रविवार, २० ऑगस्ट, २०२३

ओम् स्वतंत्रते भगवती नमः |


बृहनमुंबईच्या उपनगरातील मालाड (पश्चीम) येथे  संत तुकाराम साल्वेस्टर मिशन नावाची शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारी एक अग्रणी संस्था आहे. मालाड(प)येथे मराठी आणि इंग्लीश माध्यमाच्या पुर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक विभागाच्या अशा एकूण सहा शाळा आहेत. तसेच बोरीवली (प) आणि विरार (प) येथे अशा दोन मराठी माध्यमाच्या शाळा आहेत. ही संस्था दर वर्षी ५ ऑगस्ट रोजी वर्धापान दिन साजरा करीत असते.  या संस्थेच्या बोरीवली (पश्चीम- वझिरा) येथील आनंदराव पवार शाळेच्या सचिव पदाची जबाबदारी माझ्यावर आहे. मी त्या कार्यक्रमात उपस्थित होतो. कार्यक्रम नीट-नेटका होता. मला फार आवडला. 
तिथे काही नव्हते भंपक | 
होते ते सारे मंगल आणि रंजक || उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी देशाच्या स्वातंत्र्य अमृतोत्सवानिमीत्त आपल्या देशाची वाटचाल  या विषयावर उस्फूर्त  निबंध लिहीण्याची स्पर्धा पार पडली. निबंधाचा हा विषय यथोचित होता. मला फारच आवडला.

शुक्रवार ११ऑगस्ट २०२३ ला विश्व संवाद केंद्र, कोकण प्रान्त तर्फे आयोजित  समान नागरी संहीता या विषयावर ॲडव्होकेट अंजलीताई हेळेकर यांचे ऑनलाईन व्याखान ऐकले. हा विषय तसा क्लिष्ट. पण सध्या जनसामान्यांची उत्सुकता आणि रूची वाढती आहे. अंजलीताईने हा विषय आपल्या ओघवत्या शैलीत सोपा करून मांडला. या शिवाय व्याख्यान संपल्यावर उपस्थितांकडून प्रश्न घेत समर्पक उत्तरे दिली. त्यामुळे चार-चौघात सहजपणे या संबंधी चर्चा करू शकतो असा आत्मविश्वास श्रोत्यांना नक्कीच आला असावा. समान नागरी संहीता ही बाब विवाह, घटस्पोट, दत्तक विधान, धार्मिक कायद्यातील तफावत, वारस हक्क, सोशल वेलफेअर इत्यादी बाबीशी निगडीत आहे. त्यावर लाॅ कमीशन कडून जनमत घेतले जात आहे. त्यासंबंधी  स्वतंत्रपणे आपण चर्चा करणार आहोत. पण --- 

स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या संकल्पना आपण उसन्या घेतल्या आहेत हे तितकसं पटत नाही. आपल्या देशात  वैदिक काळापासून समानो मंत्रः समितीः, समानी व आकृतिः आणि ओम सहनाववतु इत्यादी प्रार्थना स्वरूपात आज ही म्हटल्या जातात. वसुधैव कुटुम्बकम् हे संस्कृत बोधवचनाचा आपल्या येथे किर्तन प्रवचनांपासून तसेच सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात मुक्त कंठाने उपयोग केला जातो. इतकेच नव्हे तर राजकीय पक्षांच्या प्रचारसभांत ही उपयोग होत असतो. वसुधैव कुटुम्बकम् या संस्कृत वचनाचा मूळ संदर्भ स्त्रोत हा महाउपनिषद् नावाच्या उपनिषादात येतो. या वचनाचा श्लोक असा आहे - अयं बन्धुरयन्नेति गणना लघु चेतसाम् उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ||याचा अर्थ आहे " हा माझा बंधू आणि हा नाही असा विचार संकुचित किंवा क्षुद्र बुद्धीचे लोक करतात. उदार चारित्र्याचे लोक (अर्थातच हिंदू) संपूर्ण पृथ्वी(वसुधा) हेच कुटुम्ब मानतात.

