निर्मातेच ते असावेत त्यांच्या म्हणण्यातही तथ्य, प्रामाणिकपणा मी अनुभवला आहे. मी स्वतः पुण्यातील ज्ञान प्रबोधनीचे शिबीरं पाहीले आहेत. त्या संस्थेने हिंदू समाजातील सोळा संस्कारासंबंधी काळानुसार आवश्यक ते बदल करून धर्मशास्त्रीय तत्व अबाधित ठेवून तयार केलेल्या पुस्तिका वाचल्या आहेत आणि आदराने त्या पुस्तिका मार्गदर्शिका म्हणून संग्रही ठेवल्या आहेत. त्यामुळे दशक्रिया चित्रपटाच्या निर्मात्या बद्दल तसेच चित्रपट प्रदर्शन सर्टिफिकेट देणार्या सेन्सॉर बोर्डाबद्दल मला आदर नाही असा समज कृपया करू नये. गेल्या पाच सहा वर्षापासून मराठी चित्रपट सृष्टी बहरत आहे. त्यामुळे एखाद्या चित्रपटावरून वादंग माजणे एकूण मराठी समाजाला हानीकारक ठरू शकते. निर्मात्याला जो काही संदेश दशक्रिया चित्रपटाद्वारे द्यावयाचा आहे तो आक्षेप घेणार्या वर्गापर्यंत पोहचावा, ह्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा आणि ह्या वादावर लौकरच परस्पर सहमतीने तोडगा निघावा हीच माझी इच्छा आहे. तसेच होवो अशी मी प्रार्थना करतो. 

आता राणी पद्मावती ह्या चित्रपटासंबंधी चर्चा करू या. त्या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडले आहे . त्यातला कुठला भाग राजपूतांना आक्षेपार्ह वाटला आहे ह्या संबंधीची माहिती त्रोटक स्वरूपात ऐकू आली आहे. एखाद्या चित्रपटाचीच नव्हे तर कुठच्याही प्रकल्पाची निर्मिती असो समाजातला एखादा वर्ग जरी त्यावर नाराज, किंवा दुःखी असेल तर आपली निर्मीती ही सर्वसमावेशक नाही, हे जाणणे हेच निर्मात्याच्या मनात लोकशाहीचं बीज रूजल्याचं लक्षण आहे. आपल्या शरीराचा एखादा अवयव दुखत असेल तर शरीराच्या इतर अवयवांच्या क्षमतेला हानी पोहचत असते. समाजातील एखाद्या घटकाला पीडा होत असेल तर संपूर्ण समाजरूपी शरीराला पीडा होत नाही अशी समजूत आपण कशी काय करू शकतो? अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पलिकडचा हा विचार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यच नव्हे सर्व प्रकारांच्या स्वातंत्र्या सोबत आपली जबाबदारी, आणि कर्तव्यें आलेली असतात. सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयामुळे समाजातील एकाद्या घटकाला सतत आपल्यावर अन्याय होत आहे अशी भावना बळावत जात असेल तर ती बाब लोकशाही व्यवस्थेला शोभणारी थोडीच असते? ह्याचा अर्थ राणी पद्मावती ह्या चित्रपटासंबंधी ऐकू येणारा विरोधी आवाज सभ्यता ओलांडीत आहे ह्याचं मी समर्थन करीत आहे असे कृपया मानू नये. लोकशाही राज्यप्रणालीत आपलं मत मांडतांना हेकेखोरपणाला स्थान नसते. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या ढोल पिटविण्याचा मक्ता काही मुठभर विचारवंतानांच आहे, हे ही सर्वमान्य होत नाही. इतिहास हा नेहमी जेता लिहित असतो आणि सदा सर्वदा तोच रहावा असा अट्टाहास ब्रिटिश राजवट उखडून गेल्यानंतर स्वतंत्र झालेल्या देशात किती काळ चालू ठेवावा ह्याला ही मर्यादा ठरवायला हव्यात कि नको? युरोपियन देशातील प्रबोधन चळवळीचा काळ हा आपल्या भारतीय समाजाला आपत्तीकारक होता असे माननणार्यापैकी मी नाही. ज्यांनी प्रगतीच्या वाटेवर पाऊल ठेवलं आहे त्यांच्यासाठी, इतर देश वा संस्कृती मधील चांगल्या गोष्टी स्वीकारणे ही महत्त्वाची अट आहे असेच मानले पाहिजे. विज्ञानाची कास धरल्यामुळे आपल्या समाजाचाही विकास झाला. हे ही सत्य. परंतु ज्या युरोपियन देशात प्रबोधनाची चळवळ यशस्वी झाली, त्या देशांची साम्राज्यवादाची लालसा प्रबोधन काळानंतरही संपुष्टात आली नव्हती हा इतिहास आहे. ज्या ज्या देशावर त्यांनी राज्य केले तेथील जनतेवर अनन्वित अत्याचार केले कि नाही? तेथील जनतेवर आपली संस्कृती ,आपली भाषा आपला धर्म, बळजबरीने लादले की नाही? प्रबोधन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कैवाराचे पाईक म्हणणार्या प्रगत देशांची इतर विकसित आणि विकसनशील देशांच्या अंतर्गत कारभारात नाक खुपसण्याची सवय सुटली आहे का? जर ह्या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी असतील तर जागतिकरणाच्या प्रवाहासाठी आपल्या घराची दारे, खिडक्या, उघड्या ठेवल्या आहेत म्हणून आपल्या घराचं छप्पर उडवण्याची गरज आहे का  ह्यावर ही विचार व्हावा. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले त्यांनीही आपल्या देशाच्या इतिहासातील थोर पुरूषांच्या चरित्रातूनच स्फुर्ती घेतली. आणि अशा थोर पुरूषांचे आणि स्त्रियांचे गोडवे गाणे ही सुद्धा स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी एक अट आहे असेच मानले पाहिजे. तरच देश सामर्थशाली बनु शकतो. कुठलेही क्षेत्र असो, मग चित्रपट असो वा क्रिडा, शेती असो वा व्यवसाय, शिक्षण असो वा तंत्रज्ञान, संरक्षण असो वा उद्योग आपलं स्व अबाधित ठेवूनच स्वातंत्र्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करावयास हवा. आणि त्यासाठी सर्व समाजबांधवात वाद-विवाद नको, सहमती होणे गरजेचं आहे. हाच उपाय सध्या चित्रपटावरून होत असलेल्या वादावरही लागू आहे. आणि तोच उपाय वादी-प्रतिवादी पक्षाने आतापर्यंत झालेल्या  अशा प्रकारच्या वादंगात अंमलात आणलेला आहे. राणी पद्मावती चित्रपटाच्या बाबतीत ही तोच उपाय अंमलात येईल अशी आशा बाळगू या.

रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

महाराष्ट्र मध्यावधी निवडणूकीच्या मार्गावर?


अलिकडे शिवसेना कार्याध्यक्ष श्री उद्धव ठाकरे ह्यांनी श्री शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूकीची हवा आहे अशी समजूत अनेकांची झालेली दिसत आहे. परंतु विधानसभेच्या निवडणुका कधी होतील ह्याबाबतचा अंदाज कोणी वर्तवू शकत नाही. असे असले तरी भाजपाचा द्वेष करणारे सेनेचे तसेच विरोधी पक्षांचे काही कार्यकर्ते चर्चेच्या ओघात आपआपसांत कमालीच्या  शक्यता  वर्तवित आहेत. त्यापैकी एक म्हणजे दोन्ही काॅग्रेस पक्ष बाहेरून पाठींबा देऊन शिवसेना सरकार स्थापन करू शकते. किंवा शिवसेना सत्तेतुन बाहेर पडणार आणि निवडणूका येणार ही दुसरी शक्यता. परंतु सध्यातरी ह्या शक्यता प्रत्यक्षात उतरविण्याचं धाडस वरील तिन्ही पक्ष करणार नाहीत. कारण गुजरात निवडणूकीत भाजपचा पराभव होईल कि नाही ह्याबाबत हे पक्ष साशंक आहेत. तसेच महाराष्ट्रात भाजपाचा सपशेल पराभव होईल इतका असंतोष जनतेत दिसत नाही. त्यामुळे दोन्ही शक्यताबाबत चर्चा करणं निरर्थक आहे. म्हणून महाराष्ट्रातील सद्य राजकीय स्थितीवरून श्री उध्दव ठाकरे आणि श्री शरद पवार ह्यांच्या मधील भेटीचा काय अर्थ निघतो ह्यावर चर्चा करू या. 

