शनिवार, २१ ऑक्टोबर, २०१७

पक्षातंराचा दिवाळी फराळ!


अलिकडे दिवाळीच्या पर्वावर मुंबई महापालिकेतील मनसेच्या सातापैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. ह्यावर वृत्तपत्रांचे संपादक, न्युज चॅनेल्सचे संपादक, तसेच सोशल मिडीया आणि गल्लीबोळातून गप्पांच्या कट्ट्यावर सामन्यजनांनी ही आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या. ह्यातील आपल्या भुवया उंचावतील अशी प्रतिक्रिया म्हणजे, 'म्हणे, राज ठाकरे ह्यांनीच हे पक्षांतर घडवून आणले. असल्या अंदाजात ९९ टक्के तथ्य दिसत नाही. भाजपा आणि शिवसेनामधील कलगीतुरासंबंधीही असे ऐकू येते, कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे ह्या दोघांनीही विरोधी पक्षांना काही स्पेस मिळू नये म्हणून आखलेली एक राजकीय चाल आहे. ह्यात तथ्य असू शकते. कारण अशीच स्ट्रटेजी मुलायमसिंग आणि मायावतीनी वापरात आणून उत्तर प्रदेशात आलटून पालटून सत्तेवर येत राहिले. क्रिकेट मधून क्लाइव्ह लाईड आणि विव्ह रिचर्डस ह्यांच्या निवृत्तीनंतर वेस्ट इन्डियन फलंदाजीसंबंधी क्रिकेट मधील समालोचक म्हणत असत "Predictibility of West Indian batting is Unpredictibity" त्याची आज आठवण येत आहे. कारण आजकाल राजकारण वेस्ट इंडियन फलंदाजी सारखं बेभरवशाचं झालं आहे. येथे काहीही घडू शकते. ह्याबद्दल लोकांना आता बिलकूल शंका राहिलेली दिसत नाही.

मागे मी एका लेखात म्हटलं आहे कि पंडीत नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, बॅ नाथ पै, डाॅ शामाप्रसाद मुखर्जी, पंडित दिनदयाळ उपाध्याय, डाॅ लोहिया ह्यांच्या काळात आपण राहात नाही. काॅग्रेसमधील सिंडीकेट आणि इंडिकेटचे भांडण हे आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान  लालबहाद्दूर शास्त्री ह्यांच्या अकस्मात निधनानंतर सुरू झाले; तेव्हापासून भारतीय राजकरणाचा पोत घसरू लागला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या संरक्षण आणि तत्कालीन परराष्ट्र धोरणातील मुत्सद्दीपणाचं मी कौतुक करीत असतो .परंतु देशांतर्गत राजकारणाचा पोत घसरण्याचा दोष इंदिराजीकडे जातो. हे माझे तितकेच प्रांजळ मत आहे. इंदिरा गांधीच्या काळात स्टेट बॅंकमधील घोटाळा, रेल्वे मंत्री ललित नारायण मिश्रा आणि नगरवाल ह्यांच्या हत्येसंबंधात इंदिराजींचा हात असल्याची चर्चा, अलाहाबाद हायकोर्टाने त्यांच्यावर निवडणूकीत केलेला अपहाराचा ठपका देऊन त्यांची  निवड दोषपूर्ण करून त्यांना निवडणूक लढविण्यिसाठी ६ वर्षाची केलेली बंदी, नंतर सत्तेसाठी राष्ट्रपतीनांही अंधारात ठेवून देशभर आणलेली आणिबाणी आणि आणीबाणीत विरोधी पक्षाच्या नेत्यांना कारावास पाठविणे, संचारबंदी, इत्यादी कृष्णकृत्ये भारतीयांनी प्रथमच अनुभवली. १९६७-६८ काळात काही राज्यामधील विरोधी पक्षांची आघाडी- सरकारे उलथून पाडण्यांचं कृत्त्य इंदिरा गांधींनी केलं. त्याचा वचपा विरोधी पक्षांनी १९७७ साली लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या तेव्हा उत्तर भारतातील  काॅग्रेसची  सत्ता  असलेली  सर्व  राज्य    सरकारे  बरखास्त करून काढला. १९८० साली इंदिरा गांधींची केंद्रात सत्ता आल्यानंतर विरोधी पक्षांची राज्यातील सरकारे बरखास्त केली. हरियाणा मध्ये तर जनता पार्टीच्या पूर्ण सरकारनेच काँग्रेसमध्ये प्रवेश करून भारतीय राजकारणातील पक्षातंराचा अजब प्रकार घडविला. 

