कोरोनाशी आपली लढत या शिर्षकाखाली चार लेख लिहल्यानंतर या लेखाचे शिर्षक का बदलावे लागले हे आपल्या सारख्या सुज्ञ वाचकांना सांगावयाची गरज नाही. आजचे युग माहिती व तंत्रज्ञानाचे; त्यामूळे माहितीचा महापूर अहोरात्र सुरू असतो. त्यात राजकीय घडामोडीच्या बातम्याचा नंबर पहीला लागतो. असे का होत आहे, त्यासंबंधीचा दोष जितका राजकीय पक्षांना जातो तितकाच लोकशाही राज्यव्यस्थेतील मतदार म्हणून आपल्याकडे ही येतो हे प्रथम मान्य करूनच आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो.
कोरोनाशी सुरू असलेली आपली लढत कधी संपेल या विषयी कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. प्रगत देशात ही कोरोना व्हायरसने थैमान घातलेले आपण पाहात आहोत. आपल्या देशात कोरोनाचा संसर्ग इतर देशाच्या तुलनेत कमी असला तरी रूग्णाची वाढती संख्या केवळ चिंताजनकच नाही तर भयावह आहे. याचे कारण कोरोनाशी आपली लढत जितकी लांबली जाईल तितक्या आरोग्य, आर्थिक, उद्योग, कृषी, शिक्षण, सामाजिक, क्षेत्रातील समस्या जटील होत जातील. शिवाय कुंटुब व्यवस्थेतील भावनिक समस्या नव्याने उभ्या राहतील. आपल्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव तिसर्या स्टेजवर गेला नाही ही आपली जमेची बाजू आहे. त्यासंबंधीचे उच्चस्तरीय श्रेय निश्चीतच आज प्रत्यक्ष रणांगणावर चोवीस तास लढत देणारे डाॅक्टर्स , नर्स, प्रशासकीय वर्ग, सफाई कर्मचारी, पोलीस व जवान, स्वयंसेवी संस्था इत्यादींना जाते. त्यानंतर सरकार मग ते केंद्र असो वा राज्यातले यांना श्रेय जाते. सरकारचे काम लढतीची आखणी, त्यानुसार कार्यन्वाही, विविध यंत्रणेतील समन्वय,आणि धन व रसद पुरवठा हे असते. आजच्या घडीला केंद्र व विविध राज्यातील सरकारचे काम समाधानकारक आहे याबाबत दुमत नाही. पण आपली राजकीय व्यवस्था अशी आहे की देशाच्या शत्रु राष्ट्राने दशहतवादी हल्याच्या रूपाने निर्माण केलेल्या आपत्ती काळात असो वा नैसर्गिक आपत्तीच्या काळात, आपल्या राजकीय पक्षांना राजकीय फायद्याच्या पलीकडे जाऊन काही विचार करावा, याचे भान राहात नाही. त्यामूळे ज्या राजकीय पक्षाशी आपली जवळीक आहे त्याचे कौतूक व ज्या राजकीय पक्षाशी जवळीक नाही अशा पक्षावर टिका करण्याची सवय लोकशाहीचा चौथा स्थंभ म्हणून मानला जातो, अशा प्रिन्ट व इलेट्राॅनिक्स मिडीयाला लागली आहे. तेथूनच या सवयीची लागण राजकीय अभ्यासक म्हणून मिरविणारी विचारवंत व संपादक मंडळीना आणि पुढे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व समर्थकांपर्यंत पोहचलेली दिसते. आपला देशच नव्हे तर आख्ख जग कोरोना सारख्या महासंकटात सापडलेले असताना राजकिय पक्षांतील सुंदोपोसुंदीचे दर्शन चॅनेल वरील चर्चेतून होत आहे. सोशल मिडीयावर ही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते भांडत असल्याचे आपण पाहातो. प्रिन्ट व इलेट्राॅनिक्स मिडीयाचे सुत्र नावाचे अपत्य कोणते हे आपल्या सारख्या सर्वसामान्यांना अजूनही ज्ञात झाले नाही हा आपल्या लोकशाही व्यवस्थेतील मोठा दोष आहे. त्यामूळे तिथे परस्परात