कुठल्याही दोन राजकीय पक्षाच्या नेत्यांची भेट, त्यातच ती भेट सत्तेतील भागीदार पक्षाच्या सर्वोच्च नेत्याची, विरोधी पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांशी असली तर राज्य वा केंद्र सरकार असो त्याच्या स्थिरतेसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित होणे साहजिकच आहे. महाराष्ट्रात सरकार पक्षाचा घटक शिवसेना सतत भारतीय जनता पक्षावर टिका करीत आहे. शरद पवारांचा पक्ष आणि काॅग्रेस ह्या दोन्ही पक्षांना भाजपा सरकार पाडता येणं शक्य नाही. ह्या दोन्ही पक्षाची अट तसेच इच्छा शिवसेनेने सरकारवर अविश्वास ठराव आणावा, अशीच असणार. आणि शिवसेनेला ते शक्य होईल असे दिसत नाही. म्हणून वेळोवेळी महाराष्ट्रातील सरकारवर जे अस्थिरतेचं सावट दिसत असते, त्याला कारणीभूत उध्दव ठाकरेंंची मनोवृत्ती आहे.  कोण्या एके काळी विरोधी पक्षाशी संधान बांधून वसंतदादांच  सरकार पाडले होते, म्हणून शरद पवारांचा हात असेल असा अंदाज बांधण्यात काही तथ्यांश दिसत नाही. राज्य सरकारवर अस्थिरतेचं सावट उध्दव ठाकरेंंच्या  धरसोड वृत्ती मूूळेच येत आहे. काही अंशी उध्दव ठाकरेंचा अहंकार, काही अंशी श्री शरद पवारांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी देऊ केलेला बिनशर्त पाठींबा तसेच सेनेतील आमदारांत सत्तेत सामील व्हावयाचं कि नाही ह्याबाबत पडलेले दोन तट इत्यादी कारणांमुळे उध्दव ठाकरे सत्तेत सामील होतेवेळी  धरसोड वृत्तीत अडकले होते. त्यातून त्यांना बाहेर येणं अजूनही जमलं नाही. सत्तेत सामील झाल्यानंतर महत्वाची खाती (अर्थात अर्थरूपी) मिळाली नाही, त्यामुळे शिवसेनेची कुचंबणा वाढत गेली. शरद पवारांनी निवडणूक निकाल पूर्ण येण्या अगोदरच भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी बाहेरून पाठींबा जाहीर केला. त्यामुळे मोदी-पवार ह्यांच्यात असलेल्या मैत्रीच्या गवगवाचा फायदा घ्यावा, आपणच सरकारवर टिका करीत रहावे, विरोधी पक्षाची स्पेस ही घ्यावी आणि योग्य वेळ येईल तेव्हा सरकारचा पाठिंबा काढून मध्यावधी निवडणूकीला सामोरे जावयाचे अशी व्यूहरचना उद्धव ठाकरेनीं आखली. परंतु त्याचा फारसा फायदा शिवसेनेला झाला नाही. हे मुंबई तसेच इतर पालिका निवडणुकीत भाजपाला यश मिळाल्यानंतर सिध्द झाले आहे. फडणवीस सरकारला तीन वर्षे पुरी झाली तरी शिवसेना सरकारमध्ये आहेच. 'आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो' असं व्यक्तव्यं सेनेच्या मंत्र्यांच्या मुखी सदैव असायचं, त्याची  काॅग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांनी वेळोवेळी खिल्ली उडवली. राज ठाकरे तर सेनेला  सत्तेसाठी  लाचार असेच  हिणवितात.  अनेेकांनी सोशल मिडीयावर ही खिल्ली उडवली. ह्यापेक्षा मोठी कुचंबणा वा चेष्टा कुठली असु शकते. सेनेचे गल्लीबोळातील सैनिक काय करणार ?  फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खालच्या पातळीवर टिका करण्यातच शौर्य गाजवत आहेत. अर्थात प्रत्येक विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याकडे सध्या तरी तेच एकमेव  काम हाती राहीलं आहे. म्हणून आपल्या पक्षाच्या नेत्याची समदुःखी(समविचारी ह्या शब्दाचं मोदी लाटेत बदलेलं नाव) पक्षाच्या नेत्यांशी भेट झाली कि ह्यांना वाटतं कि आता फडणवीस सरकार गडगडणार. परंतु पुन्हा पुन्हा शिवसेना सत्तेपुढे गुडघे टेकविते हाच अनुभव त्यांना येतो आणि त्यातून नैराश्य पदरी पडते. असं वारंवार नैराश्य पदरी येण्यामुळे वरील तिन्ही पक्षांच्या  कार्यकर्त्यांची विशेषकरून शिवसैनिकांची शक्ती उगीच  खच्ची  होत असते. आणि त्यातून तिन्ही पक्षांच्या कार्यकर्ते आणि नेत्यांना भाजपवासी व्हावयाचं वाटलं तर नवल वाटायला नको. शेवटी सत्तेचा मोह फक्त मोठ्या नेत्यानांच असतो असे नाही तर राजकीय पक्षांच्या प्रत्येक पातळीवरील नेते, कार्यकर्ते ह्यांना ही असतो. सत्तेपुढे शहाणपण नसते. हेच खरं.


अलीकडे शिवसेनेने मनसेेचे मुंबईतील नगरसेवक फोडून मनसेवर अन्याय केला अशी भावना मराठी लोकांत झाली. त्यातून श्री राज ठाकरे भोवती सहानुभूती निर्माण झाली. त्याचा योग्य तो फायदा उठविण्यासाठी अकस्मात रित्या राज ठाकरेनीं मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांच्या त्रासातून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी मनसे स्टाईलने अंदोलन छेडले. त्यात यश ही मिळत गेलं. आज राज ठाकरेंच्या सभांना लोकांचा उत्स्फूर्त पाठींबा मिळत असल्याचे आपण पाहात आहोत. त्यामुळे मराठी मतदारांचा वाटा मनसे वाढवित आहे. हेच मोठं आव्हान शिवसेने पुढे उभे राहिले आहे. मनसेला सध्या मिळत असलेला पाठींबा आणि त्यातच भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारनी अलिकडे श्री राज ठाकरेंची घेतलेली भेट शिवसेनेला संभ्रमित करणारी ठरली. काॅग्रेसनेही संजय निरूपमनां मैदानात उतरावून अमराठी फेरीवाल्यांच्या समर्थानर्थ दंड थोपाडले. त्यामुळे शिवसेना प्रिन्ट, इलेट्राॅनिक्स आणि सोशल मिडीयातून बाहेर फेकली गेलेली दिसत आहे. त्यामुळेच उध्दव ठाकरेनीं शरद पवारांकडे भेट घेऊन भाजपावर काही दबाव पडतो का ह्याची चाचपणी केली असावी किंवा उध्दव ठाकरे स्वतःवर वाढलेल्या दबावाखातर बाळासाहेबांचे मित्र शरद पवारकाकाकडे गेले असावेत. ह्या पलिकडे त्या भेटीतून फारसं काही घडेल असे संभवत नाही. कारण सध्या पवारांना स्वतःच्या पक्षाची कमी होत असलेले बळ भेडसावत आहे. तसेच उध्दव ठाकरे ह्यांच्या पक्षाशी युती करणं त्यांना राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात अडचणीचे आहे. आणि ही बाब उध्दव ठाकरे जाणत नाहीत असे ही नाही. परंतु शिवसैनिकांची सत्तेतुन बाहेर पडण्याची इच्छा अवसानघातकी असल्यामुळे  श्री उध्दव ठाकरेंवर  दबाव वाढत  राहतो. शिवसैनिकांची इच्छा अवसानघातकी आहे, त्यामागे  दोन कारणे आहेत. एक राज ठाकरेंचं Challenging Come Back आणि मराठा मोर्चासंबधी सेनेने सुरवातीला केलेलं व्यक्तव्य. कारण  खालच्या पातळीवर काम करण्यार्या मराठा शिवसैनिकाला मराठा मोर्चासंबंधीचं वाटलेलं आकर्षण लपून राहीलेलं नाही. कोण जाणो मराठा मोर्च्याचं राजकीय पक्षात रूपांतर झालं तर? गुजरात मधील पटेलाचं, राजस्थान- हरियाणा मधील गुर्जर आणि जाटाचं, महाराष्ट्रातील मराठाचं आरक्षणासाठी होत असलेली अंदोलने ही राजकीय दृष्ट्या सर्वच पक्षांना अडचणीचे ठरणार आहेतच. कारण न्यायालय हे संविधान प्रमाण मानणार. त्यांना लोकांच्या आरक्षणाच्या बाबतीतल्या भावनांशी काही देणं-घेणं नसते. आपणच लोकांच्या भावना चेतावयाच्या आणि त्यावर राजकीय पोळी भाजून घेण्याची राजकीय पक्षांची खेळी निंदनीय तशीच धोकादायक आहे. एकविसाव्या शतकातील महासत्तेचं स्वप्न पाहात असलेल्या आपल्या देशात एकामागून एक अशा सर्वच प्रान्तात ही आरक्षणाची लागण लागली तर आपलं काही खरं नाही असेच अत्यंत कष्टी मनाने म्हणावयासं वाटतं. 

