मंगळवार, १७ एप्रिल, २०१८

जशी इच्छा तसा मार्ग


अलीकडे Whats App वर एक पोस्ट आली. ती अशी आहे, "Desires dictates our priorities, priorities shape our choices, and choices determine our actions". वाक्य फार छान आहे. त्या वाक्यातील Desires ह्या शब्दाने मला प्रभावीत केलं. लेख लिहिण्याची इच्छा झाली. वरवर पाहता ही पोस्ट साधी आणि सरळ वाटते. मानवी जीवनातील प्रत्येक क्षेत्रातील प्रयत्न,यश, तसेच उन्नतीशी निगडीत असलेलं तत्व आहे. पण हाव, स्पर्धा, कलह, आणि अवनती इत्यादी परस्पर विरोधी बाबाशीही तेच तत्व निगडीत असलेले दिसले. मग त्या पोस्टमधील तत्वाचा दोन्ही बाजूचा विचार अंतर्भूत असावा असे ठरले. म्हणजे प्राधान्यावरून गाडी पुढे सरकली. मानव्याचा इच्छा आणि दिशा ह्या बाबतची निवड (choices) लेख लिहिता लिहिता जुळून येतील असे वाटले आणि लिखाणाच्या कृतीस प्रारंभ झाला.

'इच्छा असेल तर मार्ग दिसतो' हे वाक्य आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे. विशेषकरून विद्यार्थी दशेत असल्यापासूनचे. एखाद्या विषयात कमी मार्क्स मिळाले, की त्या विषयाचे शिक्षक हमखास हे वाक्य म्हणून दाखवित असत, मग ते शिक्षक भाषा विषयाचे असोत वा नसोत. उद्देश हाच की विद्यार्थ्यांनी अधिक गुण मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांनी अधिक गुण मिळविण्याची इच्छा धरायला हवी; फलंदाजाने अधिक धावा काढण्याची इच्छा धरावी; विम्याच्या एजंटाने अधिकाधिक ग्राहक मिळवावेत अशी इच्छा धरावी; उत्पादक क्षेत्रातल्या मंडळींनी अधिकाधिक उत्पदानाची इच्छा धरावी; संशोंधकांनी अधिकाधिक क्षेत्र पादांक्रान्त करावयास हवेत; विक्रय क्षेत्रातल्या मंडळींनी अधिकाधिक आपला माल विक्रीची इच्छा धरावयास हवी. हे सारं जग विविध इच्छा-आकांक्षाने ओतप्रोत भरलेलं आहे. म्हणूनच तर हे जग अव्यहातपणे चालत आले आहे. There is no human being without any desires. अगदी ज्यानां कसलीही इच्छा नसणार्या अशा आपल्या साधू संतानाही इच्छा होती. कुठली? तर आपल्या कल्याणाची. हा फरक आपण आणि संत मंडळीत. शास्त्रज्ञांनाही मी देवदूत मानतो. बहुतांश शास्त्रज्ञांच्या मनात मानवाचं जीवन कल्याणमय आणि सुखमय होवो हीच इच्छा असते; मग तिचं स्वरूप आंतरिक शक्तीत होते; पुढे त्यांची ही आतंरिक शक्ती त्यांना स्वस्थ बसू देत नाही त्यातून मानवाच्या गरजांचा शोध सुरू झाला; पुढे संशोधनाचं काम सुरू झालं; नवे शोध लागले; नवीन शोध लागत राहणार; अखिल मानव जातीचं जीवन सुकर होत गेले आणि होत राहणार. परंतु त्यांच्या शोधांचा दुरूपयोग करण्यांची इच्छा जगभरातल्या राजकीय नेत्यांत होऊ लागली आणि त्यातून विनाशाचं संकट उभं राहिलं, त्यात शास्त्रज्ञांचा दोष नाही.

वरील पोस्ट मधील पहीलं वाक्य आहे, Desires dictates our priorities. आपल्या इच्छेनुसार आपण आपले प्राधान्य वा पर्याय शोधत असतो. म्हणजे आपल्या इच्छा बर्याच असतात म्हणून आपण प्राधान्याचा वा पर्यायाचा शोध घेत असतो. असाही अर्थ निघू शकतो. पण ज्या लेखकाने हे वाक्य सांगितले आहे, त्यांनी निश्चीतपणे एक ठोस मानशास्त्रीय सिध्दान्त मांडला आहे.  जो आपल्या जीवनातल्या यशासाठी आवश्यक असतो. तो सिध्दान्त कुठला? " Without an aim, man is like a wall clock without cell ". ध्येय, गरज, आणि इच्छा ह्या तशा भिन्न गोष्टी दिसत असल्या तरी ध्येय आणि गरज ह्यांची जननी इच्छा हीच असावी.  