होणारी स्पर्धा आपल्याला मुकाटपणे पाहावी लागते. सध्याच्या लाॅकडाऊनच्या काळात राजकीय पक्षांतील नेत्या मध्यें या संकट काळात केलेल्या लोकोपयोगी कामाचे श्रेय घेण्याची सुरू असलेली स्पर्धा, मिडीयातून कोरोना रूग्णाची वाढती संख्या सांगताना अँकरच्या चेहर्यावर न दिसणारे गांभीर्य या सार्या गोष्टी फारच खटकतात. माझा मुद्दा असा आहे की विज्ञान युगात आपण राहातो, मिरवतो, पण आपले आचार, विचार, वर्तन आदिम काळातील मानवा सारखे होत आहे की काय असा प्रश्न जगभरातील अनेक समाजशास्त्रज्ञाला भेडसावत आहे. बर्टाड रसेल नावाच्या विचारवंताने म्हटले आहे की, 'मानवाचा मुलभूत विकास झाल्याशिवाय वैज्ञानिक प्रगती त्याच्या पचनी पडणार नाही.' हे आज पटते. आपले महात्मा गांधीजींनी मानव जातीला सल्ला देताना म्हटले आहे की, 'सबकी जरूरतें पुरी करनेकी क्षमता अपनी धरती माँके पास है पर अपनी लालच पुरी करनेकी नही है | ' हा सल्ला पदोपदी आठवतो. आपल्या अध्यात्माचे मेरूमणी स्वामी विवेकानंदानी अमेरिका व युरोपातून मायदेशी परतल्यावर एके ठिकाणी म्हटले आहे, की आजचा युरोप ज्वालामूखीच्या तोंडाशी उभा आहे.' विवेकानंदाच्या महानिर्वाणनंतर जगात झालेली दोन महायुद्धे, सतत तिसर्या महायुद्धाचे वाहात असलेले ढग, आता सुरू होत असलेले जैविक युद्ध पाहता विवेकानंदाची भविष्यवाणी खरी ठरत आहे. कोरोना व्हायरस हा नैसर्गिक आहे की जैवीक अस्त्राच्या युद्धाचा प्रारंभ आहे हेच कळेनासे झाले आहे. जर हा व्हायरस चीनने बनविला असेल तरी आपल्या धर्मशास्त्रात उत्पत्ती, स्थिती, लय हा निसर्ग नियम असे म्हटले आहे तेच उत्तर आपल्या हाती येते. मग विज्ञानाने आपण सुसंस्कृत झालो आहोत असे कसें मानावे ? निसर्ग नियमा नुसार कोरोनोचे थैमान थांबणार आहेच, ते काही या सृष्टीचा आताच पुर्ण विंध्वस करणार नाही. पण कोरोनारूपी संकटामूळे जगाचे चित्र बदलणार आहे हे निश्चीत. अनेक देशातील राज्य, समाज, व अर्थ या व्यवस्था पुर्णपणे बदलणार आहेत. जगातील राजकीय समिकरणे बदलणार आहेत. आपले सुदैव आहे की आज आपल्या देशात आरोग्य, विज्ञान, तंत्रज्ञान, सुरक्षा, व्यापार, उद्योग, कृषी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी क्षेत्रात तटस्थेने व निरपेक्ष भावनेतून विचार , सुचना, भाष्यें मांडणारी विचारवंत मंडळी व स्वयंसेवी संस्था आहेत. एक समाज म्हणून, एक देश म्हणून आपण काय करायला हवे यासंबंधी ही निःपक्ष विचारवंत मंडळी, आणि स्वयंसेवी संस्था, विविध माध्यमातून आपली मतें मांडतांना दिसत आहेत. त्यांचे विचार, त्यांच्या सुचना, त्यांचे विविध क्षेत्रांविषयी वरील भाष्य वाचले, ऐकले की कोरोनाच्या दशहतीवर मात करावयाची असेल तर आपल्याला सर्व मतभेद विसरून एक समाज, एक देश म्हणून सामोरे जाण्याशिवाय गत्यंतर नाही हे स्पष्टपणे दिसत आहे. कोरोनाशी सुरू असलेल्या युद्धातील आपल्या हाती असलेले हमखास यश देणारे शस्त्र म्हणजे महाभारतातील युधीष्ठराने व्यक्त केलेली 'आम्ही एकशे पाच आहोत ही भावना होय. प्रश्न हा आहे की त्यासाठी पुढाकार कोणी घ्यवयाचा आहे ?
