रविवार, १८ एप्रिल, २०२१

आचारः परमो धर्म आचारः परमं तपः|


प्रथम आपणांस नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या !  गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ' संवाद प्रतिपदेची ' हा लेख लिहून मी ब्लाॅगवरील लिखाणाला सुरूवात केली. आपल्याशी संवाद साधता साधता चार वर्षे पुर्ण झाली. या चार वर्षात आपण सकारात्मक प्रतिसाद दिला, योग्य त्या सुचना ही दिल्या, त्यातून मला अधिकधिक प्रेरणा मिळत गेली. त्यासाठी मी आपले सर्वांचे मनःपुर्वक आभार मानतो. आपणांस तसेच आपल्या परिवारातील सदस्यांना आणि आप्तजनांना या वर्षात सुख आणि चांगले आरोग्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. 

गेल्या वर्षीचा गुडी पाडवा आपण लाॅकडाऊन मध्ये साजरा केला. कोरोनाच्या महामारीतून आपण बाहेर पडतो आहोत अशी चिन्हें दिसत असताना पुन्हा लाॅकडाऊन करावा लागणार असे महाराष्ट्र सरकारने अलिकडे सुतोवाच केले होते. म्हणून येऊ घातलेल्या लाॅकडाऊनचे स्वरूप कसे असेल, किती दिवसाचा असेल याबाबत सर्वत्र चर्चा आणि सोबत कोरोनाची भिती अशा वातावरणातच यंदाचा ही गुढी पाडवा घरातच साजरा झाला. 

महाराष्ट्र सरकारने २ मे पर्यंत लाॅकडाऊनची घोषणा केली आणि लाॅकडाऊनचे स्वरूप ही स्पष्ट झाले.  लाॅकडाऊन संबंधी 'राजा कालस्य कारणम् ' असे समजून सत्ताधार्यांना दोष देणे हे सोपे काम असते. मग ते महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या दृष्टीने असो वा केंद्र सरकारवर टिका करणार्या विरोधी पक्षांच्या दृष्टीने. त्यावर अधिक चर्चा केल्याने काही साध्य होणार नाही. म्हणून तो विषय बाजूला ठेवणे हेच शहाणपणाचे आहे. लोकशाहीतला राजा कोण ? उत्तर आहे प्रजा. म्हणजे आपण सारे जण. सार्वजनिक ठिकाणी जी पथ्थें आपण पाळायला हवी होती ती पाळली नाहीत. राजकारणी मंडळीने ही शंभर टक्के पथ्थे पाळली आहेत असे कुठे दिसले आहे ? म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भव वाढला यात राव आणि रंक सारेच जबाबदार आहेत असेच धरू या. जगभरातील इतर देशांतही याहून वेगळे चित्र नाही. या कोरोना संकटात राजकिय मंडळीच्या आचरणा विषयी काही म्हणावे तर एक वाक्यप्रकार आठवतो तो म्हणजे 
' घरोघर मातीच्या चुली. '

सृष्टीला सृजन करण्याची जबाबदारी विधात्याने मानवावर सोपविली आहे. कारण त्याने फक्त मानवालाच बुद्धी दिली आहे. बुद्धीमूळे सारासार विचार करता येतो. त्याचेच नाव विवेक आहे. स्कंद पुराणात गुरूःर्एको विवेकः असे म्हटले आहे. माणसाचा पहिला गुरू स्वतःचा विवेक असतो.  याचा अर्थ असा नव्हे की गुरू-शिष्य परपंरेला छेद दिला गेला. प्रत्येक क्षेत्रात आपल्यासाठी जो गुरू असतो तो आपल्यासाठी साक्षात ब्रह्मा, विष्णु, महेश असतो. गुरू जे काही आपल्याला मार्गदर्शन देतो ते आत्मसात करण्यासाठी आपली गुरूवर भक्ती असली पाहीजे. जेव्हा अंतःकरणात गुरू बद्दल भक्ती तयार होते किंवा विश्वास वाटतो त्या क्रियेलाच विवेक म्हटले जाते. मनुस्मृतीत एके ठिकाणी म्हटले आहे,
        आचारः परमो धर्म आचारः परमं तपः |
        आचारः परमं ज्ञानम् आचारात् किं न साध्यते ||

