शनिवार, १७ मार्च, २०१८

॥ परनिंदा भयावहा ॥

" परनिंदा भयावहा " ह्या वचनावर आधारीत एक ऑडीओ पोस्ट Whatapp ग्रुपवर आली. ती ऑडीओ क्लीप ऐकली. मी मनापासून दाद दिली. त्यात आजच्या समाजाला परनिंदा ह्या रोगाने कसा विळखा घातला आहे ह्याचं वास्तव चित्र समोर उभे राहीलं. परनिंदा भयावहा असे माहित असूनही  ती सवय आहे, स्वभाव आहे, चलता है, यही तो जिंदगी है, असे म्हणत आपण परनिंदा ह्या प्रवृत्तीला हसण्यावरून नेत आहोत, अशी जाणीव झाली. मूळात परनिंदा ही मोठी विकृती आहे. हे ही जाणवलं. माणूस परनिंदा का करतो? आणि परनिंदेची साथ समाजाला विळखा घालेपर्यंत वाढत का जाते, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधणे सोपं आहे. कारण बहूतांश आपण सारेच ह्या रोगाचे पेशंट आहोत. पण त्यावर इलाज काय? आणि कुठल्या डाॅक्टराकडे जावे लागेल? उपचार घेतले तर त्या बाधेचा संपूर्ण नायनाट होऊ शकेल का? ह्यावरील चर्चा शेवटी करू. प्रथम परनिंदा रोगाची निर्मीती कोठून सुरू होते, ते पाहू या. 

ईश्वराचं अस्तीत्व कोणी मानो की न मानो, तसेच महाभारत घडले की नाही, ह्यावर मतभिन्नता असली तरी एक साहित्यकृती म्हणून महाभारत सर्वोच्च पातळी वरची आहे. आणि तशी उंची गाठणारी साहित्यकृती ना निर्माण झाली, ना भविष्यात निर्माण होणार. हे ही पटण्यासारखे आहे. महर्षी व्यास हे महाभारताचे लेखक. हस्तीनापूरमधील कूरू वंशात १०० कौरव व पांडव ५ असे का जन्मले? ह्या प्रश्नाच्या उत्तरातच परनिंदा, परपीडा सारख्या दूर्गणांच्या जन्माचे रहस्य दडले असावे असेच वाटते. ह्या विश्वात जिथे म्हणून मानव समाज आहे, तिथे सर्वत्र १०० कौरव आणि पांडव ५ असावेत असे वाटते. आजच्या मानवी समाजाच्या स्थितीचं जे वर्णन वृत्तपत्रातात लेखाद्वारे वा आपल्या साहित्यकृतीतून तत्त्ववेत्ते , साहित्यिक मंडळी तसेच मानसशास्त्रज्ञ, मांडताना दिसत आहे, ते सारं कलीयुगाची जी वैशिष्टे आपल्या पुराणात, गुरू चरीत्रात तसेच वैदिक ग्रंथात वर्णीले आहे, त्याच्याशी मिळतं-जुळतं आहे.  निसर्गात काटेरी झुडपें वाढतात, त्यांच्या वाढीला ना सूर्यप्रकाशाची गरज, ना खतांची वा मशागताची गरज. मानवी मनाची ठोस व्याख्या आधुनिक विज्ञानाला पूर्णपणे मांडता आलेली आहे, असे काही दिसत नाही. पण We get attracted towards bad ideas at faster speed असे मानसशास्त्रही मानते. मानवी मन चंचल आहे आणि त्या चंचलेतेचा कारक चंद्र असतो असे ज्योतिष शास्त्र मानते. ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसला तरी प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला तरी ती व्यक्ती निश्चितच मान्य करेल की आपले मन चंचल आहे आणि विकाराकडे वा विकृतीकडे लौकर धावते. आंबा फणसांची झाडे वाढवावयास वर्षे जातात. हा ही आपला अनुभव आहे. विश्वाच्या उत्त्पत्ती ज्या ऊर्जेने झाली आहे ती ही सकारात्मक (धन) आणि नकारात्मक(ऋण) अशीच आहे. ह्याचा अर्थ परनिंदा, परपीडा हे दोष आपल्यात नैसर्गिक आहेत. परंतु असेच मानावयाचे ठरविले तर नुकताच जन्मलेले बाळ निरागस, निरपेक्ष वृत्तीचे असते हे खोटं कसे मानावे ?

मग आपल्या समोर प्रश्न हा पडतो की जन्मतः आपण निरंकारी, परनिंदेची बाधा न झालेले असतानाही परनिंदा ह्या रोगाला बळी कसे पडतो? कुठल्या वयापासून आपल्याला परनिंदेची लागण होते? बालवयात की पौंगड अवस्थेत? असे प्रश्न उभे राहात असतात. तशा प्रकारच्या शंका येणे हे ही स्वाभिविक आहे. परंतु त्यात रूतण्या ऐवजी शंकेचं निरसन करण्याची जी बुध्दी  ईश्वराने आपल्याला दिलेली आहे. तिचा पध्दतशीर  वापर  केला  की, शंका-कुशंकांचे निरसन करता येते. आधूनिक मानसशास्त्रज्ञ, मानवअनुवंश शास्त्रज्ञही  मान्य  करतात की संस्कारक्षम वय असते, तेव्हा जसे घरात वातावरण असते त्याचा परिणाम बालकांवर होत असतो. अध्यात्मिक गुरू ही असेच म्हणतात.  'संस्कारः एक धनं न क्षीण जायते | ' मानवी बुध्दीला जडत्व असते. अध्यात्म विशेष करून आपल्या संस्कृतीतले, म्हणते की बाळावर संस्कार मातेच्या गर्भात असतांना होत असतात. म्हणूनच 'घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती' ह्या आधारावर गरोदर स्त्रियांना मार्गदर्शन कुठले मिळावे, त्यांनी कोणती पुस्तके वाचावीत इत्यादी संबधी चळवळ सुरू झालेली पाहतो. प्राचीन काळापासून गर्भ संस्कार विधी आपल्या कडे मान्यता पावलेला आहे आणि त्यात तथ्य असावे. परंतु केवळ त्यावरच अवलंबून राहून गरोदर स्त्रीने आधूनिक वैद्यक शास्त्राप्रमाणे आहार, औषधे न घेणे म्हणजे जन्माला येणार्या बालकाला संकटात टाकण्यासारखे ठरते. आधूनिक औषधे, उपचारामुळे जन्मतःच मृत्यू होणार्या अर्भकांची संख्या घटली आहे. मानवाचं आयुर्मन वाढले हे ही सत्य आहे. 