पुढाकार कोणी घ्यावयाचा या प्रश्नाचं उत्तर आपल्या संस्कृतीत आहे. आपल्या संस्कृती मधील महाजनो या गता सः पंथा, तसेच राजा कालस्य कारणम् अशी छोटी छोटी अनेक वचने, सुभाषितं, प्रार्थना अशा आहेत की त्यात मानव म्हणून जन्माला येण्याचं प्रयोजन सामवलेलं आहे. ही आपल्या संस्कृतीची खासियत आहे. अभिजन वर्ग ज्या दिशेने जातो त्याच दिशेने सर्वसामान्यांनी जावे असे म्हटले आहे. तसे पाहिले तर हा सल्ला नसून ते एक शाश्वत सत्य आहे. साधारणतः सामान्यजन म्हणजे समाज हा प्रवाहपतीत असतो. सामान्यजनांकडे महनीय व्यक्ती सारखी बौद्धिक पातळी नसते म्हणून त्यांच्यात ' महाजना या गता सा पंथः ' हे जीवनाचं सुत्र अंगवळणी पडले आहे. पुढील वचन आहे राजा कालस्य कारणम् | म्हणजे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, प्रजेचं मानसिक व शारिरीक आरोग्य, सुरक्षा, उदरनिर्वाहाची व्यवस्था या सार्या गोष्टींची जबाबदारी राजावर असते. पुर्वी जगातील सर्वच देशात राजेशाही हीच राज्यप्रणाली असल्यामूळे सरकार या शब्दाऐवजी राजा हा शब्द वापरण्यात आला असावा. त्यातून प्रत्येक राजाची कारकिर्द सुद्धा काल गणनेने मानली जात असे. आज जगात काही देशात लोकशाही, काही देशात लष्करशाही, काही देशात राजेशाही, काही चीन सारख्या देशात एक पक्षीय राज्यप्रणाली आहे. आपल्या येथे लोकशाही आहे. म्हणून सरकार निवडण्यासाठी आपण मतदान करीत असतो. तसे पाहता वैदिक काळात आपल्या देशात जशी राजेशाही होती तशी गणराज्यें ही होती. एकंदरीत आपल्या समाजाच्या प्रकृतीला लोकशाही मानवणारी आहे. देश गुलामशाहीत का गेला यामागील कारणांचा अभ्यास करून एक समाज म्हणून उभे राहण्याची भावना देशबांधवामध्ये निर्माण करून बावनकाशी सुवर्णासारखी राष्ट्रीय एकात्मता प्रत्यक्षात आकारास आणण्याचा विचार व धडपड म्हणजे राष्ट्रवाद. या संबंधी मी अनेक लेखात चर्चा केली आहे. म्हणून आज त्यावर चर्चा नको करू या. एक गोष्ट स्पष्टपणे दिसते आहे ती म्हणजे भारताचा आत्मा आपले अध्यात्म आहे. म्हणून अध्यात्म व विज्ञान याची सांगड घालण्यात आपण कमी पडतोय हे मान्य केलेलं बरे असे वाटते.
राजा म्हणजे सरकार ! म्हणून देशाचा पंतप्रधान व त्याचे मंत्रीमंडळ हे आपले सरकार. पण सत्ताधारी पक्षाला आपण (प्रजा) म्हणजे मतदारच निवडून देत असतो. याचा अर्थ ' आपणच आपले राजे ' असाच आहे. पण या न्यायाने आपण आपली जबाबदारी कर्तव्यें पार पाडत नसतो. म्हणूनच 'आपण आपल्या मनाचे राजे ' हा वाक् प्रचार आपण व्यवहारात स्वच्छंदी व स्वैराचारी वृत्तीच्या वर्णनासाठी वापरतो. लाॅकडाऊन, कर्फ्यू असूनही पाच- दहा टक्के समाजबांधव कायदा व प्रशासकीय सुचना धाब्यावर बसवितात ही गंभीर बाब आहे. त्यावरूनही राजकारण होताना दिसत आहे ती तर अधिक गंभीर बाब आहे. अशा वेळी पंतप्रधान वा मुख्यमंत्र्यांवर टिका करणे योग्य आहे का, याचा शांत डोक्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतोय असे दिसत असूनही देशातल्या प्रमूख विरोधी पक्ष काॅग्रेस, त्याचे मित्रपक्ष, व डाव्या पक्षांचे शिर्षस्थ नेते हाताची घडी व तोंडावर बोट ठेवून गप्प बसली होती. काॅग्रेसचे सर्वसर्वा सोनिया गांधी व राहूल गांधी शेवटी पंतप्रधान मोदीवर टिकेचं शस्त्र फेकू लागले. म्हणून सोशल मिडीयावर ' इटाली चाची आपके पास कोरोना पर कोई अच्छा इलाज