आपले स्वतःचे आचरण हा महान धर्म आहे. दुसर्या एके ठिकाणी आचरः प्रथम धर्मः इत्येतद विदुषां वचः असे मी वाचले आहे. म्हणजेच आचारण हा अखिल मानव जातीचा पहिला धर्म आहे. आचरण एक तप आहे. आचरणातून ज्ञान प्राप्त होते याचा अर्थ आचरण हेच खरे ज्ञान आहे. संत महंतानीं लौकीक दृष्ट्या शैक्षणिक पदवी घेतली नव्हती तरी त्यांनी अजरामर असे साहित्य निर्मीती केली. त्यांचे साहित्य शाळा-महाविद्यालयीन आणि पीएचडीच्या अभ्यासक्रमात असते. आचरणाने आपण साध्य करू शकणार नाही अशी एक ही गोष्ट जगात नसते. म्हणून आचरण हा महान धर्म ठरतो. धर्म हा प्रथम आणि शेवटी ही धर्मच असतो. आपण आपले आचरण वेडेवाकडे ठेवले की तो अधर्म ठरतो. म्हणून सदाचरण हे मानवी जीवनमूल्य जन्मास आले. कोरोनाची साथ फैलावली ती चीन मधून असे म्हटले जाते. ते खरे असो वा नसो शेवटी चीन मध्ये ही माणसेच राहतात ना. तेथील राजकर्त्यांना आपले आर्थिक साम्राज्य वाढविण्याची दुर्बुद्धी झाली असावी हा एक तर्क काढला गेला आहे. याचे कारण चीनच्या सत्ताधार्यांबद्दल बहुतांश देशांना अविश्वास वाटतो. अविश्वास हा सदाचारणाच्या अभावात जन्मतो. म्हणून आपले आचरण दुसर्यांना विश्वासनिय वाटायला हवे. तसे न घडले की तो अधर्म ठरतो.

आपल्या धर्मशास्त्रात आचरणाला पहिला धर्म म्हटले आहे. कारण आपली धर्माची व्याख्याच व्यापक आहे. माताधर्म पिताधर्म, पतीधर्म, पत्नीधर्म, पुत्रधर्म, बंधुधर्म, कूळधर्म, ग्रामधर्म,  पंथधर्म, उपासना धर्म  शेजारधर्म, ग्रामधर्म, समाजधर्म,  राजधर्म, राष्ट्रधर्म, विज्ञानधर्म, वैश्वीकधर्म असे वाढत आपआपल्या कर्मापर्यंत पोहचते. मग निष्काम कर्मा पर्यंत जाऊ लागते. तेव्हा आपली मती कुंटते. तसे पाहता हाच मानव धर्म असे वाटते. पण तेवढ्यावर आपला आचार धर्म थांबत नाही. याच्चवत सर्व प्राणीमात्रात सुद्धा मी आहे. चल-अचल वस्तूत मी आहे असे भगवान श्रीकृष्णाने अर्जनुला गीतेत सांगितले आहे. याचा अर्थ आपले आचरण सृष्टीधर्मानुसार आहे की नाही इथपर्यंत ती व्याखा वाढते. याचा अर्थ हा विषय फार व्यापक आहे. म्हणून या विषयावर पुढे टप्प्या-टप्प्याने स्वतंत्र रित्या चर्चा करू या. कोरोना  महामारीच्या संदर्भात गेल्या वर्षी 'आपण एकशे पाच ' अशा शिर्षकाचा तसेच आणखिन चार लेख ब्लाॅगवर पब्लीश केले आहेत. त्यामूळे या लेखाचा विस्तार वाढवित नाही. तसे पाहता लेख लिहणे यात सुद्धा एक प्रकारचा आचार धर्म आहे. वक्त्याने आपले भाषण श्रोत्यांना कंटाळा येईल इतपर्यंत वाढवू नये तसेच लेखाच्या विस्ताराला ही सीमा असणे गरजेचे आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंनी एके ठिकाणी म्हटले आहे की ' एखाद्या लेखकाने आपली पत्नी आजारी असेल तेव्हा तिच्याकडे दुर्लक्ष करून लेखनात मग्न होणे हा त्यावेळी स्वच्छंद ठरू शकतो.'  सारांशाने ' अती तिथे माती ' हाच सर्व क्षेत्रातला आचार धर्माचा मंत्र आहे असे वाटते. आपल्या आहार-विहारापासून प्रत्येक क्षेत्रातले आचरण शुद्ध आणि संयमीत असावे असे आपल्या साधु-संतानी म्हटले आहे. 

