शनिवार, २० मे, २०१७

देश,सरकार,आणि समाज


एका विशिष्ट संस्कृतीने आणि पंरपरेने बांधलेला समाज जेव्हा एका विशिष्ट भूभागावर बर्याच काळासाठी वास्तव्यात असतो, तेव्हा तेथील समाजाला राष्ट्र वा देश अशी संज्ञा प्राप्त होत असते. आणि त्याच देशातील काही लोकांचं एक मंडळ  असते, जे त्या देशाचा कारभार पाहात असते, ते मंडळ म्हणजे तेथील सरकार. मला वाटत, आजच्या चर्चेसाठी सरकारची, तसेच राष्ट्राची इतकी व्याख्या पुरेशी आहे.

जगाच्या पाठीवरील प्रत्येक देशात सरकार नावाची यंत्रणा आहे. त्यातही प्रकार आहेत. कुठे लोकांनी निवडून दिलेलं, तर कुठे राजेशाही, कुठे लष्करशाही, तर कुठे एक पक्षीय सरकार आहे. कुठल्याही पध्दतीचं सरकार असो, प्रजेची सुरक्षा आणि ऐहीक विकास ही सरकारची वा राज्यकर्त्यांची प्राथमिक कर्तव्ये होत. संरक्षण, उदरभरण आणि प्रेम या गोष्टीची निश्चिती झाली कि निश्चिंत मन सर्जनशीलतेची भरारी घेत असते. त्यातूनच व्यक्ती, समाज आणि राष्ट्राचा विकास होत असतो. पुष्कळदा सरकार आणि प्रशासनातील लोक (नोकरशाही) ह्यांच्यात समन्वय नसतो. नोकरशाही भ्रष्ट असते, असेही ऐकायला येत असते. याउलट "सरकारमधील मंत्री भ्रष्ट असतात. नोकरशाहीला का दोष देता?" असे ही ऐकतो. कुठलाही देश आणि कुठलिही राज्यप्रणाली असो, कमी अधिक प्रमाणात अशा गोष्टी ऐकावयास मिळतात आणि त्या बहुतांशी खर्या असतात. परंतु किती दोषी नेत्यांना वा नोकरशहानां शिक्षा झाली असेल, याबाबत सर्वच देशांना आणि राज्यप्रणालीनां नेगेटिव्ह गुण सारखेच मिळतील असे मला वाटते. आर्थिक घोटाळा रकमेने किती मोठा आणि किती प्रमाणात देशाचं नुकसान करतो, ह्याच प्रमाण मात्र प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असू शकते. अविकसित आणि विकसनशील देशावर भष्टाचाराची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर विपरीत परीणाम करीत असतात. हे ओघाने आलेच. आपला देश विकसनशील देशांमध्ये गणला जातो आणि सरकार आपल्या मतदानाच्या हक्कातूनच अस्तित्वात येते, मग भ्रष्टाचाराचं प्रकरण उघडकिस येते तेव्हा समाज म्हणून आपणही जबाबदार ठरतोच की. आपण ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी खाली देत असलेल्या दोन कथांचा आधार घेऊ या.