पक्षातंरावर बंदी आणण्यासाठी सर्व पक्षानी एकमताने पक्षातंरबदीचा कायदा अस्तित्वात आणला. फार मोठी आशा निर्माण झाली. परंतु सर्वच पक्ष कायद्यातील त्रुटींवर मात करीत वेळोवेळी दुसर्या पक्षामध्ये उभी-आडवी, तिरकी-बेरकी फूट पाडण्यात माहिर झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला दोष न देता अशा घाऊक आयारामामुळे शिवसेना बळकट होईल का ह्यावरच चर्चा करू या. राज ठाकरे ह्यांनी त्यांचे नगरसेवक शिवसेनेत पाठविले असं काही म्हटल जाते, ते काही तर्काला धरून नाही. हे मी वर मांडले आहे. मनसे हा पक्ष नेहमी मराठी माणसांच्या मतांसाठी कायम स्वरूपात शिवसेनेला स्पर्धक राहणार हे निश्चित. संपूर्ण मराठी मतदार ह्या दोघांत विभागला जाऊन तामिळनाडूतील डीएमके आणि एडीएमके पक्षासारखे आलटून पालटून सत्तेवर येत राहतील अशी शक्यता नजिकच्या भविष्यात संभवत नसली तरी मराठी माणसांमध्ये राज ठाकरे ह्यांच्याबद्दल त्यांच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे सहानुभूती निर्माण झालेली आहे असे दिसते. जर हे नगरसेवक भाजप मध्ये गेले असते तर भाजपावर सर्वच बाजूने जोरदार टिका झाली असती. कारण केन्द्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे. परंतु मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला ही बाब मराठी मनाला (ह्यात शिवसैनिकांची मनेंंही अंतर्भूत आहेत हे विशेष) अधिक कष्टदायक वाटते. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काॅग्रेस ह्या तिन्ही पक्षांचे नगरसेवक वा आमदार फोडले असते तर शिवसेनेचं कौतुक झालं असतं. 'शिवसेनेला मनसे हाच पक्ष फोडायला मिळाला का, शिकार करायची होती तर वाघ, सिंहाची तरी करायची होती ', असं आता ऐकू येत आहे. ह्याचा फटका शिवसेनेला पडेल असेच दिसत आहे. 'महाराष्ट्र सरकार किती स्थिर, किती अस्थिर' ह्या माझ्या लेखात मी स्पष्टपणे सांगितले आहे कि जर शिवसेनेने राज्य सरकारचा पाठींबा काढला, आणि राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणूका आल्या तर मनसे ह्या पापांचं खापर शिवसेनेवर फोडेल. कारण 'तुम्ही सत्तेत राहिलात कशाला? ही तुमची लाचारी '. असेच मनसे शिवसेनेला उद्देशून म्हणणार. जरी फडणवीस सरकार लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत टिकलं तरीही शिवसेनेवर टिका करणे मनसेला अधिक सोयीचं असतं. कारण ह्या दोन्ही पक्षाची मतपेटी समान आहे. सरकारवर टिका करताना मनसे भाजपावर टिका करेल, अगदी सणकून. तरी त्यातून मनसेला फायदा संभवत नाही हे राज ठाकरे जाणून आहेत. आता तर शिवसेनेने मनसेचे नगरसेवक पळविले त्यामुळे मराठी अस्मितेचा मुद्दा मांडताना शिवसेना कमकुवत ठरलेली दिसेल. अगदी मुंबईत महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून मुंबईकरांचे प्रश्न सोडविले तरीही. भाजपाही इतर पक्षाची फोडाफोडी करीत आहे,  परंतु त्यावर  मनसेच्या टीकेची धार आपोआप कमी झालेली दिसेल. त्यातच मुंबईतील भाजपा नेते आशिष शेलारनी लागलीच राज ठाकरे ह्यांची भेट घेतली. कशासाठी ही भेट घेतली, ह्याचा तपशील बाहेर आला नसला तरी महाराष्ट्रातील राजकीय समीकरणात बदल होण्याचे संकेत अंधुक प्रमाणात का होईना दिसत आहेत.