साधारणतः एखादं बालक सात वा आठ वर्षाचं होत असते तेव्हापासून त्याला घरात रागाने कोण आणि काय म्हणतयं, प्रेमाने कोण म्हणतयं आणि कसे म्हणतय, इतकंच काय विनोद, चेष्टा, निंदा ह्या संबंधातील घरात होणार्या चर्चा, घरातल्या मंडळींचे अहिर्भाव ते बालक ग्रहण करीत असते. मग हळूहळू वयात यावयास सुरूवात झाली की परनिंदेची लागण त्याला होत असावी. ह्या सृष्टीतील सगळेच प्राणी अनुकरण प्रिय असतात, असे आजचे विज्ञान सांगते. परंतु इथेही एक प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती ह्या न्यायाने पाहता, प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र बुध्दी, आणि स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती, घेऊनच जन्मते, त्याचे काय? त्यामूळे नैसर्गिक नियम, तसेच अनुकरणीयता, ह्या दोहोंपलीकडे काही कारणे असतात, ज्यामूळे परनिंदाचा रोग जडतो. आता त्यावर थोडेसे बोलत बोलत परनिंदेच्या रोगातून मुक्त कसे होता येईल हे पाहू.

परनिंदेला सर्वात अधिक पूरक आणि माणसाचा सर्वात मोठा शत्रू कुठला, तर तो अहंकार. तसा तो जन्मतः असतो. त्याचं मूळ स्वरूप स्व. ह्या स्व चा परीणाम असा असतो कि आपण पाहूणे म्हणून कोणाकडे गेलो आणि त्या यजमानांच्या घरातील लहान मुलाला आपलं नाव विचारलं तर ते मूल झटकन नाव सांगत नाही. कारण त्याला ती त्याची वस्तू वाटते. म्हणजेच मालकीची भावना. हा माझा अनुभव आहे. अर्थात ह्याबाबत मतभिन्नता, अपवाद ही असू शकतात. पण अंहकारामुळेच मनुष्य परनिंदा करू लागतो. हे सत्य आहे. मी बुध्दीमान पराक्रमी, कर्तृत्ववान असा माणसाला गर्व होतो, तेव्हा त्याला इतरेजन कःपदार्थ वाटू लागतात. कोणाला रूपाचा, कोणाला ज्ञानाचा, कोणाला श्रीमंतीचा, असे हे गर्वाचे प्रकार. समाजातल्या प्रत्येक थरातील लोकामध्ये अहंकाराचे असे प्रकार दिसतात. आणि हे प्रकार आपल्या अवती-भोवती लोकांच्या तूलनेतून होत असतात. परनिंदेच्या स्वरूपात सापेक्षवाद लागू होत असतो. त्यामुळे अंहकार आणि त्यातून जडलेला परनिंदेचा रोग ह्या दोहोंचं स्वरूप आणि पातळी समाजातील आर्थिक, व शैक्षणिक थरानुसार भिन्न असते. 

दुसरे कारण दांभिकता. स्वतःच्या अंगी गुण नसतात ,म्हणून  परनिंदेचा रोग जडतो. अशी व्यक्ती बढाया मारण्यात पटाईत असतात. परंतु गम्मत अशी आहे कि, तशा इसमाची निंदा करताना आपण सारे परनिंदेचे रूग्ण बनतो. आपण त्या इसमास काय म्हणतो, "अहो आपल्या पायाखाली काय जळते आहे, ते आधी पहा! 'लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण' असे काय कामाचे?". परनिंदेचं लोण हे अशाच तर्हेने पसरत असावे. हा प्रकार समूह मानसशास्त्राशी निगडीत असावा. 

मत्सरामुळे मनुष्य परनिंदा करतो, मत्सरी वृत्ती कर्तृत्त्वहिनतेतून उत्पन्न होत असावी. गुणाची पारख नसल्यामुळे मनुष्य निंदाशील बसतो. ज्यांच्या अंगी योजकता नसते, किंवा आळस शिरलेला असतो, अशी माणसे परनिंदेचे रूग्ण बनतात. ज्यांच्या समोर ध्येय नाही, वेळेचा सदुपयोग करण्याचा विचार ज्यांच्या मनाला स्पर्श करीत नाही, असे लोक परनिंदेत अधिक मग्न होत असावेत असे मला वाटते.

परनिंदा संदर्भातील आपण जी वर चर्चा केली, त्यात ज्या षढरिपूंचा उल्लेख केला आहे ते आपल्यातही कमी अधिक प्रमाणात असतात. चांगले कार्य पार पाडावयाचे असल्यास 'मी' बाजूला ठेवून 'आम्ही' ह्या शब्दाच्या नुसता प्रयोग केला तरी कार्य तडीस जाते. सहकाराच्या तत्वावर मोठमोठे प्रकल्प, उद्योग, चळवळी उभ्या राहील्या आहेत. हा आपला सार्वत्रिक अनुभव आहे. जी काही प्रगत राष्ट्रे आपण पाहतो, ती जरी विज्ञानाच्या आधारामुळे प्रगत झाली असली, तरी तेथील लोकामध्ये परस्पर आदर देण्याची वृत्ती आहे, हे ही एक कारण आहे. कोणी कोणाला टाकून बोलत नाहीत. देशबांधव परस्परांना उमेद देत असतात. आपल्या राजकिय पक्षांमधील संसदेत चाललेली भांडणं, गोंधळ आपण टिव्ही वरून पाहतो, त्यामुळे परनिंदेच्या विकृतीने समाजाला विळखा घातला आहे ह्या बद्दल आश्चर्य वाटत नाही. ज्या मंडळीने समाजाला दिशा द्यावयाची त्याचं वागणं हे असे आहे. 'राजा कालस्य कारणम्।' असे म्हणून त्या मंडळींना गप्प करता येत नाहीं. कारण लोकशाहीत आपणच खरे राजे. परंनिदा ही फार घातक आहे. व्यासमूनींच्या महत्वाच्या दोन वचनातील हे वचन 'पापाय पर पीडनम्।' परनिंदेचे दुष्परीणाम आपल्या दिसत नाही. It is like slow poisioing. व्यक्ती आणि समाजाच्या मनाला किड लागते. निंदेमुळे कालापव्यय होतो. शारिरीक, मानसिक शक्तीचा क्षय होतो. अनेकांची जीवने विनाकारण उध्वस्त होतात. निंदा ज्यावर होते ती व्यक्ती मानसिकरित्या हतबल होण्याची शक्यता असते. आणि निंदा करणार्याच्या मनातील सकारात्मक ऊर्जेचा साठा संपू लागतो आणि शेवटी ती व्यक्ती ही मनोरूग्ण बनण्याची शक्यता असते.