एकदा एका गरीब शाळकरी विद्यार्थ्याने 'मी मोठा झाल्यावर उद्योगपती होणार ' ह्या विषयावर निबंध लिहीला. सर्व विद्यार्थ्यांनी आपआपल्या परीने निबंध लिहीले. कोणी मी शिक्षक होणार, कोणी डाॅक्टर होणार, कोणी इंजिनियर, कोणी पायलट असे ठराविक साच्यातलेच निबंध लिहले. शिक्षकाने सर्व विद्यार्थांचे निबंध वाचले. पण त्या गरीब विद्यार्थाने लिहीलेला निबंध वर्गशिक्षकाने न वाचताच, तू कसला उद्योगपती होतोय, असे म्हणत त्याने लिहिलेल्या निबंधांच्या कागदाचे दोन तुकडे करून कोपर्यात भिर्कावून दिले आणि म्हणाले, उद्या दुसरा निबंध लिहून आण. तो गरीब विद्यार्थी आपल्या घरी रडत रडत परतला. घर कसले? घोड्याचा तबेला हेच घर. त्याचे वडील एका रेसकोर्सच्या मालकाकडे घोड्याची निगा राखण्याचे काम करीत असे. आपला मुलगा रडत येत आहे, हे पाहील्यावर वडीलाने मुलाला कुशीत घेतले आणि काय झालं ह्याची विचारणा केली. मुलगा रडत रडत म्हणाला "बाबा, मी लिहलेला निबंध गुरूजीने फाडून टाकला. हे बघा ,फाडलेल्या निबंथाचे हे तुकडे." त्या मुलाचे वडील थोडेफार शिकलेले होते. आपल्या मुलाचं सांत्वन करीत ते म्हणाले "बेटा, आपण गरीब! उद्योगधंद्याला फार फार पैसे लागतात. माझे वडील ह्याच शेठजीकडे कामाला होते. माझे वडील गरीब. म्हणून मी ही गरीब राहीलो." त्यावर मुलगा म्हणाला "बाबा, मी ह्या शाळेत कसा जाऊ? सर्व विद्यार्थी माझी चेष्टा उडवितात."  त्यावर त्याचे वडील म्हणाले, "थोडे दिवस ह्या शाळेत जा, आपण दुसर्या शहरात रहावयास जाऊ. मी तिथे दुसर्या शेठजीकडे नोकरी करीन." कसंबसं ते शैक्षणीक वर्ष मुलाने त्या शाळेत पूर्ण केलं. त्यानंतर वीस-पचवीस वर्षे लोटली. तो मुलगा ज्या शाळेत इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत शिकला, त्या शाळेचा सुवर्ण महोत्सव होता. जे त्याचे वर्गशिक्षक होते, ते आता शाळेचे मुख्याधापक झाले होते. आजी-माजी विद्यार्थी -पालक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत समारंभ झाला. प्रमूख पाहूण्याचं खास सत्कार झाला. त्याने शाळेला देणगी दिली होती. त्यांच भाषण सुरू झाले. त्यानी प्रथम आभार शाळेचे आभार मानले आणि म्हणाले " मित्रहो पचवीस वर्षे पूर्वी मी ह्या शाळेत शिकायला होतो. इयत्ता पहिले ते पाचवी पर्यंत. पुढे ते म्हणाले आज जे मुख्याध्यापक आहेत, ते माझे वर्गशिक्षक होते; मी आज आपल्यासमोर उद्योगपपती म्हणून उभा आहे, ह्याच श्रेय आजच्या मुख्याध्यापकांना जाते. मीच तो गरीब विद्यार्थी आपल्या वडीलासोबत घोड्याच्या तबेलात राहणारा. इयत्ता पाचवीत असतांना मी उद्योगपती होणार असा निबंध लिहीला होता. त्यावेळी ह्या मुख्यध्यापकांनी वर्गात मी लिहिलेला निबंधचा कागद फाडून टाकला होता." असे म्हणत त्यांनी आपल्या खिशातून ज्यावर निबंध लिहीला होता, त्या कागदाचे तुकडे बाहेर काढले. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाट झाला. मुख्याध्यापकाकडे कोणी पाहीलेही नाही. ही कथा काल्पनिक असली तरी अनेक उद्योगपतींच्या, जीवनातील यशाशी साधर्म्य दाखविणारी आहे. सारांश हाच की जबरदस्त इच्छा असली की कुठलेही क्षेत्र पादक्रान्त करता येते. हा झाला मानसशास्त्रीय सिध्दांत. 