कायद्यापुढे सर्व समान असे बोल आपल्या मुखीं आणि आपल्या कानीं सहजपणे आणि सराईतपणे येतात. आपल्या संस्कृतीत आपण सारें ईश्वराची लेंकरे आहोत अशी धारणा वैदिक काळापासून प्रचलीत आहे.  समान नागरी संहिता हे जितकं लोकशाही व्यवस्थेचं व्यवच्छेदक लक्षण आहे तितकचं ते एक मानवी जीवनमूल्य आहे अशी आपली धारणा आहे. म्हणून शाळेत प्रार्थना सोबत जीवनमुल्यावरील कथा आणि चर्चेसाठी वेळ ठेवण्याचा प्रघात सुरू झालेला असावा. 

रविवार १२ ऑगस्टच्या रात्री विश्व संवाद केंद्राच्या साईट वरून अखंड भारत या विषयावरचा लेख वाचला. लेख इतका अभ्यासपुर्ण आहे की वाचताना हा एक अप्रतिम ऐताहासीक दस्तऐवज आहे अशी पदोपदी धारणा होते. या तिन्ही गोष्टी म्हणा वा प्रसंगातून मला लिखाण करण्याची प्रेरणा मिळाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त काही लिखाण केले नाही अशी माझ्या मनात खंत निर्माण झाली होती. तीच उफळून येत आहे असे जाणवले. त्यातून स्वातंत्र्य आणि लोकशाही या दोन मोठ्या जीवनमुल्यांवर चर्चा करता करता छोट्या छोट्या जीवनमुल्यांचे ही उकल होईल असा मी अंदाज बांधला. अर्थात यात कितीपत यश मिळेल हे या घडीला सांगता येत नाही. पण प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. आपण वाचक मित्र सांभाळून घेतील आशा बाळगुन आपल्या समोर आलो आहे.

सोमवार १४ ऑगस्ट  २०२३ चा दिवस उजाडला. पण माझी संभ्रम अवस्था संपली नाही. ७६ वर्षापुर्वी मध्यरात्री पर्यंत आपला देश अखंड हिंदुस्थान होता. दिनाक १५ ऑगस्ट १९४७ साली मध्यरात्री दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ब्रिटीश राजवटीचा युनियन जॅक खाली उतरविला आणि स्वतंत्र भारताचा  तिरंगा ध्वजाहोरण झाले. आपल्या  दुर्दैवाने देशाची फाळणी झाली होती. फाळणीचे शल्य टोचत होते.  मुस्लीम बहूल प्रान्ताचं पश्चिमेला आणि पुर्वेला बंगाल प्रान्ताला जोडून इस्लामिक रिपब्लीक पाकिस्तान नावाचा  देश उदयास आला.  दुसर्या महायुद्धात पराभूत झालेल्या जर्मन देशाची फाळणी झाली होती. पण दोन्ही जर्मनी देश एकत्र आले. आपला देश पुन्हा अखंड स्वरूपात पाहावयास मिळेल का ? या प्रश्नाने मन पुन्हा अस्वस्थ झाले.