एका गावात गावदेवीचं मंदिर असते. ते रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या जमिनीवर होते. भाविक गाडी पकडण्याच्या घाईत असल्यामुळे, आपली पादत्राणे न काढताच मंदिरात प्रवेश करून देवीचं दर्शन घेत असत. गावातल्या एका गृहस्थाला हे काही रूचत नव्हते. म्हणून त्याने सरपंचाकडे लेखी तक्रार केली. सरपंच म्हणाले, "मी काय करणार? आपलीच मंडळी ही. मी समजावून सांगितले नाही कां?" असे म्हणत त्यांनी तक्रार दाखल करून घेतली. दुसर्या दिवशी, मंदिराच्या दरवाज्यापाशी "सर्व भाविकांना विनंती करण्यात येते कि, गावदेवीचं गाभार्यातून दर्शन घ्यावयाचे असल्यास, आपली पादत्राणे बाहेर काढून ठेवावीत. आपला सरपंच".असे फलक लागले. त्या फलकावर धूळ साचत गेली. काही परीणाम झाला नाही. मग तक्रारदाराने तहसील गाठले. तिथे तक्रार दाखल केली. तहसीलदारांनी लक्ष घालतो असे आश्वासन दिले. तिसर्या दिवशी मंदिराच्या गेटपाशी फलक लागले. फरक इतकाच कि फलकातील  सूचनेमध्ये थोडासा बदल केला. "जो कोणी भाविक पादत्राणे घालून देवीचं दर्शन घेतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. शेवटी सूचनेच्या खाली हूकमावरून, मामलेतदार. हे दोन शब्द वाढले. पण स्थितीत काही बदल झाला नाही. ना कोण्या भाविकाने तहसीलदाराच्या सूचनेला मान दिला.  ना कोणा भाविकावर कारवाई झाली. तक्रारदाराने जिल्हाधिकार्यांचं ऑफीस गाठलं. तक्रार केली. जिल्हाधिकार्यांनी लागलीच तक्रारदाराच्या समक्ष तहसीलदारा  फोनवरुन फैलावर घेतले. तक्रारदाराला आश्वस्त केले, आणि सांगितले, कि दोन दिवसात प्रत्यक्ष लक्ष ठेवण्यासाठी माझ्या ऑफीसमधील सिनियर अधिकार्याला पाठवितो. तक्रारदाराने टेबलावर आणलेला चहा घेतला आणि आनंदीत होऊन कल्टेक्टरसाहेबांचे आभार मानून घरचा रस्ता धरला. दोन दिवसानंतर जिल्हाधिकारीच्या ऑफीस मधील एक अधिकारी काही काळासाठी त्या गावदेवीच्या मंदिरातील तक्रार निवारण करण्याच्या कामावर रूजू झाले. त्यांची राहण्याची व्यवस्था ही झाली होती. रोज मंदिरात स्वतः जातीने एक बूथ ऊभे करून ते अधिकारी कोणी भाविक पादत्राणे घालून गावदेवीचे दर्शन घेत नाही ना याची खातरजमा करीत होते. तक्रारदाराला आपल्या तक्रारीची दखल घेतली गेली हयाचं समाधान मिळाले. काही व्यवसायाच्या कामानिमित्त तक्रारदार बाहेर गावी गेला. काही दिवसानंतर तो परत आला, तर काय पाहतो? भाविक त्या अधिकार्यांच्या टेबलाखालून पैसे देत पादत्राणे न काढता देवीचे दर्शन घेत होते. आपल्याच गावातील बांधवांना देवीच्या दर्शनासाठी पैसे द्यावे लागत असल्याने त्याचे मन कष्टी झाले. त्यानी पुन्हा जिल्हाधिकारीकडे तक्रार केली. जिल्हाधिकार्यांनी एक तडफदार तरूण अधिकार्याची नियुक्ती केली. नवीन अधिकार्याने आपल्यासोबत एका शिपायाला आणलं. मंदिराच्या गेटपासून थोडं दूरवर चप्पल स्टॅंड उभारला. भाविकांना रांगेत उभे राहण्यासाठी बांबूचा छोटेखानी मंडप आणि चप्पल काढून ठेवण्यासाठी स्टॅन्ड ही उभारला. भाविकांनी चप्पल येथे काढावीत आणि मगच मंदिरात प्रवेश करावा, असा फलक ही लावला. सहा महीने झाले. सारं काही जिल्हाधिकार्याने केलेल्या नियमाप्रमाणे घडत होतं. भाविकांना हया नव्या अधिकार्याला लांच देण्याची हिम्मत झाली नाही. आता देवीच्या दर्शनासाठी वेळ जास्त लागायला सुरुवात झाली. म्हणून घरातूनच भाविक लौकर बाहेर पडू लागले. गावदेवी मंदिराचा वर्धापन दिवस उजाडला. पहाटेपासून भाविकांची देवीच्या दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. त्या अधिकार्याचा शिपाई चप्पल स्टॅंड जवळच उभा होता. चप्पल काढा, चप्पल काढा, चला चला, पुढे चला असा घोष शिपाईचा चालू होता. रांग पुढे सरकत होती. एक भाविक अनवाणीच आला होता. त्यालाही चप्पल काढा आणि पुढे चला हेच वाक्य शिपयाने उच्चारले. त्या अनवाणी भाविकाने म्हटलं, मी चप्पल कुठे घातलेत? पंरतु तो शिपाई त्या भाविकाला पुढे जाऊ देत नव्हता. भाविकाने अधिकार्याला विनवणी केली. परंतु त्या अधिकार्याने त्याला पुढे जाण्यास मज्जाव केला. तो भाविक वैतागून म्हणाला, अहो साहेब मी कूठे चप्पल घातलेत? अधिकार्याने उत्तर दिले, "त्या फलकावर काय लिहले आहे, ते वाचले ना! कायदा म्हणजे कायदा. तुम्ही घरी जा. चप्पल घालून या. चप्पल स्टॅन्ड वर ठेवा, मग मंदिरात जा." कलेक्टरसाहेबांचा आदेश आहे ".तो भाविक म्हणाला, अहो साहेब, कलेक्टर साहेबांकडे तक्रार करणारा तो मीच आहे. ते अधिकारी म्हणाले "मग तुम्हाला नियम जास्त माहीत हवा. ते काही नाही तूम्ही चप्पल घालून या. येथे काढा मग दर्शनासाठी आत जा. त्या भाविकाने कपाळावर हात लावला आणि घरी परत गेला. शासकिय पातळीवरील दोन अधिकार्याचे वागणं कसे आहे? एक 'काय द्यायचे' ते बोलतो तर दुसरा अधिकारी म्हणतो, फक्त कायद्याचे बोला.

एखादा मंत्री जेव्हा  नोकरशहासंबधी वरील  ही गोष्ट सांगेल तेव्हा आपण त्यांना सम्राट चंद्रगुप्त ह्यांच्या जीवनातील गोष्ट सांगू शकतो. ती अशी आहे. सम्राट चंद्रगुप्ताला वेष बदलून नगरात फेरी मानण्याची सवय होती. त्यामुळे आपल्या स्वतः बद्दल, सेनापती, प्रधान, दरबारातील इतर अधिकार्याबद्दल प्रजेचं काय मत आहे, ह्याची माहिती मिळत असे. एकदा सम्राट, वेष बदलून नगरात पायी फिरत राहिला. नंतर त्याला थकवा आला. म्हणून रस्त्यावर उभ्या असलेल्या टांग्यात (घोडागाडी) बसतो. आणि टांगेवालाल्या सांगितले, "मला राजमहल पर्यंत सोड आणि पैसे ही तुला तिथेच मिळतील". माझ्याकडे आता पैसे नाहीत. टांगेवालाने नकार दिला. पुढे त्याने सांगितले की, "तुम्ही राग मानू नका, मी राजदरबारातल्या अधिकार्यांना राजमहलापर्यंत अनेकांना सोडलं आहे. परंतु त्या सर्वानी पैसे देण्याचं आश्वासन पाळलं नाही. राजमहल मध्ये शिरतात आणि बाहेर आलेच नाही." टांगेवाल्याला माहित नव्हतं कि तो प्रत्यक्ष आपल्या राजाशी बोलतोय. तो सम्राटाला राजमहलपर्यंत एकाच अटीवर सोडावयास तयार झाला. अट अशी होती कि राजाने आपला सदरा टांगेवाल्याकडे द्यावा आणि टांगाभाडे दिल्यानंतर सदरा राजाला परत मिळेल. बस, सम्राटांनी अट मान्य केली. आणि आपला सदरा टांगेवाल्यापाशी दिला. महलाच्या थोड्या दूरवरच टांगा उभा केला. राजाला त्या अवस्थेतून महलात शिरताना पाहून   प्रधानासकट सर्वच अधिकारी टांगेवाल्याला दम देण्यासाठी टांगेवाल्यापाशी जाऊ लागले. राजाने त्या सर्वांना "मागे फिरा; कोणीही टांगेवाल्याशी हुज्जत घालू नका आणि सर्वांनी दरबारात यावे असे फर्मान सोडले. दरबारात राजाने, सर्वाना फैलावर घेत म्हटले, "तुमच्यामूळे मला आज एका टांगेवाल्याकडून अशा मानहानीला सामोरे जावे लागले. ज्या कोणी, अधिकार्याने, टांगेवाल्याची भाड्याची रक्कम दिलेली नाही, त्यानी ती निमूटपणे माझ्याकडे जमा करावी, नाहीतर मी टांगेवाल्याला बोलावून आपल्या पैकी कोणी त्याचं भाडे थकविले असेल त्या सर्वांची ओळख पटवून त्यांना नगराबाहेर हाकलून देईन". ज्यांनीं ज्यानीं टांगेवाल्याची थकबाकी ठेवली होती ती त्यांनी  सम्राटाकडे सूपूर्त केली. सम्राटांनी स्वतः चे भाडे आणि दरबारातील अधिकार्यांनी जमा केलेली थकबाकी व्याजासकट टांगेवाल्याला दिली. टांगेवाला खूष झाला. तो सम्राटांना नमस्कार करून बाहेर पडला.