"Economics is a science of human behaviour between scare means and unlimited wants. अमर्याद गरजा आणि त्या पुर्या करण्याच्या साधन-सामुग्रीची कमतरता ह्यातून मानवाचा जो मनोव्यापार होतो त्याचेच नाव अर्थशास्त्र. बाजारातून शूज घेतले की पायमोजे घ्यावे लागतात. पाॅलीशची डबी, ब्रश हे ही घ्यावे लागते. ह्या गरजाच होत. शूज घेण्यची कल्पना ही मूळ इच्छा. मग पावसाळ्यासाठी वाॅटरफ्रूप शूज घेणे ही गरज ओघाने निर्माण होते. अशा प्रकारे वाढत जाणार्या गरजांचा उद्योजक अभ्यास करतात, मग वस्तू निर्मीती करतात. प्रत्येक वस्तूच्या निर्मीतीला स्पर्धकही असतात. एकदा का निर्मीती क्षेत्रात स्पर्धा आली की विक्री क्षेत्रातही स्पर्धा निर्माण होते. हळूहळू स्पर्धेत टिकणे ही गरज नव्हे तर इच्छा बनून राहते असा हा इच्छेचा खेळ आहे. आम्ही दिवाळी- दसरा इत्यादी सण साजरे करतो. तेही कुटूंबियासमवेत. परंतू ह्याच दिवसात व्यापारी आपआपली दूकाने उघडी ठेवतात. म्हणून आपली खरेदीची इच्छा पूर्ण होते. व्यापारानांही आपल्या कुटुंबासमवेत सण साजरे करावयाची इच्छा असते. परंतु शेवटी प्राधान्य(Priroity) आपला माल खपावा ह्यालाच दिले जाते. हा झाला उद्योग व व्यवसायातील यशाची निगडीत असलेला अर्थशास्त्रीय सिध्दांत.

जगभरातील सर्व साधू-संत, गेल्या दोन शतकातील थोर नेते, उद्योगपती, शास्त्रज्ञ ह्यांचे एका मूलभूत तत्वावर एकमत आहे, ते म्हणजे आयुष्यात काही भव्य दिव्य कामगिरी करावयाची असेल, तर मनुष्याची आंतरिक ओढ सर्वात महत्वाची असते. स्वतःच्या भावनांची ओळख असणे ही जीवनाची गुरूकिल्ली आहे. स्वामी मुक्तानंद म्हणतात, 'प्रथम स्वतःवर प्रेम करा. म्हणजे स्वतःला ओळखा. स्वतःला हीन, दीन मानू नका.' बहिष्कृतेचा शाप असूनही एकलव्य, कर्णाने आपले बलकौशल्य सिध्द केले. बालवयातच पोलीओमूळे दोन्ही पाय निकामी होऊन आपल्या आंतरिक इच्छेवर बीऐ, एमए टेक्स्टाईल डीझायनिंग अशा पदव्या घेत फॅशन टेक्नाॅलाॅजीमध्ये आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविणारी गीता कॅस्टोलिनो ही बालमोहन शाळेतील अपंग विद्यार्थिनी, ही दंतकथा नसून हकीकत आहे. इच्छा म्हणजे आंकाक्षा. म्हणजे मनाच्या गाडीचं इंधन, ऊर्जा. जितकी आकांक्षा मोठी तितकी प्रगतीची गती अधिक. 'आंकाक्षा पुढती गगन ठेंगणे' ही अतिशोयक्ती नाही तर ते एक सत्य आहे. आकाशावर नेम धरावा, फार तर तो झाडाच्या शेंड्यापर्यंत जाईल. आता माणूस इतर ग्रहावरही जाण्याच्या तयारीत आहे. प्रथम वेडगळ वाटणार्या कल्पना माणसाने मूर्त स्वरूपात आणल्या. संत रामदास स्वामी म्हणतात "उत्कट भव्य तेची घ्यावे, मिळमिळीत अवघे टाकावें!" ही सृष्टीच मूळी चैतन्याचा अविष्कार आहे. सार्या सजीव प्राण्यांमध्ये मानवाने आपली उत्क्रान्ती केली ती केवळ आकांक्षाच्या बळावर. ह्यालाच म्हणतात आत्मीक शक्तीची अनुभूती. सोsअहं!