मंगळवार १५ ऑगस्ट २०२३ उजाडला. आपल्या  देशाचा ७७ वा स्वातंत्र्यदिन ! सर्वत्र आनंदाने साजरा झाला. सकाळी आमच्या आनंदराव पवार शाळेत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात गेलो होतो. दर वर्षी आमच्या शाळेतून शालान्त परीक्षेत ज्याने पहिला क्रमांक पटकाविला त्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण होत असते. या वर्षी अमृता कांबळे या विद्यार्थीनीच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अमृता कांबळे शाळेतून पहिली आलीच पण शालान्त परीक्षा बोर्डाच्या बोरीवली-कांदिवली मराठी माध्यमाच्या विभागात ही तिने ९७-७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमाक पटकाविला आहे. ध्वजारोहणा नंतर एका पाठोपाठ एक  डोळ्याचे पारणे फिटावे असे कार्यक्रम विद्यार्थ्यानी सादर केले. आजी-माजी विद्यार्थी आणि पालक वर्ग सकाळी ७ वाजल्यापासून उपस्थित होते. उशीर झाला होता. शेवटी उपस्थित विद्यार्थी- पालक वर्गाला शुभेच्छा देऊन कार्यक्रम संपला. संध्याकाळी घरी देशभक्तीपर गाणी ऐकत होतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांची                                  ' जयोस्तु ते  श्रीमहान्मंगले शिवास्पदे शुभदे | स्वतंत्रते भगवति त्वामंहम् यशोयुतां वंदे || ' ही कविता ऐकली आणि या लेखाचं शिर्षक गवसले.    "||ओम् स्वतंत्रते भगवती नमः ||"

या लेखाचे नाव बोलण्यासाठी आणि ऐकण्यासाठी सोपे आहे. पण इतिहासातून या देवतेचं यथार्थ स्वरूप मांडणे हे माझ्यासाठी अशक्यप्राय आहे. याची मला जाणीव आहे. पण गेल्या काही महिन्यात देशात विशेषतः आपल्या महाराष्ट्र राज्यात रोज घडणार्या तथाकथीत राजकीय भूकंप, व दोन्ही पवारांची पाॅवर संबंधीत झालेल्या घालमेलाच्या बातम्यामुळे तो विषय सोडून वेगळ्या विषयावर लिहावे असा पर्याय शोधत होतो, तो प्राप्त झाला. हा पर्याय साधासुधा नाही. प्रयत्न सुरू केले की थोडंफार यश पदरात पडेल अशी आशा आहे. अशा लेखांत राजकारणातल्या दैनंदिन घटना, तसेच सामाजिक, आर्थिक, कला- क्रिडा इत्यादी क्षेत्रातील  घडामोडीचा समावेश नसेल. तसेच हा विषय गहन ही आहे. पुर्णपणे अभ्यास करून लेख लिहावे लागतील. म्हणून या मालिकेत जे लेख पब्लीश होतील ते सलगतेने होणार नाहीत. हे प्रांजळपणे कबूल करून ठेवतो. आपण नेहमीप्रमाणे  अशा लेखांना ही आपलेसे करून घ्याल अशी आशा आहे. 

स्वतंत्रता ही प्रायः सर्व  प्राणीमात्रांना प्रिय असते. कुठल्याही पक्षी वा पशूला मानवाने तयार केलेल्या पिंजरात अडकण्याची भिती असतेच. बालपणी आकाशात उडणारे पक्षी पाहून आपल्याला ही पंख असते तर आपण ही आकाशात स्वैरपणे विहार केला असता असे वाटत असे.जंगलात वाघ, सिंह सारखे हिस्त्र पशू स्वैरपणे हिंडत आपल्या ताकदीच्या जोरावर भक्ष्य मिळवित असल्याच्या कथा ऐकताना किंवा वाचताना, अशा प्राण्यांचा ही हेवा वाटत असे. शाळा नाही, होमवर्क नाही, आई-वडील शिक्षकांचा धाक नाही, अशी स्वतंत्रता आपल्याला असती तर, पण--