विकोपाला गेलेल्या परनिंदेवर मात करण्यासाठी उपाययोजना करावयाची असेल तर प्रथम 'आपण सारे परनिंदेचे समान रूग्ण आहोत' अशी भावना ठेवली की स्वतः पासून सुधरावयाची इच्छा निर्माण होऊ शकते. Charity begins at home. आसक्ती आणि विरक्तीच्या पलीकडे गेलेले तुकाराम महाराज देवाकडे "बालपण देगा देवा" असे मागणे मागतात. का? त्यांची वृत्ती, आचरण बालमनासारखे स्वच्छ निर्मळ झाले नव्हते का? झाले होतेच की. मग विठ्ठल माऊलीकडे त्यांनी असे मागणें का केले असावे? निवृतीच्या किंवा परमसिध्दीच्या परम टोका कडच्या प्रवासाकडे असताना त्यांनी देवाकडून बालपण मागितले. ह्याचा अर्थ त्या प्रवासातही ते आत्मपरिक्षण करीत असावे. अजूनही आत्मशुध्दी होणे आवश्यक आहे असे त्यांना जाणवत असावे. सार्या संताची चरीत्रे वाचल्यानंतर त्यांनी जे काही देवाकडे मागितले ते आपल्यासाठीच. त्यांचा प्रत्येक शब्द सुविचार. ह्याचा अर्थ हाच की आपण सार्यांनी बालकांसारखे निरागस होण्याचा प्रयत्न करणे. "जसा विचार, तसा आचार; जसा आचार ,तसा जीवनाला आकार." हे सूत्र अध्यात्मिक गुरू मांडतात. आधूनिक वैद्यकशास्त्रही हेच म्हणते. ह्याचा अर्थ हाच की विज्ञान आणि अध्यात्म ह्या दोहोंचा संगम घालावा. म्हणजे आपण षढरिपूवर आपण मात करू शकतो. 

माझ्या बहूतांश लेखामध्ये मी विज्ञानाची कास सोडली आहे असे दिसणार नाही. ह्या विश्वातील रहस्यें ही विज्ञानाच्या आधारेच सुटणार. शास्त्रज्ञही आधूनिक ऋषीमुनीच. युरोपातील प्रबोधन काळाचा आपल्या समाजावर सकारात्मक बदल झाला आहे हे ही मी मानतो.(चिज्ञपट आणि समाजमन हा लेख कृपया पहावा) विख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईनची दोन वाक्ये मी सतत लक्षात ठेवतो, ती अशी आहेत, पहीले "The most mystrious thing in this universe is the universe itself." आणि दुसरे "The immagination is more important than knowledge." म्हणजेच विश्वातील रहस्ये शोधण्याचा प्रवास अनंत आहे. तसेच आपल्या मनात उत्पन्न होणार्या नवीन कल्पनांना वार्यावर सोडू नये. कारण तशा कल्पनांतूनही ज्ञानाची निर्मीती होत असते, असेच आईन्स्टाईन साहेबांना सुचवावयाचे होते असे वाटते. पुढे जाऊन असेही म्हणता येईल की, जसे अध्यात्मात तप, ध्यान, जप, योग असे उपचार करून मनाला स्थिर करून परनिंदेची विकृती कमी करता येते, तसेच विश्वातील रहस्यें शोधण्यात रत झाले कि आपोआप परनिंदेची विकृती कमी होत जाते. ह्याला पुरावा काय? असं काय म्हणता राव, जेव्हा शास्त्रज्ञ विश्वाची रहस्ये शोधण्यात गर्क होतात तेव्हा ते आपोआप विश्वमय होतात. ते लौकीक दृष्टीने एखाद्या देशाचे नागरिक असले तरी , त्यांच्या मनात सार्या मानवी जीवनाचे कल्याणच असते. त्यांच्या मुलाखती, चरित्रे धुंडाळून पाहा. थोडक्यात काय अध्यात्म आणि विज्ञान दोन्ही विश्वाच्या वा त्या परमात्म्यावरील निष्ठेच्या परम टोकाकडे घेऊन जाणारे दोन मार्ग आहेत पण शेवटी एके ठिकाणीच मिळणार.

मित्रहो, अध्यात्मिक रित्या उन्नत होत जाणे, वा वैज्ञानिक संशोधनात रत होणे हे दोन्ही उपाय आपल्या सारख्या सामान्यजनांना पेलवणारे नाहीत. अधून मधून संत साहित्य वाचणे, विज्ञानातील गमती-जमती ऐकणे, हास्यविनोदाचे वावडे टाळणे, एखादा छंद जोपासणे, सामाजिक बांधिलकी जपणे, इत्यादी गोष्टी करता येतात आणि आपण करीतही असतो. पण गडबड कूठे होते? जेव्हा आपण एकत्र जमतो, तो एक गोंधळ ठरतो. मग सार्वजनिक उत्सवासाठी जमलो असो वा कुणाच्या घरात मंगल कार्यासाठी जमलेले असो.  When many people sit together , it becoms crowd हा आपला दोष आहे. आणि तिथेच पुन्हा अहंकार जागृत होतो आणि परनिंदा सुरू होते. म्हणून संत मडंळीनी सतत नामस्भरण करावे असा सल्ला दिला. भगवंताने गीतेत सर्वात सोपा उपाय दिला आहे ज्यावर मी मागच्या लेखात तसेच इतर लेखात ही चर्चा केलेली आहे. तो सोपा उपाय  म्हणजे  'नियतं कुरू कर्म त्वम्।' तोच अंमलात आणण्याचा प्रयत्न करू या, उद्याच्या नववर्षाच्या सुमूहूर्तावर. क्यों की किसीने कहा है " हम अपने कर्ममें इतने जुटे रहो की हमें दुसरोंकी निंदा करनेका समय ना मिले!"

आपण असे मानतो कि परमेश्वर सर्वत्र आहे. आणि जे काही आपण बोलू त्याला तो तथास्तु तथास्तु असा आशिर्वाद देत असतो. म्हणून आपण चांगले बोलावे. वाईटालाही वाईट म्हणू नये. कारण तशा प्रकारच्या उच्चारामुळे वाईटपणा वातावरणात फैलतो व कुठेतरी रूजतो आणि फोफावतो. आपल्या येथे अशी म्हण आहे की "नकट्याला म्हणू नये नकटे व धाकट्याला म्हणू नये धाकटे!". उद्या आपलं नव वर्ष आगमन करीत आहे. "प्राणीमात्रा जीवे लागे बर्या शब्दे "  हा समर्थ रामदास स्वामीच्या उपदेशाची आठवण करूनच नवे वर्षे येत असते.  गेल्या चैत्र प्रदिपदे पासून मी ब्लाॅगवर आपल्याशी संवाद साधावयास सुरूवात केली.  ह्या वर्षअखेरचा हा शेवटचा लेख आपल्या पदरात ठेवला आहे. आपण सार्यानी वेळोवेळी चांगल्या सुचना दिल्या, प्रतिक्रीया दिल्या, माझं कौतुकही केले. त्याबद्दल मी आपला सदैव ऋणी राहीन. असेच प्रोत्साहान मला देत राहा, अशी विनंती करतो. आपल्या सर्वाना तसेच आपले परिजन इष्ट-मित्रांना हिदू नववर्ष सुखाचे, समृध्दीचे जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून मी इथे विराम घेतो.
धन्यवाद !
जय योगेश्वर !