प्रत्येक व्यक्तीच्या इच्छा तशा भिन्न असतात तसेच स्थल-कालानूसारही बदलत असतात. त्यामूळे त्याची गणती न करता येण्यासारखी. 
                           'जशी दृष्टी तशी सृष्टी'
                           'जसा देश तसा वेष' 
                           'जशी माती तशी रूची'
                           'व्यक्ती तितक्या प्रकृती'
                           'जशी प्रकृती तशी मती' 
                           'जशी मती तशी आसक्ती' 
                           'जशी भक्ती तशी विरक्ती' 
इत्यादी सारे नैसर्गिक सिध्दान्त. ह्या संबंधी मी 'चातुर्वण्यम् मया सृष्टी गुणकर्मविभागशः' ह्या लेखात सविस्तर चर्चा केली आहे. अगदी इतर प्राणीमांत्रातही इच्छा ठासून भरलेली असते. हा सृष्टीचा नियम आहे. आपण जग जवळ आले असे म्हणतो. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्रान्तीमूळे आपण असे म्हणत असलो तरी विश्व प्रसरण पावत आहे, ही वस्तूस्थिती आहे. मानवी जीवनातील ज्ञानाच्या कक्षा वाढत आहेत. त्याला मर्यादा नाही. त्यामूळे मनात इच्छा निर्माण होणाची जी एक स्वाभाविक प्रक्रीया आहे तीचं सुध्दा विस्तारणं ओघाने होत असावे. त्यामूळेच वरील पोस्टमध्ये Desires, Prirorities, Choices, Actions हे अनेकवचनी रूपात दिसत आहेत. पण इच्छा, प्राधान्य, निवड ह्या सार्या गोष्टी जूळून आल्या तरी  Without action the combination of desire, prirority, and choice  would be just a fiction.

इच्छा शुध्द आहे; प्राधान्याबाबत गोंधळ नाही; निवडही ठोस आहे; कृतीतही हलगर्जीपणा नाही, तरी त्याला यश हूलकावणी देते. असा वर्ग म्हणजे आपला अन्नदाता, शेतकरी. असे का? पाऊस नसला की मेहनत वाया व बीयाणे वाया. पाऊस समाधानकारक ; पीकं तयार; पण नंतर गारपीटाचं संकट. कधी चांगला पाऊस; चांगलं पीक; पण शेतमालाला भाव नाही. असे हे दृष्टचक्र वाट्याला. इथे स्वातंत्र्यापूर्वी मोगल व ब्रिटिश सत्ताधारी; नंतर स्वातंत्र्यानंतर स्वदेशी सत्ताधारी. ह्यां सर्वांच्या  इच्छाशक्तीतच दोष. पावसाच्या पाण्याची साठवणी असो वा नद्यांच्यी जोडणी असो, ह्याबाबत ना इच्छा ना प्राधान्य, मग निवड तरी कशी असणार? कृती राहीली दूरच. ह्याला जबाबदार आपणही आहोतच. इच्छेचं रूपातंर उपभोगात, लालसेत, वासनेत मग निसर्गालाच ओरबडायचं; पर्यावरणाचा र्हास. मग नेमेची पाऊस, हवामान दगा देणारच.  इथेही गरज आहे ती इच्छेला सात्विकाचा आधार जोडण्याची.

इच्छेतून जसे शूभ विचार तयार होतात, तसेच विकारही निर्माण होतात. मनही अशुध्द,अशुभ असावे की काय असा प्रश्न पडतो. अन्यथा 'शुभेच्छा' हा शब्दच अस्तित्वात आला नसता. मनातील शूभसंकल्प पक्का असला, म्हणजे आपोआप बाधा पोषक ठरतात. निंदकच स्तुतिपाठक होतो. पण इच्छेतून विकार बाहेर येऊ लागले की प्राधान्य ही दुर्गंधीमय होते, पाठोपाठ निवड बनते अडगळ. शेवटी कृतीच विकृती होते. 

एकदा एका राज्यातील तरूणांना राजदरबारी नोकर्या मिळावेत अशी इच्छा झाली. त्यानीं तेथील राजाला शुध्द पोटी ही इच्छा व्यक्त केली असती तर प्रश्न नव्हता. परंतू ह्या तरूणांनी राजदरबारातील वृध्दांना काढावे आणि आम्हा तरूणांना नोकर्या द्याव्यात, आम्ही राज्याचा कायापालट करू असे राजापुढे मत मांडले. राजाने म्हटले, "हो, तरूणांची आता भरती करायला हवी. पण तुम्ही मला एका प्रश्नाचे उत्तर द्या. जर तुमच्या राजाच्या डोक्यावर कोणी लाथ मारली तर त्या इसमास काय शिक्षा द्यावी?" कसलाही विचार न करता ते तरूण म्हणाले " महाराज त्या इसमाला लागलीच चौकावर चाबकाचे फटके मारावेत आणि फाशी द्यावी". हाच प्रश्न राजाने आपल्या दरबारातील वृध्द सेवकांना प्रश्न विचारला." त्यावर ते वृध्द सेवक म्हणाले "आम्हांला थोडा अवधी द्या". राजाने त्यांना थोडा अवधी दिला. ते वृध्द सेवक एका कोपर्यात गेले. तोवर ह्या तरूणांनी राजाला म्हटले " बघितलं महाराज, असा हा ह्यांचा वेळकाढूपणा". दरम्यान तिथे कोपर्यात वृध्द सेवकांनी विचार केला, राजाच्या डोक्यावर लाथ मारायची हिम्मत कोणाला होणार? आणि मारणार तरी कशी? महलात तर राजासोबत युवराज आणि राणी असतात. अगदी नजीकचे म्हणून राणी वा युवराज राजाच्या डोक्यावर लाथ मारू शकतात, मग त्यांना शिक्षा आपण कशी सूचविणार? बस ते राजापाशी आले आणि म्हणाले " महाराज त्या इसमाला सोडून द्यावे." राजानी तरूणांना सांगितले  "दरबारातील कारभार बघण्यास ही वृध्द मंडळीच योग्य आहेत. तुम्ही तुमच्या कुवतीनूसार काय तो अर्थ लावा किंवा बोध घ्या." इच्छेचं ईर्ष्यात रूपातंर झाले की काय होतयं ते आपण पाहीलं. तो राजा विवेकशून्य नव्हता. म्हणून पुढचा अनर्थ टळला.