मागे मी एकदा म्हणालो आहे कि शिवसेनेला छोट्या भावाची भूमिका निभावणे फार कष्टदायक वाटते. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालतील आकडेवारी शिवसेनेच्या अंदाजानुसार नव्हती. निकाल बाहेर येत असतेवेळीच शिवसेनेने भाजपचं अभिनंदन करून सरकारला पाठींबा दर्शविला असता तर शरद पवारांना पाठींबा दर्शविण्याची संधी मिळाली नसती. शरद पवारांच्या पक्षाचा पाठींबा घेऊन भाजपाला सरकार स्थापणे शक्य नव्हतंच. इतकं स्पष्ट दिसताना शिवसेनेने सत्तेत सामील होण्यासाठी दिरंगाई केली ती शिवसेनेला मारक ठरली. मुळात भाजप स्वबळावर सरकार स्थापन करू शकणार नाही ह्याचा अंदाज श्री शरद पवारांना उध्दव ठाकरेपेक्षा लौकर आला. त्यातून त्यांनी शिवसेनेच्या अगोदरच भाजपला पाठिंबा दर्शवून केवळ शिवसेनेचीच नव्हे तर भाजपाचीही गोची केली. भाजपाने एनसीपीचा पाठींबा घेतला नसला तरी भाजपा आणि एनसीपी मध्ये गुप्त संगनमत आहे अशी चर्चा निर्माण करण्यात तरी शरद पवार यशस्वी झाले. अशा प्रकारच्या चर्चेमुळे शिवसेनेला सत्तेत राहूनही भाजपावर टिका करणे आवश्यक भासलं. शिवसेना म्हणजे सर्वात लोकहितकारक पक्ष आहे असे उध्दव ठाकरे भासवत असले तरी त्यावर लोकांचा विश्वास बसत आहे असे काही दृष्टीस येत नाही. सामना वृत्तपत्रात तसेच उध्दव ठाकरे करीत असलेली सरकारवरली टिका फार तर शिवसैनिकांना सतत चेतवत ठेवण्यासाठी मदतगार ठरत असेल परंतु सरकारमध्ये राहून केंद्र आणि राज्य सरकारवरील टिका शिवसेनेला मारक ठरणार असा अंदाज मी वर्तविला होताच. सध्या मनसेला मिळत असलेल्या लोकांच्या पाठींब्यावरून हा अंदाज खरा ठरत आहे असे दिसते. कारण महाराष्ट्रातील शहरात अनधिकृत फेरीवाल्यांमध्ये बिगर मराठीवाल्यांची संख्या अधिक असु शकते ह्याचा अभ्यास राज ठाकरेंनी केलेला असावा. आणि त्यातून मराठी माणूस आपसुक सुखावला जात आहे. सध्या शिवसेनेची 'ना भाजपचा, ना विरोधी पक्षांचा मित्र. ना सत्ताधारी ना विरोधी पक्ष!'. अशी अवस्था शिवसेनेची झाली आहे. आणि त्यात मराठी मतांचा भागीदार असलेला मनसे फार चर्चेत आहे. त्यामुळे शिवसेना दिशाहीन होत आहे. शिवसेनेला ना भाजपावर उगारलेले शस्त्र म्यान करता येते, ना  तिच्याकडे विरोधी पक्षांची मोट बांधण्याची कुवत. त्यामुळे "शिवसेना विकासाच्या मार्गात अडथळे उभे करीत आलेली आहे त्यामुळे सरकार चालविणे अशक्य बनले " असे जाहीर करीत, योग्य वेळी विधानसभा विसर्जित करून मुदतपूर्व निवडणुकीला सामोरे जाणं हे भाजपलाच अधिक श्रेयस्कर आहे असेच मला दिसत आहे. असे असले तरी भाजप पाच वर्षे पूर्ण करण्यावर भर देईल आणि तशी बहुमतासाठी पाठींबा देणारे आमदार मिळण्याची सोय भाजपकडे असावी. पण पाठींबा काढून स्वतः सरकार स्थापन करणे आता तर सेनेला आत्मघातकी ठरेल. आणि तसं केलं तरी राष्ट्रपती राजवटीचं भय समोर उभे ठाकणारच ना! त्यामुळे सेनेच्या नेेत्यांच्या विरोधी पक्षाच्या  नेत्यांशीं परस्पर किती भेटी होवो, महाराष्ट्र सरकार किती स्थिर वा अस्थिर ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त भाजपच्या हातात आहे. आणि हेच महाराष्ट्रातील वर्तमान राजकीय स्थितीवरील भाष्य अचुकतेच्या जवळपास जाणारं आहे असे वाटते.