जसे आपण मोठे होत जातो तेव्हा लक्षात येते की या पशू-पक्ष्यांपाशी बुद्धी नाही. त्यांच्याकडे उद्यासाठीचं भक्ष्य वा अन्न साठविण्यासाठी फ्रिज नसतात. तिथे कोणी राजा नसतो आणि प्रजा नसते. बळी तो कान पिळी हाच जीवनाचा धर्म. अनेक पक्ष्यांना आणि प्राण्यांना सतत मरण्याची भिती सतावत असते. कारण  ' जीवो जिवस्य जीवनम् ' हा या मानवेतर जगातला मुख्य नियम आहे.  तिथे पक्षी आपल्या पिल्लूंना आकाशात कसे उड्डाण करावे असे शिकवित नसतात. सिंह आपल्या छाव्याला शिकार कशी करावी याचे शिक्षण देत नसतो. गुरू-शिष्य व्यवस्था फक्त माणसात असते.  पशु-पक्षांचा कळप व थवा असतो. तर माणसासाठी समाज व्यवस्था असते. पशु-पक्षांचे जीवन सामुदायिक असते तर माणसाचे जीवन सामाजिक असते. माॅन्टेस्क नावाच्या पाश्चात्य विचारवंताने म्हटले आहे की  Man is a social  being formed to enjoy in society. "  मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. तो समाजात असला म्हणजे त्याला प्रसन्न वाटते. सुखाचा खरा आनंद त्याला समाजातच मिळतो. हा मनुष्य स्वभाव आहे. हाच माॅन्टेस्क यांच्या व्याख्याचा भावार्थ आहे ". म्हणून त्यांच्या व्याखेला अधिक मान्यता मिळाली. 

इतर अनेक पाश्चात्य विचारवंतानी  समाज  या शब्दाच्या आपआपल्या परीने अनेक उपपत्ती सांगितल्या आहेत. त्या बहुतांशी भौतिक सुखाला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या आहेत. त्यात गैर काही नाही पण स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार माजतो. सुख, मग हव्यास पुढे नशा त्यातून नैसर्गिक संपत्तीचे नुकसान, शेवटी व्यक्ती बेताल, समष्टी गोंधळात आणि सृष्टी प्रदुषणात, शेवटी सर्वनाश मग उरते काय? नरेची केला नर किती हीन ! हिंदी चित्रपटातले एक गीत आठवले. " देख तेरे संसारकी हालत क्या हो गयी भगवान | कितना बदल गया इन्सान." 

आपल्या भारतवर्षातील ऋषीमुनींनी समाज म्हणजे ईश्वर आणि ईश्वराचे वर्णन करतांना प्रचंड विराट पुरूषाचे चित्र रेखाटले आहे :--  

ओम सहस्त्रशिर्षः पुरूषः सहस्त्राक्षः सहस्त्रपात् || स भुमीं विश्वतो वृत्वात्य-तिष्ठद्दशांगुलम् || " याचा असा अर्थ -- त्याला हजारो मस्तके आहेत, हजारो डोळे आहेत आणि हजारो चरण आहेत. सकलप्राणी रूपाने अनंतशः अनंत अवयव धारण करणारा विराटसंज्ञक पुरूष ब्रह्मांडास सर्व भागी व्यापून दहा अंगुळे उरलाच आहे असा तो परमेश्वर सर्वभूतांतरात्मा आहे. म्हणून माझा आणि सगळ्या समाजाचा, संपुर्ण सृष्टीचा अत्यंत आत्मियतेचा संबंध आहे. सगळं जग माझे आहे व मी सगळ्या जगाचा आहे. ही भावना आपल्याकडे अनादी काळापासून जोपासली जात आहे, त्यांत खंड पडला नाही. आपल्या संस्कृतीच्या या अभूतपुर्व वैशिष्ट्याचं जगातील बहुतांश विचारवंतांनी कौतूक केले आहे.

ग्राम पातळीवर ग्रामपंचायत नावाची राजकीय व्यवस्था आणि समाज व्यवस्था असते, तर शहरात  महापालिका असते व हाऊसिंग सोसायट्या असतात.  राज्य पातळीवर राजकीय व्यवस्था म्हणजे विधानसभा आणि राज्य सरकार असते तर देशपातळीवर लोकसभा आणि केंद्र सरकार असते. या शिवाय न्यायालय आणि अनेक एजन्सीस असतात. मी स्वतंत्र आहे पण इतका नाही की ग्रामपंचायतने केलेल्या  नियमाची मी पायमल्ली करेन; मी ज्या शहरात राहतो तेथील महापालिकीचे नियम मला पाळणे आवश्यक असते; राज्यस्तरावर राज्य सरकार ने तसेच देशपातळीवर केंद्र सरकारचे नियम आपल्या पाळावे लागतात. यातच स्वातंत्र्याचा आनंद सामावलेला असतो.