शनिवार, १० मार्च, २०१८

सेवाधर्म आणि कर्मयोग


एका मित्राकडून ७ मार्चला सकाळी शुभेच्छारूपी एक पोस्ट आली. ती अशी आहे. The most precious thing you can give someone is the gift of your time and attention. ही पोस्ट वाचल्यानंतर लागलीच लक्षात आले कि ह्यात केवळ सेवाभावाचा अर्थ अंतर्भूत नसून आपले नियत कर्म पार कसे पाडावे ह्या संबंधीचं मार्गदर्शनही दिसले. मनातील विचारांना संवादाच्या माध्यमातून वाट दाखवावी, असे वाटले म्हणून हा लेख प्रपंच. 


सेवाभावी वृत्ती ही मोक्षप्राप्ती मार्गावरील भली मोठी शिदोरी. आपण ज्यांच्या नावाने गुरू पौर्णिमा साजरी करतो त्या महर्षी व्यासांनी म्हटले आहे,
              " परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम्"! 
संपूर्ण अठरा पुराणातील ही दोन वचने महत्वपूर्ण मानली गेली आहेत. ह्याचा अर्थ परोपकार हीच मोक्षप्राप्तीची पहीली पायरी म्हणा वा कसोटी. तर  परपीडा सारखं मोठं पाप नाही. म्हणून म्हटले जाते की जर कोणाचं भलं करता येत नसेल तर निदान कूणाला पीडा देऊ नका. कोणाचं वाईट चिंतू नका. वरील पोस्ट ही पूर्णतः परोपकराची व्याख्या स्पष्ट करते. ह्यात काही शंका नाही. परोपकार कसा करता येतो, त्यासाठी कसली गरज असते, ह्या प्रश्नाचं उत्तर वरील पोस्टमध्ये आहे. दुसर्यांसाठी वेळ देणे आणि त्यांच्याकडे लक्ष देणे. हेच ते उत्तर. परंतु हा झाला शब्दशः अर्थ. ह्या पोस्टवर खोल विचार करू लागतो तेव्हा अनेक गोष्टींचा उलगडा होत जातो.


आपण जन्माला येतो तेव्हा एक निरागस बालक असतो. म्हणजेच जन्मतः आपण सत्प्रवृत्तीचे असतो. सेवाभावी वृत्ती सुध्दा जन्मतः प्रत्येकाच्या अंगी असते. आईच्या दुधातून ती आपल्या अंगी येत असते. म्हणजे ती एक नैसर्गिक बाबच. आपलं शरीर सुध्दा पंचमहाभूताचं बनलेलं असते. त्यामुळे पंचमहाभूताची सारी वैशिष्टे ही आपल्यात अंगभूत असतात. पंचमहाभूतामध्ये परस्पर सहयोग आहे. सागर जल घेतो. सुर्य( तेज, अग्नी) सागराच्या पाण्याची वाफ करतो. आकाश त्या वाफेचं गोड जलात रूपातंर करून ढगात साठविते. वायू ढगांना घुसळवितो, पर्वत-डोंगर ढगांना अडवितात, मग पाऊस पडतो. जमीन पाण्याला मुरविते, वनस्पती जल घेते. व फळं-फूले देतात, धरणीमाता अन्न देते. आपण निसर्गाला गुरू मानतो. का तर, निसर्गात सर्वत्र सेवाभावाची उदाहरणे ठासून भरलेली आहेत. नदीचं वाहणं, वृक्षानां फळं लागणं, ती फळं आपल्या खाण्यात येणं, वृक्षाची सावली, तसेच फर्निचर औषधे इत्यादी जीवनोपयोगी मिळणार्या वस्तु; मधमाशीमुळे फुलातून मिळणारी मध, मुंग्या, कोळी सारख्या छोट्या जीवातून मिळणारा शिस्तीचा धडा आणि परभवामुळे खचून न जाण्याची मिळणारी प्रेरणा; वेगवेगळ्या प्राण्यापासून मिळणारे दुध, वाहनासाठी त्यांचा होणारा उपयोग, त्यांच गोबर, लोकर, त्वचा, इत्यादीचा व्यवहारी जीवनात होणारा उपयोग; आकाश नावाचं पंचमहाभूत, जेथून आजच्या माहीती व तंत्रज्ञानाच्या प्रसारणासाठी मिळणार्या संप्रेरणा; अनेक रंगी बेरंगी पक्षी, फूलं, फळं ह्यातून होणारा व्यवहारीक तसेच सात्वीक लाभ; समुद्रातून मिळणारे तेल, मासे, करता येणारी वाहतूक; धरणी मातेकडून मिळणारा आधार, हवे असलेली पीकं, कडधान्ये, धातू-खनिजे; जागोजागी निसर्गात ठासून भरलेलं नादब्रह्म आणि प्राणवायू. हे सारं काय दर्शवित आहे. ही निसर्गाची कृपाच. मानवाने सृष्टी निर्माण केलेली नाही हे तर स्पष्ट आहे. सर्वात बुध्दीमान प्राणी मानव आहे; ईश्वराची सर्वोत्तम निर्मीती मानव आहे. मग आपण निसर्गाला काय देत असतो? काहीच नाही. निसर्गाला देण्यासारखं आपल्यापाशी आहे तरी काय? आपण निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि निसर्गाला आपल्या लालसेसाठी ओरबाडू नये, एवढीच इच्छा निसर्गाची असते. महात्मा गांधीनी म्हटले आहे, "हमारी सब जरूरते पूरी करनेकी क्षमता धरती माॅ के पास निश्चीत है लेकीन लालच नही"! आपल्या अवती-भोवतीच्या निसर्गात जसा सेवाभाव दिसून येतो, तसाच तो आपल्या अंगी असतोच. परंतु आपल्याला त्याचा विसर पडतो. म्हणूनच वेळोवेळी साधु-संत जन्मास येत असावेत. सेवाभाव वा सेवावृत्तीची जोपासना संतमंडळी निसर्गाच्या सानिध्यातूनच करीत असतात. सार्या चांगल्या-वाईट प्रेरणांचा स्त्रोत आकाश नावाचं पंचमहभूतच की. साधु-संताकडे चांगल्या प्रेरणा घेण्याची शक्ती असते. आपल्यापाशीही असावी पण आपल्याला त्याची जाणीव होत नाही किंवा आपल्याला तिचा वापर करता येत नाही. म्हणून आपण सारे सामान्यजन. तर "जगाच्या कल्याणासाठी संताच्या विभूती" अशी संताची ओळख. संतांनी आपल्याला संयम, सदाचार, सहकार, सौजन्यशीलता, संवेदनशीलता, परोपकार,  सत्य, अंहिसा, रंजले-गांजल्यांची सेवा,  श्रमप्रतिष्ठा, भूतदया,    इत्यादी जीवनमूल्ये छोट्या छोट्या दृष्टांता द्वारे शिकविली. त्यावरून त्यांना चराचरात सद्भाव दिसला; ईश्वर दिसला. त्यामुळे आपल्या मनात 'भूदेव संतासी सदा नमावे' अशी भावना रूजते. तेथूनच आपल्यामध्ये  सेवाभावी  वृत्तीची जागृती होत असते. ती जागृती सतत टिकविण्यासाठी निस्सीम भावनेने आपले कर्म पार पाडणे हेच आवश्यक असते. ह्यावर आपण पुढे चर्चा करू या. सेवाधर्म वा सेवाभाव ह्याची व्याप्ती फार मोठी असते. आपण जे काही कमावितो ते सारं निसर्गाच्या साह्याने. निसर्ग आपल्याकडून काही मागत नसला तरी दुष्काळ, अतिवृष्टी, भूकंप, विविध रोगांची साथ अशी संकटे उभी करतोच की! हा आपल्यासाठी इशाराच नाही का? प्रदुषण थांबविणे, पर्यावरणाची कास धरणे, अती उपभोगता टाळणे, वृक्षारोपण करणे, संयमीत जीवनशैली ठेवणे, वन्यप्राण्यांची तसेच पाळीव प्राण्यांची नीगा राखणे, पक्ष्यांच्या स्वैर विहारावर गदा आणू न देणे, कुठल्याही पक्षी वा प्राण्याची शिकार न करणे, निसर्गाचं संतूलन बिघडू न देणे इत्यादी कार्ये करणे ही निसर्गाप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता होय आणि अंती आपल्या हातून झालेल्या सेवाभावाचं विलोभनीय दर्शनच. वरील पोस्टच्या भाषेत म्हणावयाचे असल्यास Precious gift of time and attention to our beloved Mother Earth. आपल्या धरणी मातेसाठी काढलेला वेळ आणि घेतलेली काळजीच नव्हे का?