बुधवार, १ नोव्हेंबर, २०१७

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा


अलिकडे WhatsApp वर एका ग्रुप वरून पोस्ट आली होती; त्यात म्हटले होते कि "जीवनात अर्धे दुःख चुकीच्या माणसावर विश्वास ठेवल्याने येते, तर बाकीचे अर्धे दुःख खर्या लोकांवर संशय घेतल्यामुळे येते". WhatsApp वरील ही पोस्ट चुकीची नाही. कारण व्यवहारी जगात विश्वासघाताचा प्रसंग सामान्यतः प्रत्येक व्यक्तीला अनुभवास आलेला असतो. तसेच सच्च्या माणसांवर संशय घेतल्याने स्वतःचेच नुकसान झाल्याचा अनुभवही प्रत्येक व्यक्तीस आलेला असतो. हे मान्य करीत त्या पोस्ट वर मी माझं मत मांडले ते असे, "आपण चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवतो ही आपली चूक आहे तसेच खर्या माणसांवर संशय घेतो तीही आपली चूक असते; After all man is a servant of circumstances ".

मी माझं मत नोंदविल्यानंतर लागलीच, मला माझेच मत    अपूर्ण वाटू लागले. मग विचारचक्र सुरू झालं. त्यातूनच हा लेख आकारास आला. म्हणून वरील पोस्ट ज्या व्यक्तीने WhatsApp वर पाठविली त्याने मला उपकृतच केले आहे, असेच मी मानतो. ब्लॉग वर लिहणं हे मी संवाद मानतो. संवादातून लेखनासाठी विषय सुचतात. ख्यातनाम लेखिका आणि मानववंशशास्त्रज्ञ इरावती कर्वे 'युगान्त' ह्या पुस्तकातील प्रस्तावनेत सांगतात, "आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटते ते इतरांना सांगावे ही एक दबून न राहणारी प्राथमिक प्रवृत्ती आहे". इरावतीमॅडमचं  म्हणणं  इतकं खरं आहे कि सामान्यतल्या सामान्य व्यक्तीमध्ये असलेल्या ह्या प्रवृत्तीला संवादातून तसेच लिखाणाद्वारे न्याय मिळतो. "प्रतिपदा संवादाची" ह्या माझ्या पहील्या लेखातच मी ही बाब कबूल केलेली आहे. संवादातून जीवनाला गोडी प्राप्त होत असते. संवादात आपण स्वतः व्यक्त होत असताना,समोरच्या व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मान राखण्यासाठीचा संयम म्हणा वा सकारात्मक प्रतिसाद देण्याची सवय आपसुक आपल्या अंगात भिनते. हे लोकशाहीच्या मूल्याशी सुसंगत आहे. आणि लोकशाही हीच आजच्या सुसंस्कृत मानवाला सर्वात साजेशी अशी राज्यप्रणाली आहे. कारण ''जशी दृष्टी तशी सृष्टी" आणि ''व्यक्ती तितक्या प्रकृती'' इत्यादी नैसर्गिक सिध्दांतांच्या जवळपास जाणारी ती एकमेव अशी राज्यप्रणाली आहे. असो. आता आपण मूळ विषयाकडे येऊ या.

To err is human being. जो चुकतो, तो माणूस. असे जे म्हटले जाते ते चुकीचे नाही. अगदी आपणास वंदनीय असलेल्या थोर पुरूषांच्या हातून चूका झालेल्या आहेत हे ही आपल्या वाचनात आलेले आहे. साधारणतः हातून  होणार्या चुकासंबंधी चर्चा करते वेळी कुठल्या परिस्थितीत त्या चुका होतात ह्यावर फारसा विचार करण्याचा प्रघात नसतो. ज्यांच्या हातून किंवा ज्यांच्यामुळे चुका झाल्या त्यांना जबाबदार धरण्याची ही एक सहज मानवी प्रवृत्ती आहे. एखाद्या व्यक्तीने आपला विश्वासघात केल्यामुळे आपलं नुकसान होते किंवा आपल्याला एखाद्या कार्यात अपयश येते. हे अगदी बरोबर आहे. परंतु जेव्हा आपण विश्वासाने काही काम सोपवितो तेव्हा ती व्यक्तीच चुकीची आहे, हे लक्षात आलेलं नसते. त्यामुळे चुक ही अप्रत्यक्षरित्या आपलीच असते, नाही का. म्हणून मी माझ्या पोस्ट मध्ये प्रांजळपणे मांडले कि व्यक्ती निवडण्यात आपली चूक होते. परंतु माझं हे मत ही पूर्णतया बरोबर नाही. कारण एखाद्यावर आपण विश्वास ठेवतो, तेव्हा कुठलीतरी परिस्थिती जिच्यावर आपलं नियंत्रण नसते, ती आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर कब्जा मिळवित असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यावर विचार करता करता सविस्तर रित्या माझं मत मांडण्याचा हा खटाटोप करीत आहे.