प्रश्न उरतो तो हाच कि शिवसेनेला मनसेचे नगरसेवक फोडण्यासाठी इतकी घाई का झाली? असं ऐकिवात आहे कि शिवसेनेचे काही आमदार सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी मनसेचे नगरसेवक फोडले असावेत का? हीच शक्यता असावी. कारण शिवसेना तसेच मनसे ह्या पक्षांची मांडणी अशी आहे कि ह्या दोन्ही पक्षाच्या मुंबईतील नेत्यांचा प्रभाव (अर्थात अर्थरूपीसुध्दा) ग्रामीण महाराष्ट्रातील ह्या पक्षांच्या कार्यकर्त्यांवर पडत असतो. त्यामुळे मुंबई महापालिका (एक मोठं उत्पन्नाचं साधन) हातातून जाऊ नये, आणि ग्रामीण महाराष्ट्रात मनसेचं बळ वाढणार नाही ह्यावर उध्दव ठाकरेंचा कटाक्ष आहे. सोबत सेनेतील काठावर बसलेले आमदार आणि नारायण राणेंचा एनडीयेमधील संभाव्य प्रवेश ह्या सर्व वजाबाकीच्या बाजूमध्ये होणारी संभाव्य बेरीज उध्दव ठाकरे टाळू इच्छितात असे दिसते.

श्री उध्दव ठाकरे सतत केंद्र आणि राज्य सरकारवर टिका करीत आले आहेत. त्यांना असेही वाटत असावे कि सध्या भाजपाच्या केंद्र सरकारवर लोकांची नाराजी दिसत आहे. त्यामुळे Anti-incumbency चा तोटा त्यांच्या पक्षाला भोवणार नाही. अजूनही २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीला अवकाश आहे. केंद्र सरकारवर जी नाराजी दिसत आहे, तीचं स्वरूप कसं आहे, ह्याकडे एक नजर टाकली तर असे दिसून येते कि टीव्हीवरील राजकीय चर्चेचे जे कार्यक्रम असतात, त्यामध्ये विविध पक्षाच्या प्रवक्त्यांची संख्या लोकसभेतील पक्षीय बलानुसार नसते. त्यामुळे भाजपाचा एक प्रवक्ता आणि तोच प्रवक्ता एनडीएचा. परंतु विरोधी पक्षांना प्रत्येकी एक प्रवक्ता. त्यामुळे सरकार विरोधी बोलणार्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे सरकारविरोधीचं वातावरण वाटत असलं तरी मनमोहनसिंगच्या दहा वर्षकालीन सरकारकावर जनतेचा जितका रोष होता तितका रोष मोदी आणि फडणवीस ह्यांच्या सरकारवर आहे असा समज कोणी करून घेऊ नये. २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकाला तसा अवकाश आहे. विरोधी पक्षाकडे मोदी सरकार विरूध्द लाट उसळवू शकेल असा नेता नाही. आणि तसा नेता निर्माण झाला तरी मनसेच्या नगरसेवकांचं पक्षातंर घडवून आणल्याच्या कॄत्यावर मनसेकडून होणार्या टिकेला शिवसेनेलाच तोंड द्यावं लागेल. त्यातून सेनेची सुटका नाही. आणि सेनेचं उत्तर काहीही असलं तरी मराठी मतदार ते कितपत स्विकारतील हा प्रश्न उरतोच. आपण चर्चा करून तो सुटेल असं दिसत नाही. एकंदरीत शिवसेनेला हा दिवाळी फराळ फळतो की भोवतो हे पहाणं एवढंच काय ते आपल्या हाती आहे. 

शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७

ग्रामपंचायत निवडणूका आणि राजकारण


ग्रामपंचायतीच्या निवडणूका ह्या पक्षातीत असाव्यात. असा पंचायतराज कायदा सांगतो. काल-परवा महाराष्ट्रात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकांच्या निकालानंतर प्रत्येक पक्षाने सर्वाधिक जागा आणि सर्वाधिक सरपंच आमचेच असा दावा मांडला. एकदा का कोणी दावा मांडला कि प्रतिदावा आलाच, मग क्षेत्र आणि संस्था कुठलेही असो. त्यातही जिथे निवडणूका असतात तिथे निकालानंतर राजकिय पक्ष आपआपले दावे मांडणार ह्यात आश्चर्य वाटावयास नको. तरीही न्युज चॅनेल्सनी ह्या विषयांवर प्रत्येक राजकिय पक्षाच्या प्रवक्त्यांना बोलावून चर्चा घडविल्या. चॅनेल्सच्यां सूत्रधारांनी सर्व राजकीय पक्षांना दोषी ठरवित ग्रामपंचायतीच्या निवडणूका पक्षातीत असाव्यात असा ठणकावून उपदेश दिला. न्युज चॅनेल्सनां मनापासून ग्रामपंचायतीच्या निवडणूका पक्षातीत असाव्यात असे वाटत असतं तर त्यांनी ह्याबाबतीत निषेध नोंदवत ह्या विषयांवरील चर्चा सत्रात राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांना स्थान द्यावयास नको होते. परंतु तसे केले असते तर त्या चर्चाच्या कार्यक्रमांना टिआरपी फारसा मिळाला नसता. त्यांच्या धंद्यात टिआरपी महत्वाचा असतो. एखाद्या घटनेला राजकीय स्वरूप मिळालं तर ते  न्युज चॅनेल्सनां हवंच असतं. काही चॅनेल्स तर एखाद्या घटनेला राजकीय स्वरूप देण्यातही माहीर असतात. न्युज चॅनेल्सवर पंचायत निवडणूक आणि त्यांचे निकाल ह्यावर झालेल्या चर्चासत्रात अप्रत्यक्षपणे विविध पक्षांच्या प्रवक्त्यांकडून पुन्हा आपआपले दावेच मांडले गेले. शिवाय परस्परविरोधी दावे सिद्ध करण्याचे आव्हानही दिले गेले. जिथे चर्चाच निकोप होत नाही, तिथे पंचायतीच्या निवडणूका पक्षातीत कशा काय होणार?

ग्रामपंचायतीचा कारभार पक्षातीत असावा ही कल्पना चांगली आहे. परंतु ती कल्पना दुर्दैवाने कागदावरच राहीली आहे. स्वातंत्र्यानंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका ह्या पक्षीय चिन्हावर लढविल्या जात नसल्या तरी गावातील प्रत्येक मतदाराला पंचायत निवडणूकीसाठी उभे राहिलेले गावातील उमेदवार हे विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतात, हे ठाऊक असते. ह्याचं कारण  विधानसभा तसेच लोकसभेच्या निवडणुकीत ह्याच उमेदवारांनी कुठच्या तरी राजकीय पक्षाचा झेंडा घेऊन काम केलेलं गावकर्यांनी पाहीलेलं असतं. त्यामुळे पंचायत निवडणूकीत कितीही प्रयत्न केला तरी राजकारण येत असतंच. आणि येत राहणार. आपल्या नैतिक जगात जे घडले वा घडते ते किती अप्रिय, अनिष्ट असले तरी त्यात सामान्य मनुष्याचा दोष थोडा असतो. कारण तो प्रवाहपतित असतो. परिस्थितीमुळे त्याला तसे व्हावे लागते. अंतर्मुख होऊन विचार करायची आणि त्या प्रमाणे आचरण करण्याची शक्ती त्याजपाशी नसते. स्वतंत्र रित्या चिंतनाला लागणारे स्वास्थ्य त्याला कधीही लाभत नाही. चरितार्थाच्या चिंतेतून मुक्त होण्याची संधी त्याला सहसा मिळत नाही. म्हणूनच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जे मतदान होत आले आहे ; होत जाईल, ते राजकीय पक्षांच्या प्रभावाने होत असते, हे आपण नाकारण्यात काही अर्थ नाही. कारण "महाजना ये गतः सा पंथः!". 