वरील दोन्ही कथातून दोन गोष्टी स्पष्ट होतात. पहिल्या कथेतून काय स्पष्ट होते, ते हे की नोकरशाही भ्रष्ट असते. तसेच काही वेळा नोकरशाही कायद्याचा पुस्तकी व्याख्या प्रमाण मानते. म्हणजे नको तिथे नियमाचा उदोउदो करते. दोन्ही गोष्टी प्रजेच्या हिताला मारक. दूसर्या कथेतून हे दिसते, की राज्याचा वा देशाच्या प्रमुखावरच आदर्श निर्माण करण्याचं उत्तरदायित्व असत. राज्यकर्त्यांचा नोकरशाहीवर अंकूश असावा. याचा अर्थ "राजा कालस्य कारणम् " हेच तत्व प्रमाण मानायचे कां? थोड्याफार प्रमाणात होय, हेच उत्तर. आपल्या देशात लोकशाही आहे, त्यामुळे प्रजा आपल्यावरील उत्तरदायित्व झिडकारू शकत नाही. काही प्रमाणात सत्ताधारी पक्षांला मतदानाद्वारे पराजित करून प्रजा आपले कर्तव्य पार पाडते. परंतु ज्यांना सत्तेवर बसविते, त्यांचाही कारभार मागील सरकार प्रमाणेच राहिला, तर मतदार, निवडणूका, ह्या गोष्टींना काही अर्थ उरत नसतो. कित्येकदा आपणच नैराश्याने ग्रासतो आणि म्हणू लागतो, "सत्तेवर कोणी बसला तरी आपल्या जीवनात काय फरक पडतो?" " सध्या मोदींची हवा आहे, असे म्हणतो, का तर प्रशासनातील बदल जाणवत आहे". असे नारायण मूर्तीं सारखे उद्योगपतीही म्हणतात, जे स्वतः मोदींचे समर्थक नाही, अशी पुस्तीही तसे विधान करताना जोडतात. तेव्हा त्यात तथ्य आहे, हे मानण्यासाठी मन मोठं का करू नये? सरकारवर टिका करण्याचा हक्क आहेच परंतु त्यासाठी पाकिस्तानातल्या टिव्हीवरून अय्यर सारख्या नेत्याने, "मोदीं सरकारको आप लोग हटाओ" असं विधान करणे योग्य आहे का? केजरीवालसारखे जे नव्याने राजकीय व्यवस्थेत आहेत, त्याचं ठीक आहे हो, परंतु साठ वर्षाहून अधिक काळ सत्ताधारी म्हणून वावरले, त्या पक्षांच्या नेत्यांनी, अय्यरांच्या विधानांबद्दल खेद व्यक्त करायला हवा होता ना! स्वातंत्र्य हे बंधना शिवाय असू शकत नाही. बोलायला वाणी लागते; परंतु कोठे आणि काय बोलावयाचे, ह्यासाठी आपल्या अंगी विवेक असावा लागतो. काळ झपाट्याने बदलत आहे, त्यामुळे सरकार आणि विरोधी पक्ष, सरकार आणि जनता, राष्ट्र आणि जग, ह्यातील नात्यांचा नव्याने विचार करायला हवा. मोदींचं सरकार अस्तित्वात येऊन काही राज्यांच्या निवडणूका झाल्या, निकाल लागले आणि मिडीयात पुढच्या लोकसभेची निवडणूक, पुढचा पंतप्रधान कोण ह्यावर चर्चा होते. ह्याला काही अर्थ आहे का? केवळ निवडणूका म्हणेजचं राजकारण असेच मानायचे कि काय? त्यामुळे संपूर्ण राजकीय व्यवस्था बदलण्यास आपण प्रजा किंवा मतदार म्हणा अपुरे पडतो असे नाईलाजाने म्हणावं लागतं. समाज म्हणून आपण किती वर्षे अल्पसंख्याक-बहूसंख्यांक, जाती-जमाती, प्रान्त-भाषा ह्यात विभागलेले राहणार?