आता त्या पोस्टच्या उत्तरार्धाकडे वळू या. खर्या माणसांवर संशय घेतल्यामुळे आपल्या पदरी दुःख येते. हे ही खरेच आहे. परंतु ह्या ठिकाणीही आपण संशय का घेतो, किंवा कुठल्या परिस्थितीत संशय घेतो ह्यावर चर्चा केल्याशिवाय ठोस अशा उत्तरापर्यंत आपण पोहचू शकणार नाही. आदीमानव समूहात का राहात होता? असुरक्षिततेची भावना हा दोष वा वैशिष्ट्य माना, परंतु ती जन्मतः माणसांमध्ये विराजमान असते. त्यातूनच संशय नावाचं भूत माणसाच्या मानगुटी वर सतत बसलेले असते. अतीसावधनेतूनही संशयवृत्ती जन्मास येते हे सत्य आपण नाकारू शकतो का? विशेषतः आर्थिक व्यवहारात कोणातरी व्यक्तीवर संशय येणे वा त्या व्यक्तीवर भरवसा न ठेवणे हे ही नैसर्गिक आहे. परंतु अशा व्यक्ती खरोखरीच खर्या आणि प्रामाणिक असतात, असा निष्कर्ष काढणे हे ही धाडसाचे ठरते. परंतु आपण तसे करतो. ह्याचं कारण ज्यांच्यावर आपण संशय घेतला, त्या व्यक्ती वाईट आहेत असं अनुभवयास आलेलं नसल्यामुळे आपल्यामध्ये एक अपराधपणाची भावना बळावत असते. आणि त्यातून त्यांच्या प्रती एक सहानुभूती निर्माण होते. खरं पाहता जेव्हा आपण अशा व्यक्तींशी व्यवहार करू आणि आपला विश्वासघात झाला नाही असा प्रत्यय आपल्याला येईल तेव्हाच त्यांना प्रामाणिकतेचं सर्टिफिकेट देणे योग्य होईल, असे मला वाटते.

सारांश असा की विश्वास आणि संशय ह्या परस्पर विरोधी गोष्टी असल्या तरी आपल्या मनात त्या जन्मतः विराजमान असतात. फक्त विश्वास कोणावर ठेवायचा आणि संशय कोणावर घ्यावयाचा हा प्रश्न सोडवता येणे आवश्यक असते. परंतु त्यात सर्वोच्च श्रेणीतील यश मिळेल ह्याची शाश्वती जवळपास नसतेच. काही दुःखे प्रारब्धानुसार भोगणे, ह्या पलीकडे आपल्या हाती काही नसते. आणि प्रारब्ध म्हणजे तरी काय, आपल्याच कर्माची ती फळं ! अनेक विद्वानांनी श्रीमद्भगवदगीतेतील कर्मयोगावर भाष्य केलं आहे. बहुतांश विचारवंतानी पुर्व जन्मातील कर्मांची चांगली-वाईट फळे आपल्याला वर्तमान जन्मात चाखावी वा भोगावी लागतात, असे म्हणत जन्माचा फेरा आपल्याला चुकवीता येत नाही ह्या मान्यतेला दृढ केले आहे. अलीकडे 'Prominent Scientists Claim That Death Does Not Exist' ह्या मथळ्याखाली www.dailyamaze.com ह्या साईटवर लेख वाचला. त्यात पदार्थविज्ञानाचे ब्रिटिश शास्त्रज्ञ डाॅ राॅजर पेनरोझ आणि त्यांची टीम तसेच म्यूनीच येथील Institute of Physics मधील शास्त्रज्ञ बराच अभ्यास केल्यानंतर आपल्या धर्मातील आत्म्याचं अमरत्व, मनकोश,पारब्ध इत्यादी संबंंधी पुष्टी देऊ लागलेत असं दिसतंय. आपले समर्थ रामदास स्वामी  म्हणतात,
मना त्वाचीं रे पूर्वसंचित केले!
तयासारखी भोगणे प्राप्त झालें!!.
पुढे ते म्हणतात,
मनीं मानव व्यर्थ चिंता वहाते !
अकस्मात होणार होऊनि जातें!!
घडे भोगणें सर्वही कर्मयोगें!
मतीमंद ते खेद मानी वियोगें!!
समर्थांच्या शिकवणीची प्रचीती खाली दिलेलं उदाहरण वाचल्यावर आपणांस येऊ शकते.

ग्रहांचे शोध लावणारे महान गणिती भास्कराचार्यांना लीलावती नावाची मुलगी होती. तिच्या जन्मकुंडलीत ती विधवा होणार असे लिहले होते. म्हणून त्यांनी  तिचे लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांच्या शिष्यांना हे काही रुचले नाही. ते भास्कराचार्यानां म्हणाले अमुक एका मुहूर्तावर लग्न झाले तर तिला वैविध्य येणार नाही. त्यावर भास्कराचार्यांनी शंका काढली की तुम्ही सांगता त्या मुहूर्तावर लग्न लागेल का? त्यावर शिष्य म्हणाले, "त्याची आम्ही हमी देतो!". एकाहून एक सरस अशा त्यांच्या विद्वान शिष्यांनी हमी दिल्यानंतर त्यांनी आपल्या मुलीचे लग्न करावयाचे ठरविले. मुलीच्या लग्नाच्या दिवशी भास्कराचार्य आत देवघरापाशी जाऊन बसले. ठरल्याप्रमाणे लग्न विधीला सुरवात झाली. सारे काही व्यवस्थीत सुरू होते. एवढ्यात लिलावतीच्या गळ्यातील मोत्याच्या हारातील एक मोती केव्हा पडला आणि घटीकापात्राच्या छिद्रात कधी जाऊन पडला हे कोणालाच कळले नाही. भास्कराचार्य आतील देवघरापाशी बसले होते तरी, त्यांच लक्ष बाहेर होतं. पोरीचं लग्न अजुनही कसे नाही लागले? झाले तरी काय, हे पहावयास ते बाहेर आले आणि घटीकापात्रात डोकावून त्यांनी पाहिले. तर घटीकापात्राच्या छिद्रात एक मोती पडलेला दिसला. ते म्हणाले "चुकले, मुहूर्ताची वेळ निघून गेली".त्यांनी मग शिष्यांना हाका मारल्या. त्यावर शिष्य म्हणाले "अजूनही घटीका भरली नाही महाराज " ते ऐकून भास्कराचार्य म्हणाले "अरे, भरली नाही काय म्हणता? नीट बघा". तेव्हा शिष्यांनाही घटीकापात्राच्या छिद्रावर पडलेला तो मोती दिसला. मग कसेबसे मुलीचे लग्न लावणे भाग पडले. थोड्याच दिवसात नियतीप्रमाणे लीलावती विधवा झाली. इथे भास्कराचार्यासारख्या विभुतींनी आपल्या शिष्यावर विश्वास कसा काय ठेवला,असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. परंतु उत्तर काय?