स्वातंत्र्य दिन असो वा प्रजासत्ताक दिन हे दोन्ही राष्ट्रीय उत्सव आहेत. आपल्याला स्वांतत्र्यचा व्यापक अर्थ कळावा व त्याचे भान ठेवून प्रत्येक नागरिकाने आपले आचारण ठेवावे हा हेतू साध्य व्हावा म्हणून हे उत्सव आपण साजरे करीत असतो.

 तसेच अहिंसा व सत्याग्रह ही दोन शस्त्रे हाती घेतलेली नेतेमंडळी, सशस्त्र क्रान्तीमार्ग स्विकारून प्राणाची आहूती देणारे स्वातंत्र्यसैनिक आणि ज्यांनी देशाचे संविधान तयार केले त्या घटना समितीचे सदस्य, संत मंडळी इत्यादी थोर पुरूषांच्या प्रती कृतज्ञता कायम राहावी आणि त्यातून देशाचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याची क्षमता आपल्यात कायम राहावी इत्यादी हेतू ही या दोन्ही उत्सवाच्या माध्यमातून साध्य होत असतात.

वस्तुतः आपला देश हजार वर्षे परवशतेच्या पाशात अडकलेला होता.  म्हणून मध्ययुगात वेळोवेळी परकीय आक्रमकांशी कडवी  झुंज ज्यांनी दिली ते ही स्वातंत्र्यसैनिकच होत. त्यात काही ठिकाणी पराभव झाला, तर काही ठिकाणी विजय मिळविला. तो आपल्या समाजाचा होता असे मानून ते ही राष्ट्रपुरूषच होते असे प्रान्त, भाषा, जात व धर्म असा भेद सोडून मानणे हा आपला स्वभावधर्म व्हावा, हा ही स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक साजरा करण्याचा आणखिन एक उद्देश असतो.  देशातील थोर पुरूषांनी आपआपल्या क्षेत्रात दाखविलेल्या पराक्रमाची केवळ थोरवी गाऊन आपले कार्य वा कर्तव्य संपले असे मानून चालणार नाही.त्यासाठी --

प्रत्येक नागरिकाने आपले शरीर कणखर बनविणे आवश्यक आहे.  बलोपसनेची गरज असते. बलोपसना म्हणजे दैनंदिन जीवनात काही यम-नियम आहेत ते ही पाळणे आवश्यक असते. शरीर सुदृढ तर मन, व बुद्धी सुदृढ मगच खरे स्वातंत्र्य उपभोगता येते. स्वतंत्रतेची व्याख्या फार व्यापक आहे. त्यावर जसजशी आपली चर्चा पुढे जात जाईल तशतशी तिचे दर्शन अधिकाधिक भव्य होत जाईल. स्वतंत्रता असली की माणसाच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते. हे आधुनिक शरीर -विज्ञान आणि मानसशास्त्राने मान्य केले आहे. विख्यात शास्त्रज्ञ आईन्स्टाईन  एके ठिकाणी म्हणतात की Imagination is more important than knowledge. याचा अर्थ नव्याचा ध्यास घेतला, की नवे उपयोगी ज्ञान म्हणजेच नवीन तंत्रज्ञान जन्मास येते. आजच्या युगात नवीन तंत्रज्ञानाचा साह्याने  देशाच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक शस्त्रे निर्माण करता येतात. अशा शस्त्रांची निर्मिती स्वबळावर आपल्या देशात सुरू झालेली आहे . स्वतंत्रते तून हाती आलेली ही देशाची मोठी संपदा आहे.