राज्यकर्त्यावर प्रजेचा, विरोधी पक्ष, स्वायस्थ संस्था जशा कि न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, सीबीआय ईडी, तसेच स्वंयसेवी संघटना, मिडीया इत्यादींचा अंकुश असणे गरजेचं असते. परंतु ह्यातील फक्त न्यायव्यवस्था जनतेच्या विश्वासास अधिक पात्र आहे असे दिसते. वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमें ह्याचांही सरकारवर अकुंश असतो परंतु तो इतका वाखाणण्याजोगा नसतो. ह्याच कारण ह्या क्षेत्रात आलेला बाजारीपणा. निवडणूक आयोग, ईडी, कॅग, ह्या संस्थाचा कारभार समाधानकारक आहे. स्वंयसेवी संघटनाचं कार्य समाधानकारक आहे, तरीही काही स्वंयसेवी संघटनांचं काम वादग्रस्त असल्याचं चित्र समोर येत आहे. परदेशातून येणारी मदत पुष्कळदा देशात कुठलं तरी अंदोलन छेडण्यासाठी वापरली जाते. जगातल्या सामरिक दृष्टया आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि प्रगत देशांची ही नेहमीची खोड आहे. कारण तेथील निवडणूका वा सत्ता जिकंण्याचं आणि मोठमोठ्या बहूराष्ट्रीय कंपन्यांचे तसेच शस्त्रनिर्मीती करणार्या कंपन्यांचे आर्थिक हितसंबंध मजबूत करण्याचं हे एक मोठं हत्यार आहे. आजही जगात बळी तो कान पिळी हाच न्याय आहे. बलाढ्य देश सतत संपत्ती आणि अत्याधुनिक शस्त्रांच्या जोरावर अविकसीत तसेच विकसनशील देशांत पर्यावरणाच्या नावाखाली कूठे अंदोलने, तर कुठे दशहतवाद्यांना अप्रत्यक्षरित्या मदत, कूठे नक्षलवाद, कुठे जिहादाचं भूत, कूठे ईलेट्राॅनिक्स मिडीयाला हाताशी घेऊन नवीन वाद निर्माण करून अस्थिरता माजवीत असतात. दूर्दैवाची गोष्ट ही की आपलेच मूठभर युवक, समाजबांधव अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नशेत चूकीची वाट पकडतात. आपण जेव्हा ह्या सार्या व्यवस्थेवर टिका करतो, तेव्हा आपण नागरिक म्हणून आदर्श आहोत कां? हा प्रश्न कोणाला विचारायाचा? वरील दोन्ही कथांत गावदेवीचं दर्शन घेणारे भाविक आणि चंद्रगुुप्ताच्या दरबारातील अधिकारी हे सुद्धा समाजाचे घटकच ना! ज्या संस्थांनी सरकारच्या कारभारावर अंकुश ठेवावा,त्यांच्याच कारभारा बद्दल आपण असमाधानी असतो. त्या संस्थां मध्ये उच्चपदस्थ अधिकार्या पासून ते शिपाया पर्यंत काम करणारी मंडळी आपले समाज बांधवच ना! सरकारी आस्थापांनात काय नी खाजगी कंपन्यांत असणारी मंडळी, तेही आपलेच लोक. दस्तुरखुद्द सरकार चालवणारे लोकंही आपलेच. ह्यावरून हेच समजून घ्यावयाचे की आपल्या देशात घडणार्या सार्या बर्या- वाईट घटनांना समाज म्हणून आपणच जबाबदार ठरतो. 'Charity begines at home' हे सर्वसामान्यांना लागू होत नाही का? अगदी शंभर टक्के लागू होते. राज्यशास्त्रात म्हटले जाते कि, 'You get the government, what you deserve'. जसे आपण तसे आपले सरकार, तशा आपल्या संस्था. परंतु हे विधान फक्त लोकशाही राज्यप्रणालीलाच लागू होत असते असे नाही. एक पक्षीय राजवट असो वा राजेशाही किंवा लष्करी राजवट असो,  भ्रष्टाचार, पक्षपात, अशा कुप्रवत्ती सर्वच राज्यप्रणालीत दिसत असतात. एक वाक्य वाचनात आले आहे, ते असे "The progress of the nation is far less depend upon the form of it's institution, rather than the character of it's own men" कुठल्याही राष्ट्राचा विकास हा तिथे कुठल्या पध्दतीची राज्यप्रणाली आहे, ह्याही पेक्षा तिथल्या लोकांच्या चारित्र्यावर अधिक अवलंबून असतो. असे म्हटले जाते कि, "माणसामध्ये ज्या सहजप्रवृत्ती असतात त्या बदलता येत नाहीत. कुत्र्याचे शेपूट सरळ करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते वाकडेच राहणार! तीच अवस्था सहजप्रवृत्तीची असते". परंतु हे निव्वळ अर्धसत्य असावे. ज्यांच्यासमोर जीवनलक्ष्य नसते केवळ त्यांच्याबाबतीत खरे असावे. ध्येयनिष्ठ माणसांच्या बाबतीत तर 'नर करणी करे तो नरका नारायण बन जाय' हेच खरे असते. भक्त प्रल्हादाकडून इंद्रदेवाचा पराभव होतो. तेव्हा आपलं राज्य, वैभव परत मिळविण्यासाठी इंद्रदेव बृहस्पतीच्या सल्ल्यानुसार प्रल्हादाकडे याचक वेषात जातो. प्रल्हादाकडे शील मागतो. प्रल्हाद म्हणतो, "हे , माझे शील तूला दिले". त्वरित एक तेजस्वी आकृती प्रल्हादाच्या शरीरातून इंद्रदेवाच्या शरीरात प्रवेश करते. ती आकृती शीलाची. पाठोपाठ शौर्य नावाची आकृती बाहेर पडते. ती इंद्रदेवाच्या शरीरात प्रवेश करण्याअगोदर प्रल्हादाला म्हणते, "मी शीलाचं रक्षण करणारी, जेथे शील, तेथे मी". नंतर धनलक्ष्मी, विद्यादेवी, शक्तीदेवी, आणि शेवटी राजश्री प्रल्हादाच्या शरीराचा त्याग करून इंद्रदेवाच्या शरीरात प्रवेश करती झाली. तात्पर्य हेच की शील असेल तर निष्ठा उच्च श्रेणीची बनते. मग कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकते. देशात बदल घडवायचा असेल तर प्रथम आपल्यात बदल केला पाहिजे. मग आपोआप समाजात बदल होतो. सर्व व्यवस्थांमध्ये बदल घडतो. भारताचे माजी राष्ट्रपती सन्माननीय श्री अब्दुल कलाम ह्यांच्या  European Union मधील भाषणातील काही भाग नमूद केल्याशिवाय  ह्या लेखाला पूर्णत्व येत नाही असे ठामपणे वाटत असल्यामुळे तो भाग खाली देऊन लेख  संपवितो.
"Where there is righteouness in the heart there is beauty in the character. When there is beauty in the character, there is harmony at home. When there is harmony at home, there is an order in the Nation and when there is an order in the Nation there is peace  in the world."