आजकाल इच्छेऐवजी इर्षेची लागण पाहावयास मिळते. स्पर्धेच्या नावाखाली मूळ इच्छेचं स्वरूप नष्ट झाल्याचा अनुभव येतोय. चंगळवाद, उपभोगता, स्त्रीया-मुलींवर होणारे अत्याचार, खून-दरोडे, फसवेगिरी, भ्रष्टाचार, आर्थिक घोटाळे, दशहतवाद, नक्षलवाद, जगभरात निर्माण झालेली साम्राज्यवादाची लालसा, भयानक स्वरूप घेत असलेली शस्त्रस्पर्धा, सत्ताधार्यांच्या सत्तेची भूक ह्या सार्या गोष्टी काय दर्शवीत आहेत? इच्छा ह्या सात्वीक स्वरूपाच्या असाव्या लागतात. नसल्या की प्राधान्य बदलतात, मग हातून दुष्कृत्यें घडतात. मुळ इच्छा सात्वीक स्वरूपाचीच असावी. म्हणजे 'ना लालसा ना वासना'. 'ना प्रेम ना हेवा'. पण विवेक हरवून बसलो की शूभसंकल्पाची जागा अनाठायी, बाधक विकल्प घेतात. "मनी वसे, ते स्वप्नी दिसे" असे आपण म्हणतो. त्याच न्यायाने "मनी वसे,तेच हातून घडते" असे म्हणण्यात का येऊ नये? माणूस म्हणजे देवत्व आणि पशूत्व ह्यामधील एक ताण आहे. सार्याच गोष्टी मनाच्या पातळीवरून करावयाच्या झाल्या तर मनुष्याच्या पदरी दुःख आणि निराशा येते. म्हणून इच्छांना बुध्दीचाही बांध असावा लागतो. त्याला विवेक म्हणतात.स्कंद पुराणात मुनीवर्य यक्षमाताला म्हणतात," गुरूर्रेको विवेकः सदा ध्यायो!" 'मनाला लगाम लावा' असे म्हटले जाते, ते योग्यच होय. सार्या गोष्टी केवळ बुध्दीच्या पातळीवरून सोडविण्याचा प्रयत्नही वेडसरपणा ठरतो, कारण मनाची संवेदनशीलता शुष्क होऊन जाते. फक्त शरीर हाच देह मानला तर शेपूट नसलेला पशू हीच आपली ओळख होईल. म्हणून देवत्वाचा ध्यास हा सर्व प्रकारच्या इच्छा-आकांक्षांना सात्विक आधार बनू शकतो. म्हणजेच प्रवृत्तीकडून संस्कृतीकडे जाण्याचा प्रयत्न करणे. हाच उपाय संत रामदास स्वामीनी दिला आहे. 

          सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे| 
                परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे ||