स्वतंत्रता, सुरक्षता व समता यांचा संगम झाला की अंतर्गत दुही, भेदाभेद लयास पावतात. त्यातूनच  इतर व्यवस्था सुद्धा ओघाने सक्षम होत जातात. हजार वर्षाच्या परवशतेच्या पाशातूनच आपल्या देशातील अनेक प्रकारच्या संपदा आक्रमकाने लुटल्या. आणि नको ती मानसिक व वैचारीक गुलामी आपल्यात जडली गेली. दुर्दैवाने ती आजही आहे. जो पर्यंत तिचे उच्चाटन होत नाही तो पर्यंत संपुर्ण स्वतंत्रता अनुभवयास येणार नाही. 

मानसिक व वैचारीक गुलामी  दूर करण्यासाठी सांघिक प्रयत्न व्हावेत तसेच सतत दक्षतेने राहण्याची इच्छा अबाधित ठेवणे गरजेचं आहे. यालाच जन जागृती वा जनजागरण म्हटले जाते. सरकार मग ते केंद्रातले असो वा राज्यातले असो जनजागृतीचे कार्यक्रम करीत असते याबाबत दुमत नाही. असे असले तरी जनजागरणाचे कार्यक्रम सरकारच्या कायदा व सुव्यवस्था, तसेच सांस्कृतिक व क्रिडा खात्यांच्या मार्फत होत असताना त्यावर थोडी-फार राजकारण नावाचे एक ग्रहण आहे त्याची छाया पडते. या उलट काही सांस्कृतिक संस्थां व शैक्षणिक संस्थां तर्फे एखाद्या विषयावर वा समस्यावर जनजागृतीचे कार्यक्रम राबविले जातात ते मोठ्या प्रमाणात स्मरणीय ठरतात, असा आपला सार्वत्रिक अनुभव आहे. कारण अशा संस्थाच्या द्वारें बालवयातच विद्यार्थावर चांगले संस्कार होऊ शकतात. मुलांवर शिशु अवस्थेत चांगले संस्कार झाले की पुढे तेच चारीत्र्यवान नागरिक होतात.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक पुज्यनीय श्री गोलवलकर गुरूजींनी आपल्या विचारधन या पुस्तकात छोटीसी कथा मांडली आहे. ' सामर्थ्य हेच जीवन आणि दुर्बलता म्हणजे मृत्यू ' हेच आपल्या सर्व धर्मग्रंथाचे सार आहे असे म्हणत शरीर बलवान असणे किती आवश्यक आहे हा मुद्दा श्री गुरूजींनी एका कथेतून समजावून दिलेला आहे. त्या कथेत चारित्र्याचे महत्व पटवून दिले आहे. ती कथा भक्त प्रल्हादाच्या चरित्रातील आहे. ती अशी आहे --

'' पुण्य कर्माच्या बळावर इंद्राला पदच्युत करून प्रल्हाद स्वतः देवेंद्र बनला. तेव्हा देवांचे गुरू बृहस्पती यांच्याकडे जाऊन इंद्र म्हणाला, 'महाराज, माझी दयनीय अवस्था आपल्याला माहिती आहे. काय केले म्हणजे माझे सिंहासन मला परत मिळेल?' बृहस्पती म्हणाले, ' एखाद्या सामान्य अतिथीचा वेष धारण करून तू प्रल्हदाच्या दरबारीं इच्छादानाच्या वेळी जावे. याचक जे मागेल ते  प्रल्हाद देतो. त्यावेळी तु जा आणि त्याच्यापाशी त्याचे शील माग. इंद्राने ते मानले आणि अथितीच्या वेषात प्रल्हादापाशी जाऊन त्याचे शील मागतो.