सोमवार, १५ मे, २०१७

सामाजिक बांधिलकी



मंडळी, मागील लेखात आपण असुरक्षिततेच्या भावनेपोटी, मनुष्य समूहात राहू लागला आणि नंतर समाज व्यवस्था उभी राहीली, हे पाहिलं. त्याच लेखात समाजाची ढोबळ रित्या दोन वर्गात मांडणी केली. एक वस्तू-निर्मिती करणारा आणि दूसरा सेवा- निर्मिती करणारा. परंतू ही मांडणी व्यावहारिक पातळीवरील झाली. मुलतः माणूस समाजाशी ज्या कर्तव्याने स्वतःहाला बांधून घेतो ती 'सामाजिक बांधिलकी' म्हणजे काय? ह्याची ठोस स्वरूपात आणि संक्षिप्त रित्या व्याख्या करणे अवघड आहे. साधा अर्थ म्हणजे माणूसकी. परंतु ती परिपूर्ण व्याख्या होत नाही. ज्या गोष्टी व्याखेत बसत नाही, अशा सार्या गोष्टी निसर्गरम्य असतात, एवढं निश्चीत. मूलतः मनुष्याचं जीवन सामाजिक असते. ह्या जगात जितके म्हणून प्राणीमात्र आहेत, त्या सर्वात मनुष्य बुद्धीमान. त्या बुद्धीच्या जोरावर इतर प्राण्यापेक्षा मानवाने प्रगती करीत त्यांच्यावर हूकमत मिळविली. परंतु एखादी व्यक्ती दूसर्या व्यक्तीवर हूकमत गाजवावयास लागली, कि त्याला माणूसकी नाही, असे आपण मानतो. कां? येथूनच सामाजिक ह्या शब्दाच्या व्याख्येला सुरवात होते. मुंगीपासून वाघ, हत्ती सारखे प्राणी असोत, वा चिमणीपासून गिधाड्या सारखे पक्षी असोत, त्याचं जीवन सामुदायिक असते. पण सामाजिक नसते. त्यांच्या जीवनात कार्यव्यवस्था असू शकते. परंतु कर्तव्यभावना नसते. त्यांच्या कामात यांत्रिकता असते. पण भावना, बुद्धी, दूरदृष्टी, इतिहास, परंपरा, सम्यक ज्ञान यांचा त्यांच्या जीवनात अभाव असतो. मनुष्याच्या जवळ या सर्व गोष्टी असतात म्हणूनच तो सामाजिक जीवन जगतो.

मान्टेस्क नावाच्या विद्वानाने म्हटले आहे, "Man is a social animal being formed to please and enjoy in society." मनुष्य समाजात असला म्हणजे त्याला आनंद मिळतो. परिवार,विद्यालये,खेळ, नाट्य, संगीत, साहित्य, राष्ट्र, पंथ, संप्रदाय, सभा, संमेलने, उत्त्सव-समारोह, आदी नावाखाली चाललेले मनुष्याचे उद्योग त्याच्या सामाजिकतेचीच ग्वाही देतात. सामाजिक बांधिलकी ह्या शब्दात माणसाचं एकंदरीत समाजातील वागणं, तसेच लोकांशी व्यवहार (relationship) ह्या गोष्टीचाही अंतरभाव असतोच. ह्या संदर्भात एका पाश्चात्य विचारवंताने  म्हटले, "Be Civil to all, Social to many, Familiar with few, Friend to one, and Enemy to none. कोणाशीही वैर नसावे. एकदा का कोणी शत्रू नाहीत, असे आपल्या मनाने स्विकारले कि आपण सर्वांशी सुसंस्कृतपणाने वागू शकतो. Civil ह्या शब्दाचा Civic Science (नागरिक शास्त्र) प्रमाणे, शब्दशः अर्थ पकडला तरी अर्थ बदलत नाही. जसा मी देशाचा नागरिक, तसेच ह्या देशातील प्रत्येक व्यक्ती देशाची नागरिक आहे, हे मान्य केले पाहिजे आणि ते ही मनापासून. जास्तीत जास्त लोकांशी सामाजिक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही लोकांशी जवळीक असावी. जवळीक (familiar)    ह्याचा अर्थ आपल्या संताच्या शिकवणीच्या आधारे घ्यावयाचा असेल तर नेहमी सुसंगतीत असावे, असाच धरू या. आणि मैत्री एकाशीतरी असावी.  हा उपदेश ज्या कोणी साहित्याकाने दिला असेल, त्याला "एकच मित्र असावा" असे अभिप्रेत नाही. तसे असते तर त्याने only one friend असा शब्द वापरला असता.

सामाजिक बांधिलकी पुष्कळदा आपण दैनंदिन जीवनात अनुभवीत असतो. कोणाच्या घरी जर काही दुःखद घटना घडली तर सगेसोयरे, शेजार-पाजारी, मित्रपरिवार, सगेसोयरे, ओळखीपाळखीचे इतकेच काय पण अनोळखी आणि जातीपातीचा संबंध नसलेले लोक ही त्याच्याकडे येतात, त्याला मदत करतात, सात्वंन करतात. तसेच आपण दूसर्याच्यां सुखात ही सामील होतो. कुठे अपघात घडला तर त्या ठिकाणी जाऊन जखमींना रूग्णालयात नेण्याची जबाबदारी स्विकारणे, वादळ, पूर,भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या लोकांच्या मदतीला धावणे, अलीकडे शेतकर्याच्यां दुर्दैवी स्थितीत त्यांच्यासाठी उभार्यल्या जाणार्या निधीमध्ये आपलाही हातभार लागणे, शहीद जवानांच्या आप्तानां मदत करणे, वनवासी, दलीत-पीडीतांना सहाय्य करणे, रक्तदान, देहदान, वृक्षारोपण इत्यादी कामें करण्यात जो सहभागी होतो तो खर्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपतो. प्रत्यक्ष समाज कार्य आपल्या हातून घडत नसले तरी काही स्वंयसेवी संघटना आहेत जसे कि बाबा आमटे ह्यांनी सुरू केलेले उपक्रम, गिरीश प्रभुणे ह्यांनी भटक्या व विभुक्त जमातीसाठी यमगरवाडीत शाळा सुरू केलेला उपक्रम, सिंधुताई सकपाळांचा अनाथ मुलांसाठीचा उपक्रम, विश्वहिंदू परिषदेचे वनवासी कल्याण आश्रम, अशांना आर्थिक मदत वा मोफत कपडे, भांडी, पुस्तके, वह्या इत्यादींचं वाटप करून समाज कार्यात हातभार लावता येतो. मराठी विज्ञान षरिषद असो, वा साक्षरता आणि स्वच्छतेची मोहीम ह्यात आपला खारिचा वाटा उचलून अंशतः आपण समाजाचं ऋण फेडू शकतो. सगळ्या जगाशी तुसडेपणाने वागतो, शेजारी रडतोय तर रडू दे, रस्त्यावरून वुध्द आजोबा क्राॅसींग ओलाडंताना चाचपडत आहेत तर राहू द्या त्याला तसेच, गावाला आग लागली तर लागू दे. अशा वेळी माझं काही कर्तव्य आहे, हेच जो विसरतो, त्याला आपण माणूस मानतो का? नाही .