है, तो पहले अपने मैंकेको दिजीए, उन्हे अधिक जरूरत है |' अशी कडवट टिका व्हायरल झालीच. काॅग्रेसच्या या दोन्ही शिर्षस्थ नेत्यांनी आपणहून कोंडमारा करून घेतला आहे. प्रधानमंत्री केअर फंड ऐवजी पंतप्रधान आपत्ती निवारण फंडात दानापोटी आलेली रक्कम टाकावी असा सोनिया गांधीची मागणी म्हणजे तो हट्ट होता कारण त्या फंडात काॅग्रेस अध्यक्षाचा सदस्य म्हणून समावेश आहे. हे सत्य लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर सोनीया गांधीना फक्त पैशाची हाव आणि ती ही कोरोनो सारख्या गंभीर संकट काळात ही सुटत नाही ही बाब फारच खालच्या दर्जाची दिसली. पंतप्रधान मोदींना कोरोना आपत्तीचे दिर्घ काळपर्यंत निर्माण होणार्या समस्यांची पुर्ण जाणीव आहे म्हणून त्यांनी एक कायम स्वरूपाचा स्वतंत्र फंड व्हायरस इन्फेशनचे संकट जे वेळोवेळी येऊ लागले त्यासाठी तयार केला. कोरोनाचे संकट वाटते त्याहून ही फार धोकादायक व दिर्घ कालीन टिकणारी समस्या आहे, असे दिसून आल्यानंतर काल परवा राहूल गांधी शहाणपणाने बोलले. पण तो पर्यंत काॅग्रेस व मित्र पक्षांचे कार्यकर्ते व समर्थकांनी सोशल मिडीयावर धुमाकूळ घालायचा तो घातलाच. मरण आपल्या दाराशी येत आहे असे दिसल्यावर शहाण्यासारखं वागण्याची सुरूवात करणे म्हणजे आपले राजकीय अस्तित्व संपत आल्यामूळे काॅग्रेसचे हे शिर्षस्थ नेते भयभीत झाल्याचे लक्षण आहे हे न कळण्याइतकी आपली जनता खूळी नाही.
सध्यातरी कोरोनावर सामाजिक अंतर हेच औषध आहे. आधूनिक विज्ञानाच्या अत्याधुनिक साधनांचा ही कोरोनासमोर टिकाव लागत नाही, हे अमेरिका व युरोपीयन देशाची स्थिती कशी झाली आहे त्यावरून सिद्ध झाले आहे. म्हणून आपल्या सरकारने लाॅकडाऊनचा निर्णय घेतला आहे. तो यशस्वी करण्यासाठी सरकारला सहकार्य करणे हे सर्व विरोधी पक्षांचेच नव्हे तर देशातील सर्व स्वयंसेवी संस्था, विचारवंत, धर्मगुरू व सामान्यजनांचे आद्य कर्तव्य आहे. देशातील, व सर्व राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षांनी एकजूटीचा नारा द्यावा. आमचे जे काही राजकीय मतभेद असतील ते काही काळ बासनात गुंडाळून ठेवू या. अर्थव्यवस्थेतील समस्यांवर उपाय व योजना इत्यादी हळूहळू आखत पुढे चालत राहू या. देश वाचला तरच स्वातंत्र्याला अर्थ राहील. स्वातंत्र्य राहीलं तरच विकासाच्या योजना अंमलात येतील. कदाचित कोरोनोचे संकट निवाळल्यानंतर आपल्या देशाला अधिक चांगल्या संधी ही मिळतील असे ही काही अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय अभ्यासक सांगत आहेत. त्यासाठी आपल्याला
' साथी हात बढाओ ' याच न्यायाने पुढे जावे लागणार आहे. आजच्या आणिबाणीच्या स्थितीत पंतप्रधान मोदी देशातील वैज्ञानिक, डाॅक्टर्स , विचारवंत, समाजशास्त्रज्ञ, उद्योजक, अर्थशास्त्रज्ञ, संरक्षण व परराष्ट्र खात्यातील आजी माजी सनदी अधिकारी यांचा सल्ला घेत आहेत. सर्व राज्यातील मुख्यमंत्री ही समाधानकारक कामगिरी बजावित आहेत. प्रत्येक राजकीय पक्षांच्या शिर्षस्थ नेत्यांनी राजकीय फायद्याचे गणित विसरून खालच्या पातळीवरील नेत्यांसमोर, कार्यकर्त्यांसमोर , व सामान्यजनांसमोर संयम, सांमजस्य, आणि वेळ पडल्यास कठोर निर्णय घेण्यासाठी एकजूटीचे इतिहासातील सर्वोत्तम असे आदर्श उदाहरण ठेवल्यास करोना संकटावर आपण मात करू शकतो.Yes We can stop Corona.