लेखमालिकेचे शिर्षक वाचून आपला गैरसमज होईल म्हणून प्रथम आपल्या समोर नम्रतेने एक निवेदन करतो की, मी एक सामान्य भाविक आहे. तसेच मी एक सामान्य काव्य व संगीत प्रेमी आहे. त्यामूळे या लेखमालिकेतून महर्षी वाल्मीकी रामायणवर एखाद्या गाढा अभ्यासकांच्या शैलीतले प्रवचन, विश्लेषण आणि गीतरामायणावर एखाद्या ख्यातनाम साहित्यकार, कवी संगीतकार, गायक व कलाकारां च्या मुखातून येणारें लयबध्द, मंत्रमुग्ध रसग्रहण दिसणार नाही. तसेच रामलीलाचा अनुभव प्रत्ययास येणार नाही. श्रीरामजन्मभूमी अयोध्या मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची घोषणा झाल्यावर देशभर झालेल्या राममय वातावरणा मुळे मला श्रीरामायण संबंधीत काहीतरी लिहावे अशी इच्छा झाली. अशीच इच्छा आमचे परम मित्र परागजी कुळर्णीनें ही जानेवारी महिन्याच्या पहिल्या सप्ताहास मांडली होती. आपण सुजाण वाचक आहात. इच्छा आणि प्रेरणा यातला फरक आपण जाणत आहात. म्हणून अधिक काय सांगावे ?
रविवार दिनांक २१ जानेवारी २०२४ ला नाळासोपारा (प ) आमच्या गावी पंचक्रोशीतल्या निर्मळ तीर्थक्षेत्री शंकराचार्य समाधी मंदिराच्या पटागंणात स्वर सामवेद या संस्थेतर्फे
गीतरामायणाचा कार्यक्रम झाला होता. मला कार्यक्रम फार आवडला. त्याची पाच कारणें आहेत.
१)पहिले कारण असे की प्रत्येक माणसाला आपली माय, मायबोली आणि मातृभूमी प्रिय असतात.
२)महर्षी वाल्मीकी रामायण जितके प्रिय व अभिमानाचे वाटते तितकेच गीतरामायण ही आपल्या सर्वांना अभिमानस्पद व प्रिय आहे.
३) कारण ते शब्दसम्राट ग. दि. माडगुळकरांनी रचलेले आणि स्वरसम्राट बाबूजी उर्फ सुधीर फडकेंनी स्वरबद्ध केलेले आहे.
४) गीतरामायणात समुह गीतांचा ही समावेश आहे. समुहात राहणे हा मानवाचा स्वभाव आहे. त्यातून पोवाडे, आरती, आवर्तने, प्रार्थना इत्यादी समुहात म्हणणे ही आपली नैसर्गिक गरज झाली. म्हणजेच गीत-संगीत आपला श्वास आहे. कारण हे विश्वच नादब्रह्म आहे.
४) वाल्मीकी ऋषी हे आदि कवी होत आणि रामायण या भूतलावरील संस्कृत मधील म्हणजेच या जगातले पहिले महाकाव्य आहे.
५) आपल्या साठी सर्वात महत्वाचे म्हणजे आजच्या चंगळमय दुनियात महाराष्ट्रातल्या गावा-गावात युवक-युवती आपल्या गोड आवाजात गीतरामायणाचे प्रयोग करीत आहेत. ही बाब आपल्याला अमूल्य असे समाधान देत आहेत.
दुसर्या दिवशी सोमवार २२ जानेवारी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दिवस. रात्री गीतरामायणावर लेख लिहावा असे वाटले. पण मनाची घालमेल थांबत नव्हती. याचे कारण असे की मूळात रामायण या ग्रंथाचे नायक रामचंद्राचे उदात्त चरित्र, त्यात ते काव्य मनोहर स्वरूपात आणले ते आदिकवी महर्षी वाल्मिकीनीं व गात आहेत कुशाग्र बुद्धीचे, मधुर कंठ असलेले, रामचंद्राचे प्रत्यक्ष सौंदर्याचे पुतळे असेलेले लव-कुश. हे चित्र डोळ्यासमोर समोर येत होते. अजरामर असलेल्या वाल्मीकी रामायणाचे मराठीत रूपातंर झालेले गीतरामायण ही अजरामर झाले आहे. गीतरामायण ऐकताना मी फार भावूक होतो. संत ज्ञानेश्वर महाराज, तुकारम महाराज, चोखाबा, इत्यादींचे चरीत्र वाचतांना ही मी भावूक होतो.
काही वर्षापुर्वी (वर्ष आठवत नाही) जेष्ठ समाजसेवक नानाजी देशमूख काही कामानिमित्त बोरीवली- दहिसरला आले होते. त्यांच्या या दौर्यात दहिसरच्या समाज कल्याण मंदिरात त्यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजीत केला होता. त्यावेळी त्यांनी 'आम्ही वनवासी रामाची भक्ती करतो' असे वाक्य उच्चारून वनवासी रामावर सुदंर व श्रोत्यांच्या हृदयाला स्पर्श करणारे व्याख्यान ऐकीवले होते त्यांची आठवण ही मला या आठ दिवसात झाली होती. पण प्रश्न समोर उभा होता, तो म्हणजे जागतिक दर्जाचे या महाकाव्यावर लेखमालिका हाती घेण्याचे धाडस होत नव्हते. शेवटी रामभरोसे ही लेखमालिका सुरू केली. पुढचे पुढे बघू या.