एकदा इसापाचा मालक झांथस इसापला म्हणाला, "मला नदीवर स्नानाला जायचे आहे. तेथे किती माणसे आहेत पाहून ये बरे. गर्दी असेल तर मी इतक्यात जाणार नाही." इसाप नदीवर जाऊन आला आणि म्हणाला,"महाराज तेथे एकही माणूस नाही." "घे तर मग माझे कपडे " असे म्हणून राजा नदीवर जायला निघाला. तेथे जाऊन पाहतो तो, नदीवर बरीच गर्दी होती. तेव्हा राजा इसापवर रागावला आणि म्हणाला, "काय रे,तू तर मला सांगितलेस की नदीवर एकही माणूस नाही!" इसाप म्हणाला, होय महाराज, मी जे सांगितले ते अगदी खरे आहे. हा पाहा, हा वाटेत एक मोठा दगड पडला आहे. येणार्या-जाणार्याला त्याची ठेच लागत आहे; पण कोणीही तो बाजूला सरकवीत नाही. ज्यांच्याजवळ माणूसकी नाही, जे दुसर्याचा विचार करीत नाहीत, त्यांना मी माणूस कसे म्हणू?" इसापने जे म्हटले त्यात काही चूक दिसत नाही.मग  माणूस कोण? असा प्रश्न आपल्याला पडतो.  ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी एक कथा सांगियली जाते, ती अशी आहे.

ईश्वराच्या मनात एकदा चैतन्याचं स्पूरण चढले. मग फार कष्ट करून त्याने पंचमहाभूते निर्माण केली आणि आपल्या घरी रात्री उशीरा पोहचला. आपल्या पत्नीला म्हणजेच शक्तीदेवीला आंनदाने माहिती दिली नतंर जेवण उरकून झोपी गेला. पण एक तासानंतर त्याला जाग आली. पुन्हा कामाला लागला. देवीने विचारले, हे काय विश्वभंरा, आपण झोप मोडून कामाला कसे लागलात?  ईश्वराने म्हटले, कालच्या पेक्षा आज भरपूर काम आहे आणि ते  बाहेर पडले. आता तर दुप्पट कष्ट घेतले आणि विविध झाडं, फूलं, पर्वत,दर्या-खोर्या, नद्या, समुद्र, डोंगर निर्माण केले.  विविध रंगीबेरंगी अशी सृष्टी तयार झाली. ईश्वर आपल्या घरी. परतला. आज तर स्वारी खुशीत होती. ईश्वराने आंनदाने सृष्टीचे वर्णन करून देवी कडून जेवण घेतले. झोपताना "आज मला चागंली झोप लागेल" असं म्हटलं देखील. कालच्या रात्री पेक्षा आज झोप चांगली लागली असे दिसू लागले. आज झोपून दोन तास झाले तरी त्याला जाग आली नाही. असे समजून देवी झोपण्याची तयारी करणार इतक्यात ईश्वर जागा झाला. आणि म्हणाला, देवी, मला आज फार ऊशीर होईल, असे म्हणून कामाला लागला. सृष्टी चांगली सजली होती, परंतु ईश्वराला तिच्यात हालचाल दिसत नव्हती. ईश्वराला हवी होती सृष्टीत movement. मग ईश्वराने विविध रंगाचे,विविध आकाराचे पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी, समुद्रांत, नद्यांत, सरोवरात विहार करणारे विविध प्राणी निर्माण केले आणि घरी परतला. आज ईश्वर फारच खुषीत होता. "सृष्टी सजली आणि चालती बोलती झाली, आनंद होणारच ". हे उदगार होते ईश्वराच्या अर्धांगीचे. आता माझे कार्य संपले असे म्हणत ईश्वर झोपी गेला. आज लगेच गाढ झोपली. परंतु चार तासानंतर जाग आली. देवीला झोपेतून ऊठविले आणि सांगितले, काम संपलं नाही. आता जे काम पुढ्यात आहे ते पूर्ण होण्यास अनेक वर्षे  लागतील. देवीलाही कळले. (ईश्वराचं एक वर्ष म्हणजे भूलोकातील सहस्त्र कोटी वर्षे). ईश्वर कामाला लागला. दिवस-रात्र कष्ट चालूच राहिले. कारण त्याला ह्या सृष्टीला सतत सृजन करणारा प्राणी निर्माण करावयाचा होता, नुसती movement करणारा नव्हे, तर improvement करणारा हवा होता आणि तो कसा असावा, तर सृष्टीला सृजन करीत करीत त्याचा म्हणजेच ईश्वराचा शोध घेईल. महत प्रयासा नंतर ईश्वराने हवा तसा प्राणी निर्माण केला. त्याचेच नाव आहे, मानव. 

जी सृजन होते ती सृष्टी. मानवाने समाज नावाची व्यवस्था निर्माण केली. त्यातूनच काही अलिखीत, काही लिखीत असे नियम बनले. त्या नियमाला अनुसरून एखादी व्यक्ती व्यवहार करते ती त्याची सहज प्रवृत्ती मानली गेली. त्या नियमाला न जुमानता स्वतःच्याच हिताला प्रधान्य देऊन दुसर्या व्यक्तीचे अहित करून एखादी व्यक्ती व्यवहार करते ती विकृती आणि विकृतीचं टोक गाठून अजूनही तसाच व्यवहार ती व्यक्ती करीत राहीली कि हळूहळू खाली पशुत्वाकडे पोहचते. ह्या उलट सामाजिक नियमांचं पालन करीत, आपल्या हिताचा त्याग करीत आपल्या हिस्साचं फळ दुसर्या समाजबांधवा साठी देतो तेव्हा प्रवृत्तीचं रूपांतर संस्कृतीत होते आणि  पुढे संस्कृतीच्या वाटेवर  निवृत्तीची वाट सुरू होत असते.  पण ती कोठून सुरू होत असावी याचा अंदाज बांधता येत नाही. पण ती वाट खडतर आणि प्रदीर्घच असते. तीच संताची वाट. तीच मोक्षप्राप्तीची वाट. तीच  पंढरीची वाट, जिथे जीवा शिवाची भेट होते.
 