प्रश्न ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील राजकारण कसे टाळता येईल हा नसून पंचायत राज कायद्यात अभिप्रेत असलेलं सत्तेचे विकेंद्रीकरण कसं साध्य होणार हा आहे. महात्मा गांधीजींचा ग्रामोद्योग, पंडित दिनदयाळ उपाध्याय ह्यांचं अंत्योदय आणि डाॅ राम मनोहर लोहीयांचं ग्रामीण अर्थव्यवस्थेसंबंधीचा विचार ह्यात मूलतः कुठलाच फरक नाही. असे असुनही राजकीय पक्षांना ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत इतका रस का असतो? तिथेही त्यांना राजकारण का करावे लागते?. कारण सत्तेचं विकेंद्रीकरण असा शब्दप्रयोग जो कायद्यात मांडला गेला, त्यातील सत्ता ह्या शब्दावरच राजकीय पक्षांच लक्ष केंद्रित झालं. वस्तुतः पंचायत राज कल्पनेत सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणजे विकासाचं विकेंद्रीकरण होणं हेही अभिप्रेत आहे. ज्या सोयी-सवलती शहरातील लोकांना मिळतात तशा ग्रामीण भागातील लोकांनाही मिळणे आवश्यक आहे. अन्यथा शहराकडे ग्रामीण जनतेचा लोंढा कमी होणार नाही. आज देशभरातील सर्वच राज्यांची स्थिती काय आहे? शहराची लोकसंख्या भौमितिक पध्दतीने वाढत असून शहरं बकाल; तरी हातांना काहीतरी काम. तर गावे ओसाड; त्यात वारंवार दुष्काळ किंवा अवेळी    गारपीटच संकट, त्यामुळे शेती उजाड. त्यातून हात बेकार मग नैराश्य, अंधश्रद्धा, व्यसनाधिनता, आत्महत्या. असे कुठपर्यंत चालत  राहणार? वेळीच गावांच्या विकासवर लक्ष न पुरविले तर परदेशी गुंतवणूकदार तिसर्या जगतातील म्हणजे आफ्रिकन आणि लॅटीन अमेरिकन देशाकडे आपला मोर्चा वळवितील. त्यांना आपण रोखू शकणार नाही. मग महासत्तेचं स्वप्न कसे साकार होणार? 

गावात सोयी सवलती कशा प्रकारे देता येतील? ग्रामविकासात कुठल्या गोष्टींना प्राधान्य द्यावे, ह्यासंबंधीचा अभ्यास आपल्या देशातही सतत होत असतो. इतकंच नव्हे तर काळानुसार इष्ट तो बदल कसा असावा हे ही ग्रामीण विकास आणि कृषी मंत्रालयातर्फे वेळोवेळी जो विकास आराखडा जाहीर केला जातो त्यात प्रतिबिंबित होत असतो. अर्थसंकल्प मग तो राज्याचा असो वा केंद्र सरकारचा , ग्रामीण विभागाच्या विकासासाठी पुरेशी तरतूद ही केली जात असते. मग विकासाची गंगा गावापर्यंत पोहचत का नाही? उत्तर स्पष्ट आहे. आणि ते म्हणजे भ्रष्टाचार. विकास निधीतून वेगवेगळ्या योजना कार्यान्वित होत असताना ठेकेदार, लोकप्रतिनिधी, आणि नोकरशहा ह्याच्यातील मिलीभगत मुळे ग्रामविकास निधीचा विनियोग पारदर्शी राहात नाही. अनेक योजना रखडण्याचे प्रकार घडत राहतात. आणि नंतर पुढे त्या पुर्ण करताना खर्चही वाढत जात असतो. प्रत्येक आमदार, खासदारांना  त्याच्या मतदारसंघात विभिन्न योजना राबविता याव्यात म्हणून तसेच विकासकामासाठीही स्वतंत्र  निधी मिळत असतो. परंतु कित्येकदा जनप्रतिनिधीच्या अनास्थेमुळे वा बेपर्वाइमूळे मिळालेला निधी  न वापरता पडून राहतो. 