आपल्या देशातील सारी संत-मंडळी, गुरूदेव नानक आणि बुद्ध-महावीरांसारखे देवादिक मंडळी, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, महात्मा गांधीजी, आचार्य विनोबा भावे, पंडीत दिनदयाळ उपाध्याय, स्वाध्याय प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोलवलकर गुरूजी, प्राध्यापक प्र ग सहस्त्रबुद्धे, साने गुरूजी, प्राचार्य शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर, आफळेबुवासारखे किर्तनकार, प्रा सु ग शेवडे सारखे प्रवचनकार, श्री श्रीरवि शंकर, शंकर अभ्यंकर सारखे अध्यात्मिक गुरू अशी एक लांबलचक यादी होईल. त्यांची नावें आणि छोटासा परिचय करावयाचा म्हटले तरी एक मोठा ग्रंथ होईल. ' तेथे कर माझे जुळती ' अशा ईश्वरनिष्ठाची मांदियाळींची ही आपली भूमी. आपला देश  'आचरण ' या विषयाची शिकवण सार्या जगाला देश देऊ शकतो. पण आपले दुर्दैव म्हणा  की आपल्या कर्मदारिद्र्यपणा मुळे विख्यात लेखक ह ना आपटेंना पडलेला ' पण लक्षात कोण घेतो ' हा प्रश्न आपण आजच्या कोरोना संकटात ही अनुत्तरीत ठेवला आहे.

ईशावास्यम् इंद सर्वम् | असे आपण मानतो. म्हणजे चराचर सृष्टीत ईश्वर सामावलेला आहे. मनुष्य हा निसर्गाचाच एक भाग. जसा मनुष्य उत्क्रांत होत गेला तसा या सृष्टीतल्या प्रत्येक जीवाला उत्क्रान्त होण्याची प्रेरणा मिळत असावीच.  आपण अनंत औषधोपचार शोधले पण प्रत्येक जीवजंतूत ही प्रतिकार शक्ती निसर्गानियमाने वाढत असावी. अनेक जीवजंतू नवीन रूपे घेत असावीत. त्यामूळे त्यावरील लस शोधण्यात आणि तयार करण्यात अवधी लागतो. उत्पत्ती, स्थिती, लय या तीन अवस्था आहेत हे सर्वांना मान्य झालेले शाश्वत सत्य आहे. माल्थस नावाच्या अर्थशास्त्रीने  रोगराई, दुष्काळ, अतिवृष्टी, भूकंप, महापूर इत्यादीतून होणारी जिवीत हानी हे निसर्गाच्या खेळी आहेत असे आपल्या Theroy of Population या ग्रंथात मांडले आहे. आज कोरोना तर पुढे भविष्यात नवीन जीवजंतु येणार, जीवजंतु ही नवनवीन रूपे धारण करणार हे गृहीत धरूनच आपले आचरण ठेवणे गरजेचे ठरते. चौर्यांशी योनीतून मनुष्य देह प्राप्त होत असतो असे म्हटले जाते. त्यावर विश्वास ठेवावा की नाही हा प्रश्न महत्वाचा नाही. पण इतर प्राण्यांपेक्षा आपण वरचढ आहोत हे तर खरे आहे. 'नरेची केला नर किती हीन'  की 'नराचा नारायण ' व्हावयाचे असे दोन पर्याय ईश्वराने म्हणा वा सृष्टीने आपल्या समोर ठेवले आहेत. पर्याय आपण निवडावयाचा आहे. पण ईश्वर नसला तर काय करायचे ? तो आहे असे मानावयास पुरेसा पुरावा नाही. पण आशेची एक बाब आहे. अनेक महापुरूषांना गूढरम्य अनुभव आले. नामजपामूळे मनाला शांती मिळते असा अनुभव आपणास आलेला असतोच. योगासने, दीर्घ श्वसन यामूळे लागणारी झोप  व प्राप्त होणारे आरोग्य अनेक जन्मी लाभले तरी हवेसे वाटेलच. आजारात सुख नाही आणि अज्ञानात आनंद नसतो. व्यसन आणि मोह तर विघातक. त्या वाटेने जाऊ नये. असे म्हटले जाते की माणूस हा केवळ दोन पायावर खांबा सारखा उभा आहे. तर इतर प्राणी चार पायांवर उभे असतात. पृथ्वीतलावर आढळणारी गुरूत्वकर्षाणाची ओढ माणसाच्या सरळ शरीरस्थितीमुळे त्याच्या वाटेला अधिक येते. तिचा प्रभाव कमी पडावा या साठी माणसाने अधून मधून बसावे किंवा सरळ आडवे व्हावे. शवासन ही एक सहजस्थिती आहे. या आसनात गुरूत्वाकर्षणाची शक्ती मुक्त होते. माणूस खाली ओढला जात नाही. हृदयावर कामाचा ताण कमी पडतो. रक्ताभिसरणासाठी त्याला अधिक बळ वापरावे लागत नाही. त्याला थकवा किंवा ग्लानी येण्याची शक्यता कमी असते म्हणून योगाचार्य म्हणतात की शवासन मृत्यूला मागे लोटते. जे योगासने करतात, दीर्घश्वसन करतात अशांना  कोरानो सारख्या संकटापासून भय कमी असते. आपल्या आहारात चरबी युक्त पदार्थ नसावेत. सर्वात महत्वाचे पथ्य म्हणजे प्रमाणाबाहेर विचार करू नये. महत्वाकाक्षेंचे मजले कमी करावेत. इत्यादी खबरदारी आपण बहुतांश डाॅक्टर मंडळी, योगाचार्य, आयुर्वेदिक वैद्यांकडून ऐकत आलो आहोत. ' शरीरमाद्य खलु धर्मसाधनम ' असे म्हटले आहे ते सदैव लक्षात ठेवून आपला आहार - विहार, बाबत सजगता बाळगावी. 

