ईश्वराचं अस्तीत्व कोणी मानो की न मानो, तसेच महाभारत घडले की नाही, ह्यावर मतभिन्नता असली तरी एक साहित्यकृती म्हणून महाभारत सर्वोच्च पातळी वरची आहे. आणि तशी उंची गाठणारी साहित्यकृती ना निर्माण झाली, ना भविष्यात निर्माण होणार. हे ही पटण्यासारखे आहे. महर्षी व्यास हे महाभारताचे लेखक. हस्तीनापूरमधील कूरू वंशात १०० कौरव व पांडव ५ असे का जन्मले? ह्या प्रश्नाच्या उत्तरातच परनिंदा, परपीडा सारख्या दूर्गणांच्या जन्माचे रहस्य दडले असावे असेच वाटते. ह्या विश्वात जिथे म्हणून मानव समाज आहे, तिथे सर्वत्र १०० कौरव आणि पांडव ५ असावेत असे वाटते. आजच्या मानवी समाजाच्या स्थितीचं जे वर्णन वृत्तपत्रातात लेखाद्वारे वा आपल्या साहित्यकृतीतून तत्त्ववेत्ते , साहित्यिक मंडळी तसेच मानसशास्त्रज्ञ, मांडताना दिसत आहे, ते सारं कलीयुगाची जी वैशिष्टे आपल्या पुराणात, गुरू चरीत्रात तसेच वैदिक ग्रंथात वर्णीले आहे, त्याच्याशी मिळतं-जुळतं आहे. निसर्गात काटेरी झुडपें वाढतात, त्यांच्या वाढीला ना सूर्यप्रकाशाची गरज, ना खतांची वा मशागताची गरज. मानवी मनाची ठोस व्याख्या आधुनिक विज्ञानाला पूर्णपणे मांडता आलेली आहे, असे काही दिसत नाही. पण We get attracted towards bad ideas at faster speed असे मानसशास्त्रही मानते. मानवी मन चंचल आहे आणि त्या चंचलेतेचा कारक चंद्र असतो असे ज्योतिष शास्त्र मानते. ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसला तरी प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला तरी ती व्यक्ती निश्चितच मान्य करेल की आपले मन चंचल आहे आणि विकाराकडे वा विकृतीकडे लौकर धावते. आंबा फणसांची झाडे वाढवावयास वर्षे जातात. हा ही आपला अनुभव आहे. विश्वाच्या उत्त्पत्ती ज्या ऊर्जेने झाली आहे ती ही सकारात्मक (धन) आणि नकारात्मक(ऋण) अशीच आहे. ह्याचा अर्थ परनिंदा, परपीडा हे दोष आपल्यात नैसर्गिक आहेत. परंतु असेच मानावयाचे ठरविले तर नुकताच जन्मलेले बाळ निरागस, निरपेक्ष वृत्तीचे असते हे खोटं कसे मानावे ?