मानव हा ही एक निसर्गाचा घटक आहे. म्हणून जे बांधव जन्मतः अपंग आहेत, त्याच्यांकडे लक्ष देणं हे आपले कर्तव्य आहेच. Attention ह्या शब्दाचा अर्थ केवळ लक्ष देणे इतकाच नसून काळजी घेणे असाही आहे. आपण जे काही कमावितो, खातो, त्यातील काही हिस्सा गोरगरीबांना देणे म्हणजे एक प्रकारे यज्ञच होय. जे शिक्षक आहेत त्यांनी विद्यादान करावे, जे धनवान आहेत त्यांनी धनरूपाने मदत करावी. जे वैद्यकीय व्यवसायात आहेत,त्यांनी औषधपोचार करावेत. जे व्यापारी आहेत त्यांनी आपल्याकडील वस्तू रूपाने दान करावे. मग कपडे असो, वा किराणा माल. दान कुठल्याही प्रकारे करता येते. रूग्णांची सेवा एक प्रकारे दानच होय. डाॅ बाबा आमटेंनी कुष्ठरोगांसाठी आपलं जीवन सार्थकी लावले. नानाजी देशमुखांनी साठी ओलाडंली आणि राजकारणातूंन निवृत्ती घेऊन अंत्यदयोच्या कामाला वाहून घेतले. गिरीश प्रभूणे भटक्या जाती-जमातीतील लोकांसाठी शाळा चालवितात. सिंथुताई सकपाळ अनाथ मुलांना आधार देत आहेत. कोणी वृध्दाश्रम चालवितात. कोणी अन्नदान करतात. डाॅ अभय बंग समाजाला व्यसनमूक्तीचं महत्व पटवून देत आहेत.स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पुज्यनीय पांडुरंगशास्त्री आठवलेनी भक्तीयोगाची दिक्षा देऊन समाजातील व्यसनाधिनता कमी केली तसेच पर्यावरणाच्या कार्यात योगदान दिले. विश्व हिंदू परिषदेने संस्कार, साक्षर, आणि स्वावलंबन ह्या त्रिसूत्रावर वनवासी बांधवासाठी कल्याण आश्रम उभे करून त्यांच्या जीवनात आमृलाग्र बदल घडविला आहे. १९२५ साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात सेवाभावी संस्था ऊभारून समाजसेवेचं देशभर जाळं विणलयं. शिवाय भूकंप, पूर, अपघात इत्यादी राष्ट्रीय आपत्तीत संघाचे स्वयंसेवक मदतीसाठी धावून जातात. आपल्या देशाच्या प्रत्येक राज्यात, गावा-गावात  असलेले देव-देवतांच्या देवालयाचे तसेच विविध संप्रदायाचे ट्रस्ट,  गोर-गरीब लोकांसाठी शिक्षण, संस्कार, रूग्णसेवा, अन्नदान, सहकार पर्यावरण सारखे कार्यक्रम वेळोवेळी राबवित आहेत. अनेक भक्तगण अशा सेवासाठी काही मानधन न घेता राबत असतात. ह्या सार्या  संस्थांनी सेवाधर्म हेच कर्म मानलं तेही भक्तीयोगाची जोड देऊन. म्हणून समाजात सद्भाव टिकुन आहे.आजकाल मृत्यु पश्चात देहदान करण्यासंबंधीची चळवळ जोर धरू लागली आहे. ही गोष्ट तशी आपल्या संस्कृतीशी मिळती-जुळती आहे. आपण ऐकलंय वैदिक काळात दधीची ऋषीनी असुरांचा नायनाट करण्यासाठी देवांना आपल्या अस्थी दिल्या होत्या. मृत्यूनंतर आपल्या देहाला अग्नीऐवजी नदी वा समुद्रात आपला पार्थीव देह सोडावा जेणेकरून जलाशयामधील जीवांना अन्न मिळावे अशी आगाऊ सुचना नाशिक येथील पुजनीय गणेशबाबांनी दिली होती आणि ती आज्ञा त्यांच्या शिष्यांनी पाळली ही तर अलीकडची गोष्ट. आत्मा अमर असतो. शरीर हे वस्त्राप्रमाणे आहे असे भगवंतानी गीतेत सांगितले आहे. नेत्रदान, रक्तदान, किडनीदान इत्यादी प्रकाराच्या दानामुळे अनेक नेत्रहीनांना दृष्टी प्राप्त होते. रक्ताच्या पुरवठ्यामूळे अनेक रूग्णांचा जीव वाचतो. किडनी दानातूनही रूग्णाला जीवदान मिळते. 'मरावे परी किर्तीरूपी उरावे' ह्या वचनाला जागं राहण्याची संधी अवयव वा देहदानानेही प्राप्त होऊ शकते. ज्याला आपण काळ म्हणतो, त्याचं अस्तित्व अनादि कालापासून आहे. जेव्हा ह्या सृष्टीत म्हणा वा विश्वात काहीच नव्हते तेव्हापासून काळ अस्तित्वात आहे. तो आपल्या मृत्युसोबतही असतो. जर त्याचं व्यवहारातील नाव वेळ म्हणजे Time हेच असेल तर आपल्या देहदानाची अंमलबजावणी होताना आपण वरील पोस्टमधील most precious gift is to give time हे तंतोतंत पाळले असेच समजावे. देहदान वा अवयवदान ह्यामूळे कोणा रूग्णाचं आयुष्य वाढतं त्याअर्थी त्याला जीवन जगण्यासाठी दिलेला अधिक वेळ. ह्याहून अधिक स्पष्ट कुठला आणि काय अर्थ निघू शकतो?


