गुरुवार, ४ जून, २०२०

शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने - राज्याभिषेकाची गरज


आज जेष्ठ शु१३ शके १९४२ शिवराज शक ३४७ गुरूवार दिनांक ४जून २०२०. आजच्या दिवशी म्हणजे जेष्ठ शु१३ शके १५९६ अर्थात ६ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. गेल्या वर्षी  ' शिवराज्याभिषेक के पर्वपर ' या शिर्षकाखाली  तीन लेख हिंदीत लिहून पब्लिश केले होते. गेल्या वर्षी शिवराज्याभिषेकाच्या दिनी मला बोरीवली पुर्वेस एके ठिकाणी भाषण द्यावयास जावे लागले. सभेला   अमराठी लोकांची चांगली उपस्थिती होती. म्हणून ते भाषण मला हिंदीतून करावे लागले होते. ते भाषण  संपल्यानंतर उपस्थित अमराठी लोकांना शिवचरीत्र अधिक जाणून घेण्याची इच्छा झाली व मला विनंती केली, की ब्लाॅगवर शिवचरीत्रपर दो-तीन लेख हिंदीमे लिखकर पब्लीश करेंगे, तो हम उसे जरूर पढेंगे | त्यांची विनंती मान्य करून मी शिवचरीत्रावर तीन लेख लिहून पब्लीश केले. त्यामध्यें मी शिवाजीराजांचा पराक्रम, राज्याभिषेक सोहळा, आणि प्रशासन इत्यादी संबंधीची संक्षिप्त माहिती माझ्या कुवतीनूसार आपल्या समोर ठेवलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे दैवत आहे. त्यांचे जीवन-चरीत्र शब्दांत बांधणे म्हणजे शिवधनुष्य उचलण्याइतके महाकठीण काम. पण सतत शिवरायाच्या चरीत्राचा ज्यांनी ध्यास घेतला, असे रियासतकार गोविंद सरदेसाई , बाबासाहेब पुरंदरे, जेष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहंदळे सारख्यांनी शिवाजीचे चरीत्र शब्दात गुंफले. ही मंडळी खरोखरीच महानिय व्यक्ती होत. ज्यांचे चरीत्र शब्दात गुंफले आणि संपले, असे होत नसते ते युगपुरूष. शिवाजी महाराज युगपुरूष होते. त्यांच्या चरीत्राचे स्मरण म्हणण्यापेक्षा पारायण हा शब्द उचीत वाटतो.  पारायणाला अंत नसतो. युगपुरूषांच्या जयंती वा पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला प्रेरणा मिळावी या हेतूने त्यांच्या व्यक्तीमत्वातील एखादा पैलू वा त्यांच्या एखाद्या गुणाची, एखाद्या प्रंसगाची आठवण करण्याचे व्रत पाळणे हा पारायणाचा सोपा अर्थ आहे. शिवाजी महाराज राजे होते. म्हणून आज त्यांच्या राज्याभिषेक संबंधी सविस्तरपणे संवाद का साधू नये असे मनात आले म्हणून हा लेख प्रपंच.