कसे वागायचे, काय खावे, काय खाऊ नये हे ठरविण्याचे स्वातंत्र्य आपल्याकडे आहे. पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. आकाशात स्वच्छंदपणे विहार करणारे पक्षी, रानावनात काही बंधने नसताना फिरणारे पशू पाहून आपल्याला वाटत असते की पशू-पक्ष्यांच्या जीवनात खरे स्वातंत्र्य आहे पण ते तितकेसे खरें नाही. आपल्याला काय हवे आहे याची जाणीव पशूपक्ष्यांना ही असते. पण जाणीवप्रमाणे प्रयत्न करून मिळविणे हे फक्त मानवालाच जमते. पशुपक्ष्यांचे जीवन सामुदायिक असते तर मानवाचे जीवन सामाजिक असते. जसे आपल्या शरीरात हृदयापासून प्रत्येक अवयवात रक्ताचे अभिसरण चालू असते तसे व्यक्ती आणि समाज, समाज आणि राष्ट्र यामध्ये वैचारीक अभिसरण होत राहणे गरजेचे असते. तोच  स्वतंत्रताचा खरा अर्थ आहे. ब्रह्मांडात अनेक ग्रह आहेत. त्यांचे आकारमान आणि गुरूत्वाकर्षण, गती, कक्षा सारं काही भिन्न आहे. पण ते ही आपल्या कक्षा सोडून फिरत नाहीत. बंधनातच स्वातंत्र्य शोभून दिसते. Ever viligance is the price we are paying for liberty असे कोण्या इंग्रजी समाजशास्त्रज्ञाने म्हटले आहे. ते सतत ध्यानात ठेवणे गरज असते. आपल्या शरीराच्या रचनेत ही बंधनाचे धागे असतातच. म्हणूनच पथ्ये पाळणे गरजेचे असते. समाज असो वा देश असो फक्त स्वातंत्र्यावर जगत नसतात. प्रत्येक समाजाला आणि देशाला अनेक अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाच्या संकटांना सामारे जावे लागते. शेवटी समाज जगला, देश जगला तर आपल्या स्वातंत्र्याला अर्थ आहे. म्हणूनच नागरिकतत्व जपून वापरणे आवश्यक आहे. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते  आपल्या पुर्वाश्रमींच्या हाल अपेष्टा व त्यांच्या त्यागातूनच मिळाले आहे. खरें म्हणजे देशातील थोर पुरूषांनी लोकशाही प्रणाली स्विकारल्यामूळे आपले मत माडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे. त्यामूळेच तर आपला परस्पर संवाद होतो आहे. म्हणून सारे स्वातंत्र्यवीर मग ते अहिंसा मार्गावरील असोत वा सशस्त्र क्रान्ती मार्गावरील, तसेच देशाच्या घटना समितीवरील सर्व तज्ञ मंडळी  इत्यादींचे आपल्यावर अनंत ऋण आहेत. मी जे काही इथे मांडले आहे ते अनेक महापुरूषांनी आपल्याला त्यांच्या जीवनगाथेतूनच सांगितले आहे. ही  जाणीव ठेवून कोरोनाशी या निकराच्या लढाईच्या समयीं  'समाज आणि देश प्रथम' असे ध्यानात ठेवून सरकारने घालून दिलेले नियम पाळून आपले आचरण शुद्ध ठेवण्याच्या संकल्प सोडू या. यातच आपल्या सर्वांचे हित आहे. 

गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

वाझे प्रकरण गंभीर वळणावर ?