मग आपल्या समोर प्रश्न हा पडतो की जन्मतः आपण निरंकारी, परनिंदेची बाधा न झालेले असतानाही परनिंदा ह्या रोगाला बळी कसे पडतो? कुठल्या वयापासून आपल्याला परनिंदेची लागण होते? बालवयात की पौंगड अवस्थेत? असे प्रश्न उभे राहात असतात. तशा प्रकारच्या शंका येणे हे ही स्वाभिविक आहे. परंतु त्यात रूतण्या ऐवजी शंकेचं निरसन करण्याची जी बुध्दी ईश्वराने आपल्याला दिलेली आहे. तिचा पध्दतशीर वापर केला की, शंका-कुशंकांचे निरसन करता येते. आधूनिक मानसशास्त्रज्ञ, मानवअनुवंश शास्त्रज्ञही मान्य करतात की संस्कारक्षम वय असते, तेव्हा जसे घरात वातावरण असते त्याचा परिणाम बालकांवर होत असतो. अध्यात्मिक गुरू ही असेच म्हणतात. 'संस्कारः एक धनं न क्षीण जायते | ' मानवी बुध्दीला जडत्व असते. अध्यात्म विशेष करून आपल्या संस्कृतीतले, म्हणते की बाळावर संस्कार मातेच्या गर्भात असतांना होत असतात. म्हणूनच 'घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती' ह्या आधारावर गरोदर स्त्रियांना मार्गदर्शन कुठले मिळावे, त्यांनी कोणती पुस्तके वाचावीत इत्यादी संबधी चळवळ सुरू झालेली पाहतो. प्राचीन काळापासून गर्भ संस्कार विधी आपल्या कडे मान्यता पावलेला आहे आणि त्यात तथ्य असावे. परंतु केवळ त्यावरच अवलंबून राहून गरोदर स्त्रीने आधूनिक वैद्यक शास्त्राप्रमाणे आहार, औषधे न घेणे म्हणजे जन्माला येणार्या बालकाला संकटात टाकण्यासारखे ठरते. आधूनिक औषधे, उपचारामुळे जन्मतःच मृत्यू होणार्या अर्भकांची संख्या घटली आहे. मानवाचं आयुर्मन वाढले हे ही सत्य आहे.
साधारणतः एखादं बालक सात वा आठ वर्षाचं होत असते तेव्हापासून त्याला घरात रागाने कोण आणि काय म्हणतयं, प्रेमाने कोण म्हणतयं आणि कसे म्हणतय, इतकंच काय विनोद, चेष्टा, निंदा ह्या संबंधातील घरात होणार्या चर्चा, घरातल्या मंडळींचे अहिर्भाव ते बालक ग्रहण करीत असते. मग हळूहळू वयात यावयास सुरूवात झाली की परनिंदेची लागण त्याला होत असावी. ह्या सृष्टीतील सगळेच प्राणी अनुकरण प्रिय असतात, असे आजचे विज्ञान सांगते. परंतु इथेही एक प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती ह्या न्यायाने पाहता, प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र बुध्दी, आणि स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती, घेऊनच जन्मते, त्याचे काय? त्यामूळे नैसर्गिक नियम, तसेच अनुकरणीयता, ह्या दोहोंपलीकडे काही कारणे असतात, ज्यामूळे परनिंदाचा रोग जडतो. आता त्यावर थोडेसे बोलत बोलत परनिंदेच्या रोगातून मुक्त कसे होता येईल हे पाहू.
परनिंदेला सर्वात अधिक पूरक आणि माणसाचा सर्वात मोठा शत्रू कुठला, तर तो अहंकार. तसा तो जन्मतः असतो. त्याचं मूळ स्वरूप स्व. ह्या स्व चा परीणाम असा असतो कि आपण पाहूणे म्हणून कोणाकडे गेलो आणि त्या यजमानांच्या घरातील लहान मुलाला आपलं नाव विचारलं तर ते मूल झटकन नाव सांगत नाही. कारण त्याला ती त्याची वस्तू वाटते. म्हणजेच मालकीची भावना. हा माझा अनुभव आहे. अर्थात ह्याबाबत मतभिन्नता, अपवाद ही असू शकतात. पण अंहकारामुळेच मनुष्य परनिंदा करू लागतो. हे सत्य आहे. मी बुध्दीमान पराक्रमी, कर्तृत्ववान असा माणसाला गर्व होतो, तेव्हा त्याला इतरेजन कःपदार्थ वाटू लागतात. कोणाला रूपाचा, कोणाला ज्ञानाचा, कोणाला श्रीमंतीचा, असे हे गर्वाचे प्रकार. समाजातल्या प्रत्येक थरातील लोकामध्ये अहंकाराचे असे प्रकार दिसतात. आणि हे प्रकार आपल्या अवती-भोवती लोकांच्या तूलनेतून होत असतात. परनिंदेच्या स्वरूपात सापेक्षवाद लागू होत असतो. त्यामुळे अंहकार आणि त्यातून जडलेला परनिंदेचा रोग ह्या दोहोंचं स्वरूप आणि पातळी समाजातील आर्थिक, व शैक्षणिक थरानुसार भिन्न असते.