एकंदरीत काय तर सर्व अवनतीमागे भ्रष्टाचार हेच प्रमुख कारण असते. भ्रष्टाचार हा एक शिष्टाचार बनला आहे. सार्वजनिक जीवनात पैशाचा प्रभाव फार पडत असतो. त्यातून सत्ता मिळत असते. आणि सत्तेतुन पैसा. म्हणूनच ग्रामपंचायतीच्या निवडणूका असो वा सहकारी संस्था व बॅंकातील निवडणूका असो प्रत्येक राजकीय पक्ष हिरिरीने लढवत असतात, मग संविधानांत वा कायद्यात किती पवित्र भाव मांडलेला असला तरी. ज्ञानपीठ विजेते विख्यात लेखक वि स उर्फ भाऊसाहेब खांडेकरांनी आपल्या एका पुस्तकातील प्रस्तावनेत काय म्हटले आहे हे साररूपाने ऐकू या. "मोठमोठया संस्था असो वा सरकारी महामंडळे,  कृषी उत्पन्न बाजार समित्या असो, वा गावपातळीवरील सहकारी डेअर्या, ग्रामपंचायतपर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्था असो, वा  सहकारी बॅंका,  सहकारी साखर कारखाने असो वा शिक्षण संस्था, किंवा  मोठमोठाली उत्पन्न असणारी देवालये, ह्या सार्या ध्येयवादी महात्म्यांच्या स्फुर्तीतुन आणि त्यागातुन निर्माण झालेल्या आहेत. परंतु पै-पै करून पैसा मिळविणार्या बापाच्या कष्टांची कल्पना आयत्या बिळावर नागोबा होणार्या त्याच्या गर्भश्रीमंत मुलाला जशी येत नाही ,त्याप्रमाणे कुठल्याही संस्थेच्या संस्थापकांचा ध्येयवाद ती चालविणार्या पुढल्या पिढीच्या आचरणात उतरत नाही. संस्थेचा उज्वल ध्येयवाद, ती चालविणार्या पुढल्या पिढीला हिणकस झाल्याशिवाय राहातच नसावा. महाराष्ट्रात सार्वजनिक जीवनाच्या अग्रभागी असलेल्या सर्व संस्थांचा गेल्या तीन पिढ्यांचा इतिहास पाहिला, तर पहिल्या पिढीची ध्येयाची पताका तिसर्या पिढीला उपयुक्त लंगोटी म्हणून वापरण्यात येत आहे असे दिसून येते. राष्ट्राच्या उध्दाराकरिता तरूण पिढी विशिष्ट संस्कारांनी युक्त व्हायला हवी म्हणून काढलेल्या शिक्षणसंस्थांना आज कारकून निर्माण करण्यार्या कारखान्यांचे स्वरूप आले आहे. वनराजाने जिथे स्वच्छंद विहार करावयाचा, त्या स्वतंत्र अरण्याला मेंढरांच्या कोंडवाड्याचे स्वरूप यावे, ह्यापेक्षा अधिक दुर्दैवाची गोष्ट कोणती असू शकते? पुढे पुढे हा दुबळेपणा लपविण्यासाठी 'संस्था जगली पाहिजे' हे सूत्र फार उपयोगी पडते असा सर्व संस्थाचालकांचा अनुभव आहे! पण निर्जीव संस्थेच्या चिरंजीवनापेक्षा सजीव संस्थेचा अपमृत्यु शतपटीने श्रेष्ठ असतो; तो स्फूर्तीची दिव्य ज्योत अमर ठेवून समाजाला प्रगतीचा मार्ग दाखवू शकतो, हे त्यांच्या लक्षात येत नसते, वा लक्षात येऊनही दुर्लक्ष करणे त्यांना सोयीचे ठरत असावे. संस्था कुठल्याही क्षेत्रातील असो, एकदा का त्या आपल्या मूळच्या ध्येयापासून च्युत झाल्या आणि ठराविक चाकोरीतून वाटचाल सुरू झाली कि साहजिकच दोन प्रकारच्या साधूंचा तिथे लवकरच शिरकाव होतो. पहिले संधीसाधू आणि दुसरे स्वार्थसाधु. लोकशाहीचा जयजयकार करीत हे दांभिक लोक संस्थेतल्या मूठभर निष्ठावंत सेवकांची गळचेपी करू लागतात. टोळ्या केल्याशिवाय चोरांचे व्यवहार चालू शकत नाहीत; उलट तपस्व्याला एकांतातच ध्यानधारणा करणे आवडते. ह्या नियमाला अनुसरून असल्या संस्थांत स्वार्थसाधूंचे कंपू तयार होतात व सज्जन माणसे एकाकी पडतात. मग कुटील कंपू त्यांचा सहजगत्या पराभव करतात. आपल्या राजकिय व्यवस्थेतील  संसद वा राज्यांच्या विधानसभा ह्या ही संस्थाच.  विविध क्षेत्रातील सरकारी महामंडळेही संस्थांच.  शैक्षणिक, सहकारी, सामाजिक संस्थांप्रमाणे सरकारी महामंडळे ही संरमजमशाहीच्या काळातील संस्थानांचं रूप घेताना दिसत आहेत आणि  उल्के प्रमाणे पहिला अविष्कार संपला की तिचे जसे  पाषाणात रूपांतर झालं, तशीच अवस्था  अनेक  सरकारी  महामंडळांची आणि संस्थांची स्थिती झाली असावी कि काय असा प्रश्न पडतो".