प्रल्हादाने अतिथीला (अर्थातच इंद्र देवाला) विचारले ' माझ्या केवळ शीलावर तू संतुष्ट आहेस हे कसे ? ' अतिथीने उत्तर दिले, ' मला एवढेच पुरेसे आहे. ' प्रल्हाद म्हणाला, ' हे माझे शील तुला दिले.' त्याने असे म्हणताक्षणीच त्याच्या शरीरातून एक आकृती बाहेर पडली आणि अतिथीच्या शरीरात प्रविष्ट झाली. प्रल्हादाने त्या आकृतीला विचारले, ' तु कोण आहेस ? माझे शरीर सोडून अतिथीच्या शरीरात का प्रवेश करीत आहेस?' त्या तेजस्वी आकृतीने उत्तर दिले, ' मी तुझे शील आहे. मला तू या अतिथीला  देऊन टाकले आहेस. त्यामुळे मला आता त्याच्या शरीरात प्रवेश करणे भाग आहे.' क्षणार्धात आणखी एक तेजस्वी आकृती प्रल्हादाच्या शरीरातून बाहेर पडली. प्रल्हादाने त्या आकृतीस विचारले ' तू कोण आहेस ? माझे शरीर सोडून तू बाहेर का जात आहेस? ' त्या आकृतीने उत्तर दिले, ' मी तुझे शौर्य आहे. मी शीलाचा सेवक आहे. तुझ्यापाशी जे शील होते तो पर्यंत मी तुझ्या शरीरात होतो आणि तो पर्यंत मी तुझी सेवा केली, आता शील निघून गेले आहे. त्यामुळे त्याच्या मागोमाग मी ही जात आहे.'  अशा प्रकारे आणखिन आकृती प्रल्हादाच्या शरीरातून बाहेर पडल्या. शेवटी अतितेजस्वी अशी एक स्त्रीरूपी आकृती प्रल्हादाच्या शरीरातून बाहेर पडली. ती म्हणाली, ' मी तुझी राज्यश्री आहे. मी ही शीलाचीच सेवक आहे. तू तुझ्या शीलाचा त्याग केला असल्यामूळे आता मी ही निघून जात आहे. अशा प्रकारे प्रल्हाद आपली सर्व सत्ता व वैभव गमावून बसला आणि इंद्राला त्याचे सिंहासन परत मिळाले.  तात्पर्य शील असेल तर कोणतेही गोष्ट सहज होऊ शकते. ही गोष्ट जितकी व्यक्तीच्या बाबतीत खरी आहे तितकीच राष्ट्राच्या बाबतीत ही खरी आहे. "

वाचक मित्र हो, वरील कथेवरून मला एक वाक्य आठवले. चर्चेच्या ओघात जिथे आवश्यक वाटते तिथे माझ्या वाचनात आलेले ते वाक्य रेफरन्स म्हणून मी देत असतो.  ते वाक्य माझ्या वाचनात २४ ऑगस्ट सन १९७३ ला आले होते. ते आज ही स्मरणात आहे. त्यावेळी दक्षिण मुंबईच्या  हुतात्मा चौकातील (फोर्ट सर्कल) अकबरअलीज् स्टोअरच्या समोर एलआयसीची शाखा क्रमांक ९०१ चे ऑफीस डॅडी हाऊस या इमारतीत होते. तो नोकरीतील माझा पहीला दिवस होता. लंच ब्रेक झाले. डब्बा खाल्यानंतर  जिथे विकास अधिकारी बसतात त्यांचा परिचय करून घ्यावा या उद्देशाने मी त्या विंग मध्ये गेलो. प्रथम श्री माधव बर्वे या जेष्ठ विकास अधिकारीशी ओळख करून घेतली. त्यांच्या टेबलावर छोटेसे ग्रिटीग कार्ड लॅमिनेट करून त्यावर प्रिन्ट केलेलं एक वाक्य मी पाहीले आणि वाचले.  त्या वाक्याच्या खाली उद्गाता कोण हे लिहीलेलं नव्हतं. मी माधवजींना विचारले तर त्यांना ही ते वाक्य कोणी म्हटले हे ठाऊक नव्हते. मला वाटतं त्या वाक्याचा उगम भक्त प्रल्हादाच्या कथेतुनच झाला असावा. ते वाक्य असे आहे--

' Progress of the nation is far less depend upon form of it's institution rather than character of it's own men.'  (अर्थ-- कुठल्या ही देशाचा विकास हा तेथे कुठल्या प्रकारची राज्यव्यवस्था आहे या पेक्षा त्या देशातील नागरिकांच्या चारित्र्यावर अधिक अवलंबून असते.)