आता आपण व्यवहारीक जीवनात वरील पोस्टचा अर्थ कसा लागतो, हे पाहू या. आपल्या धार्मीक मान्यतानुसार जीवनात ऐहीक उन्नतीला त्याज्य मानलेलं नाही. सेवाभाव मनात असला तरी तसा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपल्या मनामधील आसक्ती पुर्णपणे नाहीशी होणे आवश्यक असते. सर्वसामान्यांना अशी विरक्ती प्राप्त करणे हे काम आवाक्याच्या पलीकडचे असते. आणि तशी अपेक्षा आपल्याकडून संतानींही केलेली नाही. समर्थ रामदास स्वामीनी म्हटले आहे ' प्रपंच ते भाग्य, परमार्थ ते वैरागय'! संन्यास ही धर्मातील एक व्यवस्था आहे. धर्माचा पूर्ण अर्थ म्हणजे संन्यास नव्हे. भगवद् गीतेत श्रीकृष्णाने कर्मयोगाची महतीही विषद केली आहे. आणि कर्मयोगाद्वारे आपण परमसिध्दीला पोहचू शकतो अशी खात्रीही भगवंतानी दिली आहे. 


Time is one of the natural resorces man has got from the god. एक प्रकारचे नैसर्गीक संसाधन म्हणजे वेळ. आपल्याकडे काहीतरी असल्या शिवाय आपण दान करू शकत नाही. सर्वात प्रथम निसर्गाने आपल्याला दिलेली देणगी म्हणजे मानव म्हणून जन्म. दुसरी देणगी म्हणजे वेळ. तिसरी गोष्ट म्हणजे बुध्दी. चौथी गोष्ट म्हणजे कष्ट करण्यासाठी शरीररूपाने दिलेली शक्ती. देव आपल्याला सतत सांगत आहे. मी तुला दिले आहेत दोन कर; तु त्याचा वापर करून काहीतरी कर ज्यामूळे तुझी किर्ती वाढेल. प्रथम आपण वैद्यकीय व्यवसायिकाचं उदाहरण पाहू या. डाॅक्टरने आपल्या दवाखान्यात यावे आणि आपल्या पेंशटसाठी वेळ देणे गरजेचं आहे. डाॅक्टर दवाखान्यात बसलेच नाही तर तो अक्षम्य गुन्हाच म्हणावा. वरील पोस्ट मध्ये म्हटलं आहे कि to give the gift of time and attention. ह्यातील attention ह्या शब्दाचा अर्थ काळजी घेणे तसेच ऐकणे वा लक्ष देणे असाही आहे. पेंशट काय सांगतोय हे डाॅक्टरानी काळजीपूर्वक ऐकावयास हवे. नाहीतर पेशंटच्या रोगासबंधी निदान कसे लागेल? निदान लागण्यासाठी पेशंटची नाडी, पोट, छाती तपासणे आवश्यक असते. त्यानंतर डाॅक्टराने औषध देणं आवश्यक आहे. जितका जास्त वेळ डाॅक्टर आपल्या पेशंटना देईल तितका पेशंटचा डाॅक्टरवरील विश्वास वाढतो. पेशंटचा विश्वास वाढत जातो तेव्हा पेशंटची आजारातून बरे होण्याची शक्यता अधिक असते. हळहळू त्या डाॅक्टरकडे गर्दी वाढत जाते; मग आणखिन वेळ पेशंटसाठी वाढवावा लागतो. हळूहळू डाॅक्टरचा नावलोकीक वाढत जातो. डाॅक्टर असो वा वकील. व्यापारी असो वा विम्याचा एजंट, शेतकरी असो वा शेतमजूर, शिक्षक असो वा प्राध्यापक, वा इंजिनियर , उद्योगपती असो वा नेता प्रत्येकाला आपआपल्या व्यवसायासाठी तसेच आपल्या ग्राहकाला वेळ तसेच लक्ष देणं आवश्यक असते. Customer is always right, हा आजच्या आर्थिक जगतातील महत्वाचा सिंध्दांत. महात्मा गांधीजींनीही ' ग्राहक हाच मालक' ही भावना अंतःकरणात सतत ठेवून त्याच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचा उपदेश दिला आहे. हा ही अर्थ वरील पोस्ट मध्ये अंतर्भूत आहे. ह्या संदर्भात Attention म्हणजे लक्ष देऊन ग्राहकाचं म्हणणं ऐकून घेणे आवश्यक आहे. त्यावरूनच त्याला काय हवयं हे जाणून घेण्याची आपली क्षमता वाढते. विक्री व्यवसायात आज Service after Sales ही कल्पना चांगलं मूळ धरताना दिसतेय. ह्याचं कारण वरील पोस्टमध्ये अंतर्भूत असलेलं सेवाभाव वा सेवाधर्म हे शाश्वत सत्य. संशोधकालाही फार मोठा वेळ आपल्या कार्यात द्यावा लागतो. सर्वच शास्त्रज्ञांनी अहोरात्र वेळ देऊन कष्ट करून विविध क्षेत्रात अमोल कार्य केले आहे. आणि त्यांच्या शोधकार्यामूळे मानवी जीवन सुकर झाले. हा ही एक प्रकारचा सेवाभावच की. डाॅ एलीयास ह्यूम नावाच्या शास्त्रज्ञाला नाताळ सणापूर्वी शिंपी असणार्या त्यांच्या पत्नीच्या कामाचा डोंगर पाहून काळजी वाटत होती. अनेकांचे कपडे हाताने शिवायचे आणि नाताळापूर्वी ग्राहकाला द्यावे लागत होते. बस संशोधन सुरू केले. दिवस-रात्र कष्ट घेतले आणि कपडे शिवण्याची मशीन तयार केली. हा शोध मानव जातीवर उपकारच नव्हे का!


कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी वेळ, प्रयत्न आणि चिकाटी आवश्यक असतात. म्हणजेच आपलं नियत कर्म समरस होऊन करावे. म्हणजेच कुठलाही हलगर्जीपणा नको; ना वेळेचा(time), ना लक्ष (attention) विचलीत करण्याचा. भगवंतांनी गीतेत सांगितले आहे, 
           न च सन्यासनात एवं सिध्दिम् समधिगच्छति! 
कर्माचा संन्यास किंवा त्याग केल्याने सिध्दि प्राप्त होत नसते. 


एक गृहस्थ आपल्या आर्थिक विवंचनेसंबंधी उपाय मागण्यासाठी एका अध्यात्मिक गुरूकडे जातो. गुरूने सारं काही ऐकलं आणि त्याला उजव्या हाताच्या अनामिकेत एक अंगठी घालायला दिली आणि सांगितले कि,  "ह्या अंगठीत एक यंत्र आहे. त्याला रोज सकाळी, दुपारी, आणि संध्याकाळी आपल्या घराचा, शेताचा आणि मळ्याचा प्रत्येक कोपरा दाखवत जा. एक महीन्यानंतर बघ. तुझं दैन्य निघून गेलेलं दिसेल". गुरूच्या आज्ञेनुसार त्या गृहस्थाने त्या यंत्राला कोपरा दाखविण्यास सुरूवात केली. पहील्या दिवशीच त्याला आपला मुलगा खोलीत अभ्यास करण्याऐवजी सिनेमाची गाणी ऐकत बसलेला दिसला. वडीलांना पाहून त्याने अभ्यास करावयास सुरूवात केली. मळ्यात गेल्यानंतर पाहतो तर, तो मळ्याचा रखवालदार भाजी चोरून विकत आहे. म्हशी आणि बैलासमोर कडबा दिसला नाही. शेतात दुसर्यांची गुरे शिरलेली दिसली. नोकर वर्ग कामाच्या वेळी खुशाल झाडाखाली गप्पा मारताना दिसले. मालकाला पाहून त्यांना नवल वाटले. ते उठले आणि कामाला लागले. पण मालकाचा रोज तिन्ही वेळी संचार होऊ लागला. त्याच बरोबर मुलगा अभ्यासाला लागला. मळ्यातील चोरी बंद झाली. दुसर्यांची गुरे शेतात दिसेनासी झाली. पिकाची नासाडी थांबली. नोकरांच्या गप्पा मारणे बंद झाले. महीन्याभरात त्याची आर्थिक स्थिती सुधारली. गुरूजवळ येऊन त्याने सारा वृतांत सांगितला. यंत्राबद्दल गुरूचे आभार मानले. गुरू म्हणाले ती अंगठी साधी आहे. त्यात कुठलेही यंत्र नाही. ईश्वराने तुला time and attention नावाची दोन यंत्रे दिली आहेत, ती तू उपयोगात आणली. म्हणून तुझी स्थिती सुधारली. तात्पर्य हेच की आपल्या कामासाठी वेळ देणे आणि कामावर लक्ष ठेवणे हाच जीवन जगण्याचा मंत्र, तंत्र वा जप आहे. भगवंतानी गीतेत सांगितले आहे, 
             नियतं कुरू कर्म त्वं कर्म ज्यायो अकर्मणः! 
             शरीरयात्रापी च न ते न प्रसिध्येत् अकर्मणः!! 
नियतीने सोपविलेले कर्म वा कर्तव्याचे पालन कर. कारण कर्म करणे निश्चितच निष्क्रियतेपेक्षा श्रेष्ठ असते. निष्क्रियतेमुळे आपला निर्वाह ही होऊ शकणार नाही. निष्क्रियतेने पृथ्वीवर भार होणे हा एकप्रकारे अधर्म होय.


एक भिकारी रेल्वेच्या डब्यात लोकाकडून भीक्षा मागत असे. कोणी पैसे देत असत तर कोणी देत नसत. परंतु एक रूबाबदार कपड्यातील व्यापारी भिक्षा देत नसे पण त्याला सांगत असे कि, तू मला काहीतरी दे की मी तुला भीक्षा देईन. त्या भिकार्याच्या मनात विचार आला, खरेच आपण काही द्यायला हवं. दुसर्या दिवसापासून त्याने त्या रूबाबदार श्रीमंत व्यापाराला फूल देण्यास सुरवात केली. त्या व्यापाराने पैसे द्यायला सुरवात केली. हळूहळू त्या भिकार्याने गाडीतील सर्वच प्रवाशांना फुले देण्यास सुरवात केली. आता त्या भिकार्याचं भिक्षेतील उत्पन्न वाढू लागलं. दिडएक वर्षानंतर त्या गाडीतून प्रवास करताना एके दिवशी त्या व्यापाराच्या शेजारी दुसर्या स्टेशनवर एक श्रीमंत प्रवासी बसला. त्याने व्यापार्याला नमस्कार केला आणि म्हणाला, मला ओळखलं का? त्या व्यापार्याने म्हटलं, नाही बूवा. मग त्या प्रवाशाने म्हटलं अहो, मी तुमच्या बरोबर ह्या गाडीतून प्रवास करीत असे. त्या व्यापाराने आठविण्याचा प्रयत्न केला पण काही ओळख पटली नाही. नंतर त्या प्रवाशाने  व्यापाराला म्हटले आज मी एक व्यापारी झालो आहे. दुसर्या ठीकाणी फुलांची आर्डरच्या निमित्ताने जात आहे. ह्याच गाडीत ह्याच डब्यात तुमच्या कडे भीक्षा मागणारा मी भिकारी. काहीतरी दिल्याशिवाय काही मागायचं नाही हा तुमचा सल्ला मी मानला आणि माझं जीवन बदललं. व्यापार्याला ओळख पटली. त्या व्यापार्याने त्याचं अभिनंदन केल. त्या प्रवाशाने व्यापार्याचे आभार मानले आणि तो दुसर्या स्टेशनवर उतरता झाला. सेवाधर्मातून झालेला एक कर्मयोगीचं हे अस्सल उदाहरण. कोणाकडे जाताना रिक्त हाताने जाऊ नये असे म्हटले जाते त्यात तथ्य आहे. जसे द्याल आणि जे काही द्याल त्यापेक्षा कितीतरी पटीने ते तुमच्याकडे  परत येत असते. परोपकार कराल, तर कधी दुःखी होणार नाही. दुसर्यांना पीडा द्याल तर पीडाच तुमच्याकडे परत येणार हाच निसर्गाचा वा नियतीचा नियम आहे. 