माझ्या ब्लाॅगवरील सन २०१७ पासून लेखांचे एडिटींग व पब्लीश करण्याचं काम माझा मुलगाच करीत असतो. त्याने दोन वेळा गीतरामायणाचे सुत्र संचालन केलेले आहे. हा एक प्लस पाॅईंट माझ्यासाठी आहे आणि सोबत तुम्ही वाचक मला सांभाळून घ्याल अशी आशा ही आहे.
या लेखमालिकेच्या विषयाला, नाही म्हटले तरी श्रीरामजन्मभूमी मंदिर अयोध्या संबधीत झालेला संघर्ष व त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या अलिकडील निकालाची पार्श्वभूमी आहे. त्याबद्दल थोडीफार माहिती प्रथम मांडावी असे मला वाटले. कारण असे की ' श्रीरामजन्मभूमी मंदिर अयोध्या ' या राष्ट्रीय विषयावर मी काही लेख ब्लाॅगवर लिहले आहेत. त्यामुळे या लेखमालिकेची सुरूवात करायला माझा आत्मविश्वास वाढला आहे. अर्थात त्यातून श्रीरामायण महाकाव्य, श्रीराम, श्रीरामजन्मभूमी अयोध्या समस्या या संबधीत थोडाफार माहित झालेला इतिहास, या विषयाचे महत्व, इत्यादी गोष्टी अर्थातच काही पुस्तकांचा संदर्भ घेऊन आपल्यासमोर मांडतो आहे. त्यामुळे पहिल्या तीन भागांचा विस्तार ही वाढलेला असेल तसेच तीन-चार छोट्या परिच्छेदांत राजकारणाला स्पर्श झालेला आहे. त्याबद्दल मी आपल्या कडे क्षमायाचना करतो.
श्रीमद्वाल्मिकी- रामायण हा आपल्या देशाच्या वाड्:मयातील एक सर्वोत्कृष्ट ग्रंथ आहे. रामायणाचा प्रसार आपल्या देशाच्या प्रत्येक प्रान्तीय भाषेत रूपांतर होऊन प्रसार झाला आहे. भारताबाहेर श्रीलंका, नेपाळ, ब्रह्मदेश, इंडोनिशिया, कंबोडीया, लाओस, थायलंड, फिलीपाईन्स, चीन, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, मंगोलिया इत्यादी आशियायी देशांमध्ये झाला आहे. या शिवाय मूळ रामायणाचे रूपांतर केवळ विविध भाषा, साहित्य लेखन या माध्यमांपुरता मर्यादित न राहता याचे प्रगटीकरण अनेक प्रकारच्या कला माध्यमातून ही झालेले आहे. उदाहरणार्थ ख्वेर नृत्य, रंगभूमी, केरळ व लक्षद्विप मधील मुस्लिमांची माप्पीला गीते, तसेच कर्नाटकातील यक्षगान, नृत्यें यात ही रामायणातील प्रसंगावर आधारीत चित्रातून ही प्रगटीकरण झाले आहे.
कांबोडीयाला कांबोज किंवा कंबूज असे ही म्हणतात. याची स्थापना स्वायंभुव मनुने केली असे समजले जाते. या देशाची राजधानी नाॅम्पेन आहे. या ठिकाणी संस्कृत भाषेत सहस्त्रावधी शिलालेख सापडले आहेत. येथील भाषेवर संस्कृत आणि पाली भाषेचा प्रभाव आहे. येथील विराट सभागृहाच्या भितींवर इ स १२०० मध्ये सम्राट द्वितीय सूर्यवर्मन यांच्या कारकिर्दीत रामायण तसेच महाभारत मधील दृष्यें अंकित केली आहेत. येथील साहित्यात रामायण हे रामकिर्ती या नावाने प्रतिष्ठीत झाले आहे.
सायबेरिया हा आशियाच्या अति उत्तरेला असलेला देश. त्याला प्राचीन भारतीय साहित्यात शिबीर देश म्हणून गणला जात असे. हा देश संपुर्णतया हिमाच्छादित आहे. त्या ठिकाणी मंगोलियाच्या क्षेत्रात तसेच रशियामधून वाहणार्या व्होल्गा नदीच्या किनार्यावर प्रभू रामचंद्राचे चरित्र ऐकवले जात असे त्याचे नाव रामन-खागान असे आहे, म्हणजेच राजा रामाची कथा. या कथेचा सारांश असा आहे की ' जनतेच्या नेत्याने क्षूल्लक अशा आनंदात मग्न होऊ नये, विषयलंपट होऊ नये. लोभात पडल्यानेच प्राचीन काळी राक्षस राजा रावण लंकेत मारला गेला.' हजारो वर्षापासून मंगोलियन व सैबेरियन-रशियन लोकांमध्ये राम कथा वाचली जाते तसेच सांगितली ही जाते. हे एक प्रकारचे पारायण होय. खगोल शास्त्राचे अभ्यासक प्रफूल मेंडकी यांनी 'रामायणाचा खगोल शास्त्रीय शोध' या पुस्तकात रामायणाची कथा सहा हजार वर्षे जुनी असू शकते असे म्हटले आहे.
क्रमशः-
जय श्रीराम !