सामाजिक भावना ज्याच्याजवळ ज्या प्रमाणात अधिक असेल, तो त्या प्रमाणात श्रेष्ठ मानला जातो. सर्व महापुरूषांच्या चरित्रांचे हेच सार आहे. आणि त्यांच्या श्रेष्ठत्वाचे हेच गमक आहे. तो महापुरूष प्राचीन असो की अर्वाचीन, पौर्वात्य असो की पाश्र्चिमात्य,तो आपल्या घरापेक्षा मोठा होतो, गावात, प्रांतात, देशात, आणि परदेशातही मोठा होतो. लोकांची दुःखे दुर करतो. त्यांना सन्मार्ग दाखवितो. प्रसंगी निंदानालस्ती,मानहानी सहन करतो. बस रामदास स्वामी ने म्हटल्याप्रमाणे "चंदनाचे परि त्वां झिजावें!". अशा मंडळींना माझे शतशः प्रणाम!.

गुरुवार, ११ मे, २०१७

व्यक्ती आणि समाज


मंडळी, पुष्कळदा संवादातूनही लिखाणासाठी विषय सूचतो, असे ऐकिवात आले आहे. राजेश खन्नाच्या चित्रपटातील एका गाण्यासाठी लागणारी चाल, नायक-नायिकेचं नृत्य, शूटींगचं ठिकाण, इत्यादी बाबी तयार होत्या आणि त्यावरून गीत तयार करण्याचे आव्हान गीतकारांसमोर होते. संगीतकारांच्या घरात बैठक संपली. गीतकारांना गाणं काही सुचलं नाही. गीतकार संगीतकारांना म्हणाले, अच्छा तो हम चलते है! संगीतकारांनी पृच्छा केली, फिर कब मिलोगे? असा संवाद झाला आणि गीतकार घरी गेल्यानंतर या संवादावरून गीत तयार केले. मराठीतील 'सखी चांदणी' ह्या अजरामर गाण्याचा जन्म संपूर्णतया वेगळा आहे. गीतकारांना गाणं सुचत नव्हतं आणि त्या कारणाने गीतकाराला रात्री झोप येत नव्हती. ते झोपेला आमंत्रण देत राहीले आणि तेच गाणं म्हणून स्विकारले गेले. अलीकडे माझ्या एका मित्राने "Your blog is gaining momentum" असा मेसेज मला पाठविला. मी त्याला आभार मानताना सहज म्हणालो, "आपण आपआपसात चर्चा करतो, त्यातूनही विषय सूचतात". मित्राशी बोलणं संपलं, माझं विचारचक्र सुरू झालं. बस त्यातून जे काही सूचत गेलं ते ते सारे लिहित गेलो. लेखाची व्याप्ती वाढत गेली. नंतर असे ठरविले जे काही लिहिलंय ते प्रत्यक्ष आपल्या पर्यंत पोहचवावे ते टप्प्याटप्प्याने. आपण स्वागत कराल अशी आशा बाळगतो.

लिखाणासाठी आधी शब्द सूचतात कि विषय? थोडया वेळासाठी वाटलं, विषय सुचला तरच लिखाण करू शकतो. लगेचच मनातल्या मनात म्हटलं, आपआपसांत चर्चा करतो, तीही आपल्या वाणीद्वारें बाहेर येणार्या शब्दातूनच की. आपण आपल्याशी बोलत असतो ते ही परा नावाच्या वाणीच्या साहाय्यानेच. चीनमधील तत्ववेत्ता कनफ्युशस म्हणतो "शब्द हा आत्म्याचा उद्गगार आहे". ज्ञानेश्वर महाराज, वाड़ःमयरूपी श्री गणेशाचे वर्णन करून, ज्ञानेश्वरी ग्रंथात सुरवातीलाच शब्दब्रह्माला नमन करतात. "हे शब्दब्रह्म अशेष| तेचि मूर्ती सुवेष||". तुकाराम महराजांनीही म्हटले आहे, "तुका म्हणे पहा,शब्दाचि हा देव| शब्देंचि गौरव, पूजा||"

शब्द म्हणजे साक्षात ईश्वराचं रूप. असं म्हटलं जातं, कि भगवान शंकराने डमरू वाजविला. त्यातून "ॐ" असा ध्वनी निघाला. तेच नादब्रह्म आणि तेच ते अ ऊ म हे शब्दब्रह्म. मानवाने हे ईश्वरी रूप प्रथम अनुभविले ते आपल्या वाणीतूनच. पुढे ते क्रमशः अक्षरातून, म्हणजे लेखणीतून अनुभवयास सुरूवात झाली.मग छापखाने आले, शब्द छापून येऊ लागले, आता तर संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून शब्दांची भेट होत आहे. लेखनाची माध्यमे बदलत गेली. लेखनासाठी विषयाची सूची वाढत आहे. आजचा काळ झपाट्याने बदलत आहे. असे असुनही, लेखनासाठी लागणार्या विषयाचा उगम आजपावेतो मानवाच्या मेंदूतून आणि मनातील भावविश्वातून होत आहे. पुढेही ही क्रिया अशीच राहिल, असे वाटते. हे आपण शरीर विज्ञानात शिकलो आहे. समाज, आसपासचा परिसर, सृष्टीत घडणार्या घटना, निसर्ग व मानवामधलं नातं ह्या गोष्टी लेखनाचे स्त्रोत आहेत आणि भविष्यातही तेच स्त्रोत राहतील. असे वाटते. ह्याचं कारण या सृष्टीत सर्वात अधिक संवेदनशील प्राणी कोण आहे तर त्याच उत्तर निःसंदिग्धपणे 'मानव' हेच आहे. त्यामुळे आसपासचा परिसर, समाज ह्यांच्यासह राहणे हे त्याच्यासाठी नैसर्गिक आहे.