सार्या देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चीम बंगाल, आसाम, पाॅन्डेचरी, तामीळनाडू आणि केरळमधील निवडणूकांच्या प्रचार सभांचा धुराळा उडतो आहे, तोवर ओपिनियन पोल ही येऊ लागले आहेत. सर्व न्युज चॅनेल्स, वर्तमानपत्रें, साप्ताहिके, यु ट्युब चॅनेल्स वरून या राज्यांमधील निवडणूकांच्या प्रचाराचा रागरंग, मतदारसंघ निहाय चर्चा इत्यादी कार्यक्रमांची रेलचेल वाढली आहे. या पाच राज्यातील निवडणूकासंबंधीत आपण ही क्रमशः काही लिहावे असे वाटले. पण आपल्या महाराष्ट्रावर आख्या जगाचं लक्ष लागून राहिलेल्या वाझे प्रकरणातून अशा काही गोष्टी बाहेर येत आहेत की त्यावर आपल्याशी पुन्हा एकदा संवाद साधावा अशी इच्छा झाली म्हणून हा लेख प्रपंच.


निवडणूका नसतानाच्या काळात ही आपला महाराष्ट्र सचीन वाझे प्रकरणामूळे नॅशनल न्यूज चॅनेल्सवरील चर्चेत अग्रणी दिसतो. एखाद्या चांगल्या कामगिरी संबंधी आपला महाराष्ट्र  नॅशनल न्यूज चॅनेल्सवर चर्चेच्या अग्रणी राहिला असता तर आपल्या छातीत ऊर भरून आला असता. पण जे काही घडले आहे आणि घडते आहे त्यातून सर्वात पुरोगामी आणि विकसित राज्य म्हणून जो टेंभा आपण मिरवित होतो तो धुळीस मिळाला आहे.  मुंबई हायकोर्टने उपमुख्यमंत्री अनिल देशमूख यांनी खंडणी वसूल करण्याचा आदेश पोलीस स्टाफना दिला होता त्या आरोपा संबंधी जी याचिका होती त्यावर  ' सीबाय तर्फे चौकशी करावी ' असा निर्णय दिल्याची बातमी आली. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. जर  परमवीर सिंगनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते तेव्हाच देशमुखांनी राजीनामा दिला असता तर इज्जत राखली गेली असती. 

एकंदरीत या प्रकरणात फक्त वाझे, परमवीर सिंग आणि अनिल देशमुखाचींच इज्जत गेली असे नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काॅग्रेसचे शरद पवार यांची सुद्धा गेली आहे. तसे पाहता  विधानसभेत अलिकडील अर्थसंकल्पच्या अधिवेशनात हा विषय चर्चीला जात होता त्यावेळी बकवास करणारे सर्वश्री संजय राऊत, अनिल परब, जिंतेद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, सचीन सावंत, नाना पाटोले, मलीक सारख्या नेतेमंडळीचींही  इज्जत वेशीवर टांगली गेली आहे. आता म्हणे, अनिल देशमूख दिल्लीत गेले आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यांनी जी काही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे,  ती स्वंतत्र रित्याच त्यांना चालवावी लागेल. महाराष्ट्र सरकारने त्यांचा राजीनामा स्विकारला आहे. म्हणजे वाझे प्रकरणात अनिल देशमूख हा तिसरा बळीचा बकरा ठरला आहे.

लोकशाहीमध्ये कुठल्याही गोष्टीचे ' एक घाव दोन तुकडे ' असा प्रकार नसतो. प्रथम चौकशी, त्यानंतर प्रथम दर्शनी गुन्हा वाटल्यास केस नोंदविणे मग न्यायालयात जाणे नंतर परिस्थितीजन्य पुरावे दाखल करणे, त्यावर खटला चालविणे, साक्षी घेणे, वेळ पडल्यास संबंधित आरोपींच्या नार्को टेस्ट्स घेणे आणि शेवटी न्यायालयाचा निकाल हाती येईपर्यंत आपल्या सारख्या जनसामान्यांचा संयम संपतो आणि ते प्रकरण आपल्या मेंदुतील विस्मरण नावाच्या स्टोअर्समध्ये जमा होते. शेवटी नाईलाजास्तव ' जसे कर्म तसे फळ ' किंवा  'आले देवादिकांच्या मनी ' अशी आपण समज करून घेतो. सचिन वाझे प्रकरणावरील या चर्चेत देवाधिदेवांचा उल्लेख आल्यामूळे  कोरोनाच्या पहिल्या महामारीत सामना वृत्तपत्राचे संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊतानी  ' देवांनी दारें बंद करून घेतली आहेत ' असे विधान केल्याचे आठवले. या ठिकाणी मी संजय राऊतांना सांगू इच्छीतो की ' गेल्या सोमवारपासून महाराष्ट्र सरकारने छोटा लाॅकडाऊन घोषीत केला आणि मंदिरातील देव पुन्हा दारें बंद करून बसली आहेत आणि अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रीय देताना आपण म्हटले, की  ' परमेश्वरा इतकी निरपेक्षपणे चौकशी करणारी यंत्रणा नसते.'   'संजयजी, हा जागा झालेला परमेश्वर कोण आहे हे जरा खुल्या मनाने रोखठोक मधून आम्हांस सांगितला तर बरें होईल.  कारण तुम्ही मानलेल्या दोन ईश्वरापैकी एकाने मौन धरले आहे. दुसरा ईश्वर पोटदुखीने त्रस्त आहे. दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन खोटे-नाटे खुलासे देताना राऊतांच्या या महादेवाची तारांबळ उडालेली दिसली.' त्यामूळे संजय राऊतांनी कुठल्या निरपेक्ष परमेश्वराचा उल्लेख केला आहे हेच आता कळेनासे झाले आहे. शेवटी कुठला का असेना पण संजय राऊतांना परमेश्वर आठवला हे ही नसे थोडके !  मागील लेखात मी म्हटले होते की, ज्या तत्परतेने मोदी-शहा जोडीने एनआयए कडे हे प्रकरण सोपविले त्यावरूनच ठाकरे सरकाराच्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज येतो. पण वाझे प्रकरणातून जे काही बाहेर येत आहे हे पाहता जो काही मी अंदाज बांधला होता तो फारच थिटा पडणार आहे, असे दिसू लागले आहे.