दुसरे कारण दांभिकता. स्वतःच्या अंगी गुण नसतात ,म्हणून परनिंदेचा रोग जडतो. अशी व्यक्ती बढाया मारण्यात पटाईत असतात. परंतु गम्मत अशी आहे कि, तशा इसमाची निंदा करताना आपण सारे परनिंदेचे रूग्ण बनतो. आपण त्या इसमास काय म्हणतो, "अहो आपल्या पायाखाली काय जळते आहे, ते आधी पहा! 'लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण' असे काय कामाचे?". परनिंदेचं लोण हे अशाच तर्हेने पसरत असावे. हा प्रकार समूह मानसशास्त्राशी निगडीत असावा.
मत्सरामुळे मनुष्य परनिंदा करतो, मत्सरी वृत्ती कर्तृत्त्वहिनतेतून उत्पन्न होत असावी. गुणाची पारख नसल्यामुळे मनुष्य निंदाशील बसतो. ज्यांच्या अंगी योजकता नसते, किंवा आळस शिरलेला असतो, अशी माणसे परनिंदेचे रूग्ण बनतात. ज्यांच्या समोर ध्येय नाही, वेळेचा सदुपयोग करण्याचा विचार ज्यांच्या मनाला स्पर्श करीत नाही, असे लोक परनिंदेत अधिक मग्न होत असावेत असे मला वाटते.
परनिंदा संदर्भातील आपण जी वर चर्चा केली, त्यात ज्या षढरिपूंचा उल्लेख केला आहे ते आपल्यातही कमी अधिक प्रमाणात असतात. चांगले कार्य पार पाडावयाचे असल्यास 'मी' बाजूला ठेवून 'आम्ही' ह्या शब्दाच्या नुसता प्रयोग केला तरी कार्य तडीस जाते. सहकाराच्या तत्वावर मोठमोठे प्रकल्प, उद्योग, चळवळी उभ्या राहील्या आहेत. हा आपला सार्वत्रिक अनुभव आहे. जी काही प्रगत राष्ट्रे आपण पाहतो, ती जरी विज्ञानाच्या आधारामुळे प्रगत झाली असली, तरी तेथील लोकामध्ये परस्पर आदर देण्याची वृत्ती आहे, हे ही एक कारण आहे. कोणी कोणाला टाकून बोलत नाहीत. देशबांधव परस्परांना उमेद देत असतात. आपल्या राजकिय पक्षांमधील संसदेत चाललेली भांडणं, गोंधळ आपण टिव्ही वरून पाहतो, त्यामुळे परनिंदेच्या विकृतीने समाजाला विळखा घातला आहे ह्या बद्दल आश्चर्य वाटत नाही. ज्या मंडळीने समाजाला दिशा द्यावयाची त्याचं वागणं हे असे आहे. 'राजा कालस्य कारणम्।' असे म्हणून त्या मंडळींना गप्प करता येत नाहीं. कारण लोकशाहीत आपणच खरे राजे. परंनिदा ही फार घातक आहे. व्यासमूनींच्या महत्वाच्या दोन वचनातील हे वचन 'पापाय पर पीडनम्।' परनिंदेचे दुष्परीणाम आपल्या दिसत नाही. It is like slow poisioing. व्यक्ती आणि समाजाच्या मनाला किड लागते. निंदेमुळे कालापव्यय होतो. शारिरीक, मानसिक शक्तीचा क्षय होतो. अनेकांची जीवने विनाकारण उध्वस्त होतात. निंदा ज्यावर होते ती व्यक्ती मानसिकरित्या हतबल होण्याची शक्यता असते. आणि निंदा करणार्याच्या मनातील सकारात्मक ऊर्जेचा साठा संपू लागतो आणि शेवटी ती व्यक्ती ही मनोरूग्ण बनण्याची शक्यता असते.