माणसाला समाजात राहायला आवडणं, हे आपण नैसर्गिक  मानलं. पण समाज म्हणजे काय? आणि निसर्ग म्हणजे काय? ह्या दोन्ही प्रश्नापैकी निसर्गाबाबतची व्याख्या अतिविस्तिर्ण      आहे. एका वाक्यात उत्तर  द्यावयाचे असेल तर    "पंचमहाभूताचा समुदाय" हेच होय. अंबामातेच्या स्तवनात म्हटले जाते "मेळोवोनी पंचमहाभूताचा मेळ, अंंबे त्वां रचिला  गोळ!" अशा ह्या पंचमहाभूतांची आपल्याला अनुभूती येत असते. त्यामुळे आणखिन खोलात जाऊन त्याविषयी चर्चा नको करुयात. निसर्गातील अगदी मेघांचा गडगडाट असो वा त्या पाठोपाठ आकाशात दिसणारे वीजेचे लोळ असो, वा अती वेगाने आणि तेही चक्रगतीने घोंघावणारे वादळ, सागराला येणार्या उंच उंच लाटा, अक्राळविक्राळ प्राणी, त्यांच्या भयंकर आरोळ्या आणि तसेच निसर्गातील न उलगडलेली रहस्यें, यामुळे असुरक्षिततेची भावना अष्मयुगापुर्वीपासूनच मानवामध्ये होती आणि त्यातूनच समूहामध्ये मानव राहू लागला. हा इतिहास आहे. समूहातून समाजाची निर्मिती आणि मग पुढे प्रगती होत होत जगात सर्वत्र प्रगत समाज(Civilized Society) निर्माण झाले. जगभरातील अनेक विद्वानांनी समाजाच्या व्याख्या केल्या आहेत. त्यापैकी प्लेटोने म्हटले आहे, "मानवाच्या विविध गरजा व त्यांच्यी पूर्ती स्वतःच करण्याविषयीची त्याची असमर्थता या दोन कारणांमुळे समाज निर्माण झाला असावा". तर अॅरिस्टाॅट्लने, ती माणसाची उपजतप्रवृती असे मानले. आपल्या येथील ऋषीमूनीपासून ते संतांपर्यतांच्या महापुरूषांनी ह्यासंबंधी जे काही म्हटले आहे, त्याच सार एका वाक्यात सांगावयाचे, तर "सृष्टीमाजी जितुकी शरीरे, तितुकी भगवंताची घरे " हाच समाज.

आपल्याला काय हवयं ह्याची जाणीव होणे, आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे हे मानवाचं वैशिष्ट्य आहे. त्यातून समाजाच्या गरजा, त्रूटी तसेच मानव आणि निसर्ग हयामधील नातं काय आहे हे ही त्याला कळत गेलं असावं. समाजातील लोकांच्या ठायीं अंगभूत गुणवैशिष्ट्येही विभिन्न असतात. त्यामुळे समाजातील काही लोक आपल्या अगंभूत गूणांच्या आधारे समाजाच्या ऐहिक, गरजा पूर्ण करण्याचं काम हातात घेतात, तर कोणी वैचारिक गरजा पूर्ण करण्याचा कार्याला लागतात. आणखिन काही लोक भावनिक गरजा पुर्ण करण्याचं काम हाती घेतात. ऐहिक गरजा ह्या बहुतांशीं विविध वस्तूच्यां उपयोगातून वा उपभोगातून पूर्ण होतात. त्यामूळे ज्या लोकांमधला अंगभूत कल वस्तूनिर्मितीकडे असतो, त्यातून लघु उद्योगपती, मोठे उद्योगपती, व्यापारी, कारागिर, ठेकेदार, बिल्डर, औषधी उत्पादक, टूर्स अॅन्ड ट्रॅव्हलवाले, ट्रान्स्पोर्टवाले, हाॅटेलमालक, इत्यादी मंडळी उदयास आली असावीत. ह्यांना Entrepreneurs असेही म्हटले जाते आणि ज्या लोकांना सेवा निर्मितीचे अंग प्राप्त झाले आहे, त्यातून शास्त्रज्ञ, डाॅक्टर,कवी, लेखक, कलाकार, चित्रकार, शिल्पकार, शेतकरी, वकील, प्राध्यापक, चार्टड अकौंटंट, प्राध्यापक, प्रवचनकार, किर्तनबूवा प्रबोधनकार ही मंडळी उदयास आली असावी. हा माझा ढोबळ अंदाज आहे असेच समजावे. ह्या बाबतीत अधिक तार्किक दृष्टया खुलासा मानसशास्त्र, समाजशास्त्र, तसेच मानववंशशास्त्रातील तज्ञ मंडळीच करू शकतात.

माणसाच्या गरजा ह्या भौमैतिक पध्दतीने वाढत असतात. कूठलीही एक नविन सुविधा येते, तिच्यासंगे नवीन असुविधाही येत असते. त्यामुळे व्यक्ती, मग ती श्रीमंत असो, वा गरीब,पुरूष असो वा स्त्री, सदाकाळ सुखी राहिल ही गोष्ट असभंवनीय वाटते. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात "जगी सर्व सुखी असा कोण आहे". पण मग सुखी होण्याचा मार्ग काय? समर्थांनीच उत्तर दिलयं, "विचारे मना तूची शोधून पाहे| मना त्वाची रे पूर्वसंचीत केले| तयासारिखे भोगणे प्राप्त झाले||". पूर्वसंचीता प्रमाणे भोग म्हणजे नेमकं काय? मागच्या जन्मीचे पाप पुण्य वगैरे म्हणण्यापेक्षा माणूस म्हणून समाजात तुम्ही कसे वागता ह्यालाच तुमचे संचित म्हणावे. पाप काय नी पुण्य काय त्याच्या परीभाषा समाज हितानुरूपच ठरविलेल्या दिसतात. म्हणूनच माणसाने समाजाची चिंता केली पाहीजे. समाजाला दु:खी ठेवून तो एकटा सुखी होऊ शकणार नाही. त्याच प्रमाणे व्यक्तीला दु:खी ठेवून समाजही सुखी होऊ शकणार नाही. शरीरामधे ज्याप्रमाणे हृदयाकडून अवयवांकडे आणि अवयवांकडून हृदयाकडे रक्ताचे अखंड अभिसरण सुरू असते, त्याच प्रमाणे समाजाकडून व्यक्तीकडे आणि व्यक्तीकडून समाजाकडे सुखांचे, इच्छा-आकांक्षांचे, विचारांचे,तत्वज्ञानाचे आणि ध्येयवादाचे अभिसरण होत राहिले पाहिजे. या परस्पर आदान-प्रदानावरच मानवी समाजाचे सुख अवलंबून आहे.

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...