एनआयएच्या तपासातून दोन cctv vdr, दोन cpc, दोन hard disk, प्रिन्टर, दोन number प्लेट्स, बनावट पासपोर्ट, नकली आधार कार्ड, एटीम कार्ड,  ज्यात बार आणि रेस्टाॅरन्ट मालकाची नावे व हिशोब असलेली एक डायरी अशा बर्याच काही गोष्टी हाती लागल्या आहेत. सचिन वाझेच्या चार मार्च या दिवसाच्या सार्या हालचाली, म्हणजे सीएसएमटी स्टेशन ते कळव्यापर्यंतचा रेल्वेने प्रवास, नंतर मनसुख हिरेनचे पार्थीव मिळाले तिथे उपस्थिती नंतर पुन्हा बारकडे जाणे सारं काही एनआयएने टिपण काढून ठेवली आहेत. ठाण्याच्या हाॅस्पीटलमध्ये जिथे मनसुख हिरेनच्या देहाचे पोस्टमार्टम झाले त्याच दिवशी त्याच वेळी तिथे वाझेची उपस्थित होती असे विडीओतून आपण पाहिले. मनसूख हिरेनचा मृत्यु हा राजकारणातला बळी मानला जातो तेव्हा त्यासाठी सरकार विरूद्ध भांडणे हे विरोधी पक्षाचे कर्तव्य जरूर आहे. पण मुंबईतील नाईट लाईफ मध्ये सर्वसामान्य जनांतला या मनसूख हिरेनचे सचीन वाझे सारख्याशी इतके सख्य कसे जमले हा ही एक आपल्यासारख्या जनसामान्यांना प्रश्न पडतो. याचा अर्थ आपल्या समाजव्यवस्थेतच बिघाड झाला आहे हे तर मान्य करावे लागते.  वाझे सोबत असलेली एक स्त्री, ती कोण होती, हे शोधणे एक दिव्य काम होते. पण एनआयएने तिचा ही शोध लावला. ती कोणीतरी मिरा रोडला राहणारी  मीना जाॅर्ज आहे. तिची ही चौकशी सुरू होत आहे. त्यातून वाझे सोबत असलेले बँकेचे खाते, २५ लाखाची रक्कम, इत्यादी महत्वाचे धागेदोरे हाती आले आहेत. वाझे वापरत असलेल्या उंची गाड्या, त्यांची राहणी, उंची हाॅटेलमधील वास्तव्य,  सर्वच काही अलीशान, जणू एखाद्या चित्रपटातला अन्डरवर्डचा डाॅन भासावा असे अनेक विडीओ मधून वाझेंना आपण पाहीले आणि ऐकले आहे. पण समाजात नाईट लाईफच्या जीवनशैलीशी महिला वर्गाला आकर्षण कसे वाटले हा ही आजच्या बाजारी समाजव्यवस्थेतला मोठा दोष दिसतोय, त्याचे काय ? असे म्हटले जाते की प्रत्येक पेयात पाणी असते. दुधात, फळांच्या रसात, माणसाच्या रक्तात सुद्धा पाणी असते. पण ते पाणी म्हणून ओळखले जात नाही. आपली द्रवरूपता अन्य रूपात प्रगट करणारे व आपले सत्व समर्पित करून परत्त्वात विलीन होणारे पाणी हे सृष्टीतले समरसतेचे एक सर्वोत्तम उदाहरण आहे. समाजातील आपल्या सारखी सर्वसामान्य माणसे देशासाठी हेच करतात. पडेल ते काम पत्करणारी व वाट्याला येईल ती भूमिका पार पाडणारी सामान्य माणसे जगातून चालती झाली तर मागे काय उरेल? प्रत्येक जण लोकनेता, प्रशासकीय अधिकारी किंवा तथाकथित 'श्रीमंत ' झाला तर कामें पार पडतील का? सुतार, लोहार, चांभार, दुकानदार, बस कन्डक्टर, हमाल, भाजीवाला, चायवाला, पानपट्टीवाले ही माणसे जगातून चालती झाली तर समाजजीवन शून्यवत होईल. माणसाच्या या सामान्यत्वाला लोकशाहीत नागरिकत्वाचे परिमाण लाभते. नागरिकत्वाची निर्मलता, सुदृढता हेच लोकराज्याचे खरे बळ आहे. जेव्हा सामान्य माणसाला ही जगण्यासाठी लबाडी करावी लागते, तेव्हा लोकशाहीची प्रतिष्ठा धोक्यात येते. एनआयएच्या तपासातून जे काळेबोरें बाहेर येत आहे ते पाहता फक्त राजकीय व्यवस्थाचीच लक्तरे बाहेर येत आहेत असे नाही तर संपूर्ण मराठी भाषिक समाजाची जगभर शीं थू झाली आहे. आम्ही शाहू, फूले, आंबेडकरांचा वृथा अभिमान तरी कशासाठी बाळगावयाचा? आपण स्वतःच आपली फसवणूक करीत आहोत.