   राज्याभिषेकेची आवश्यकता

महाकवी कालिदासाने म्हटले आहे की, उत्सव प्रियः खलू मनुष्यः | माॅन्टेक नावाच्या विचारवंताने म्हटले आहे की, Man is social being formed to please and enjoy in society. नेहमीच्या व्यवहारात सुद्धा निरनिराळ्या प्रसंगाच्या निमित्ताने उत्सव पाळण्याचा प्रघात पडला. सामान्यजनात, वाढदिवस, विवाह, नव्या घरातील वास्तुशांती  इत्यादीचे उत्सव फार पूर्वीपासून साजरे केले जात आलेले आहेत. राजे-महाराजात राज्यरोहण, रौप्यसुवर्णादि राज्यौत्सव, तुला प्रसंग, अश्वमेघ यज्ञ केले जात असत. अशा कार्यक्रमास धार्मिक महत्वाबरोबर व्यवहारीक महत्व ही बरेच असे. जनतेवर छाप पाडण्यास, इतरत्र दरारा वाढविण्यास, नावलौकीक पसरविण्यास अशा समारंभाचे पुष्कळ साह्य होत असे. त्यामूळे शिवाजीने बाल वयापासून प्रंचड धोका पत्करीत, जीवाचे रान करीत आपल्या व आपल्या साथीदारांच्या पराक्रमाच्या बळावर सुरू केलेल्या राष्ट्रधोद्धराच्या कामाची सांगता राज्याभिषेकाने होणे योग्यच होते. त्या शिवाय शिवाजीची व त्याच्या कार्याची श्रेष्ठता लोकांच्या मनावर ठसली नसती. त्यावेळी यवनांच्या दरबारातील मराठी सरदारांना राजे हा किताब बहाल करण्यात येत असला तरी ते फक्त नावाचे राजे होते. त्यांना राज्याभिषेक करवून घेत येत नसे, व तसा प्रयत्न कोणी केला नव्हता. म्हणून शिवाजीच्या राज्याभिषेक सोहळ्याची मातब्बरी वेगळी होती. आपण स्वतंत्र राजे आहोत, मराठ्यात अतःपार स्वतंत्र तख्तनशील राजे आहोत एवढेच नव्हते तर  आदिलशाही, निजामशाही, कुतूबशाही व मोगलशाहीच्या तोडीचे आपण आहोत असा वचक देशभर निर्माण करण्याचा उद्देश होता.

राजेशाही व्यवस्थेत निवडणूका नसतात. आपल्या पराक्रमाच्या जोरावर प्रदेश जिंकून राजा होणे हीच प्रचलीत रित असते. शिवाजी कितीही बलवान झाला तरी तो केवळ विजापूरी सरदाराचा बंडखोर मुलगा समजला जात असे. हिंदु समाज स्वधर्म, स्वभाषा आणि स्व-संस्कृती संबंधीत जागा झाला होता व शिवाजी विषयी आदर, अभिमान वाटत होता. तरी  शिवाजीस न जुमानणारे मराठा सरदार बर्या प्रमाणात होते. त्यांच्या मनावर  मुसलमानी सत्तेचा पगडा होता. अशा परिस्थितीत, शत्रु-मित्रांनी शिवाजीस राजा म्हणून स्विकारावयाचे असल्यास शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध होणे गरजेचे होते. आजूबाजूस सर्वत्र यवनांची सत्ता म्हणजे आदिलशाही निजामशाई, सुलतानशाही, असल्या कारणाने रयतेकडून कर वसूल करणे, कायद्याने त्याचे नियमन करणे, परराज्याशी बरोबरीच्या नात्याने व्यवहार ठेवणे इत्यादी गोष्टी करता येत नव्हत्या. यवनी राज्यातील बरेचसे मराठा सरदार शिवाजीला येऊन मिळाले असले तरी त्यांच्या राज्यातील कायद्याप्रमाणे ते गुन्हेगार म्हणून शिक्षेस पात्र ठरले होते. एकंदरीत, किल्ले व प्रदेश जिंकून ही स्वतंत्र राज्य निर्माण झाले नव्हते.  शिवाय मराठी माणसांना मराठी माणसाचं यश डोळ्यात खुपण्याच्या सवयीचा शिवाजीचा राज्याभिषेक होण्यात अडसर होताच. अनेकांनी भोसले घराण्याचे क्षत्रियत्व राहीलेले नाही असे शुद्र आरोप ही केले होते. त्या काळात राजेशाही ही एकच राज्यप्रणाली प्रचलित होती. त्यामूळे शिवाजीचा रितसर राज्याभिषेक होणे आवश्यक होते.