विकोपाला गेलेल्या परनिंदेवर मात करण्यासाठी उपाययोजना करावयाची असेल तर प्रथम 'आपण सारे परनिंदेचे समान रूग्ण आहोत' अशी भावना ठेवली की स्वतः पासून सुधरावयाची इच्छा निर्माण होऊ शकते. Charity begins at home. आसक्ती आणि विरक्तीच्या पलीकडे गेलेले तुकाराम महाराज देवाकडे "बालपण देगा देवा" असे मागणे मागतात. का? त्यांची वृत्ती, आचरण बालमनासारखे स्वच्छ निर्मळ झाले नव्हते का? झाले होतेच की. मग विठ्ठल माऊलीकडे त्यांनी असे मागणें का केले असावे? निवृतीच्या किंवा परमसिध्दीच्या परम टोका कडच्या प्रवासाकडे असताना त्यांनी देवाकडून बालपण मागितले. ह्याचा अर्थ त्या प्रवासातही ते आत्मपरिक्षण करीत असावे. अजूनही आत्मशुध्दी होणे आवश्यक आहे असे त्यांना जाणवत असावे. सार्या संताची चरीत्रे वाचल्यानंतर त्यांनी जे काही देवाकडे मागितले ते आपल्यासाठीच. त्यांचा प्रत्येक शब्द सुविचार. ह्याचा अर्थ हाच की आपण सार्यांनी बालकांसारखे निरागस होण्याचा प्रयत्न करणे. "जसा विचार, तसा आचार; जसा आचार ,तसा जीवनाला आकार." हे सूत्र अध्यात्मिक गुरू मांडतात. आधूनिक वैद्यकशास्त्रही हेच म्हणते. ह्याचा अर्थ हाच की विज्ञान आणि अध्यात्म ह्या दोहोंचा संगम घालावा. म्हणजे आपण षढरिपूवर आपण मात करू शकतो.
माझ्या बहूतांश लेखामध्ये मी विज्ञानाची कास सोडली आहे असे दिसणार नाही. ह्या विश्वातील रहस्यें ही विज्ञानाच्या आधारेच सुटणार. शास्त्रज्ञही आधूनिक ऋषीमुनीच. युरोपातील प्रबोधन काळाचा आपल्या समाजावर सकारात्मक बदल झाला आहे हे ही मी मानतो.(चिज्ञपट आणि समाजमन हा लेख कृपया पहावा) विख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईनची दोन वाक्ये मी सतत लक्षात ठेवतो, ती अशी आहेत, पहीले "The most mystrious thing in this universe is the universe itself." आणि दुसरे "The immagination is more important than knowledge." म्हणजेच विश्वातील रहस्ये शोधण्याचा प्रवास अनंत आहे. तसेच आपल्या मनात उत्पन्न होणार्या नवीन कल्पनांना वार्यावर सोडू नये. कारण तशा कल्पनांतूनही ज्ञानाची निर्मीती होत असते, असेच आईन्स्टाईन साहेबांना सुचवावयाचे होते असे वाटते. पुढे जाऊन असेही म्हणता येईल की, जसे अध्यात्मात तप, ध्यान, जप, योग असे उपचार करून मनाला स्थिर करून परनिंदेची विकृती कमी करता येते, तसेच विश्वातील रहस्यें शोधण्यात रत झाले कि आपोआप परनिंदेची विकृती कमी होत जाते. ह्याला पुरावा काय? असं काय म्हणता राव, जेव्हा शास्त्रज्ञ विश्वाची रहस्ये शोधण्यात गर्क होतात तेव्हा ते आपोआप विश्वमय होतात. ते लौकीक दृष्टीने एखाद्या देशाचे नागरिक असले तरी , त्यांच्या मनात सार्या मानवी जीवनाचे कल्याणच असते. त्यांच्या मुलाखती, चरित्रे धुंडाळून पाहा. थोडक्यात काय अध्यात्म आणि विज्ञान दोन्ही विश्वाच्या वा त्या परमात्म्यावरील निष्ठेच्या परम टोकाकडे घेऊन जाणारे दोन मार्ग आहेत पण शेवटी एके ठिकाणीच मिळणार.