सचिन वाझेंनी जितकी वर्षे पोलीस दलात काम केलं आहे. त्यातील बहुतांश काळासाठी ते बडतर्फ होते. असे ऐकीवात आले आहे की त्या काळात सचीन वाझेंनी माहिती व तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतले. केवळ शिक्षणच घेऊन ते थांबले असे नाही तर त्या क्षेत्रात इतकं प्राविण्य मिळविले आहे की अट्टल सायबर गुन्हेगारां पेक्षा ते महाअट्टल गुन्हेगार ठरावेत. काल तर सचिन वाझेनीं म्हणें एक लेटर बाॅम्ब टाकला आहे आणि त्यात शिवसेनेचे मंत्री अनिल परब, अजित पवार आणि  शरद पवार यांच्या ही नावाचा समावेश आहे. एखादा डोंगर पोखरला की त्यातून चित्र-विचित्र प्राणी बाहेर पडतात तसेच काहीतरी अजब आणि आपल्या तर्काच्या पलिकडचे जग कसे आहे याचे पुसटसे दर्शन होत आहे.  दिवसा काबाडकष्ट करून शांतपणे घरी परतायचे आणि रात्री झोपी जाणे हा आपल्या सारख्या सामान्यजनांचा दिनक्रम. पण ही मुंबई मायानगरी आहे. इथे रात्रीच ज्यांचा दिवस सुरू होतो असे लोक ही राहातात आणि आपले करोडो रूपयाचे व्यवहार करतात. हे व्यवहार करीत असताना एकाची ऐशबाजी तर दुसर्याचे शोषण, छळ किंवा थेट मृत्यू. मग तो लपविण्यासाठी बर्याच खटपटी आणि त्यातून आपल्या सारख्यानांही उपद्व्याप. सर्वत्र पोलिसांची टेहाळणी. नाईट लाईफचे समर्थक आणि रातोंके राजेलोक राजरोसपणे आपल्यावर सत्ता गाजवित असतात. यांना माणसें म्हणावे की पशू ? एखाद्या माणसाची अवहेलना करताना आपण त्याला 
'पशू' असे म्हणून मोकळे होतो. पशू मुके असतात. त्यांना सत्य समजते पण उच्चारता येत नाही. माणूस समजून उमजून सहज खोटे बोलतो. माणसे तंटेबखेडे करतात. चोर्या करतात. लूट करतात. मारामारी करतात. दंगली व जाळपोळ करतात. कोर्टाची पायरी झिजेपर्यंत तिचा चढउतार करतात. पशू अशा प्रकारची आगळीक करीत नाहीत. भूक नसताना ते खात बसत नाहीत. ते भक्ष्य मिळवितात आणि लागलीच खातात. उद्याच्या दिवशी खाण्यासाठी तजवीज व्हावी म्हणून फ्रिजमध्ये ठेवतात किंवा बेकायदा साठा करतात असे काही ऐकीवात आले नाही. पशू उगाच कोणाची छेड काढीत नाहीत. द्वेष-मत्सर हा भाव त्यांच्या जीवनात आढळत नाही. पशू-पक्षांना मानसोपचाराची गरज नसते. त्याच्यांत पक्ष, गट, संघटना नसतात. असतात ते थवे आणि कळप. स्वार्थ साधावा म्हणून ते संस्था काढीत किंवा चालवित नाहीत. हे सर्व पशू-पक्षी जीवन पाहिल्यावर माणसाने जीवन सुधारावे असे वाटते की नाही? सत्ता, मत्ता, मानापमान ही नाटके सोडून पशूंची पार्दशकता पत्करून आपल्याला किमानपक्षी सुखाने जगता येऊ शकते की नाही ? श्रीगोपाळकृष्ण, श्रीपशुपतिनाथ आणि श्रीदत्तगुरू सारख्यां पशुधनाचा आदर करणार्या देवाधिदेवांची, संत-महंतांची परंपरा असलेल्या आपल्या समाजाने पशू-पक्ष्यांकडून काही शिकावयास हवे की नाही? इत्यादी प्रश्न आपल्यासारख्या जनसामान्यांच्या मनात उभे राहिले आहेत. 