उत्तरेत औरंगजेबाच्या हिरवट व हिडीस अंमलाखाली दिवस कंठविणार्यांना शिवाजी महाराजा बद्दल आपोआप आदर व कौतुक वाटत होते, सर्वत्र महाराजाबद्दल चर्चा चालत. महाराजाच्या  रोमहर्षक चरीत्रातून बुंदेलखंडांत छत्रसाल नावाच्या युवकाने प्रेरणा घेत मोगलीं राज्याच्या पाशात अडकलेला बुंदेलखंड स्वतंत्र राज्य निर्माण केले. शिवाजी महाराजांचे दर्शन झाल्यावर भूषण नावाचा कवी इतका देहभान विसरून गेला की,  अतिसुंदर अलंकाराने सजविलेल्या शिवराय चरीत्राच्या ओव्या मुखातून त्याच्या मुखातून येत ' शिवराज भूषण ' नावाचा एक ओजस्वी काव्य अवतरले. तर दक्षिणेतील तंजावरचा जयरामकवीने शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर अनेक यशोगीते रचली. शिवाजी महाराज जन्मास येण्याअगोदर जवळपास चारशे वर्षे ज्ञानेश्वर महाराजा पासून ते संत रामदास स्वामीपर्यंतच्या संतानी जनजागरणाचा काम हाती घेतले होते. त्यामूळे शिवाजीच्या असामान्य पराक्रमाने सारा समाज जागेतून उठला होता, तुणतुणे- बिणे झंकारत होते, गोंधळ्याची मशाल पाजळत होती, भल्या पहाटेस वासूदेव गावोगावी धर्म रक्षणार्थ गीत गाऊ लागले होते, किर्तनकार आवाज उठवत होते, झांजा, मृंदग यांच्या साथीने संत-वारकरी लोकांना उठवत होते, शाहीरांनी शिवाजीच्या पराक्रमाच्यावर पोवाडे रचले व गायवयास सुरूवात केली होती. विचारवंत ते सामान्यजन, माता-भगिनी, विद्वान, कामगार, मजूर, शेतकरी, युवक सारा समाज स्वधर्म, स्वभाषा, स्वसंस्कृती, व स्वदेश इत्यादी संबंधी जागृत झाला होता, कोंदडधारी श्रीरामाचा जय जय रघुवीर समर्थ म्हणून जयजयकार  होऊ लागला होता. समर्थ रामदास स्वामी सारखे विरक्त महायोगी आणि तत्त्वज्ञ महर्षी यशवंत, शिवाजी महाराजाच्या देवकार्यावर संतुष्ट होऊन शिवाजीची मुक्त कंठाने स्तुती करीत होते. अनेक योद्धे, अनेक मुत्सद्दी महाराजांच्या पदरी होते. इत्यादींच्या सोबत राज्याभिषेक संबंधीच्या शिवाजी महाराजांच्या बैठका झाल्या होत्या. 

शिवाजी महाराजाच्या अद्भूत पराक्रमाच्या रोमहर्षक कथा व समाजात स्पुरलेल्या नवचैतन्याच्या वार्ता भारतवर्षात पसरल्या होत्या. यवनांच्या चार सत्ताशी झुंजणारा हा युवक अदभूत असला पाहिजे असे सर्वाना वाटे. आग्र्याहून सुटकेने तर सार्या जगाला थक्क केले होते. असा हा अचाट बुद्धीचा व अलोट शौर्याचा शिवाजी राजा धर्मसंस्थापनेसाठी स्वराज्य मिळवित आहे व तो प्राचीन राजांच्या मालिकेंत शोभावा असा राजा आहे. अशी त्यांची किर्ती सर्वत्र पसरली होती.  महत्वाचे म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे पौराहित्य ज्यांच्या नेतृवाखाली पार पडणार होते त्या महापंडीत गागाभट्टच्या कानावर शिवाजी महाराजाची ती किर्ती पडली होती व ती त्यांच्या हृदयापर्यंत पोहचली. नंतर त्यांची व शिवाजी महाराजांची भेट होते. या अविस्मरणीय भेटीतून महाजन व सामान्यजनांचे डोळे दिपवून गेले असा शिवाजींचा राज्याभिषेक सोहळा पार पडला तो आजच्या दिवशी. 

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...