बुधवार, ४ एप्रिल, २०१८

ॲट्राॅसिटी ॲक्ट,न्यायालयाची ॲक्शन व अंदोलन


अनुसूचित जाती-जमातीच्या मागास व दुर्बळ लोकांवरील अत्याचारांना पायबंद रोखण्यासाठी १९८९ साली भारत सरकारने ॲट्राॅसिटी ॲक्ट पारित केला होता. त्या कायद्यात अशी तरतूद आहे की ज्या व्यक्तीवर वर नमूद केलेल्या समाजातील वर्गावर अत्याचाराचा आरोप असेल तर ॲट्राॅसिटी कायद्याच्या कलम१८ अन्वये त्या व्यक्तीला अटक पूर्व जामीन न देता तात्काळ अटक होत असे. बुधवार २० मार्च रोजी माननीय सर्वोच्च न्यायलयाने डाॅ सुभाष महाजन विरूध्द महाराष्ट्र सरकार ह्या विषयाशी संबंधीत याचिकेवर  सुनावणी करताना विना चौकशी आरोपीला तात्काळ अटक करता येणार नाही असा निर्णय दिला. हा निर्णय देते वेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने आरोपी सरकारी कर्मचारी असेल तर त्याला अटक करण्यासाठी आरोपीच्या वरीष्ठ अधिकार्याची लेखी परवानगी घ्यावी लागेल तसेच आरोपी सरकारी कर्मचारी नसेल तर वरिष्ठ पोलीस अधिक्षकाची लेखी परवानगी घ्यावी लागेल अशी अट ही टाकली. आणखिन पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालयाने, दोन्ही प्रकारच्या आरोपींना अटक करावयाची असेल तर अटकेची परवानगी देणार्या अधिकार्याने सोबत कारणें जोडावीत हे ही स्पष्ट केले.

ॲट्राॅसिटी कायद्या संबंधीत  डाॅ सुभाष महाजन विरूध्द महाराष्ट्र सरकार ह्या याचिकेच्या  खोलात न जाता ही, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून स्पष्ट दिसतेय कि सर्वोच्च न्यायालयाला ॲट्राॅसिटी ॲक्टचा दुरूपयोग होत असावा, ह्याची ठाम खात्री झालेली दिसते. त्यामूळे, सर्वोच्च न्यायालयाने वरील निर्णयासंबंधी पुनर्विचार याचिका जी केंद्र सरकारने दाखल केली आहे त्यावर सुनावणी बाकी आहे. त्यामुळे परवा सुरू झालेली  जाळपोळ हा अतातायीपणा वाटतो. सरकारी मालमत्तेची जाळपोळ करून आपण क्रान्तीकार आहोत, अमक्या शहरात आमचाच आवाज आहे असे दाखविण्याची स्पर्धा काही राजकीय पक्षात आहे. याचे भान सुप्रिम कोर्टाला आहे. म्हणून सुप्रिम कोर्टाने २० मार्चच्या निर्णयाला स्टे देण्याची मागणी फेटाळून लावली आहे. समाजशास्त्राचा आणि मानसशास्त्राचा  ज्यांचा अभ्यास आहे अशी मंडळी निश्चीतच मान्य करतील  कि एखाद्या कुटूंबात एका मुलाचे अती लाड झाले कि ते मूल डोक्यावर बसते. तद्वतच फार काळापासून सुरू राहीलेल्या आरक्षणाची सवलत, आणि ॲट्रासिटीसारख्या कायद्याचं हत्यार हाती मिळालं की मूल डोक्यावर बसण्याची शक्यता नाही असे कसे मानता येईल? आणि मानले तरी किती काळासाठी? कुटुंबातील इतर मुलांची काळजी घेऊ नये का? आज देशातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या जातींनांही आरक्षण हवेसे वाटू लागलंय. एकविसाव्या शतकातील महासत्ता होण्याची स्वप्न पाहणार्या आपल्या सारख्या देशात सर्वच समाजबांधवांना आरक्षण हवे असे वाटणे उचीत आहे का? न्यायालयं कधीही भावनेच्या आहारी जाऊन निर्णय देत नसतात. त्यांना राजकीय फायद्या-तोट्याचं गणित मांडून निर्णय द्यावयाचा नसतो. त्यामूळे परवा सर्वोच्च न्यायालयाने म्हटले "आम्ही कोठल्या एका समाजाविरूध्द नाही, ॲट्राॅसिटी कायद्याच्या ढाचाला सुध्दा आम्ही बदललेलं नाही. कायद्यातील सवलतीतून उगीचच दुरूपयोग करण्याची संधी मिळू नये आणि निर्दोष व्यक्तीचा छळ होता कामा नये" हाच आमचा हेतू आहे". 

मुळात ॲट्राॅसिटीचा कायदा पास झाला, त्या वेळेला सत्तेवर भाजपा नव्हता, आणि कायदा सर्वसंमतीने किंवा बहूमताने पास झालेला असला तरी ह्या कायद्यात काही त्रूटी असतील, तर त्याचं खापर वर्तमान मोदी सरकारवर फोडावयाची गरज नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने २० मार्चच्या आपल्या निकालपत्रात स्पष्टपणे म्हटलं आहे कि 'ॲट्राॅसिटीच्या कायद्यातील कलम १८ नुसार, आरोपीला अटकपूर्व जामीन देण्यास पूर्ण प्रतिबंध कोठे आहे?'. सर्वोच्च न्यायालयापेक्षा  कायद्याचा अभ्यास  जाळपोळ करणार्या टपोरी पोरांना वा त्यांच्या नेत्यांना अधिक आहे असे समजावयाचे का आपण? ॲट्रिसिटी 
ॲक्ट संबंधीबाबत ज्या काही शंका-कुशंका असतील त्यावर सरकारशी सहकार्य करून सोडविता येऊ शकतात. त्यासाठी मोदी सरकारला आरोपीच्या पिंजर्यांत उभे करण्याची जरूरी नाही. आणि जाळपोळ, हिंसक कृत्ये करणे हे तर बेशरमपणाचे लक्षण. अगदी तुमच्या मागण्या रास्त असल्या तरीही.