वाचक मित्र हो, पुजनीय गोलवलकर गुरूजींनी अनेक जीवनमुल्यांची मांडणी विचारधन या पुस्तकात केली आहे. आपल्या धर्मशास्त्रांच्या बहुतांश पुस्तकातून मानवी जीवनमुल्यांवर आधारीत कथा असतात. त्या कथा छोट्याशा असल्या तरी गगनाला गवसण घालण्याइतकी प्रेरणा त्यातून मिळत असते. चराचर स्षृष्टीतील पहीलं वाहीलं जीवनमूल्य म्हणजे 'स्व' हे होय.  एक चैतन्य रुपी शीवाला अनेक व्हावयासं वाटले आणि त्यातून हे विश्व अवतरलेले आहे. त्यात सहस्त्र आकाशगंगा आहेत, सहस्त्र सूर्य आहेत, अगणीत ग्रह-तारे नक्षत्र आहेत. प्रा पु ग सहस्त्रबुद्धे म्हणतात, स्व म्हणजे स्वतःच्या तंत्राने वागणे. यातील स्व आणि तंत्र हे दोन्ही शब्द अत्याधिक महत्वाचे आहे. स्व म्हणजे मी, स्वतः आपण, स्व म्हणजे अस्मिता, स्व म्हणजे सर्व शरीराचे अधिष्ठान, स्व म्हणजे कर्तृत्वशक्तीचे मूळपीठ.' या संबंधी सविस्तर चर्चा आपण पुढील लेखात करणार आहोत. लेखाचा विस्तार वाढला आहे म्हणून मी आता या लेखाच्या समाप्ती कडे जात आहे.

In political science it is said, ' the Government is a machinery of the state.  Demoncrcy  is a form of government of the people, for the people and by the people.'  In  social studies,     ' Liberty means to have the spirit of togetherness.' In civic science ' Liberty means to have a civic sense. It is not just about keeping the roads, gardens, public property clean. Civic sense is more than that. It has to do with law abiding, respect for fellow men and maintaining decorum in public places.  In true sense ' Liberyh means to know, What we owe to our nation and be a part of nation building activities in any form which is acceptable in general.'

थोडक्यात राष्ट्र निर्माणात, गरजू देशबंधु भगिनींना मदत करण्यात, चक्रीवादळ, भूकंप, पूर  अपघात इत्यादी आपात्तीत मदत करण्यात आपले योगदान असावे. याचेच नाव आहे सामाजिक बांधिलकी. त्यातूनच पुढे सेवा परमो धर्मः हे वचन जन्मास आले असावे. बंधनाशिवाय स्वातंत्र्याला ही अर्थ नसतो. प्रत्येक क्षेत्रात एक व्यवस्था असते. त्या व्यवस्थेत असलेले नियम पाळणे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. आपल्या देशात प्राचीन काळापासून गणराज्ये व राजेशाही एकत्र नांदत असल्याचे दाखले आहेत. त्यासंबंधी आपण सवड मिळेल तशी चर्चा पुढे करीत राहू. वैदिक काळापासून  देशात होऊन गेलेले ऋषीमुनी, वैज्ञानिक, समाज सेवक , साहित्यिक, आणि स्वातंत्र्य सैनिक इत्यादी थोर पुरूषांनी तपस्या आणि त्यागातून अनेक ज्ञानगंगा निर्माण केल्या आहेत. त्यातील एक एक थेंब म्हणजे तीर्थ आहे. ते आपण अधुन मधून घेत राहू  या. आपले सहकार्य मला लाभत राहील अशी आशा व्यक्त करून मी येथे थांबतो. धन्यवाद !

         भारत माताकी जय !

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...