सतरा वेळा युध्दात पराभव ज्याचा केला त्या महंमद घोरीला पृथ्वीराज चौहान का क्षमा करतो? केवळ कैकयीने हट्ट धरला आणि श्रीरामाच्या वाटेला वनवास आला. का? केवळ सीतेने हट्ट केला म्हणून श्रीराम कांचनमृगाच्या मागे धावतात. असे सोनेरी हरीण असते का, असा प्रश्न श्रीरामाला का पडला नाही? लक्ष्मणाने आखलेली रेषा ओलांडून सीता रावणाला भिक्षा देते.का? भिष्माला प्रतिज्ञापूरतीचा कैफ; तो का व कसा वाढत गेला? द्रौपदी स्वतःच्या रूपाभिमाने भरलेली का राहते? एकदा घेतलेला त्रागा ती अखेरपर्यंत का सोडीत नाही? युध्दिष्ठीर द्यूत खेळणं सोडत नाही. का? भीम कौरवांना जळावयाचे सोडीत नाही, अर्जुन लढायचे सोडत नाही, दुर्योधन द्वेष सोडीत नाही, कर्ण पीळ सोडीत नाही, कुंती खंत सोडीत नाही; धृतराष्ट्र आधीच दृष्टीहीन परंतु त्याबाबत महाभारताच्या वाचकांनी कधी चेष्टा केली असावी असे संभवत नाही. परंतु तो पितृप्रेमाने इतका अंध होतो कि भर दरबारात वस्रहरण होताना कुलवधुचा त्रागा त्याला ऐकू का येत नाही? ह्या बाबतीत सारा दोष त्याच्या पदरात पडलाच ना; पुत्रप्रेम ही स्वाभाविक बाब; पण त्याला मर्यादा असणे ओघाने येतेच ना! आपल्या देशाची फाळणी ही आपल्यासाठी शोकांतिकाच. परंतु सत्ताधारी तर ब्रिटिश होते ना! बॅरिस्टर जीनाची महत्वाकांक्षा का कशी वाढली? इतिहासापासून ते वर्तमानापर्यंत राष्ट्राच्या, समाजाच्या, आम आदमीच्या जीवनात असे अनेक प्रसंग येतात, अनेक चुका घडतात. आणि त्यांची किंमत मोजतच पुढे वाटचाल करावी लागते. का? उत्तर एकच. ते म्हणजे After all man is servant of circumstances. मनुष्य परिस्थितीचा गुलाम असतो. हे सत्य पडताळून पाहणे शक्य आहे, परंतु ज्या गोष्टी आपल्या आधीन नाहीत त्यावर आपण मात करू शकत नाही. हे ही तितकेच खरे .