आपल्या येथील राजकीय पक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रीया देताना आम्ही कायद्याचा आणि न्यायालयाचा  मान राखतो असे म्हणतात, पण दुसर्या बाजूने त्या निकालावरून  राजकीय फायदा उठविण्यासाठी समाजातील विशिष्ट वर्गांना हाताशी धरून अंसतोष माजविण्यासाठी अंदोलने करीत सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे, जाती-जमातींत तेढ वाढविण्याच्या धोकादायक खेळी रचत असतात. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या पुनर्विचार याचिकेचा निकाल यावयाच्या अगोदरच दलीत बांधवांनी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्याचा धूडघूस सुरू केलेला आहे. हे अंदोलन पूर्वनियोजीतच.  हे अंदोलन अजूनही तीव्र ही होण्याची शक्यता आहे. मला प्रश्न हा पडलाय की डाॅ बाबासाहेब आंबेडकरांची भारतिय संविधानाचा शिल्पकार म्हणून पूजा करावयाची , आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी 'माझं नाव बंडखोर म्हणून नोंद होणार नाही ह्याची काळजी घ्या' हा सल्ला दलित बांधव व त्यांचे नेते पाळत का नाहीत? सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल पचविण्याची ताकद जर नसेल, तर अशा लोकांनी आणि त्यांच्या नेत्यांनी डाॅ बाबासाहैब आंबेडकराचं नाव घेण्याचं बंद करावं. अंदोलनं करता येतात, जाळपोळ करता येते, आणि वर आम्ही क्रान्तीचा झेंडा हातात घेतला आहे असे म्हणत मिरवावयाचे हे अनुचीत आहे. खरं म्हणजे क्रान्तीची भाषा करण्यांना मागासवर्गीय का म्हणावे? सवलती घ्याव्यात आणि कर्तव्ये पाळायची नाहीत, हाच स्वातंत्र्याचा, बंधुत्वाचा, समतेचा अर्थ आहे काय?

केवळ दलीत बांधव अंदोलनाला हिंसक स्वरूप देतात असे समजण्याचे कारण नाही. कुठे जातीची अस्मिता, तर कुठे प्रादेशिक अस्मिता पेटविण्याचे काम करीत दंगा, सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ, मोडतोड करणे, असे प्रकार होत असतात. त्यातूनच राजकीय पक्षांच्या नेत्यांना थोरपद प्राप्त होत असते. हे आपल्या राजकीय व्यवस्थेला लागलेली मोठी खोड आहे.  मग कोणी स्वतःला पुरोगामी माना, वा गांधीवादी. सब घोडे बारा टक्के. कोणी छत्रपतींचं नाव घेतात, कोणी राणा प्रतापांचं. कोणी शाहू-फूलेंच तर कोणी पेरियनचं. कोणी राणी पद्मावतीचं. आणि ही नावं ज्यांना परिचीत नाहीत ते अफझल गुरू, तालीबान, लादेन ह्यांची किंवा लेनीन, स्टॅलीन, कार्ल मार्क्स, माओ इत्यादींची नावे घेऊन तोडफोड, जाळपोळ करीत असतात.अलीकडे  कन्हैया, मेवानी सारखे साम्यवादी युवक आजादी, रोटी,कपडा, सर्वधर्मसमभावाच्या गप्पा मारत चमकण्याचा प्रयत्न करीत आहेत. ह्या साम्यवादी युवकांनी चीनमध्ये जाऊन आजादीच्या घोषणा करून दाखवाव्यात. साम्यवादी जेव्हा  स्वातंत्र्य आणि सर्वधर्मसमभाव, अंहिसाच्या गप्पा मारतात तेव्हा वांझ म्हशीने वीस लिटर दूध दिल्याची  बातमी ऐकल्यासारखे वाटते.   