वाझे प्रकरण इतकं गंभीर वळणावर आलेलं आहे की  ते केवळ महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नसून आपल्या देशाच्या सुरक्षतेला आव्हान उभे करणार्या पाकिस्तान देशाने रचलेल्या कटाशी संबंध आहे असे राॅचे निवृत्त अधिकारी एन. के. सूद , माजी पोलीस महासंचालक अरविंद इमानदार, माजी केंद्रीय गृह सचीव आर. वी. एस. मणी यांच्या सारख्या अनुभवी अधिकार्यांच्या मुलाखतीतून स्पष्ट झाले आहे. वाझे प्रकरणाला आपल्या बाॅलीवूड मधील कलाकारांचा, राजकीय नेत्यांचा मुंबईत १९९३ साली बाॅम्बस्पोट घडवून आणणार्या मोस्ट वान्टेड खतरनाक दाऊद ईब्राहीमशी थेट असलेल्या संबंधाची मोठी पार्श्वभूमी आहे असे ही म्हटले जात आहे.  एनआयएच्या तपासातून जे काही बाहेर येत आहे त्यावरून मविआ नावाचे सरकार अस्तित्वात आणण्याची योजना२०१९ च्या विधानसभेच्या निवडणूक प्रचारातच आखली होती की काय असा संशय बळावतो आहे. मविआ सरकारने फक्त केंद्र सरकारच्या विरूध्दात बोलणे, सारा दोष केंद्र सरकारचाच असा पवित्रा घेऊन महाराष्ट्रात इतक्या हत्या घडत असुनही  कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर नाही असा देखावा विद्यमान राज्य सरकार करीत आहे. ही तर हद्दच झाली हो !  आता तर महाराष्ट्र सरकार गृहमंत्री अनिल देशमुखाच्या पाठीशी बळ उभे करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच की ! आताच्या ताज्या बातमीनुसार सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमूख यांच्या याचिका फेटाळल्या आहेत. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने मविआ सरकारच्या अध्वैर्युंच्या थोबाडीत सणसणीत हाणली आहे.  जे ' महा राष्ट्र ' म्हणून ओळखले जावे यासाठी  ज्या १०५ हुतात्म्यांनी रक्त सांडले, ज्यांनी तहान-भूक विसरून संयुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलन छेडले, केंद्र सरकार मधील अर्थमंत्रीपदाचा ज्यांनी राजीनामा दिला, ज्यांनी ' हे मराठी भाषिकाचे राज्य ' असे उद्गार काढीत समस्त मराठी लोकांच्या अभिमानरूपी सागराच्या लाटेतून आलेला, १मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण कलश आपल्या हातात घेऊन आले, अशा आपल्या पुर्वाश्रमींच्या स्वप्नातील हाच तो आधुनिक,  पुरोगामी, आणि विकसित महाराष्ट्र का ? येत्या १मे ला आपल्या राज्याचा ६२ वा वर्धापन दिन आपण साजरा करणार आहोत  पण कुठल्या हाताने साजरा करणार ? निरपधार्यांच्या रक्ताने माखलेल्या हाताने की लोकांकडून खंडणी स्विकारलेल्या हातानी ? कुठल्या मुखाने आपण जय महाराष्ट्र म्हणणार आहोत ? हे  फक्त तो सर्वसाक्षी परमेश्वरच जाणो ! 

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...