मग ह्यातून मार्ग कोणी आणि कसा काढावा?लोकशाही राज्यव्यवस्था यशस्वी होण्यासाठी सर्वसामान्यांत 'आपण ह्या देशाचे महत्वाचे घटक तसेच रक्षक आहोत'. ही भावना अंतःकरणी रूजावयास हवी. घटनेने आपल्याला काही हक्क आणि काही कर्तव्यें पार पाडण्याची जबाबदारी दिली आहे. म्हणून  ही भावना आपल्या समाजबांधवात पसरविण्यासाठी आपल्यालाच सामुहिक रित्या काम करावे लागेल. जगभरातील प्रगत देशाचा इतिहास पाहिला तर आपल्याला आढळून येईल कि ह्या प्रगत देशात सर्वसमान्यांनीच उठाव करून बलाढ्य राजेशाही संपुष्टात आणली. आणि आपला व आपल्या देशाचा विकास घडवून आणला. डोंगरपठारावरून पाण्याचे हजारो लोंढे खळाळत खाली कोसळले म्हणून काही शेते पिकत नाहीत किंवा वीज निर्माण होत नाही. कुठल्याही शक्तीचा उपयोग करण्यासाठी सामुहिक बुध्दी आणि योजकता कशी कामी येते हे वाळवंटी प्रदेश म्हणून मानल्या गेलेल्या इजरायल देशाने पाण्याच्या दुर्भिक्षेवर केलेली विलक्षण मात पाहून आपल्याला समजू शकते. अथक परिश्रमांतून आधुनिक विज्ञानाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपली औद्योगिक प्रगती करत, सर्वात छोटा देश असुनही सामरिक रित्या सर्वात बलशाली राष्ट्र म्हणून इजरायलने स्थान पटकावले आहे. क्युबामधील सार्वजनिक आरोग्यव्यवस्था, फिनलॅड मधील शाळा व संपूर्ण शिक्षण व्यवस्था, डेन्मार्कमधील सर्व संस्था आणि व्यवस्थेतील व्यवहार भ्रष्टाचाराविना कसे चालतात ह्या सार्या गोष्टी पाहण्याजोग्या आहेत. आपल्या येथील बहुतांश राज्यातील मंत्री , खासदार ,आमदार, नगरसेवक, इत्यादींनी कुठल्या नी कुठल्या परदेशात अभ्यास दौरे केले आहेत आणि करीतही आहेत. परंतु स्वतःची परदेशवारीची हौस पिटविण्याखेरीज गावाच्या वा शहराच्या विकासासाठी ह्या लोकांनी भरीव काही केलं असे दिसतच नाही. ह्याच कारण नेत्यांवर प्रजेचा अंकुश नाही. आणि तसा अंकुश निर्माण करण्यासाठी मध्यमवर्गीय लोकांनी Comfort Zone मधून बाहेर येणं आवश्यक आहे. शहरी आणि नागरी मध्यमवर्गीयांनी गावातील लोकांना राजकिय, आणि आर्थिक रित्या साक्षर बनविले पाहीजे. सामान्य मनुष्याच्या सर्व गरजा चांगल्या रितीने भागविल्या जातील तरच संतापासून पुढार्यापर्यंत सर्व लोक जे नीतिपाठ देत असतात ते त्यांच्या गळी उतरतील. मनुष्य सुखासुखी किंवा सहजासहजी चांगला होत नाही. उपोभोगाइतकी त्यागाची वृत्ती स्वाभाविक नसते. ती संस्कृतीने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. माणसाला चांगले बनवावे लागते. तो तसा बनला तरी त्याचे चांगुलपण टिकवावे लागते. म्हणून ह्या सर्व गोष्टींना पूरक अशी सामाजिक परिस्थिती निर्माण होणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी राजकीय नेत्यांनी वृथा अभिमान सोडून परस्पर सहमतीने, समाजातील विभिन्न क्षेत्रातील तज्ञानां, समाजातील विद्याविभूषितांना बरोबर घेऊन ग्रामीण भागातील लोकांचे विज्ञानासबंधीचे, शेती व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानासंबंधी असलेले अज्ञान दुर करावे लागेल. प्रजा आणि राजा जेव्हा हातात हात घालून कार्यारंभ करेल तेव्हा एक वैज्ञानिक दृष्टीकोन असलेला आधुनिक, समर्थ, आणि प्रगत भारत उदयास येऊ शकेल.

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...