लोकसभेच्या निवडणूकीचे वेध सर्वच पक्षांना लागले आहेत. ते ही स्वाभाविकच आहे म्हणा. प्रत्येक पक्ष आपल्या हिताची काळजी घेणार हे ही ओघाने आलेच. भाजप ही धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे असे मानण्याचे कारण नाही. प्रश्न हा आहे की राष्ट्रीय संपत्तीची नासाडी किती वेळ करीत रहावयाचे? प्रांजळपणे आणि निरपेक्ष भावनेने एवढंच म्हणता येईल कि अलीकडचा तोंडी तलाकासंबंधीचा निर्णय असो, वा पद्मीनी राणीवरील पद्मावती चित्रपटामूळे उठलेलं वादळ असो, कर्नाटकातील लिंगायत समाजाला धार्मिक  दर्जा देण्याचा निर्णय, आणि ॲट्रासिटी कायद्यासंबंधातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असो, ह्या सार्या बाबीशी पंतप्रधान मोदी आणि त्यांचं सरकार ह्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध नाही. ह्यातून जे काही अंदोलने उभी राहात आहेत ही फसवी आहेत. तोंडी तलाखा संबंधी रविवार ४ फेब्रवारच्या मटामधील संवाद पुरवणीत लिहिलेल्या आपल्या लेखात मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष श्री शमशुदीन तांबोळींनी शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळेंच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आणि त्या नाराजींतून त्यानी मुस्लीम सत्यशोधकचे संस्थापक आणि विचारवंत दिवंगत हमीद हलवई जे सतत म्हणत असलेले वाक्य, त्या लेखात पेरले आहे. ते असे आहे, "काही पुरोगामी हिंदू मंडळी मुस्लीमांची इतकी बाजू घेतात, कि ती मंडळी मुस्लीमाहून अधिक मुस्लीम वाटतात". दलीत समाजाबद्दल सार्या विरोधी पक्षांना वाटणारी सहानुभूती तसेच लिंगायत समाजाबद्दल काॅग्रेसला वाटणारी सहानुभूती ह्याच प्रकारात मोडते. 

खरं म्हणजे मोदी सरकार विरूध्दच्या लढाईत सरळ मार्गाने जिंकता येणार नाही ह्याची जाणीव विरोधी पक्षांना झालेली आहे.Biggest challenge in front of all opposition parties is Modi's popularaty which is in tact. कर्नाटकातील निवडणूका हे राहूल गांथीच्या कुवतीसंबंधीची ठरणार आहे.  तिथेही Huge antiincumbancy is prevailing against Congress Rule. नोटाबंदी दिवस हा ' काळा दिवस ' मानण्याचा कार्यक्रम फ्लाॅफ ठरला. उत्तर  भारतात काॅग्रेसचे नामोनिशाण राहीले नाही. भाजप शासीत मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधील लढाईत काॅग्रेस कडवी झुंज देण्याइतकी बलशाली नाही. राजस्थान मध्ये काॅग्रेस विधानसभेत भाजपाला कडवी झुंज देईल पण लोकसभेच्या निवडणूकीत काॅग्रेस भाजपावर मात करील असे वाटत नाही. मोदी सरकार विरूध्द भ्रष्टाचारचा आरोप करता येत नाही. भाजपा अध्यक्ष श्री अमीत शहांच्या मुलावर कमाॅडीटी व्यवहारात  भ्रष्टाचाराचा जो आरोप विरोधी पक्ष करीत आहेत, त्यासंबधीचे पुरावे विरोधी पक्षाकडे नाहीत. त्यातही बहूतांश विरोधी पक्षांच्या नेत्यावर  भ्रष्टाचाराचे आरोप असल्यामूळे  त्यासंबंधीच्या लढाईत जोश दिसणार नाही. विरोधी पक्षांची आघाडी आकारास येण्यामध्ये महत्वाचा अडसर आहे, तो म्हणजे, प्रादेशिक पक्षातील नेत्यांमध्ये सर्वात सक्षम कोण, हे दाखविण्याची स्पर्धा.  त्यामुळे चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी, वायएसआर, के राव, शरद पवार इत्यादी नेते ॲक्टीव झालेले दिसत आहेत. वस्तुस्थिती ही आहे की आपण मोदीजींना हरवू शकतो, ह्याबद्दलचा आत्मविश्वासच विरोधी पक्षाकडे नाही. काही विरोधी पक्ष कुंपणावर बसले आहेत. काही विरोधी पक्ष नैराश्याच्या गर्केत पडले आहेत. त्यामुळे काहीतरी कारणे शोधून विरोधी पक्षातर्फ  हिंसक अंदोलने  केली जात आहेत. ह्यात  त्यांना आणि देशाला काय फायदा होणार आहे  ह्याचं उत्तर जनता २०१९च्या निवडणूकीत देईल. पण तोपर्यंत  'सर्वात मोठी लोकशाही' असा बिल्ला लावून होणारा  रेल्वे रोको किंवा उपोषण, कुठे मार्चा  कुठे हिंसा, कुठे जाळपोळ, कुठे पुतळ्यांची विटंबना पाहात रहावे या पलिकडे आपण मतदार किंवा लोकशाहीचे मालक काही करू शकत नाही. 

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...