मित्रहो, अध्यात्मिक रित्या उन्नत होत जाणे, वा वैज्ञानिक संशोधनात रत होणे हे दोन्ही उपाय आपल्या सारख्या सामान्यजनांना पेलवणारे नाहीत. अधून मधून संत साहित्य वाचणे, विज्ञानातील गमती-जमती ऐकणे, हास्यविनोदाचे वावडे टाळणे, एखादा छंद जोपासणे, सामाजिक बांधिलकी जपणे, इत्यादी गोष्टी करता येतात आणि आपण करीतही असतो. पण गडबड कूठे होते? जेव्हा आपण एकत्र जमतो, तो एक गोंधळ ठरतो. मग सार्वजनिक उत्सवासाठी जमलो असो वा कुणाच्या घरात मंगल कार्यासाठी जमलेले असो. When many people sit together , it becoms crowd हा आपला दोष आहे. आणि तिथेच पुन्हा अहंकार जागृत होतो आणि परनिंदा सुरू होते. म्हणून संत मडंळीनी सतत नामस्भरण करावे असा सल्ला दिला. भगवंताने गीतेत सर्वात सोपा उपाय दिला आहे ज्यावर मी मागच्या लेखात तसेच इतर लेखात ही चर्चा केलेली आहे. तो सोपा उपाय म्हणजे 'नियतं कुरू कर्म त्वम्।' तोच अंमलात आणण्याचा प्रयत्न करू या, उद्याच्या नववर्षाच्या सुमूहूर्तावर. क्यों की किसीने कहा है " हम अपने कर्ममें इतने जुटे रहो की हमें दुसरोंकी निंदा करनेका समय ना मिले!"
आपण असे मानतो कि परमेश्वर सर्वत्र आहे. आणि जे काही आपण बोलू त्याला तो तथास्तु तथास्तु असा आशिर्वाद देत असतो. म्हणून आपण चांगले बोलावे. वाईटालाही वाईट म्हणू नये. कारण तशा प्रकारच्या उच्चारामुळे वाईटपणा वातावरणात फैलतो व कुठेतरी रूजतो आणि फोफावतो. आपल्या येथे अशी म्हण आहे की "नकट्याला म्हणू नये नकटे व धाकट्याला म्हणू नये धाकटे!". उद्या आपलं नव वर्ष आगमन करीत आहे. "प्राणीमात्रा जीवे लागे बर्या शब्दे " हा समर्थ रामदास स्वामीच्या उपदेशाची आठवण करूनच नवे वर्षे येत असते. गेल्या चैत्र प्रदिपदे पासून मी ब्लाॅगवर आपल्याशी संवाद साधावयास सुरूवात केली. ह्या वर्षअखेरचा हा शेवटचा लेख आपल्या पदरात ठेवला आहे. आपण सार्यानी वेळोवेळी चांगल्या सुचना दिल्या, प्रतिक्रीया दिल्या, माझं कौतुकही केले. त्याबद्दल मी आपला सदैव ऋणी राहीन. असेच प्रोत्साहान मला देत राहा, अशी विनंती करतो. आपल्या सर्वाना तसेच आपले परिजन इष्ट-मित्रांना हिदू नववर्ष सुखाचे, समृध्दीचे जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून मी इथे विराम घेतो.
धन्यवाद !
जय योगेश्वर !