आपले डोळे (दृष्टी), वाणी (आवाज), नाक(वास), त्वचा(स्पर्श), जिव्हा(रस/चव) आणि कान (ऐकू येणं) ही आपली ज्ञानेंद्रिये. मेंदू आपल्या शरीराचा राजा आणि बुध्दी ही मेंदूच्या कार्याचा भाग आहे. इथपर्यंत विज्ञानाने आपल्याला ज्ञात केलं आहे. मग विचार-विकार, संस्कृती -प्रवृत्ती- विकृती, पाप-पुण्य, सुख-दुःख, हार-जीत, आशा-निराशा, संशय-विश्वास, मोह- लोभ, दया-क्रोध, प्रेम-मत्सर इत्यादी भावना मनामध्ये विराजमान आहेत असे आपण मानतो, ते मन कुठे असतं? मन म्हणजे नेमके काय? परंतु मनाची व्याख्या आजपावेतो पूर्णत्वास गेलेली नाही. मन हे फार चंचल असते. ते काबूत ठेवण्यासाठी ध्यानधारणा, योग, इत्यादी उपाय आपल्यासाठी उपलब्ध असतात. तसेच आधुनिक वैद्यकीय शास्त्रातही औषधें उपलब्ध आहेत. परंतु तशा प्रकारांच्या उपाययोजनेचा फारसा उपयोग होत नसतो. कारण त्या उपाययोजना कार्यन्वयीत करण्यात आपलं सातत्य कमी पडत असते. मग सातत्य कमी पडल्यावर काही उपाययोजना आहे का? असा प्रश्न पडतो. हो, उत्तर आहे. ते म्हणजे चिकाटी. परंतु चिकाटीने ज्या काही कार्यात आपण यश प्राप्त करतो ती सारी कार्यें प्रथमदर्शनी बहुतांश वैयक्तिक पातळीवरची असतात. एखाद्या परीक्षेतील यश वा संशोधनातून शास्त्रज्ञांनी तयार केलेले यंत्रे ही त्यापैकी काही उदाहरणे होत. टेलीफोनचा शोध लावणारे थोर शास्त्रज्ञ एडिसनचे ९९९ प्रयत्न चुकले आणि हजाराव्या प्रयोगात ते टेलीफोनचे यंत्र बनवू शकले. त्यावर ९९९ वेळा प्रयत्न केले म्हणून यश मिळाले अशी मार्मिक प्रतिक्रिया एडिसनने दिल्याची वाचनात आले आहे. ह्याचा अर्थ असा की एडिसन ह्यांचे ९९९ प्रयत्न चुकीचे नव्हते, ते तर त्यांच्या शोधकार्यातील टप्पे होते असेच मानायला हवे. पोर्तुगीज खलाशी कोलंबस सागरमार्गे भारताकडे यावयास निघाला, परंतु पोहचला दुसर्या देशात. त्याचेच नाव अमेरिका असे पडले. एडिसन असो वा कोलंबस ह्यांच यश वैयक्तिक पातळीवरील मानले तरी त्यातही त्यांचे आई-वडील, गुरूजन (शास्त्रज्ञांच्या बाबतीत पूर्वासुरीचे शास्त्रज्ञ किंवा निसर्गरूपी गुरू) ह्यांची मदत झाली होतीच की. कोलंबसने म्हणे, तेथील राणीला भारतातील सुंदर नक्षीकाम असलेले दागिने आणण्याची लालूच दाखविली होती आणि त्याचमुळे त्याला परवानगी मिळाली. शिवाय राणीतर्फे प्रवासाचा खर्च, सरकारी गलबतही मिळाले. तात्पर्य हेच कि समाजाचा एक घटक म्हणून आपण वावरत असतो, त्यावेळी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे अनेक आपले आप्त, इष्ट- मित्र, शेजारी, अशा अनेक आपल्या संपर्कातील समाजबांधवांच्या वर्तणूकीचा आपल्यावर सकारात्मक तसेच नकारात्मक प्रभाव पडत असतो. कारण ह्या विश्वाची उत्पत्ती ऊर्जेतून झाली असं विज्ञान सांगते. तेच अध्यात्मिक गुरूही सांगत असतात. फक्त ते ऊर्जाऐवजी चैतन्य हा शब्द वापरतात. विश्वातील ऊर्जा दोन प्रकाराची असते. एक सकरात्मक(धन) दुसरी नकारात्मक (ऋण). ह्या विश्वाची निर्मिती हा एक अपघात आहे असे विज्ञान मानते, तर अध्यात्मशास्त्र विश्वाची निर्मिती ही ईश्वराची लीला मानते. परंतु त्यामुळे विश्वाच्या रचनेत, स्वरूपात, वैशिष्ट्यात तसेच दोन्ही प्रकारच्या ऊर्जातही काही फरक पडत नाही. आंब्याच्या झाडावरून कोकीळेच्या सनईचे गुंज ऐकू येते तर दुसर्या बाजूला ताडाच्या वृक्षावरून घुबडाचा भयभीत करणारं कर्कश खेसकणेही ऐकू येत असते. ह्या सत्यातही अजूनही बदल झाला नाही आणि होणार ही नाही. त्यामुळे विश्वासू माणसांचा शोध करावयाचा तरी कसा? प्रत्येक व्यक्तीत रज, तम, सत्व हे त्रिगुण विसावलेले असतात. त्यामुळे कोणी मानो वा न मानो दैवी शक्ती आणि आसुरी शक्तीं मधील दंद्व सतत आपल्या अंतःकरणी सुरू असते. आणि बहुतांशी आसुरी शक्ती लौकर उफाळून वर येत असते. कारण काटेरी झुडपं सुर्यप्रकाश, खते आणि मशागताविना वाढत असतात. तीच निसर्गाची नियमावली आहे. आणि तिचं परिचीत नाव आहे 'नियती '. नियतीचा पराभव आपण करू शकत नाही. मानवी रूपात अवतार घेणार्या विभूतीनांही दुःख भोगावं लागलं. त्यांना ही छळ, चुका, मानहानी, वादविवाद आरोपांना सामोरे जावे लागले. शेवटी काय 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा '. हेच सत्य. म्हणून जीवनात आलेल्या संकटांना, आरोपांना, अन्यायाला फसवणूकीला, मानहानीला, हसतमुखाने स्विकारत, मुखी हरीनाम घेत, जे सदेही वैकुंठात गेले अशा संत तुकाराम महाराजांचा खालील अभंग सदैव ओठीं, कंठी, ठेवणे हाच सुखःदुखा वरील रामबाण उपाय असावा असेच मला वाटते.
मन करा रे प्रसन्न! सर्व सिद्धीचें कारण!
मोक्ष अथवा बंधन! सुख समाधान इच्छा ते!

(विशेष सूचना:- प्रस्तुत लेखक दैववादाचा पुरस्कार करीत नाही. प्रयत्न हाच देव ह्यावर त्यांची निष्ठा आहे. ह्याच ब्लाॅगवरील 'आपल्यातला देव ' तसेच  'आपली वाणी आणि आपलं यश ' ह्या लेखावरुन प्रचीती येईल)

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...