तुम्ही शेतकरी असो वा व्यापारी, उद्योजक असो वा व्यवसायिक, कामगार असो वा कर्मचारी. कलाकार असो वा गायक. जो अविरतपणे काम करतो तोच यशस्वी होतो. हा तर निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक क्षेत्रातील यशस्वी माणसांची यादी पाहीली, तर आपल्या लक्षात येते कि त्यानांही दिवसाचे चोवीस तासच मिळतात. तरीही ते यशस्वी कसे होतात? उत्तर सरळ आहे. वक्तशीरपणा, मेहनतीत कमतरता न ठेवणे, आपल्या कामावरची श्रध्दा,आपल्या क्षेत्रासंबंधी अधिकाधिक ज्ञान,आणि कुशलता मिळविण्यासाठी जाणकारांशी तसेच जे आपल्या व्यवसायावर अंवलंबून आहेत अशा लोकांशी सततचा संपर्क इत्यादी गुणांच्या आधारेच ते यशाच्या शिखरावर पोहचलेले असतात.


अचूक संधी साधणे ही एक यश प्राप्त करण्यासाठी पहीली पायरी आहे. Opportunity means a course of action which is immediately possible. मुखातून एखादा अपशब्द बाहेर पडला तर मागे घेता नाही. हे खरे, पण माफी मागता येते. परंतु वाया घालविलेला वेळ किंवा संधी परत येत नाही. आळसामुळे वेळेचा अपवय्य करणे हा ही एक भ्रष्टाचारच होय. कारण Time is money हे आपण जाणतोच. एका हिन्दी सिनेमात कादरखानच्या मुखी एक डायलाॅग आहे, ' जो वक्तका फिक्र नही करता, वक्त भी उसका फिक्र नही करता है! कवीवर्य माधव ज्युलीयन म्हणतात 'थांबला तो संपला'.ईमर्सन म्हणतात "Run with the time'. गती हाच आजच्या काळाचा मंत्र आहे. गती शिवाय प्रगती नाही हेच खरे. रिकामी पिशवी उभी राहात नाही. एकदा का आपली पिशवी फलाने भरली की आपोआप आपली वृत्ती तामसाकडून राजसाकडे आणि राजसाकडून सात्वीकतेकडे प्रवास करू लागते. शेवटी आपल्यात जन्मतः असलेला सद्भाव आणि सेवाभाव जागा होतो. व्यवहारी जीवन जगत असतांना एखादा व्यवसाय उभा केला, वृंदिगत केला, आणि अनेकांच्या हातांना आपण काम दिले तर ते ही एक प्रकारे दानच होय. भले त्याला कोणी स्वार्थातून परमार्थ साधला असे म्हटले तरी. 


प्रत्येक व्यक्तीत ज्ञान, शौर्य, व्यापार, आणि सेवाभाव जन्मतःच असतात. प्रत्येक व्यक्ती निर्माता तसेच ग्राहक ही असते. डाॅक्टर मंडळीचा व्यवसाय हा सेवा प्रकारात मोडतो. तरी ही मंडळी औषध निर्मीती करणार्या कंपनीचे ग्राहक असतात. तर औषधे विकणारी मंडळी कंपनीचे सेवक असतात. औषधे निर्माण करणारी मंडळी आपल्या आजारावर इलाजासाठी डाॅक्टराकडे जातात तेव्हा ती मंडळी डाॅक्टराचे ग्राहक बनतात. एकदंरीत काय प्रत्येकजण कर्म करीत असता सेवा ही करीत असतो. शेतकरी पीकं काढतो; बाग फुलवितो, फळं विकतो. हे कर्म आणि सेवाधर्मही. तोच शेतकरी स्वतःच्या शेतातील पिकं आणि फळापासून बनविलेल्या बिस्कीटाची, औषधाची तसेच फलरसाची खरेदी करतो. औषधे, फलरस,बिस्किटे निर्मीती करणार्या कंपनीचं हे कर्म आणि सेवाभावही. मूंगफली शेतकरी पिकवितो.तर खाद्यतेलाची निर्मीती उद्योजक करीत असतो. पुन्हा खाद्यतेलाची खरेदी शेतकरी करीत असतो तेव्हा शेतकरी ग्राहक बनतो हे आणखीन एक उदाहरण. ह्यालाच कोणी जगरहाटी म्हणतात, तर कोणी निसर्गाचं चक्र. वस्तूतः ते कालचक्रच. मानव एकटा आपल्या सर्व गरजांची पूर्ती करू शकत नाही, म्हणूनच समाजाची निर्मीती झाली आहे. जो पर्यंत मानवी जीवन ह्या धरतीवर अस्तित्वात आहे तो पर्यंत सहजीवनाला महत्व राहणार. त्या सहजीवनाचं अध्यात्मीक पातळीवरचं नाव म्हणजे सेवाधर्म. ह्याचा अर्थ हाच की सेवा आणि कर्म ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. निस्सीम भक्तीने नियत कर्म पार पाडीत असता आपल्या हातून सेवाधर्म घडत असतोच की. कर्म करताना वेळ वायफळ रित्या दवडणे म्हणजेच आचरण धर्माची अवहेलना होय. त्यामूळेच भगवंताने गीतेत म्हटले आहे, 
            स्वे स्वे कर्माणी अभिरतः संसिध्दी लभते नरः!
आपआपल्या स्वभावजन्य गुणाप्रमाणे प्राप्त झालेल्या कर्मात जी व्यक्ती नित्य रत असते, त्याला परमसिध्दि प्राप्त होत असते. सारांशरूपाने असेच म्हणता येईल की Time and attention both are precious. आणि ह्या दोन्हीचा सदुपयोग हे दान. म्हणजेच निस्सीम कर्मयोगाचं फल. 

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...